रविवार, ३१ ऑगस्ट, २००८

बुलडॉग !

बुलडॉग !


आमचे एक विभागप्रमुख होते, कोब्राच होते, त्यांचे खरे नाव मी त्यामुळे घेणार नाही. पण बुलडॉग या नावानेच ते जास्त ओळखले जायचे ! त्यांची देहयष्टी व देहबोली दोन्ही या नावाला अगदी सार्थ होत्या. हाताखालच्या माणसांना फायरींग कशी द्यायची हे त्यांच्याकडून शिकावे ! कोब्रात जेवढे काही गुण(?) असतात, त्यांचे ते अगदी माहेरघर होते. तिरके बोलणे, खोचक बोलणे, शालजोडीतले मारणे या सर्वच प्रकारात त्यांची मास्टरी होती ! मला कधी त्यांची फायरींग झेलावी लागली नाही पण तृतीय श्रेणी कर्मचार्यासमोर आपल्या हाताखालच्या अधिकारार्यांना झापणे त्यांना भारी आवडायचे. त्यामूळे तो अधिकारी पुरता शरमिंदा होउन जायचा. त्यांचा फोन जरी आला तरी अधिकारी उठून उभे रहात ! त्यांच्या केबिनमधून बाहेर आलेला अधिकारी 'सूटलो' म्हणतच, घाम पूसत बाहेर यायचा. ते राउंडला आले तरी त्या भागात भयाण शांतता पसरायची. त्यांच्यासमोर कधी कोणाला बोलताना कोणी पाहीले, ऐकले नसेलच ! पण माझ्या संगणकविभागाचे त्यांना बरीक कौतुक होते. मी स्वत:हुन त्यांच्या समोर कधी गेलो नाही पण अनेक मोठे पाहुणे त्यांच्यासोबत आमच्या संगणक विभागात येत.


नोकरीवरचा त्यांचा शेवटचा दिवस होता आणि स्वारी चक्क सकाळी आठ वाजताच माझ्या कार्यालयात धडकली. मुड चांगला होता बहुतेक. चक्क माझे व माझ्या विभागाचे, टापटीपेचे, स्वच्छतेचे त्यांनी मनापासून कौतुक केले. आज माझा कामावरचा शेवटचा दिवस, तुम्ही सगळे परत भेटणार नाही म्हणून तुम्हाला खास भेटण्याकरता आलो असे सांगून ते परत निघाले आणि भूकंप झाला जणू ! बाथरूमच्या दिशेने चेहर्याला दाढी करण्यासाठी फेस लावलेला, भोके पडलेला बनियन व घेरदार पोटावर अतिशय तोकडा पंच घातलेला माणूस त्यांच्या नजरेस पडला ! बुलडॉगने भेदक घार्या नजरेने त्याला नखशिखान्त न्याहाळले. त्या नजरेनेच त्या माणसाला आपले भवितव्य कळले, त्याला दरदरून घाम फूटला, पोटावरचा पंच कधीही घसरून पडेल असे दिसू लागले. माझ्या पण तोंडाला कोरड पडली ! 'who is he ?' ते कडाडले ! 'जबान पे ताला लगना' म्हणजे काय ते मी अनुभवत होतो. मी 'हा म-म-म---' असा लूप मध्ये गेलो असतानाच ते 'Oh, mazdoor !' एवढेच म्हणाले व निघाले, पण त्या शब्दातली तुच्छता , तिटकारा, घृणा निव्वळ अनुभवण्यासारखीच होती ! शिकारीला बाहेर पडलेला वाघ सशाच्या पाठी कशाला पडेल ? त्यांना मी दारापर्यंत सोडले पण आता हा महम्मद माझी कुर्बानी करणार या भीतीने मला पछाडले होते. तो मला बराच वरीष्ठ होता. तो तिसर्या पाळीला होता आणि फ्रेश होउनच घरी परत जाणार होता. त्याला आम्ही ममद्या म्हणायचो पण साहेबांना सांगताना मी त्याचे मूळ नाव आठवायचा प्रयत्न करत होतो पण 'म' चा अर्थ साहेबांनी मझदूर असा घेतला होता आणि मी त्याला मुंडी डोलावली होती ! ममद्यासमोर, खाटकासमोर बकरी जशी उभी राहते तसा मी उभा राहीलो पण झाले भलतेच ! 'मराठे, आज मान गये यार ! तुमने मेरी नौकरी बचायी ! तुम्ही ये सुझा कैसे ?' हे ऐकून मी उडालोच ! मग तर त्याने मला मुसलमान ईदच्या दिवशी मारतात तशी तीनदा मीठी सुद्धा मारली. बाकी बघणार्याना शिवाजी व शाहीस्तेखानाची भेट परत आठवली ते वेगळे !

शनिवार, ३० ऑगस्ट, २००८

मुंबई बंदराला मिळाले बारा हत्तींचे बल(ळ) !

मुंबई बंदराला मिळाले बारा हत्तींचे बल(ळ) !


साधारणपणे २००४ सालातली गोष्ट असेल. आमची नवी प्रणाली, IPOS (Integrated Port Operations System) कार्यान्वित झाली होती. सगळेच नवे असल्यामुळे जरा गोंधळ होत होताच. काही तक्रारी वरपर्यंत गेल्या होत्या. अशाच एका सकाळी , साधारण दहाच्या सुमारास श्री.शेख (मुख्य सुरक्षा अधिकारी, 'ते तिघे' मधले एक !), अजून एक अधिकारी सोबत एका track suit घातलेल्या व्यक्तीला घेउन आले ! मध्यम उंची, दणकट बांधा, चेहर्यावर आत्मविश्वास आणि अधिकाराची झाक असे ते व्यक्तीमत्व होते. माझ्याच शेजारी बसून ते नव्या प्रणालीची माहीती घेत होते. बरोबरचा दूसरा अघिकारी भयंकर दडपणाखाली वाटत होता तेव्हा शेकसाहेबांच्या इषार्या सरशी मी सूत्रे हाती घेतली. नव्या प्रणालीची इंत्यभूत माहीती मी त्यांना दिली. त्यांचे समाधान झाल्यासारखे वाटत असतानाच त्यांनी विचारले की 'कालच्या दिवशी गोदी विभागाला किती उत्पन्न मिळाले ते मला चटकन कळू शकेल का ? या प्रश्नाने मी उडालोच ! हा आहे तरी कोण ? मी त्यांना हवी असलेली माहीती जनरेट करून दाखविली, त्यात काही सुधारणा सुचवून ते निघून गेले. त्यांना सोडून शेख साहेब परत आले. मला शाबासकी दिली. मी विचारले कोण होते ते ? शेख साहेब म्हणाले 'You don't know him ? That's why you are so cool !' अरे ते आपले नवे उपाध्यक्ष श्री अशोक कुमार बल, I.R.S !


आमचा आधी अगदी ठाम विश्वास होता की जो पर्यंत समुद्राला भरती ओहोटी आहे , तो पर्यंत आम्हाला रोजी-रोटीची काळजी नाही. पण या विश्वासाचे कधी भ्रमात रूपांतर झाले ते कळलेही नाही. माल हाताळणीचा pattern बदलू लागला होता. मालाची अधिकाधीक हाताळणी डब्यातुन होउ लागली. सुट्या मालाची हाताळणी करणार्या बोटी बंदरात १० ते ३० दिवस तळ ठोकून असत पण कंटेनर जहाजे , अद्ययावत साधने असतील तर एका दिवसात काम संपवत ! निव्वळ अशा जहाजांना सोयी पुरवण्यासाठी केंद्र सरकारने हाकेच्या अंतरावर 'जवाहरलाल नेहरू बंदराची' (जुने नाव न्हावा-शेवा बंदर) उभारणी केली. साहजिकच महाकाय आकाराची जहाजे याच बंदरात जाउ लागली. याची झळ आम्हाला १९९८ मध्ये जाणवली ती प्रथमच operating loss झाल्यावर ! या आधी बंदर सतत शिलकीतच होते ! अनेक कल्याणकारी योजनांना कातर्या लावल्या गेल्या. १२५ वर्ष जुने जहाज बुडू लागले. अनेक बडे अधिकारी राजीनामे देउन जाउ लागले. जहाजांविना गोदी भकास दिसू लागली. या बुडत्या जहाजाचे सारथ्य आता श्री. बल यांच्या खांद्यावर आले होते.


माझ्या सारख्या गोदी विभागात कारकून असलेल्याला एरवी अध्यक्ष / उपाध्यक्ष कोण याचे काहीही देणे घेणे नसते. पण आता स्थिती वेगळी होती. भरकटणारे तारू सांभाळण्यासाठी समर्थ कप्तानाची गरज होती आणि बल साहेबांनी दणक्यात सुरवात केली. मुंबई बंदराचा मुख्य आधार आमचा गोदी विभाग आहे हे त्यांनी लगेच हेरले व सुधारणांना तिकडूनच सुरवात केली. कामगारांना शिस्त लावली, फाजील ओव्हरटाईम पूर्ण बंद केला, पीसरेट पद्धतीत सुधारणा केली, खाजगीकरणाच्या माध्यमातुन माल हाताळणीचा वेग वाढविला. कंटेनर जहाजांच्यापाठी वेळ घालवण्यापेक्षा जे बंदराचे बलस्थान आहे, सुटया मालाची हाताळणी , यावरच त्यांनी लक्ष केंद्रीत केले. त्यासाठी आयातदार, निर्यातदारांना, जहाज एजंट यांना अधिक सोयी दिल्या, जागा उपलब्ध करून दिली. त्यांच्या समस्या जाणण्यासाठी व्यापार वृद्धी विभाग (Business Developement Cell ) स्थापन केला. याच काळात भारतीय मोटार उद्योगाने कात टाकली. आपल्या गाड्यांना परदेशात मोठी मागणी होती. ही निर्यात बल साहेबांनी मुंबई बंदरातुन व्हावी म्हणून विषेश प्रयत्न केले. माल नसल्यामुळे मोकळया पडलेल्या जागेवर आता निर्यातीसाठी आलेल्या गाड्या दिसू लागल्या ! त्याच वेळी उदारीकरणाच्या धोरणामुळे भारतात उच्च मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा खेळू लागला होता व समुद्र पर्यटनाचे परदेशातील लोण भारतात येउन पोचले होते. बलसाहेबांनी नेमकी ही संधी हेरली व या वाहतुकीचा फार मोठा हीस्सा मुंबई बंदराकडे वळवला गेला.त्या करीता क्रूझ विभागाची स्थापना केली गेली. जाहीरातबाजीची आम्हाला आधी कधी गरजच पडली नव्हती पण काळाची गरज ओळखून अनेक व्यापार विषयक प्रदर्शनात आमचाही स्टॉल दिसू लागला ! वेगवेगळ्या वृत्तपत्रांतुन मुंबई बंदरातील प्रत्येक नव्या घडामोडीची दखल घेतली जाउ लागली. वृत्तपत्रांच्या प्रतीनिधींबरोबर त्यांनी अतिषय सलोख्याचे संबंध जोपासले व त्यातुनच मुंबई बंदराची चांगली प्रतिमा लोकांसमोर उभी राहू लागली. संगणकीकरणाची प्रक्रीया धीम्या गतीने चालू होती ती त्यांनी अधिक गतिमान केली. कोबोल जाउन oracle 9i आले ! सर्व प्रणालींचे सूसूत्रीकरण केले गेले. याचाच फायदा पुढे ISO 9001 हे मानांकन मिळण्यात झाला. चार वर्षाच्या अथक प्रयत्नांना यश लाभले, भरकटणारे मुंबई बंदराचे जहाज सुरक्षितपणे धक्क्याला लागले ! बल साहेबांनी याचे श्रेय मात्र सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाला दिले !


'त्या' भेटीनंतर आमची पुन्हा कधी भेटही झाली नव्हती, व्हायचे काही कारणही नव्हते. अचानक २३ जुलैला मला फोन आला, मोठी जबाबदारी पार पाडायला तयार आहेस का ? मी लगेच होकार कळवला. दूसर्याच दिवशी अध्यक्षांचा खाजगी सहायक म्हणून नियूक्तीचे पत्र हातात पडले ! ३० जुनला अध्यक्षा सौ. राणी जाधव सेवा-निवृत्त झाल्या होत्या व नवीन अध्यक्षाची घोषणा होईपर्यंत बला साहेबांकडेच अध्यक्षपदाचा अतिरीक्त भार देण्यात आला होता. त्यांच्या दिमतीला नवा कर्मचारीवर्ग देण्यात आला त्यात माझी निवड झाली. जे स्वप्नातही नव्हते ते प्रत्यक्ष घडले. नियुक्तीच्या दिवशी ते दोन दिवस दिल्लीला गेले होते. त्यानंतर मी जाउन त्यांची भेट घेतली. 'तुझ्या बद्दल बरेच चांगले मी ऐकून आहे, keep it up' असे सांगून त्यांनी माझी भीती घालवली.दडपण निवळले. सुरवातीला आपल्याला हे कसे जमणार असेच वाटत होते पण दोन दिवसात सर्व कामाची माहीती झाली. संगणकासंबंधी काही फाइल आल्यास बल साहेब माझे मत अजमावत. त्यांचा पत्रव्यवहार , email मी हाताळू लागलो. असेच एक आमच्या वेबसाईटमध्ये सुधारणा हवे असे मेल आले व साहेबांनी मला त्यात लक्ष घालून , सुधारणा सुचवायला सांगितल्या. मी सुचविलेल्या सूचना त्यांच्या पसंतीस उतरल्या व ते पत्र मग संबंधित विभागाकडे रवाना झाले. मुंबई बंदराचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही जबाबदार्या सांभाळायच्या म्हणजे अग्निदिव्यच आहे, पण कामाचा विलक्षण झपाटा असल्यामुळे त्यांनी ते सहज पार पाडले. सकाळी येताना ते ज्या उत्साहाने येत त्याच उत्साहाने रात्री सात-आठ पर्यंत थांबून, कामाचा फडशा पाडूनच ते घरी जात !


याच काळात त्यांच्या स्वीय सचिवाला कामावर असतानाच आमच्या रूग्णालयात दाखल करावे लागले. साहेबांना हे कळताच त्यांनी थेट मुख्य वैद्यकिय अधिकार्याला फोन लावून त्याच्या तब्येतीची पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना केल्या. एवढेच नाही तर त्याला discharge मिळेपर्यंत त्यांचा फोन रोज जायचाच ! अर्थात सर्वच कर्मचार्यांची त्यांना पूर्ण काळजी आहे. वनवासी कल्याण आश्रमाच्या उपक्रमांना आमच्या कर्मचार्यांकडून बराच निधी मिळतो. अशा निधीतुन उभ्या राहीलेल्या कामाची पाहणी, दुर्गम भागात जाउन बल साहेबांनी सपत्निक केली आहे व कामाचे व स्थानिक कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या अनेक योजना त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जात आहेत. आमच्या बंदरात सत्यनारायणाच्या पूजेचे फार प्रस्थ आहे. अशा सर्व पूजांना साहेब कितीही उशीर झाला तरी जातातच , आयोजित करणार्या कर्मचार्यात मिसळतात. प्रसाद घेउन तो आपल्या स्टाफला पण देतात. असेच एका ठीकाणी त्यांनी "Tale of four friends, Everybody, Nobody, Somebody, Anybody" हे पोस्टर वाचले. त्याने ते चांगलेच प्रभावित झाले. त्या पोस्टरची प्रत घेउन त्यांनी संबंधित कर्मचार्याना कार्यालयात बोलवून घेतले, त्यांचे कौतुक केले व पोस्टरच्या प्रती आमच्या सर्व कार्यालयात वितरीत करण्यास सांगितले ! याच काळात देशात स्फोट झाले व आम्हाला red alert मिळाला. एरवी कोणीही पत्रकबाजी करून एसी केबिनमध्ये बसून राहीला असता पण साहेबांनी कुलाबा ते वडाळा हा आमचा भाग स्वत: आधी चाळून, पिंजून काढला, सुरक्षेतले कच्चे दुवे हेरले, त्यावर उपाय योजना केल्या व मगच सर्व विभाग प्रमुखांना सक्त सूचना/आदेश जारी केले. बंदरात जर घातपात झाला असता तर देशाची प्रतिमा खराब झाली असती व व्यापार-उदीमावर त्याचा दुष्परीणाम झाल असता. या दौर्यात त्यांनी स्वत: जीवावर उदार होउन, झटापट करून एक चोर सुद्धा पकडला ! त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आमच्या बंदराला त्यांच्या नावातच असलेले बारा हतींचे बळ मिळाले !


श्री. बल साहेबांकडून अल्पावधीत बरेच शिकायला मिळाले पण ६ ऑगस्टला नवीन अध्यक्षांनी पदभार स्वीकारला व बल साहेब आपल्या मूळ जागी उपाध्यक्ष म्हणून गेले. नवीन साहेबांना त्यांनी माझी 'our computer expert' अशी ओळख सुद्धा करून दिली ! बल साहेब I.R.S म्हणजे Indian Revenue Services मधेले अधिकारी आहेत पण मुंबई बंदराला त्यांनी जो गौरव प्राप्त करून दिला त्यावरून ते Innovative & Revolutionised System आहेत ! मुंबई बंदराच्या कामगारांतर्फे त्यांना माझे लाख लाख प्रणाम ! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी, भरभराटीसाठी, यशप्राप्तीसाठी माझ्या शुभेच्छा !

बुधवार, २७ ऑगस्ट, २००८

महाराष्ट्र साला चोरोंकाही है !

महाराष्ट्र साला चोरोंकाही है !
लोकलने ने कुर्ला स्टेशन सोडले , गर्दीने अगदी कळस गाठला. अचानक "मेरा पॉकेट मारा" असा ओरडा ऐकू आला. अर्थात कुर्ला स्थानक या साठी प्रसिद्धच आहे. 'मै बरबाद हो गया, सारा पैसा, दिल्ली जाने का राजधानी का टिकट सब चोरी हो गया--, महाराष्ट्र साला चोरोंकाही है'. हे शेवटचे वाक्य मात्र माझ्या कानात शिसासारखे घुसले. 'तो' आता दोन सीटच्या मध्ये नेमका माझ्या समोरच उभा राहीला. उंचा-पुरा, गोरापान, हाडापेराने मजबूत, वय मात्र ६० च्या वर असावे, पंजाबी असावा. त्याचा चेहरा मात्र सर्वस्व गमावलेल्या माणसासारखा झाला होता. त्याच्या सोबत अवाढव्य म्हणता येईल अशी लेदर बॅग सुद्धा होती. आता तर तो एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडू लागला. मी त्याला माझी जागा बसायला दिली. त्याच्याशी चार धीराचे शब्द बोललो. मी तुम्हाला पनवेलला गाडी पकडून देतो. माझ्या मोबाईलवरून तुमच्या मुलाशी संपर्क साधून बोलतो, तुम्ही काळजी करू नका. सर्व ठीक होईल. आता त्याला जरा हायसे वाटले. माझा हात आपल्या हातात घेउन तो 'बडी मेहरबानी आपकी' असे म्हणाला. त्याला आपला बोगी/सीट नंबर आठवत होता. त्याच्या मुलाचा मोबाईल नंबर मी माझ्या मोबाईलमध्ये सेव करून ठेवला.

राजधानी गाड्या तशा वेळेवरच असतात आणि आजही जर ती वेळेवर आली तर मात्र आमची प्रचंड धावपळ होणार होती. गाडी पनवेलला लागली आणि बाजूला राजधानी येत असल्याची घोषणा झाली. मी त्याची ती अवाढव्य बॅग फलाटावर उतरवली. कुलीला हाक मारून त्याला त्याने सांगितलेल्या बोगी समोर उभे रहायला सांगितले. त्या पंजाब्याला घेउन स्टेशनमास्तरच्या केबिन मध्ये गेलो. त्याला तिकीट पाकीटा बरोबर चोरी गेल्याचे सांगितले. पण वेळ कमी असल्यामुळे त्याने थेट बोगीत चढून तिकीट तपासनीसाकडून नाममात्र दंड भरून पावती घ्यायचा सल्ला दिला. आम्ही लगेच बोगी गाठली. तो हमाल समोर उभा होताच. याचे पाकीट मारले असल्यामुळे हमाली देण्यासाठी मीच पैसे काढले पण त्या पंजाब्याने मला अडवले. 'थोडा पैसा है मेरा पास' म्हणून त्याची हमाली दिली, वर मला १०० रूपये देउ लागला. मी मात्र ते नम्र पण नाकारले. 'आपका जिसने पाकीट मारा वो शायदही मराठी हो सकता है लेकीन आपको अभी जो मदत कर रहा है वो पुरा मराठी है इतना याद रखो' हे मात्र मी त्याला ऐकवलेच. त्याच्या चेहर्यावरचे भाव भरभर बदलत गेले. 'मै शरमिंदा हू, हो सके तो मुझे माफ कर दो' एवढेच तो गदगदलेल्या आवाजात म्हणू शकला. गाडी सूटली. मी त्याच्या मुलाला sms करून सर्व प्रकार कळवला. (तेव्हा मोबाईल हा प्रकार महागडाच होता !) दूसर्या दिवशी त्याच्या मुलाचा फोन आला, वडील सुखरूप घरी पोचले, आपका बहुत बहुत शुक्रीया !

मंगळवार, २६ ऑगस्ट, २००८

विदेशी जहाजे आणि तिरंगा.

विदेशी जहाजे आणि तिरंगा.
मुंबई बंदरात येणार्या सर्वच जहाजांना राष्ट्रीय ध्वज , तिरंगा फडकवावा लागतो व त्याबाबतचे सर्व नियम पाळावे लागतात. साधारण ८७ साली असेच धक्क्यावर जहाजातून उतरत असलेल्या मालाची टॅली घेत असताना कोणाचे तरी लक्ष जहाजावर फडकवलेल्या तिरंगी झेंड्याकडे गेले. ध्वज चक्क फाटलेला होता ! जहाजावर एकूण चार ठीकाणी काम चालू होते. बाकी तीने टॅली क्लार्क माझ्याकडे जमले व काय करायचे म्हणून विचारू लागले. मी ताडकन काम थांबवायचे असे बोलून बसलो. टॅली क्लार्क टॅली घेत नाही म्हट्ल्यावर मजूरांनी पण काम थांबवल. जहाजाचे काम बघणारा सुपरवायझर सांगू लागला की उद्यापर्यंत झेंडा बदलतो , काम चालू करा. मी ठामपणे सांगितले की जोपर्यंत नवीन ध्वज लावला जात नाही तोपर्यंत काम बंद राहील. मनात काहीही नसताना नेतेपद गळ्यात पडले व मग वाघावर बसलेल्या माणसासारखी अवस्था झाली. बराच गोंधळ उडाला. जहाजाची चढ उतार थांबल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाते. अनेक अधिकारी काम चालू करा म्हणून विनवू लागले तर कोणी धमकाउ लागले पण आता माझे माघारीचे दोर कापले गेले होते ! शेवटी त्या जर्मन जहाजाचा कप्तान खाली उतरला. संध्याकाळपर्यंत नवा झेंडा लावतो पण काम चालू करा असे विनवू लागला, पण आम्ही ठाम राहीलो. मग मात्र त्याचा नाईलाज झाला. हाताखालच्या अधिकार्याला त्याने ताबडतोब झेंडा आणण्याकरता पिटाळले. जर्मन वकीलातीत जाउन त्याने नवा ध्वज आणला, सन्मानाने तो फडकवण्यात आला व मगच काम चालू झाले.
हे लोण मग सर्वत्र पसरले व ज्या जहाजावर ध्वजाचा मान राखला जात नाही तिकडे कामगार स्वत:हुन काम बंद करू लागले ! अर्थात देशप्रमाचे हे भरते भार काळ टीकले नाही. त्यानंतर ९२ साली मी संगणक विभागात आलो. माझे कार्यालय पाचव्या मजल्यावर होते व बंदरात लागलेल्या सर्व बोटी व्यवस्थित दिसत. असेच एके दिवशी माझा सहकारी भोज म्हणला की समोरच्या जहाजावरचा झेंडा धुराने पार काळा पडला आहे. त्याच्या हातात 'अपना पोर्ट' हे आमचे गृहपत्र होते व त्यात जहाजांनी ध्वजाचा मान कसा राखला पाहीजे यावर लेख होता व अपमान होत असल्यास कोणाला संपर्क करावा त्या अधिकार्याचा दूरध्वनी क्रमांक दिला होता. मी लगेच त्या अधिकार्याला फोन करून आवश्यक माहीती पुरवली. आणि काय होते हे खिडकीतुन बघू लागलो. काही मिनीटातच जहाजाचे काम थांबवले गेले व जहाजाच्या कप्तानाने धावपळ करून नवा ध्वज फडकावला ! याने परत आमचे देशप्रेम जागे झाले व रोज कार्यालयात आल्यावर नजरेच्या टप्प्यात येणार्या सर्व जहाजांचे झेंडे आम्ही निरखू लागलो व तिरंग्याचा अपमान होत असल्यास फोन करून मग उडणारी लगबग बघू लागलो. जसा काही हा आमच्या कामाचा एक भागच होता ! तिरंग्याचा सन्मान फडकवताना राखला जाउ लागला पण तो सुर्यास्त होण्या आधी सन्मानाने खाली उतरवला पाहीजे. जहाजावरचा क्रू यात मात्र हयगय/ आळस करत असे. काळोख झाल्यामुळे आम्ही नीट बघू पण शकत नसू. मग आम्ही थोडी लांबची वाट करून दोन दिशानी जाउ लागलो व सूर्यास्तानंतर जहाजावर झेंडा फडकत असल्यास तो सन्मानाने उतरवून घेउ लागलो.

आता अध्यक्षांचा सहायक आहे तेव्हा या प्रश्नाचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी काहीतरी प्रस्ताव नक्की सादर करणार आहे. भारतात आलेली जहाजे भारतीय ध्वजाचा अपमान करतात पण बाहेरच्या देशात असे करायची त्यांची हींमत तरी होत असेल का हा प्रश्न छळत राहणार आहेच !

रविवार, १० ऑगस्ट, २००८

अगदी ठरल्याबरहुकूम !

लांबच्या नात्यातला एक मुलगा मला ४ वर्षाचा असताना भेटला होता. तेव्हा त्याने मला लढाउ विमानाचा वैमानिक होणार असे खणखणीतपणे सांगितले होते. बायकोचा मावस भाउ असेच मी पवईतुन आय.आय.टी. करणार असे म्हणाला होता व तीची आत्येबहीण डॉक्टर होणार होती. मला तेव्हाही कौतुक मिश्रीत आश्चर्य वाटले होते. एवढ्या लहान वयात ही मुले असे कसे बरे ठरवू शकतात ? वरील सर्व उदाहरणातली मुले प्रत्यक्षात तसे झालीही ! आय.आय.टी करणार्याला बारावीला थोडे कमी टक्के मिळाले तर पठ्ठ्या सर्व पेपर परत देउन गुणवत्ता वाढवून आय.आय.टी., पवई दाखल झालाच !


माझ्या आयुष्यात काय बरे असे ठरवून झाले ? तसे सगळेच, कारण काय करायचे हे तरी कोठे मुळात ठरले होते ! अगदी लहानपणी शाळेत जावे असे कधी वाटायचेच नाही. तरी शाळेत ढकलला गेलो. सर्वात 'ढ' मुलगा असा लौकीक तेव्हा मिळाला. मग बाबांनी आगाशीला (विरार) रहायला गेल्यावर थेट पहीलीत भरती केले. पुढे मग माळी, सुतार, मोटरमन, सैनिक व्हावे असे त्या त्या वयात वाटत गेले पण यातले प्रत्यक्ष काही झाले नाही. मग दहावीला ७८% गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर वाणिज्य शाखेत पोद्दारला प्रवेश घ्यायचा होता. तीन तास रांगेत काढल्यावर थेट प्रवेश संपला व प्रतीक्षा यादी चालू झाली ! मग नाईलाजाने वडाळ्याच्या S.I.W.S. मध्ये प्रवेश घ्यावा लागला. अकांउटस मध्ये चांगली गति होता तेव्हा सी.ए. व्हायचे असे ठरले पण प्रवेश परीक्षेचा अडथळाच पार करता आला नाही. मग S.Y.B.Com. ला असतानाच सध्याची नोकरी चालून आली. B.Com मध्ये निदान दूसर्या वर्गात तरी पास होईन असे वाटत होते पण ज्या अर्थशास्त्र या विषयात ७०+ गुणांची अपेक्षा होती त्यात मुंबई विश्वविद्यालयाने मला १ गुण मेहरबानी खातर देउन माझ्यावर पास असा शिक्का मारला ! मग बँकाच्या, MPSC व UPSC च्या प्रवेश परीक्षा दिल्या पण कोणी निकाल कळवायचीही तसदी घेतली नाही ! याच काळात ट्रेकींगचा छंद लागला. एक हिमालयीन ट्रेक केल्यावर यातच करीयर करायचे असे ठरवले. उत्तर प्रेदेशमध्ये 'जवाहरलाल नेहरू गिर्यारोहण संस्था' या विषयातले बेसिक व प्रगत असे ३ महीन्याचे वर्ग घेते. यात प्रवेश मिळणेच अवघड असते पण सुदैवाने तो मिळाला आणि लग्न ठरले ! लग्न ठरल्या ठरल्या बायकोला सोडून तीन महीने डोंगरात कोठे भटकायचे हा विचार करून त्या वर्गाला जाणे रद्द केले. मग फोटोग्राफीत करीयर करावे असे वाटू लागले, विविध प्रकारचे कॅमेरे हाताळले, विकतही घेतले पण व्यवसाय म्हणून फोटो कधीच काढले नाहीत किंवा जमले नाही म्हणूया ! मागे काही काळ हॉटेल व्यवसायात शिरून लोकांना मराठी खाद्य संस्कृतिचे धडे द्यावेत असा प्रयत्न करून पाहीला पण त्यात 'गोडी' वाटेनाशी झाली. संगणक विभागात दाखल झाल्यावर , त्या ज्ञानाचा व्यावसायिक वापर करून मात्र बर्यापैकी पैसे मिळाले पण सतत बदलणार्या या क्षेत्रात स्थिर काही होता आले नाही. शेयरच्या व्यवहाराचे बर्यापैकी ज्ञान व ब्रोकर मित्रांच्या अनेक ऑफर असूनही पैशासाठी कधी काम केले नाही.फूकट सल्ले मात्र भरपूर दिले व ज्यांनी ते ऐकले त्यांचे नक्कीच कल्याण झाले. अनेक मराठी वृत्तपत्रांसाठी बरेच लिखाण केले पण नियमित एखादे सदर चालवायची संधी मात्र कोणी दिली नाही. तर हे झाले व्यवसायासंबंधी, पण बाकी व्यक्तीगत बाबींत तरी काय बरे ठरवून घडले ? ठरवून करता आले ? शिकायची अजिबात आवड नव्हती पण पदवीधर झालो, आगाशीचे मित्र सोडून वडाळ्याला रहायला जायचे नव्हते, जावे लागले ! वडील जिकडे काम करतात तिकडेच नोकरी करायची नव्हती, नोकरी अगदी गळ्यातच पडली ! सगळा भारत बघितल्याशिवाय लग्न करायचे नव्हते, अगदी २५ व्या वर्षीच लग्नाच्या 'बेडीत' अडकलो ! नोकरी असेपर्यंत भाड्याच्या (कार्यालयीन) जागेत राहणार होतो , पनवेलकर झालो ! संगणकाची चक्क भीती वाटायची, शिफ्ट चुकवण्यासाठी म्हणून या विभागात आलो आणि इकडचाच झालो.ऑर्कुटॅच्या फंदात कधी पडणार नव्हतो पण --- ! पुढे ब्लॉग लेखन कधी माझ्या हातुन होईल असे वाटलेही नव्हते पण कोणी धक्का देउन का होईना झाले एकदाचे ! यात मन रमत असतानाच अचानक नोकरीत अध्यक्षांचा सहायक म्हणून संधी मिळाली आणि ऑर्कुट आणि ब्लॉग दोन्हीवर मर्यादा आली ! समाजसेवा या शब्दाचीही चीड होती व ब्राह्मण संघटन तर कधी स्वप्नातही नव्हते पण नवीन पनवेल सारख्या संमिश्र वस्तीत ब्राह्मण सभा चांगलीच रूजली आहे.


आयुष्यात अगदी हे असेच चालू आहे. जे जे ठरवले त्याच्या अगदी विपरीत काहीतरी घडले किंवा बिघडले आणि असे होउनही नुकसान मात्र कधी झाले नाही. तेव्हा आता ठरले तर, काहीही ठरवायचे नाही. जे काही होत आहे ते तटस्थपणे अनुभवायचे, इश्वरावर विश्वास ठेउन या भवसागरात स्वत:ला अगदी झोकून द्यायचे ! अगदी 'त्याने' ठरवल्या बरहुकूम !