राजकारण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकारण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

शरद पवार आणि त्यांचे दळभद्री राजकारण !

गेली अनेक दशके शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्र स्थानी आहेत. निवडणुक हरले म्हणून त्यांचे अस्तित्व पुसायची चूक कोणीही करणार नाही. पण पवार जे जे काही करतात त्याला राजकारण म्हणणे मला अजिबात पसंत नाही. पवारांनी आजतागायत राजकारणाच्या नावाखाली जे जे केले ते निव्वळ स्वार्थकारण होते. दगाफटक्याचे राजकारण करणारा औरंगजेब व पवार यात मला काहीही फरक वाटत नाही. सत्तेसाठी काहीही करण्याच्या त्यांच्या स्वभावाला राजकारण म्हणणे हे सुद्धा योग्य नाही. शरद पवार यांच्यात निश्चितच देशाचा नेता म्हणून मिरवण्याचे गुण आहेत पण संयम मात्र त्यांच्याकडे अजिबात नाही. सत्ता संपादनासाठी थांबायला लागते, योग्य वेळ साधायला लागते पण पवारांना हा लॉगकट कधीही मानवला नाही. “सत्तातुराणां न भयम न लज्जा” या उक्तीप्रमाणे पवारांनी सत्तेत शिरायला शॉर्टकटच कायम स्वीकारला. त्या साठी सर्कशीत सुद्धा बघायला मिळणार नाहीत अशा कोलांटयाउड्या मारल्या, जे बोलले त्याच्या नेमके उलट केले, ज्यांच्या खांद्यावर हात ठेवला त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला, ज्यांना दूषणे दिली त्यांनाच सत्तेची चाहुल लागताच मीठ्या मारल्या, स्वत:ला सेक्युलर म्हणवायचे व मग निवडणुकीत प्रचार करताना मात्र जोशी-महाजन असा जहरी प्रचार करायचा. मुस्लिमांचे तुष्टीकरण करायचे म्हणून १९९२ च्या मुंबई स्फोटात पवारांनी तेरावा काल्पनिक बॉम्ब मंदीरात फोडला होता. सोनियांच्या विदेशीपणाचा मुद्दा घेवून पवार कॉंग्रेसमधून बाहेर पडले पुढे सत्ता मिळते म्हणताच सरकारात सामील पण झाले ! २००९ च्या निवडणुकित तिसर्या आघाडीचे तुणतुणे वाजू लागताच पवार दोन्ही दगडावर पाय ठेवून होते पण कॉंग्रेस अधिक मजबूत झाल्यावर परत सोनियांच्या गोटात दाखल झाले. महाराष्ट्रात लोकसभेत व आता विधानसभेत अर्धी चड्डी त्यांना सलत होती पण निकालात लोकांनी त्यांचीच चड्डी उतरवल्यावर कोणी विचारायच्या आधीच त्यांनी भाजपाला बिनशर्त पाठींबा देवू केला.या सगळ्यांची गोळा-बेरीज म्हणजे लोकांचा विश्वास गमावणे ! आता या सगळ्यात राजकारण कोठे दिसते ? दगाबाजी, लांगुलचालन व वाटेल तश्या कोलांट्या उड्या म्हणजे राजकारण का ? कोठूनही सत्तेला चिकटून राहणे म्हणजे राजकारण का ?

१९८० च्या महाराष्ट्रातील निवडणुकात पवारांच्या नेतृत्वाखाली पुलोदला चांगल्या जागा मिळाल्या होत्या. सेना तर तेव्हा राज्यात कोठेच नव्हती व भाजपा पुलोदच्या प्रयोगाला अनुकुल होता. पाच वर्षे विरोधी बाकावर जर पवार बसले असते तर पुढच्या वेळी त्यांची बारी नक्कीच आली असती. पण आधी सत्ता भोगून झालेल्या पवारांना सत्तेशिवाय अजिबात करमत नव्हते. काही वर्षातच ते सरळ कॉंग्रेसवासी झाले. मुख्यंमंत्री, केंद्रीय मंत्री व परत मुख्यमंत्री असा प्रवास चालू होता. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर कॉग्रेसमध्ये सत्तासंपादनाची लढाई झाली त्यात नरसिंह राव सर्वाना पुरून उरले. पवार, माधवराव सिंदीया, अर्जुन सिंग, पायलट हे गुढघ्याला बाशिंग बांधून रावांना डच्चू देवू पहात होते पण रावांच्या राजकारणाने या सगळ्यांना पार निष्प्रभ करून टाकले. अल्ममतातले सरकार रावांनी बहुमतात आणले, मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री करून देशाचे आर्थिक गाडे रूळावर आणले, पंजाबमध्ये अतिरेक्यांचा बीमोड करून तिथे निवडणुका घेतल्या, काश्मीरात पण निवडणुका घेवून दाखवल्या. बाबरी पडल्यावरचा धुरळा खाली बसायच्या आत त्यांनी संघावर बंदी घातली भाजपाची गुजरात, मध्य प्रदेश व दिल्लीतील सरकारे बरखास्त करून केंद्रात सत्ता स्थापण्याचा भाजपाचा मनसुबा पुढची १० वर्षे यशस्वी होवू दिला नाही. पाच वर्षात गांधी-नेहरू परिवाराचे अस्तित्वच त्यांनी पुसून टाकले होते ! याला राजकारण म्हणतात ! संस्थाने भारतात विलीन करताना सरदार पटेलांनी केले ते राजकारण, बांगला मुक्त करून पाकिस्तानला सिमला करारावर सह्या करण्यास इंदीरा गांधीनी भाग पाडले ते राजकारण, अनेक वर्षे विसा नाकारणार्या अमेरिकेला एका शब्दानेही न विचारता पंतप्रधान झाल्यावर पायघड्या घालून स्वागत करायला भाग पाडणार्या मोदींनी केले ते राजकारण !

स्वत:चा स्वार्थ नसलेले राजकारण पवारांनी केल्याचे एकतरी उदाहरण आहे का ? पवार महाराष्ट्रात गुन्हेगारांचे गॉडफादर झाले. ठाकूर व कलानीला आमदारकी देवून राजकारणाचा दरवाजा त्यांनी गुन्हेगारांसाठी सताड उघडला व आज “कोठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा ?” असे विचारायची वेळ आली आहे. मिंध्या पत्रकारांनी निदान आता तरी पवारांच्या राजकारणाचे गुणगान थांबवावे व त्यातली सत्तेची अगतिकता उघड करावी !

सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

ओवैसी फॅक्टर !

या निवडणुकीत उघड चिथावणीखोर भाषणे करणार्या ओवैसी संघटनेचे 3 उमेदवार निवडून आल्याने अनेक जण अस्वस्थ आहेत. लोकशाही मार्गाने 3 उमेदवार निवडून आले हे खरे तर स्वागतार्हच आहे ! ही संघटना वाढली तर देशाच्या एकात्मतेला धोका आहेच. पण काळजी करायचे काहीही कारण नाही. देशात मुस्लिम 15 % असले तरी ते एकगट्ठा मतदान करतात हा सिद्धांत खोटा असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. मुस्लिम समाजात सुधारणेचा वेग कमी असला तरी प्रक्रीया चालूच आहे. शिक्षण घेतलेला, सरकारी / खाजगी नोकरी करणारा सर्वसाधारण मुसलमान ना चार लग्ने करत ना खाटवळभर मुले जन्माला घालत.

भीती वाटते आहे ती अशा धर्मांध संघटनेच्या झेंड्याखाली मुस्लिम एकत्र होण्याची. तसे झाले तरी वांदा नाही. या वेळीही मुस्लिम बहुल भाग भिवंडी व मुंब्रा, या संघटनेचे कोणीही निवडून आलेले नाही. आता जे आले आहेत ते मतविभाजनाचा फायदा मिळून, निव्वळ मुस्लिम मते घेवून नाही. जी मुस्लिम मते सपा, कॉंग्रेसला एकगठ्ठा मिळत होती ती ओवैसी यांच्या पक्षाला मिळाली तर नुकसान सपा व कॉंग्रेसचे आहे ! अगदी टोकाची शक्यता म्हणून मुस्लिम मतांचे ध्रूवीकरण झाले तर काय ? देशात 20 % लोकसभा मतदारसंघ असे आहेत की जिकडे मुस्लिम मते निर्णायक ठरतात. पण जेव्हा 20-30 % मतांचे ध्रूवीकरण होइल तेव्हा हिंदूत त्याची प्रतिक्रीया उमटणारच व 80 % हिंदू मतांचे ध्रूवीकरण होण्याची प्रक्रीया सुद्धा सुरू होइलच ! तेव्हा देश लोकशाही मार्गाने धर्मांधाच्या हातात जाणार नाही हे नक्की !

आता याच ओवैसींनी कायदा हातात घेतला तर काय ? देशात आता प्रखर राष्ट्रीय विचारसरणीचे सरकार आहे. आधीच्या राजवटीत मतांच्या बेगमीसाठी जे लांगुलचालन चालायचे तसे अजिबात होणार नाही. काही आगळीक केल्यास सरकार ती कठोर पणे मोडून काढेल याची खात्री बाळगा ! मुस्लिमांना सुद्धा शांतता व विकास हवा आहे हे गुजरातेतील मुसलमानांनी दाखवून दिलेच आहे. तेव्हा ते अशा चिथावणीला बळी पडतील असेही वाटत नाही. मोदी सगळ्यांनाच सोबत घेवून चालले आहेत तेव्हा मुस्लिमही त्यांनाच साथ देतील यात काही शंका नाही.

25 वर्षानी मिळाला उ:शाप !

रामायणात एक गोष्ट आहे. सीतेच्या शोधासाठी हनुमान व इतर जणांचे पथक दक्षिण भारताच्या किनार्यावर पोचते. सीतेला इथूनच समुद्रपार लंकेत पळवून नेले आहे असे त्यांना जटायूचा भाऊ सांगतो व शापमुक्त होतो. पण एवढा मैलोनमैल पसरलेला समुद्र पार कोण करणार ? हनुमानाकडे ती क्षमता असते पण त्याला त्याची जाणीव नसते ! लहानपणी त्याने एका साधुची दाढी ओढलेली असते व तो त्याला सामर्थहिन होशील असा शाप देतो. पुढे देवांनी मिनतवारी केल्यावर त्याला उ:शाप मिळतो की दूसरा कोणी त्याला आपल्या सामर्थाची जाणीव करून देइल तेव्हा ते त्याला परत मिळेल. जांबुवंत नेमकी हीच आठवण हनुमानाला करून देतो व महाबली हनुमान समुद्र लीलया उल्लंघून लंकेत पोचतो !

महाजन-मुंढे यांनी 25 वर्षापुर्वी सेनेचे लोढणे गळ्यात बांधून घेतले व महाराष्ट्रातल्या भाजपाला आपल्या सामर्थाचा विसर पडला. सेने कडून अपमान-उपेक्षा-अवहेलनाच भाजपाच्या पदरात पडली. सेना दरवेळी भाजपाचे हात पिळत राहिली व भाजपा ते सहन करीत राहिला. लोकसभेच्या जागा सेनेने वाढवून घेतल्या, केंद्रात भाजपाचे सरकार असताना सतत विरोधी भूमिका घेतली. राव सरकार वरच्या अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी सेनेचे खासदार रावते यांचे पोट बिघडले , पुढे प्रतिभा पवारांना सेनेने मराठी म्हणून समर्थन दिले व पुढे प्रणब मुखर्जी यांना सुद्धा पाठींबा दिला ! दोन्ही वेळी त्यांनी भाजपाला तोंडघशी पाडले.

शिवसनेच्या घराला घरघर लागली होती. युती असताना अखंड कॉंंग्रसला हरविणारी युती पुढे कॉंग्रेसची दोन शकले झाल्यावरही 2 निवडणुका हरली होती त्याला कारण निव्वळ सेना होती. शिवसनेच्याच जागा दरवेळी कमी होत होत्या व उभी फूट सुद्धा पडत होती. भाजपा मात्र अभंग होता व इतर राज्यात एकट्याच्या बळावर सत्ता मिळवत होता, टीकवत होता. सेना मात्र गृहकलहाने क्षीण होत चालली होती. महाजन-मुंढे सेनेचे जन्माचे ऋणाइत असल्याप्रमाणे अपमान सोसून पक्षाला सेनेच्या दावणीला बांधत होते, त्यांचे रूसवे फुगवे काढण्यासाठी मातोश्रीचे उंबरे झिंजवत होते. तरीही सेनेचा हेकेखोरपणा कमी होत नव्हता.

मोदी-शहा या जोडगोळीच्या रूपाने भाजपाला  डोकेबाज नेतृत्व मिळाले व संघाचे नेटवर्क हुशारीने वापरून लोकसभेची सत्ता भाजपाने निर्विवादपणे काबीज केली. या बदललेल्या परिस्थीतीत महाराष्ट्रातली दुय्यम वागणून आता सहन करायची नाही  हे ठरले. ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र कायम ठेवून 10-15 जागा, त्या सुद्धा जिथे सेना सातत्याने  अनामत रक्कम गमावत होती, त्या, भाजपा मागत होती. सेना मात्र आम्हाला 151, बाकी तुम्ही काय ते बघा म्हणून अडून बसली होती. बरे, या वेळी युती नव्हती तर महायुती होती. नव्याने सामील झालेल्या पक्षांना सेना आपल्या कोट्यातील एकही जागा सोडत नव्हती. रिपाईच्या आठवलेंना राज्यसभेवर पाठविले भाजपाने, सेनेने नाही ! नव्या सवंगड्यांना 20 जागा द्यायच्या म्ह्टल्या तर भाजपाला एकही जागा जास्तीची मिळत नव्हती ! महायुतीतल्या इतर घटकांना सेनेने भाजपाच्या दारात बांधले होते. या स्थितीत युती टीकवणे भाजपाच्या हिताचे नव्हते. मधल्या काळात युतीचे शिल्पकार महाजन-मुंढे व स्वत: सेनाप्रमुख बाळासाहेब काळाच्या पडद्याआड गेले. सगळी सूत्रे मोदी-शहा व गडकरी या नेत्यांकडे होती. आता मातोश्रीवर जावून नाक घासणारा भाजपात कोणी उरला नव्हता. शहा यांनी तर पहिल्या भेटीत मातोश्रीचा उंबरासुद्धा ओलांडला नाही व सेनेला वातावरण बदलले असल्याची जाणीव करून दिली. मोदींची लाट लोकसभेत अनुभवलेले उद्धव आता स्वत:ची कुवत नसताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने बघत होते. 25 वर्षाची गुलामगिरी भाजपा एवढ्या सहजी झुगारणार नाही, येइल शरण अशाच भ्रमात ते होते. भाजपाने सुद्धा हा भ्रम अखेरपर्यंत तसाच ठेवला व स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली. महायुतीतले घटक पक्ष भाजपाने आपल्या गळाला लावले. मोदी त्यांचा हुकमाचा एक्का होता. त्यांच्या सभा 15 वरून 25 एवढ्या वाढविल्या गेल्या. विदर्भावर भिस्त ठेवायची, मुंबई-ठाण्यात मराठी मतांचे विभाजन होणार हे गृहीत धरून, अमराठी मतांची रसद आणायची योजना बनली.  अमित शहा प्रचारात फिरले असते तर शिवसनेने त्याचे भांडवल केले असते म्हणून त्यांच्या सभा मर्यादित केल्या गेल्या. सेनेवर थेट टीका करायचे मोदींनी टाळले व सेनेच्या प्रचाराचे मुख्य हत्यारच बोथट केले. एकूणच भाजपाने calculated risk  घेत आपला डाव यशस्वी केला. पवार मात्र जुगार खेळले. युती तुटते हे नक्की झाल्यावरच त्यांनी आघाडी तोडली. लोकसभेतल्या कॉंग्रेसच्या दोन जागा व आपल्या चार जागा बघून हा जुगार खेळायला ते उद्युक्त झाले. शिवाय दोन दगडांवर पाय ठेवायलाही ते मोकळे होतेच ! तेव्हा भाजपाने पवारांशी संगनमत करून युती तोडली या आरोपात काहीही तथ्य नाही. मोदींनी बारामतीतच सभा घेवून पवारांची लक्तरे काढल्यावरही जर कोणी असे म्हणत असतील तर "अंदाज अपना अपना" ! आता पवारांनी बिनशर्त पाठींबा देवू केला आहे तो त्यांचा "आखरी दाव" आहे ! कारण हरण्यासारखे त्यांच्या कडे काही उरलेलेच नाही. बनी तो बनी नही तो परभणी ! भाजपा एवढा भोळा नक्कीच नाही उलट तो पवारांचाच टीश्यु पेपर करेल हे नक्की ! निकाल बघितलेत तर लक्षात येइल की आघाडी झाली असती तरी भाजपाला फारसा फटका बसला नसता कारण भाजपाच्या मतांची टक्केवारी दोन्ही  कॉंग्रेसच्या एकत्रित मतांएवढीच आहे. युती झाली असती तर मात्र त्याचा जास्त फायदा सेनेलाच मिळाला असता व भाजपा मागत असल्या 10-15 जास्त जागा देवूनही सेनेचे आमदार जास्तच आले असते व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते !  परत तोंड वर मी मोठा भाऊ, तू भांडी घास सांगायला मोकळे ! भाजपाच्या मागे संघाची फौज असते. युती असल्यामुळे हे "अर्धी चड्डीवाले"  सेनेसाठी राबत होते याचा सेनेला विसर पडला व तोच निर्णायक ठरला.

आता तरी उद्धव ठाकरे यांनी स्वप्नातून सत्यात यावे. भाजपा मोठा भाऊ असल्याचे मान्य करावे. त्यात त्यांचा तिहेरी फायदा आहे. केंद्रात, राज्यात व मनपात सत्ता ! एरवी भीकेचे कटोरे !  युती हवी असल्यास ज्या जागा जिंकल्या आहेत त्या त्या पक्षाकडे व हरलेल्या जागा तिकडे दुसरा किंवा तिसरा असलेल्या त्या पक्षाला असे नवे सूत्र मान्य करायला हरकत नाही. लोकांना नेमके हेच हवे आहे. स्थिती अशी आहे की युतीच निर्धोक राज्य करू शकते व सेना व दोन्ही कॉंग्रेस एकत्र आल्या तरी सरकार धड बनणार नाही. सेनेने अजून उशीर केला तर सेनेचे आमदार टीकणार नाहीत व मोठी फूट पडणार हे नक्की ! केंद्रातील सत्तेवर ज्याची मांड आहे त्याला उदंड मित्र मिळतील हे नक्की ! सत्तेला हपापलेले आपल्या पक्षाला सोठचिट्ठी देवून भाजपात प्रवेश करतील अशीही शक्यता आहेच ! युती तोडायची पहिली चूक सेनेने केली आता भाजपा बरोबर मान राखून सरकार सेना करणार नसेल तर ती दूसरी चूक ठरेल व तिसरी चूक करायलाही सेना शिल्लक राहणार नाही !


सेनेला आपल्या नसलेल्या सामर्थावर प्रचंड विश्वास होता तर भाजपाला आपल्या ताकदीचा तब्बल 25 वर्षे विसर पडला होता ! मोदी-शहा यांनी राज्यातील भाजपाला या शक्तीची आठवण करून दिली व गुलामगिरीचे जोखड झुगारू कमळ महाराष्ट्र भर फुलले ! राष्ट्रीय पक्ष म्हणून पुढे यायचे असेल तर स्थानिक पक्षांचा वापर करून , त्यांची शिडी करून आपली ताकद वाढविण्यात, गैर मला तरी काही वाटत नाही. शेवटी फैसला लोकच करणार आहेत !  

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

लोकशाहीचा गाडा का अडला ? मतदार न फिरकल्यामुळे !

घोडा का अडला ? भाकरी का करपली ? पाणी का अडले ? या सगळ्यांचे उत्तर एकच आहे “न फिरवल्यामुळे” ! तसेच लोकशाहीचेही आहे ! लोकशाहीचा गाडा का अडला ? मतदार न फिरकल्यामुळे ! जिकडे लोकशाही रूळली आहे अशा देशात मतदानाचे प्रमाण 94 ते 98 % आहे व आपल्याकडे ते अजूनही 60 % च्या वर जात नाही ! आपल्या एका मताची किंमत मतदाराला अजूनही कळलेली नाही व ती कळावी या साठी प्रयत्नही करायची गरज सत्ताधार्यांना वाटत नाही ! जेव्हा जेव्हा विक्रमी मतदान होते तेव्हा तेव्हा सत्तांतर होते हा इतिहास असताना मतदानाचा टक्का वाढावा म्हणून कोणता पक्ष प्रयत्न करेल ? ही जबाबदारी निवडणुक आयोगानेच घ्यायला हवी. नुसते मतदार यादीत नावे आले म्हणून समाधान मानण्यात काय अर्थ आहे, मतदानही दणदणीत व्हायला हवे.

आपल्याकडे मतदान सक्तीचे नाही. जेमेतेम 60 % मतदान होते. काही राज्यात, मुंबईसारख्या शहरात तर ते 40 % एवढे कमी होते. या उदासीनतेतुन निवडून येणारा काय लायकीचा असतो व त्यातुन बनणारे सरकार कसे काम करते हे आपण बघतोच आहोत.  देशात जर खर्या अर्थाने लोकांचे प्रातिनिधिक सरकार असेल तर सरकारच्या प्रत्येक निर्णयला जनता विरोध कसा करते / होतो ? याचा सरळ अर्थ आहे की उमेदवार + सरकार तांत्रिक दृष्ट्या बहुमत मिळवून झालेले असते. लोकांचा मनसे पाठींबा त्याला नसतोच. सध्याच्या निवडणुक पद्धतीतला हा दोष दूर करायलाच हवा.

सरासरी 50-60 % मतदान होते तेव्हा काय होते ? ज्याच्याकडे अगदी 10-15 % ( जात, धर्म, झोपडपट्टी, दादागिरी ) मतांची वोट-बँक आहे तो निवडून यायची शक्यता खूपच वाढते. 10-15% त्याची स्वत:ची मते, 10 % प्रचार करून, आश्वासने देवून व 2- 5% गैरमार्गाने ( विकत !) – अशी मतांची बेगमी केली की झाला विजय निश्चित ! निवडून यायची पात्रता हा एकमेव निकष तिकिट देताना पक्ष बघतात तेव्हा तिकिटे अभ्यासू उमेदवाराला मिळण्याची शक्यता उरतच  नाही व तो निवडून यायचा प्रश्नच येत नाही ! राजकारणातुन सज्जन माणसे हद्दपार होतात ती अशी ! मग गल्लोगल्लीचे गुंड, काळा पैसा असलेले धंदेवाइक, जाती-पातींचे पुढारी हेच निवडणुक रिंगणात उतरतात. मतदारसंघात किमान 10 उमेदवार असतात, त्यातले मात्तबर असे चार ते पाच असतात, बाकी सगळे मते खायला उभे असतात / केलेले असतात. म्हणजे 30 % मतांची बेगमी झाली की विजय निश्चित ! जाती-पातीचे राजकारण मग बंद कसे होणार ?  मतदारसंघात कोणत्या जातीचे किती प्राबल्य आहे हे बघूनच उमेदवार निवडला जातो. सर्वसाधारणपणे एखाद्या मतदारसंघात  30 ते 40 % मते एखाद्या जातीचीच असतात. आपल्या जात-भाईसाठी मतदार हिरीरीन मतदान करतातच ! बाकीचे उदासीन असतात. असा उमेदवार जेव्हा निवडून येतो व सरकार जेव्हा बनते तेव्हा तो / ते  आपली वोट-बॅंकच मजबूत करणार. 25-30 % मतदारांचे भले करणारे निर्णय बाकी 70 % लोकांवर लादले जाणार व त्याला विरोध होणार, विकास खुंटणार, जाती-पातीच्या दलदलीत लोकशाहीचा गाडा रूतत जाणार ! का ? तर  मतदार न फिरकल्याने !

हेच जर 80 % पेक्षा जास्त मतदान सातत्याने होत राहिले तर ? सगळ्यात मुख्य म्हणजे बोगस मतदान बंद पडेल वा त्याचा प्रभाव निकालावर पडणार नाही ! जाती-पातीची गणिते चालणार नाहीत, भावनिक आवाहनांचा परिणाम होणार नाही, मते विकत घेवूनही फायदा होणार नाही वा परवडणार नाही ! या सगळ्यांची गोळा-बेरीज म्हणजे चांगला उमेदवार, सर्व थरातुन पाठींबा असलेला, जातीच्या बाहेर विचार करणारा उमेदवार विजय होइल, असे उमेदवार देणारा  पक्ष सत्तेत येइल व मग व्यापक हिताचे निर्णय घेतले जातील. लोकशाही मजबूत होइल.

सध्या मतदानाच्या दिवशी रजा दिली जाते. याचा टक्का वाढण्यासाठी काहीही उपयोग होत नाही ती आधी बंद करायला हवी.  त्यातही गंमत म्हणजे एकाच दिवशी सगळ्या राज्यात मतदान नसेल तेव्हा येते. माझे कार्यालय आहे मुंबईत तर मुंबईत मतदान आहे तेव्हा मला सुट्टी मिळते व मी मतदान करणार पनवेलला तेव्हा तिकडे मतदान वेगळ्या दिवशी असेल तर परत मला 2 तासाचे कन्सेशन मिळते !  ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी दोन तासाची सवलत द्या , तेवढी पुरे आहे.  काम बंद ठेवल्याने करोडो रूपयांचे  नुकसान देशाचेच होते.

मतदानाची वेळ साधारण 7 ते 5 अशी असते. ती अशी मर्यादित ठेवण्यापेक्षा मतदारसंघात बुथ/केंद्र निहाय  80 % मतदान होइपर्यंत चालू ठेवायला हवीत ! भले दोन दिवस सुरू ठेवा की मतदान, काय प्रोब्लेम आहे ? एरवीही बंद मतपेट्या 5 दिवस कडी-कुलपात ठेवल्या जातातच ना ? मतदान केंद्राबाहेर फलक लावून मतदानाची टक्केवारी प्रदशित करावी, स्थानिक केबल नेटवर्क वापरून ती सर्वाना कळेल अशी सुद्धा व्यवस्था करता येइल. 7 ते 5 या वेळेत 80 % मतदान झाले तर ते केंद्र बंद करा नाहीतर सुरू ठेवा. काही दिवस थांबूनही टक्केवारी गाठली जात नसेल तर तिकडची प्रक्रीयाच स्थगित करा. याचा अर्थ त्या भागातल्या लोकांना लोकशाहीत रस नाही, तिकडचा कारभार प्रशासकावर सोडा ! त्या भागात कोणतीही विकासकामे करू नका ! आपले जात-भाईच नाही तर मतदारसंघातले  जास्तीत-जास्त मतदार मतदान करतील ही जबाबदारी आपसूकच उमेदवारावर व पक्षावर पडेल ! कोणतीही सक्ती न करता मतदानाचा टक्का वाढेल !

फिरवल्यामुळे भाकरी करपणार नाही, घोडा बुजणार नाही, पाणी अडणार नाही तसेच मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी फिरकला तर लोकशाहीचा गाडा सुद्धा अडणार नाही !

सर्व मतदारांना नम्र विनंती – स्वत: मतदानाचा हक्क बजावा व महाराष्ट्रात यंदा 80% + मतदान होइल या साठी प्रयत्न करा ! धन्यवाद !

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

कमळेच्या काडीमोडाची करूण कहाणी !

कमळा ही एका मोठ्या घरातली एकुलती एक लेक होती. दिसायला चांगली, अभ्यासात हुषार, टाप-टीपीची आवड असलेली व गृहकर्तव्यदक्ष ! लग्नाच्या बाजारात ती सहज खपली असती पण तिच्या घरच्यांची भरमसाठ हुंडा द्यायची इच्छा नव्हती व ज्या घराण्यात मुलगी द्यायची ते घराणे श्रीमंत नसले तरी चालेल चारीत्र्यवान मात्र हवे, आपल्या विचारधारेचे नसले तर निदान तिला समांतर विचारधारेचे हवे असा आग्रह असणारे होते. कमळेच्या माहेरच्यांना आपली विचारधारा सगळ्या देशात रूजवायची होती व देशाचे घर चालवायची महत्वाकांशा होती पण ती काही नजरेच्या टप्प्यात नव्हती. मोठ्या घरचा कारभार हाती यावा म्हणून कमळेच्या माहेरचे जंग जंग पछाडत होते पण यश मात्र कायम हुलकावण्या देत होते. मोठे घर सांभाळण्यासाठी आधी छोटी घरे सांभाळायला मिळावित व मग त्या घरांचा कारभार दाखवून मोठे घर चालवायला घ्यावे अशी व्यूहरचना ठरली.

महाराष्ट्रात घर बांधायची खटपट प्रमोद व गोपीनाथ काका करीत होते. पण इकडचे वातावरण जरा वेगळेच होते. हवामानाचा अंदाज दोन्ही काकांना येत नव्हता व दरवेळी बांधलेले घर कोलमडत होते. आपले घर मजबूत ठेवून इतरांची घरे कशी मोडायची याचे त्यांचे ज्ञान बारामतीच्या काकांच्या तुलनेत अल्पच होते ! प्रमोद व गोपीनाथ काकांप्रमाणेच महाराष्ट्राचे घर चालवायला इतरही बरेच इच्छूक  होते पण त्यातल्या त्यात तालेवार होते बाळासाहेब ठाकरे ! त्यांची जीभ म्हणजे दांडपट्टा होता व ती तरवारी सारखी फिरवून त्यांनी अनेकदा शरदरावांना सुद्धा गार केले होते ! पण आतून म्हणे या दोघांची अगदी घनिष्ट मैत्री होती. प्रमोद काकांकडे घराचा कारभार जायच्या आधी कमळेला पवारांच्या घरात द्यायचे ठरविले होते पण देण्या-घेण्यावरून ही सोयरिक मोडली होती !

कमळेला जर बाळासाहेबांच्या घरात दिली तर या सोयरिकेने पवारांचे घर मोडून महाराष्ट्रात स्वत:चे घर निदान भागीदारीत तरी बांधता येइल असा विचार प्रमोद रावांनी केला व या सोयरिकेचा प्रस्ताव बाळासाहेबांसमोर ठेवला. बाळासाहेबांचा हुंड्याला विरोध असला तरी घरबांधणीत कमळेच्या घरच्यांनीसुद्धा राबले पाहिजे व जो काही भाकर-तुकडा देवू तो खावून गुमान जगले पाहिजे ही अट मात्र होती. ही अट कमळेच्या इतर काकांना व भावांना मान्य नव्हती पण प्रमोदरावांनी “कमळेचा संसार सांभाळायची जबाबदारी माझी, तिचे सासरे भले आहेत” असा शब्द दिला व सर्वांना राजी केले !

कमळेला सासुवास नव्हता पण सासरेबुवा मात्र  फार छळत. सारखा पाण-उतारा करीत, तिच्या घरच्यांना नावे ठेवित, तिच्या चारीत्र्यावर संशय घेत. अगदीच झाले म्हणजे प्रमोद व गोपीनाथ काका येवून तिची समजूत घालत व हे ही दिवस जातील, जरा धीर धर म्हणून सांगून निघून जात. थोडे दिवस चांगले जात व परत ये रे माझ्या मागल्या सुरू होई. कमळेचा नवरा सुशेगात होता. घर सांभाळण्यात त्याला काही रस नव्हता. सासर्यांच्या  मेहनतीवर जगत होता. सासरेबुवांचे नोकर प्रामाणिक होते, त्यातल्या काहींनी गद्दारी केली असली तरी सासरेबुवा त्यांना पुरून उरले होते. आणि शेवटी तो सोनियाचा दिन आला ! कमळेच्या सासर्यांनी तिच्या भावांच्या मदतीने पवारांच्या घरावर कब्जा केला. कमळेला आता चार धडकी मिळू लागली, अंगावर चार दागिने दिसू लागले. अर्थात सासर्यांची करडी नजर तिच्यावर होतीच. ती आपल्या भावंडाना भरीला घालून या घरावर दावा सांगेल असा डाउट त्यांना सतत यायचा. याच भीतीतुन मग कमळेचा व तिच्या भावांचा, काकांचा जाहिर उपमर्द सासरे करू लागले. तुम्हाला कुत्रे विचारीत नव्हते. आज जे काही आहात ते माझ्या मुळेच असे जाहिर सभेत सुनवित. मधल्या काळात कमळेचे इतर राज्यातले भाऊबंद कर्ते-सवरते झाले व अनेक मित्र मिळवून त्यांना मोठ्या घराचा सुद्धा ताबा मिळाला.
दिवस आले तसे गेले ही ! सासर्यांचा जीभेचा पट्टा, वाढलेले वय, बोलघेवडी मुले व पुतण्या, त्यांच्या बड्या सरदारांची गद्दारी, घरातली भाउबंदकी या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणून पवार साहेबांनी आपले घरत परत ताब्यात घेतले. तिकडे माहेरच्यांचे दिल्लीतले मोठे घर सुद्धा अकस्मात कोसळले. कमळेच्या अंगावर परत चिंध्या आल्या. हे कमी म्हणून की काय कायम धीर देणारे प्रमोद काका निवर्तले ! एक मोठा आधार गेला. तिच्या नशीबी परत रांधा-वाढा उष्टी काढा आले ! पण कोठेतरी दूर आशेचे किरण दिसू लागले होते. तिचे भाऊ कर्तबगार निघाले. वेगवेगळ्या राज्यात त्यांनी परत आपले बस्तान बसविले व दिल्लीत स्वत:चे घर बांधता येइल एवढा विश्वास कमावला. त्या सर्व भावात गुजरातेतला दाढीवाला नरेंद्र भलताच बेरकी निघाला. आपले टोलेजंगी घर तर त्याने बांधलेच वर दिल्लीचे घर बांधायचे काम सुद्धा मलाच द्या असे तो सांगत सूटला. दोनदा त्याचे कोणी ऐकले नाही पण शेवटी त्याला एक संधी द्यायला काय हरकत आहे असे वाटून त्याला घर बांधायची मुभा दिली गेली. पुढे  गुजरातच्या चिरेबंदी घराचे मॉडेल देशभर फिरवून त्याने सगळ्यांची मने जिंकली व लोकांनी त्यालाच दिल्लीचे घर चालवायला दिले !

या दादाचा आपल्या कमळेवर भारी जीव होता. तिची परवड त्याच्या कानावर येत होती पण तो योग्य संधीची वाट पहात होता. मधल्या काळात कमळेच्या सासरच्या घराचा डोलारा पार कोसळला होता. साससेबुवा थकले होते म्हणून त्यांनी घराचा कारभार मुलाच्या व पुतण्याच्या हाती दिला होता. पुत्रप्रेमा पोटी मग त्यांनी पुतण्याला बेदखल केले व सर्व मालमत्ता कमळेच्या घरधन्याला देवून टाकली. पुतण्या चिडला व इरेला पेटला. कमळेच्या माहेरच्यांना पुतण्याला असे वार्यावर सोडणे योग्य नव्हे असे वाटत होते. वडीलकीच्या नात्याने गोपीनाथ काका चार चांगल्या गोष्टी कमळेच्या घरच्यांना सांगायला गेले तर त्यांचाच “खामोश” म्हणून उपमर्द केला गेला. सर्व कारभार आयताच कारभार्याच्या हाती आला.  भांडून घर सोडलेल्या भावाची ताकद कारभार्याला जोखता आली नाही, कोणी समजावण्याचे पलिकडे कारभारी गेलेले होते. शेवटी व्हायचे तेच झाले. सत्तेचे दोर हातात आले असे वाटत असतानाच  निसटले. चुलत भावाने आपला हिसका दाखविलाच ! या नंतर थकलेले सासरे काळाला शरण गेले.  परत कमळाच पांढर्या पायाची ठरली.

दिल्लीचा एकछत्री कारभार हाती आल्याने गुजरातच्या दादाची माणसे कमळेला तिचा हक्क मिळायलाच हवा असे ठणकावून तिच्या कारभार्याला सांगू लागली. कारभारी त्यांनाच कमळेच्या कागाळ्या सांगू लागला. कमळी म्हणे शरदरावांच्या घरच्या कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे. हे वागणे बरे नव्हे. मी खपवून घेणार नाही. नेसत्या वस्त्रानिशी लाथ मारून घराबाहेर काढीन असे धमकावू लागला ! खरे तर तोच अनेक घरांचे उंबरे झिजवित होता, पण तो पडला पुरूष, त्याला हे सगळे करायचा हक्कच आहे ना ! मधल्या काळात कमळेचा संसार सांभाळून धरणारा गोपीनाथ काका सुद्धा काळाच्या पडद्याआड गेला व कमळेच्या कारभार्याला रान मोकळे मिळाल्यासारखेच झाले. कमळेच्या भावांना तुमची मला गरज नाही मी एकटाच घर बांधायला समर्थ आहे. मी जे देतोय ते घ्या नाहीतर फुटाची गोळी घ्या असे सांगू लागला.

अचानक कमळीच्या कारभार्याला गुजरातच्या दादाच्या पुर्वजांशी असलेले जुने वैर आठविले, अगदी खानदानी वैर ! खूप वर्षापुर्वी कारभार्याचे वंशज व दादाचे वंशज मुंबईच्या मालकीवरून एकमेकांच्या उरावर बसले होते. त्याही खूप खूप शतके  आधी कोणा शिवरायाने दादाची सुरत लुटली होती. कारभार्यांच्या आजोबाची मुंबईवरच्या मारामारीत सरशी झाली होती. पुढे सासरेबुवांना मुंबई मिळाली पण दादाच्या माणसांची भांडी घासावी लागतात म्हणून त्यांनी  वादळ उठविले होते. या नंतर बरेच पाणी वाहून गेले होते व दोन्ही पक्षात सुलुख झाला होता. कमळीला सुन म्हणून घरात घेताना याची कोणी वाच्यताही केली नव्हती. दादा आता कमळीच्या मागे भक्कमपणे उभा आहे असे बघून कारभार्याची सटकली !  त्याने दादाचीच औकात काढली. जुने मुडदे उकरू लागला. झाले, कमळीचाही आता निर्धार पक्का झाला.  आता अधिक अपमान नाही सहन करायचा, कारभार्याला त्याची खरी जागा दाखवायचीच या निर्धाराने ती पेटून उठली. आपले सुद्धा स्वत:चे घर हवे म्हणून मैदानात उतरली! गंमत म्हणजे पवार साहेबांनीही सोयरीक मोडून आवंदा स्वत:चे घर बांधायचे मनावर घेतले आहे व कंबर कसली आहे. कमळेच्या भावाची भीती वाटते म्हणून ते तिच्या कारभार्याला जवळ घेवू पाहत आहेत. तशी त्यांच्या मनात सुद्धा कमळेला वश करून घेता आले तर हवेच आहे हो , आपल्या मुलीची व पुतण्याची काळजी त्यांना ही आहेच की ! पण सध्या तरी हाताची घडी तोंडावर बोट !

या लढाईत मी कमळेच्या बाजूने ठामपणे उभा राहणार आहे ! तुम्ही ???????



मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

रमेश किणीचे काय झाले ?

सामना सिनेमात मास्तर एकच प्रश्न विचारत असतात "मारूती कांबळेचे काय झाले ?" मला पण राजना एकच प्रश्न विचारायला आहे "रमेश किणीचे काय झाले" ? 

शिवशाहीत एक सामान्य मराठी माणूस, सामना कार्यालयात शेवटचे बघितलेला , खिषात विष खायलाही पैसा नसलेला माणूस मुंबईतुन वादळी पावसात पुण्याला पोचला कसा, अलका सिनेमात, ब्रोकन अ‍ॅरो च्या शेवटच्या शोला गेला कसा, सोडीयम सायनाइड पिवून मेला कसा व हे रहस्य अनेक वर्षे सी.आय.डी तपास होवूनही कसे उलगडल गेले नाही ? सामनाच्या पुणे आवृत्तीत रमेश किणी मृत अवस्थेत सापडल्याची बातमी नव्हती पण मुंबई आवृत्तीत होती - Exclusive !

या प्रकरणाचे कंगोरे जबरदस्त आहेत, मेलेला माणूस मराठी, त्याला जागा खाली करायला लावणारा निरंजन शहा हा गुजराती व या शहाला वडीलांसमान मानणार कोण तर मराठीचा एकमेव कैवारी राज ठाकरे ! हे प्रकरण उघडकीला आणणारे होते छगन भुजबळ ! राजची चौकशी तेव्हा पोलिसांनी तेव्हाच्या गृहराज्यमंत्री सेनेच्या किर्तीकरांच्या उपस्थितीत केली होती ! 

रमेश किणींच्या विधवा शीला किणी न्याय मिळावा म्हणून झगडत होत्या . स्वत: बाळ ठाकरे अतिषय अश्लाघ्य भाषेत त्यांच्यावर सामनात टीका करीत होते ! रमेश किणी यांचे दुसर्यांदा शव विच्छेदन केले तेव्हा त्यात मेंदू सापडला नव्हता. रमेश किणी यांना मेंदूच नव्हता असे सामनात बाळ ठाकरे यांनी लिहिले होते ! 

शिवसेने बद्दल जबरदस्त भ्रमनिरास माझा या एकाच प्रकरणातुन झाला !

नौटंकी साला !

सेनेला मुंढे प्रेमाचे भरते आलेले पाहून एकच डायलॉग आठवतो - नौटंकी साला !

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची आपली महत्वाकांशा मुंढेनी कधीच लपवून ठेवली नव्हती. तेवढी त्यांची पात्रता होतीच व आज जर युती असती तर भाजपाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले असते हे सुद्धा नक्की ! मागच्या सलग 3 निवडणुका कमी जागा लढवूनही सेनेच्या जवळपास जागा त्यांच्याच दमदार नेतृत्वाखाली भाजपाला मिळाल्या होत्या. 

छगन भुजबळांनी सेनेचे दोन तुकडे केल्यावर विधानसभेत सेनेचे आमदार कमी झाले व विरोधी पक्षनेतेपद आपसुकच भाजपाकडे गेले व मुंढेंनी क्षणाचाही विलंब न लावता ते ग्रहण केले. या नंतर बाळासाहेबांनी मुंढेवर "ठाकरी" शैलीत टीका केली होती.

पुढच्या निवडणुकित युतीची सत्ता आली  व महत्वाचे असे गृहमंत्रीपद मुंढेनी आपल्याकडे ठेवले होते व त्यावरूनही ते सेनेच्या टीकेचे धनी झाले होते.

पवारांच्या नेतृत्वाखाली तेव्हा अखंड कॉंग्रेसला युतीने हरविले होते तेव्हा पवार बाहेर पडल्यावर मतांच्या विभाजनात युती सत्ता टिकवेल असे दिसत होते.लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका एकत्रच झाल्या व एक अजब ट्रेंड बघायला मिळाला. लोकसभेत युतीने आघाडी घेतली तर विधानसभेत दोन्ही कॉंग्रेस मत विभाजनानंतरही , मागाहून एकत्र येवून सत्ता काबीज करू शकल्या. 

युतीच्या अनपेक्षित पराभवाचे कारण  होते "युतीत ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री" हे सूत्र ! सेना व भाजपाने आपले आमदार जास्त आणायचा एक आत्मघातकी मार्ग निवडला तो म्हणजे मित्रपक्षाचेच उमेदवार छुप्या कारवाया करून पाडायचे ! याचा परिणाम सत्ता गमावण्यात झाला ! बाळासाहेबांनी या वेळेही मुंढे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांशा मुळावर आल्याचे म्ह्टले होते. पुढे विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही म्हणून राण्यांनी सेना सोडली व सोबत 6 आमदार सुद्धा नेले. सेनेला विरोधी पक्षनेतेपदावर परत एकदा पाणी सोडायला लागले ! 

त्या नंतर राजनीच सेना सोडली व मनसे स्थापली. राज्यभर प्रचार करून राजने मनसेची हवा निर्माण केली. त्यांची ताकद (उपद्रव मुल्य म्हणा हवे तर !) सगळ्यात आधी मुंढेंनी हेरले व मनसेशी युती हवी असे स्पष्ट बोलून दाखविले. झाले, परत सामनामधून गोपीनाथरावांवर आगपाखड झाली व तो विचार त्यांनी सोडावा लागला ! अर्थात पुढे मुंढेच द्रष्टे ठरले व सत्तेचा घास युतीला मनसेने गिळू दिला नाहीच ! या वेळी तर भाजपाला सेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या व साहजिकच विरोधी पक्षनेतेपद सुद्धा !

लोकसभा जिंकल्यावर  मोदीसरकारने मानाने मुंढेना दिल्लीत बोलवून घेतले व महत्वाचे खातेही दिले. अर्थात हा रांगडा गडी दिल्लीच्या दरबारी राजकारणात फिट बसणारा नव्हता तेव्हा विधानसभेच्या वेळी त्यांची महाराष्ट्रात पाठवण करायचे भाजपाने ठरविले होतेच. केंद्रात मंत्री म्हणून काम केलेले मुंढे आता महाराष्ट्रात येणार ते मुख्यमंत्री व्हाययाच हे समजण्याइतके सेना नेते दु्धखुळे नक्कीच नव्हते. सेनेच्या तंबूत थरकाप उडालेला होताच, युती तुटणार वा भाजपा जास्त जागा भांडून घेणार हे स्पष्ट दिसतच होते. 

दरम्यान नियती अजब डाव खेळली. मुंढेच अपघातात निवर्तले, मुख्यमंत्री पदाचा प्रबळ दावेदारच रणांगणातुन बाहेर पडला. पुढे या अपघाताची चौकशी करावी अशी मागणी सेनेने केली. ( रमेश किणी यांच्या मत्यूची चौकशीच काय वाच्यता सुद्धा तेव्हा सत्तेत असलेल्या सेनेला नको होती. न्यायालयाच्या ब भुजबळांच्या दणक्याने ती करावे लागली याची आठवण सुद्धा आज कोणाला होत नसेल !)  सेनेसाठी मात्र हे चांगलेच झाले व भाजपा महाराष्ट्रात नेतृत्व पोकळी झाल्याने भाजपा जागा-वाटपात तुटे पर्यंत ताणणार नाही हे  सेना गृहीत धरून चालली. अनेक अपमान पचवून युती टीकविणार्या भाजपाला मात्र मोदींच्या लाटेने युती अधिक जागा मिळणार नसतील तर युती तोडणेच योग्य वाटू लागले. सेनेला अखेरपर्यंत बोलण्यात गुंतवून, बाकी मित्रांना आपल्याकडे वळवून शेवटच्या क्षणी भाजपाने युती तोडली ! गोपीनाथरावांनी अगदी हेच केले असते ! पण ते आता हयात नाहीत म्ह्टल्यावर मात्र सेनेला त्यांचा पुळका आला आहे ! 

नौटंकी साला !

रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४

बाळासाहेबांच्या नावाने भावनिक साद घातली तर मराठी मतदार विरघळतो का ?


छगन भुजबळ हे सेनेतुन बाहेर पडलेले पहिलेच बडे नेते. बाळासाहेबांनी तेव्हा खरोखरच भुजबळांना संपविले होते. माझगाव या त्यांच्या बालेकिल्ल्यात बाळा नांदगावकर या कार्यकर्त्याला उमेदवारी देवून भुजबळांना चीतपट केले होते सेनेने (आज नांदगावकर सुद्धा मनसेवासी झालेले आहेत !), मग भुजबळ नाशिकात गेले व लोकसभेला उभे राहिले व तिकडे सुद्धा त्यांचा पाडाव झाला !). मग मात्र भुजबळांनी आपले बळ वाढविले व बाळासाहेबांशीही सुलुख केला !

गणेश नाइक - सेनेची सत्ता असतानाच नाइक मंत्री होते व त्यांचा मुलगा नवी मुंबई मनपाचा महापौर. अचानक साहेबांची मर्जी फिरली व नाईकांना सेनेतुन हद्दपार केले गेले. मग नाईक गेले आधी कॉंग्रे्समध्ये व नंतर पवारांचा हात धरून राष्ट्रवादीत. त्यांच्या घराण्याची सत्ता अजूनही नवी मुंबईत शाबूत आहे.

नारायण राणे - राणे यांनी बाळासाहेबांना खरे हादरविले ! आपल्या सोबत बाहेर पडलेल्या सर्वच आमदारांना त्यांनी पोटनिवडणुकित निवडून आणले ! राण्यांचा पराभव करायचे बाळासाहेबांनी कोकणी माणसाला भावनिक आव्हान तेव्हा केले होते पण कोकणी माणसाने त्याचा मान राखला नाही. कोकणताला सेनेचा गड राण्यांनी साफ उध्वस्त केला !

विखे-पाटील - साखर सम्राटांना उसाच्या चिपाडासारखे पिळण्याची बाळासाहेबांची इच्छा तर होती पण तसे काही झाले नाही. सेना सत्तेत असताना जे अपक्ष त्यांच्या सोबत होते त्यांनी साखर सम्राटांचे हित अबाधित कसे राहिल याची पुरेपुर काळजी घेतली. अर्थात सेनेची सत्ता जाताच यातले बहुतेक स्वगृही परतले व आपल्या एरीयात इज्जत राखून वावरले. पुढे राधाकृष्ण पाटलांनी मात्र गद्दारी केल्यावर लोकसभेच्या निवडणुकित पाडून बाळासाहेबांनी आपली हुकमत दाखविली होती.

राज ठाकरे - दुसर्यांच्या घराणेशाहीवर हल्लाबोल करणारे बाळासाहेब शेवटी आपल्याच घरातील कौटुंबिक कलहाला थोपवू शकले नाहीत. मुलगा किे पुतण्या यात शेवटी त्यांनी मुलाचीच निवड केली व पुढे तर राजला आपले नावही घ्यायची बंदी केली. डिवचलेल्या राजनी आपला हिसका त्यांना त्यांच्या हयातीतच दाखविला व मागच्या विधानसभेत सेनेच्या तोंडचा सत्तेचा घास हिरावून घेतला.

सेना अगदी नवी असताना कोणा बंडू शिंगरेने बंड करून प्रती-शिवसेना काढल्याचे आठविते व त्यान्र अमेरिकन वकिलातीवर हल्ला सुद्धा केलेला होता. पण त्यावेळी सेना दखल घेण्याएवढी मोठी नव्हती. काही वर्षापुर्वी हा बंडू शिगरे वारला. 

आपल्या सभांना गर्दी करणारे लोक मतदानाच्या दिवशी कोठे गायब होतात हे प्रश्न बाळासाहेबांना नेहमीच पडायचा, कालपासून  राज यांना सुद्धा तोच प्रश्न सतावतो आहे !

एखादा सिनेमा जसा चालेल की पडेल याचे भाकित वर्तविता येत नाही तसेच निवडणुकितील जय / पराजयाचे आहे व  नेत्यांच्या भावनिक आव्हानाचे आहे ! शेवटी लोक म्हणजे ओक हेच खरे !

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०१४

उद्धवा अजब तुझे वागणे !

25 वर्षाची युती अखेर तुटली. ही युती 100 % सत्ता-प्राप्तीसाठी होती, तात्विक मुलामा कोणी कितीही देवो ! धाकल्या भावाचा उत्कर्ष सहन न झाल्याने मोठ्याने घर फोडले. या आधी मोठ्याच्या घराला घ्रर-घर लागलेलीच होती म्हणा, आधी राणे मग राज बाहेर पडलेच होते. राजने बाळासाहेबांचे नावही न घेता शिवसेनेच्या सत्ताकांशेला सुरूंग मागच्या निवडणुकित लावला होताच.

लोकसभेत नमो नामाने यश मिळाले ते उद्धवच्या डोक्यात शिरले. तेव्हा मी देवाची मुर्ती पाठीवरून नेणार्या गाढवाची गोष्ट सांगितली होती. अनेकांना असे वाटते की युतीने फायदा भाजपाचा झाला. हे साफ खोटे आहे. युती नसताना झालेल्या विधानसभेत सेनेची अवघी 1 जागा होती. ते भुजबळ सुद्धा आज सेनेत नाहीत व भाजपाच्या 16 जागा होत्या. युती झाल्यावर झालेल्या निवडणुकित भाजपा 60 जागा कमी लढवूनही 40 वर पोचला तर सेना थेट 49. तेव्हा कोण कोणामुळे मोठे झाले ? अर्थात मग भुजबळ व राणे यांनी सेनेला "जय महाराष्ट्र" केल्यावर सेनेला विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकले नाही, ते अगदी आजतागायत ! सेनेची ताकद सातत्याने कमी होवूनही विधानसभेच्या 177 जागा ती लढवत होती व भाजपा मात्र 117 जागा लढवूनही जवळपास निम्म्या जागा जिंकत होता. एकूण मतांची टक्केवारी भाजपाची कायमच 16 ते 20 % होती तर सेनेची कमी कमी होत थेट 14 % एवढीच उरली होती. सतेत असताना व नसताना देखील सेनेने कायमच दादागिरी दाखविली. ठाण्याची जागा त्यांनी भाजपाकडून हुसकावून घेतली. अगदी अलिकडे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकित सेनेने आपल्या मनाने मतदान केले. गुजरात , दिल्ली व मध्य-प्रदेशात काहीही ताकद नसताना सेना तिकडच्या विधानसभा निवडणुका सातत्याने लढवित होती व युती फक्त महाराष्ट्रात आहे असा साळसूद खुलासा करीत होती. सुपारी घेवूनच हे केले जात होते व नमो हे नक्कीच विसरले नसणार! या सर्व अपमानाचे सव्याज उट्टे आज भाजपा फेडत आहे. 

महायुतीतले घटक पक्ष वारा बघून भाजपाच्या मागे उभे आहेत व सेना एकटी पडली आहे. भाजपाने खेळी तर सुरेख खेळली आहे कारण युती मोडली की आघाडी बिघडणार हे लक्षात ठेवूनच व्यूहरचना रचली गेली आहे. पंचरंगी लढतीत मराठी मतांची विभागणी होणार पण मुंबई-ठाण्याची गुजराती मते एकगठ्ठा भाजपालाच मिळणार व जागाही ! हीच आघाडी निर्णायक ठरेल असे दिसते. भाजपाला बहुमत मिळाले नाही तरी 100 च्या आसपास जागा मिळाल्या तरी पवार साहेबही घड्याळ बघून भाजपात जातील. अर्थात भाजपा पहिला हात सेनेचा स्वीकारेल व सत्तेचे नवे समीकरण सेनेला मान्य करावे लागेल. धाकटा आता धाकटा नसेल !


बुधवार, ११ जुलै, २०१२

प्रतिभाताईंमुळे मराठी माणसाची मान शरमेने खाली गेली आहे !

अब्दूल कलामांनी राष्ट्रपति पदाची शान पाच वर्षात एवढी उंचावर नेवून ठेवली होती की पुढच्या 50 राष्ट्रपतींनी नुसते बसून दिवस काढले तरी चालेल असे मला बापड्याला वाटायचे. महाराष्ट्राची सुकन्या असलेल्या प्रतिभाताईंनी मात्र पाच वर्षे पुरी व्हायच्या आत त्या पदाचे पोतेरे केले आहे ! गांधीघराण्याप्रति अखंड निष्ठा या एकमेव निकषाने त्यांना एवढा मोठा बहुमान मिळवून दिला होता. त्यात गुजरातमध्ये राज्यपाल म्हणून असताना मोदी सरकारचे धर्मातरबंदी विधेयक व टाडा सारखा कठोर कायदा आणू पहाणारे विधेयक त्यांनी परत पाठविले . या असामान्य कर्तबगारीची दखल दिल्लीश्वर घेतल्याशिवाय कसे राहतील ? पवारांनी आपले राजकारण साधले व शेखावत वि शेखावत अशी झुंज लावून दिली. प्रतिभा पाटलांच्या प्रतिभा शेखावत झाल्या आहेत हे मात्र मराठी माणसाला या निमित्ताने तरी समजले हे ही नसे थोडके ! या संधीचे सोने करण्याचा वकुब नव्हता तर निदान त्याची माती तरी करायची नव्हती, पण महाराष्ट्राचेच दुर्दैव , दूसरे काय ! जन्माने मराठी असलेल्या महिला राष्ट्रपतिने मराठी माणसाला कायमचा कमीपणा आणला आहे ! गोडसेने महात्म्याचा खून केला तर ताईंनी आपल्या विशेष अधिकारात बलात्कार करून खुन करणार्यांची फाशी रद्द केली ! एक दोन नव्हे, त्यांच्या पुढे प्रलंबित असलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे तब्बल 35 प्रकरणात ताईंनी अट्टल गुन्हेगारांना “दे दान सूटे गिर्हान” या धर्तीवर फाशीतुन सूट दिली आहे. वर ताईंचे म्हणणे आहे की मी एकाही दहशतवाद्याची फाशी कमी केलेली नाही ! अहो पण मग अफझलच्या व राजीव गांधीच्या मारेकर्यांच्या फाइल का नाही क्लियर केल्या ? त्यांच्या जरी गळ्याभोवती फास आवळायची हिंमत दाखविली असतीत तर निदान महाराष्ट्राला थोडी तरी मान उंचावता आली असती ! अजून एक क्रूर विनोद म्हणजे तुमच्या कार्यालयाने 5 वर्षीपुर्वी जेलमध्येच मरण पावलेल्या एका कैद्याची फाइल तुमच्यासमोर ठेवली व तुम्ही दयाळूपणे त्याची फाशी सुद्धा माफ केली आहे. तुमच्या या राजहट्टापायी सरकारला आता नरकात याचना अर्ज करून त्या कैद्याला परत जिवंत करून आणायला लागणार आहे !

भारतात फाशी अगदी विरळात-विरळा अशा प्रकरणातच दिली जाते. बलात्कार्याला फाशी हवी असे जमनत असताना , असे केल्यास बलात्कार करून पुरावा नष्ट करण्यासाठी पीडीतांचे खून सुद्धा होतील असे सांगून सरकार बलात्कारी नराधमाला फाशी द्यावी अशी सुधारणा करीत नाही. भारतातली कमालीची सडलेली पोलिस यंत्रणा, गुन्हा उभे करण्यासाठी लागणारे काटेकोर पुरावे, ते गोळा करण्यातली सर्वच संबंधितांची उदासीनता, कारणे कोणतेही असोत – भारतात गुन्ह्याचे प्रमाण प्रचंड आहे व त्या तुलनेत तक्रार दाखल होणे / करून घेणे, आरोपी सापडणे, पुरावे मिळणे, कोर्टात केस उभी राहणे व आरोपीला शिक्षा होणे याचे प्रमाण नगण्य आहे. बरे खालच्या न्यायालयात शिक्षा झाली तरी हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात अपील केल्यास शिक्षा कमी वा रद्द होण्याचीच शक्यता जास्त. असे असताना, “विरळात विरळा” असा निकष लागून अगदी सुप्रीम कोर्ट जेव्हा एखाद्याची फाशी कायम करते तेव्हा त्याची विना-विलंब अंमलबजावणी झालीच पाहिजे, यात पुन्हा राष्ट्रपतीला दया याचना करायचा प्रश्न येतोच कोठे ? बरे असा खास अधिकार लोकशाहीतली सर्वोच व्यक्ती म्हणून दिला तर त्या व्यक्तीने तो अधिकार अगदी काटेकोरपणे वापरला पाहिजे. ताई म्हणतात की सरकारचे सर्व विभाग दया अर्जावर टीपणी देतात व मला त्या बाहेर जाता येत नाही ! म्हणजे हे पद रबर स्टॅम्प आहे असेच तुम्हाला ताई म्हणायचे आहे का ? शेंबडे पोर सुद्धा सांगेल की हा बचाव तकलादू आहे ते ! फाइलवर ऊलट-सूलट मते असली तरी अंतिम अधिकार उच्चाधिकार्याचाच असतो व त्याची जबाबदारी पण त्या व्यक्तीनेच स्वीकारायची असते. हाताखालच्या लोकांवर त्याचे खापर फोडणे म्हणजे पळपुटेपणा तरी आहे नाहीतर आपल्यात निर्णय क्षमता नाही याची कबुली देणे आहे ! कलामांनी दोन अर्ज निकाली काढले , त्यात एकाला माफी दिली तो बलात्कारी नक्कीच नव्हता व त्याचे वय झाले होते 80. एकाचा, कोलकात्याचा धनंजय (?) बॅनर्जी, याचा अर्ज मात्र त्यांनी फेटाळला होता. त्याने कोवळ्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. या बॅनर्जीच्या नातलगांनी मग फारच थयथयाट केला होता, फाशी दिल्यास भर चौकात स्वत:ला म्हणे जाळून घेणार होते. पण बंगालमधले तेव्हाचे कम्युनिस्ट सरकार खंबीर राहले व कडक बंदोबस्तात नराधम बॅनर्जीच्या गळ्याभोवती फास आवळला गेलाच !

स्वत: एक महिला असलेली राष्ट्रपति, तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करणार्या नराधमाला दया दाखवितेच कशी ? अशी कोणती स्थिती होती की या नराधमाला जिवंत ठेवावे असे ताईंना वाटले ? हा निर्णय घेण्यापुर्वी ज्यांची हत्या झाली त्यांच्या नातलगांचे मत विचारात घेतले गेले का ? 35 दया अर्जापैकी 2 नवे होते तर बाकी 33 आधीच्या राष्ट्रपतींच्या काळापासून पेंडींग होते. साडेचार वर्षात ज्या फाइल पडून होत्या त्यावर निवृत्तिला काही महिनेच राहिले असताना होससेल पद्धतीने निर्णय घेण्याएवढी कोणती परीस्थिती निर्माण झाली होती ? सगळेच अनाकलनीय ! अफझल गुरू व मुरूगनच्या डेथ वॉरंटवर सही करायची धमक नाही की अजून एखादा देश फिरायला वेळ कमी पडतो आहे ? शिवसेनेने याच साठी या ताईंना पाठींबा दिला होता का ? सेना याचा जाब ताईंना का बरे विचारीत नाही ? उठसूठ सचिनला शिव्या घालणारे सेनाप्रमुख आता ताईंच्या या सार्वत्रिक माफीवर गप्प का ? तशी मराठी वृत्तपत्र सृष्टीने ही सार्वत्रिक माफीची बातमी साइडलानलाच टाकली, आता कोठे जनतेच्या तीव्र प्रतिक्रीया “वाचकांची मते” मध्ये अगदी सौम्य करून छापल्या जात आहेत. कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही हे आता या पेपरवाल्यांनाच सांगायची वेळ आली आहे. ताई , मराठी माणसे तुमच्या मुलाची आमदारकी विसरतील, नवर्याने मिरवलेला पदचा बडेजाव विसरतील, तुमच्यावर तुमच्या आप्त-स्वकियांवर सहकार क्षेत्रात झालेले गैरव्यवहाराचे आरोप विसरतील, (अर्थात या आधीच्या एकाही राष्ट्रपतीकडे बोटही दाखवायची कोणाची हिंमत झाली नव्हती, असो ! ) जगातल्या प्रत्येक देशाला भेट देवून जनतेच्या पैशाची केलेली उधळपट्टी विसरतील पण बलात्कारी खुन्याला दिलेली माफी कसे विसरतील ? कोणत्या तोंडाने सांगतिल की बलात्कारी खुन्याला माफी देणारी व देशद्रोह्यांबाबत निर्णय घेण्याची धमक न दाखविणारी व्यक्ती मराठी राष्ट्रपति होती ? पहिली मराठी राष्ट्रपति म्हणून मराठी माणसाने तुम्हाला मान दिला त्याच मराठी माणसाची मान तुमच्यामुळे शरमेने खाली गेली हे नक्की !

शनिवार, २३ जून, २०१२

पळपुट्या दादा !

नेत्यांना नुसते नावाने ओळखले जाणे कमीपणाचे वाटत असावे. अंगात कर्तबगारी काही नसतेच तेव्हा निदान नावाला तरी काही उपाधी जोडणे त्यांना गरजेचे असते. कोणी साहेब, कोणी पंत, कोणी राव तर कोण दादा ! दादाचा मुळ अर्थ थोरला भाऊ पण त्याही पुढे जावून जबाबदारी घेणारा, सगळ्यांना सांभाळणारा, आधार वाटणारा. पण आजच्या काळात दादा हा शब्द गुंड या शब्दाला समानार्थी म्हणून वापरला जातो. राजकारण करणे म्हणजे गुंड असणे आता स्वाभाविक झाले आहे. त्यात सत्ता हाती असले तर काय बघायलाच नको !

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा दादा व्यक्तिमत्व आहे. त्यांचा दरारा सर्वदूर पसरलेला आहे. मंत्रलयाला आग लागली तेव्हा हे दादा तिकडेच होते. या दादाने सगळ्यात आधी मैदान गाठले ! त्यांना भेटायला आलेले त्यांचे दोन मित्र त्यांची वाट बघत तिकडेच थांबलेले आहेत याचे भान सुद्धा त्यांना राहिले नाही. दादा वाचले पण त्या दोघांचा मात्र कोळसा झाला ! त्या दोघांची दादांवरची निष्ठा तरी किती अढळ बघा, आपल्या शेवटच्या कॉलमध्ये सुद्धा त्यांना दादांच्या जीवाची काळजी होती ! पण दादा मात्र मैदान सोडून केव्हाच मैदानात आले आहेत हे त्यांना कळले असते तर ?

जहाज बुडते तेव्हा कप्नान सगळ्यात शेवटी जहाज सोडतो. तसे झाले नाही तर तो जहाजाबरोबरच जलसमाधि पत्करतो. पण इथे मात्र दादा असल्याचा दावा करणार्‍याने सगळ्यात आधी मंत्रालय सोडले ! आता तुम्हीच ठरवा याला दादा म्हणायचे का फद्या ते !

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०११

माजी पंतप्रधानांच्या मारेकर्यांना फाशी झालीच पाहिजे.

तब्बल ११ वर्षाच्या विलंबानंतर राष्ट्रपतींनी राजीव गांधी यांच्या मारेकर्यांचा दया अर्ज फेटाळला. अर्थात १९९१ मध्ये हत्या झाल्यावर १० वर्षे हा खटलाच चालला होता. खुद्द सोनिया गांधीनीच राजकारणात प्रवेश करताना , व त्यांच्याच पक्षाचे नरसिंहराव पंतप्रधान असताना या दिरंगाईबद्दल अमेठीच्या जाहीर सभेत नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्याच मर्जीतल्या राष्ट्रपतींना ही फाइल क्लियर करायला एवढा विलंब का लागला या बद्दल त्यांनी किंवा त्यांच्या मुलाने राहुलने कधी बोंब मारली नव्हती हे ही लक्षात घ्यायला हवे.

आपला स्वत:चा नवरा / बाप मारला गेला तरी सोनिया व राहुलला तामिळनाडूतली सत्ता जास्त प्रिय वाटत होती / आहे. काय दळभद्री मायलेक आहेत बघा ! यातुनच द्रमुक बरोबर चुंबाचुंबी सुरू होती. करूणानिधी उघडपणे तामिळ वाघांचे समर्थन तेव्हाही करत होते व आजही करीत आहेत. जेव्हा राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा त्यांचेच सरकार तिकडे सत्तेत होते. तामिळ वाघांशी हातमिळवणी केली असल्याच्या सबळ पुराव्यावरून तेव्हा त्यांचे सरकार चंद्रशेखर यांनी बरखास्त केले होते. राजीव हत्येपाठोपाठ झालेल्या लोकसभा व राज्य विधानसभेच्या निवडणुकित करूणानिधींचा द्रमुक पार भुईसपाट झाला होता व तेव्हा अण्णाद्रमुकने कॉंग्रेसशी केंद्रात व राज्यात युती केली होती. यावरून तामिळनाडूतील जनतेची सहानुभूति श्रीलंकेतील फुटीरतावादी तामिळ वाघांना केव्हाही नव्हती हे सुस्पष्ट आहे. संख्येच्या बळावर जयललिता यांनी अत्यंत बेमुर्वतखोरपणे तेव्हा काँग्रेसला राज्यातील सत्तेतला वाटा नाकारला होता. जयललिता यांनी मग टाडाचा वापर करत द्रमुकला चांगलेच अडचणीत आणले होते. आज तामिळ अस्मितेच्या नावाने गळा काढणारे जयललिता व करूणानिधी कधी काळी तामिळ वाघांच्या हिटलिस्टवर होते, प्रभाकर त्यांच्या जीवावर उठला होता तेव्हा केंद्र सरकारने दिलेल्या संरक्षणातच त्यांना रहावे लागले होते ! आज श्रीलंकेने तामिळ वाघांचा पुरता बिमोड केल्यावर व त्यांचा म्होरक्या प्रभाकरनचा खातमा केल्यावर तामिळनाडूतल्या तामिळ नेत्यांना त्याचा पुळका आला आहे.


 

राष्ट्रपतींनी ११ वर्षे विलंब का केला हे विचारायचा अधिकार मद्रास उच्च न्यायालयाला कसा आहे ? दया अर्ज करताना खुन्यांनी "वेळेत निर्णय द्या" अशी काही अट घातली होती का ? "इतका विलंब का होत आहे" असे आधी कधी विचारले होते का ? फाशीला दिलेली स्थगितीच बेकायदा ठरवून ठरल्या दिवशी सगळ्यांना फासावर लटकवायलाच हवे. कहर म्हणजे तामिळनाडू विधानसभेने "फाशी रद्द करावी" असा एकमुखी ठराव केंद्राला पाठविला आहे. हा तर सरळ सरळ देशाच्या एकात्मतेवर घाला आहे. मारेकरी तामिळ होते म्हणून त्यांना फाशी देवू नये ही मागणी मान्य केल्यास देशाच्या विघटनाची प्रक्रीयाच सुरू होणार आहे. देशाच्या सीमावर्ती भागातल्या फुटीरतावादी कारवायांना अलिकडे बराच चाप बसला आहे, त्यांना या निर्णयाने नव्याने बळ मिळेल. उद्या मुसलमान दुखावतील म्हणून कसाबची फाशी रद्द करायची का ? का त्यामुळेच संसद हल्ल्याचा सूत्रधार अफझलला फाशी दिले जात नाही ? शीख मारेकर्यांनी इंदिरा गांधी यांची हत्या केली होती तेव्हा उडालेल्या आगडोंबात ३००० पेक्षा जास्त शीखांची कत्तल झाली होती. त्यांच्या मारेकर्यांना फासावर लटकाविले गेले व त्यानंतरही कॉंग्रेसचे सरकार पंजाबात सत्तेवर आले होते. तेव्हा कोणाचीही प्रादेशिक अथवा भाषिक अस्मिता कुरवाळण्याची गरज नाही. वेळ आली तर राजीव यांच्या मारेकर्यांबरोबरच त्यांच्या सहानुभूतिदारांना सुद्धा फासावर लटकावयची धमक केंद्र सरकारने दाखवायला हवी. "देरसे आये लेकिन दुरूस्त आये" या न्यायाने देशाच्या सार्वभौमत्वाला आवाहन देणार्यांना जरब बसावी म्हणून तसेच देशाची अखंडता टिकवण्यासाठी ही फाशी अत्यंत आवश्यक आहे.


 


 


 


 

सोमवार, २५ जुलै, २०११

इनोसंट कलमाडी साहेब !

चला, आज दसरा, आजच दिवाळी ! अहो , तोंड सांभाळून बोला, मला विस्मरणाचा रोग नाही जडला आहे, जडला होता आमच्या कलमाडी साहेबांना ! या रोगाने त्यांची नुसती आठवणच नव्हती गेली , राजकारणातली सोन्यासारखी फुललेली करीयरही संपूष्टात आली होती. कोणी म्हणत होते की शरदाचे चांदणे त्यांना बाधले. महालात राहणारा माणूस तिहारच्या तुरूंगात सडत होता. भगवान के दरबारमे देर है लेकिन अंधेर नही याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. आमचे साहेव आता निर्दोष सूटणार !


 

आता कोणाला सांगायला हरकत नाही, माझी व साहेबांची ओळख फार फार जुनी, म्हणजे किती वर्षापुर्वीची हे बी आठवत नाय यवडी जुनी ! आता गोदीत कारकुनी करणारा माणूस एवढ्या मोठ्या माणसाच्या संपर्कात तरी कसा आला असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे म्हणा, पण वो एक बहुत पुरानी कहानी है ! किती पुरानी ते मात्र आता आठवत नाय बघा ! झाले असे की आस्मादिक पुण्याचा प्रसिद्ध दगडूशेट हलवाईचा गणपती बघायला गेले होते. दगडूशेटला पोहचे पर्यंत पुण्यातल्या रीक्षावाल्यांनी घुम घुम घुमवून माझा अर्धा खिसा रिकामा केलेला होताच. दर्शनासाठी नंबर लागेपर्यंत माझे पाकिट, मोबाइल, घड्याळ, अंगठी,( चेन घातली होती का व घातली असेल तर ती सुद्धा मारली का ते आठवत नाही.) असे काय काय गहाळ झाले, दगडूशेटच्या पायावर लोटांगण घाले पर्यंत माझा कॉटन किंगचा कॉटनचा शर्ट सुद्धा कोणीतरी मारला. भयंकर प्रसंग ओढवला होता. त्याच वेळी दाढीधारी, पांढरे शुभ्र कपडे घातलेला माणूस नवस फेडण्यासाठी तिकडे आलेला होता. माझी त्याची नजरा नजर झाली व लगेच त्याने मला "पपलू" अशी जोरात हाक मारली. माझी ही अवस्था बघून तो मला "पुना कॅफे" अशी पाटी असलेल्या एका दूकानात घेवून गेला. त्याने दोन कॉफी अशी झोकात ऑर्डर ठोकली. मला उगीच वाटतय की ज्याने कॉफी आणली त्याची सुरत बारामतीकरांशी काफी मिलती जुलती होती. मी पपलू नाही, एकनाथ मराठे असे त्यांना हजारदा सांगितल्यावर त्यांना पटले. पण माणूस मोठा दिलदार ! "या कलमाडीने एकदा कोणाला आपला दोस्त मानले की मानले, कवा बी येत जा राव, हा कॅफे आपलाच आहे, दोस्त आपकी सेवा मे हाजिर है !" असा सबूद दिला आणि तो पाळलाही. योगायोग असेल पण माझी अपघाती झालेली ओळख त्यांना चांगलीच लकी ठरली. सोनिया (मा/आ)यने आश्रय दिला, राज्यसभेची खासदारकी मिळाली , पुढे तर राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजन समितीचे यजमानपद सुद्धा मिळाले.


 

साहेब म्हणजे एक वल्ली आहेत. मला त्यांनी एकदाही मराठे वा एकनाथ म्हणून हाक मारलेली मला आठवत नाही. खरेच आठवत नाही हो - नाही तसे नाही – कधी मारलीच नाही अशी हाक ! कधी मला ते टी बाळू म्हणत, कधी लखोबा, कधी आर आर कधी राहुल --- एकदा तर मला त्यांनी ममद्या अशी हाक मारून पाठीत प्रेमळ धपाटा सुद्धा घातला होता ! मला थोडे विचित्र वाटायचे पण मोठ्या माणसांच्या लिला आपल्याला कशा कळणार म्हणून सोडून द्यायचो. पुढे मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतले. दिल्लीत आयपीएचे ऑफिस आहे त्यात त्यांनी मला डेप्युटेशनवर बसविले. माझा दिल्लीत चांगलाच जम बसला. राष्ट्रकूल स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली होती, विविध कामांची धडाक्यात टेंडरे निघू लागली व माझ्या पायाला जणू भिंगरी लागली. चहा सोनियाजीं बरोबर, फराळ प्रियांकाच्या घरी, रॉबर्टबरोबर बीयर, राहुलबाबा बरोबर धाब्यावर खाणे, मनमोहनांसोबत मलईदार लस्सी, शीला दिदींच्या घरी रात्रीचे शाकाहारी खाणे ---- ! मस्त चालले होते सगळे ! पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला नजर लागतेच ना ! साहेबानी काहीतरी गडबड सुरू केली होती. टेंडर एकाचे, कंत्राट दूसर्यालाच, कामाचे पैसे तिसर्यालाच ते सुद्धा ठरल्यापेक्षा कितीतरी जास्त ! एकच काम, पण बिले हजार, काम रूपयाचे, बिले लाखाची तर कधी काम न करताच बिले ! एरवी साहेब सुरेश कलमाडी याच नावाने क्रॉस्ड चेकच घ्यायचे पण हल्ली मला ते चेक भरायला द्यायचे त्यावर आपले नाव काही भलतेच लिहायचे. मग चेक घेणे बंदच करून गांधीच घ्यायला लागले. पण मग मिळालेले पैसे तरी नीट तिजोरीत ठेवायचे ना ? अहो काय सांगू, नोटांची बंडलेच बंडले कोठेही टाकून द्यायचे, गादीखाली, लादीत, सोफ्यात, बाथरूममध्ये , अगदी संडासात सुद्धा ! शेवटी मी त्यांना जबरदस्ती डॉक्टरांकडे घेवून गेलो. सगळी लक्षणे विस्मृती रोगाची होती ! हे कळल्यावर साहेबांनी क्षणाचीही उसंत न घेता आपला राजीनामा खरडला, सार्वजनिक जीवनातुन निवृत्त होणार असून आता फक्त पुना कॅफे सांभाळणार असे प्रत्रक माझ्याकडून बनवून घेतले. आपल्या निवृत्तिचे कारण सोनिया माय, शीला दिदी, प्यारे मोहन या सगळ्या सगळ्यांना कळवायची जबाबदारी त्यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर दिली. मी उदयिकच १० जनपथ गाठले. सोनियामाय बरोबर पास्ता खात असतानाच मी कलमाडी साहेबांना झालेल्या असाध्य रोगाची माहीती दिली व ते सार्वजनिक जीवनातुन निवृत्त होत आहेत असेही सांगितले. मग मात्र अजबच झाले, सोनियांना कलमाडी कोण तेच आठवत नव्हते ! मी जोरात "राहुलबाबा जल्दी आओ" असे ओरडलो व तो धावतच आल्यावर कलमाडी टेप वाजविली तेव्हा राहुलबाबाने "कलमाडी हो या अनाडी, उनसे हमारा क्या वास्ता ? " असे मला विचारले. तिकडून मी थेट मनमोहनांकडे धाव घेतली तर त्यांना राष्ट्रकुल स्पर्धा किस चीज का नाम आहे हेच आठवत नव्हते, त्यांनी माझी बोळवण शीला दिदींकडे केली. शीला दिदींना मी सगळा प्रकार धाप लागेपर्यंत सांगितला तर त्यांनी "आपको विश्राम की सख्त जरूरत है" असे सांगत हातावर एक पेपरमिटची गोळी देवून पिटाळले. हा सगळा प्रकार साहेबांना सांगायला गेलो तर त्यांनी मलाच "कोन है बे तू ?" असे खडसाविले व धक्के देवून बाहेर काढले ! काहीतरी भयंकर घोटाळा होणार, साहेबांबरोबरच देशाचे नाव सुद्धा खराब होणार म्हणून मी पवार साहेबांना बारामतीत जावून लोटांगण घातले. मी त्यांना त्यांच्या नावाने साद घालताच ते एकदम शून्यात नजर लावून बोलू लागले " कोण मी, कोठून आलो, बारामतीची भानामती की मैद्याचे पोते ? की ममद्या खाटीक की मी श्रीखंड्या ? मराठा सदार की मोघल बादशहा ?" असे स्वगत बोलल्यासारखे बोलू लागले !


 

मधला काही काळ मीच कोमात होतो (म्हणे )! काही महिन्यानंतर की वर्षानंतर डोळे उघडल्यावर "मै कहा हूं" असे न विचारता मी "राष्ट्रकूल स्पर्धा पार पडली का ?" हा प्रश्न विचारला. पडली एकदाची रडत खडत पण त्यात करोडोचा घोटाळा केला म्हणून कलमाडी तुरूंगात आहेत असे कळताच मी "ये हरगिज नही हो सकता, साब बेकसूर है, वो तो अपनी यादगाश खो बैठे है, उन्हे छोड दो" असा टाहो फोडला तेव्हा डॉक्टरांनी "इसके दिमाखपे असर हुआ है" असे म्हणून मला येरवड्याला हलवायची व्यवस्था केली.


 

शेवटी आज तो सोनियाचा दिनू उगवला, माझी मेंटल वार्ड मधून सूटका झाली तशी आदरणीय कलमाडी साहेबांची सुद्धा होईलच ! गेलेला मान-सन्मान परत मिळेल ! चला, मला आता दिल्लीत होणार्या ऑलिंपिकच्या तयारीला आतापासूनच लागायला हवे !

शुक्रवार, १० जून, २०११

मरणानंतर वैर संपते पण ---

रामाने रावणाचा वध केल्यावर ’मरणांतानि वैराणी’ असे म्हणत स्वत: रावणाला विधिवत अग्नी दिला होता. हा आदर्श भारतात अजूनही पाळला जातो. स्वराज्याचा घास घ्यायला आलेल्या खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला पण त्याच्या कबरीला प्रतापगडाच्या पायथ्याशी जागा दिली. कारगिल युद्धात मेलेल्या पाकच्या सैनिकांचे भारतीय जवानांनी सन्मानाने दफन केले, अगदी याच पाकड्यांनी आपल्या सैनिकांच्या मृतदेहांची मेल्यानंतरही विटंबना केलेली असतानाही ! न्यायालयीन कारवाई टाळण्यासाठी परागंदा झालेले हुसेन लंडनमध्येच पैगंबरवासी झाले म्हणून भारतीय वृतपत्रांनी मोठाच मातम केला आहे ! त्यांनी लंडनमध्ये पलायन केले याला जणू सगळे हिंदूच जबाबदार या आवेशात सगळ्या पेपरवाल्यांनी गळा काढला आहे.

महाराष्ट्रातील पंढरपूर येथे जन्मलेले चित्रकार एम.एफ. हुसेन लंडनमध्ये पैगंबरवासी झाले. भारतात उदंड पैसा, प्रसिद्धी कमावलेले हुसेन लंडनमध्ये कशाला गेले होते ? हिंदू देव-देवतांची नग्न चित्रे काढल्याबद्दल त्यांच्यावर भारतात न्यायालयात खटले चालू होते. त्यात त्यांना शिक्षा होणार होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांना जर एवढा पुळका होता तर आपली ही भूमिका त्यांना न्यायालयात ठामपणे मांडता आली असती. जिकडे कसाबचे ऐकले जाते तिकडे हुसेनचे सुद्धा ऐकले गेले असतेच ! पण भ्याड हुसेन यांनी आधी दुबईत मग इंग्लंडमध्ये पलायन करणे पसंत केले. आता वयाच्या पंचाण्णवाव्या वर्षी मृत्यू येणे तसे स्वाभाविकच आहे आणि तो जिकडे असाल तिकडेच येणार. यमदूत काही देशांच्या सीमा पाळायला बांधील नाहीत. हुसेन यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दावाच मुळात खोटारडा होता. हिंदू देव देवतांची नग्न चित्रे त्यांनी रेखाटलीच पण त्याही पुढे जावून त्यांनी भारतमातेच्याच वस्त्राला हात घातला. या वेळी मात्र भडका उडाला व हुसेन यांचे हात त्यात पोळले, तोंड दाखविणे त्यांना मुष्किल झाले. त्यांनी या प्रकाराची माफी मागितली तेव्हाच हिंदू देव-देवतांना विकृत स्वरूपात रेखाटल्याबद्दल खेद व्यक्त करायला हवा होता. पण तसे मात्र त्यांनी केले नाही ! हिंदूच्या देव देवतांना नग्न रेखाटणारा हुसेन यांचा कुंचला इतर धर्मातल्या विभूति रेखाटताना मात्र भलताचा सोज्वळ असे. हुसेन यांची आई लहानपणीच गेली होती व अखेरपर्यंत ते आपल्या आईच्या कबरीचा शोध घेत होते. आईचे रेखाटन करताना हे असले थेर हुसेन यांना का सुचले नाहीत ? तेव्हा हिंदूना दुखविणे, त्यांच्या श्रद्धा स्थानांना ठेच पोचविणे व यातुन अधर्मी मिडीयाचा वापर करून स्वत:ची तुंबडी भरणे हेच हुसेन यांचे खरे स्वरूप होते. जिकडे आपण नाव कमाविले तिकडेच मरण येणे हे भाग्यलक्षण असले तरी ते भाग्य हुसेन यांनी स्वत:च लाथाडले होते. दोष त्यांच्या कर्माचाच आहे. देशद्रोहाचा आरोप माथ्यावर मिरवत परागंदा असलेला दावूद सुद्धा केव्हातरी मरणारच आहे, तो उद्या पाकमध्ये किंवा दुबईत मेला म्हणून भारतीय मिडीया असाच मातम करणार आहे का ?

झाले ते झाले ! हुसेन मेले ,वैर संपले, आता खुषाल त्यांचे थडगे पंढरपूरमध्ये बांधा पण कफन म्हणून भारतमातेच्या वस्त्राला हात घालू नका म्हणजे झाले !

रविवार, १३ मार्च, २०११

म्या मरीन पण तुका ---- !

“म्या मरीन पण तुका रांड करीन” अशी एक इरसाल मालवणी म्हण आहे ! टीम इंडीयाने या म्हणीचा प्रत्यय काल शतक ठोकणार्या सचिनला दिला ! हीच टीम इंडीया सचिनला विश्वचषकाची भेट देणार आहे म्हणे ! मुंह मे राम और बगल मे छुरी ! इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात सुद्धा सचिनने शतक केल्यावर बाकी फलंदाजानी योजनाबद्ध हाराकिरी केली होती पण सचिनच्या पुण्याईनेच तो सामना टाय झाला. हल्ली काही दळभद्री लोक सचिनने शतक ठोकले की भारत हरतो अशी बोंब ठोकत आहेत. अशांच्या xx मध्ये बेल्ससकट सहा स्टंप ठोकायला हवेत. संघातला एक फलंदाज चेंडूगणिक धाव घेवून शतक ठोकतो व बाकिचे त्याला नाट लावण्यासाठी आपले नाक कापून घेतात हेच खरे ! माणूस जेवढा मोठा होतो तेवढेच त्याला शत्रू सुद्धा निर्माण होतात. सचिनवर बंगाली काला-कांडी करून गांगुली थकला, अझरने बेंटींग करून सचिनच्या अनेक चांगल्या खेळींची माती केली. द्रविडने वेळ येताच कानडीपणा दाखविला आता धोणी तीच गादी पुढे चालवित आहे !


कालचा पराभव माझ्या मते सर्वात लाजिरवाणा पराभव म्हणावा लागेल ! अगदी जावेदने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराचे वळ एक वेळ बुजतील पण हा सचिनच्या खेळीला नाट लावण्यासाठी ओढवून घेतलेला पराभव विसरू विसरता येणारा नाही ! काल आपल्याला दक्षिण आफ्रिकेने हरविले यावर अजूनही माझा विश्वास बसलेला नाही. नक्की कोठे घोटाळा झाला ? चावलाला काढून टाकले तर त्याच्या जागी अश्विनला घ्यायचे सोडून नेहराच बरा धोणीला गवसला ? आणि सुरेश रैना काय फक्त क्षेत्ररक्षणासाठीच संघात आहे का ? गंभीर किंवा विराट कोहली यातल्या एकाला आलटून पालटून विश्रांती देवून रैनाला का खेळविले जात नाही ? रैना गोलंदाजी सुद्धा करू शकतो व त्याची फिल्डींग हा बोनसच आहे.


सचिन-सेहवागच्या धडाकेबाज सलामीनंतर भारताची धावसंख्या कमाल ४०० ते किमान ३५० असायलाच हवी होती. इंग्लंडविरूद्ध अशीच दणकून सलामी मिळून सुद्धा शेवटी उडालेल्या घसरगुंडीने शेवटचा चेंडू खेळायला आपल्याकडे फलंदाजच शिल्लक उरला नव्हता. या इतिहासातुन टीम इंडीयाने कोणता बोध घेतला ? तर या वेळी शेवटचे आठ चेंडू खेळायला आपल्याकडे फलंदाजच शिल्लक नव्हता ! याला म्हणतात अनुभवाने शहाणे होणे ! धोणीचे गणित सुद्धा कच्चे आहे हे नक्की. शेवटचे षटक आपल्या सर्वोत्तम गोलंदाजाकडे कसे यावे यासाठी त्याने शिकवणी लावायची गरज आहे. धोणीच्या वकुबाबद्द्ल सुद्धा शंका घ्यायला बराच वाव आहे. पॉवर प्ले कधी घ्यायचा याचा निर्णय कायम त्याच्या व पर्यायाने संघाच्या अंगलट आला आहे. शतकी खेळी केलेला सचिन दमला असणे स्वाभाविक होते व पॉवर प्ले मध्ये उलचून चेंडू मारण्यात तो यशस्वी होण्याची शक्यता कमी होती. तो एकेरी-दुहेरी धावा घेवून धावफलक हलता ठेवत असताना पॉवर प्लेचा अवसानघातकी निर्णय पुढे ढकलता आला असता. बरे पॉवर प्ले मध्ये विकेट पडत आहेत हे लक्षात आल्यावर आक्रमकपणाला मुरड घालून खेळपट्टीवर तळ ठोकला असता तरी निदान ३०० चा पल्ला गाठता आला असताच. सचिन असेपर्यंत फलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी एकदम रंग बदलेल हे संभवत नाही. पण सचिनला नाट लावायची या एकाच प्रेरणेने सगळे खेळत होते व हे सगळे दूसर्या टोकाला धोणीच्या साक्षीने चालले होते. धोणी कॅप्टन कुल नसून खूनशी आहे नाहीतर बथ्थड तरी आहेच आहे ! अगदी शेवटच्या षटकात तेरा धावा हव्या असताना धोणीने चेंडू दिला नेहराकडे ! काय त्या नेहराचा चेहरा ! एरंडेल घेतलेला नेहरा शेवटचे षटक टाकणार म्हटल्यावर छातीत धस्स झाले होते ! सचिन गोलंदाजीसुद्धा ( हो, सेहवाग सुद्धा ! ) करू शकतो याचा हल्ली धोणीला विसरच पडलेला आहे ! याच सचिनने पोरसवदा असताना याच आफ्रिकेविरूद्ध शेवटचे षटक टाकून सामना टाय केला होता , इंझमाम हक सारख्या कसलेल्या फलंदाजाला शेवटच्या चेंडू पर्यंत जखडून ठेवण्याची करामत केलेली होती --- पण सचिन द्वेषाने पछाडलेल्या झारखंडी धोणीला त्याचे काय ? मराठ्यांचे पानिपत कसे करायचे हेच त्याच्या सडक्या डोक्यात असणार ! निदान शेवटच्या चेंडू पर्यंत तरी उत्कंठा वाटेल असेही नेहराने काही केले नाही ! चोकार, षटकार, चौकार ! खेळ खल्लास ! हीच का टीम इंडीयाची सचिनला संस्मरणीय भेट ? ३७ वर्षाचा तरूण तडाखेबंद शतक ठोकतो, तेवढ्याच उत्साहात स्वत:च्या शरीराचा कोट करून क्षेत्ररक्षण करतो व त्याला नाट लावण्यासाठी बाकी टोळभैरव विकेट विकतात, हातातले झेल सोडतात, तो जेव्हा दूसरी धाव घेण्यासाठी अर्धे अंतर पार करून आलेला असतो तेव्हा त्याचा तरूण सहकारी एक धाव कशीबशी पुरी करीत असतो !


सचिन भारतात जन्माला आला हे आपले भाग्य पण त्याचे काय ? ही कसली टीम इंडीया ही तर ’शेम इंडीया’ !

शुक्रवार, २८ मे, २०१०

भाषावार प्रांतरचना आणि बाळासाहेब !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रकृती सुधारून परत सक्रीय होत आहेत ही चांगली बातमी आहे. १ मेच्या कार्यक्रमातली त्यांची उपस्थिती शिवसैनिकांना नवी उमेद देवून गेली असणार यात शंकाच नाही. बाळासाहेबांनी काही विधान केले की गदारोळ उडालाच पाहिजे व माध्यमांना पुढचे काही दिवस मथळा काय द्यायचा याची काळजी करावी लागत नाही. “अमरनाथ यात्रेला अडथळा आणाल तर हज यात्रा बंद पाडू” किंवा खलिस्तान प्रश्न पेटला असताना मुंबईत शीख समुदायावर बहिष्कार टाकण्याचे वक्तव्य चांगलीच गाजली होती. पण कधीतरी बाळासाहेबांचा बोलताना तोल सूटतो. यात बाळासाहेबांची गोची होतेच (अर्थात याने त्यांना काहीच फरक पडत नाही म्हणा ! ) पण मराठी भाषिक सुद्धा संभ्रमात पडतात. महाराष्ट्रात मराठीचे जे काही थोडेफार अस्तित्व आहे, अगदी फाटक्या कपड्यात का असेना, बाळासाहेबांमुळेच आहे हे नक्की ! पण याच बाळासाहेबांची अनेक वक्तव्ये आपल्याच तत्वाला हरताळ फासणारी असतात ! ,मराठीचा मुद्दा लोकांच्या पचनी पडत असतानाच अचानक सेनेने हिंदुत्वाची कास धरली व १.५० लाख झोपडट्टीवासियांना मोफत घरे देण्याची सवंग घोषणा करून १९९५ च्या निवडणुका जिंकल्या. मध्यमवर्गीय, कायदा पाळणारा मराठी माणूस घरासाठी घरघर करीत असतानाच कायदा धाब्यावर बसवून शहराला बकाल करणार्या युपी-बिहारींना सेनेने आपलेसे केले. संजय निरुपमला सेनेने मोठा केला व वेळ येताच त्याने सेनेला अंगठा दाखविला व युपी-बिहारींची टेंपररी वोट बँक काँग्रेसच्या दावणीला बांधली. दरम्यान ठाकरे घरातच भाउबंदकीचा प्रयोग रंगला व पुतण्या राज ठाकरे यांनीच सेनेचा सत्तेचा दोर यंदा कापला ! आता दोन भावांतच मराठीचे खरे कैवारी आपणच आहोत हे दाखविण्याची स्पर्धा लागली आहे.

खूप वर्षे आधी “माझी नातवंडे कॉनवेंट (इंग्रजी माध्यम नव्हे ! ) मध्ये शिकल्यामुळे स्मार्ट झाली आहेत “ असे उद्गार काढले होते. ( उद्धव यांचा मुलगा ज्या बॉम्बे स्कॉटीश हायस्कूलात शिकला त्या संस्थेने आपले नाव बदलायला ठाम नकार दिला आहे !) तेव्हा सुद्धा लोक चांगलेच संभ्रमात पडले होते. आजच्या पेपरात बाळासाहेबांनी जातवार जनगणनेला विरोध करतानाच “भाषावर प्रांतरचनेमुळे देशाचे वाटोळे झाले” असले परस्पर काहीही संबंध नसलेले विधान विधान केले आहे. मराठी भाषिकांचे वेगळे राज्य हवे ही मागणी फार जुनी होती. तसे भाषिक राज्याला काँग्रेसच्याच अनेक नेत्यांचा पाठींबा होता. फक्त आकसाने वेगळे मराठी भाषिक राज्य देण्यास मात्र नेहरू तयार नव्हते.. या साठी फार मोठी चळवळ झाली, अनेकांनी आपले रक्त सांडले, मराठी भाषिक राज्य हवे हा एककलमी कार्यक्रम घेवून काँग्रेस विरोधी पक्षांची एक मोठी ताकद उभी राहिली होती, निवडणुकित या आघाडीने चांगलाच हादरा दिल्यावर संयुक्त महाराष्ट्राचा जन्म झाला होता. तसे राज्य स्थापूनसुद्धा साठी उलटली. साठ वर्षाचा मराठी भाषिक राज्याचा ताळेबंद नक्कीच उत्साहवर्धक आहे. अनेक क्षेत्रात देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. दुर्दैवाने या विकासाचा लाभ मराठी माणसाला कमी मिळाला. हिंदुस्थानवर गझनीने केली नसतील एवढे भयंकर आक्रमणे पुढील काळात युपी-बिहारींनी महाराष्ट्रावर केली व महाराष्ट्राचे लचके तोडले, शहरे भकास व बकाल करून टाकली. देशाच्या इतर कोणत्याच राज्यात युपी-बिहारींना मोकळे रान मिळाले नाही, त्यातील अनेक राज्यात भाषिक अभिमान जागा असल्याने प्रादेशिक पक्षांची सरकारे आली. हिन्दीचा कोणत्याही प्रकारे मुलाहिजा या राज्यांनी राखला नाही ! आंध्रात तर रामारावांनी हिन्दी बातम्यांचे प्रसारणच बंद पाडले होते ! काँग्रजी मराठा नेत्यांनी मात्र महाराष्ट्राला दिल्लीची बटीग बनवून टाकले. मराठी माणसावर व भाषेवर केंद्र व राज्यातील काँग्रेस सरकार अन्याय करते, केंद्र सरकार आपल्या आस्थापनात मराठी भाषिकांना डावलते, दिल्लीत मराठी माणसाला मान नाही या मुद्द्यांवरच तर सेनेचा जन्म झाला. मराठी अस्मितेचा निखारा सेनेने सतत फूंकर मारून धगधगत ठेवला व त्याचा पुर्ण लाभ उठविला त्याच सेनेचा संस्थापक भाषावार प्रांतरचनेला ६० वर्षानी विरोध करतो आहे हे किती अजब ! असली बेछूट विधाने करून मिळते काय व गमावतो काय याचा बाळासाहेबांनी विचार करायची वेळ आली आहे. जर ते तसा करणार नसतील तर मराठी माणसाने तरी वेगळा विचार केला पाहिजे !