रविवार, २९ मे, २०११

भारतरत्न कोण ?

देशासाठी सर्वोच्च त्याग करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे व अशा गौरविलेल्या व्यक्तींचे सरासरी वय नक्कीच ६५ च्या वर असेल.. आतापर्यंत समाज सेवा, कला, साहित्य, विज्ञान व तंत्रज्ञान, कारखानदारी ही क्षेत्रे व सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला गेला आहे. राजीव गांधी व एम.जी. रामचंद्रन ही दोन नावे वगळली तर हा सन्मान ज्यांना दिला गेला त्याच्या योग्यतेबद्द्ल कोणताही वाद नाही. अर्थात योग्यता असूनसुद्धा निव्वळ दळभद्री राजकारणामुळे स्वा. सावरकरांना हा पुरस्कार दिला गेला नाही याची बोच पुढची अनेक वर्षे सलत राहणार आहेच. कोणत्याही क्रिडापटुला या पुरस्काराने गौरविले गेलेले नाही. किंबुहना तसे कोणालाही सचिनने नाव या पुरस्कारासाठी घेतले जावू लागले तो पर्यंत वाटलेही नव्हते. पेपरात आलेल्या बातमीप्रमाणे या पुरस्काराच्या मानकात क्रिडा हे क्षेत्रच नसल्याने हा मान कोणाही क्रिडापटूला देताच येणार नाही ! अर्थात यात काहीच तथ्य नाही, कला या सदरात खेळ धरायला काहीच हरकत नाही. क्रिडापटूला हा पुरस्कार द्यायचा झाला तर अगदी ध्यानचंद , सुनील गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे , पी.टी. उषा, मिल्खा सिंग व विश्वनाथन आनंद यांना डावलून तो थेट सचिनला देणे हास्यास्पद ठरेल.

खेळाडू , जास्त करून क्रिकेटपटू असे काय करतो की त्याला या सर्वोच्च पुरस्काराने गौरवावे ? धोंडो केशव कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, खान अब्दुल गफार खान, विश्वेश्वरय्या , जे.आर.डी. टाटा यांच्या रांगेत सचिनला बसवायची नुसती कल्पना सुद्धा करवत नाही. व्रत आणि व्यवसात यात निश्चित फरक आहे ! डोळसपणे हे केल्यास सचिन या पुरस्कारासाठी अगदीच अपात्र आहे.
जो खेळ उणेपुरे आठ देश खेळतात तो जागतिक समजला जाणे हेच बावळटपणाचे आहे ! देशासाठी खेळण्यापेक्षा पैशासाठी खेळायला सचिनने नेहमीच प्राधान्य दिले आहे. अगदी हल्लीच आयपीएलचा तमाशा खेळून झाल्यावर विश्रांती हवी म्हणून त्याने विंडीज दौर्याला कलटी मारली आहे. अर्थात भारतीय क्रिकेट संघाला टीम इंडीया म्हणणे हेच मुर्खपणाचे आहे. भारतातल्या क्रिकेटवर १०० % नियंत्रण बीसीसीआय या खाजगी संस्थेचे आहे . भारत सरकारचे या संस्थेवर अगदी काडीचेही नियंत्रण नाही. भारतातले क्रिकेटवेड व्यवस्थित एनकॅश करून या संस्थेने बख्खळ पैसा कमविला आहे खेळाडूंनाही पैशाने न्हाऊ घातले आहे. या क्षेत्रात आपलीच एकाधिकारशाही रहावी म्हणून प्रतिस्पर्धी संस्थेचा कसा काटा काढला हे सर्वज्ञातच आहे. क्रिकेटमध्ये पैशाचा महापूर व बाकी देशी खेळांची परवड सुरू आहेच. भारतात क्रिकेटने बारसे धरले आहे ते त्यातल्या निखळ पैशामुळे . देशासाठी हातात बंदूक घेणारे निधडे तरूण , तगड्या पगाराच्या खाजगी नोकरीवर लाथ मारून सरकारी सेवा पत्करणारे , खाजगी प्रॅक्टीसचा मोह टाळून एखाद्या ठार खेड्यात लोकसेवेचे व्रत स्वीकारणारे , लोकांनी दगड मारले तरी स्त्री शिक्षणासाठी हयात वेचणारे, साठ वर्षापुर्वी कुटूंब नियोजनाचा प्रसार करणारे एका बाजूला व पैसा मिळतो म्हणून हातात बॅट धरणारे व त्यात चालणार्या बीसीसीआय पुरस्कृत गैरप्रकारावर मौन पाळणारे, मनमानीवर चकार शब्द न उच्चारणारे एका बाजूला – कशी वाटते तुलना ? कलेच्या , साहीत्याच्या, समाजसेवेच्या क्षेत्रात पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींनी त्यासाठी आपली हयात घातली आहे, सचिनचे तर तेवढे अजून वय सुद्धा नाही !

पैसा कमवू नये असे कोणीच म्हणणार नाही, पण पैसा की देश असा प्रसंग आला तेव्हा त्या व्यक्तीने काय केले हे बघितले गेले पाहिजे. शारजामधील क्रिकेटच्या फडात भाग न घेता राष्ट्रकूल स्पर्धेत खेळावे लागल्यावर सचिनने काय केले होते ? तळतळाट व थयथयाट ! इतर क्रिडापटूंसारखा तो खेलग्राम मध्ये राहीला होता का ? पंच तारांकित हॉटेलात त्याची (व संघाची सुद्धा ) सोय करायला लागली होती ! त्या स्पर्धेत त्याची कामगिरी काय होती ? सुमार ! मानधन काय घेतले होते ? शारजात न खेळल्याने होणारे त्याचे नुकसान त्याला भरून दिले गेले होते, रोखीने ! फेरारीचा कर त्याला का भरायचा नव्हता, क्रिकेटमधल्या सट्टेबाजीला सचिन कर्णधार असताना ऊत आला होता तेव्हा सचिनने मुकनायकाची भूमिका का निभावली ? त्यासाठी नेमलेल्या चंद्रचूड आयोगाला त्याने उडवा-उडवीची उत्तरे का दिली ? कारगिल संकटात त्याने खिषात (स्वत:च्या !) हात घातला होता का ? (अर्थात बाळासाहेबांना त्यासाठी सचिनला बोल लावण्याचा काहीही अधिकार नाही, त्यांनी असा कोणता दानधर्म केला आहे ?)

खेळाडू पैसा कमविणे हे एकमेव उद्दीष्ट समोर धरून जेव्हा हातात बॅट घेतो तेव्हा भारत-रत्न पुरस्कारावर त्याचा काहीही अधिकार रहात नाही. क्रिडा नैपुण्यासाठी असलेला अर्जुन व खेल रत्न पुरस्कार सचिनला या आधीच दिला गेला आहे. दॅटस ऑल ! अर्थात क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर स्टार व ईएसपीएन वर न जाता ( किंवा अगदी तसे करूनही ! ) भारतातल्या प्रत्येक खेड्यात क्रिडा संस्कृति जोपासण्यासाठी , रूजण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त असे मैदान बनविण्यासाठी तो जर खस्ता खाणार असेल तर मात्र -------- !

बायपास !

दहा वर्षे बिनतक्रार सेवा देणारा फूड प्रोसेसर “ऑन ड्यूटी” बंद पडल्याने घरातले वातावरण चांगलेच तापले होते. प्रत्येकाने आपापल्या परीने त्याला सुरू करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने “पुढे काय ?” या प्रश्नाचे उत्तर आता मलाच द्यावे लागणार होते. मी ताबडतोब “आजच नवा प्रोसेसर विकत आणूया” असा तोडगा सूचवल्यावर सौ. कडाडली. काही नवा-बिवा आणायचा नाही, आहे हाच मला दुरूस्त करून हवा, तो सुद्धा आजच्या आज. आपल्या नव्या संसाराची सुरवात आपण याच प्रोसेसरने केली होती----- आज जुना म्हणून प्रोसेसर फेकाल, उद्या मला सुद्धा ---“ लगेच डोळ्याला पदर सॉरी ओढणी ! हीच्या भावनांचा उद्रेक त्सुनामी सारखा असतो ! नक्की कशाने (कशा कशाने )ही सेन्टी होते हे काही अजून मला कळलेले नाही. लगेच तिच्या सुरात सूर मिसळून प्रियांकाने “ते काही नाही बाबा, आई म्हणते आहे तर हाच (मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला’च’ पाहिजे मधला ’च’ बरे का ! ) प्रोसेसर दुरूस्त झालाच पाहिजे” असा हेका धरला. मातोश्रींची आज्ञा प्रमाण मानून लगेच चि. प्रसादने गुगल करून त्या कंपनीची वेब साइट शोधून, आमच्या भागातल्या सेवा केंद्राचा फोन नंबर मला दिला. सेवा केंद्राने माणूस घरी पाठवायचे २५० रूपये होतील त्या पेक्षा तुम्ही तो आमच्या दूकानातच आणा असे सूचविले.

लगेचच माझी पिटाळणी त्या पत्त्यावर झाली. दहा वर्षे जुने असलेले आपल्याच कंपनीचे मॉडेल बघून सेवा केंद्रावरचे कर्मचारी चांगलेच हैराण झाले. ते मॉडेल केव्हाच बंद पडले होते व त्याचा कोणाताच पार्ट मिळायची कोणतीही शक्यता नव्हती. हा फूड प्रोसेसर एक्सचेंज मध्ये सुद्धा कोणी आता घेणार नाही. तुम्ही नवाच घ्या हा सल्ला मात्र जाताना त्यांनी मला फूकट दिला. दहा वर्षे सेवा बजावणार्या त्या यंत्राचा आता मला सुद्धा कळवळा आला. नवीन संसार थाटल्यापासून तो आमचा सोबती होता व त्याला अशी सक्तीची व्ही.आर.एस. देणे माझ्या सुद्धा जीवावर आले. निदान त्याला चालता बोलता करूनच निरोप द्यायला हवा. वाटेत जेवढी दुरूस्तीची दूकाने लागली त्या सर्वाना मी बंद पडलेला फूड प्रोसेसर दाखविला पण त्याला हात सुद्धा लावायची तयारी कोणा यंत्रज्ञाने दाखविली नाही. भंगारात सुद्धा आता त्याला कोणी विचारणार नाही असे प्ररखड मत अनेकांनी मला ऐकविले.

शेवटची आशा म्हणून ज्याने माझा पंखा दुरूस्त करून दिला होता त्याच्या दूकानात मी शिरलो. दूकानाचा मालक मिक्सर दुरूस्त करत होता तेव्हा माझ्याकडे बघायला त्याने एका १०-१२ वर्षाच्या पोराला खुणावले. पोरगा चुणचुणीत दिसत होता. एखाद्या लहान बाळाला जसे हातात घेतात तसे त्याने माझ्या फूड प्रोसेसरला आपल्या ताब्यात घेतले. पॉवर केबल व टेस्टर घेवून त्याने वेगवेगळे प्रयोग चालू केले. अर्थात या क्षेत्रातले माझे ज्ञान अगदीच बेताचे आहे. वीजेचा दिवा बदलता आला तरी मला कृतार्थ झाल्यासारखे वाटते. इथे हा १२ वर्षाचा , या क्षेत्रातले कोणतेही औपचारीक शिक्षण न घेतलेला मुलगा, नुसत्या निरीक्षणाने अनेक चाचण्या पार पाडत होता. एका विशिष्ट प्रकारे वायरची जोडणी करून हवा तसा रीझल्ट मिळाल्यावर त्याने विजयी हास्य केले. “साब, ये फूड प्रोसेसर मे दो ब्लेड है, एक मिक्सर का, एक प्रोसेसर का, लेकिन दोनो ब्लेड एकसाथ चालू होते है, इससे हात कट्ने का रीक्स था, कंपनीने सेफ्टी के लिये ऐसा सिस्टीम बनाया की दोनो बर्तन आपको लगानेही पडते है, प्रोसेसर का बर्तन जबतक ये लॉक के जरीये फिट नही बैठता आपका मिक्सर चालू होंगा ही नही ! दस साल इस्तेमाल करने के बाद ये स्विच ढीला पड गया है और वो फिट नही बैठनेसे आपका मशीन चालू नही हो रहा है” रोगाचे निदान त्याने अचूक केले होते. फूड प्रोसेसर विकत घेताना ही सर्व माहिती आम्हाला दिली गेली होतीच. “अभी ये स्वीच का पार्ट कंपनीवालोंके पास भी नही मिलेगा. “ --- म्हणजे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न ! मी प्रोसेसर परत माझ्या ताब्यात घ्यायला हात पुढे केला तेव्हा त्याने “क्यो न इसकी बायपास करले ?” असा पर्याय ठेवताच मी उडालोच ! माणसाची बायपास माहिती होती पण मशीनची बायपास कशी असते ? माझ्या चेहर्यावरचे प्रश्न चिन्ह त्याला वाचता आले व “वत्सा ---“ च्या स्टाइलमध्ये त्याने मला समजाविले की फूड पोसेसरचे भांडे घट्ट बसले आहे असा सिग्नल मोटरला ज्या खटक्याने जातो तो झिजला आहे व तो भाग नवा मिळणार नाही तेव्हा ती प्रोसेस बायपास केली तर सगळाच प्रश्न मिटेल ! आता माझ्याही डोस्क्यात हजार वोल्ट्चा प्रकाश पडला ! कमाल आहे, जो उपाय या क्षेत्रातल्या पदव्या घेतलेल्या अनेकांना सूचला नाही तो विचार १२ वर्षाच्या मुलाला सूचला होता. मी ओके सिग्नल दिल्यावर मिनिटात त्याने प्रोसेसर सुरू करून दिला ! त्याच्या पात्यांची घरघर ऐकून मला धन्य झाल्यासारखे वाटले ! जन्माला आलेल्या मुलाचा ट्या ऐकला की कसे आनंदाचे भरते येते तसे झाले अगदी !

राजा असतो तर त्याला अर्धे राज्य सुद्धा द्यायची माझी तयारी होती ! त्याच जोशात “बोलो, कितना रूपया देने का ?” असे विचारताच त्याने “मामुली बायपास तो किया है, खाली एक वायर यहासे निकालके वहा डाला, दस रूपया दो” असे म्हणून मला चांगलेच खजिल केले. कंपनीचा माणूस नुसते घरी यायचेच २५० रूपये घेणार होता. मशीनवर एक फटका मारून जेव्हा ट्र्क चालू होतो तेव्हा सरदारजी १०० रूपयाचे बिल बघून करवादतो ! तेव्हा त्याला मेकॅनिक सांगतो की एक रूपया फटका मारायचा व ९९ रूपये फटका कोठे मारायचा त्याची अक्क्ल असल्याचे आहेत ! एरवी माणसावरच्या बायपासचा खर्च काही लाखात जातो, इथे मात्र या १२ वर्षाच्या मुलाला फक्त दहा रूपये हवे होते ! मी आधी फूड प्रोसेसर ताब्यात घेतला व त्याच्या हातावर शंभरची करकरीत नोट ठेवून तिकडून त्वरेने निसटलो , “साब , आपका बचा पैसा लो” असा आवाज अगदी पार ऐकेनासा होई पर्यंत !