मंगळवार, १ मे, २०१२

दुष्काळ - पाण्याचा व अकलेचा !

पावसाळा काही आता नेमेचि येत नाही तसेच निरोपही वेळेवर घेत नाही पण दुष्काळ मात्र महाराष्ट्राच्या जणू पाचवीलाच पूजलेला आहे. मार्च महिना सुरू होताच दुष्काळाच्या बातम्या व फोटो पेपरात यायला लागतात. भेगा पडलेली जमीन, तळ गाठलेल्या विहीरी, कोरडे पडलेले तलाव, पाण्यासाठी कळशी घेवून मैलोन-मैल अंतर तुडविणार्या बायका ! गेली साठ वर्षे अगदी हेच चित्र आहे ! ज्या देशात बारमाही वाहणार्या नद्या आहेत, वर्षातले चार महिने जिकडे मेघ पाण्याचा वर्षाव करतात त्या देशात लोकांना धड पाणीही सरकार देवू शकत नाही. सुजलाम सुफलाम या ओळी राष्ट्रगीतातच उरल्या आहेत. नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे हा देशच वाळवंट होत चालला आहे.

 जनावर मेले की गिधाडे आपसूकच जमतात तशी द्ष्काळ पडला की नेते लगेच तिकडे धाव घेतात. दुष्काळी कामांच्या नावाखाली पैसा कसा जिरवता येइल हाच या दौर्यांचा खरा हेतू असतो. जाहिरातीवर डोळा ठेवून आपला आत्मा गहाण ठेवलेली वर्तमानपत्रे राहुल गांधींना युवराज म्हणतात. असे हे युवराज आपल्या लवाजम्याला घेवून दुष्काळाची पाहणी करायला महाराष्ट्राच्या दौर्यावर आले होते. मटामध्ये त्या दौर्याचा एक फोटो आला आहे. एक गरीब बाई छातीचा भाता फुटेस्तोवर हापसा उपसते आहे पण त्यातुन जेवढे थेंब पाणी येत आहे त्यापेक्षा जास्त पाणी तिच्या डोळ्यातुन येत आहे. हा फोटो बघितला आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली पण त्याच फोटोत युवराज व त्याचे हुजरे मख्खपणे उभे आहेत. ज्यांच्या अंगात पाणीच नाही ते महाराष्ट्राच्या जनतेची तहान कशी भागविणार ? पाण्याचा दुष्काळ बघायला अकलेचा दुष्काळ असलेल्या राहुलने यावे हाच एक मोठा विनोद आहे ! अर्थात या दौर्याने युवराजांच्या अब्रूची लक्तरे पुरती फेडली गेली ! एका तरूणाने युवराजाला सुनावले की ही नौटंकी बंद कर ! इथला दुष्काळ बघायला तुझी आई सुद्धा आली होती ! तरूणाच्या बापाला व आजाला नक्की आठवेल की बाप-लेकच काय गांधी घराण्याचे पणजोबा नेहरू, आजी इंदीरा व बाप राजीवसुद्धा इथे येवून गेले असतील ! कैक नेते आले व गेले दुष्काळ मात्र आहे तसाच आहे !

  लोकशाहीत सर्व लोकांना सर्व काळ फसविता येत नाही असे म्हणतात पण महाराष्ट्रात तरी त्याचा काही प्रत्यय येत नाही ! गांधी घराणे मराठी जनतेला गेली साठ वर्षे फसवित आहे व महाराष्ट्राची जनता दिल्लीश्वरांची रखेल म्हणून जगते आहे. मराठा नेतृत्व दिल्लीश्वरांनी फेकलेली शिळी भाकर चघळत व स्वाभिमान इटालियन मडमेच्या पदरात टाकून फक्त आपली सरदारकी सांभाळते आहे. गेली दहा वर्षे महाराष्ट्रात नुसता काळोख पसरला आहे. ना वीज, ना पाणी, ना चांगली आरोग्य सेवा, ना धड शिक्षण ना जगण्याची शाश्वती ! पण आघाडी सरकार मात्र सुखाने राज्य करते आहे ! विकासकामे करून सत्ता टीकवण्यापेक्षा “फोडा व राज्य करा” ही नीती वापरून राज्य करणे जास्त सोपे नाही का ? लोकांना पाणी मिळाले, वीज मिळाली तर ते सुखी होतील पण मग नेत्यांचे काय ? त्यांच्या उसाला बारमाही पाणी कसे मिळेल ? त्यांनी काढलेल्या वीज प्रकल्पाला स्वस्तात जमीन व भरमसाठ भाव कसा मिळेल ? त्यांच्या विना-अनुदान चाललेल्या शिक्षणाच्या दुकानदारीला कच्चा माला कसा मिळेल ? त्या पेक्षा यांना काळोखात ठेवलेले बरे , आपले धंदे त्यांना कळणारच नाहीत. काळोख असल्यावर गरीब माणून हात धरतोच व त्या हातावर घड्याळ असतेच ! बाजूच्या गुजरातकडे बघा ! मोदींनी विरोधकांना फाट्यावर मारून नर्मदा प्रकल्प पुरा केला व गुजरातची तहान भागविली आहे. आता तर नर्मदेच्या कालव्यावरच त्यांनी सौर प्रकल्प चालू केले आहेत. स्वच्छ वीज मिळेल पण त्याहून महत्वाचे म्हणजे पाण्याचे बाष्पीभवन होवून वाया जाणारे लक्षावधी लीटर पाणे वाचणार आहे ! आपल्याकडे मात्र पाणी अडवा व पाणी जिरवा ही घोषणा कागदावरच उरली आहे. दुष्काळ पडूदे , मग आधी टॅंकरने पाणी विकून पैका कमवू मग दुष्काळी कामे काढून पैसा आणू व जिरवू असा कारभार चालला आहे. दुष्काळ ही जणू सत्ताधार्यांसाठी सिंहस्थ पर्वणी झाली आहे व उन्हाने पोळलेल्या व तहानेने व्याकूळलेल्या महाराष्ट्राला नागवे करण्यातच नेते दंग आहेत. मोघलाईत ही स्थिती असतानाच शिवाजी जन्माला आला होता व त्याने “पाणी उदंड जाहले” अशी कामगिरी केली होती. आज याच शिवबाचे नाव घेणारे दिल्लीची हुजरेगिरी करून सत्ता ओरपत आहेत ! असेना का दुष्काळ मलबार हिल वर मात्र “पाणी उदंड झाले स्विमिंग पुल बांधायाला” अशी स्थिती आहे ! मुंबईत उडप्याकडे तुम्ही तोंडाला पाणी लावून ग्लास बाजुला ठेवताच तो उचलून नवीन भरलेले ग्लास ठेवले जात आहेत, मोटारी, रेल्वेचे डबे धुण्यासाठी हजारो लिटर पाणी रोज वाया चालले आहे. शहरी माणूस महापालिकेचे घरी नळाला येणारे शुद्ध पाणी महाग म्हणून बोंब मारतो. त्याचा भाव आहे हजार लिटरला दोन रूपये पण हाच माणूस एक लिटर बिसलेरीला 15 रूपये मोजतो आहे ! मुंबईसाठी जिकडून पाणी आणले जाते त्या गावातल्या लोकांना मात्र पाणी नाही ! मुंबईत मात्र पाइपलाइन फोडून पाणी विकणारे पाणी-माफिया फोफावले आहेत ! मुंबईला पुरविल्या गेलेल्या फक्त 30 % पाण्याचा हिशोब लागतो. बाकी 70 % पाणी झोपडपट्टीवाले हडप तरी करतात किंवा वाया तरी जाते ! अनेक घरातले नळ गळके असतात ते दुरूस्त करायची तसदी मालक घेत नाही, वाहत्या नळाखाली भांडी धुतली जातात, यंत्र वापरून कपडे धुणे सोपे जाते पण त्यासाठी तिप्पट पाणी वापरले जाते ! मोठ्या मोठ्या पिंपात साठवलेले पाणी सकाळी ताजे (?) पाणी आल्यावर चक्क ओतून दिल जाते ! हे सर्व राजरोस करणारे आपण सर्व “तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होणार” या वर मात्र सहमत असतो ! शाळेत आपली मुले पाण्याचा पुनर्वापर कसा करावा याचे प्रोजेक्ट सादर करीत असतातपण ते फक्त गुणासाठी असते ! घरी मात्र नळ पुर्ण सोडून तोंड धुत असतात, जरा पाणी तोंडाला लावून बाकी पाणी बेसिनमध्ये फेकून देतात ! शहरातल्या या पाण्याच्या उधळपट्टीला आळा घालायलाच हवा तरच महाराष्ट्राच्या काना-कोपर्यात पाणी मिळेल.

  रयतेचे कल्याण करण्याची इछाशक्ती असती तर दुष्काळ हा शब्दच इतिहासजमा झाला असता. पावसाचे फक्त 1 % पाणी जरी अडवले व जिरवले तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होइल असे तज्ज्ञ म्हणतात. मग 60 वर्षात ही साधी गोष्ट का नाही झाली ? प्रत्येक गावात छोटे सिंचन प्रकल्प, लहान बंधारे का नाही बांधले जात ? राळेगणसिद्धीत अण्णांनी जलस्वराज्य आणले मग हाच प्रयोग अण्णा इतर गावात का करीत नाहीत ? उन्हातान्हात पावलाना चटके बसत असताना व डोके तडकत असताना पाण्यासाठी वणवण भटकणार्या आया-बहिणींना बघून नेत्यांना जरा सुद्धा शरम कशी वाटत नाही ? तहानलेल्या महाराष्ट्राचा घडा कधी भरणार नाही तसेच यांच्या पापांचा घडाही कधी भरणार नाही !