मंगळवार, २४ जून, २००८

पाऊस आठवणीतला !

पावसाशी गट्टी कधी जमली हे पण आता आठवत नाही एवढे जुने झाले आहे ! जुलै मधल्या जन्मामुळे असेल, पण जेव्हा जेव्हा शक्य झाले तेव्हा तेव्हा प्रत्येक पावसात अगदी चिंब भिजलो आहे. 'चिंब' आणि 'अंग झिम्माड झालं' या शब्दात एक अनोखा ओलावा आहे जो मला नेहमीच मोहरून टाकतो. पोटापाण्यासाठी ईतर उद्योग करणे भाग आहे, नाहीतर मी विरघळून जाईपर्यंत पावसात भीजत राहीन! कामावर जाताना भीजता येत नाही पण घरी परतताना पाउस असेल तर भिजणार्या गोष्टी स्कूटरच्या डीकीत टाकून 'चिंब' भिजूनच घरी जातो. बायको टॉवेल घेउनच दार उघडते ! ट्रेक आणि पाउस हा योग तर मी साधतोच, आणि पाउस पण दगा देत नाही कधी !


पण याच मित्राचे रौद्र रूप अनुभवायला मिळाले दोन वर्षापुर्वी, २६ जुलैला ! दिवसभर पावसाने अगदी उभा दावा मांडला होता. लोकलने घरी निघालो पण वडाळ्याच्या पुढे जाउ शकलो नाही. शेवटी वडाळ्याला कॉलनीत मित्राच्या घरी आश्रय घ्यावा लागला. त्या आधी बायकोला फोन करून सूखरूप आहे, दोन दिवस घरी नाही आलो तरी काळजी करू नको असे सांगून टाकले होते. दूसर्या दिवशी सकाळी दादरला आलो तर पनवेल साठी बस सेवा अजून बंदच होती, लोकल बंद होत्याच तरी दादर स्टेशनात गेल्यावर v.t. ला जाणारी लोकल मिळाली. कोणाच्या घरी आश्रय घेण्यापेक्षा कार्यालय बरे म्हणून परत कार्यालयात गेलो. अनेक सहकारी अडकून पडले होते. त्यांच्या चेहर्यावर ताण स्पष्ट दिसत होता. मुंबईच्या उपनगरात पावसाने तांडवच मांडले होते. अनेक अफवा उठत होत्या आणि मोबाईल पण काम करत नव्हते. मी सूखरूप असलो तरी आता घरच्यांची काळजी वाटू लागली. त्या दिवशी भावाचा वाढदिवस होता. मोठ्या प्रयासाने त्याला फोन लागला तेव्हा कळले की लोकलमधेच त्याने रात्र काढली होती. लोकल च्या फूटबोर्डला पाणी लागले होते !


नंतर एकाने खबर दिली की गाढी धरणाचे पाणी सोडावे लागल्याने पनवेल पुराच्या पाण्यात बूडून गेले आहे ! दूसर्या दिवशी घर गाठायचेच अशा निर्धाराने पहाटेच बाहेर पडलो. v.t - ठाणे - वाशी असा रडत खरडॅत प्रवास करीत साधारण १२ वाजता पनवेलला पोचलो. लख्ख उन पडले होते. स्टेशन परीसरात तर कालच्या प्रकोपाचा काहीही प्रत्यय येत नव्हता. स्कूटर वाहून गेली असेल असे वाटत असताना ती पण 'जैसे थे' होती. मुख्य रस्त्यावरचे दृष्य मात्र मन विदीर्ण करणारे होते. सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले होते. गुढग्याएवढ्या चिखलात लोक असहायपणे बसले होते. मुख्य रस्त्यावरचे दृष्य मात्र मन विदीर्ण करणारे होते. सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले होते. गुढग्याएवढ्या चिखलात लोक असहायपणे बसले होते. परत आश्चर्याचा धक्का बसला , आमच्या भागात प्रकोपाच्या कोणत्याही खुणा नव्हत्या ! जरा हायसे वाटले, पावसाने निदान आपल्या दोस्तीचा मान राखला तर !


पण घरी गेलो आणि-- दार उघडेच होते- वाटले मुले भोSSक करणार असतील- पण घरात शिरताच जाणवली भयाण शांतता, आधी कधीही न अनुभवलेली-- दोन्ही बेडरूमच्या दाराला कड्या-- काय बरे आक्रीत घडले असेल ?-- मन घट्ट करून दार उघडले-- आत काणीच नव्हते-- मग दूसरी बेडरूम उघडली -- कोणी नाही -- ही कसली थट्टा ?-- बाथरूम मधून कोणीतरी दारावर थापा मारत होते-- पाठोपाठ हुंदक्यांचा आवाज-- आता मात्र माझा धीर खचला -- थरथरत्या हाताने कडी उघडली -- आत प्रसाद,प्रियाका-- भीतीने थिजून गेलेले -- रडतच मला बिलगले-- आई कोठे आहे ? ती आपल्याला सोडून गेली -- परत नाही येणार-- आता मात्र मी --- काही भांडण नाही -- अशी अचानक -- मी पार कावराबावरा झालो-- मुलांना धीर दिला-- काळजी करू नका, मी तिला आणतो परत-- दाराकडे आलो तर समोर ही !


काय पोरकटपणा चाललाय --?????सकाळपासून मुलांनी नुसता उच्छाद मांडला होता. दोन दिवस माझा पत्ता नव्हता, ही चा संयम संपला, मुलांना बसा भांडत, मीच जाते घर सोडून असे म्हणून दोघाना बाथरूममधे कोंडून ही घराबाहेर पडली होती. नेमका त्याच वेळी मी घरात प्रवेश केला होता अणि थरार अनुभवला होता ! त्या प्रलयी पावसाने मला वेगळ्याच भावविश्वाची सफर घडवून आणली होती !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: