मराठी ब्लॉग - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीतले अनुभव, स्वत:चे विचार, संस्कृत सुभाषिते, मुंबईच्या लोकलने रोज कराव्या लागणार्या प्रवासाचे अनुभव, इंग्रजीतले जे भावले त्याचा माय मराठीत अनुवाद आणि बरेच काही, जुन्या व गाजलेल्या हिंदी,मराठी गीतांच्या एम.पी.३ खजिन्याची किल्ली! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे.
रविवार, १२ जून, २०११
चष्मा लागला पण दृष्टी मात्र गेली !
अध्यक्षांचा मदतनीस म्हणून काम सुरू केल्यावर मात्र सततच्या संगणक वापराने डोळे व डोके दुखू लागले. चाळीशी लागल्याची सर्व लक्षणे दिसत होती पण कामाच्या रामरगाड्यात रूग्णालयात जावून दिवस वाया घालविणे कसे जमणार ? पण आता मी अध्यक्षांचा पीए होतो नाही का ! फक्त एक फोन करून डोळ्याच्या डॉक्टरची भेटीची वेळ ठरविली व इतर कोणतेही सोपस्कार न होता मला तपासणी करून नंबर काढून मिळाला व तसे आवश्यक प्रमाणपत्र सुद्धा मिळाले. या वेळी मात्र नंबर चांगलाच वाढला होता व जवळचा व लांबचा असे दोन्ही दोष निर्माण झाल्याने चष्मा रोज वापरावाच लागणार होता. क्लेम मिळणार होता जास्तीत जास्त हजार रूपयाचा पण माझे खर्च झाले १५०० रूपये ! बायफोकलने मला खूपच ताप झाला. कार्यालयात बसण्याच्या रचनेप्रमाणे संगणकाचा पडदा माझ्यापासून दिड फूट लांब होता, की- बोर्ड खाली दोन फूट अंतरावर व नोंदी करायचे रजिस्टर एक फूटावर ! हे त्रांगडे मला चांगलेच त्रास देवू लागले. इकडून तिकडे नजर फिरविताना आधी सगळेच धूसर दिसायचे व काही सेकंदाने नजर बसायची ! पायर्या उतरताना भयंकर गोंधळ उडू लागला. पायरी किती खोल आहे याचा अंदाजच यायचा नाही. असेच एकदा घाई- घाईत कार्यालयाच्या बाहेर पडताना, पायरीचा अंदाज न आल्याने माझा पाय मुरगळला व मी चांगलाच आदळलो ! लगेच काही कळले नाही पण पनवेलला पोहचेपर्यंत पाय हत्तीसारखा सूजला होता. या स्थितीत स्टेशनचा जिना चढून तिसर्या मजल्यावरच्या घरात कसा पोहचलो माझे मलाच माहीत ! सकाळी उठलो तेव्हा मुरगळलेला पाय मी जमिनीला टेकवू सुद्धा शकत नव्हतो. ही अवस्था दोन दिवस होती ! संपूर्ण बरा व्हायला तब्बल महिना लागला पण १० दिवसाच्या रजेनंतर एका पायाने कामावर जायला लागलो होतो. मधल्या काळात अध्यक्षांच्या पीएचा पाय घसरला, पायरी विसरला , पायरी समजली , पायरी ओळखा --- असे अनेक पीजे मित्रमंडळीनी पसरवले होतेच ! चष्म्याचे हजारभर रूपये मिळाले पण १० दिवसाची रजा वाया गेली, ओवरटाइम बुडाला, क्ष-किरण तसासणी, फिजीओथेरपी व मलमे यावर हजारभर रूपये खर्च झाले ! लेने के देने पडले ! पण हे एवढ्यावरच थांबले नाही. असला अपघात परत होवू नये म्हणून डॉक्टरी सल्ल्याने मी दोन चष्मे बनवून घेतले, एक जवळचे बघायला व एक लांबचे बघायला. त्याचा दोन्हींचा खर्च आला पत्येकी एक हजार ! एक काढून दूसरा चष्मा लावताना धांदरटपणाने त्याच्या काचा सुद्धा अनेकदा फूटल्या व तो बदलायचा खर्च वेगळाच !
अशी दोन वर्षे धडपडत गेल्यावर परत नव्याने क्लेम लागू झाला. या वेळी आधी पनवेलमधीलच प्रख्यात नेत्र-तज्ज्ञाकडून नंबर काढून घेतला व आधी वेळ ठरवून आमच्या रूग्णालयात गेलो. तिकडे काढलेला नंबर काही वेगळाच निघाला पण तरीही मी खाजगी तपासणी करून घेतलेल्या नंबरा प्रमाणेच प्रमाणपत्र घेतले. चष्मा बनवायला दूकानात दोन दिवसाच्या अंतराने गेलो तेव्हा दूकानदाराने तपासणी करून तिसराच नंबर दिला तेव्हा मात्र माझ्या डोळ्यासमोर काजवेच चमकले ! आता चष्मा कोणत्या नंबराप्रमाणे बनवायचा ? शेवटी दूकानदाराने परत तपासणी करून त्याने काढलेल्या नंबराप्रमाणेच चष्मा बनवायचे ठरले. दोन फ्रेम होत्याच तेव्हा त्यानांच नवीन नंबराच्या काचा लावून दे असे दूकानदाराला सांगताच त्याने माझ्यापुढे प्रोग्रेसिव लेन्सचा प्रस्ताव ठेवला. या लेन्स म्हणे जशी आपली नजर फिरते त्याप्रमाणे आपोआपच अॅचडजस्ट होतात. याचा खर्च मात्र येणार होता फक्त २५०० रूपये ! अर्थात जुन्या फ्रेम नव्या प्रोग्रेसिव लेन्सला सूट होत नसल्याने नव्या फ्रेमसकट हा खर्च होता. अर्थात सोय चांगली असल्याने मी त्याला देकार दिला.
चष्मा बनल्यावर मी तो दूकानात घालून बघितला तेव्हा मला थ्री डी चित्रपट बघत असल्याचा भास झाला ! डोके नुसते गरगरू लागले ! ना जवळचे नीट दिसते होते ना लांबचे ! खोलीचा अंदाज तर बिलकूलच येत नव्हता ! दूकानदाराने मात्र सवय नाही म्हणून असे होते , रोज वापरा, काही दिवसाने तुम्हाला सवय होइल असे सांगून माझी बोळवण केली ! दिवस कसले, काही महिने झाले तरी मला काही त्याची सवय झालेली नाही ! जवळचेही दिसत नाही, लांबचेही दिसत नाही, पायर्या उतरताना चाचपडणे काही थांबत नाही ! ’ते’ दूकान शोधतो आहे पण चष्मा काढल्यावर ते दिसत नाही व लावल्यावर ’हेच ते दूकान’ म्हणून ओळखता येत नाही. डोंगर दुरूनसुद्धा साजरे दिसत नाहीत. एखादी सुंदरी (तसे हल्ली जगात सुंदर असे माझ्या दृष्टीने काही उरलेलेच नाही म्हणा ! ) जवळून गेली तरी मान मोडेपर्यंत बघायचे कष्ट मी हल्ली घेत नाही त्यामुळे सौ मात्र भलतीच खुष आहे !
गुरुवार, २ डिसेंबर, २०१०
गुगलवर सापडली सोनपापडी !
खाल्लेली मिठाइ कोणती असा फालतू प्रश्न माझ्या डोक्यात आला व तो सगळ्यांनाच अस्वस्थ करू लागला. नाव तर अगदी तोंडावर होते पण चटकन आठवत मात्र नव्हते. अनेक नावे घेतली गेली पण ते नक्की नाही यावर मात्र एकमत होत गेले. उत्तर न सापडल्याने सगळे खापर माझ्यावरच फूटले. याने नको तो प्रश्न उपस्थित करून सगळ्या मिठाईची गोडी घालविली तेव्हा उत्तर त्यानेच द्यावे व न देता आले तर अशीच मिठाई सगळ्यांना खिलवावी या शिक्षेवर एकमत झाले. मी डोके चालवित असतानाच बाकी सगळे वेगवेगळे पर्याय सुचवून माझी मस्त फिरकी घेत होते. माझे संगणकवेड माहीत असल्याने एकाने “अरे तू संगणकावर का शोधत नाहीस” असे सांगून चांगलाच हशा पिकविला.
Why not ? मी सुद्धा मग ते आव्हान स्वीकारले. गुगल नामक वाटाड्यावर हवे असलेले काहीही सापडत नाही. हा वाटाड्या वाट दाखवित नाही तर वाट लावतो किंवा वाटेला लावतो हा माझा आजवरचा अनुभव. गुगलवर काही शोधणे म्हणजे “खांब खांब खांबोली खेळणे” ! तरीही काही शोधायचे म्हटले की मी गुगलच वापरतो ! पण आत्ता आपण जे काही गोड खाल्ले ते या वाटाड्याला सांगणार तरी कोणत्या तोंडाने सॉरी शब्दाने ? पण जरा विचार केल्यावर मला मार्ग सापडला ! जो पदार्थ चाखला होता त्या करता हलदीरामची ख्याती होती. एवढी मोठी कंपनी म्हणजे तिची वेबसाइट असणारच, त्यात तिच्या प्रसिद्ध उत्पादनांची जाहीरात तर असणारच, त्या मिठायांचे फोटो सुद्धा असणारच ! मग असे फोटो बघत जायचे व आपण जी मिठाई खाल्ली ती तशी दिसते का ते बघितले की नाव सापडणारच ! मग, काय ! गुगलच्य सर्च बार मध्ये हल्दीराम शब्द टाकला , अगदी पहिले छूट हल्दीरामची वेब साइट मिळाली. ती उघडल्यावर स्वीट्सवर क्लिक केल्यावर जी पहिली मिठाई उघडली तीच तर आम्ही आता फस्त केली होती ! सोनपापडी ! युरेका , युरेकाच्या चालीवर मी सोनपापडी, सोनपापडी असे ओरडताच सगळे सहकारी, अरे हो रे ! आठवले, आठवले, सोनपापडीच ती ! बरोब्बर ! अशी कबूली देवून मोकळे झाले. आता खरेतर मी पार्टी द्यायचा काहीही प्रश्न नव्हता पण लगेच मला हरभर्याच्या झाडावर चढवून “काय साल्याची कमांड आहे नाही संगणकावर ! मिठाई सुद्धा शोधून काढतो, मराठे, इस बात पे हो जाय एक पार्टी !” असे सहकार्यांनी कबूल करून घेतलेच !
युद्ध जिंकणारे मराठे तहात का हरतात हे गुगलवर समजेल का ?!!!
फाइलला पाय कसे फूटतात ?
शेवटी मी या प्रश्नाला भिडायचे ठरविले. फाइल पाठविली आहे असे छातीठोकपणे सांगणार्याला आधी मी ती फाइल घेतल्याची सही दाखव असे सांगू लागलो. फाइल थेट आमच्याकडे येणार होती की दूसर्या विभागातुन आमच्याकडे येणार होती ते सुद्धा विचारू लागलो. बहुतेक न मिळणार्या फाइल एकतर मला दिलेल्याच नसत किंवा दूसर्याच विभागात असून त्या आमच्या कार्यालयात पोचल्याच नसल्याचे समजत असे. माझा अर्धा ताप कमी झाला. फाइल आम्ही पाठवून सुद्धा न मिळणे – याचे कारण बहुतेकदा ती फाइल संबंधित विभाग प्रमुखाच्या कार्यालयात पडून असे हेच होते. कधी कधी साहेबच एका विभागाची फाइल दूसर्या विभागाकडे, जसे कायदा वा अर्थ खात्याच्या अभिप्रायासाठी पाठवित व ज्याची फाइल आहे तो ती मिळत नाही म्हणून बोंब मारे. मग आम्ही अशी नोंद संगणकात ठेवू लागलो व मूळ विभाग प्रमुखाच्या पीएला फोन करून त्याची माहीती देवू लागलो. आता फाइल गहाळ होणे हे प्रकार बरेच आटोक्यात आले तरीही अध्यक्षांच्या टेबलावरून फाइल गुल होण्याचे प्रकार मधून मधून होतच होते ! अशीच एक गुल झालेली फाइल महीन्याभराने नवीन टाचणासह पुन्हा माझ्या टेबलावर दिसताच मला भूताटकीचाच प्रकार वाटला. तपास केल्यावर कळले की साहेबानीच त्या विभागप्रमुखाला बोलावून ती फाइल अधिक माहीतीसाठी परत केलेली होती. मी मग सर्व विभागप्रमुखांना भेटून अशी थेट फाइल आणल्यास कृपया मला कळवित जा अशी विनंती केली. साहेबाच्या रूमबाहेर असलेल्या शिपायांना कोणीही अधिकारी रीकाम्या हाताने केबिनमध्ये गेला आणि फाइल घेवून बाहेर पडला तर लगेच आम्हाला कळवायला सांगितले. मग तशी वर्दी मिळताच आम्ही लगेच त्या विभागप्रमुखाला गाठतो व फाइलची नोंद अपडेट करतो !
काही विभाग कार्यालये पार माझगाव वा वडाळ्याला आहेत. अशा ठीकाणी दिवसातुन फक्त दोनदाच बटवडा होत असे व फाइल न मिळण्याचे ते एक मुख्य कारण असे. अनेकदा विभागप्रमुख फाइल डीसपॅचने पाठवू नका, आमचा शिपाई पाठवतो त्यालाच द्या असे सांगतात. अशा फाइल आम्ही वेगळ्या ठेवायचो व त्या शिपायाकडे द्यायचो. मी नवीन असताना यातलीच एक फाइल गुल झाली. काही महिने तपास करून सुद्धा ती सापडली नाही तेव्हा डुप्लिकेट फाइल बनवून तिच्यावर मंजूरी घेण्यात आली. सहा महिन्याने मी एक फाइल बंद करण्यासाठी एक मोठे पाकिट घेतले तेव्हा त्यात आधीच एक फाइल दिसली. लापता झालेलीच ती फाइल होती ! बहुदा मी आधी ती फाइल डीसपॅचने पाठविण्यासाठी पाकीटात भरून ठेवली असावी मी नसताना ती कोणी शिपाई न्यायला येणार असा निरोप मिळायावर वेगळी ठेवली ती तशीच राहून गेली असणार ! मग मात्र आम्ही हे प्रकार बंद केले व फाइल तडक डीसपॅच विभागात पाठवून हवी असेल तर तिकडूनच घ्या असे सांगू लागलो.
एकदा मात्र फारच गंभीर मामला घडला. टेंडरची एक फाइल काही केल्या सापडत नव्हती. संबंधित विभाग प्रमुख रोज फोन करून आम्हाला झाडत होता व आम्ही साहेब गेल्यावर त्यांची केबिन झाडून ती फाइल शोधत होतो. अनेकांना फोन करून झाले, प्रत्यक्ष भेटून झाले पण काहीही थांगपत्ता लागत नव्हता. आमची विश्वसनीयताच धोक्यात आली होती व कारवाईची टांगती तलवार लटकत होतीच. अचानक सतर्कता विभागाच्या प्रमुखानी फोन केला व माझ्या विभागाचा काहीही संबंध नसलेली फाइल तुम्ही मला का पाठविलीत म्हणून फायरींग चालू केली. या फाइलमुळे मी संपूर्ण आठवडा हैराण आहे असे आम्हालाच सुनावले. आम्ही ताबडतोब माफी मागून ती फाइल आणायला शिपायाला पिटाळले. आम्ही शोधत होतो ती फाइल तीच होती ! सतर्कता विभागाच्या काही फाइल गोपनीय असतात व साहेब स्वत:च त्या पाकीटात भरून सील करून त्या विभागाला पाठवितात. अशाच एका फाइलबरोबर ती फाइल बंदोबस्तात बाहेर पडली होती !
आमच्याकडे जी पत्रे येतात, साधारण दिवसाला 40 ते 50, जसे आयातदार, निर्यातदार, जहाज मालक वा त्यांचे प्रतिनीधी, केंद्र सरकारचे जहाज मंत्रालय व इतर खाती, आम्ही कारवाईसाठी साहेबांच्या सहीने संबंधित खात्याकडे पाठवितो. मूळ प्रत त्या कार्यालयाला जाते व तीची एक प्रत आमच्या रेकॉर्डला असते. या ओसी प्रतींमुळे सुद्धा मी खूप त्रासलो होतो. अनेकदा संबंधित विभाग आमची प्रत हरविली आहे असे सांगून आमच्या ओसी वरून दूसरी प्रत मागायचा. मला अनेकदा आमची ओसीच मिळत नसे ! असे प्रकार वरचेवर घडू लागल्याने मी चांगलाच धास्तावलो. एकदा एकाने असेच एका ओसीची प्रत मागितली व मी ती सापडत नाही असे नम्रपणे सांगताच आमची फोनवरच जुंपली. तुम्हाला द्यायची नसेल तर सरळ नाही सांगा पण सापडत नाही असे खोटे का सांगता ? या त्याच्या वाक्याने मी भडकलो व उगाच आरोप करू नका म्हणून सुनावले त्यावर त्याने काल श्रॉफने ओसी आहे म्हणून सांगितले आज तुम्ही नाही म्हणून सांगता याचा अर्थ काय ? असा उलट जाब विचारला. त्या दिवशी श्रॉफ आला नव्हता म्हणून मी त्याचा ड्रावर उघडला व माझे डोळेच विस्फारले ! मला ज्या ज्या ओसी सापडत नव्हत्या त्या सगळ्या त्या खणात विश्रांती घेत होत्या. ओसीची प्रत हवी असल्याचा फोन श्रॉफला आल्यावर तो लगेच ती ओसी आपल्या ताब्यात घ्यायचा व कामाच्या धावपळीत प्रत काढायचे विसरूनच जायचा. कधी प्रत काढायचा पण ओसी जागेवर ठेवायला विसरायचा. ती ओसी मात्र त्याच्या खणात तशीच पडून रहायची, पुढच्या वेळी मी फोन घेतल्यावर ती मला कशी सापडणार ? आता ओसी मिळत नसली की मी आधी श्रॉफचा ड्रावर उघडतो !
आता मात्र मी ठामपणे सांगू शकतो की निर्जीव असलेली फाइल / प्रत्र कधीच हरवत नसतात, त्यांना पाय सुद्धा फुटत नाहीत. ती सांभाळणारी माणसे मात्र सोयीप्रमाणे त्यांना हरवितात वा शोधून काढतात ! आता “आदर्श”ची फाइल कोठे असेल ते मात्र मला विचारू नका !
सोमवार, २९ नोव्हेंबर, २०१०
पाच हजाराचे बक्षिस !
विभागप्रमुखानी लगेच तसा प्रस्ताव उपाध्यक्षांच्या कार्यालयाला सादर केला. उपाध्यक्षांनी तो लगोलग वित्त विभागाकडे सत्वर कारवाईसाठी धाडला. वित्त विभागाच्या प्रमुखानी सविनय उपाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले की नियमाप्रमाणे ते फक्त एक हजाराचेच बक्षिस देवू शकतात ! उपाध्यक्ष भडकले ! माझा शब्द म्हणजे शब्द ! ते काही नाही, विश्वस्त मंडळाच्या आगामी मासिक बैठकित त्वरीत ही मर्यादा वाढवायचा प्रस्ताव संमत करून घेण्याचे त्यांनी सचिवांना आदेश दिले ! त्या प्रमाणे प्रस्ताव रीतसर पारीत झाला, अर्थात या काळात निदान चार महीने तरी गेले ! या काळात पोटदुखीने हैराण झालेले अनेक जण कामाला लागले होतेच. त्या अभियंत्याला बक्षिस मिळू नये म्हणून जोरदार आघाडी उघडली गेली. निनावी तक्रारींचा भडीमार सुरू झाला. होत असलेल्या वेळकाढू पणाने तो अभियंता सुद्धा ढेपाळला. त्यातच त्याचा कोणी जाणकाराने बुद्धीभेद केला ! मर्यादा वाढणे कठीण आहे, बरे, जरी वाढली तरी ती पुर्वलक्षी प्रभावाने मिळणार नाही. त्या पेक्षा तू वेतनवाढ माग ! एरवी तू दोन वर्षात निवृत्त होणारच आहेस, यात तुझा जास्त फायदा आहे, पेन्शन जास्त बसेल. त्या अभियंत्याने रोख बक्षिस नको मला वेतनवाढच द्या असा विनंती अर्ज सादर केला. विरोधी कंपूने वित्त विभागात फिल्डींग लावलेलीच होती. वित्त विभागाने बक्षिसावर जोवर निर्णय होत नाही तोवर या अर्जावर कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी भूमिका घेतली.
नंतरच्या काळात काही विघ्नसंतोशी थेट उपाध्यक्षांच्या कानाला लागले. उपाध्यक्षांचे मत प्रतिकूल झाल्यावर बक्षिसाची फाइल अडगळीत पडली ! दोन वर्षे अशीच गेली. बिचारा तो अभियंता निवृत्त सुद्धा झाला. अर्थात जाहीर झालेले बक्षिस मिळणार नसेल तर निदान वेतनवाढ तरी द्या अशी लिखापढी त्याने चालू केली. अर्थात तो नोकरीत असताना त्याला पुरून उरलेले त्याला निवृत्त झाल्यावर थोडेच भीक घालणार होते ? त्याच्या सर्व अर्जाना फाइल केले गेले ( केराची टोपली असे वाचा !).
यथाकाल उपाध्यक्षांची टर्म संपली. नवी नेमणूक निदान तीन तरी महीने होणार नव्हती ! उपाध्यक्षांची सर्व कामे या काळात अध्यक्षच बघणार होते. निवृत्त झालेला कर्मचारी त्याला घोषित झालेली इनामाची रक्कम मिळण्यासाठी पायपीट करीत आहे हे आम्हाला सुद्धा पटत नव्हते. त्याचा हक्क त्याला मिळवून द्यायचा आम्ही चंग बांधला. आमच्या प्रेरणेने तो अभियंता परत नव्या उमेदीने कामाला लागला. आपल्या विभागप्रमुखांना या प्रकरणाची तड लावायची त्याने अर्जी केली व विभागप्रमुखांनीसुद्धा या प्रकरणाचा एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लागावा असे साकडे अध्यक्षांना घातले. अर्थात त्याच्या आधी उपाध्यक्ष कार्यालयात दोन वर्षे अडगळीत पडलेली फाइल आम्हाला शोधायला लागली. विभागप्रमुखानी अथ पासून इति पर्यंत सर्व हकीगत बयान केली होती व अंतिम निर्णय अध्यक्षांनी घ्यावा असे सूचविले होते. अध्यक्ष मानवतावादी दृष्टीकोन ठेवून त्या अभियंत्याला न्याय मिळवून देतील अशी त्यांना सुद्धा खात्री वाटत होती.
सहीला आत गेलेली फाइल बाहेर येताच मी तिच्यावर झडपच घातली. सायबाचा शेरा नजरेखालून घालून निराशपणे मी ती फाइल माझ्या सिनीयर सहकार्यांना दाखविली. “वा वा, याला म्हणतात खरा प्रशासक, कसे एक घाव दोन तूकडे केले की नाही आपल्या साहेबांनी ? उगाच भावनिक-बिवनिक न बनता सरळ शेरा मारला आहे “Reward can’t become right …..File “! तुम्ही उगीच त्या अभियंत्याला खोटी आशा दाखविलीत ! माझ्या सहकार्यांनी माझ्यावरच टोलेबाजी सुरू केली ! मला काही हे अजिबात पटले नाही ! बक्षिस मागितले गेले नव्हते, दिले गेले होते हा मुद्दा इथे लक्षात घेतलाच गेला नव्हता. त्या साठी मर्यादा वाढविणारा प्रस्ताव सुद्धा विश्वस्तांच्या बैठकीत पास झाला होता ! त्यानंतर अनेकांनी पाच हजाराची बक्षिसे घेतली सुद्धा होती ! आणि एकदा उच्चपदस्थ व्यक्तीने जाहीर केलेले बक्षिस देणे हे खरे तर प्रशासनाचे कर्त्वव्य आहे, यात भावनेचा प्रश्न येतोच कोठे ? याचा पाठपुरावा करण्यात त्या अभियंत्याची चूक तरी कशी ? तो आपल्या हक्कासाठीच भांडत होता, मिळालेले बक्षिस मिळावे, बक्षिस मिळावे म्हणून नव्हे ! खरेतर झाली चूक मोठ्या मनाने कबूल करून, उशीर झाल्याबद्दल माफी मागून त्या अभियंत्याला आपल्या दालनात बोलवून सन्मानाने बक्षिस / प्रमाणपत्र दिले गेले असते तर प्रशासनाची शान नक्कीच वाढली असती --- पण लक्षात कोण घेतो ?
अर्थात झाले हे बरेच झाले, मला सतत वाटायचे की आपण गोदीच्या संगणक विभागात एवढे चांगले काम केले, प्रशासनाचे लाख काय कोट्यावधी रूपये वाचविले, त्याची कोठेतरी प्रशासकीय पातळीवर कदर व्हायला हवी होती. या प्रकरणानंतर ती खंत मात्र माझ्या मनातुन कायमची गेली !
शनिवार, ३ ऑक्टोबर, २००९
मुंबई डाईंग !
डाटा एन्ट्री टाळण्यासाठी आम्ही SDF format मध्ये जहाजातल्या मालाची माहीती मागावायचो. मला एकदम स्ट्राइक झाले की Bombay आणि Mumbai दोघांच्या स्पेलिंगमध्ये सहाच अक्षरे आहेत. त्या मुळे मुळ फ़ाइल मध्येच ते मुंबई करून घेतले तर ? थोडी खटपट केल्यावर मला तसे करता आले. जिकडे जिकडे Bomaby असेल तिकडे Mumbai झाले ! सगळ्यांना आश्चर्य वाटले, अजून नाव बदलून आठवडा पण नाही झाला आणि सगळ्या परदेशी जहाज कंपन्यानी कशी बरे याची लगेच अंलबजावणे केली ? मी त्यांना मूळ फ़ाइलमध्ये मुंबई असेच आहे बघा हवे तर असे दाखवून गप्प केले.
बराच काळ गेल्यानंतर बॉम्वे डाइंग कंपनीचे एक पत्र अनेक खात्यात फ़िरत फ़िरत माझ्याकडे आले. त्यांना आम्ही जी पावती देतो तिच्यावर हल्ली “मुंबई डाईंग “ असा उल्लेख असतो. आम्ही आमचे नाव बदललेले नाही त्यामुळे कंपनीचे लेखा परीक्षक त्याला नेहमी हरकत घेतात, असे का होत आहे ? असा त्याचा मतितार्थ होता ! सरसकट बॉम्बेचे मुंबई करण्याच्या ध्यासापायी मी ही गोष्ट लक्षात घेतलीच नव्हती. मग बरीच डोकेफ़ोड केल्यावर फाइलच्या ज्या भागात बंदराचे नाव व मालावरचा मार्क असतो तेवढाच भाग तपासून, तिकडे मुंबई करून बाकी भाग आहे तसाच सोडू लागलो ! आधीचे सर्व रेकॉर्ड तपासून जिकडे कंपनीचे नावच बदलले गेले होते ते सुद्धा जैसे थे करून ठेवले. मग “computer mistake” असे ठोकळेबाज कारण देउन पुढे मात्र असे होणार नाही याची खात्री दिली व प्रकरण मिटवले !
गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९
दत्तक’विधी’ !
सरकारी नोकरीत असलेल्या महीला कर्मचार्यांना १३५ दिवसाची भरपगारी बाळंतपणाची विशेष रजा मिळते. अनेक कारणासाठी हल्ली मुल दत्तक घेण्याचे प्रमाण सुद्धा वाढते आहे. मुल कुटुंबात लवकर रूळावे, त्याचा लळा लागावा म्हणून अगदी तान्हे बाळ दत्तक घेतले जाते. केंद्र सरकारने अशा महीलांना प्रोत्साहन मिळावे या हेतुने ३१ मार्च २००६ पासून आपल्या महीला कर्मचार्यांसाठी दत्तक घेतलेल्या मुलासाठी सुद्धा १३५ दिवसाची रजा देण्याचा कल्याणकारी निर्णय घेतला. मुंबई बंदरात कर्मचार्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत असतात. केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना ज्या ज्या सवलती मिळतात त्या सर्व आम्हाला मिळाव्यात हे तत्वत: मान्य करण्यात आले आहे. हा नियम लागु झाल्यावर एका महीला कर्मचार्याने जून महीन्यात एक मुल दत्तक घेतले व अशा प्रकारच्या विशेष रजेसाठी अर्ज केला. तेव्हा त्यावर कोणताही निर्णय न घेता अशी रजा मिळावी म्हणून केंद्राच्या धर्तीवर आमच्या नियमात बदल करून, तसा ठराव विश्वस्त सभेत २९ जुलै २००८ रोजी मजूर होउन, अंतिम मंजूरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. पण हे सर्व सोपस्कार होण्या आधीच अजून एका महीला कर्मचार्याने मे २००८ मध्ये मुल दत्तक घेउन विशेष रजेसाठी अर्ज केला !
मी या कार्यालयात जुलै २००८ मध्ये आलो, तेव्हा हा आधीचा घोळ मला माहीतच नव्हता. त्यानंतर ऑक्टोबर २००८ मध्ये माझ्या ओळखीच्या एका महीला कर्मचार्याने मुल दत्तक घेउन रजेसाठी अर्ज केला. तेव्हा मला हा सगळा इतिहास माहीत झाला. केंद्र सरकारच्या पोत विभागात मग आम्ही पाठवलेल्या ठरावाचे काय केले याची विचारणा केली. चार-पाच वेळा तगादा लावल्यावर ’विहीत नमुन्यात ठराव नसल्याने कारवाई केली नाही’ असे साचेबंद सरकारी उत्तर आले व सोबत ’विहीत नमुना’ जोडलेला होता. मी लगेच कर्मिक विभागाच्या मागे लागून तो ठराव पोत विभागाला जसा हवा होता तसा पाठवुन द्यायला लावला. १८ जून २००९ ला सरकारने दुरूस्तीला मंजूरी दिली व तशी नोंद असलेल्या राजपत्राच्या ६ प्रती धाडल्या. खरेतर मंजूरी पुर्वलक्षी प्रभावाने मिळेल असे अभिप्रेत असताना “राजपत्र प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून लागू” या एका ओळीने आमचा चांगलाच विरस झाला. ज्यांनी याचा पाठपुरावा केला त्यांना या सुधारणेचा फ़ायदा मिळणार नाही हे स्पष्ट झाले ! त्या तिघींनी सुद्धा “ठीक आहे, आम्हाला नाही तर नाही, या पुढे कोणी दत्तक घेइल त्याला तर फ़ायदा होईल” असा मनाचा मोठेपणा दाखवून स्वत:ची समजूत करून घेतली. पण मी हार मानायला तयार नव्हतो. मी त्यांना कामगार नेते व मुंबई बंदराच्या विश्वस्त पदी कामगार प्रतिनिधी म्हणून सलग ४० वर्ष असलेले श्री. कुळकर्णी यांच्याकडे तुमची कैफ़ियत मांडा असे सूचवले. श्री. कुळकर्णी यांनी सुद्धा याची तातडीने दखल घेउन, अध्यक्षांना पत्र लिहीले व स्वत:च्या विशेष अधिकाराचा वापर करून तिन्ही महीला कर्मचार्यांची विशेष रजा माणुसकीच्या नात्याने मंजूर करावी अशी गळ घातली. अध्यक्षांनी यावर कर्मिक विभागाचे मत मागितले. त्यावर, अध्यक्षांना अशा प्रकरणात पुर्वलक्षी प्रभावाने नियम लागू करता येत नाही पण विश्वस्त मंडळाच्या बैठेकीत असा ठराव पास करून घेता येइल अशी टीपणी दिली. अध्यक्षांनी त्वरीत स्वत:च असा ठराव मांडण्याला संमती दिली व २२ सप्टेंबरच्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर झाला , अपवादात्मक बाब म्हणून या तिन्ही महीला कर्मचार्यांना या सुधारीत नियमाचा लाभ द्यावा असे ठरले ! वर्षभर चाललेल्या कागदोपत्री लढाईचा अखेर विजय झाला. चांगल्या कामाचे चीज झाले ! आधुनिक झाशीच्या राणींना विलंबाने का होईना न्याय मिळाला, त्यांचे दत्तक विधान , ’विधी’वत मंजूर झाले !
’ती’ राणी हरली – खुब लढी मर्दानी झांसीवाली …. पण तिच्यापासून स्फुर्ती घेतलेल्या या तिघी मात्र जिंकल्या ! इतिहास बदलला !!
रविवार, २० सप्टेंबर, २००९
किस्सा खुर्सी का !
एकदा अचानक काहितरी काम निघाले म्हणून मी हापिसला दांडी मारली होती. दूसर्या दिवशी कामावर जाताच श्रॉफ म्हणाला, “मराठे, तुझी खुर्ची बरोबर नाही. तू एवढे महिने तिच्यावर बसून काम करतोस म्हणजे नवलच आहे. माझी तर पाठ काल एक दिवसातच कामातुन गेली. तक्रार दिली आहे माणसे येतीलच एवढ्यात.” खुर्ची हा एकच शब्द मला थेट भूतकाळात, १९८६ मध्ये घेउन गेला.
१९८६ मध्ये गोदी विभागात कामाला लागलो. डॉकयार्ड ते बॅलार्ड पियर एवढ्या विस्तीर्ण भागात जहाजांचे धक्के आहेत. धक्क्याजवळ तेवढ्याच अवाढव्य शेड. जहाजाने आणलेला माल त्यात ठेवला जातो. निर्यात करायचा माल सुद्धा तिकडेच आधी उतरवला जातो. टॅली घेणे म्हणजे या मालाच्या चढ-उताराची व्यवस्थित नोंद ठेवणे. आमच्यासाठी घडी करता येणार्या खुर्च्या असायच्या. शेड मधुन त्या ताब्यात घेउन धक्क्यापर्यंत न्यायला लागायच्या. अनेक क्लार्क त्या फ़रफ़टत नेणेच पसंत करत ! खुर्ची एक, त्यावर बसणार दोघे ! मुंबई बंदराचे प्रतिनीधी म्हणून आम्ही, टॅलीक्लार्क आणि जहाज एजंटाचे प्रतिनिधित्व करणारे बोर्डाचे क्लार्क ! हे क्लार्क एक नंबरचे कामचूकार ! शिफ़्ट सुरू होताना ते जे तोंड दाखवुन काळे करत ते काम संपतानाच उगवत. आमच्या नोंदीची नक्कल करून ते मोकळे होत. हेच काम विमा कंपन्याचे सर्व्हेयर सुद्धा करत. त्या बिचार्यांची अवस्था अगदीच खराव होती. पंधरा रूपये रोजावर ते काम करत. बोर्डाचा माणूस गुल असला तरी यांना आम्हाला माणुसकी म्हणून अर्धी खुर्ची द्यावीच लागे. ती खुर्ची शेवटी मोडायची. आमचेच अनेक क्लार्क काम संपल्यावर खुर्ची अशीच धक्क्यावर सोडून देत व मग ती अनायसेच भुरट्या चोरांच्या ( ट्रकचे क्लिनर ती सरळ गाडीत टाकून देत ! ) हाती पडे. कितीही वेळा नव्या खुर्च्या दिल्या तरी एका आठवड्यात “खुर्ची नाही” अशी स्थिती असायची ! मग हातगाडीवर, धान्याच्या गोणीवर कोठेही बसून टॅली घ्यायला लागायची. अर्थात प्रामाणिक पणे काम करणार्यांनाच याचा त्रास होई, अनेक जण सर्व्हेयरच्या जिवावर क्लबमध्ये खेळत बसत व शिफ़्ट संपताना परत येउन शेवटचा स्ट्रोक मारून मोकळे होत. एखादा दिवस जरी संपूर्ण खुर्ची, ती पण धड अवस्थेत असलेली बसायला मिळाली तरी चैन वाटायची ! तशी खुर्चीकरता अनेकदा आंदोलने झाली पण “आपलेच दात आणि आपलेच ओठ” अशी अवस्था असल्याने ती कधी तडीस गेली नाहीत.
१९९२ साली संगणक विभागात आल्यावर पहिले समाधान होते स्वत:ची चांगल्या स्थितीत असलेली लाकडी खुर्ची, ती सुद्धा पुर्णवेळ मिळाल्याचे ! संगणकावर काम करण्यासाठी वेगळी खुर्ची असते हे तेव्हा नुसते ऐकुनच ठावकी होते ! दोन वर्षानंतर नव्या इमारतीतला एक संपूर्ण मजलाच संगणक विभागाला देण्यात आला. माझे बस्तान इथे हलले. सेंट्रल एयरकंडीशनिंगचे मला एवढे नवल वाटले नाही पण साधारण ३७०० रूपयाची, गोदरेजची व्हील असलेली खुर्ची बघुन मी अगदी हरखुनच गेलो ! त्या खुर्चीत बसल्यावर जणू इंद्रपदच मिळाल्यासारखे वाटले ! खुर्चीत बसून स्वत: भोवती गिरक्या मारणे, ती खालीवर करून बघणे, व्हिलचा वापर करून एका जागेवरून दूसरीकडे जाणे हे सगळे आमचे खेळच झाले होते. तिची पाठ सुद्धा हवी तशी पाठी-पुढे करता येत असे. असल्या खुर्चीत बघून आम्हाला काम करताना बघून अनेकांचा तेव्हा जळफ़ळाट होत असे ! खुर्चीचा मान व माज म्हणजे काय असतो हे मला तेव्हा कळले ! मी तिकडे आठ वर्षे मनमुराद अधिकार गाजवला. अनेक जण त्याचा उल्लेख पेशवाई असाच करतात. नंतर माझी रवानगी त्याच इमारतीत चवथ्या मजल्यावर झाली. तिकडचे वातावरण अगदी उबग आणणारे होते. अपुर्या जागेत तब्बल १० माणसे काम करीत. अगदी एकमेकांच्या पाठीला पाठ लावुनच काम करावे लागे. सर्वत्र पसारा पडलेला होता. एसी नुसते नावाला होते. आणि हो , संगणक खुर्च्या पार मोडलेल्या होत्या. व्हील मोडलेली, बॅलन्स गेलेली होती, कुशन निघालेले होते, आर्म रेस्ट मोडलेले होते, खुर्चीची उंची कमी जास्त करणारी यंत्रणा बाद झालेली होती.
त्या वातावरणात काम करणे अगदीच असह्य व्हायचे. अगदी घुसमट हो़उ लागली. एका शनिवारी एक तास आधी कामावर येउन , सगळा पसारा बाहेर फ़ेकून दिला. मोडके संगणक, भंगारात निघालेले रॅक बाहेर काढले. नुसता एसी हवा म्हणून आत बसणार्यांना बाहेर हुसकावुन लावले. बसायची रचना बदलली. एवढे झाल्यावर आधीची कोंदट जागा अगदी ऐसपैस व हवेशीर वाटू लागली. एसी सुद्धा दुरूस्त करून घेतला. मग लक्ष वळले खुर्च्यांकडे ! गेली १० वर्षे नव्या खुर्च्या आल्याच नव्हत्या, तसा कोणी प्रयत्न सुद्धा केला नव्हता. आधीचा इन-चार्ज स्वत:पुरती चांगली खुर्ची (त्यातल्या त्यात) घेउन बसायचा, शक्य असूनही त्याने दूसर्यांना खुर्ची देण्यासाठी काहीही केले नाही. सनदशीर मार्गाने मी नव्या खुर्च्यांची मागणी लावुन धरली. बरेच कागदी घोडे नाचल्यावर मायबाप व्यवस्थापनाने प्लास्टिक खुर्च्या देण्याची तयारी दाखविली. मी तो प्रस्ताव धुडकावला व संगणक खुर्ची ही चैन नव्हे हे त्यांना समजावले. मी खूपच ताणून धरले तेव्हा माझ्याच जुन्या कार्यालयातुन एक खुर्ची मला देउ करण्यात आली. अर्थात मी त्याला सुद्धा नकार दिला. खुर्ची मिळत नाही म्हटल्यावर मी स्टुलावर बसून काम करण्याचा निर्णय घेतला व त्याची भरपूर बोंब सुद्धा केली. मोडक्या खुर्चीत बसून काम करण्यापेक्षा स्टुलावर बसून करणे खूपच सोपे होते. आमचा साहेव जेव्हा जेव्हा कामासाठी माझ्याकडे यायचा तेव्हा तेव्हा मला स्टुलावर बसलेले बघुन तो जरा वरमायचाच. त्याच्या बरोबर अनेक बडे अधिकारी सुद्धा असायचे. संगणक विभागाचा प्रमुख स्टुलावर बसून काम करतो म्हटल्यावर ते सुद्धा चमकायचेच ! शेवटी स्वत:च्या खास अधिकारात ५००० रूपये मंजूर करून खुर्च्या द्यायला ते तयार झाले. अर्थात सगळे पेपर-वर्क मी करायचे अशी अट घालूनच ! मला एकूण ६ खुर्च्या हव्या होत्या. गोदरेजची एक खुर्चीच ४००० रूपयाची होती. तेव्हा मी मशीदबंदर जवळील अनब्रँडेड खुर्च्यांच्या बाजारात गेलो. चांगल्या दर्जाची खुर्ची निदान १८०० रूपयाच्या खाली नव्हती. तेव्हा आधी दोन घेउ, अशा दोन दोन करत सगळा कोटा पुर्ण करायचे ठरले. सगळे सोपस्कार पार पडल्यावर जेव्हा पैसे घ्यायला गेलो तेव्हा ऑडीटने खुसपट काढून, खुर्ची फ़र्निचर मध्ये मोडते, आकस्मिक निधीतुन ती घेता येणार नाही असा नियम दाखवला ! सगळे मूसळ केरात !
याच काळात माझ्या खास ओळखीचे शेख साहेब बढती मिळून उप-गोदी प्रबंधक झाले. त्यांच्या कानावर सगळा प्रकार घालताच त्यांनी लागलीच गोदी विभाग प्रमुखांकडून १०,००० रूपये मंजूर करायचे आश्वासन दिले. मी लगेच माझ्या कार्यालयातुन तशी शिफ़ारस रवाना केली. एका आठवड्याने स्वत: शेख साहेबांनी फ़ोन करून १०,००० रूपये मंजूर झाल्याची खूषखबर दिली ! परत बाजार पालथा घातला. आधी १८०० रूपयाला उपलब्ध असलेल्या खुर्च्या आता २२०० रूपये झाल्या होत्या ! वॅट - मुल्यावर्धित विक्रीकर लागू झाल्याचा तो फ़टका होता ! निराश हो़उन मी दूकानातुन बाहेर पडत असतानाच मालकाने मला बोलावणे धाडले. मी त्याला दहा हजारात सहा खुर्च्या बसवायची गळ घातली. या वर त्याने सरकारी काम असल्याने पावती तर करावीच लागणार, पण तुम्ही रोख पैसे द्यायला तयार असाल तर जमेल कारण चेक घ्यायला आम्हाला महीनाभर खेटे घालावे लागतात वर वीस टक्के कट द्यावा लागतो असे सूचित केले. मी लगेच मला तुमची फ़ूटकी कवडी सुद्धा नको, पावतीसह ६ खुर्च्या तुम्ही पोचत्या करणार असाल तर मी तुम्हाला सगळे पैसे आगाउ द्यायला तयार आहे असे सांगितले. त्याने लगेच हसून ’डन’ केले ! अर्थात त्यासाठी त्याला हजार रूपयाचा ऍडवान्स मला माझ्या खिषातुनच द्यावा लागला. त्याच्याकडून मी रितसर कोटेशन घेतले व मोठ्या उत्साहात कामावर परतलो. सगळ्यांनी एकच जल्लोश केला. पण खरी लढाई पुढेच होती !
झारीतले शुक्राचार्य म्हणजे काय याचा अनुभव मला लेखा विभागात टेबलो-टेबली आला. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी “खांब खांब खांबोली खेळावे” लागले. जसे काही खुर्च्या मी माझ्या घरीच घेउन चाललो होतो. एवढा उत्साह दाखविलास तर सतर्कता विभाग तुझी चौकशी करेल असेही धमकावले गेले. ( चौकशी चालु आहे ती इतरांनी ४००० रूपयाला घेतलेल्या खुर्च्या मी त्याच्याही अर्ध्या किमतीत व त्याहून चांगल्या दर्जाच्या कशा घेतल्या याची ! कदाचित यालाच सगळे संबंधित घाबरले असावेत ! ) मी या सगळ्यांना पुरून उरलो. तब्बल तिन दिवस खेटे, हेलपाटे घातल्यावर , टक्के-टोमणे सहन केल्यावर हातात दहा हजार रोख पडले एकदाचे ! मग त्या दूकानात फ़ोन करून खुर्च्या तयार ठेवायला सांगितले. सहा खुर्च्या टॅक्सीच्या टपावर बांधून मी विजयी वीराच्या थाटात गेटवर आलो. इकडे पांढरा बगळा म्हणजे कस्टमचा अधिकारी आडवा आला. एक तास त्याच्याशी हुज्जत घातल्यावर मला त्याने खुर्च्या आत घेउन जायला मोकळिक दिली. लिफ़्टने खुर्च्या वर जात असताना सगळा स्टाफ़ ते दृष्य विस्मयाने बघत होता. कोणाच्या नजरेत कौतुक होते तर कोणाच्या असूया ! कामावर त्या खुर्च्यांची चक्क पूजा करण्यात आली. मोठ्या जल्लोशात आम्ही सगळे त्या खुर्च्यांवर स्थानापन्न झालो. माझ्या चिकाटीचे अनेकांनी खुल्या मनाने कौतुक केले पण त्यात सुद्धा “आता मराठेच्या घरी सुद्धा अशी खुर्ची असेल” असे कोणी फ़ूत्कार सोडलेच ! दुर्दैवाने त्याच आठवड्यात आमच्यातल्या चार जणांची बदली झाली, मला मुदतवाढ मिळाली. नव्या आलेल्यांना अनायसेच नव्या खुर्च्या मिळाल्या. मुदतवाढ मला सुद्धा मानवली नाही. खुर्चीच्या लढाईत अनेकांशी वैर पत्करावे लागले होतेच. कोणेतीही सूचना न देता माझी बदली तडकाफ़डकी श्रम विभागात झाली. इथे लाकडी खुर्च्या होत्या. परत संघर्ष करून नव्या खुर्च्यांसाठी मंजूरी मिळवली पण शेवटच्या टप्प्यात सायबाचीच बदली झाली व तो प्रस्ताव दफ़्तरजमा झाला ! लगोलग माझी सुद्धा नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पात बदली झाली. माझ्या सुरवातीच्या कार्यालयातच ! माझ्या खुर्चीचा प्रश्न आला नाही ! पण इकडे मी “जिकडे संगणक तिकडे संगणक खुर्ची हवी” असा पण करून पाठपुरावा चालु केला. युनियनच्या मदतीने तो आता अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच तब्बल ३०० नव्या संगणक खुर्च्या सगळ्यांना मिळतील !
तिकडून झालो थेट चेयरमनचा पीए ! या खुर्चीचा दरारा तो काय वर्णावा ! माझी खुर्ची बिघडली आहे असे कळताच एखाद्या गंभीर आजारी रूग्णाला बघायला जशी गर्दी होते तसे अनेक जण गंभीर चेहर्याने ये़उन गेले. थोडे तेलपाणी केल्यास आहे तिच खुर्ची चांगली होईल हे माझे सांगणे कोणी मनावर घेतले नाही. शेवटी नवी खुर्ची मला देण्याचा निर्णय झाला. अवघ्या १० मिनिटात मी नव्या कोर्या खुर्चीवर स्थानापन्न झालो होतो ! संस्कृत सुभाषितात कळसावर बसल्याने कावळा गरूड होत नाही असे भले म्हटले असेल, सरकारी कार्यालयात मात्र अधिकाराच्या खुर्चीवर बसलेला आपोआपच महान होतो ! खुर्चीमुळे माणूस मोठा समजला जातो की कामामुळे ? कोणी सांगेल का मला ?
सोमवार, १८ मे, २००९
प्रोटोकॉल !
असाच एकदा मला त्यांनी रजेच्या दिवशी, अवेळी फ़ोन केला. तुमचा गेटचा स्टाफ़ ओळख दाखवुनही मला आत सोडत नाही अशी तक्रार केली. मी चौकशी केल्यावर कळले की पास त्यांचा एकट्याचाच आहे, सोबत चालक आहे, बायको आहे एकवेळ त्यांनाही सोडू पण अजून एक आहे त्याला कसे सोडू ? तेव्हा मी बड्या साहेबांना समजावले की सुरक्षा सध्या थोडी कडक आहे, कृपया सहकार्य करा, तुम्ही बाहेरच्या रस्त्याने आमचा टोल नाका गाठा. थोड्या वेळाने परत फ़ोन, “तुम्ही काय माझा सतत पाण़उतारा करायचे ठरवले आहे काय ? मी कोण आहे माहीत आहे ना ? तुमचा हा फ़डतूस क्लार्क म्हणतो माझ्याकडचा पास इकडे चालणार नाही म्हणून, काय चाललाय काय ? चौकशी केल्यावर कळले की त्यांना अजून रोड पास दिलाच गेला नाही आहे. अर्थात ही चूक आमचीच असल्याने मी परत फ़ोनवरच सूचना देउन त्यांचा मार्ग मोकळा केला, जायचा व यायचा सुद्धा ! मग कामावर पोचल्यावर त्यांच्या रोड पासचे लाल फ़ितीत अडकलेले काम सुद्धा मार्गी लावले.
त्या नंतर २६/११ घडले, सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी फ़क्त एकच गेट उघडे ठेवले गेले, त्याचा एक अनपेक्षित फ़ायदा झाला ! फ़ोर्ट मधुन कल्याण, पुणे दिशेला जायचे असेल तर पी.डीमेली रोड, वाडीबंदर येथे प्रचंड वाहतुक कोंडीचा सामना करायला लागतो. बडे अधिकारी आमचा गोदी पास फ़्री घेउन फ़ोर्टे च्या ग्रे-गेट मधुन आत प्रवेश करून थेट माझगावला बाहेर पडत, पुढे लगेच आमचा रस्ता आहे तो थेट माहुलला जातो ! गोदीतल्या कंटेनर वाहतुक जलद व्हावी म्हणून तो बांधला गेला, आधी तो पुर्ण त्याच कामासाठी होता. पुढे गोदीतली कंटेनर वाहतुक जवळ जवळ बंदच पडल्याने, त्याची देखभाल परवडावी म्हणून तो टोल घेउन सर्वाना मोकळा केला गेला. अर्थात बड्यांना त्याचाही फ़्री पास द्यायला लागतो. आता कर्नाक बंदरचे एकच गेट उघडे असल्याने गोदी पास निरर्थकच ठरला होता. हे झाल्यावर गोदीत एक कार्येक्रम होता, त्याचे ठीकाण ग्रे-गेट कडून अगदी जवळ होते, साहेबाना तिकडे जायचे होते. वळसा वाचावा म्हणून ग्रे-गेट समोर गाडी उभी करून ते उघडायची तयारी चालु झाली. तेव्हा साहेब गाडीतुन खाली उतरले. माझ्यासाठी सुद्धा कोणताही नियम मोडायची गरज नाही. गाडी बाहेरच राहू दे, मी चक्रीने आत जातो ! योग्य तो सिग्नल गोदीला मिळाला ! नियम म्हणजे नियम ! काही दिवसानी कस्टम्सच्या एका पायलट बोटीचे अनावरण करायचे होते. त्यांनी विशेष बाब म्हणून ग्रे-गेट उघडायची विनंती(?) केली. साहेवांनी ती नम्र पणे फ़ेटाळली. मग सुरू झाले दबावाचे राजकारण, साहेबानी त्यालाही भीक घातली नाही. तेव्हा गेटच्या बाहेर एक ,व आत एक गाडी उभी करून तो पेच सोडवला गेला.
काही दिवसांनी परत ’त्यांचा’ फ़ोन आला. तुमचा स्टाफ़ मला आत घेत नाही. हा काय प्रकार आहे ? मी त्यांना समजावुन सांगितले की आत जाउन तुमचा काहीही फ़ायदा नाही, कारण त्याच गेटने तुम्हाला बाहेर पडावे लागेल, हकनाक वळसा पडेल. मग हा पास फ़ूकटच आहे म्हणजे ! असा खवचट शेरा ऐकावा लागला .( हे दूसर्या अर्थाने सुद्धा खरेच होते !) मग बर्याच महीन्यानी त्यांचा परत फ़ोन आला, तुमचा स्टाफ़ मला बाहेर सोडत नाही म्हणून. वर तुमचे नाव सांगितल्यावर ओळखत नाही असे गुर्मीत म्हणतो ! तुम्ही एवढे चेयरमनचे सचिव आणि तुम्हाला ओळखत नाही म्हणजे काय ? मी चकीत झालो, बाहेर पडायला हे मूळात आत शिरले तरी कसे ? नवी व्यवस्था त्यांना माहीत होती. त्यांना मी याची नम्रपणे जाणीव करून दिली तेव्हा ते चुकून आलो, आता एवढा आलोच आहे, तर एकवेळ सोडा ! मला खूप घाई आहे. आणि माझे जाउ दे हो, तुम्हाला पण तो किंमत देत नाही म्हणजे काय ? त्याचा रीपोर्टच करा ! बोलण्याच्या ओघात ते असेही बोलून बसले की या आधी तुमचे नाव सांगितल्यावर दोनदा मला सोडले गेले आहे ! मला क्षणात सर्व परीस्थीतेचे आकलन झाले. त्यांचा चूकलो, हा सरळ सरळ कांगावा होता, उलट माझे नाव सांगून तो दोनदा असे गेला होता, सोकावला होता ! मला आता हरभर्याच्या झाडावर चढवुन आपले काम होईल असे त्याला वाटले असावे. मी त्यांना सांगितले की आपण स्वत: जबाबदार माजी अधिकारी आहात, नियम तुम्हीच तोडणार असाल तर त्याला अर्थ काय ? आमचे साहेब स्वत: या बाबतीत आदर्श घालुन देत असताना आम्ही तुमचा तरी अपवाद का करायचा ? तुम्ही कृपया गाडी परत फ़ीरवा व आलात तसेच बाहेर जा. लगेच मी इंटरकॉम वरून फ़ोन करून गेट-कीपरला सक्त ताकीद दिली कि कोणत्याही स्थितीत गेट उघडायचे नाही ! पाच मिनीटाने त्या गेट कीपरने फ़ोन केला व साहेब तो जामच तमाशा करतोय, थयथयाट चालला आहे नुसता, मोठी मोठी नावे घेत आहे, सोडू का एक वेळ ? मधल्या मध्ये आमच्यावर संक्रात ओढवायची, तुम्ही नामा-निराळे व्हाल. मी म्हटले अजिबात नाही. मी तुमच्या पाठीशी आहे, निर्धास्त रहा ! ते गेट तोडू तर नक्कीच शकणार नाहीत. तुम्ही त्यांना कोणतेही उत्तर देउ नका, अगदीच वेळ आली तर मला फ़ोन करा. पुढची सलग दहा मिनीटे तो बडा माझा मोबाईल ट्राय करत होता, मी तो घेतला पण नाही. मग त्यांचा संयम संपला व त्यांनी चक्क एसेमेस केला “you bloody fool, I will teach you a lesson”. मग मात्र मी त्यांना उलट फ़ोन करून ठामपणे सांगितले “इनफ़ इज इनफ़ ! एसेमेस करून तुम्ही मला भक्कम पुरावा दिलात त्याबद्दल धन्यवाद ! तमाशा बंद करा, गुमान गाडी परत फ़िरवा, दहाव्या मिनीटाला तुम्ही बाहेर नाही पडलात, तर मी हा सर्व प्रकार चेयरमन साहेबांना कळवीन. तुमचा रोडचा पास मग रद्द सुद्धा होईल, mind this well ! मग मात्र तो जमिनीवर आला, ते गेट बाहेर गेल्याचा मेसेज दूसर्याच मिनीटाला मिळाला. काही वेळाने फ़ोन करून त्यांनी चक्क माफ़ी मागितली, झाले गेले विसरून जा, प्रकरण वाढवू नका अशी गळ घातली.
या एकाच प्रसंगातुन बरेच शिकता आले. हे शक्य झाले अर्थात साहेबांनी स्वत:च्या आचरणातुन एक आदर्श घालुन दिला होता म्हणूनच !
रविवार, ७ डिसेंबर, २००८
भरवसा !
साहेब नाही आहेत, दिल्लीला गेले आहेत, हे कळल्यावर मात्र त्याचा धीर खचला व तो धाय मोकलून रडू लागला. त्याचा शोक मग संतापात बदलला व सर्व यंत्रणाच कशी सडली आहे, माणसाच्या जीवाची कदर कोणालाच नाही, तुमच्यावर वेळ आली म्हणजे कळेल असे सुनवू लागला. मला ऐकून घेणे भागच होते. बरेच काही बोलल्यावर तो शांत झाला व शून्यात नजर लावून बसला. मग मी त्याला शांतपणे म्हटले उद्या दूपारी बाराच्या आत तुम्हाला चेक द्यायची जबाबदारी माझी. आधी आपण काय ऐकले यावर त्याचा विश्वासच बसला नाही तेव्हा तेच वाक्य मी त्याला अधिकच ठामपणे सांगितले. मग मात्र तो ओशाळला. माझे आभार मानून निघून गेला.
रात्री उशीरा घरी पोचलो, पण सुदैवाने मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याच्या आत. हल्ल्याची तीव्रता बघता उद्या कामावर इच्छा असूनही जाउ शकू का हा विचार पहीला डोक्यात आला. पाठोपाठा विमानतळाबाहेर स्फ़ोट झाल्याची बातमी वाचली व साहेब तरी दिल्लीवरून त्यांच्या मलबारहीलच्या बंगल्यात पोचतील का याचीही काळजी वाटू लागली. सतत त्या कामगाराचा चेहरा समोर येत होता व त्याचे कधीही न बघितलेले वृद्ध वडील. सकाळी लोकल सेवा सुरू झाल्याचे कळले व कामावर निघायची तयारी केली. पाठोपाठ आई-बहीण-सासू यांचे फ़ोन आले व आज कामावर जाउ नये असे सूचवले गेले. अर्थात कोणत्याही परीस्थितीत घरी बसणे मला आवडत नाही. १९९३ च्या दंगलीत मुंबई जळत असताना सुद्धा मी व माझा भाउ विरार वरून कामावर जातच होतो, कधी-कधी तर अख्ख्या डब्यात आम्ही सगळे मिळून पाच-सहा जणच असायचो ! मग आज तरी का घरी बसा ? इतक्या वर्षाच्या संसारानंतर बायको सुद्धा मला चांगले ओळखून आहे तेव्हा तीने सुद्धा माझा डबा तयार ठेवला होताच ! घराबाहेर पडताना मात्र मुलीने घट्ट धरून ठेवले व आज जायचे नाही असे निक्षून सांगितले. शणभर माझा सुद्धा निश्चय डळमळीत झाला पण परत समोर त्या कामगाराचा चेहरा आला.. नाही.. मला कामावर गेलेच पाहीजे. माझ्या भरवशावर तर तो आहे ! मोठ्या निग्रहाने मी तीच्या हातांची मिठी सोडवली , कामावर पोचल्यावर फ़ोन करतो असे सांगून पाठी वळून न बघता चालू पडलो. नेहमी सारखी टाटा करायला मुलगी बाल्कनीत आली नाहीच !
जवळपास रीकाम्या लोकलने कामावर पोचलो. फ़ोर्ट विभागावर शब्दश: अवकळा पसरली होती. रस्त्यावर शुकशुकाट, हे मुंबईचे रूप मला तरी नवीनच ! आमच्या मुख्यालयाचा दरवाजा बंदच होता. त्याला लागुनच असलेल्या ’पोर्ट भवन’चा दरवाजा सुद्धा बंदच होता. मला बघून सुरक्षा रक्षकांनी दरवाजा उघडला. माझा सिनीयर सहकारी, गिरगावला राहतो, तो सुद्धा आला होता. त्यानेच साहेब रात्री दिडला घरी पोचले पण आता कामावर यायला निघाले आहेत असा निरोप मिळाल्याचे सांगितले. गोदी विभाग, जेथे प्रत्यक्ष मालाची चढ-उतार होते, तिकडेही सामसूम होती. विविध वाहीन्यांचे प्रतिनीधी, पत्रकार फ़ोन करून गोदीची हाल-हवाल विचारत होते. त्यांच्या प्रश्नांच्या फ़ैरींना उत्तरे देणे जड जात होते. साहेब साधारण साडे अकरा वाजता कार्यालयात आले. ते आल्या आल्याच गोदीचा आढावा घ्यायला निघणार होते पण मी लगेच त्यांचाकडून ’त्या’ फ़ाइल वर सही घेतली व शिपायाला ती फ़ाइल ताबडतोब अर्थ विभागात पोचवायला पिटाळले. हुश्श... अर्धे काम तर पार पडले होते ! आता शिपाई आला की अर्थ विभागाच्या प्रमुखांना गळ घालून चेक तयार करायला सांगितले की मला सूटकेचा आनंद मिळणार होता. पण थोड्या वेळाने शिपाई आला व अर्थ विभागात कोणी आलेलेच नाही आहे हे समजले. परत निराशेने मला ग्रासले. तेवढ्यात साहेबांनी फ़ोनवर सूचना दिली की सगळ्या विभाग प्रमुखांना तातडीच्या बैठकीसाठी बोलवून घ्या, जसे असतील तिथून, लगेच ! मी पडत्या फ़ळाची आज्ञा घेउन पहीला कॉल लावला अर्थ-विभागाच्या प्रमुखांनाच. आमचे सगळे अधिकारी कुलाबाच्या कार्यालयीन वसाहतीत राहतात आणि तिथे तर कर्फ़्यु पुकारला होता ! तरी मी सांगितले, ओळखपत्र दाखवा आणि या, पण याच ! पुढल्या वीस मिनीटात सगळे विभाग प्रमुख हजर झाले, अर्थ विभागाचे प्रमुख सुद्धा ! परत गाडी रूळावर आली होती तर ! आता तो कामगार आला की चेक बनणे कठीण नव्हते. परत सूटकेचा आनंद साजरा करता आला, माझ्याकडून सगळी तयारी बाकी होती. आता फ़क्त ’त्याची’ वाट बघणे. पण अगदी पाच पर्यंत वाट बघून सुद्धा तो काही फ़िरकला नाही. दूसर्या दिवशी साहेब मंत्र्यांबरोबरच्या उच्चस्तरीय बैठकीसाठी दिल्लीला जाणार होते त्यामुळे त्यांची सही घेतली हे चांगलेच झाले होते. दूसर्या दिवशी तो नक्की येणार म्हणून कामावर जाणे भागच होते पण तो नाहीच आला ! आता मला वेगळीच काळजी वाटू लागली, त्याचेच तर काही बरे-वाईट झाले नसेल ? तरी मी चेक तयार असल्याची खात्री करूनच घर सोडले. आता मात्र मी पुरता निर्धास्त होतो. तो कधीही का येईना, मी माझा शब्द तर खरा केला होता !
तिसर्या दिवशी तो अगदी सकळीच प्रगटला, अगदी निवांत वाटला, घाई त्याला अजिबातच नव्हती जणू ! “काय, झाली का सही साहेबांची ? मीच नेतो फ़ाईल अर्थ विभागात, शस्त्रक्रीया पुढे ढकलली आहे, काय व्हायचे ते होउ दे आता ! ज्याला त्याला आपल्या जीवाची काळजी, दोन दिवस बायकोने बाहेर सोडलेच नाय बगा, डोळ्याला पदरच लावून बसली होती बगा ! मी बी म्हटलं, कशापारी आनी कोनासाठी जीव धोक्यात घालायचा ? म्हातारं काय , आज नाही परवा खपनारच आहे, पन माझ्यापाठी भरला संसार आहे नव ? आनी मी जरी आयलो असतो तरी तुम्ही थोडीच कोनी येणार होता, , भरोसा तरी कसा बाळगायचा ? खात्रीच होती मला , कोनी कामावर नसणार याची, तेवा म्हणल जाव निवांत, द्या ती फ़ाइल द्या , तशी काय बी घाय नाय म्हना आता !”
त्याला बरच काही सुनवायचे होते, पण शब्दच बाहेर नाही पडले, ’तुमचा चेक अर्थ विभागात तयार आहे, जा आता’ एवढेच मी कसेबसे बोलू शकलो !
शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २००८
रेट !
रेट !
१९८६ ते १९९२ हा गोदीतल्या नोकरीचा काळ खरच परम-सुखाचा होता, त्यात दूसरी पाळी म्हणजे पर्वणीच असायची। आठवड्यातुन ३ दिवस तरी आमची सगळी बॅच संध्याकाळी ६ वाजताच सूटायची. मग मोर्चा वळायचा इंग्रजी चित्रपटगृहांकडे. पोस्टर बघून कोणता चित्रपट बघायचा ते ठरवले जाई ! अर्थात त्यातही अनेकदा फसगत होईच ! शो सूटला की कॅनन ची पावभाजी, ( किंवा कोणी एखाद्या खादाडीच्या नव्या-चांगल्या स्पॉटची माहीती दिलेली असेत तर तिकडे) , मग कालाखट्टा किंवा कूल्फी ! आझाद मैदान किंवा गेट-वे पर्यत फेरफटका आणि मग घर गाठायचे ! फोर्ट भागात सध्याकाळी फेरफटका मारताना लक्ष वेधून घेणारी अजून एक गोष्ट म्हणजे शरीर-विक्रय करणार्या बायका ! आम्ही सगळेच तेव्हा अविवाहीत होतो व 'तसल्या' बायकांबद्दल सुद्धा आमच्यात गप्पा व्हायच्या पण 'तिकडे' जावे असे मात्र कधीच वाटले नव्हते. आमच्यातला एक जण मात्र या विषयात भलताच रस दाखवायचा. एकदा असेच अति झाले आणि माझी तार खसकली. मी म्हटले 'ज्या गावाला जायचेच नाही त्याची वाट कशाला विचारायची ? तेवढी हिंम्मत आपल्यापैकी एकातही नाही, तेव्हा आता ही चर्चा पुरे !" या वर तो मला घाबरट, भागुबाई म्हणून चिडवू लागला. मी त्याला आव्हान दिले की तुझ्यात जर एवढी हिम्मत असेल तर त्यातल्या एकीला फक्त रेट विचारून दाखव ! जर नुसते विचारलेस तरी मी सगळ्यांना कॅनन मध्ये पावभाजी खायला घालीन नाहीतर तू तरी ! त्याने ते आव्हान स्वीकारले !
नगर चौकाकडे आमचा मोर्चा वळला। स्टॉपवर 'त्या' बायका घोळक्याने उभ्या होत्या. हा त्यांच्या दिशेने गेला पण तसाच थोडा टर्न घेउन पुन्हा आम्हाला सामील झाला. मी विचारले तर म्हणाला खूपच थोराड वाटल्या ! मग जीपीओ जवळच्या त्याला खूप लहान वाटल्या. कोठे काय तर कोठे काय ! सगळ्यांना कळून चूकले की गडी फाफलला आहे पण कबूल करत नाही आहे. शेवटी त्याला अल्टीमेटम दिले गेले ! सेंट्रल कॅमेर्यालगतची गोला-लेन बदनाम गल्ली आहे. आम्ही त्या गल्लीत शिरलो इतक्यात त्या भागातली बत्ती गुल झाली ! तिथले एक लॉज 'प्रसिद्ध' आहे, मित्र त्यात शिरला, कोणीतरी साक्षीदार हवा, म्हणून त्याच्या सोबत आणि एक जण गेला. तब्बल २० मिनीटे ते आत होते. मला खात्री पटली की आपले पैसे ढीले होणार आता ! ते दोघेही परत आले तेव्हा तो घाम पूसत होता. आम्ही सगळ्यानी एकदमच विचारले, काय झाले ? तो काही बोललाच नाही पण सोबत गेलेला म्हणाला "हा ना अगदी xx आहे ! याने बर्याच प्रयासाने तोंड तर उघडले, तब्बल दोनदा , पण आधी विचारले काय तर "लाइट केव्हा येणार" आणि नंतर आवंढा गिळत गिळत "तुझा -- तुझा -- काय -- काय -- टायम काय झाला ?" मराठे तू याचे पाणी बरोबर जोखलेस आणि पैज जिंकलास ! पण तो एवढा खजिल झाला होता व त्याचा चेहरा इतका रडवेला झाला होता की त्यावर आम्ही पुढे काहीच न बोलता घर गाठले !
या घटनेला दोन महीने झाले असतील. त्याच्या बरोबरचा 'त्या दिवशीचा' साक्षीदार व माझी एकत्र तिसरी पाळी होती. मागाहुन लोकल पटकन मिळत नाहीत म्हणून आम्ही घरून अर्धा-एक तास लवकरच निघायचो. जीपीओ समोरच एक इराणी आहे. तिकडे आम्ही पानीकम घ्यायचो व रमत-गमत धक्क्यावर जायचो. असेच बस स्टॉपवर उभे असताना याला काय लहर आली कुणास ठाउक, 'मराठे बघ माझी डेरींग' म्हणत त्याने जवळच घुटमळणार्या एकीला खुणेने बोलावले व रेट विचारला ! तीने तो संगितल्यावर याने तोंड फीरवले व आम्ही चालू पडलो. आता मात्र नाटकच झाले. तीने त्याचा हातच पकडला व खडसावून विचारले, "भाव करके कहा जाता है बे xxx, बोल तुझे क्या परवडता है ! " काही कळायच्या आत ३-४ भडव्यांनी आम्हाला घेरले ! प्रसंग बाका होता, हाडे मोडायचीच वेळ आली होती. तो तर पार हडबडून गेला होता. मी आता सावरलो होतो. मी आवाज चढवून माझे सरकारी ओळखपत्र उंच धरले व आम्हाला गोदीत धाड घालायला जायचे आहे, मागाहून काय ते बघू असे दरडावले. त्यांचा विश्वास बसेना, ते आमच्या पाठोपाठ येउ लागले. अर्थात गोदीच्या आत शिरायची हिंम्मत ते करणार नाहीत याची मला खात्री होती. गेट मधून आम्ही आत शिरलो आणि धक्क्याच्या दिशेने धूम ठोकली ! बरेच अंतर त्यांच्या अर्वाच्य शिव्या मात्र आमच्या कानावर आदळतच होत्या !
बुधवार, १५ ऑक्टोबर, २००८
वसा, 'जागते रहो' चा !
वसा, 'जागते रहो' चा !
१९८६ मध्ये मुंबई बंदरात कामाला लागलो तेव्हा आपल्याला तिन्ही शिफ्ट मध्ये काम करावे लागणार याची कल्पना होती। पण जेव्हा प्रथमच तिसरी पाळी केली तेव्हा मात्र पार वाट लागली. आधीच ४४ किलो असलेले वजन चक्क एका आठवड्यात ५ किलो उतरले. नोकरी झेपणारच नाही असे वाटू लागले. रोटा लागल्यावर तिसरी पाळी करायची असेल तर पोटात गोळाच यायचा. काम असो की नसो, झोप अनावर व्हायची. पहाटे ३ ते ५ या वेळेत कोणाला तरी बसवून शेड मध्ये कोठेही मी ताणून द्यायचो, पण झोप पूर्ण काही होत नसे. सर्व आठवडा डोळे तारवटलेलेच असत व तो हॅन्ग-ओव्हर पुढचे काही दिवस राहत असे. शिफ्ट करून लोकलने घरी परतताना वडाळ्याला उतरायच्या ऐवजी, झोप लागल्याने अनेकदा कुर्ला कारशेड पाहीली होती. घरी गेल्यावर बूट कसेबसे काढून हॉल मध्येच ताणून द्यायचो, मग १० वाजता अर्ध-मिटल्या डोळ्यानी सर्व आन्हीके पार पाडून परत झोप, १२ वाजता जेवण, परत संध्या. ६ पर्यत झोप. पण येणारी जाणारी माणसे, रस्त्यावरची वर्दळ याने गाढ झोप लागत नसेच. मग रात्री १० वाजता परत कामावर. सगळेच माझ्या शिफ्टला कंटाळले होते कारण माझी चीडचीड त्यांनाच सहन करायला लागायची, पित्त खवळायचे ते वेगळेच.एकदा अगदी कहरच झाला. कामावर जाण्यापुर्वी थोडी डुलकी लागली आणि चक्क रात्री २ वाजता जाग आली ! दांडी झाली. रजा पास होणार नाही म्हणून खोटे वैद्यकीय प्रमाण-पत्र घेतले पण नियमाप्रमाणे ते दोन दिवसाचे मिळाले व दोन दांड्या झाल्यामुळे पूर्ण तिसरी पाळी परत करायला लागली !
वडील सुद्धा बंदरातच कामाला होते व माझ्याहून जास्त वर्षे पाळ्या करत होते, अगदी गोरेगाव, विरार येथे रहात असल्यापासून आणि अगदी विना-तक्रार ! शेवटी त्यानांच शरण गेलो ! काय करावे म्हणजे ही तिसरी पाळी माझी तिसरी घंटा वाजवणार नाही ? कशी बरे सुसह्य होईल ? बाबा वदले , वत्सा, प्रामाणिक पणे ! संपूर्ण वेळ जागे राहून आणि घरी आल्यावर लगेच अजिबात झोपायचे नाही, दूपारच्या भोजनापर्यंतची सर्व नित्यकर्मे करायची मगच झोपायचे। झोप पूर्ण होईल, कामावर जाताना पेंगुळलेला दिसणार नाहीस, आल्यावर पण प्रसन्न वाटशील ! हा वसा नीट पाळ, उतू नकोस, मातू नकोस, तुझे भले होईल !
आणि खरच चमत्कार झाला. सुरवातीला रात्री कामावर जागणे कठीण गेले पण मग सलग ७ तास जरा सुद्धा थकवा न येता काम करायची सवय लागली ! मी तिसर्या पाळीत जागा असतो हे कळल्यावर अनेक जण का कोण जाणे, मला टरकून राहू लागले, धक्क्यावर काम करणारे कामगार सलाम मारू लागले, यो सायब लय कडाक हाय असे म्हणू लागले. सहकारी मात्र मी जागतो आहे म्हटल्यावर बिनघोर झोपू लागले पण त्या बदल्यात दिवसा मला सांभाळू लागले. वरीष्ठांकडून मान मिळू लागला. काम नसेल तेव्हा झोप येउ नये म्हणून वाचायची सवय लावून घेतली तीचा पण चांगलाच फायदा झाला. पुस्तकांशी परत मैत्री झाली. नव्या विचारांचे दालन खुले झाले. असेच एकदा रात्री दोन वाजता आमच्या बॅलार्ड पियरच्या धक्क्याजवळ असताना, कस्टमचा कोणी शिपाई पहाडी आवाजात लोकगीत गात होता. त्या आवाजाने तिकडे शब्दश: ओढला गेलो ! गाणारा खरच भान हरपून गात होता आणि ऐकणारेही तल्लीन झाले होते. ती अवीट मैफल कानात अगदी साठवून ठेवली आहे. शेवटी त्याने "ढलता सूरज धीरे -- " म्हणून त्यावर चार चांद लावले ! अशीच मग काम नसेल तेव्हा गेट-वे-ऑफ-इंडीया पर्यंत रात्री भटकायची सवय लागली, सोबत कोणी असेल तर ठीकच, नाहीतर एकला चलो रे ! रात्रीची अंगावर शहारा आणणारी मुबई अगदी जवळून बघता आली. भीती पण दूर झाली. असेच मग पहाटे टपरीवर इस्पेसल चाय आणि खारी विकणारा एक मित्र झाला. त्याच्या तोंडून या माया-नगरीचे अनेक रंग उमगले, जणू नवे दालनच खुले झाले !
संगणक विभागात आल्या पासून तब्बल १६ वर्षे दिवस पाळीच करतो आहे पण जागरणाचे काहीही वाटत नाही. याचा उपयोग मुलगी आजारी असताना, सतत तीन रात्री जागून काढताना झाला आणि सासर्यांच्या अखेरच्या दिवसात तीन रात्री जागून त्यांची सुद्धा सेवा करता आली. जागरणाचा आता मला कोणताही side effect होत नाही ! प्रामाणिक पणे काम केल्यामुळे जणू निद्रा देवी मला प्रसन्न झाली आहे !
शनिवार, ४ ऑक्टोबर, २००८
ओळख आणि तपास !
ओळख आणि तपास !
साधारण दूपारची दोनची वेळ असेल, जरा कमी कामाची वेळ। याच वेळी मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आले. एका खुनाच्या तपासासाठी त्यांना मदत हवी होती. मुंब्र्याच्या एका लॉज मध्ये एका मुस्लीम बाईचा खून झाला होता. मृत महीलेची ओळख पटत नव्हती पण तीच्या सामानाते एक खोके सापडले होते व त्यावर काही नंबर व "PORT MUMBAI" असे छापलेले होते. तोच धागा पकडून आमची अनेक कार्यालये पालथी घालून तो आता माझ्याकडे आला होता. हा खरतर सूतावरून स्वर्ग गाठण्याचाच प्रकार होता पण त्याला नाराज करणे बरे वाटले नाही म्हणून मी तो मार्क व त्याचा फोन नंबर लिहून घेतला. आमच्या सिस्टीम मध्ये निदान लाखभर तरी रेकॉर्डस होते, त्यात तो नंबर सापडणे अवघडच होते, म्हणजे तसे हजारो नंबर सापडले असते. पण मग जरा विचार केल्यावर प्रयत्न करायला हरकत नाही असे वाटू लागले.
माल बाहेर सापडला होता, म्हणजे जे आयटम अजून pending होते ते बघायची गरज नव्हती,
बाईच्या खूनाची साधारण तारीख होती, त्या तारखेच्या आत सोडवलेला माल तपासायचा,
तो माल बॅगेज या प्रकारचा असावा, मग त्यात पण आयटम टाइप UB च तपासायचा,
आयातदाराच्या पत्त्यात , मुंबई हा शब्द असेल तरच पुढे जायचे !
असा पद्धतशीर 'सर्च' केल्यावर तपास लागला ! त्या बाईचे नाव, पत्ता, तीला तो माल कोणी पाठवला होता त्याचा ठाव-ठीकाणा पण लागला ! पोलीस मग त्या बाईच्या नागपाड्याच्या पत्त्यावर गेले तेव्हा ती बाई missing असल्याचे त्यांना कळले व लगेच तीच्या फोटोवरून मृतदेहाची ओळख पटली ! एकदा ओळख पटल्यावर खुनाची उकल करायला पोलीसांना फारसा वेळ लागला नाही. अनैतिक संबंधातुनच हा खून झाला होता. पोलीसांनी आमच्या विभागाचे आभार मानले. बक्षिसासाठी माझ्या नावाची शिफारस पण झाली होती पण त्याचे पुढे काय झाले याचा अजून तपास लागायचा आहे !
मंगळवार, २३ सप्टेंबर, २००८
भेट !
भेट !
शनिवारची गोष्ट, संध्याकाळी ५:०० वाजता साहेब निघणार म्हणून वर्दी मिळाली, आज लवकर सूटका कोणार या आनंदात आवराआवर करायला घेतली पण लगेच निरोप आला, जाणे cancel ! साहेबांनी 'मुख्य अभियंता' आणि 'उपाध्यक्ष' यांना बोलावून घेतले आहे ! पुन्हा PC On केला. ५:३० वाजता सिक्युरीटीवाल्याने फोन केला , " पुसद वरून कोणी आलाय, सायबाला भेटायचे म्हणतो, काय करू ?". मी त्या माणसाला फोन द्यायला सांगितले. "तुम्ही साहेबांना कसे ओळखता ?".
त्याचे उत्तर " ते १९८४ मध्ये यवतमाळला 'मुख्य कार्यकारी अधिकारी' होते, त्यांच्या हस्ते मला बक्षिस मिळाले होते"
अहो, आता २५ वर्ष झाली या घटनेला, मध्ये कधी भेटला होतात का ?
नाय बा ? आमच्या गरीबाला काय पडतय कारण ?
अहो, मग आता का ?
असेच, सहज, सायबाच्या बंगल्यावर फोन लावला, बाईसाहेब बोलल्या साहेब कामावरच आहेत. पत्ता शोधत शोधत आलो, झालं ! नुसता एक वार भेटू द्या !
सोड बाबा त्याला आत, पण आधी मला भेटायला बोल !
जरा वेळाने, मराठे सायब कोण ? असे विचारत तो आला, बरोबर अजून एक.
मी विचारले, आता हे कोण अजून बरोबर ?
लगेच बरोबरचा म्हणाला "माझ काय नाही साहेब, आपला याच्या बरोबर आहे, याला भेटवा, मी बाहेरच थांबतो".
लगेच त्याने माझ्या हातात पेपरचे एक कात्रण टेकवले, "हे साहेब, आणि यो म्या"
त्या कात्रणावर निदान ५० तरी फोटो होतो. सगळ्यात मोठा फोटो आमच्या साहेबाचा, त्यांच्याच शब्दात ते 'तरूण आणि तडफदार' सनदी अधिकारी असतानाचा ! आणि मग सरपंच, जिल्हा परिषदेचे बाकी सदस्य, गट प्रमुख, आणि मग शेवटच्या ओळीत 'याचा' फोटो ! मी कपाळावर हातच मारणार होतो. कोठे ही नसती ब्याद पाठी लावून घेतली, आता साहेबाला सांगू तरी काय ? सहकारी खुणेने त्याला कटव (हाकल्) असे सूचवत होते !
"खरंच तुमचे अजून काही काम नाही", मी .
दोघात थोडी चलबिचल ! मग एक दूसर्याला म्हणतो, सांग की खरे काय ते.
साहेब, मुलीच्या नोकरी साठी सबूद टाकायचा होता. साहेब आधी महावितरण च्या संचालक पदी होते. त्यांचा एक फोन काम करून जाईल बघा ! तसे काम झालेलेच आहे, waiting list वर आहेच ती, हे बघा पत्र.
मी ते बघितले आणि थक्कच झालो. ती मुलगी चक्क MCA होती व सहायक अधिकार्याच्या पदासाठी निवडली गेली होती. आता माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पार बदलला. या खेड्वळ वाटणार्या माणसाने, मुलीला एवढे शिकवण्यासाठी किती खस्ता खाल्या असतील ? माझा बदललेला भाव बघून सोबतचा पण बोलला माझी याच्या पोरी बरोबरच waiting वर आहे. मी आता त्यांना बसा म्हटले. चहा सांगितला. चहा नको, नुसते पाणी पाजा, येथवर पोचेपर घशाला पार कोरड पडली आहे ! ती पाणी पीत असतानाच मी साहेबाला हे सांगण्यासाठी गेलो. तेवढ्यात उपाध्यक्ष आत गेले. परत १० मिनीट थांबावे लागले. मग आत गेलो, ते कटींग त्यांना दाखवले, दबक्या आवाजात "आता पाठवू ?" असा प्रश्न केला. साहेबानी नुसती मान हलवली. म्हणजे वांदा ! हो की नाही ! but be always positive, मी त्याचा अर्थ 'हो' असाच घेतला व त्यांना आत बोलावले. अगदी दोघांनाही ! त्यांनी चपला बाहेरच काढल्या, का तर सायबाच्या पाया पडायचय ! त्याच्या आत मी केबिनच्या बाहेर पडलो !
जरा वेळाने ते आले ते हात जोडूनच ! साहेब देवमाणूस हाय, कागद ठेउन घेतले, सबूद दिला आहे, काम व्हणार ! त्यांना अगदी कृतार्थ वाटत होते. माझ्या मात्र पाया पडायचा त्यांचा प्रयत्न फोल ठरवला व त्यांना निरोप दिला.
आत आल्यावर सिनीयर कातावले. मराठे, अशा लोकांना फूटवायला शिक आता !
मी शातपणे म्हटले, "लोक आपल्याला शंकरापुढचा नंदी म्हणतात ते योग्यच आहे, पिंडीवरच्या विंचवापेक्षा नंदीच बरा नाही का ? माझे काही चूकले असे मला तरी वाटत नाही. त्याच्या डोळ्यातले समाधान माझ्यासाठी एक ठेवा आहे !
शनिवार, २० सप्टेंबर, २००८
बॅक-अप नव्हे रोल-बॅक !
बॅक-अप नव्हे रोल-बॅक !
१९९८ मध्ये आमच्याकडे वेतन वाढीचा करार झाला. दोन वर्ष वाटाघाटी चालल्या व १९९६-२००६ असा १० वर्षाचा करार व्यवस्थानाबरोबर झाला. आता मागची दोन वर्षाची थकबाकी द्यावी लागणार होती. संगणकावर पगार-पत्रक आधीच घेतले असल्यामुळे थकबाकीचे काम सुद्धा संगणाकाच्याच सहाय्याने करायचे ठरले. त्या मुळे वेळ व जादा कामाचा भत्ता पण वाचणार होता. आमच्या ११ विभागात एकाचवेळी हे काम चालू करण्यात आले. साधारण महीन्याभरात काम पूर्ण करायचे होते. प्रत्येक विभागाने माझ्या कार्यालयात माणूस पाठवून आठवड्यातुन एकदा सेफ्टी बॅक-अप घ्यावे असेही ठरले. त्या प्रमाणे सगळे व्यवस्थित चालले होते. ठरल्या वेळेत सगळे काम आटोपले. अभियांत्रिकी(CE) विभाग थोडा मागेच होता पण शेवटच्या आठवड्यात त्यांनी जोर लावून सगळे काम पूर्ण केले. त्यांचा एक माणूस बॅक-अप घेण्यासाठी cartridge घेउन माझ्याकडे आला. मी कामात असल्यामुळे अतुलने ते काम आपल्याकडे घेतले.
CE विभाग सोडून बाक्या सगळ्या विभागांची थकबाकी पत्रके तयार झाली. CE वाले मात्र काहीतरी गोंधळ झाल्याचे सांगत होते. त्यांच्या विभगाची थकबाकी अगदीच कमी येत होती. अधिक तपास केल्यावर कळले की त्यांनी शेवटच्या आठवड्यात भरलेली माहीती गुल झाली होती. प्रकरण माझ्या संगणक विभागाकडे आले. मी बॅक-अप रजिस्टर तपासले. मग त्या विभागाच्या संगणकावर असलेल्या डाटा फाइलची तारीख तपासली आणि सगळा घोळ लक्षात आला ! शेवटच्या बॅक-अप चे आधीचे बॅक-अप नेमके त्याच तारखेला घेतले होते ! मी अतुलला बोलावले आणि बॅक-अप काय कमांड देउन घेतलेस ते विचारले. अतुल ने tar -xvf असे सांगितले. खरे तर ही कमांड cartridge वरचा डाटा हार्ड डिस्क वर घेण्यासाठी द्यायची असते. त्यामुळे नवीन केलेल्या कामाचे बॅक-अप घेतले जाण्या ऐवजी रोल-बॅक झाले होते आणि आता परत सगळे काम करण्यावाचून गत्यंतर नव्हते ! सगळेच नवे असल्यामुळे याची आम्ही फारशी वाच्यता केली नाही आणि computer mistake असे नमूद करून त्या प्रकरणावर पडदा टाकला. पण आता झोपेतही अतुल कधी कधी tar -cvf बॅक-अप घेण्यासाठी, tar -xvf री-स्टोर करण्यासाठी आणि tar -tvf बॅक-अप काय घेतले ते बघण्यासाठी असे घोकत असतो !
शुक्रवार, १९ सप्टेंबर, २००८
मेमो !
मेमो !
ऑस्करची मुंबै बंदरातली नोकरी व माझी संगणक विभागातली उमेदवारी बरोबरच सुरू झाली. वयात फारसा फरक नसल्याने मैत्री ही जमली. जसा कामाचा पसारा वाढला तसा कामत नावाचा अधिकारी आमच्याकडे नियुक्त झाला. त्याने ऑस्करला आम्हा बद्दल भलते सलते भरवायला सुरवात केली. हे गोदी विभागातले लोक पक्के लबाड, बनेल असतात. त्यांच्या बरोबर राहून तू बिघडशील ! हळू हळू ऑस्करने आमच्यात मिसळणे बंद केले. मग केव्हातरी दोन विभागांचे हीतसंबंध आडवे येउन आमच्या छुपे वैर निर्माण झाले. तांत्रिक ज्ञानात आम्ही कच्चे होतो आणि या मुळेच ऑस्कर येता जाता आमचा पाणउतारा करू लागला. हे सगळे असह्य झाल्यावर अभ्याने त्याला धडा शिकवायचे काम माझ्यावर सोपवले. मी लगेच ऑस्करची संपूर्ण माहीती गोळा केली. तो 'सहानुभुती तत्वावर' कामाला लागला होता. १२ वी पण पास नव्हता. त्याला बराच ओव्हर टाईम मिळत होता, तो काही बाहेरची कामेही करत होता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याला मिळत असलेल्या ओव्हरटाईमने त्याच्याच विभागाची माणसे त्याच्यावर खार खाउन होती.
सर्व माहीती काढल्यावर मी एकदा ऑस्करच्या कानावर घातले की तुझ्या विभागाची माणसे तुझी फारच खोलात चौकशी करत आहेत, तेव्हा सावध रहा, खोटा ओव्हरटाइम लिहू नकोस, गोत्यात येशील. पण ऑस्करने माझे बोलणे उडवून लावले. कामत साब मेरे पीछे है, मै किसको डरता नही ! नंतर एक आठवड्याने त्याला कामावर आल्या आल्या एक बंद पाकीट दिले, त्याच्याच नावाचे, आमच्या सतर्कता विभागाचे (vigilance)! घाबरतच त्याने ते उघडले. पत्र वाचताच त्याचा चेहरा साफ पडला, भेदरला पार तो. "सालो ने मेरा vigilance मे कंम्लेंट किया , अब क्या होगा? जरा पढो तुम भी ! मला पत्र वाचायची काय गरज होती, मीच तर ते लिहीले होते ! मी साळसूदपणे बोललो, "i have warned you, but -- जाओ, कामत साब को दिखाओ, तुम्हारे godfather है ना !" कामत एक नंबरचा टरक्या होता. vigilance चे नाव येताच त्याने ऑस्करची साथ सोडली ! मग अभ्याने त्याला कोपच्यात घेउन समजावले, " ये मराठे है ना, उसकी पहुंच बहुत है, वो ही तुम्हे बचा सकता है" झाले, ऑस्कर माझ्या खनपटीलाच बसला. "मेरा गलती हुआ, कामत ने मुझे भडकाया, पुराना सब भुल जाकर मुझे बचाओ!" मी पण गंभीर झाल्याचा आव आणला व ते पत्र आधी माझ्या ताब्यात घेतले. "मॅटर सिरीयस है, लेकीन अपने दोस्त के लिये जान भी हाजिर है , don't worry, i will study and reply to this memo !" ऑस्कर भलताच खुश झाला. मग संध्याकाळी हॉटेलात बसून आम्ही फराळ करत चर्चा करायचो, उत्तराचा draft बनवायचो, नीट नाही उतरला म्हणून फाडून टाकायचो. बिल आले की ते ऑस्करच्या पुढ्यात टाकायचो, बडीशेप खाउन चालू पडायचो ! असे ऑस्करला बरेच झुलवल्यावर, त्याचा खिसा हलका केल्यावर मी draft final केला, त्याची वर सही घेतली, बाजू मांडायची माझ्याकडे authority घेतली व मग महीनाभराने केस फाईल करून टाकली, म्हणजे, दोन्ही पत्र फाडून टाकली हो ! ऑस्कर अजूनही जो भेटेल त्याला "भटने मेरी नौकरी बचायी" असे सांगत असतो !
गुरुवार, १८ सप्टेंबर, २००८
गुरू-घंटाळ - एक तीन अंकी नाट्य !
गुरू-घंटाळ - एक तीन अंकी नाट्य !
प्रवेश पहीला
काळ १९९३. माझी संगण विभागात उमेदवारी चालू होती. साहेब पण नवेच होते, नियोगी नावाचे बंगाली बाबू. चेन स्मोकर, धूरांडेच. जरा जोडून सुट्ट्या आल्या की साहेब त्यांचे गाव गाठायचे आणि आरक्षणाचे काम टाकायचे त्यांच्या शिपायावर, भोसलेवर ! बिचारा भोसले, भल्या पहाटे रांग लावून टोकन घ्यायचा, दूसर्या दिवशी तिकीटा करीता दोन-एक तास रांगेत थांबल्यावर मोठ्या कौतुकाने साहेबाला तिकीट दाखवायचा पण तो पर्यंत साहेबाचा विचार आणि प्रवासाची तारीख बदललेली असायची, किंवा सीट नंबर संडासजवळचे आहेत असे सांगून त्याला परत रद्द करण्याकरीता पिटाळत ! परत सगळा सव्यापसव्य ! असाच एकदा साहेबाच्या केबिनमधून बाहेर आलेला भोसले माझ्या समोर मटकन बसला आणि काकूळतीने म्हणाला, "यातुन मला सोडवा !" मी ही लगेच त्याला प्रसन्न झालो व त्याला एक कानमंत्र दिला. आधी नाही नको म्हणणारा भोसले 'तुम्ही साथ देणार ना ?" असे कन्फर्म करून तयार झाला.
प्रवेश २
दूसर्या दिवशी साहेबांनी 'भोसले अबतक कैसा नही आया' असे निदान चार वेळा तरी विचारले. साधारण ३ वाजता भोसले आला, आमची नेत्रपल्लवी झाली. मी धावत पळत साहेबाच्या केबिन मध्ये गेलो आणि घाबर्या-घुबर्या आवाजात 'साहेब भोसले' एवढेच बडबडत राहीलो. वैतागुन साहेब केबिन बाहेर येताच भोसलेने त्याचे पाय घट्ट पकडले आणि थोबडीत मारून घेउ लागला ! मी भोसलेला 'काय झाले ते सांग' असे सांगितले तेव्हा मोठ्या प्रयासाने भोसलेने सांगितले की मी रांगेत उभा होतो, साधारण दोन तासाने नंबर नंबर जवळ आला तेव्हा पैसे काढायला खिषात हात घातला तेव्हा कोणीतरी गर्दीत पाकीट मारल्याचे कळले. साहेबाला मी या सगळ्याचे इंग्रजी भाषांतर करून सांगितल्यावर त्याने नुसता थयथयाट चालू केला ! xxx च्या भाषेत कोकलून दमल्यावर त्याने मला त्याचा रीपोर्ट करायला फर्मावले. मी साळसूदपणे काय लिहायचे असे विचारले तर उतर आले जे झाले ते लिही. तो सस्पेंड झाला पाहीजे ! मी त्यांना समजावले की असे काही केलेत तर तुम्हीच सस्पेंड व्हाल कारण कामावरच्या कर्मचार्याला असे व्यक्तीगत कामासाठी पाठवता येत नाही ! आता मटकन बसायची पाळी साहेबाची होती ! मतलब मेरा ४००० रूपया ये xxx के xxx मे गया ? आता भोसले कसलेला अभिनेता बनला होता. वेड्यासारखे हातवारे करत होता, मध्येच 'मै पाई-पाई चूका दूंगा' असे बरळत होता आणि शेवटी गलीतगात्र झाल्यासारखा फतकल मारून बसला, मग गुडघ्यात डोक खुपसून रडू(?!) लागला. नाटक छान वटले, साहेब वरमला, शांत झाला. बादमे देखेंगे म्हणून निघून गेला. पुढचे काही दिवस भोसले अभिनयाचे नवे नवे रंग दाखवत होता आणि नियोगी साहेब पार हादरून गेला होता ! शनिवारी साहेबांना हाफडे असतो. ते गेल्यावर मी भोसलेला बोलावले व आता नाटक पुरे झाले , कामाला लाग म्हणून सांगितले. लगेच भोसलेने माझे पाय धरले व अजून काही दिवस थांबूया, लय मजा येते आहे असे म्हणू लागला. मी बोललो आता हा खेळ पुरे झाला. कामाला लाग. तर त्याने एकदम आक्रमक पवित्रा घेतला. तुम्हीच मंत्र दिलाय, मी आता असाच वागणार, कोण माझे काय करते (उखडते/उपटते) ते बघू अशी भाषा करू लागला ! भोसले असा उलटल्यावर माझा सगळा स्टाफ स्तंभितच झाला व आता मी काय करणार अशी चर्चा होउ लागली.
प्रवेश ३
काही क्षण गोंधळाचे गेले व मग शांतता पसरली. "भोसले बापाला xxxx शिकवतोस ? उपकाराची फेड अशी करतोस ? तुला काय वाटले असे ढोंग मी खपवून घेईन ? आता मी काय सांगतो ते नीट ऐक आणि मग काय ते सांग. माझ्या आवाजातली जरब, भाषा ऐकून भोसलेचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. शॉक बसावा तसा तो ताडकन उभा राहीला. अपेक्षित परीणाम साधल्यावर मी पुढे बोललो, "तुझे जॉब कार्ड बघ 'त्या' दिवसाची तुझी हजेरी मी लावलेली आहे पण लेबर रीटर्न मध्ये स्पष्ट रीमार्क पास केलाय , ८:०५ ते ३ वाजेपर्यंत मिसींग म्हणून तसेच तुझा मिसींग रीपोर्ट पण तयार आहे आणि वेड्याचे नाटक केलेस तर ambulance बोलावून तुला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवू शकतो, मग ३ महीने सक्तीची रजा आणि मग तू खरंच वेडा कसा होशील हे तुला पण कळणार नाही ! आणि हो , उद्या साहेबाचे ४००० रूपये माझ्याकडे आणून द्यायचे !" भोसलेला ५०० वोल्टचा शॉकच बसला जणू ! आता त्याने माझे पाय धरले पण तो अभिनय नक्कीच नव्हता ! भोसले सुतासारखा सरळ झाला. त्याने साहेबाचे पैसे आणून दिले व मी ते लगेच त्यांना परत केले. भोसले शहाणा झालेला बघून नियोगी साहेबाला वेड लागायची पाळी आली. 'मराठे ये कैसा हुआ ?', मी सांगितले की 'पागल आदमी कभी कभी शॉक देने के बाद सुधर जाता है' !
रविवार, ३१ ऑगस्ट, २००८
बुलडॉग !
बुलडॉग !
आमचे एक विभागप्रमुख होते, कोब्राच होते, त्यांचे खरे नाव मी त्यामुळे घेणार नाही. पण बुलडॉग या नावानेच ते जास्त ओळखले जायचे ! त्यांची देहयष्टी व देहबोली दोन्ही या नावाला अगदी सार्थ होत्या. हाताखालच्या माणसांना फायरींग कशी द्यायची हे त्यांच्याकडून शिकावे ! कोब्रात जेवढे काही गुण(?) असतात, त्यांचे ते अगदी माहेरघर होते. तिरके बोलणे, खोचक बोलणे, शालजोडीतले मारणे या सर्वच प्रकारात त्यांची मास्टरी होती ! मला कधी त्यांची फायरींग झेलावी लागली नाही पण तृतीय श्रेणी कर्मचार्यासमोर आपल्या हाताखालच्या अधिकारार्यांना झापणे त्यांना भारी आवडायचे. त्यामूळे तो अधिकारी पुरता शरमिंदा होउन जायचा. त्यांचा फोन जरी आला तरी अधिकारी उठून उभे रहात ! त्यांच्या केबिनमधून बाहेर आलेला अधिकारी 'सूटलो' म्हणतच, घाम पूसत बाहेर यायचा. ते राउंडला आले तरी त्या भागात भयाण शांतता पसरायची. त्यांच्यासमोर कधी कोणाला बोलताना कोणी पाहीले, ऐकले नसेलच ! पण माझ्या संगणकविभागाचे त्यांना बरीक कौतुक होते. मी स्वत:हुन त्यांच्या समोर कधी गेलो नाही पण अनेक मोठे पाहुणे त्यांच्यासोबत आमच्या संगणक विभागात येत.
नोकरीवरचा त्यांचा शेवटचा दिवस होता आणि स्वारी चक्क सकाळी आठ वाजताच माझ्या कार्यालयात धडकली. मुड चांगला होता बहुतेक. चक्क माझे व माझ्या विभागाचे, टापटीपेचे, स्वच्छतेचे त्यांनी मनापासून कौतुक केले. आज माझा कामावरचा शेवटचा दिवस, तुम्ही सगळे परत भेटणार नाही म्हणून तुम्हाला खास भेटण्याकरता आलो असे सांगून ते परत निघाले आणि भूकंप झाला जणू ! बाथरूमच्या दिशेने चेहर्याला दाढी करण्यासाठी फेस लावलेला, भोके पडलेला बनियन व घेरदार पोटावर अतिशय तोकडा पंच घातलेला माणूस त्यांच्या नजरेस पडला ! बुलडॉगने भेदक घार्या नजरेने त्याला नखशिखान्त न्याहाळले. त्या नजरेनेच त्या माणसाला आपले भवितव्य कळले, त्याला दरदरून घाम फूटला, पोटावरचा पंच कधीही घसरून पडेल असे दिसू लागले. माझ्या पण तोंडाला कोरड पडली ! 'who is he ?' ते कडाडले ! 'जबान पे ताला लगना' म्हणजे काय ते मी अनुभवत होतो. मी 'हा म-म-म---' असा लूप मध्ये गेलो असतानाच ते 'Oh, mazdoor !' एवढेच म्हणाले व निघाले, पण त्या शब्दातली तुच्छता , तिटकारा, घृणा निव्वळ अनुभवण्यासारखीच होती ! शिकारीला बाहेर पडलेला वाघ सशाच्या पाठी कशाला पडेल ? त्यांना मी दारापर्यंत सोडले पण आता हा महम्मद माझी कुर्बानी करणार या भीतीने मला पछाडले होते. तो मला बराच वरीष्ठ होता. तो तिसर्या पाळीला होता आणि फ्रेश होउनच घरी परत जाणार होता. त्याला आम्ही ममद्या म्हणायचो पण साहेबांना सांगताना मी त्याचे मूळ नाव आठवायचा प्रयत्न करत होतो पण 'म' चा अर्थ साहेबांनी मझदूर असा घेतला होता आणि मी त्याला मुंडी डोलावली होती ! ममद्यासमोर, खाटकासमोर बकरी जशी उभी राहते तसा मी उभा राहीलो पण झाले भलतेच ! 'मराठे, आज मान गये यार ! तुमने मेरी नौकरी बचायी ! तुम्ही ये सुझा कैसे ?' हे ऐकून मी उडालोच ! मग तर त्याने मला मुसलमान ईदच्या दिवशी मारतात तशी तीनदा मीठी सुद्धा मारली. बाकी बघणार्याना शिवाजी व शाहीस्तेखानाची भेट परत आठवली ते वेगळे !
शनिवार, ३० ऑगस्ट, २००८
मुंबई बंदराला मिळाले बारा हत्तींचे बल(ळ) !
मुंबई बंदराला मिळाले बारा हत्तींचे बल(ळ) !
साधारणपणे २००४ सालातली गोष्ट असेल. आमची नवी प्रणाली, IPOS (Integrated Port Operations System) कार्यान्वित झाली होती. सगळेच नवे असल्यामुळे जरा गोंधळ होत होताच. काही तक्रारी वरपर्यंत गेल्या होत्या. अशाच एका सकाळी , साधारण दहाच्या सुमारास श्री.शेख (मुख्य सुरक्षा अधिकारी, 'ते तिघे' मधले एक !), अजून एक अधिकारी सोबत एका track suit घातलेल्या व्यक्तीला घेउन आले ! मध्यम उंची, दणकट बांधा, चेहर्यावर आत्मविश्वास आणि अधिकाराची झाक असे ते व्यक्तीमत्व होते. माझ्याच शेजारी बसून ते नव्या प्रणालीची माहीती घेत होते. बरोबरचा दूसरा अघिकारी भयंकर दडपणाखाली वाटत होता तेव्हा शेकसाहेबांच्या इषार्या सरशी मी सूत्रे हाती घेतली. नव्या प्रणालीची इंत्यभूत माहीती मी त्यांना दिली. त्यांचे समाधान झाल्यासारखे वाटत असतानाच त्यांनी विचारले की 'कालच्या दिवशी गोदी विभागाला किती उत्पन्न मिळाले ते मला चटकन कळू शकेल का ? या प्रश्नाने मी उडालोच ! हा आहे तरी कोण ? मी त्यांना हवी असलेली माहीती जनरेट करून दाखविली, त्यात काही सुधारणा सुचवून ते निघून गेले. त्यांना सोडून शेख साहेब परत आले. मला शाबासकी दिली. मी विचारले कोण होते ते ? शेख साहेब म्हणाले 'You don't know him ? That's why you are so cool !' अरे ते आपले नवे उपाध्यक्ष श्री अशोक कुमार बल, I.R.S !
आमचा आधी अगदी ठाम विश्वास होता की जो पर्यंत समुद्राला भरती ओहोटी आहे , तो पर्यंत आम्हाला रोजी-रोटीची काळजी नाही. पण या विश्वासाचे कधी भ्रमात रूपांतर झाले ते कळलेही नाही. माल हाताळणीचा pattern बदलू लागला होता. मालाची अधिकाधीक हाताळणी डब्यातुन होउ लागली. सुट्या मालाची हाताळणी करणार्या बोटी बंदरात १० ते ३० दिवस तळ ठोकून असत पण कंटेनर जहाजे , अद्ययावत साधने असतील तर एका दिवसात काम संपवत ! निव्वळ अशा जहाजांना सोयी पुरवण्यासाठी केंद्र सरकारने हाकेच्या अंतरावर 'जवाहरलाल नेहरू बंदराची' (जुने नाव न्हावा-शेवा बंदर) उभारणी केली. साहजिकच महाकाय आकाराची जहाजे याच बंदरात जाउ लागली. याची झळ आम्हाला १९९८ मध्ये जाणवली ती प्रथमच operating loss झाल्यावर ! या आधी बंदर सतत शिलकीतच होते ! अनेक कल्याणकारी योजनांना कातर्या लावल्या गेल्या. १२५ वर्ष जुने जहाज बुडू लागले. अनेक बडे अधिकारी राजीनामे देउन जाउ लागले. जहाजांविना गोदी भकास दिसू लागली. या बुडत्या जहाजाचे सारथ्य आता श्री. बल यांच्या खांद्यावर आले होते.
माझ्या सारख्या गोदी विभागात कारकून असलेल्याला एरवी अध्यक्ष / उपाध्यक्ष कोण याचे काहीही देणे घेणे नसते. पण आता स्थिती वेगळी होती. भरकटणारे तारू सांभाळण्यासाठी समर्थ कप्तानाची गरज होती आणि बल साहेबांनी दणक्यात सुरवात केली. मुंबई बंदराचा मुख्य आधार आमचा गोदी विभाग आहे हे त्यांनी लगेच हेरले व सुधारणांना तिकडूनच सुरवात केली. कामगारांना शिस्त लावली, फाजील ओव्हरटाईम पूर्ण बंद केला, पीसरेट पद्धतीत सुधारणा केली, खाजगीकरणाच्या माध्यमातुन माल हाताळणीचा वेग वाढविला. कंटेनर जहाजांच्यापाठी वेळ घालवण्यापेक्षा जे बंदराचे बलस्थान आहे, सुटया मालाची हाताळणी , यावरच त्यांनी लक्ष केंद्रीत केले. त्यासाठी आयातदार, निर्यातदारांना, जहाज एजंट यांना अधिक सोयी दिल्या, जागा उपलब्ध करून दिली. त्यांच्या समस्या जाणण्यासाठी व्यापार वृद्धी विभाग (Business Developement Cell ) स्थापन केला. याच काळात भारतीय मोटार उद्योगाने कात टाकली. आपल्या गाड्यांना परदेशात मोठी मागणी होती. ही निर्यात बल साहेबांनी मुंबई बंदरातुन व्हावी म्हणून विषेश प्रयत्न केले. माल नसल्यामुळे मोकळया पडलेल्या जागेवर आता निर्यातीसाठी आलेल्या गाड्या दिसू लागल्या ! त्याच वेळी उदारीकरणाच्या धोरणामुळे भारतात उच्च मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा खेळू लागला होता व समुद्र पर्यटनाचे परदेशातील लोण भारतात येउन पोचले होते. बलसाहेबांनी नेमकी ही संधी हेरली व या वाहतुकीचा फार मोठा हीस्सा मुंबई बंदराकडे वळवला गेला.त्या करीता क्रूझ विभागाची स्थापना केली गेली. जाहीरातबाजीची आम्हाला आधी कधी गरजच पडली नव्हती पण काळाची गरज ओळखून अनेक व्यापार विषयक प्रदर्शनात आमचाही स्टॉल दिसू लागला ! वेगवेगळ्या वृत्तपत्रांतुन मुंबई बंदरातील प्रत्येक नव्या घडामोडीची दखल घेतली जाउ लागली. वृत्तपत्रांच्या प्रतीनिधींबरोबर त्यांनी अतिषय सलोख्याचे संबंध जोपासले व त्यातुनच मुंबई बंदराची चांगली प्रतिमा लोकांसमोर उभी राहू लागली. संगणकीकरणाची प्रक्रीया धीम्या गतीने चालू होती ती त्यांनी अधिक गतिमान केली. कोबोल जाउन oracle 9i आले ! सर्व प्रणालींचे सूसूत्रीकरण केले गेले. याचाच फायदा पुढे ISO 9001 हे मानांकन मिळण्यात झाला. चार वर्षाच्या अथक प्रयत्नांना यश लाभले, भरकटणारे मुंबई बंदराचे जहाज सुरक्षितपणे धक्क्याला लागले ! बल साहेबांनी याचे श्रेय मात्र सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाला दिले !
'त्या' भेटीनंतर आमची पुन्हा कधी भेटही झाली नव्हती, व्हायचे काही कारणही नव्हते. अचानक २३ जुलैला मला फोन आला, मोठी जबाबदारी पार पाडायला तयार आहेस का ? मी लगेच होकार कळवला. दूसर्याच दिवशी अध्यक्षांचा खाजगी सहायक म्हणून नियूक्तीचे पत्र हातात पडले ! ३० जुनला अध्यक्षा सौ. राणी जाधव सेवा-निवृत्त झाल्या होत्या व नवीन अध्यक्षाची घोषणा होईपर्यंत बला साहेबांकडेच अध्यक्षपदाचा अतिरीक्त भार देण्यात आला होता. त्यांच्या दिमतीला नवा कर्मचारीवर्ग देण्यात आला त्यात माझी निवड झाली. जे स्वप्नातही नव्हते ते प्रत्यक्ष घडले. नियुक्तीच्या दिवशी ते दोन दिवस दिल्लीला गेले होते. त्यानंतर मी जाउन त्यांची भेट घेतली. 'तुझ्या बद्दल बरेच चांगले मी ऐकून आहे, keep it up' असे सांगून त्यांनी माझी भीती घालवली.दडपण निवळले. सुरवातीला आपल्याला हे कसे जमणार असेच वाटत होते पण दोन दिवसात सर्व कामाची माहीती झाली. संगणकासंबंधी काही फाइल आल्यास बल साहेब माझे मत अजमावत. त्यांचा पत्रव्यवहार , email मी हाताळू लागलो. असेच एक आमच्या वेबसाईटमध्ये सुधारणा हवे असे मेल आले व साहेबांनी मला त्यात लक्ष घालून , सुधारणा सुचवायला सांगितल्या. मी सुचविलेल्या सूचना त्यांच्या पसंतीस उतरल्या व ते पत्र मग संबंधित विभागाकडे रवाना झाले. मुंबई बंदराचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही जबाबदार्या सांभाळायच्या म्हणजे अग्निदिव्यच आहे, पण कामाचा विलक्षण झपाटा असल्यामुळे त्यांनी ते सहज पार पाडले. सकाळी येताना ते ज्या उत्साहाने येत त्याच उत्साहाने रात्री सात-आठ पर्यंत थांबून, कामाचा फडशा पाडूनच ते घरी जात !
याच काळात त्यांच्या स्वीय सचिवाला कामावर असतानाच आमच्या रूग्णालयात दाखल करावे लागले. साहेबांना हे कळताच त्यांनी थेट मुख्य वैद्यकिय अधिकार्याला फोन लावून त्याच्या तब्येतीची पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना केल्या. एवढेच नाही तर त्याला discharge मिळेपर्यंत त्यांचा फोन रोज जायचाच ! अर्थात सर्वच कर्मचार्यांची त्यांना पूर्ण काळजी आहे. वनवासी कल्याण आश्रमाच्या उपक्रमांना आमच्या कर्मचार्यांकडून बराच निधी मिळतो. अशा निधीतुन उभ्या राहीलेल्या कामाची पाहणी, दुर्गम भागात जाउन बल साहेबांनी सपत्निक केली आहे व कामाचे व स्थानिक कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या अनेक योजना त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जात आहेत. आमच्या बंदरात सत्यनारायणाच्या पूजेचे फार प्रस्थ आहे. अशा सर्व पूजांना साहेब कितीही उशीर झाला तरी जातातच , आयोजित करणार्या कर्मचार्यात मिसळतात. प्रसाद घेउन तो आपल्या स्टाफला पण देतात. असेच एका ठीकाणी त्यांनी "Tale of four friends, Everybody, Nobody, Somebody, Anybody" हे पोस्टर वाचले. त्याने ते चांगलेच प्रभावित झाले. त्या पोस्टरची प्रत घेउन त्यांनी संबंधित कर्मचार्याना कार्यालयात बोलवून घेतले, त्यांचे कौतुक केले व पोस्टरच्या प्रती आमच्या सर्व कार्यालयात वितरीत करण्यास सांगितले ! याच काळात देशात स्फोट झाले व आम्हाला red alert मिळाला. एरवी कोणीही पत्रकबाजी करून एसी केबिनमध्ये बसून राहीला असता पण साहेबांनी कुलाबा ते वडाळा हा आमचा भाग स्वत: आधी चाळून, पिंजून काढला, सुरक्षेतले कच्चे दुवे हेरले, त्यावर उपाय योजना केल्या व मगच सर्व विभाग प्रमुखांना सक्त सूचना/आदेश जारी केले. बंदरात जर घातपात झाला असता तर देशाची प्रतिमा खराब झाली असती व व्यापार-उदीमावर त्याचा दुष्परीणाम झाल असता. या दौर्यात त्यांनी स्वत: जीवावर उदार होउन, झटापट करून एक चोर सुद्धा पकडला ! त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आमच्या बंदराला त्यांच्या नावातच असलेले बारा हतींचे बळ मिळाले !
श्री. बल साहेबांकडून अल्पावधीत बरेच शिकायला मिळाले पण ६ ऑगस्टला नवीन अध्यक्षांनी पदभार स्वीकारला व बल साहेब आपल्या मूळ जागी उपाध्यक्ष म्हणून गेले. नवीन साहेबांना त्यांनी माझी 'our computer expert' अशी ओळख सुद्धा करून दिली ! बल साहेब I.R.S म्हणजे Indian Revenue Services मधेले अधिकारी आहेत पण मुंबई बंदराला त्यांनी जो गौरव प्राप्त करून दिला त्यावरून ते Innovative & Revolutionised System आहेत ! मुंबई बंदराच्या कामगारांतर्फे त्यांना माझे लाख लाख प्रणाम ! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी, भरभराटीसाठी, यशप्राप्तीसाठी माझ्या शुभेच्छा !
मंगळवार, २६ ऑगस्ट, २००८
विदेशी जहाजे आणि तिरंगा.
मुंबई बंदरात येणार्या सर्वच जहाजांना राष्ट्रीय ध्वज , तिरंगा फडकवावा लागतो व त्याबाबतचे सर्व नियम पाळावे लागतात. साधारण ८७ साली असेच धक्क्यावर जहाजातून उतरत असलेल्या मालाची टॅली घेत असताना कोणाचे तरी लक्ष जहाजावर फडकवलेल्या तिरंगी झेंड्याकडे गेले. ध्वज चक्क फाटलेला होता ! जहाजावर एकूण चार ठीकाणी काम चालू होते. बाकी तीने टॅली क्लार्क माझ्याकडे जमले व काय करायचे म्हणून विचारू लागले. मी ताडकन काम थांबवायचे असे बोलून बसलो. टॅली क्लार्क टॅली घेत नाही म्हट्ल्यावर मजूरांनी पण काम थांबवल. जहाजाचे काम बघणारा सुपरवायझर सांगू लागला की उद्यापर्यंत झेंडा बदलतो , काम चालू करा. मी ठामपणे सांगितले की जोपर्यंत नवीन ध्वज लावला जात नाही तोपर्यंत काम बंद राहील. मनात काहीही नसताना नेतेपद गळ्यात पडले व मग वाघावर बसलेल्या माणसासारखी अवस्था झाली. बराच गोंधळ उडाला. जहाजाची चढ उतार थांबल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाते. अनेक अधिकारी काम चालू करा म्हणून विनवू लागले तर कोणी धमकाउ लागले पण आता माझे माघारीचे दोर कापले गेले होते ! शेवटी त्या जर्मन जहाजाचा कप्तान खाली उतरला. संध्याकाळपर्यंत नवा झेंडा लावतो पण काम चालू करा असे विनवू लागला, पण आम्ही ठाम राहीलो. मग मात्र त्याचा नाईलाज झाला. हाताखालच्या अधिकार्याला त्याने ताबडतोब झेंडा आणण्याकरता पिटाळले. जर्मन वकीलातीत जाउन त्याने नवा ध्वज आणला, सन्मानाने तो फडकवण्यात आला व मगच काम चालू झाले.
आता अध्यक्षांचा सहायक आहे तेव्हा या प्रश्नाचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी काहीतरी प्रस्ताव नक्की सादर करणार आहे. भारतात आलेली जहाजे भारतीय ध्वजाचा अपमान करतात पण बाहेरच्या देशात असे करायची त्यांची हींमत तरी होत असेल का हा प्रश्न छळत राहणार आहेच !
शुक्रवार, ११ जुलै, २००८
गोदीतल्या गमती-जमती !
गोदीतल्या गमती-जमती !
आमच्या कडे 'एक' जरा मंत्रचळी म्हणतात त्या प्रकारातला आहे. स्वत: वर त्याचा अजिबात विश्वास नाही. एखादे काम केले के दहा वेळा केले, केले , केले किंवा दिले, घेतले, तपासले असे काहीतरी बरळत राहतो. त्याच्या बरोबर काम करणार्याला त्याच्य या स्वभावामुळे वेड लागायची पाळी येते. अनेक महत्वाच्या पुस्तकांची पाने देताना आणि घेताना तपासायची असतात. दहा दहा वेळा तपासून पण याचे समाधान होत नाही. बेरजा मारताना पण तेच ! आमच्या कडे सहसा कामाची वेळ संपेपर्यंत कोणी थांबत नाही, काम संपले की निघाले तरी चालते. पण हा मात्र वेळ संपेपर्यंत जागचा हालणार नाही. कार्यालय बंद केलेत तर बाहेर थांबेल असा अवलिया ! एकदा असेच दूसर्या पाळीतले काम संपले. गोदाम मास्तरने गोदामाचे वीस दरवाजे व्यवस्थित बंद केल्याची खात्री केली. मुख्य दरवाजा सील केला आणि गेटवर चावी जमा करायला निघाला. गेट वीस मिनीटे लांब होते. सोबत 'हा' होताच ! तसे दरवाजे चेक करताना पण तो होताच ! गेट वर चावी जमा करताना हा बोलला, की अगदीच राहवत नाही म्हणून सांगतो की एका दरवाजाची चावी लावायची राहीली असावी, निदान मला तरी तसे वाटते. गोदाम मास्तर उडालाच. तसे त्याने तपासले होतेच पण विषाची परीक्षा कोण घेणार ? कारण एखादे दार उघडे राहीले तरी निलंबन नक्कीच ! सगळा लवाजमा परत शेडला आला. सील फोडून सर्व दरवाजांची कुलपे तपासली गेली. काहीही प्रोब्लेम नव्हता ! आता सगळे त्याच्यावर जाम भडकले, उगीच ताप दिला म्हणून ! त्याची प्रतिक्रीया एवढीच "सेफ्टी फर्स्ट" हा आपला मोटो आहे ना ! एखादा दरवाजा उघडा असता तर काय केले असतेत ?
एका गोदाम मास्तरने याला न जुमानता रात्री ११ वाजताच गोदाम बंद केले व सरळ चावी जमा करून निघून गेला ! हा दारासमोरच थांबून राहीला ! सिक्युरीटीची जीप आल्यावर तीच्या समोर उभा राहीला. आतल्या अधिकार्याला मी कामावर आहे माझा रीपोर्ट करू नका असे विनवू लागला ! त्याला काय प्रकार आहे तेच कळेना !
एकदा माझा मित्र रात्री १२ वाजता दूसर्या शेडला जाण्यासाठी लिफ्ट मागायला उभा होता. लांबून त्याला बुलेट येताना दिसली. याने हात दाखविला. पण बुलेट थांबल्यावर त्याची बोबडी वळली, कारण बुलेटवर होत्या ACP, Port Zone, श्रीदेवी गोयल, पावणे सहा फूट उंच व धिप्पाड ! बुलेट उभी करूनही मित्र पाठी बसत नाही म्हटल्यवर त्या कडाडल्याच ! 'लडकी जैसा क्या शर्माते हो, बैठो' झक मारत बसला, मॅडमने त्याला हवे तिकडे सोडले ! आता तो कोणाकडेही लिफ्ट मागत नाही !
आमच्याकडे तीन दिवसाहून जास्त काळ न कळविता रजेवर असल्यास एक घोषणापत्र द्यावे लागते व वैद्यकिय तपासणी करूनच कामावर घेतात. असाच एक जण न कळविता दांडी मारून कामावर आला. रूजू करून घेणार्याने त्याला असेच कामावर घेतले आणि मागाहून त्याच्या लक्षात आले. याला त्याने किमान फीट प्रमाणपत्र तरी आण म्हणून विनवले पण हा काही ऐकेना ! अनेक वेळा निरोप पाठवले, दम दिला पण हा ढीम्म ! एकदा मग संबंधित क्लार्क त्याला भेटायला गेला. 'हा' त्याला घेउन धक्क्याच्या टोकावर उभा राहीला. त्याला बोलला , तू मला रूजू करून घेतलेस, आता तूच काय ते निस्तर, मला परत त्रास दिसाल तर जीव देईन आणि तुझ्यामुळे हे केले असे लिहून ठेवीन ! बिचारा, करतो काय ? त्याने आपल्याच पदरचे १०० रूपये खर्च केले व याच्या नावाचे खोटे प्रमाणपत्र घेउन मोकळा झाला.
हीच वल्ली एकदा extra मध्ये होती. जेवणाच्या वेळात त्याच्या कोणातरी बॅचवाल्याला बरे वाटत नव्हते म्हणून थेट आमच्या रूग्णालयात घेउन गेला. कोणालाही, काहीही न सांगता ! एक उशीराची requirement आली. याचा काही पत्ता नव्हताच, पण याच्या जीवावर बाकी दोन extra घरी गेले होते, त्यांचाही report करावा लागला !
गोदीत अनेक लबाड आयातदार 'जुने-वापरलेले कपडे' या नावाखाली चांगले कपडे मागवायचे. ही बाब तशी लपून रहायची नाहीच. मग कस्टम तो माल अडवून ठेवायची. गोदीतले अनेक कर्मचारी मग ते कपडे घरी नेत. असाच मोह एका गोदाम मास्तरला झाला.तो होता पहील्या पाळीला. कपड्यांच्या गठ्ठ्यात त्याला मस्त त्याच्या मापाची नवी कोरी पॅण्ट सापडली. सगळे ताळतंत्र सोडून त्याने घातलेली पॅण्ट तिकडेच काढून ठेवली व नवी घालून आला ना बाहेर ! दूसर्या पाळीचा गोदाम मास्तर आला. प्रथेप्रमाणे सर्व दरवाजे चेक झाल्यावर त्याने चावी मागितली ! चाव्यांचा जुडगा खिषात नव्हता ! मग त्याला आठवले की आपल्या जुन्या पॅण्ट मध्येच होता ! त्याच्यावर जणू आभाळच कोसळले ! गोदामातला होता नव्हता तेवढा सगळा स्टाफ कामाला लावला गेला. तीन तास सगळे गठ्ठे उलटे पालटे केल्यावर ती पॅण्ट एकदाची सापडली व आत जुडगा सुद्धा !
आयतदाराचा एंजंट BE (bill of entry, खूप महत्वाचे कागद ) शोघत होता. शेडचा सगळा स्टाफ जेवायला बसला होता. त्याचे लक्ष त्यांनी टेबलावर ठेवलेल्या कागदाकडे गेले आणि तो उडालाच ! काही जण त्याला हव्या असलेल्या BE वर चक्क डबा उघडून बसले होते. तेलाने माखलेले ते कागदपत्र निदान मिळाले तरी याचाच त्याला जास्त आनंद झाला !
संगणक आमच्याकडे नवेच होते. लोकांना अगदी स्वीच कोठे आहे इथपासून शिकवायला लागायचे ! अनेक वेळा आम्हाला फोन करून काही समस्या सांगत पण ते रेकॉर्ड त्यांनी असेच उघडे ठेवले असल्याने आम्हाला बघता येत नसे. अशा वेळी 'तू बाहेर ये' असे आम्ही सांगत असू ! मी असेच एकाला सांगितल्यावर तो माझ्यावर जाम उखडला ! स्वत:ला काय भाई समजतोस काय ? बोल कोणत्या गेटच्या बाहेर येउ ? तू काय माझे वाकडे करणार ते बघतोच ? त्याला सर्व समजाउन सांगितल्यावर तो चांगलाच वरमला !
अगदी सुरवातीला आमच्या कडे RS6000 मशीन होते. ते AC रूम मध्ये होते व आम्ही सगळे बाहेर बसू. फोन मात्र आतल्या रूममध्ये होता. असेच मी मझ्या एका सहकार्याला , जो फोन घेत होता, त्यालाच फ्लॉपी आत टाकायला सांगितले. बराच वेळ होउनही फ्लोपी रीड होत नव्हती म्हणून मी आत गेलो तर फ्लोपी हव्या त्या स्लॉतमध्ये नव्हतीच. त्याला विचारले तर तो बोलला केव्हाच पार आत टाकली ! त्या मशीनला एक मोठी खाच होती, याने ती त्या खाचेत टाकली होती ! हे कळल्यावर एकच धावपळ उडाली. मशीन शटडाउन करून, अभियंत्याला पाचारण करून ते उघडावे लागले तेव्हाच ती फ्लॉपी परत मिळाली !
असेच एकदा एकाला मॉडेमचा स्वीच ऑफ करायला सांगितल्यावर त्याने सरळ मेन-स्वीच बंद करून टाकला होता ! काम फूल स्वींग मध्ये चालू असताना मशीन बंद केल्याने कोबोलच्या सगळ्या डाटा फाईल्स करप्ट झाल्या ! ते सगळे निस्तरायला चार दिवस लागले !
आमच्याकडे संगणकावर थकवाकी काढायचे काम चालू होते. त्याचे बॅक अप पण घेतेले जाई. असेच कोणीतरी नवखा माणूस बॅक अप घेत होता. त्याला ते जमत नव्हते म्हणून माझ्या एका सहकार्याने त्याला ते घेउन दिले. त्यानंतर त्या विभागाची तक्रार आली की आम्ही नवीन केलेले काम मिळत नाही ! शोध घेतल्यावर गोंधळ कळला. बॅक अप घेताना cvf च्या ऐवजी xvf कमांड दिली गेली होती ! त्या मूळे आधी घेतलेले बॅक अप परत हार्ड डिस्क वर टाकले गेले !
कार्बन असलेल्या कागदावर छपाई करताना पेपर योग्य दिशेनेच लावावा लागतो. एकाने कोर्या बाजूवर प्रिंट छान दिसते म्हणून ती बाजू वर ठेवली. पेपर होता थ्री-पार्ट ! सगळा गठ्ठा संपल्यावर हा गोंधळ समजला. तो वाया गेलेला ढीग डबा खाताना पुढेचे अख्खे वर्ष आम्ही वापरत होतो !
नोकरी लागण्याच्या आधीपासूनच कॉलनीत रहात होतो त्यामूळे बरीच जण ओळखीची होती. असाच एक जण जहाजावर फोरमन होता. जहाजात उतरून काम करणार्या कामगारांचा तो प्रमूख. एकदा तिसर्या पाळीत त्याने माझ्याकडे शीट्टी दिली आणि ३ ते ३:३० , रजेची वेळ झाली की ती जोरात वाजव असे सांगितले. मी पण होय म्हटले. पुढे जरा वेळाने माझ्या गँगचे काम संपले व मी लगोलग झोपायला निघून गेलो. साधारण पहाटे ५ वाजता कोणीतरी मला गदागदा हलवून उठवले व शीट्टी मागितली. मी त्याच्या बरोबरच धक्क्यावर आलो. त्याने जोरात शीट्टी वाजवली व मगच जहाजातले कामगार कामाला लागले ! काम कंटाळवाणे होते व फोरमन पण जागेवर नव्हता मग काय त्यांना निमित्तच मिळाले. रजेची वेळ संपली हे आम्हा अडाण्यांना कळत नाही, फोरमन शीट्टी वाजवेल तेव्हाच आम्ही काम सुरू करणार असा कायदा त्यांनी दाखविला. मी ती शीट्टी खिषात ठेउन झोपलो होतो, फोरमन माझ्या भरवश्यावर कोठेतरी बार मध्ये ढोसत पडला होता ! ३:३० वाजल्यापासून माझा शोध चालू होता, पण कोणी त्रास देउ नये म्हणून मी जरा लांबच जाउन झोपलो होतो, त्यामूळे तासभर कोणाला सापडलो नाही !
असेच एकदा तिसर्या पाळीत असताना धक्क्यावर गेल्यावर कळले की जहाज ३ च्या पुढे येणार आहे. ही संधी साधून आम्ही तडक झोपी गेलो. मध्येच केव्हातरी जाग आली आणि डोळे चोळत आम्ही धक्क्यावर आलो आणि आमची झोप पार उडाली. जहाज केव्हाच लागले होते व डेकवरचे सर्व कंटेनर उतरवले पण गेले होते ! आता त्यांचे नंबर कोठे मिळणार ? शेवटी ३० मिनीटे तंगडतोड करून स्टोरेज पॉईट ला गेलो, नंबर घेतले व मग टॅलीशीट भरली !
परत तिसरी पाळी ! धक्क्यावर काम जोरात चालू होते. रात्र पाळीचा अधिकारी पाहणी करण्याकरीता आला. टॅली मारणारे गेले कोठे ? अंदाजाने त्याने धक्क्यावर झोपलेल्या एकाला उठवले. कोण आहेस ? टॅली क्लार्क ! मग टॅली कोण मारतो आहे ? रीलिव्हर ! त्याच्या शेजारच्याला उठवले , त्याने पण तसेच उत्तर दिले. मग तिसर्याला उठवले, तू कोण ? तर उत्तर आले, रीलीव्हर !