सोमवार, २० डिसेंबर, २०१०

मूल्य !

तुम्हाला तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठावूक आहे का ?

व्यक्तीमत्व विकासाच्या एका वर्गाची सुरवातच नाट्यमय झाली. भाषण देणार्या त्या प्रसिद्ध वक्त्याने खिषातुन 500 रूपयाची नोट काढून उपस्थित सर्वापुढे फडफडवली व ही नोट कोणाला हवी आहे असे विचारले. अर्थात सगळ्यानीच हात वर केले. मग त्या वक्त्याने ती नोट हातात घेवून पार चुरगळून टाकली व परत तोच प्रश्न विचारला. आताही सगळ्यांचे हात वरच झाले. चेहर्यावर आश्चर्य दाखवित आता त्या वक्त्याने ती नोट बूटाने चूरडली, तिच्यावर उड्या मारल्या. आता त्या नोटेची अवस्था बघवत नव्हती ! “आता तरी ही नोट घेणारे कोणी असेल का ?” या त्याच्या प्रश्नाला सगळ्यांनीच हात उंचावून तयारी दाखविली !

वक्ता हसत हसत सगळ्यांना म्हणाला की तुम्ही आताच एक अतिशय मौल्यवान धडा शिकलात ! 500 ची नोट मी हाताने चुरगळली, बूटाने लाथाडली तरी ती पाचेशेची नोटच राहते, तिचे मूल्य जराही कमी होत नाही. प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा आपल्यावर अनेक संकटे येतात, आपण कोलमडतो, अपयशाचे फटकारे खातो, आपणच घेतलेले अनेक निर्णय आपल्यालाच गोत्यात आणतात, मग आपण स्वत:लाच दोष देतो, आपण बिनकामाचे आहोत, आपली काही किंमतच नाही, लायकी नाही असे आपल्याला वाटते. पण काहीही झाले तरी तुमचे मूल्य केव्हाही कमी झालेले नसते, होणारही नाही हे पक्के लक्षात ठेवा !

तुम्ही खास असामी आहात हे कधीही विसरू नका ! भूतकाळातल्या अपयशाची सावली तुमच्या उज्वल भविष्यावर कधीही पडू देवू नका !

“VALUE HAS A VALUE ONLY IF ITS VALUE IS VALUED”

रविवार, १९ डिसेंबर, २०१०

दळवी काकांचे काय बरे झाले असेल ? ( भाग 2 )

पहिला भाग पोस्ट केला तेव्हा दूसरा भाग लिहायला लागेल असे खरेच वाटले नव्हते. 80 वर्षाचे दळवीकाका माझी पोस्ट जगाच्या पाठीवर कोठेतरी वाचतील व आपण जिवंत असल्याचे सांगतील असे माझ्या ध्यानी मनी सुद्धा नव्हते. तसे त्यांनी आपण जिवंत आहोत व अमेरिकेत मुलीबरोबर सेटल झालो आहोत असे वाचल्यावर खूप खूप बरे वाटले. अनेक वर्षे पोखरून काढत असलेली खंत दूर झाल्याचे समाधान मिळाले – काही काळ तरी मिळाले. हो काही काळच ! तसे एक मन सांगत होते कशाला आता यात अजून गुंततो आहेत. घे करून मनाचे समाधान, काका सुखरूप आहेत ! पण दूसरे चिकित्सक वृत्तीचे मन मात्र समाधान मानणार नव्हते. दळवी काकांनी एवढे त्रोटक का बरे लिहिले ? मी तर माझा मोबाइल नंबर सुद्धा ब्लॉगवर दिला आहे. त्यांनी नाही निदान त्यांच्या मुलीने तरी संपर्क साधायला हवा होता. अजून एक गोष्ट म्हणजे मी त्या पोस्ट मध्ये त्यांना देय असलेल्या लाखाच्या थकबाकीचा उल्लेख केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी काहीही चौकशी न करणे शंकास्पदच होते. बाबांची साधी खुषाली त्यांनी विचारू नये हे सुद्धा विचित्रच वाटत होते मला. कदाचित अजून काही दिवसांनी सविस्तर खुलासा करतील, कदाचित फोन सुद्धा करतील म्हणून मी एक आठवडा वाट बघायचे ठरविले. अचानक मला मी ब्लॉगवर टाकलेल्या विडगेटची आठवण झाली. स्टॅट काउंटर माझा ब्लॉग कोणी, कधी, कोठे, केव्हा वाचला याची नोंद ठेवत असतो. पोस्टवर कॉमेंट पोस्ट केल्याची वेळ मी त्या दिवशीच्या विजीटसशी जुळावून बघितली. दळवी काकांची पोस्ट त्या काळात 4 जणांनी वाचली होती व त्यातला एकही अमेरिकेतला नव्हता ! पुढचे दोन दिवस त्या पेजला परत परत भेट देणारा एक युजर मला लोकेट करता आला व तो भारतातला एवढेच नाही तर मुंबईतला होता ! त्याचा आय पी आयडी मी लिहून ठेवला व ते स्टॅटचे पेजच कॉपी-पेस्ट करून ठेवले. अर्थात कोणीतरी टवाळेगिरी करण्यासाठी अशी पोस्ट टाकली असेल अशी शक्यता सुद्धा होतीच ! पण हा टवाळ कोण ते शोधल्याशिवाय मला चैन पडणार नव्हतीच !

दळवी काका युनियनचे काम करीत व त्यांच्या ओळखीही खूप होत्या. दळवी काकांची मी एक फाइलच बनविली व ओळख काढून थेट एका एसीपीलाच भेटलो. हा एसीपी खरेच भला माणूस निघाला. माझे म्हणणे त्याने अगदी शांतपणे ऐकून घेतले. काही मुद्दे क्लियर झाल्यावर त्यांनी मला थेट प्रश्न विचारला की तुम्हाला खरेच याच्या अगदी तळाला जायचे आहे ? मी हो असे ठामपणे सांगताच त्यांनी मग तुम्हीच दळवीकाका बेपत्ता असल्याची लेखी तक्रार आधी आम्हाला द्या असे सांगितले. मी तक्रार लागोलाग कागदावर लिहून काढली व त्यांना दिली. काही विचार करून त्यांनी हा तपास आता सीआयडी मार्फतच केला पाहिजे असे ठरविले. फोनाफोनी झाल्यावर हा तपास गुप्तचर विभागात नव्यानेच दाखले झालेले तरूण अधिकारी संग्राम भोसले यांच्याकडे सोपवायचे ठरले. मी भोसलेंशी तासभर चर्चा केली. भोसलेंनी सगळे शांतपणे ऐकून घेतले व तो आय.पी अ‍ॅड्रेस कोणाचा हे शोधणे व त्या घराच्या विक्रीच्या व्यवहाराचे सर्व पेपर तपासणे हे मुख्य काम असेल व मगच तपासाला नक्की दिशा मिळेल असे सांगितले. आम्ही दोघांनी परस्परांचे मोबाइल नंबर सेव केले व निरोप घेतला. भोसले मला मधून मधून फोन करून अपडेटस देणार होतेच.

इन्स्पेक्टर भोसले तडफेने कामाला लागले. मीरा-रोडच्या निबंधक कार्यालयातुन त्यांनी जागेच्या व्यवहाराची फाइल मागविली. सायबर सेलला आय.पी. अ‍ॅड्रेसवरून तो कोणाचा आहे ती माहिती मागविली. आमच्या पेन्शन विभागातुन दळवींच्या सही व अक्षराचे नमुने गोळा केले. पासपोर्ट कार्यालयाकडून त्यांनी जेडी दळवी व त्यांच्या मुलीचा पासपोर्ट आहे का व असल्यास त्याच्यावरच्या नोंदी मागविल्या. बोगस कागदपत्रांच्या आधारे जागेचे हस्तांतरण केले गेले होते व ज्या इस्टेट एजंटाने हा व्यवहार केला होता त्याचा आय.पी. अ‍ॅड्रेस, पोस्ट वर दळवी जिवंत असल्याची कॉमेंट देणार्याशी तंतोतंत जुळत होता. जागेचे हस्तांतरण सोसायटीच्या मंजूरी शिवाय होतच नसल्याने संस्थेच्या सचिवाचे वागणे सुद्धा संशयास्पद होते. पोलीसी पाश आता सर्व संशयितांभोवती आवळले जावू लागले होते. गुप्तपणे त्यांची प्रत्येक हालचाल टीपली जात होती. प्रकाश घोडके हा इस्टेट एजंट त्या भागात भाईगिरी सुद्धा करीत होता. अनेकांना दमबाजी करून, प्रसंगी मारहाण करून सुद्धा त्याने जागा खाली करून घेतलेल्या होत्या. त्याच्या गुंडगिरीमुळे याची कोणी वाच्यता केली नव्हती किंवा पोलिस ठाणेसुद्धा त्याने बांधून ठेवले असावे. दळवी व त्यांच्या मुलीचे बेपत्ता होणे व त्यांच्या जागेची बोगस कागदपत्रांच्या आधारे विक्री करणे हे दोन वेगवेगळे गुन्हे होते. घोडके बनावट कागद बनवून फ्लॅट विकण्याच्या कटात सहभागी होता हे निश्चित पण त्याने दळवी वा त्यांच्या मुलीचे अपहरण, खून केला असे सिद्ध करणे कठीण होते. बरेच दिवस जागा बंद बघून त्याने ती विकली असेल हे सुद्धा गृहित धरायला हवे होते. दरम्यानच्या काळात पासपोर्ट विभागाकडून मागितलेली माहिती मिळाली. त्यावरून दळवींकडे वैध पासपोर्ट होता तरी ते देशाबाहेर गेल्याची नोंद नव्हती पण त्यांची मुलगी मात्र आपल्या नवर्याबरोबर अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी रवाना झाली. तारीख होती दळवी बेपत्ता झाल्याचा दूसराच दिवस ! पासपोर्ट कार्यालयाकडून दळवींच्या जावयाचा भारतातला पत्ता मिळाला. पोलिस त्या पत्त्यावर गेले तेव्हा त्यांना माहिती मिळाली की दळवींना हे आंतरजातीय लग्न अजिबात पसंत नव्हते. एकुलत्या एक मुलीने कायमचे परदेशात सेटल व्हावे हे त्यांना साफ नामंजूर होते. मुलीच्या सासर्यांशी त्यांनी अजिबात सख्य ठेवले नव्हते. दळवींच्या मुलीला नवर्याने परदेशात बोलाविले होते. अगदी शेवटच्या दिवशी ती हे सर्व काकांना सांगणार होती पण त्या दिवशी सकाळी घराबाहेर पडलेले काका रात्री उशीरापर्यंत घरी आले नव्हते. दूसर्या दिवशीच्या विमानाने अमेरिकेला जायचे असल्याने घरी चिठी सोडून ती सासरच्या घरी आली होती. शेवट पर्यंत अर्थात दळवी तिला भेटलेच नाहीत. अमेरिकेत गेल्यावर सुद्धा मुलगी वडीलांनी काहीच संपर्क न साधल्याने काळजीत होती. सासर्यांकरवी तिने वडील बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. अर्थात त्याचा पाठपुरावा करायला सासरचे कोणीच उत्सूक नव्हते. घोडके या एजंटाने दळवींच्या नावाने कॉमेंट टाकताना मुलीबरोबर अमेरिकेत असल्याचा नेमका उल्लेख कसा केला मग ? त्याला हे कसे कळले असेल ?

भोसलेंनी मग मध्यरात्री प्रकाश घोडके, त्याचे तीन साथीदार, सदनिका हस्तांतरणाला ना हरकत प्रमाणपत्र देणारा सोसायटीचा सचिव यांना उचलले व लॉकअप मध्ये टाकले. घोडकेच्या घरावर धाड टाकून अनेक गोष्टी जप्त केल्या गेल्या. त्यात होते एक चांदीचे नाणे, मुंबई बंदरातील कामगारांच्या पतसंस्थेने आपल्या रौप्य महोत्सवाबद्दल ते सर्व सभासदांना दिलेले होते ! म्हणजे घोडके व दळवी एकमेकांना भेटले होते याची शक्यता खूपच जास्त होती. पहिली विकेट पडली सोसायटीच्या सचिवाची ! पोलिसांच्या प्रश्नांच्या फैरीने तो पार गारद झाला व 25000 रूपयाच्या मोहापायी फारशी विचारपूस न करता या सर्व व्यवहाराला आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र त्याने जारी केले होते. अर्थात ज्याने जागा विकत घेतली तो मात्र या सर्वांविषयी अनभिज्ञ होता. घोडके व त्याचे तिन साथीदार मात्र चांगलेच निर्ढावलेले होते. ते ताकास तूर लागू देत नव्हते. सचिवानेच आम्हाला हा व्यवहार करायला भाग पाडले असा त्यांचा बिनतोड बचाव होता. चांदीचे नाणे म्हणे गोदीतल्या एका मित्राने त्याला दिले होते ! मला ब्लॉगबिग काहीही माहीत नाही, मी कोणतीही पोस्ट वाचलेली नाही, कोणीतरी माझे कनेक्शन हॅक करून हे सगळे केले असावे. त्या जागेचा सगळा व्यवहार रोखीत केला असे त्याने सांगितल्यावर जागेच्या विक्रीच्या पैशाचा माग काढायचा मार्ग सुद्धा खुंटला होता. पण भोसले हार मानाणार्यातले नव्हते. प्रकरणात काहीतरी काळेबेरे नक्की होते. त्यांनी घोडके व त्याच्या तिन साथीदारांना वेगवेगळ्या खोलीत डांबले. घोडकेकडे अजिबात लक्ष दिले नाही पण त्याच्या तिन साथीदारांना बोलते केले. केसचा गुंता आता उलगडू लागला होता. त्याच रात्री बाराच्या ठोक्याला भोसले दोन साथीदार घेवून घोडकेच्या लॉक अप मध्ये घूसले. आपल्या साथीदारांनी कबुली दिली असे समजूनही घोडके तोंड उघडायला तयार नव्हता. तेव्हा थर्ड डीग्री वापरण्याशिवाय गत्यंतर नव्हते. थोड्याच वेळात इस्टेट एजंट घोडकेचे उरलेसुरले अवसान गळाले व तो पोपटासारखा बोलू लागला.
’त्या’ काळरात्री घोडके व त्याचे साथीदार मीरा रोड स्टेशनजवळच जमले होते. रात्री उशीरा दळवींना त्यांनी घरी जाताना बघितले व घोडकेला शोधत असलेली नामी संधी मिळाली. या आधी त्याच्या विनंतीला व मग दमदाटीला काकांनी अजिबात भीक घातली नव्हती व जीव गेला तरी जागा विकणार नाही, तुझ्यासारखे छप्पन बघितले असे त्याला सुनावले होते. आता दळवी एकटे होते व रस्तासुद्धा निर्मनुष्य होता. दळवींना त्याच्या साथीदारांनी धरले व फरफटत मोटारीत कोंबले. निर्जन जागी गाडी उभी करून त्यांनी दळवींना अमानुष मारहाण केली. मार देताना मात्र मुका दिला गेला. शरीरावर मारहाणीची कोणतीही खूण दिसणार नाही याची काळजी घेतली होती.पण दळवी कोर्या कागदावर सही करायला तयार झाले नाहीत, म्हातारे असले तरी दळवी हाडापेराने मजबूत होते, त्यांना तावडीत ठेवणे सोपे नव्हते. आता दळवींना जिवंत सोडणे सुद्धा धोक्याचे होते. लोखंडी कांब त्यांच्या डोक्यात घालून त्यांना संपविले गेले. त्यांचे सर्व खिसे उलटपालटे करून त्यातल्या सगळ्या वस्तू त्यांनी ताब्यात घेतल्या. त्यात घराची किल्ली सुद्धा होतीच. मग त्यांचा मृतदेह रूळावर टाकून ते रात्री दोन एकच्या सुमारास त्यांच्या घरात शिरले. घरात मुलीने सोडलेली चिठ्ठी त्यांना मिळाली. घरातले सोने-नाणे, रोख रक्कम त्यांनी लंपास केली व थेट शिर्डी गाठली. सात दिवसाने ते मीरा-रोडला परतले. नंतरचे चार महिने काहीही गडबड झालेली नाही हे बघून जागा विकण्यासाठी ते सज्ज झाले. बाप मेलेला, मुलगी अमेरिकेला गेलेली इतर कोणीही नातेवाइक नाही, तेव्हा बोगस पेपर बनवून ती जागा विकून टाकणे त्यांना जड गेले नाही. सचिवाचे तोंड बंद केले होतेच. ती जागा विकून त्यांनी तब्बल 40 लाख रूपये कमाविले होते. जागेची विक्री केल्यावर त्या व्यवहारासंबंधी चौकशी करायला काकांच्या मित्राचा मुलगा आला होता त्याला त्यांनी पटेलशी कारणे देवून वाटेला लावले होते. काही दिवसापुर्वी मात्र त्याचा साथीदार अशोक कांबळेने त्याला ब्लॉगवर असलेली एक गोष्ट दाखविली. इतरांना ती गोष्ट काल्पनिक वाटली तरी घोडके चांगलाच टरकला. चोराच्या मनात चांदणे. अमेरिकेत असलेली मुलगी हा ब्लॉग नक्की वाचणार व चौकशीच्या भोवर्यात आपण अडकणार अशी भीती त्याच्या मनावर अशोकने ठसविली. फोन करण्यात धोका होता तेव्हा त्या पोस्टवरच दळवी जिवंत आहेत अशी कॉमेंट टाकण्याची बिनतोड आयडीया त्याला सूचली ! अर्थात असे करताना आय.पी. लॉग होतो हे त्यांच्या डोक्यात आलेच नाही. त्या कॉमेंट मुळेच आपले पाप उघडकीला आले यावर एरवी त्याचा विश्वासही बसला नसता ! पोलिसांनी दळवींच्या मुलीच्या सासर्याला व मग सासर्यांनी तिच्या नवर्याला या सर्व प्रकरणाची कल्पना फोन करून दिली. दळवींची मुलगी गरोदर असल्याने धक्का बसेल म्हणून तिला सध्या याची काहीही कल्पना द्यायची नाही असे ठरले.

त्यांनी खून तर व्यवस्थित पचविला होता, जागा विक्रीचा व्यवहारही बिनबोभाट पार पडला होता, अगदी कोणताही पुरावा त्यांनी मागे सोडला नव्हता. त्यांनी जरी काही माग सोडला नाही तरी जेडीकाकानीच माग मागे सोडला होता. एरवी ते कार्ड जर मी त्यांना परत केले असते तर अशी अभद्र शंका माझ्या मनात यायचे काहीही कारणे नव्हते. माझी पोस्ट वाचून ते गुन्हेगार गप्प राहिले असते तरी फारसे काही होणार नव्हते. कदाचित त्यांचा गुन्हा उघडकिला आलाच नसता. एवढे सगळे होवूनही भोसले समाधानी नव्हते. त्यांच्या मते गुन्हा उघडकीला येणे वेगळे व तो न्यायालतात सिद्ध होणे वेगळे. सगळे धागे-दोरे नीट जुळले असते तरी दळवींचा मृतदेह जो पर्यंत हाती लागत नाही, अगदी त्याचा अवशेष , तो पर्यंत खुनाचा आरोप शाबित करणे कठीण आहे. घोडकेने जरी मृतदेह रेल्वे रूळावर ठेवल्याची कबूली दिली असली तरी कोणत्याच पोलिस स्टेशनातल्या रूळावरील मरणाच्या नोंदीत त्याचा पडताळा येत नव्हता. कदाचित घोडकेने मृतदेहाची दूसर्या मार्गाने विल्हेवाट लावली का हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्याचा कमालीचा छळ केला पण तरीही घोडके रेल्वे मार्गावर मृतदेह टाकला या म्हणण्यावर ठाम राहिला. आरोपपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पोलिस थांबले पण कोणताही इनपुट न मिळाल्याने पोलिसांनी प्रत्यक्ष मारहाणीत कमी सहभाग असलेल्याला माफीचा साक्षीदार केले. पोलिसांनी पत्रकार परिषद घेवून या सर्व गुन्ह्याची उकल कशी केली ते कथन केले. सर्वच क्षेत्रातुन पोलिसांचे कौतुक झाले. आपली पहिलीच केस तडफेने सोडविणार्या निरीक्षक भोसलेंना पोलिस पदक मिळाले. घोडके व त्याच्या दोन साथीदारांवर फसवणुक, अपहरण, मारहाण, जबरी चोरी, खून व मृतदेहाची विल्हेवाट लावणे असे आरोप लावले गेले. सोसायटीच्या सचिवावर सुद्धा खटला चालविला गेला. खटला कोर्टात भयंकर गाजला. त्याची रोजची सुनावणी अनेक वर्तमानपत्रे पहिल्या पानावर छापत होती. दळवी काकांचा खून झाला असे उघड झाले असले तरी त्यांच्या मृतदेहाचे काय झाले या विचाराने मी मात्र अस्वस्थच होतो.

खटल्याची सर्व सुनावणी पुर्ण झाली, निकालाला अजून थोडा अवधी होता. गुन्हेगारांना जबर शिक्षा होणार याची खात्री असली तरी त्यांना फाशी होणार नाही याचे दु:ख होतेच. अचानक इन्स्पेक्टर भोसल्यानी फोन करून मला ताबडतोब त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले, त्यांचा आवाज भलताच उत्तेजित वाटत होता. मी टॅक्सी करून पोलिस मुख्यालय गाठले. भोसल्यांना भेटायला कोणी मारवाडी आला होता. सुरतमध्ये एक मोफत रूग्णालय व त्याला जोडूनच एक अनाथाश्रम तो चालवित होता. त्याने सांगितलेली माहीती विस्मयकारक होती. त्याला नक्की तारीख आठवत नसली तरी साधारण वर्षापुर्वी शेवटची लोकल पकडून तो विरारला चालला होता. गाडी आधी सिग्नलला थांबली होती. पिवळा सिग्नल मिळताच गाडी वेग घेत असतानाच मोटारमन जोरजोरात हॉर्न वाजवित होता म्हणून त्यांनी दारातुन बघितले. रूळावर कोणी व्यक्ती आडवी पडली होती व हॉर्नचा आवाज ऐकून सुद्धा बाजूला होत नव्हती.गाडी हळू असल्याने ती थांबविणे मोटारमनला शक्य झाले. या मारवाड्याने गाडीतुन उडी मारली व त्या माणसाला रूळातुन बाजूला काढले. तो अर्धवट शुद्धीत होता. त्यांनी त्याला डब्यात घेतले. विरारला गाडी आल्यावर रीतसर तक्रार नोंदवून उपचारासाठी त्याला संजीवनी रूग्णालयात त्या मारवाड्याने दाखल केले. रूग्ण बरा झाला तरी डोक्याला मार लागल्याने त्याला बोलता येत नव्हते. त्याच्या खिषात काहीच नव्हते, मुका मार व बसलेला धक्का या मुळे तो आपल्या संवेदनाच हरवून बसला होता. शेवटी या मारवाड्यानेच त्याला आपल्या अनाथाश्रमात आणले. पेपरात रोज येत असलेली केसची सुनावणी त्याच्या कानावर आली होती व तो थेट भोसल्यानांच भेटायला आलेला होता. आम्ही लगेचच त्या मारवाड्याच्या गाडीतुन सुरतला निघालो. व्हिलचेयर बसलेला ’तो’ माणूस म्हणजे दळवी काकाच होते ! खरेच काका जिवंत होते. डोक्यात रक्ताच्या गुठळ्या झाल्याने त्यांना स्मृती दगा देत होती. बोलता येत नव्हते व हाता पायात त्राण उरले नव्हते. मला बघितल्यावर त्यांच्या चेहर्यावरचे भाव झरझर बदलत गेले व शेवटी तो ताण त्यांना असह्य झाला व हाताने त्यांनी डोके गच्च दाबून धरले व मला निघायची खूण केली. डॉक्टरांच्या मते थोडी खर्चिक शस्त्रक्रीया केल्यास गुण येण्याची खूप शक्यता होती. दळवी जिवंत असल्याने त्यांच्या मुलीला सगळी कल्पना दिली गेली. तिने लगेचच भारतातच यायचे ठरविले. वडीलांवर शस्त्रक्रीया करण्यास तिने परवानगी दिली व पैशाची सुद्धा सोय केली.

दळवी जिवंत असल्याने पोलिसांनी नवीन घडामोडींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले व सुधारीत आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी व मुदत मागितली ती अर्थातच न्यायालयाने मान्य केली. आपल्या मुलीला त्यांनी लगेच ओळखले . दरम्यान दळवींवरील शस्त्रक्रीया यशस्वी झाली. ते चांगले चालते-बोलते झाले, भूतकाळातील गोष्टी त्यांना हळूहळू आठवू लागल्या. भारतातले सर्व सोपस्कार झटपट उरकून मुलगी त्यांना घेवून सरळ अमेरिकेलाच रवाना झाली. मधल्या काळात न्यायालयाने आरोपींना 2 ते 10 वर्षाच्या सश्रम कारावासाच्या सजा सुनावल्या, या तपासासाठी पोलिसांनी घेतलेल्या परीश्रमाची न्यायालयाने खास दखल घेवून त्यांचे मुक्त कंठाने कौतुक केले. भारतात प्रथमच आय.पी. अॅसड्रेसचा वापर पुरावा म्हणून केला गेला होता व न्यायालयाने सुद्धा त्याची दखल घेतली होती. माझ्या ब्लॉगगिरीचे सुद्धा कौतुक झालेच !

आता माझ्या मनात काहीही शंका उरली नाही ! नि:शंक पणे मी आता लिहू शकतो की हो, की दळवी काका जिवंत आहेत, अमेरिकेत आहेत आपल्या मुलीकडे --- व हो आता नातवासोबत सुद्धा, मजेत आयुष्य घालवित आहेत !

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०१०

दळवी काकांचे काय बरे झाले असेल ?

जे.डी दळवी पोर्ट ट्रस्टच्या सेवेतुन माझ्या बाबांच्याही पाच वर्षे आधी निवृत्त झाले होते. त्यांची बायको काही वर्षापुर्वीच वारली होती व एकुलत्या एक मुलीबरोबर ते मीरा रोडला राहत होते. मी वडाळ्याला ऑफिसच्या खोलीत रहात असताना अनेक योग जुळून आले. आई-वडील घरी रहायला आले होते. जेडी काका काही कामासाठी कॉलनीत आले होते, योगायोगाने त्यांची माझी कॉलनीत गाठ पडली. वडील घरी आहेत, या गप्पा मारायला, म्हटल्यावर ते लगेच माझ्या बरोबर घरी यायला निघाले. बाबांना सुद्धा जुना मित्र अकस्मात भेटल्याने फार आनंद झाला. गोदीतला सुवर्णकाळ, अनेक गमती जमती, सध्या काय चालले आहे, राजकारण, साहीत्य, ज्योतिष अशा अनेक स्थानकातुन चर्चेची गाडी रमतगमत चालली होती. दुपारी घरी आलेल्या काकांना बाबांनी रात्रीचे जेवूनच जा असा आग्रह केला व तो त्यांना मान्य करावाच लागला. चर्चा अध्यात्म्याच्या स्थानकात आली व मी लगेच खाली उतरलो ! तरी त्यांच्या गप्पांकडे माझा कान होताच. मरण या विषयावर चर्चा चालली असताना काकांनी अचानक मला बोलावून एक कार्ड माझ्या हातात टेकविले. त्या कार्डावर त्यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, रक्तगट असे सगळे सुवाच्य अक्षरात लिहिलेले होते. असे कार्ड प्रत्येक म्हातार्याने जवळ ठेवलेच पाहिजे म्हणजे काही अपघात झाल्यास मदत करणार्या व्यक्तीला आपली नीट माहीती मिळते. अर्थात मी सुद्धा याला दूजोरा दिला. निघतो , निघतो म्हणत निघू पाहणारे काका रात्री 10 वाजले तरी काढता पाय घेत नव्हते. गप्पांचा ओघ थांबता थांबत नव्हता. शेवटी मी मग आता इकडेच मुक्काम करा, सकाळीच निघा असे सूचवताच मात्र काका ताडकन उठून बसले ! घरी गेलेच पाहिजे, कितीही उशीर झाला तरी असे सारखे बोलत ते स्टेशनकडे जायला निघाले. मी त्यांना स्टेशनावर सोडायला निघालो होतो पण काही गरज नाही, अगदी सरळ रस्ता आहे, मी जातो हळूहळू असे म्हणून सगळ्यांचा निरोप घेवून ते निघाले सुद्धा !

त्यानंतर साधारण महीना झाला असेल. मी नवीन पाकिट घेतले व पहिल्या पाकिटातल्या सर्व कामाच्या वस्तू नवीन पाकिटात भरू लागलो. दळवी काकांचे कार्ड सुद्धा त्यात दिसताच मी चमकलो, कमाल झाली, म्हणजे त्या दिवशी मी ते कार्ड त्यांना परत केलेच नाही व त्यांनी सुद्धा परत मागितले नाही. दळवी काकांच्या घरी मी लगेच फोन लावला. बेल तर वाजत होती पण कोणी फोन उचलत नव्हते. दूसर्या दिवशी वेगवेगळ्या वेळी मी त्या नंबरावर फोन लावत होतो व कोणी तो घेत नाही म्हटल्यावर मी जरा चरकलोच. काय झाले असेल ? या घटनेने माझी अस्वस्थता एवढी वाढली की शेवटी मीरा-रोडला त्यांच्या घरी जायचे मी ठरवले. तिकडे गेल्यावर मात्र अधिकच चक्रावलो. घराला कुलुप होते म्हणून शेजार्यांकडे चौकशी केली तर कळले की ते बराच काळ , निदान एक महिना घरी आलेलेच नाहीत. त्यांची नोकरी करणारी मुलगी सुद्धा आलेली नाही. दार बंदच आहे. हे सांगत असतानाच पेपरवाला अजूनही त्यांच्या दारात टाकत असलेल्या पेपरचा ढीग त्यांनी दाखविला. मी ते जुने पेपर चाळले तेव्हा मला अजून एक धक्का बसला, माझ्या घरून ते रात्री जे निघाले होते ते अजून घरी पोहचलेच नव्हते ! कोणा नातलगाकडे गेले म्हणावे तर मुलीचे काय ? ती का घरी येत नाही अजून ? त्यांची ओळख पटविणारे कार्ड माझ्याकडेच राहिले म्हणून मला एकापेक्षा एक अभद्र शंकांनी पार पोखरून टाकले. माझ्या घरून निघताना त्यांना अपघात झाला असल्यास त्यांची ओळख कशी पटणार होती ? मदत करणारा वा पोलिस तरी कोणाशी संपर्क साधणार होते ? कदाचित ओळख पटविणारी अजून एखादी खूण त्यांच्या खिषात असू सुद्धा शकते, उदा. पास – पण नाही, ते तर निवृत्त झाले आहेत पाच वर्षापुर्वीच, आता कशाला पास ठेवत असतील ? त्यांच्याकडे एखाद्या बँकेचे कार्ड असण्याची शक्यता सुद्धा कमीच होती – आणि तसे असते तर त्यांच्या घरी निरोप घेवून कोणीतरी आले असतेच ना ? शेजार्यांकडे नक्की चौकशी झाली असती, पण तसे काहीही झाले नव्हते. काय बरे झाले असेल दळवी काकांचे ?

जसे जसे दिवस जात होते , माझ्या डोक्यातुन दळवीकाकांचे काय झाले असावे हा किडा जरा कमी वळवळू लागला होता. पण केव्हातरी अकस्मात ही गोष्ट आठवून खंत वाटायचीच. असेच एकदा मला सूचले की दळवी काका महिन्याचे पेन्शन तरी घेत असतील , त्यावरून काही तपास लागू शकेल. मी लगेच आमची पेन्शन ब्रँच गाठली. दळवी काकांनी पेन्शन न घेता फंडच घेतला होता तेव्हा तो मार्ग सुद्धा बंद झाला ! त्यांच्या सोबत निवृत्त झालेल्यांना जसे जमेल तसे गाठून दळवींचा पत्ता विचारला पण दुर्दैवाने काका त्या कोणाच्याच संपर्कात नव्हते. परत पुढचे काही दिवस दळवी काकांचे काय झाले असेल या प्रश्नाने पोखरून टाकले ! मग मी अनेक पोलिस ठाणी पालथी घातली, त्या दिवशी नोंदलेल्या गेलेल्या अपघाती मृत्यूंच्या सर्व केसेस तपासल्या. ज्यांची ओळख पटली नाही अशा एक-दोन केस सापडल्या पण फोटोवरून काहीही ठोस निष्कर्श मात्र मला काढणे शक्य झाले नाही. असेच एकदा त्यांच्या मुलीचा नेटवरून धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला, ऑर्कुट, फेसबुक, ट्वीटर – सगळे ट्राय करून बघितले पण हाती काहीही लागले नाही. असेच वर्ष उलटले. वाटणारी टोच, खंत बरीच कमी झाली होती आणि अचानक कळले की युनियनने डी.ए संबंधीची एक जुनी केस जिंकली. तिचा परीणाम म्हणून 1985 ते 1988 या काळात निवृत्त झालेल्यांना लाखभराची थकबाकी मिळणार आहे. म्हणजे दळवींच्या घरी सुद्धा चेक गेला असणारच, काय झाले असेल त्याचे ? मी परत पेन्शन विभागात गेलो. परत धक्का बसला – पत्र चक्क “या नावाचा कोणी इथे रहात नाही” असे लिहून परत आले होते ! कदाचित मधल्या काळात काकांनी जागा विकली सुद्धा असेल , याचा अर्थ माझ्या घरून गेल्यावर तरी निदान ते बराच काळ जिवंत होते. म्हणजे स्वत:ला दोषी मानायची काही गरज नाही, मनावरचे ओझे अचानक हलके झाल्यासारखे वाटले पण तरीही एकदा मीरा-रोडला जावून आल्या शिवाय मला चैन पडणार नव्हतीच.

मीरा रोडला दळवींच्या घरावर आता पाटी नव्हती. म्हणजे ते इकडे राहत नाही हे तर नक्की झाले ! नवीन घर घेतलेली व्यक्ती त्यांना नक्की भेटली असणारच तेव्हा त्यांच्याशी बोललो की सगळ्या शंका फिटल्याच ! पण नाही – नवीन राहात असलेला भाडोत्री होता, त्याने एका एजंट मार्फत ही जागा भाड्याने घेतलेली होती. सोसायटीच्या सचिवाने पॉवर ऑफ अॅलटॉर्नीच्या सहाय्याने सगळा व्यवहार झाला असल्याने दळवी इथे यायचा प्रश्नच उपस्थित होत नाही असे सांगितले. एजंटने फार कामात असल्याचे दाखवून मला बाहेरचा रस्ता दाखविला तेव्हा मात्र मला अजून एका शंकेने घेतले. नक्कीच काहीतरी काळेबेरे असले पाहिजे. एकटा म्हातारा माणूस बघून कोणीतरी षडयंत्र रचून त्यांचे घर बळकाविले असण्याची शक्यता होतीच शिवाय त्यांचा जीव सुद्धा कशावरून घेतला नसेल ? पैशाकरीता हल्ली कोण काय करेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकणार नाही. पण मग त्यांच्या मुलीचे काय झाले असेल ? ती कोठे गायब झाली ?

पोलिसात तक्रार तरी काय आधारावर द्यायची ? निव्वळ त्यांची ओळख पटविणारे कार्ड ते माझ्या घरी विसरले व मग त्यांचा पत्ता लागत नाही अशी तक्रार दिली तर पोलिस मलाच आत टाकतील , वर्षभर का गप्प बसलात असे विचारल्यावर काय सांगायचे ? परत त्यांची तरूण मुलगी गायब आहे असे सांगितले तर अजून गोत्यात येवू ! या निमित्ताने मी त्यांची जी महिती काढली ती पोलिस माझ्या विरूद्धच पुरावा म्हणून वापरतील ! नकोच ते !

बस झाल्या या शंका-कुशंका ! दळवी काकांचे काय झाले हा विचार आता मनातुन काढून टाकायलाच हवा ! नाहीतर मलाच वेड लागेल वेड ! पण तुम्हाला काय वाटते ? काय झाले असेल ’त्यांचे’ ? काय अजून करायला हवे होते मी ? त्यांचे कार्ड जर मी त्यांना लगेच परत केले असते तर हा सगळा गुंता झालाच नसता ! तसेही मग दळवी कधी आपल्या घरी आले होते हे सुद्धा मी विसरलो असतो ! पण ------ खरेच काय झाले असेल दळवीकाकांचे ?

शनिवार, ११ डिसेंबर, २०१०

बोरूडेचे कोडे !

बोरूडे हा खाकी वर्दीतला नराधम म्हणे फरारी आहे ! राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी चीड व्यक्त करून सुद्धा तो सापडत नाही यावर शेंबडे पोर सुद्धा विश्वास ठेवणार नाही ! पोलिस दलात नुसती दलदल माजली आहे व रोजच त्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहेत. लोकांना आता गुंड परवडले पण वर्दीतले हे गुंड आवरा असे झाले आहे. राजरोस चोर्या, दरोडे, डाके घातले जात आहेत, बँका लुटल्या जात आहेत आणि पोलिस अबलांचे रक्षण करण्याऐवजी त्यांच्या अब्रूचेच धिंडवडे काढत आहेत ! गुन्हेगार उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत व पोलिसांनाच तोंड दाखवायची चोरी झाली आहे !

बोरूडे फरारी आहे म्हणजे नक्की काय प्रकार आहे ? फरारी असलेला हा नीच माणूस खालच्या न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज करतो, तो फेटाळला जाताच तो आता हाय कोर्टात अर्ज करीत आहे ! या सगळ्या गोष्टी फरारी असलेला व बडतर्फ (की निलंबित ? ) इसम कसा करू शकतो ? तो आपल्या वकिलाशी संपर्क कसा साधतो ? चर्चा कशी करतो ? त्याला काय गुप्त होण्याची कला अवगत झाली आहे का ? सरकारने बोरूडे हा फरारी आहे असे घोषित केले आहे तेव्हा त्याला वकिल तरी कसा मिळतो ? तो बेशरम वकिल पैशासाठी काळा डगला चढवितो व बोरूड्याची बाजू मांडायला न्यायालयात येतोच कसा ? न्यायदेवता आधी फरारी माणसाला शोधून दे नाहीतर तुझा डगला उतरविते असा हग्या दम त्या वकिलाला कसा देत नाही ? फरारी व्यक्तीची बाजू मांडणार्याला पोलिस आपला हिसका का दाखवू शकत नाहीत ? का पोलिसांनीच डोळ्यावर झापडे बांधले आहे ? आणि हे म्हणे स्कॉटलंड यार्डपेक्षा सरस पोलिस खाते ! गुन्हेगार राजरोस जामिनावर मोकाट सुटतात व बलात्कारी पोलिस फरारी होतात ! वा रे कायदा व सुव्यवस्था !

गृहमंत्री आबा पाटील म्हणे नेक इसम आहेत ! पेपरवाल्यांनी नेक म्हणून कोणी नेक होत नसते, त्यासाठी ठोस कृती हवी ! सगळे पोलिस दलच बरखास्त करायची वेळ आली आहे पण एवढी हिंमत म्हणा वा धडाडी, तडफ आबांत वा एका तरी राजकारण्यात आहे का ?

सचिनला व्यवहार समजतो का ?

सचिनच्या कोणा निकटवर्तीयाने आजच्या पेपरात एक बातमी मस्त पेरली आहे ! सचिनने म्हणे एका मद्य विकणार्या कंपनीला नकार दिला ! तब्बल 20 कोटींचा प्रस्ताव त्याने म्हणे धुडकाविला. लहान वयातच धवल यश मिळालेल्या आपल्या मुलाने तंबाखू , मद्य उत्पादनांच्या जाहीराती करू नयेत असे त्याच्या वडीलांचे मत होते.

मला बुवा असे काही वाचले की भलतेच प्रश्न पडतात ! मुळात कोणीतरी सोडलेली गुटख्याची पुडी पेपरवाल्यांनी कशाला चावायला हवी होती ? या बातमीवर सचिनचे मत जाणून न घेताच, शहानिशा न करताच त्यांनी ती छापलीच का ? देशात मद्य व तंबाखूच्या उत्पादनांना जाहिरात करायला उघड बंदी असताना असा प्रस्ताव मद्य बनविणार्या कंपनीने दिलाच कसा ? का पेग वर पेग रीचवून टाइट झाल्यावरच हा प्रस्ताव सचिनला दिला गेला होता ? सचिन जाहिरात करणार नाही, इतर मात्र करतात, हे इतर कोण ? मी तरी अशी जाहिरात कोणी खेळाडूच काय कसलेल्या अभिनेत्यांनी सुद्धा केल्याचे बघितलेले नाही ! म्हणजे जाहिरात बघताना तसे सुरवातीला वाटते खरे पण प्रत्यक्षात ती सीडी, बिसलेरी पाणी , सोडा, अशा निरूपद्रवी उत्पादनांची जाहिरात असते . अर्थात हे शेवटी नीट बारक्या अक्षरातले बघितल्यावरच कळते ! मग अशा जाहीरातीला नकार देवून 20 कोटी सचिनने ठोकरले असतील तर तो लक्ष्मीचा अपमानच नव्हे काय ? मराठी माणसाला व्यवहार कळत नाही पण त्याची बायको तर गुजु आहे ना ? सचिन दोन दशके लोकप्रियतेच्या शिखरावर आहे, आताच त्याला अशी विचारणा झाली होती का ? झाली असेल तर तेव्हाही त्याने नकारच दिला असणार, मग तेव्हा या पुड्या का सुटल्या नाहीत ? का 20 कोटी कमी वाटले म्हणून हे दबावतंत्र ? सचिन शीतपेयांच्या जाहीरातीत असतो ती आरोग्याला चांगली आहेत का ? शीतपेयांचा उत्पादन खर्च चार आणे सुद्धा नसतो व ती भरमसाठ नफ्याने निव्वळ जाहिरातबाजी करून खपविली जातात, अगदी ज्या गावात पाणी सुद्धा प्यायला मिळणार नाही, लोकांना एकवेळच्या जेवणाची भ्रांत आहे तिकडे सचिन शीतपेयाचे क्रेटच्या क्रेट ओततो, हे कसे चालते बुवा ? सचिन “बुस्ट इज ए सिक्रेट ऑफ माय एजर्नी” असे सांगतो ते सुद्धा खरेच का ? सचिनचा धर्म तेव्हा कोठे जातो ?

सचिन, देशातच काय जगात तुझे अब्जावधी चाहते आहेत, त्यातही तरूण जास्त ! तूझा प्रत्येक शब्द तरूणाई झेलेल. सचिन, तुला खरेच वाटते की देशातली तरूण पिढी निर्व्यसनी, सुदृढ, निकोप व्हावी ? मग फक्त एकच कर – जेव्हा जेव्हा लोकांसमोर बोलायचा प्रसंग येइल तेव्हा बेडरपणे सांग की माझ्या यशाचे गुपित दारू वा सिगारेट नाही तर निर्व्यसनीपणा आहे ! दणकट शरीराचे रहस्य कोणतेही शक्तीवर्धक नाही तर नियमित व्यायाम आहे ! यश मिळविण्यासाठी वा साजरे करण्यासाठी, अपयशाचे दु:ख पचविण्यासाठी दारू वा सिगारेटची काहीही गरज नाही ! दारू , सिगारेट, गुटखा ही व्यसने तुमचे आयुष्य बरबाद करतील, त्यांना चार हात दूर ठेवा ! दारू, सिगारेट वा गुटख्याला तू निव्वळ जाहीरातीतला नकार देवून चालणार नाही तू त्याचा धिक्कार करायला हवास ! खेळताना तुझ्याकडून ज्या अपेक्षा बाळगतो त्याहून ही अपेक्षा पुरी करणे नक्कीच कठीण नाही !

टाटांचे मीठ !

उद्योगपती टाटा लवकरच टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरून पाय-उतार होणार आहेत. त्यांचा वारसदार कोण असेल या बाबत सुद्धा अनेक वावड्या उठत आहेत. पण खुद्द टाटा निवृत्तिनंतर हरीनामाचा गजर करीत बसणार आहेत का ? नक्कीच नाही. टाटा नॅनो गाडीतुन भारतभर भ्रष्टाचार विरोधी यात्रा काढतील असेही नाही ! टाटांची अलिकडील विधाने वाचून ते राजकारणात शिरणार असेच दिसते.

10 वर्षापुर्वी टाटा उद्योग समुहाकडे विमानसेवा सुरू करण्यास परवाना देण्यासाठी म्हणे कोणी दहा कोटी मागितले होते. रतन टाटांना एवढेच आठवते ! कोणी मागितले होते, नक्की कशासाठी मागितले होते, ते त्यांनी दिले का ? या पैकी कोणात्याच प्रश्नाचे उत्तर देण्यास ते बांधील नाहीत ! अर्थात मीठाला जागणार्या पेपरवाल्यांना मथळे सजवायला एवढे खूप झाले की ! तुम्हाला आम्हाला अगदी रेशनिंग कार्ड काढण्यासाठी, गॅसचे कनेक्शन मिळविण्यासाठी, वाहन परवाना काढण्यासाठी, मुलांच्या शाळा-कॉलेजात प्रवेशासाठी पैसे मागितले जातात त्याची बातमी होत नाही, पण अब्जाधीश असलेल्या टाटांकडे फक्त दहा कोटी मागितले तर केवढे अकांड-तांडव ! टाटांचे विमान कधी उडलेच नाही तेव्हा याचा अर्थ काय काढायचा ? टाटांनी बाणेदारपणे लाच देणे नाकारले म्हणून भारतीय जनता दर्जेदार विमानसेवेला मुकली ? की टाटांना 10 कोटी फायद्याच्या मानाने जास्त वाटले ? आता पर्यंतचा टाटा उद्योगसमुहाचा डोलारा एका पैची सुद्धा लाच न देता उभारला गेला का ? या कालावधीत ज्यांनी विमानसेवा काढल्या त्या सर्वानी लाच देवूनच परवाने घेतले का ? दरम्यानच्या काळात राडीया टेपकांड उघड झाले. टाटांचा नैतिकतेचा बुरखा टराटरा फाडला गेला ! इतर उद्योगपतींसारखेच टाटा उचापती करणारे आहेत हे जगजाहीर झाले. नाकाने कांदे सोलणारे रतन टाटा आता न्यायालयात जावून या टेप फूटल्याच कशा याची चौकशी करण्याची मागणी करीत आहेत. आता 2जी घोटाळ्याला भाजपाप्रणीत रालोआ सरकारचा धरसोडपणा सुद्धा कारणीभूत आहे अशी नवीच पुडी टाटांनी सोडली आहे. धरसोड धोरणाने म्हणे सरकारचा अब्जावधी रूपयाचा महसूल बुडाला ? देशाच्या बुडणार्या महसूलाची काळजी टाटांनी करावी हेच एक नवल ! अर्थात हे शहाणपण त्यांना आधी का सूचले नाही याचीच खरेतर चौकशी केली पाहिजे. रालोआच्याच काळात फायद्यात चालणार्या अनेक सरकारी कंपन्या अल्प मोबदल्यात खाजगीकरणाच्या गोंडस नावाखाली उद्योगी घराण्यांच्या दावणीला बांधल्या गेल्या. स्वत: टाटांनी बख्खळ फायदा कमाविणारा विदेश संचार निगम हा उपक्रम आपल्या घशात घातला, सॉफ्टवेयर क्षेत्रातली अग्रणी सरकारी कंपनी सीएमसी आपल्या दावणीला अल्प मोबदल्यात बांधली, आता अजीर्ण झाल्यावर टाटांना ढेकरा येत आहेत !



भारतीय वृत्तपत्रे ही कोणाना-कोणा उद्योग्यपतीच्या दावणीला बांधलेली आहेत. नवाकाळकारांच्या भाषेत भांडवलदारांचे जनानखाने म्हणजे भारतीय वृत्तपत्रे ! त्यांचे संपादक म्हणजे त्यांनी साखळीने बांधलेले कुत्रे ! मालकाने छू म्हणतात हे संपादक एक मुखाने आपल्या संपादकियातुन भुंकू लागतात ! त्याने डोळे वटारताच उगी रहातात. टाटा म्हणजे सचोटी, कार्यक्षमता व गुणवत्ता अशी प्रतिमा भारतीय जनमानसात आहे. पण वास्तव काय आहे ? टाटाच कशाला, एकही भारतीय उद्योगपती परदेशी स्पर्धेला तोंड देण्यास समर्थ नाही. चांगली सेवा देवून फायदा कमाविण्याचा मार्ग एकाही भारतीय कंपनीने चोखाळलेला नाही. सवलतींच्या कुबड्या, लांड्यालबाड्या, काळा बाजार, कृतिम टंचाई, नफेखोरी, फसवणुक, करबुडवेगिरी व दडपशाही याच मार्गाने भारतीय उद्योगांनी त्यांचे उद्योग चालविले व वाढविले. सरकारी धोरणे आपल्या उद्योगाला धार्जिणी कशी होतील व प्रतिस्पर्ध्याला मारक कशी होतील यातच यांची कार्यक्षमता दिसून येते पण दर्जा वाढवावा, संशोधन करावे या बाबत मात्र सगळा आनंद आहे. रतन टाटांनी सुरवातीच्या काळात टाटा समूह भंगारातच काढायला घेतला होता. अनेक कंपन्या त्यांनी फूकून टाकल्या, सुत गिरण्यातुन टाटांनी अंग काढून घेतले. देशातले उद्योग फूकून टाकणारे टाटा विदेशातील बंद पडलेल्या उद्योगात मात्र रस दाखवितात, अवाच्या सवा मोबदला देवून ते ताब्यात घेतात या मागचे अर्थकारण सामान्यांच्या कधी लक्षात येणारच नाही ! अंबानींच्या स्पर्धेत ते टीकू शकले नाहीत, मुंबईतील वीज वितरण कंपनी त्यांना ताब्यात घेता आली नाही, टेलिफोन सेवेत सुद्धा त्यांना मागल्या दाराने प्रवेश करावा लागला, अर्थात त्यांच्या टाटा इंडीकॉमच्या सीडीएमए सेवेला लोकांनी केव्हाच टाटा केला आहे ! टाटा म्हणे अनवधानाने लाखात कार देतो म्हणून बोलून बसले, आता टाटांचा शब्द म्हणजे शब्द ! टाटांचा शब्द पाळण्यासाठी त्यांना जमीन, पाणी, वीज फूकटात देणे सरकारचे कर्तव्यच नव्हे का ? एवढ्याने काय होते, लाखात कार द्यायला करात सुद्धा सुट द्यायलाच हवी, जाचक कामगार कायदे बाजुला ठेवायला हवेत. समाजवादाची माळ ओढणार्या बंगाल सरकारने ते सुद्धा केले. चांगली कसदार जमीन नाममात्र मोबदला देवून सरकारनेच अधिग्रहीत करून ती टाटांना दिली. प्रकल्पाचे गाडे मार्गी लागले. पण ममता बॅनर्जींना वा शिंगूरवासियांना पटविणे काही टाटांना जमले नाही, शेवटी हा प्रकल्प बंगालातुन टाटांना गुंडाळावा लागला( ती अल्पमोली, बहुगुणी जमीन मात्र टाटांनी सरकारला परत केलेली नाही , करणारही नाहीत ! ) व कोणी जागा देते का जागा अशी साद घालायला लागली. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा टाटांना रेड कारपेट पांघरले होते पण टाटा काही मराठी मीठाला जागले नाहीत व त्यांनी थेट गुजरातची वाट धरली. एवढे सगळे फूकटात लाटून सुद्धा टाटांना लाखात नॅनो काही देता आलीच नाही,आता लोकच नॅनोला नो नो म्हणत आहेत ते अलाहिदा !

अनेक वर्षापुर्वी मीठात आयोडीनची कमतरता असते व त्यामुळे लहान मुलांची निकोप वाढ होत नाही असा अहवाल मिळताच सरकारने साध्या मीठावर बंदी घातली व आयोडीनयुक्त मीठाची सक्ती केली ! डोक्यावर मीठ घेवून विकणारे मीठवाले देशोधडीला लागले. जे मीठ 30 पैसे किलो भावाने मिळायचे तेच टाटा मग 10 रूपये किलोने विकू लागले. योगायोग म्हणजे आयोडीन असलेले मीठ तेव्हा फक्त टाटा केमिकलच बनवित होती ! टाटा खाल्ल्या मीठाला जागले नसतील पण टाटांचे मीठ खावून सगळा देशच नमकहराम झाला !

चला तर, टाटांच्या आयोडीनयुक्त मीठाला जागून सगळे एक सुरात म्हणा “रतन टाटांचा जय हो !”

गुरुवार, ९ डिसेंबर, २०१०

डकवर्थ-लुइस सूत्र !

हातात कधीही बॅट न घेतलेल्या इंग्लंडातील डकवर्थ-लुइस नामक दोन सांख्यिकी तज्ज्ञांनी अनेक एकदिवसीय सामन्यांचा अभ्यास करून म्हणे एक सूत्र शोधले ! कोणत्याही कारणाने एक दिवसीय सामन्यात व्यत्यय येवून वेळ वाया गेल्यास, हे सूत्र वापरून सामन्याचा निक्काल लावला जातो ! 1996 साली झिम्बाब्वे व इंग्लंडच्या सामन्यापासून हे सूत्र वापरले जात आहे. चौफेर टीका होवून सुद्धा याचा वापर चालूच आहे. न्युझीलंड विरूद्धचा चौथा एक दिसवीय सामना या नियमाने आपण 13 धावांनी हरलोच असतो पण पठाणने पठाणी दणका दाखवून ती मॅच जिंकून दिली व परत एकदा या नियमावर प्रश्नचिन्ह उभे राहीले !

पाच दिवस चालणारी कसोटी अनिर्णीत राहिली तर चालते पण एका दिवसात संपणार्या सामच्याचा निक्काल लावलाच पाहिजे हा अट्टाहास का ? का हे सर्व फिक्सरच्या सोयीसाठी केले आहे ? शेकडा एक टक्का सामनेच पावसाने व कमी प्रकाशाने निकाली सुटत नसतील तर ते अनिर्णीत म्हणून करा की जाहीर ! काय बिघडणार काय आहे त्याने ? या नियमाचा पायाच मुळी ठीसूळ आहे. जितक्या विकेट बाकी व जितकी षटके बाकी तितकी धावा होण्याची शक्यता जास्त – हा या नियमाचा पाया आहे. क्रिकेटसारख्या बेभरवशी खेळाला असे सूत्रात अडकविणेच मुर्खपणाचे आहे. एकदिवसीय सामन्यात महत्व धावांनाच आहे, तुम्ही किती विकेट गमाविल्या याला नाही. पहिल्या संघाने 2 विकेट गमावून तिनशे धावांचे आव्हान दिले व प्रतिस्पर्धी संघाने अगदी 9 विकेट गमावून ते शेवटच्या चेंडूवर जरी पार केले तरी तोच संघ विजयी ठरतो. हातात असलेल्या विकेट कोणीच जमेला धरत नाही. सुरवातीची फळी ढेपाळल्यावर तळाच्या फलंदाजांनी नेटाने खेळून सामना वाचविल्याची अनेक उदाहरणे आहेत. क्रिकेटमधली अनिश्चीतताच या खेळाच्या लोकप्रियतेला कारण आहे. या सूत्राचा अतिरेक झाल्यास टीम मध्ये एखादा डी/एल रुल तज्ञ्ज घ्यावा लागेल किंवा मग पीसीवरच खेळून निकाल लावावा लागेल. हे नक्कीच क्रिकेटला मारक आहे.

या नियमाचा धांडोळा नेटवर घेतला तेव्हा अनेक नवीन मुद्दे समजले. या नियमावर होणारी मुख्य टीका म्हणजे हातात असलेल्या विकेटवर जास्त भर दिला आहे. या मुळे 300 धावांचे आव्हान घेवून एखादी टीम पावसाळी वातावरणात मैदानात उतरली व पहिल्या पंचवीस षटकात एकही विकेट न गमाविता त्यांनी अगदी 125 धावा जरी काढल्या व पाउस पडल्यास तो संघ विजयी ठरेल ! तसेच हे नियम ठरविताना पॉवर प्लेचा विचार केलेला नाही, ज्यात कर्णधार त्याच्या मर्जीप्रमाणे क्षेत्ररक्षणाचे निर्बंध लादू शकतो. कधी एखादा संघ पिंच हीटर म्हणून तळाचा फलंदाज वर पाठवितो. अगदी आठव्या नंबरावर सुद्धा अनेक नामांकित फलंदाज बॅट परजून जातात जसे पोलार्ड, हरभजन. ( क्लूसनर आता खेळत नाही पण या नंबरावर फलंदाजी करून द. आफ्रिकेला याने अनेक विजय मिळवून दिले होते.) कधी चांगली गोलंदाजी टाकणार्या खेळाडूची षटके कर्णधार स्लॉग ओवरसाठी राखून ठेवतो. गेल्या 20-30 वर्षात हा खेळ अधिक वेगान झाला आहे. आधी साठ षटकांच्या खेळात जेमतेम 250 धावा व्हायच्या, आता पन्नास षटकात 434 धावा सुद्धा विजयासाठी अपुर्या पडलेल्या आहेत ! हवामानाची स्थिती, खेळपट्टीचा लौकिक, दोन संघाचे तौलनिक बल या गोष्टींना सुद्धा सूत्रात बांधणे अशक्यच आहे.

एवढ्या सगळ्या त्रूटी असूनही हा नियम या आधी सामन्याचा निकाल लावण्यासाठी जे नियम लावले जात होते त्या पेक्षा बराच बरा आहे ! सगळ्यात खतरनाक नियम होता “बेस्ट स्कोअरींग ओवर्स” ! म्हणजे पहिल्या संघाने तीनशे धावा केल्या व त्यात पाच षटके निर्धाव होती, दूसर्या संघाच्या डावात जर व्यत्यय आला व पाच षटकांचा खेळ कमी करावा लागला तरी त्यांचे लक्ष तीनशे धावांचेच राहील ! विश्वकरंडकात (1992) पावसाआधी आफ्रिकेला 13 चेंडूत 22 धावा करायच्या होत्या, पावसाचा व्यत्यय आल्यावर या नियमाने त्यांना आव्हान दिले गेले एका चेंडूत 21 धावा करण्याचे ! इथे जर डी/एल नियम लावला असता तर आफ्रिकेला एका चेडूत पाच धावा करायला लागल्या असत्या ! दगडापेक्षा वीट मऊ ! पन्नास षटकाच्या सामन्यात व्यत्यय आल्यास पंचवीसाव्या षटकापर्यंत कोणी जास्त धावा केल्या होत्या त्याला विजयश्री बहाल करण्याचा प्रयोग सुद्धा करून झाला होता. ज्या क्षणी सामना व्यत्यय आल्याने थांबविला गेला तेव्हाच्या स्कोअरची तुलना करून निर्णय द्यायची पद्धत सुद्धा काही काळ वापरली गेली होती.

Duckworth-lewis.com या संकेत स्थळाच्या FAQ सदरात या सूत्रावर घेण्यात येणार्या अनेक आक्षेपांचे निराकारण सोदाहरण केले गेले आहे, तसेच 2004 साली या सूत्रात अनेक शक्यता जमेला धरून बदल करण्यात आले आहेत. आधी साधे कोष्टक वापरून या नियमाने सुधारीत लक्ष निश्चित करता येत असे, आता मात्र त्या करीत संगणकाचा वापर मस्ट आहे ! या नियमाबाबत सर्वसाधारण घेतले जाणारे आक्षेप व निराकारण इथे देवून हा लेख गुंडाळतो आहे.

1) कधी कधी पहिल्या डावात व्यत्यय आल्यास दूसर्या संघाला तेवढ्याच षटकात जास्त धावा का कराव्या लागतात ?
पहिला संघ 50 षटके पुर्ण खेळायला मिळणार असे जमेस धरून डावाची उभारणी करीत असतो. सुरवातीला पायाभरणी झाल्यावर, हातात विकेट ठेवून शेवटच्या दहा षटकात हल्लाबोल केला जातो. चाळीस षटकात दोनशे धावा करणारा संघ विकेट हातात असतील तर पुर्ण षटके खेळल्यावर 270-300 धावा नक्की करू शकतो. चाळीसाव्या षटकात पावसाचा व्यत्यय आल्यास त्यांच्या मनसुब्यावर पाणी पडते. पाठलाग करणार्याला संघाला आधीपासूनच माहीती असते की त्यांना 40 षटकात दोनशे धाव करायच्या आहेत व ते अगदी पहिल्या चेंडूपासून हल्लाबोल करू शकतात. तेव्हा समान न्याय मिळण्यासाठी सुधारीत आव्हान 225 धावांचे देणेच योग्य आहे !

2) दोन्ही संघातील खेळाडूंचे तौलनिक बल, मैदानाचा इतिहास, क्षेत्ररक्षण मर्यादा याचा विचार का केला जात नाही ?
साधा कॅलक्युलेटर वापरून सुधारीत लक्ष काढता यावे म्हणून या गोष्टी आधी जमेला घेतल्या नव्हत्या. अर्थात सुधारीत आवृत्तीत या सर्व गोष्टींना योग्य ते महत्व दिले गेले आहे पण या साठी संगणक असणे आवश्यक आहे !

3) बदली खेळाडूचा नियम जमेला धरला आहे का ?
सुधारीत आवृत्तीत तशी सोय आहे पण आता हा नियमच बाद झाला आहे !

तेव्हा क्रिकेट न खेळलेल्या या जोडगोळीचे योगदान आता मान्य करायलाच हवे – तसे शरद पवारांनी कधी हातात बॅट घेतली होती का ?!

क्रेडीट कार्ड पहावे काढून आणि मग वापरून !

1990 च्या सुमारास कोणी “कार्ड देते का कार्ड” असे विचारीत मी अनेक बँकाचे उंबरे झिजवले होते. उधारीवर खरेदी करणे हा हेतू मात्र अजिबात नव्हता. मला कार्ड हवे होते बाहेरगावच्या गाड्यांची तिकिटे काढण्याकरीता ! माझ्या बहीणीचे लग्न झाले होते, तिचे सासर सांगलीला होते व मंत्रालयातुन तिची सांगलीला बदली अजून व्हायची होती. त्यामुळे शनिवार-रविवार तिचे सांगली-मुंबई-सांगली सुरूच असायचे व त्याची तिकिटे मला काढावी लागत. रांगेचा मला अगदी मनस्वी कंटाळा आहे. अगदी दवाखान्यात जरी गेलो आणि दोन पेशंटनंतर जरी माझा नंबर असला तरी प्रचंड रांग आहे असे म्हणत मी सरळ घर गाठतो. रेल्वेची तिकिटे संगणकावर मिळत असली तरी रांग लावायला लागायचीच ! असेच एकदा कळले की रेल्वेने आता क्रेडीट कार्ड धारकांसाठी वेगळी खिडकी सुरू केली आहे व तिकडे गर्दी अजिबात नसते. लगेच कार्ड घ्यायचा ध्यास मी घेतला. अर्थात त्या काळी क्रेडीट कार्ड मिळणे एवढे सोपे नव्हते. मोजक्याच बँका या व्यवसायात होत्या व त्यांचे निकष सुद्धा खूप काटेकोर होते. या निमित्ताने कार्ड देणार्या बँकांच्या कारभाराचे अनेक मजेशीर अनुभव आले. ग्रिंडलेज बँक पिन कोड 400037 , मी रहायचो तोच, वडाळ्याचा, अजिबात कार्ड देत नसे, का तर म्हणे या भागात झोपडपट्टी जास्त होती ! सिटी बँक फक्त अधिकारी असेल तर कार्ड देत असे. अजून एक गंमत म्हणजे पोलिस व वकिल यांना कोणतीही बँक कार्ड जारी करीत नसे ! (कदाचित अजूनही देत नसतील ! ) मी पडलो सरकारी कारकून, माझा पगार जरी नियमात बसत असला तरी पदातला कारकून शब्द गोची करायचा. आमच्याकडे खाजगी कंपन्याचे शिपाई येत, त्यांचे पद असे Junior Executive ! वचने किम दरीद्रता ? पगार माझ्यापेक्षा अर्धा जरी असला तरी त्यांना कार्ड मिळे ! ही मंडळी कार्डाचा मनमुदार वापर करीत व लाखाची बिले थकवित, कार्ड कंपन्या मग त्यांच्या हातापाया पडून शेवटी अर्ध्या रकमेवर पाणी सोडून तडजोड करीत. ( या मुळेच मग बँका वसूलीसाठी पठाणी उपाय योजू लागल्या असाव्यात !). अनेक बँकाची नकारघंटा ऐकून झाल्यावर बँक ऑफ इंडीयाचा एक एजंट माझ्याकडे आला. मी व माझ्या एका मित्राने त्याच्यामार्फत “इंडीया कार्ड” साठी अर्ज केला. आता अर्ज केल्यानंतर चार दिवसात कार्ड मिळते तेव्हा आम्हाला दोन महीन्यानंतर बॅलार्ड पियरच्या शाखेत जावून चौकशी करायची होती. अर्थात दोन महिने थांबून आम्ही त्या शाखेत गेलो तेव्हा तुमच्या कार्यालयातुन पडताळणी अहवाल न आल्याचे कळले. तीस हजार कर्मचारी असलेली आमची कंपनी कशाला अशी पडताळणी करीत बसणार आहे ? ते पत्र केराच्या टोपलीतच गेले असणार ! मी मग मिनतवार्या करून पडताळणी पत्र स्वत:च माझ्या विभागात नेवून दिले. त्या विभागात ओळख निघाल्याने ते लगेच भरून मी स्वत:च शाखेत आणले पण बँकेने ते घेतले नाही. त्यांना म्हणे ते रीतसर पोस्टानेच यायला हवे होते ! शेवटी मी परत आमच्या विभागात जावून ते पोस्ट करायची व्यवस्था केली ! मग आठवड्याने शाखेत गेलो तेव्हा एकदाचे कार्ड मला मिळाले !

कार्ड घेवून मी वीटीच्या संगणक आरक्षण केंद्रात गेलो आणि बघतो तो काय, कार्डासाठी असणार्या दोन खिडक्यांवर डबल गर्दी होती. मग कळले की तांत्रिक बिघाडामुळे कार्ड काउंटर बंद होते. पुढच्या वेळी गेलो तेव्हा दोन पैकी एक खिडकी बंद असल्याने भलीमोठी रांग होती. तिसर्यावेळी गर्दी कमी होती, नंबर सुद्धा आला पण माझे कार्ड काही केल्या चालत नव्हते ! मग कळले की बँक ऑफ इंडीयाच्या कार्डात हा प्रोब्लेम नेहमीचाच होता. कार्ड बदलण्यासाठी मग बँकेच्या नरीमन पॉइंटच्या कार्ड विभागात जावे लागले. चवथ्या वेळी बँकेकडून “हॉट लिस्ट” आली नसल्याचे कारण सांगून कार्ड नाकारले गेले ! पाचव्या वेळी नव्या उत्साहाने रांगेत उभा राहिलो तेवढ्यात एका सूचनेकडे लक्ष गेले. कार्डावरून तिकिट काढण्यासाठी प्रत्येक व्यवहारामागे रेल्वे 30 रूपये जास्तीचे घेणार होती ! मग मात्र माझा कार्ड वापरून रेल्वे तिकिट काढायचा उत्साह पार मावळला. त्या नंतर काही वर्षानी सगळे योग जुळून आले व मी कार्ड वापरून औरंगाबाद ते मुंबई असे देवगिरी एक्सप्रेसचे तिकिट काढले पण ते होते वेटलिस्टेड ! अंतिम चार्ट बनेपर्यंत ते कन्फर्म झाले नाही. ते रद्द करण्यासाठी गेल्यावर कळले की कार्डाने काढलेल्या तिकिटीचा रोख परतावा मिळत नाही, तुम्ही स्टेशन मास्टरला भेटा. मग पुन्हा एक अर्ज भरावा लागला, त्यावर स्टेशन मास्टरची सही व शिक्का घेतला व रजिस्टर्ड पत्राने तो अर्ज हैद्राबादला पाठवावा लागला. हे सर्व सोपस्कार केल्यावर मला परतावा दोन महीन्याने मिळाला व ते क्रेडीट मला द्यायला बँकेने अजून दोन महीने घेतेले ! कार्ड नाकारले जायचा मग मी धसकाच घेतला होता. कार्डावरून खरेदी करायचो पण लाज जावू नये म्हणून रोख पण बाळगायचो ! एकदा असेच दादरला विंडो शॉपिंग करीत असताना एक शर्ट पीस खूप आवडला व मास्टर कार्डचा लोगो बघून त्या दूकानात शिरलो. शर्टाचे कापड घेतल्यावर त्यावर मॅचिंग पॅण्टपीस सुद्धा घेणे आलेच. मोठ्या रूबाबात कार्ड पुढे केले तेव्हा मालकाने मला एक बोर्ड दाखविला “लिंक तुटल्याने कार्ड स्वीकारण्यात येणार नाही” अजून एक बोर्ड होता तो म्हणजे “कार्ड असल्यास लिंक असल्याची आधी खात्री करून घ्यावी” ! माझ्याकडे पैसे नसल्याने भलतीच पंचाईत झाली. सेल्समन तर कापड सुद्धा कापून तयार होता ! शेवटी मी खिसे उलटे पालटे करून पन्नास रूपये जमविले व ते इसारा म्हणून दिले व दूसर्या दिवशी घरून पैसे आणून तो व्यवहार पुर्ण केला !

आत्तासारखी आपल्या कार्डाचे व्यवहार / बिल संगणकावर बघायची तेव्हा सोय नव्हती. कार्डाचे बिल ( अर्थात वेळेत मिळाले तर ! ) शाखेत स्वत: नेवून भरावे लागे. कितीही आधी बिल भरले तरी बँकेच्या मुख्यालयात त्याची नोंद होत नसे व बिलात विलंब आकार लावला जाई. मग आपल्यालाच सगळे पुरावे देवून ते बिल दुरूस्त करायला लागत असे. थोडक्यात सोय कमी व मनस्ताप जास्त असाच प्रकार होता. शेवटी मी ते कार्ड न वापरण्याचा निर्णय घेतला. सर्व सोपस्कार पार पाडल्यावर सुद्धा बँक ऑफ इंडीया मी परत केलेल्या कार्डाचे बिल पुढेची काही वर्षे इमाने-इतबारे, दंडासह पाठवित होती !

मध्ये केव्हातरी टेली-मार्केटींग करणार्या गोड आवाजाला भुलून मी स्टेट बँकेचे रेल्वे कार्ड घ्यायचे ठरविले. हे कार्ड म्हणे 100% फ़्री होते तसेच या कार्डावरून रेल्वे पास वा तिकिट काढल्यास त्याला वेगळा सेवा आकार द्यावा लागणार नव्हता ! होकार कळविताच दूसर्याच दिवशी एजंट घरी आला व त्याने कार्ड फूकट असल्याला दुजोरा दिला म्हणून मी बाकी सोपस्कार पुर्ण केले. त्या नंतर मात्र ताप सुरू झाला. आठवडयानंतर मोबाइलवर वेळी अवेळी फोन येवू लागले. सुरवात , मी कार्डासाठी अर्ज केला आहे त्याची छाननी करतो आहोत अशी असे व मग कळे की तो तद्दन मार्केटींग कॉल होता ! कार्ड मला मिळायच्या आत (जे पुढे कधी मिळालेच नाही !) बिल मात्र मिळाले व त्यात वार्षिक फी 500 रूपये लावली होती. मी लगेच बँकेच्या कस्टमर केयरला फोन लावला तेव्हा कळले की फ्री कार्डाची कोणतीच स्किम नाही. म्हणजे माझी चक्क फसवणुकच केली गेली होती. मी तत्काळ ते कार्ड रद्द केले.पुढचे काही महीने मला विलंब आकारासह बिल मात्र येतच होते. शेवटी एक कडक इमेल पाठविल्यावर हा प्रकार थांबला !

मधल्या काळात या क्षेत्रात तंत्रामुळे आमूलाग्र बदल झाला व कार्डाचे अप्रूप राहिले नाही. बहुतेक सर्व बँकाने आपली कार्डे आणली व कार्ड मिळणे खूपच सुलभ झाले. सिटी बँकेचे कार्ड मला एका आठवड्यात मिळाले होते. या कार्डाचे बिल ऑनलाइन बघता यायचे, इमेलने यायचे व इ.सी.एस.ने भरता येत होते. सिटी बँकेचे कार्ड मी का परत केले त्याची वेगळी कहाणी आहे , ती केव्हातरी सांगेनच पण त्यानंतर आजतागायत मी आयसीआयसीआय बँकेचे कार्ड वापरीत आहे. माझे अनेक मित्र माझे कार्ड वापरून अनेक ऑनलाइन व्यवहार करतात, त्यांचा रांग लावायचा त्रास वाचतो मला रीवार्ड पॉइंट मिळतात. एक मित्र तर म्हणतो सुद्धा “मुर्ख माणसे क्रेडीट कार्ड बाळगतात, शहाणी माणसे त्यांच्याशी मैत्री करतात “ ! मी एकदाही लेट पेमेंट चार्ज भरलेला नाही ! असे ग्राहक बँकेला कसे चालतात असा प्रश्न मला अनेकदा पडतो ! म्हणजे अशाने बँकेचा धंदा कसा चालणार हो ! क्रेडीट कार्ड ( तसेच डेबिट कम एटीएम कार्ड सुद्धा ! ) हा आता माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे व त्यासाठी थोडे जास्त पैसे मोजावे लागले तरी मला चालते. अगदी हॉटेलात वेटरला टीप सुद्धा मी कार्डानेच देतो ! दुधवाला, इस्त्रीवाला, रीक्षावाला, चणेवाला, पेपरवाला असे अनेक वाले कार्ड स्वीकारू लागले आहेत असे स्वप्न मला अगदी पहाटेसुद्धा पडते ! मुंबई सारख्या शहरात खिषात एक पै सुद्धा न बाळगता भटकण्याचे धाडस या कार्डाच्या जीवावरच तर मला करता येते !

रविवार, ५ डिसेंबर, २०१०

नावातला घोळ !

माझे संपूर्ण नाव एकही चूक न करता सरकार दरबारी नोंदले जायचा प्रसंग विरळाच ! एकनाथ जनार्दन मराठे या नावात एकनाथ लिहीताना फारशी चूक कोणी करत नाही पण जनार्दनचे जनार्धन मात्र हमखास होते ! मराठे हे आडनाव अनेकदा इंग्रजीत म्हात्रे असे नोंदविले जाते. मी जागरूकपणे या चुका लागलीच दुरूस्त करून घेतो पण केव्हा केव्हा माझा सुद्धा नाइलाज असतो. पॅन कार्डवर माझे नाव ’एकनाथ जनार्दन मराठे’ व वडीलांचे नाव ’जनार्धन गोविंद मराठे’ असे तिरपागडे आयकर खात्याने करून ठेवले होते ते मी पारसे गांभीर्याने घेतले नव्हते. पनवेलला जागा घेतल्यावर वर्षभराने बिल्डरने सर्व सदनिकाधारकांना त्यांच्या नावाचा वेगळा मीटर घेवून दिला. पहिले बिल जेव्हा आले तेव्हा माझ्या नावाची एकनाथ जनार्धन म्हात्रे अशी इंग्रजी वाट लावली होती ती सुद्धा मी फारशी मनाला लावून घेतली नव्हती. रेशनिंग कार्डावर नाव बरोबर असल्याने पुराव म्हणून ते देताना माझी काही अडचण होत नव्हती.

एका पावसाळी ट्रेक मध्ये अनवधानाने पॅन कार्ड पाकिटात तसेच राहीले व धबधब्याखाली भिजल्यावर त्याचा पार लगदा झाला. नवीन पॅन कार्ड साठी अर्ज करतानाच वडीलांचे नाव सुद्धा दुरूस्त करून घ्यायचे ठरविले. मधल्या काळात सरकारने फतवा काढून रेशनिंग कार्ड निवासाचा पुरावा म्हणून चालणार नाही असे जाहीर केल्याने माझी भलतीच गोची झाली. टेलिफोनच्या बिलावर नुसते आद्याक्षर होते म्हणून तो पुरावा बाद झाला, वाहन परवान्यावर जनार्धन असेच असल्याने त्याचाही उपयोग नव्हता, वीजेच्या बिलावर तर सगळीच बोंब होती. शेवटी पासबुक पुरावा म्हणून सादर करून नवीन पॅन कार्ड काढले. भविष्यात , खास करून मुलांच्या शिक्षणात, पत्त्याचा पुरावा देताना त्रास होवू नये म्हणून एका मित्राने वीजेच्या बिलावर सुद्धा नाव दुरूस्त करून घे असे सूचविले व मला पण ते पटले. घराकडून जवळ असलेल्या महावितरणच्या कार्यालयात गेल्यावर समजले की नावातली दुरूस्ती फक्त टपाल नाका, पनवेल इकडेच होते. सुट्टीच्या शनिवारी मी पायपीट करून त्या कार्यालयात गेल्यावर समजले की लेखा विभाग सर्व शनिवारी बंद असतो ! म्हणजे नाव बदलण्यासाठी रजा घेणे भागच होते. मधल्या काळात मी अनेकांना हा नामबदल कसा करता येइल, काय काय लागेल याची चौकशी केली. त्यांची उत्तरे ऐकून मी हादरूनच गेलो. सगळ्यांचे म्हणणे पडले की तुला आठ वर्षे काय झोपा काढत होतात का याचा खुलासा द्यावा लागेल. त्यांच्या मते ही नावाची दुरूस्ती नसून मीटरच्या मालकीत घर विकल्याने होणारा बदल असेल ! जनार्धन चे जनार्दन एकवेळ समजू शकेल पण म्हात्रे कोठे व मराठे कोठे ? कशावरून तू म्हात्रे नावाच्या मालकाचे घर रीसेलने घेतले नसशील ? मुद्दा अगदीच दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता ! आता मी महावितरणच्या कर्मचार्यांच्या मानसिकतेतून बघू लागलो. काय काय बरे पुरावे लागतील ? सोसायटीचे शेयर सर्टीफिकेट – नाही ते नाही पुरणार, सोबत सचिवाचे हा सोसायटी झाल्यापासून सभासद असल्याचे प्रमाणपत्र सोबत घेवूया, अरे हो, आपण घरखरेदीवर मुद्रांक व नोंदणी शूल्क भरले आहे त्याची प्रत सोबत घेवूया, त्याच्यावर नाव बरोबर आहे, सोबत आपले पॅनकार्ड, कार्यालयाचे ओळखपत्र याची प्रत जोडूया – असे एकेक करत निदान 15 पुरावे, मूळ कागद व त्याची नक्कल , अशी जय्यत तयारी करून मी नामबदलाच्या मोहिमेवर रवाना होण्यासाठी मी सज्ज झालो.

लेखा विभागाची खरे तर दहाची वेळ पण 11 पर्यंत तिकडे कोणीच फिरकले नव्हते. तक्रार द्यायला कोणी तिकडे अधिकारीसुद्धा आलेला नव्हता तेव्हा चडफडणे या शिवाय मला पर्यायच नव्हता. अकारा वाजता मंडळी आल्यावर चहापाण्यात 20 मिनिटे गेल्यावर मी लाचारासारखा एका कर्मचार्यापुढे वाकून उभा राहीलो. काय काम आहे ? असे तो खेकसल्यावर मी अदबीने नाव चुकीचे पडले आहे, दुरूस्त करायचे आहे असे सांगितले. त्याने लेखी अर्ज द्यायला सांगितल्यावर मी तत्परतेने तो त्याला दिला. अर्ज न बघताच एखाद्या वीजचोराकडे बघावे असे त्याने माझ्याकडे रोखून बघितले व कशावरून तुम्ही ही जागा विकत घेतली नाही, रीसेलने ? असे पोलिसी खाक्यात विचारले. मी लगेच जागेचे 8 वर्षापुर्वीचे मुद्रांक व नोंदणी प्रमाणपत्र दाखविले. यावर आठ वर्षे काय झोपा काढल्यात काय ? अर्थात याला माझ्याकडे काही उत्तर नव्हते. मी शक्य तेवढ्या नम्र पणे कामावर रजा घेवून आलो आहे, या कामासाठीच खास वेळ काढला आहे असे सांगताच मग आम्ही काय इथे तुमचीच कामे करायला बसलो आहो का ? असे ऐकावे लागले. मी एका मागून एक पुरावे त्याला दाखवू लागलो पण तो नन्नाचा पाढाच लावून बसला होता. नाही, नाही, हे नाही चालणार ! शेवटी मी शरण भावाने तुम्हीच काय करू ते सांगा असे त्याला विचारले. यावर बराच इचार करून त्याने स्टॅम्प पेपरववर आफिडिवेट सादर करावे लागेल असा निकाल दिला. मी तशा प्रतिज्ञापत्राचा काही नमुना आहे का असे विचारताच त्याने बाहेर पाटील म्हणून एक बसतो त्याच्याकडे मला पिटाळले. पाटील महाशयांनी मला कोपच्यात घेवून, साहेब तुम्हाला साधे कसे कळत नाही ? एक गांधी द्या मला, तुमचे काम झालेच म्हणून समजा ! आता मात्र माझ्या सहनशक्तीचा कडेलोट झाला ! हिन्दी चित्रपटाचा हीरो माझ्या अंगात संचारला ! एक से एक डायलॉग माझ्या तोंडातुन बाहेर पडू लागले, अर्थात त्याला कोणीच भीक न घातल्याने मी अजून संतापलो, समोरची खुर्ची उचलून फेकून दिली, काही कागद फाडले, त्या कारकुनाची गचांडी धरली ! राडा केला राडा ! मी स्कूटरला किक मारून पोबारा करण्याच्या बेतात असतानाच पोलिस आले व माझ्या बकोटीला पकडून जीप मध्ये मला फरफटत नेवू लागले. मी सोडा सोडा असे म्हणत ----. बायको मला गदागदा हालवून काय झाले , कोणी धरले ? असे विचारीत होती. म्हणजे हे सगळे स्वप्न होते तर ! सकाळी तिकडे निघताना बायकोने दहा-दहा वेळा बजावून सांगितले की पहाटेची स्वप्ने खरी होतात तेव्हा तिकडे राडा-बिडा करायच्या फंदात पडू नका !

महावितरणच्या कार्यालयात गेलो, 10 वाजता कोणीच आले नव्हते, 11 वाजता आले, 11:30 पर्यंत चहापान चालले. सगळे कर्मचारी आपापल्या जागेवर स्थानापन्न झाल्यावर मी मान खाली घालून एका टेबलावर गेलो , काय काम आहे असे खेकसून विचारल्यावर नाव दुरूस्त करायचे आहे त्याचा अर्ज, सोबतचे पुरावे, 8 वर्षे का नाही आलो याचा खुलासा – अशी टेप सुरू करणार तेवढ्यात त्या कर्मचार्याने एक रजिस्टर काढले – तुमची फालतु बडबड ऐकायला आम्हाला वेळ नाही , तुम्हाला काय नाव पाहीजे तेवढे सांगा, पाल्हाळ नको , असे दटावले. मी स्वत:च त्या रजिस्टर मध्ये बरोबर नाव लिहिले. यावर त्याने मला निघा अशी मानेनेच खूण केली. मी निदान एवढा आणलाच आहे तर अर्ज तरी ठेवून घ्या असे विनविताच तो करवादला “अर्ज काय चुलीत घालू का, लय शिकलेले असाल तर तुमच्याकडे, आम्हाला शानपन शिकवू नका ! पुढच्या बिलावर नाव बरोबर येइल, परत डोस्के खायला इथे येऊ नका.” विश्वास न बसल्याने मी उगीच तिकडे थोडा टाइमपास केला, पाटील नावाचा कोणी चायपानी मागायला येतो का ते बघितले. पण नाही. सगळे कसे शांत शांत होते ! दोन दिवसाने महावितरणच्या साइटवर बरोबर नाव याची देही याची डोळा बघितले व धन्य जाहलो ! पहाटेची स्वप्ने खरी होत नाहीत हेच खरे !

रेशनकार्ड !

पनवेलला घर घेवून रहायला आल्यावर नवीन रेशनकार्ड काढायला तलाठी कार्यालयात गेलो. सोबत आवश्यक सगळी कागदपत्रे घेतली होती. पांढरे कार्ड , फक्त पुरावा म्हणून घ्यायचे असल्याने फारशी कटकट होणार नाही असे वाटते होते. सर्वच सरकारी कार्यालयात आढळणारी अनागोंदी इथे सुद्धा होतीच. एकही माहिती देणारा फलक नव्हता. जे होते त्यावरची माहिती अगम्य भाषेत (सरकारी मराठीत !) दिलेली होती. नवीन गिर्हाइक बघताच एजंट लोकांनी मला गराडा घातला व एवढे रूपये दिलेत तर कार्ड घरपोच करतो अशी ऑफर दिली. अर्थात मी कोणाला भीक न घालता मला हवी असलेली खिडकी गाठली. नवीन रेशन कार्डचा अर्ज द्या असे सांगताच ’अर्ज संपले आहेत, समोरच्या दूकानात जा व अर्ज घ्या’ असे सांगितले ! मी तडक तलाठ्याच्या केबिनमध्ये घुसलो. तुमच्या कडे अर्ज नाहीत व समोरचा दूकानदार ते विकतो हा काय प्रकार आहे असे त्याला आवाज चढवून विचारताच त्याने बेल दाबून एका शिपायाला बोलावले व एक अर्ज मला दिला. पहिली लढत जिंकल्याच्या आनंदात मी तो अर्ज भरून सोबत पुराव म्हणून लागणारी कागदपत्रे त्या बाईच्या तोंडावर फेकली. माझा दणका वर्मी बसल्याने गुमान तिने अर्ज स्वीकारला व दहा दिवसाने कार्ड घेवून जायला सांगितले व एक तारीख एका कागदावर लिहून दिली. या काळात रेशनिंग निरीक्षक म्हणे घरी येवून शहानिशा करून जातो तेव्हा कोणीतरी घरी रहा असेही बजावले. सरकारी काम दिल्या तारखेला होणे अशक्य म्हणून मी अजून 10 दिवस थांबूनच तिकडे गेलो. घरी सुद्धा चौकशीसाठी कोणी आले नव्हते. या वेळी त्या खिडकीतल्या बाईच्या चेहर्यावर आसुरी हास्य फुलले. दिल्या तारखेला तुम्ही आला नाहीत आता नवीन तारीख घ्या असे फर्मान तिने सोडले. मी दिल्या तारखेलाच आले पाहिजे असे काही नाही तेव्हा माझे काम झालेच पाहिजे असे सांगताच विजयी मुद्रेने तिने मला आतला एक फलक दाखविला, त्यावर रेशनिंग कार्ड फक्त बुधवारीच मिळणार असे अत्यंत गिचमिड अक्षरात लिहिले होते ! मी परत तलाठ्याला केबिनमध्ये धडकलो, या वेळी मी त्यालाच केबिन बाहेर काढले. तो बोर्ड त्याला दाखविला व हा बोर्ड कोणाला दिसणार नाही असा का लावला आहे व त्या खाली असे कोणाच्या आदेशावरून लिहिले आहे याचा उल्लेख कसा नाही याचा जाब विचारला. अर्थात ही मनमानी परस्परच चालली होती तेव्हा माझे रेशनिंग कार्ड देण्याचा आदेशच त्याने दिला. तरीही एकाने काडी घातलीच, साहेब यांच्या घरी अजून कोणी निरीक्षक गेला नाही तेव्हा कार्ड कसे द्यायचे ? हा मुद्दा काढला. त्यावर मी दिलेल्या मुदतीत तुम्ही घरी आला नाहीत हा माझा दोष नाही तेव्हा मला कार्ड दिलेच पाहिजे नाही तर बांगलादेशींना कार्ड कसे मिळते याचा मला शोध घ्यायला लागेल ! आता मात्र हे खटले भारी आहे तेव्हा शहाणपण चालवून फायदा नाही असे दिसताच सरकारी यंत्रणा वेगाने कामाला लागली व 10 मिनिटात रेशनकार्ड माझ्या हातात पडले. 10 मिनिटे मी शांत रहावे म्हणून वर मला चहा सुद्धा पाजला गेला !


जाताना “एका सरकारी कर्मचार्याने दूसर्या सरकारी कर्मचार्याला नडू नये” असे “काचेच्या घरात राहणार्यांनी दूसर्यांच्या घरावर दगड मारू नये” च्या चालीवर मला सुनावले मात्र गेले ! चहा पाजल्यामुळे तेवढे मात्र मला ऐकून घ्यायलाच लागले !

एम.टी.एन.एल.चा कारभार !

महानगर टेलिफोन निगम, मुंबई या नावाचे एवढे प्रस्थ आता राहीले नाही . मोबाइल जेव्हा नव्हते तेव्हा मुंबईकरांना निगमने आपल्या मनमानी कारभाराने चांगलेच त्रस्त केले होते. चेहर्यावरचा माज बघून समोरची व्यक्ती म.टे.नि.ल मध्ये वायरमन आहे, कारकून आहे की अधिकारी हे सांगता यायचे ! ग्राहकाला छळायचे कसे याचे अनेक वस्तूपाठ तेव्हा निगमने घालून दिले होते. अगदी नवीन जोडणी मिळण्यापासून ते बिल देणे, वसूल करणे, बिल भरून सुद्धा फोन कट करणे, बंद फोनच्या तक्रारींची दखल न घेणे, या सर्वच बाबतीच ग्राहक भरडला जात होता. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशीच तेव्हा अवस्था होती. 1995 च्या आसपास थोडे सुधारणांचे वारे खात्यात शिरले असावेत. मी स्वत: याच सुमारास निगमचा ग्राहक झालो. नातलग कोकणात, सासर औरंगाबादचे, आई- वडील विरारला अशी स्थिती असल्याने फोनला एसटीडी सुविधा माझ्यासाठी अत्यावश्यकच होती. त्याच सुमारास इलेक्ट्रॉनिक लॉकची सोय झाल्याने एसटीडीची सुविधा घेणे जोखमीचे राहीले नव्हते. नायगाव येथील ग्राहक सेवा केंद्रात मी गेलो व फोनला एसटीडीची सोय हवी आहे असे सांगितले. लगेच मला एक अर्ज भरून देण्यास सांगितले गेले. अर्ज भरून दिल्यावर तुमच्या सहीची पडताळणी हवी , तेव्हा तुमच्या बँकेत जावून मॅनजरची सही आणा असे फर्मावले गेले. मी अर्जावर असा काही उल्लेख नाही तेव्हा मला असे करायला का सांगता असे विचारले. हा आगाऊपणा कमी झाला म्हणून माझ्या सहीचे नमुने मी जोडणीसाठी अर्ज केला होता, तेव्हा तुमच्याकडे असायलाच हवेत, तुमच्या कार्यालयातच तपासा असे सांगितले ! सरकारी कर्मचार्याला नियम सांगणे हा भयंकर गुन्हा आहे ! महिला कर्मचार्याने तणतणत तो अर्ज घेतला व मी आता तो पडताळणीसाठी मुख्य कार्यालयात पाठविते, दोन महीने लागतील असे सुनावले ! मी पण आता हट्टाला पेटलो होतो, काहीही झाले तरी परत खेप घालणार नाही, दोन महिने गेले तरी बेहत्तर !


दूसर्याच दिवशीच्या पेपरात दिलेल्या जाहीरातीत चक्क निगमनेच ’एसटीडी हवा आहे का ?’ असा लाडीक प्रश्न विचारला होता व नुसता या नंबरावर फोन करा अशी ऑफर दिली होती. मी लगेच त्या नंबरावर फोन लावला. मिळालेल्या माहीतीप्रमाणे दोन ओळीचा अर्ज व सोबत सहीचा पुरावा म्हणून माझ्या कार्यालयीन ओळखपत्राची प्रत मी फॅक्स केली. दूसर्याच दिवशी फोनवर एसटीडी सुविधा चालू झाली !


त्या नंतर दोन महीन्याने निगमकडून एक पत्र आले . तुम्ही एसटीडीसाठी अर्ज करताना सहीची पडताळणी न केल्याने तुम्हाला ही सोय देता येणार नाही असे सांगून चक्क दिलगिरी व्यक्त केली गेली होती ! सरकारी खात्यात दोन विभागात कसा ताळ्मेळ नसतो त्याचा हा घ्या पुरावा !

’बेस्ट’ उपाय योजना !

साधारण 1985 च्या सुमारास सुट्या पैशांची अभूतपुर्व टंचाई झाली होती. नेहमी सारखीच सरकारला अनेक वर्षानी जाग आली व चक्क नाणी आयात केली गेली होती. पण मधल्या काळात मुंबईकर या नाणेटंचाईने चांगलेच हैराण झाले होते. नाणेटंचाईचे अनेक खुमासदार किस्से त्यावेळी पब्लिकमध्ये चघळले जात होते. कोणी काय म्हणे लग्नात हुंडा नको पण 100 रूपयाची सुट्टी नाणी द्या असा आग्रह धरल्याने ठरलेले लग्न मोडले, भिकार्याला पाच पैसे चार आणे भिक म्हणून लोक देत व त्याच्याकडून मोड मिळवून आपली सुट्या पैशाची नड भागवत, भिकारी सुद्धा सुटे पैसे विकून म्हणे गब्बर झाले होते, सुटे पैसे नाहीत म्हणून लोक भीक घालत नाहीत म्हणून भिकार्यांनी आत्महत्या केल्याच्या सुद्धा बातम्या होत्या ! घरोघरी मुलांच्या पिगा बँका फोडून त्यातल्या सुट्यावर मोठ्यांनी डल्ला मारला होता, घरी चोरी करण्यासाठी शिरलेला चोर नोटांऐवजी नाणी घेवून पळाला होता --- ! खरे वांदे झाले होते बेस्टचे ! बेस्टची तिकिटे तेव्हा अगदी 25 पैशापासून सुरू होती. प्रवाशाने रूपया काढून 25 पैशाचे तिकिट मागितल्यास त्याचे व वाहकाची जुंपायची. कधी कधी प्रकरण हातघाईवर जायचे. शेवटी बेस्ट प्रशासनाने नाण्याएवजी कूपन पद्धत आणली व ही बेस्ट कूपन मुंबईभर अधिकृत चलनासारखी वापरली जाउ लागली . अगदी मंगल कार्यात आहेर म्हणून सुद्धा पाकिटात ही बेस्टची कूपने दिली जात !


पण हा उपाय राबविण्याआधी बेस्टने एक योजना राबविली होती. सुटे पैसे नसतील तर वाहक तिकिटामागेच किती पैसे बाकी आहेत ते स्वत:चा बिल्ला नंबर टाकून लिहून द्यायचा. प्रवाशाने ते तिकिट वडाळा आगारात दिल्यास बेस्ट त्याला ते पैसे परत करणार अशी ती योजना होती ! काय पण डोके चालविले होते ! जास्तीत जास्त 75 पैसे परत घेण्यासाठी मुंबईच्या कोणत्याही भागातुन निव्वळ तिकिटाचे बाकी सुटे पैसे घ्यायला कशाला कोण येणार ? पण हीच तर सरकारी कामकाजाची खासियत असते ! त्या वेळी मी वडाळ्यालाच रहायला होतो. एकदा असेच सुटे पैसे नसल्याने बाकी 25 पैसे मला वाहकाने तिकिटावर लिहून दिले व वडाळ्याला जाउन घ्या असे फर्मावले ! एक अनुभव म्हणून मी वडाळ्याच्या आगारात गेलो. अनेक ठीकाणी चौकशी केल्यावर व रूपयाचे रक्त आटविल्यावर मला एकदाचा तो सुटे पैसे परत करणारा विभाग मिळाला. तिकडे मला एक छापील अर्ज देण्यात आला. त्याच्या तीन प्रती होत्या. या सगळ्या कागदांचा खर्चच रूपयाएवढा झाला असता ! त्या अर्जावर नाव, पत्ता, जन्म तारीख, प्रवासाची तारीख, मार्ग , वेळ, किती पैसे दिले होते व किती परत मिळायला हवेत असे रकाने होते. अर्ज तीन प्रतीत भरायचा होता ( एक स्थळ प्रत, एक लेखा विभागाची, एक प्रशासकिय प्रत ! ) पण कार्बन नसल्याने मला ते सगळे अर्ज वेगवेगळे भरावे लागले, माझी निदान पाच पैशाची तरी शाई संपली असावी !


शेवटी अर्ज व तिकिट जोडून मी एका काउंटर वर दिले. मला वाटले की लगेच मला 25 पैसे परत मिळतील, पण तसे काही नव्हत. मी अर्ज केल्यानंतर त्या वाहकाला डेपोत बोलवून ती सही त्याचीच असल्याची खात्री केली जाणार होती व त्याच्याकडून तेवढ्या पैशाची भरपाई करून घेतली जाणार होती. ते झाल्यावर माझे 25 पैसे मला चक्क मनिऑर्डरने घरपोच मिळणार होते ! साधारण आठ दिवसाने 25 पैशाची मनिऑर्डर घेवून पोस्टमन दारी आला ! पैसे देताना पोस्टमनला सुद्धा हसू आवरत नव्हते, कारण मनिऑर्डरचा छापील अर्जच तेव्हा 15 पैशाला मिळायचा शिवाय कमिशन म्हणून निदान 25 पैसे पोस्ट खात्याला द्यायला लागायचे ! म्हणजे 25 पैसे परत करण्यासाठी बेस्टने तीन प्रतीतल्या अर्जाचा निदान 1 रूपया, मनिऑर्डरचा अर्ज अधिक कमिशन असे एक रूपया चाळीस पैसे खर्च केले होते ! मला प्रश्न पडला की प्रवाशाचे 25 पैसे परत करण्यासाठी धडपड करणार्या बेस्ट प्रशासनाचे कौतुक करायचे की त्या साठी मुंबईच्या करदात्यांचे एक रूपये चाळीस पैसे खर्च केल्याबद्द्ल संताप व्यक्त करायचा ?

गुरुवार, २ डिसेंबर, २०१०

गुगलवर सापडली सोनपापडी !

अध्यक्षांच्या कार्यालयात ’कुछ मिठा हो जाय’ असा घोष सतत चालू असतो. अधिकारी वर्गाला मिळणारे प्रमोशनचे गाडे आमच्या साहेबाच्या मान्यतेशिवाय पुढे जाउच शकत नाही त्यामुळे संबंधित अधिकारी सतत आमच्या संपर्कात असतो व साहेबाची सही झाली की तोंड गोड करायला तो स्वत: येतोच ! तसेही आम्ही आज कोणाचा वाढदिवस आहे हे बघून त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोन करतो व “त्याने” किंवा “तीने” तिच्या बर्थडेला कसे तोंड गोड केले होते त्याची हटकून आठवण करून देतो, गोळी अचूक लागते व मिठाईचे पुडके आमच्या कार्यालयाला सत्वर धाडले जाते.अशीच एकदा आलेली मिठाई आम्ही फस्त केली व त्यानंतर मात्र धमालच झाली !


खाल्लेली मिठाइ कोणती असा फालतू प्रश्न माझ्या डोक्यात आला व तो सगळ्यांनाच अस्वस्थ करू लागला. नाव तर अगदी तोंडावर होते पण चटकन आठवत मात्र नव्हते. अनेक नावे घेतली गेली पण ते नक्की नाही यावर मात्र एकमत होत गेले. उत्तर न सापडल्याने सगळे खापर माझ्यावरच फूटले. याने नको तो प्रश्न उपस्थित करून सगळ्या मिठाईची गोडी घालविली तेव्हा उत्तर त्यानेच द्यावे व न देता आले तर अशीच मिठाई सगळ्यांना खिलवावी या शिक्षेवर एकमत झाले. मी डोके चालवित असतानाच बाकी सगळे वेगवेगळे पर्याय सुचवून माझी मस्त फिरकी घेत होते. माझे संगणकवेड माहीत असल्याने एकाने “अरे तू संगणकावर का शोधत नाहीस” असे सांगून चांगलाच हशा पिकविला.


Why not ? मी सुद्धा मग ते आव्हान स्वीकारले. गुगल नामक वाटाड्यावर हवे असलेले काहीही सापडत नाही. हा वाटाड्या वाट दाखवित नाही तर वाट लावतो किंवा वाटेला लावतो हा माझा आजवरचा अनुभव. गुगलवर काही शोधणे म्हणजे “खांब खांब खांबोली खेळणे” ! तरीही काही शोधायचे म्हटले की मी गुगलच वापरतो ! पण आत्ता आपण जे काही गोड खाल्ले ते या वाटाड्याला सांगणार तरी कोणत्या तोंडाने सॉरी शब्दाने ? पण जरा विचार केल्यावर मला मार्ग सापडला ! जो पदार्थ चाखला होता त्या करता हलदीरामची ख्याती होती. एवढी मोठी कंपनी म्हणजे तिची वेबसाइट असणारच, त्यात तिच्या प्रसिद्ध उत्पादनांची जाहीरात तर असणारच, त्या मिठायांचे फोटो सुद्धा असणारच ! मग असे फोटो बघत जायचे व आपण जी मिठाई खाल्ली ती तशी दिसते का ते बघितले की नाव सापडणारच ! मग, काय ! गुगलच्य सर्च बार मध्ये हल्दीराम शब्द टाकला , अगदी पहिले छूट हल्दीरामची वेब साइट मिळाली. ती उघडल्यावर स्वीट्सवर क्लिक केल्यावर जी पहिली मिठाई उघडली तीच तर आम्ही आता फस्त केली होती ! सोनपापडी ! युरेका , युरेकाच्या चालीवर मी सोनपापडी, सोनपापडी असे ओरडताच सगळे सहकारी, अरे हो रे ! आठवले, आठवले, सोनपापडीच ती ! बरोब्बर ! अशी कबूली देवून मोकळे झाले. आता खरेतर मी पार्टी द्यायचा काहीही प्रश्न नव्हता पण लगेच मला हरभर्याच्या झाडावर चढवून “काय साल्याची कमांड आहे नाही संगणकावर ! मिठाई सुद्धा शोधून काढतो, मराठे, इस बात पे हो जाय एक पार्टी !” असे सहकार्यांनी कबूल करून घेतलेच !

युद्ध जिंकणारे मराठे तहात का हरतात हे गुगलवर समजेल का ?!!!

फाइलला पाय कसे फूटतात ?

मी 1986 मध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये गोदी विभागात कामाला लागलो. निम-सरकारी संस्था असूनही फाइल वा लाल फीतीशी माझा अगदी अध्यक्षांच्या कार्यालयात बदली होईपर्यंत संबंध आला नव्हता. त्या आधी 12 वर्षे संगणक विभागात असताना सुद्धा माझा बहुतांश भर पेपरलेस वरच होता. अगदी सुरवातीला फिल्ड वर्क असल्याने “रात गयी बात गयी” असेच काम चालायचे. समोर असेल ते काम तेव्हाच उडवले की चौकशी झाली तरी अगदी काल काय केले ते आठवत नाही असे बिनदीक्कत सांगता यायचे. नवीन जागी मात्र सगळे व्यवहार फायलीमार्फतच होतात ! फाइल चालते, हलते आणि बोलतेसुद्धा ! मला सुरवातीला हा प्रकार खूपच जड गेला. फाइल आली का ? इथपासून केव्हा गेली, कोणाकडे गेली, शेरा काय मारला आहे असे अनेक प्रश्न मला फेस करावे लागले. मी येण्या आधी एका रजिस्टर मध्ये नवी फाइल / पत्र आल्यावर तिला नंबर देवून ती कोणाकडून आली, त्या विभागाचा संदर्भ कमांक, विषय व साहेबाची सही व शेरा असल्यास तो नोंदवल्यावर ती परत केव्हा पाठविली त्याची रकान्याप्रमाणे लिखीत नोंद असे. रजिस्टर मध्ये बघून फाइल संबंधीच्या चौकशांना उत्तर देणे खूपच वेळकाढूपणाचे, किचकट होते. तेव्हा मी सगळ्यात आधी त्याचे एक्सेलीकरण केले. त्या मुळे काहीही इनपुट मिळाला / टाकला तरी फाइलचा ट्रॅक शोधणे सोपे झाले. अशा प्रकारच्या सर्व चौकशा मी सेकंदात उडवू लागल्यावर अनेकांना मी न बघताच ठोकून देत आहे वाटू लागले होते ! अर्थात मग सर्वच विभागात ही पद्धत राबविली गेली. पण तरीही काही फाइलचा पत्ता लागत नसे तो नसेच ! फोनवर चौकशी करणारा “दोन दिवसापुर्वीच तुमच्या कार्यालयात पाठविली, नाही कसे म्हणता ?” असे विचारीत मला फैलावर घेत असे. कधी कधी “संगणकात बघून मारे सांगता फाइल दोन दिवसापुर्वीच पाठविली, मग अजून ती कशी मिळाली नाही ?” अशीही झाडाझडती होत असे. यापेक्षा गंभीर प्रकार म्हणजे फाइल आल्याचीच मुळात संगणकात नोंद नसे तर कधी ती आमच्याच कार्यालयात असल्याचे संगणक दाखवे पण ती प्रत्यक्षात साहेबाच्या टेबलावरच नसे ! एवढे सगळे करून सुद्धा टीकेचे धनी व्हायला लागते म्हणून मी खूपच अस्वस्थ झालो होतो. फाइलचे होते तरी काय ? या प्रश्नाने माझी झोप काही काळ तरी उडविली होती. फाइल साहेवाच्या टेबलावरूनच गुल होणे भयानक होते कारण सायबाला फाइल कोठे गेली असे विचारायची सुद्धा सोय नसे !

शेवटी मी या प्रश्नाला भिडायचे ठरविले. फाइल पाठविली आहे असे छातीठोकपणे सांगणार्याला आधी मी ती फाइल घेतल्याची सही दाखव असे सांगू लागलो. फाइल थेट आमच्याकडे येणार होती की दूसर्या विभागातुन आमच्याकडे येणार होती ते सुद्धा विचारू लागलो. बहुतेक न मिळणार्या फाइल एकतर मला दिलेल्याच नसत किंवा दूसर्याच विभागात असून त्या आमच्या कार्यालयात पोचल्याच नसल्याचे समजत असे. माझा अर्धा ताप कमी झाला. फाइल आम्ही पाठवून सुद्धा न मिळणे – याचे कारण बहुतेकदा ती फाइल संबंधित विभाग प्रमुखाच्या कार्यालयात पडून असे हेच होते. कधी कधी साहेबच एका विभागाची फाइल दूसर्या विभागाकडे, जसे कायदा वा अर्थ खात्याच्या अभिप्रायासाठी पाठवित व ज्याची फाइल आहे तो ती मिळत नाही म्हणून बोंब मारे. मग आम्ही अशी नोंद संगणकात ठेवू लागलो व मूळ विभाग प्रमुखाच्या पीएला फोन करून त्याची माहीती देवू लागलो. आता फाइल गहाळ होणे हे प्रकार बरेच आटोक्यात आले तरीही अध्यक्षांच्या टेबलावरून फाइल गुल होण्याचे प्रकार मधून मधून होतच होते ! अशीच एक गुल झालेली फाइल महीन्याभराने नवीन टाचणासह पुन्हा माझ्या टेबलावर दिसताच मला भूताटकीचाच प्रकार वाटला. तपास केल्यावर कळले की साहेबानीच त्या विभागप्रमुखाला बोलावून ती फाइल अधिक माहीतीसाठी परत केलेली होती. मी मग सर्व विभागप्रमुखांना भेटून अशी थेट फाइल आणल्यास कृपया मला कळवित जा अशी विनंती केली. साहेबाच्या रूमबाहेर असलेल्या शिपायांना कोणीही अधिकारी रीकाम्या हाताने केबिनमध्ये गेला आणि फाइल घेवून बाहेर पडला तर लगेच आम्हाला कळवायला सांगितले. मग तशी वर्दी मिळताच आम्ही लगेच त्या विभागप्रमुखाला गाठतो व फाइलची नोंद अपडेट करतो !

काही विभाग कार्यालये पार माझगाव वा वडाळ्याला आहेत. अशा ठीकाणी दिवसातुन फक्त दोनदाच बटवडा होत असे व फाइल न मिळण्याचे ते एक मुख्य कारण असे. अनेकदा विभागप्रमुख फाइल डीसपॅचने पाठवू नका, आमचा शिपाई पाठवतो त्यालाच द्या असे सांगतात. अशा फाइल आम्ही वेगळ्या ठेवायचो व त्या शिपायाकडे द्यायचो. मी नवीन असताना यातलीच एक फाइल गुल झाली. काही महिने तपास करून सुद्धा ती सापडली नाही तेव्हा डुप्लिकेट फाइल बनवून तिच्यावर मंजूरी घेण्यात आली. सहा महिन्याने मी एक फाइल बंद करण्यासाठी एक मोठे पाकिट घेतले तेव्हा त्यात आधीच एक फाइल दिसली. लापता झालेलीच ती फाइल होती ! बहुदा मी आधी ती फाइल डीसपॅचने पाठविण्यासाठी पाकीटात भरून ठेवली असावी मी नसताना ती कोणी शिपाई न्यायला येणार असा निरोप मिळायावर वेगळी ठेवली ती तशीच राहून गेली असणार ! मग मात्र आम्ही हे प्रकार बंद केले व फाइल तडक डीसपॅच विभागात पाठवून हवी असेल तर तिकडूनच घ्या असे सांगू लागलो.


एकदा मात्र फारच गंभीर मामला घडला. टेंडरची एक फाइल काही केल्या सापडत नव्हती. संबंधित विभाग प्रमुख रोज फोन करून आम्हाला झाडत होता व आम्ही साहेब गेल्यावर त्यांची केबिन झाडून ती फाइल शोधत होतो. अनेकांना फोन करून झाले, प्रत्यक्ष भेटून झाले पण काहीही थांगपत्ता लागत नव्हता. आमची विश्वसनीयताच धोक्यात आली होती व कारवाईची टांगती तलवार लटकत होतीच. अचानक सतर्कता विभागाच्या प्रमुखानी फोन केला व माझ्या विभागाचा काहीही संबंध नसलेली फाइल तुम्ही मला का पाठविलीत म्हणून फायरींग चालू केली. या फाइलमुळे मी संपूर्ण आठवडा हैराण आहे असे आम्हालाच सुनावले. आम्ही ताबडतोब माफी मागून ती फाइल आणायला शिपायाला पिटाळले. आम्ही शोधत होतो ती फाइल तीच होती ! सतर्कता विभागाच्या काही फाइल गोपनीय असतात व साहेब स्वत:च त्या पाकीटात भरून सील करून त्या विभागाला पाठवितात. अशाच एका फाइलबरोबर ती फाइल बंदोबस्तात बाहेर पडली होती !

आमच्याकडे जी पत्रे येतात, साधारण दिवसाला 40 ते 50, जसे आयातदार, निर्यातदार, जहाज मालक वा त्यांचे प्रतिनीधी, केंद्र सरकारचे जहाज मंत्रालय व इतर खाती, आम्ही कारवाईसाठी साहेबांच्या सहीने संबंधित खात्याकडे पाठवितो. मूळ प्रत त्या कार्यालयाला जाते व तीची एक प्रत आमच्या रेकॉर्डला असते. या ओसी प्रतींमुळे सुद्धा मी खूप त्रासलो होतो. अनेकदा संबंधित विभाग आमची प्रत हरविली आहे असे सांगून आमच्या ओसी वरून दूसरी प्रत मागायचा. मला अनेकदा आमची ओसीच मिळत नसे ! असे प्रकार वरचेवर घडू लागल्याने मी चांगलाच धास्तावलो. एकदा एकाने असेच एका ओसीची प्रत मागितली व मी ती सापडत नाही असे नम्रपणे सांगताच आमची फोनवरच जुंपली. तुम्हाला द्यायची नसेल तर सरळ नाही सांगा पण सापडत नाही असे खोटे का सांगता ? या त्याच्या वाक्याने मी भडकलो व उगाच आरोप करू नका म्हणून सुनावले त्यावर त्याने काल श्रॉफने ओसी आहे म्हणून सांगितले आज तुम्ही नाही म्हणून सांगता याचा अर्थ काय ? असा उलट जाब विचारला. त्या दिवशी श्रॉफ आला नव्हता म्हणून मी त्याचा ड्रावर उघडला व माझे डोळेच विस्फारले ! मला ज्या ज्या ओसी सापडत नव्हत्या त्या सगळ्या त्या खणात विश्रांती घेत होत्या. ओसीची प्रत हवी असल्याचा फोन श्रॉफला आल्यावर तो लगेच ती ओसी आपल्या ताब्यात घ्यायचा व कामाच्या धावपळीत प्रत काढायचे विसरूनच जायचा. कधी प्रत काढायचा पण ओसी जागेवर ठेवायला विसरायचा. ती ओसी मात्र त्याच्या खणात तशीच पडून रहायची, पुढच्या वेळी मी फोन घेतल्यावर ती मला कशी सापडणार ? आता ओसी मिळत नसली की मी आधी श्रॉफचा ड्रावर उघडतो !

आता मात्र मी ठामपणे सांगू शकतो की निर्जीव असलेली फाइल / प्रत्र कधीच हरवत नसतात, त्यांना पाय सुद्धा फुटत नाहीत. ती सांभाळणारी माणसे मात्र सोयीप्रमाणे त्यांना हरवितात वा शोधून काढतात ! आता “आदर्श”ची फाइल कोठे असेल ते मात्र मला विचारू नका !

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०१०

वाचन’रंग’ !



अभ्यास मी एका जागी बसून करीत असे,अगदी सलग चार तास सुद्धा ! पण कादंबरी वाचताना मात्र ते शक्य होत नसे ! कादंबरी जशी जशी उत्स्कूता वाढवित जाते तशा तशा बसण्याच्या जागा व स्थितीत सुद्धा नकळत फरक पडतोच ! हीच गंमत टीपली आहे चि. प्रसाद व प्रियांकाच्या मदतीने !

वाचन’रंग’ उलगडण्यासाठी वरील छायाचित्रावर टीचकी मारा !

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०१०

मोबाईलखोरांना कसे आवरायचे ?

सीमेपलीकडचे आतंकवादी, तसेच युपी-बिहारी घुसखोरांमुळे राष्ट्र व महाराष्ट्र बेजार झाला आहे, लाचखोर सरकारी यंत्रणेपुढे सामान्य माणूस हतबल आहे, हरामखोर नेत्यांमुळे सगळेच भरडून निघत आहेत. या सर्व खोरांना आता अजून एक जमात सामील झाली आहे आहे ती म्हणजे मोबाईलखोर ! मोबाईलचे रूपयातले मूल्य जरी कमी झाले आहे तरी त्याचे उपद्रवमुल्य जबर वाढले आहे ! या कंपन्यांच्या गळाकापू स्पर्धेपायी अनेक वैविध्ये असणारी मोबाईल उपकरणे कमी किमतीत बाजारात आणली गेली व “माकडाच्या हाती कोलीत” असा प्रकार त्यात स्पीकरची सुविधा दिल्यावर झाला ! आज सामान्य लोकलकरांना या मोबाईल स्पीकरचा ठणठणाट सहन करीत प्रवासाचे दिव्य करावे लागत आहे. तसे तक्रार केल्यास “सहप्रवाशांना उपद्रव” या कलमाखाली मोबाइलवर गाणी वाजवणार्यावर कारवाई पोलिस करू शकतात पण लोकलमधली गर्दी बघता हे व्यवहारात शक्य नाही. गर्दीत कधी कधी तर कोणाचा मोबाईल कोकलत आहे हेच कळत नाही. (अर्थात अशक्यही नाही !). काही मिनिटे वाट बघून मी स्वत: मात्र अशा खोरांना हीसका दाखवितो, एकाने आवाज दिला की अनेक त्रस्त लोक त्या आवाजात आवाज मिसळून मोबाईलखोराला स्पीकर बंद करण्यास भाग पाडतात पण पुढाकार कोणी घ्यायचा यातच शेवटचा थांबा येतो किंवा दरम्यानच्या काळात तो उपद्रवी उतरून सुद्धा गेलेला असतो. मी नमनालाच शिवी हासडून मोबाइलखोराला गार करतो पण सगळ्यांनाच हे जमेल असे नाही, तसे मला सुद्धा ताकदीचा अंदाज घेवून केव्हा केव्हा कानात नुसता इयरफोन घालून स्वत:चा बचाव करावा लागतो ! तुम्हाला गाणे ऐकायचे नसेल वा दूसर्या कोणाचे खपवून घ्यायचे नसेल तर नुसता इयरफोन कानात घालून बसावे, लोकलच्या तिकिटात विमानप्रवासाचा आनंद मिळतो ! तसे उदारपणे आपला इयरफोन त्या मोबाइलखोराला तुम्ही तात्पुरता ऑफर सुद्धा करू शकता.


अर्थात “सांगताही येत नाही, सहनही होत नाही” अशा संभ्रमात पडू नका. खाली दिलेले काही उपाय गांधीवादी आहेत व आपापल्या वकुबा प्रमाणे करून बघायला हरकत नाही, अर्थात विपरीत परीणाम झाल्यास मी जबाबदार नाही !

तुम्ही जर खिडकीजवळ बसला असाल व तुमच्या बाजुला कोणाचा मोबाईल कोकलत असेल तर “बघु कोणते मॉडेल आहे” असे म्हणत त्याचा मोबाइल हातात घ्या, लगेच तो खिडकीबाहेर ठेवा, माझ्या अंगाला जरी हात लावलास तरी मोबाईल खिडकीबाहेर पडेल हे त्याला नम्रपणे सांगा व कुर्ल्याला(च) उतरून गाडी सुरू होताना बाहेरून मोबाइल ताब्यात घेण्याची नम्र विनंती करा. तुमचा मोबाइल जर हजार बाराशेचा असेल व समोरच्याचा जर भारी असेल तर हा उपाय लय भारी सिद्ध होतो !


“आयला कसली भारी गाणी आहेत हो तुमच्याकडे “ अशी साखरपेरणी करीत त्या मोबाइलखोराला लोकलच्या टफावर चढवा. लगेच नीलदंत तंत्राचा वापर करून ती गाणी मला पण हवीत असा हट्ट धरा. अर्थात गाणी आपसूकच बंद करून तो ती गाणी मोठ्या उत्साहाने तुम्हाला सेंड करू लागतो ! याने एकतर प्रवास तरी शांततेत संपतो वा त्याची बॅटरी तरी संपते ! सुंठीवाचून गेला की नाही खोकला ?!


“अरे ही गाणी डुप्लिकेट आहेत, बहुदा कोणा ऑर्केस्ट्रामधल्या कलाकाराच्या आवाजातली आहेत, तुला कोणीतरी xx बनविले” असे म्हणा किंवा “आवाज एवढा दणदणीत वाटत नाही, स्पीकर बिघडला की काय ? सेकंडचा साला हाच प्रोब्लेम आहे” हे शेरे सुद्धा असरदार शाबित होतात. कधी अंबानीचा बाप काढून “याच्या बापाचं स्वप्न खरेच साकार झाले, कोणीही आजकाल मोबाईल घेतो, अडाणी माणसाला कसे समजणार इयरफोन काय प्रकार असतो ते ?” अशी खंत व्यक्त करावी. न चालणारे पाच, दहा, चार वा आठ आण्याचे नाणे काढून मोबाइलखोराच्या हातावर ठेवल्यास त्या बिचार्याची अवस्था “जोर का झटका धीरे से लगे” अशी होते, अर्थात मधल्या काळात तुमचे स्टेशन मात्र यायला हवे !


समजा जर कोणी जुनी गाणी वाजवित असेल तर “काय लेका सैगलची / बाबा आदमके जमानेकी / रडकी गाणी ऐकतोस, जरा उडती गाणी लाव की” असा टोमणा मारावा किंवा vice-versa ! तसे टोमणे बर्याच प्रकारे मारता येतात पण मोबाईलखोरांचा बुद्ध्यांक बुद्धयाच कमी असतो हे ध्यानी घ्यावे. “आयला तुझा मोबाइल वाजतोय होय, मला वाटले कोणी भिकारीच गाणी गात भीक मागत आहे !” हे किंवा “घेतलास ना सेकंड हॅन्ड / चायनामेड ? थोडी पदरमोड केली असतीस तर branded मिळाला असता, त्याच्या बरोबर इयरफोन फूकट मिळतो” असे हळहळायचे. जर त्याने रफीची गाणी लावली असतील तर किशोरकुमार वाजवायची फर्माईश करायची, हे गाणी आहे का ? ते गाणे आहे का ? तुला माझ्याकडची गाणी देवू का ? अशी विचारणा सतत करून त्याचा गोंधळ उडवून देण्यात सुद्धा मजा येते. कधी तुझ्याकडे अजून कोणती आहेत बघू असे म्हणत त्याच्या मोबाइलचा ताबा आपल्याकडे घ्यायचा. हिन्दी गाणी लावली असतील तर मराठी वाजव असा आवाज दिल्यास मोबाइखोराची मोलती बंद होते असा सॉलिड अनुभव आहे !


अर्थात तुमच्याकडे डबा दणदणवून टाकणारा स्पीकर फोन असल्यास खूपच गमती जमती करता येतात. त्याने जे गाणे लावले असेल त्याच्या नेमक्या उलट मूडचे गाणे त्याच्यापेक्षा मोठ्या आवाजात लावल्यास काही काळ गोंधळ उडतो व पब्लिकच “दोनो भी अपना अपना स्पीकर बंद करो” असा निवाडा देते. मी एकदा असा प्रयोग केल्यावर मात्र भलताच रीझल्ट मिळाला होता. झाले असे की एकजण नवीन गाणे वाजवित होता. त्याला गप्प करण्यासाठी मी माझ्या मोबाइलचा स्पीकर ऑन करून “चढता सूरज धीरे धीरे” ही एवरग्रीन कव्वाली चालू केली. आवाज अगदी टीपेला पोचल्यावर पब्लिकचा माझ्या भोवती गराडाच पडला. तो सुद्धा आपला मोबाइल थंड करून कानात प्राण आणून कव्वाली ऐकू लागला. त्या कव्वालीच्या प्रत्येक कडव्याला मैफलीत मिळते तशी दाद मिळू लागली ! गाणे संपल्यावर “वन्स मोर”चा जल्लोष झाला. मला झक मारीत ते गाणे पुन्हा वाजवावे लागले. माहौल एकदम बदलून गेला, डब्यात एकदम पिन ड्रॉप सायलेन्स ! जो तो त्या गाण्यात अगदी तल्लीन झाला. पनवेल येईपर्यंत त्या गाण्याची आवर्तने चालू होती. पनवेल स्थानकात उतरल्यावर पुढची 10 मिनीटे – अर्थात बॅटरीचे शेवटचे टोक उरे पर्यंत मी लोकांना ते गाणे ब्ल्युटूथने पाठवित होतो !



हे लिहीताना उगाच डोक्यात भुंगा शिरला, म्हणजे “लोकांना खरेच ते गाणे आवडले होते की …………….?”

पाच हजाराचे बक्षिस !

सरकारी नोकरीत सब घोडे बारा टक्के हाच न्याय असतो व ज्याला आपण गुणवंत आहोत असे वाटते त्याने सरळ बाहेरची वाट धरावी हा शिरस्ता असतो ! तुम्ही काम करा , करू नका, पाट्या टाका, ठरलेल्या तारखेला तुम्हाला वेतनवाढ मिळणार असतेच. पण तरीही काही महाभाग असतात की ज्यांना काही वेगळे करायची खुमखुमी असते, सरकारी यंत्रणेत खपून सुद्धा त्यांचा वरचा मजला रीकामा नसतो ! आपल्याला सरकार एवढा पगार देते आहे त्यामानाने थोडे काम केले पाहिजे या भावनेने पछाडलेले काही असतात. असाच एक अभियंता आमच्या रूग्णालयाच्या विद्युत उपकरणांची निगराणी करायला होता. रूग्णालयाच्या वापराच्या मानाने येणारे वीजेचे बिल खूपच आहे हे वरीष्ठांना पटवून द्यायचा त्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यावर या पठ्ठ्याने स्वत:च आगावूपणा करून एक प्रणाली विकसित केली व बिनखर्चात राबविली सुद्धा ! आणि काय चमत्कार, रूग्णालयाच्या विजेच्या बिलात दर महीना लाखाची बचत झाली ! वरीष्ठांनी कितीही दडपायचे म्हटले तरीही ही खवर त्या विभागाच्या प्रमुखापर्यंत पोचली व त्याने ती उपाध्यक्षांच्या कानावर घातली. उपाध्यक्षांनी लगेच रूग्णालयाला भेटा देवून सर्व पाहणी केली, मागची बिले बघून बचत झाल्याचे मान्य केले व हा उपक्रम राबविणार्या अभियंत्याचे जाहीर कौतुकही केले. एवढेच नाही, त्याला चक्क पाच हजाराचे इनाम घोषित केले !


विभागप्रमुखानी लगेच तसा प्रस्ताव उपाध्यक्षांच्या कार्यालयाला सादर केला. उपाध्यक्षांनी तो लगोलग वित्त विभागाकडे सत्वर कारवाईसाठी धाडला. वित्त विभागाच्या प्रमुखानी सविनय उपाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले की नियमाप्रमाणे ते फक्त एक हजाराचेच बक्षिस देवू शकतात ! उपाध्यक्ष भडकले ! माझा शब्द म्हणजे शब्द ! ते काही नाही, विश्वस्त मंडळाच्या आगामी मासिक बैठकित त्वरीत ही मर्यादा वाढवायचा प्रस्ताव संमत करून घेण्याचे त्यांनी सचिवांना आदेश दिले ! त्या प्रमाणे प्रस्ताव रीतसर पारीत झाला, अर्थात या काळात निदान चार महीने तरी गेले ! या काळात पोटदुखीने हैराण झालेले अनेक जण कामाला लागले होतेच. त्या अभियंत्याला बक्षिस मिळू नये म्हणून जोरदार आघाडी उघडली गेली. निनावी तक्रारींचा भडीमार सुरू झाला. होत असलेल्या वेळकाढू पणाने तो अभियंता सुद्धा ढेपाळला. त्यातच त्याचा कोणी जाणकाराने बुद्धीभेद केला ! मर्यादा वाढणे कठीण आहे, बरे, जरी वाढली तरी ती पुर्वलक्षी प्रभावाने मिळणार नाही. त्या पेक्षा तू वेतनवाढ माग ! एरवी तू दोन वर्षात निवृत्त होणारच आहेस, यात तुझा जास्त फायदा आहे, पेन्शन जास्त बसेल. त्या अभियंत्याने रोख बक्षिस नको मला वेतनवाढच द्या असा विनंती अर्ज सादर केला. विरोधी कंपूने वित्त विभागात फिल्डींग लावलेलीच होती. वित्त विभागाने बक्षिसावर जोवर निर्णय होत नाही तोवर या अर्जावर कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी भूमिका घेतली.


नंतरच्या काळात काही विघ्नसंतोशी थेट उपाध्यक्षांच्या कानाला लागले. उपाध्यक्षांचे मत प्रतिकूल झाल्यावर बक्षिसाची फाइल अडगळीत पडली ! दोन वर्षे अशीच गेली. बिचारा तो अभियंता निवृत्त सुद्धा झाला. अर्थात जाहीर झालेले बक्षिस मिळणार नसेल तर निदान वेतनवाढ तरी द्या अशी लिखापढी त्याने चालू केली. अर्थात तो नोकरीत असताना त्याला पुरून उरलेले त्याला निवृत्त झाल्यावर थोडेच भीक घालणार होते ? त्याच्या सर्व अर्जाना फाइल केले गेले ( केराची टोपली असे वाचा !).


यथाकाल उपाध्यक्षांची टर्म संपली. नवी नेमणूक निदान तीन तरी महीने होणार नव्हती ! उपाध्यक्षांची सर्व कामे या काळात अध्यक्षच बघणार होते. निवृत्त झालेला कर्मचारी त्याला घोषित झालेली इनामाची रक्कम मिळण्यासाठी पायपीट करीत आहे हे आम्हाला सुद्धा पटत नव्हते. त्याचा हक्क त्याला मिळवून द्यायचा आम्ही चंग बांधला. आमच्या प्रेरणेने तो अभियंता परत नव्या उमेदीने कामाला लागला. आपल्या विभागप्रमुखांना या प्रकरणाची तड लावायची त्याने अर्जी केली व विभागप्रमुखांनीसुद्धा या प्रकरणाचा एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लागावा असे साकडे अध्यक्षांना घातले. अर्थात त्याच्या आधी उपाध्यक्ष कार्यालयात दोन वर्षे अडगळीत पडलेली फाइल आम्हाला शोधायला लागली. विभागप्रमुखानी अथ पासून इति पर्यंत सर्व हकीगत बयान केली होती व अंतिम निर्णय अध्यक्षांनी घ्यावा असे सूचविले होते. अध्यक्ष मानवतावादी दृष्टीकोन ठेवून त्या अभियंत्याला न्याय मिळवून देतील अशी त्यांना सुद्धा खात्री वाटत होती.


सहीला आत गेलेली फाइल बाहेर येताच मी तिच्यावर झडपच घातली. सायबाचा शेरा नजरेखालून घालून निराशपणे मी ती फाइल माझ्या सिनीयर सहकार्यांना दाखविली. “वा वा, याला म्हणतात खरा प्रशासक, कसे एक घाव दोन तूकडे केले की नाही आपल्या साहेबांनी ? उगाच भावनिक-बिवनिक न बनता सरळ शेरा मारला आहे “Reward can’t become right …..File “! तुम्ही उगीच त्या अभियंत्याला खोटी आशा दाखविलीत ! माझ्या सहकार्यांनी माझ्यावरच टोलेबाजी सुरू केली ! मला काही हे अजिबात पटले नाही ! बक्षिस मागितले गेले नव्हते, दिले गेले होते हा मुद्दा इथे लक्षात घेतलाच गेला नव्हता. त्या साठी मर्यादा वाढविणारा प्रस्ताव सुद्धा विश्वस्तांच्या बैठकीत पास झाला होता ! त्यानंतर अनेकांनी पाच हजाराची बक्षिसे घेतली सुद्धा होती ! आणि एकदा उच्चपदस्थ व्यक्तीने जाहीर केलेले बक्षिस देणे हे खरे तर प्रशासनाचे कर्त्वव्य आहे, यात भावनेचा प्रश्न येतोच कोठे ? याचा पाठपुरावा करण्यात त्या अभियंत्याची चूक तरी कशी ? तो आपल्या हक्कासाठीच भांडत होता, मिळालेले बक्षिस मिळावे, बक्षिस मिळावे म्हणून नव्हे ! खरेतर झाली चूक मोठ्या मनाने कबूल करून, उशीर झाल्याबद्दल माफी मागून त्या अभियंत्याला आपल्या दालनात बोलवून सन्मानाने बक्षिस / प्रमाणपत्र दिले गेले असते तर प्रशासनाची शान नक्कीच वाढली असती --- पण लक्षात कोण घेतो ?



अर्थात झाले हे बरेच झाले, मला सतत वाटायचे की आपण गोदीच्या संगणक विभागात एवढे चांगले काम केले, प्रशासनाचे लाख काय कोट्यावधी रूपये वाचविले, त्याची कोठेतरी प्रशासकीय पातळीवर कदर व्हायला हवी होती. या प्रकरणानंतर ती खंत मात्र माझ्या मनातुन कायमची गेली !

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

हो, देव आहे !

स्वत:ला नास्तिक, अनीश्वरवादी म्हणवणार्या विज्ञानाच्या प्राध्यापकांचे नवीन विद्यार्थीसाठीचे पहिलेच व्याख्यान असते. प्राध्यापक महाशय देव हा विज्ञानाच्या प्रसाराला कसा मारक ठरत आहे हे ठसवायच्या प्रयत्नात असतात. एका विद्यार्थाला ते उभे रहायची खूण करतात आणि त्या दोघात प्रश्नोत्तरे चालू होतात.

प्राध्यापक – तू देव आहे असे मानतोस का ?
विद्यार्थी – नि:संशय ! देव आहे !
प्राध्यापक – मग देव चांगला असतो का ?
विद्यार्थी – नक्कीच !
प्राध्यापक – देव सर्व शक्तीमान असतो का ?
विद्यार्थी – हो !
प्राध्यापक – माझा भाउ कर्करोगाने मेला, तो बिचारा देवाची प्रार्थना करीत होता. आपण सगळेच आजारी माणूस बरा व्हावा म्हणून काही प्रयत्न करीत असतोच. पण देव मात्र काहीच करीत नाही ! तरी तो चांगला ? काय ?
( यावर विद्यार्थी काहीच बोलत नाही )
प्राध्यापक – अरे तू काहीच का बोलत नाहीस ? परत विचारतो , देव चांगला असतो का ?
विद्यार्थी – होय !
प्राध्यापक – सैतान चांगला असतो का ?
विद्यार्थी – नाही.
प्राध्यापक – मग हा सैतान येतो तरी कोठून ?
विद्यार्थी – देवानेच सैतान सुद्धा जन्माला घातला आहे.
प्राध्यापक – आता कसे अगदी बरोब्बर बोललास ! आता मला सांग की जगात पाप असे काही असते का ?
विद्यार्थी – हो.
प्राध्यापक – पाप सगळीकडे आहे, खरे ना ? आणि या सर्वाचा कर्ता-सवरता देवच आहे नाही का ?
विद्यार्थी – हो.
प्राध्यापक – मग आता सांग की पापाचा बाप कोण ?
( विद्यार्थी निरूत्तर )
प्राध्यापक – जगात आजार असतात का ? व्यभिचार ? द्वेष ? कुरूपता ? या सर्व गोष्टी जगात असतातच ना ? हो की नाही ?
विद्यार्थी – होय सर.
प्राध्यापक – मग हे सगळे कोणी केले ?
( विद्यार्थी निरूत्तर )
प्राध्यापक – विज्ञान सांगते की पंचेद्रीयाद्वारे आपल्याला आजुबाजूच्या गोष्टींची जाणीव होते. आता मला सांग की तू कधी देव बघितला आहेस का ?
विद्यार्थी – नाही सर.
प्राध्यापक – तू देवाचा आवाज तरी ऐकला आहेस का ?
विद्यार्थी – नाही सर.
प्राध्यापक – देव आहे अशी जाणीव तुला कधीतरी झाली आहे का ? त्याची चव म्हणा किंवा गंध किंवा स्पर्श तरी ?
विद्यार्थी – खरे आहे सर, मला अशी काहीही जाणीव झालेली नाही.
प्राध्यापक - तरीही देव आहे असे तुला वाटते ?
विद्यार्थी – हो !
प्राध्यापक – अनुभवजन्य, वस्तुस्थितीजन्य वा प्रत्यक्षप्रमाणाच्या आधारे शास्त्र म्हणते की देव अस्तित्वात नाही. तुला यावर काय म्हणायचे आहे ?
विद्यार्थी – काहीही नाही, पण तरीही देव आहे अशी माझी श्रद्धा आहे.
प्राध्यापक – खरे आहे ! श्रद्धा, विश्वास ! आणि हीच तर शास्त्राच्या मार्गातली धोंड आहे !
विद्यार्थी – सर, उष्णता असे काही असते का ?
प्राध्यापक – हो.
विद्यार्थी – मग थंड असे काही असते का ?
प्राध्यापक – हो.
विद्यार्थी – नाही सर. थंड असे काहीही नसते !
( एवढा वेळ प्राध्यापक प्रश्न विचारीत असतात आणि विद्यार्थी बचावात्मक भूमिकेत असतो ! आता प्रथमच विद्यार्थी प्राध्यापकाच्या प्रतिपादनाला आवाहन देतो ! या नाट्यमय कलाटणीने वर्ग स्तब्ध होतो.)
विद्यार्थी – सर, तुमच्या शास्त्रात भरपूर उष्णता आहे, अती उष्णता सुद्धा आहे, अगदी प्रचंड उष्णता सुद्धा आहे. तशीच कमी उष्णता व उष्णतेचा अभाव सुद्धा आहे.
पण थंड असे काही नाही. आपण उणे 458 एवढी उष्णता मोजू शकतो, या पुढे मोजू शकत नाही. पण थंड असे मात्र काहीही नाही. उष्णतेच्या अभावाला आपण ढोबळपणे थंड असे म्हणतो.थंड असे काही आपण मोजू शकत नाही. उष्णता म्हणजेच उर्जा. थंड म्हणजे उष्णतेच्या विरूद्ध स्थिती नव्हे, तर उष्णतेचा अभाव.
(आता वर्गात टाचणी पडेल तरी आवाज घुमेल एवढी शांतता.)
प्राध्यापक – मान्य. मग याच मताने मग अंधार नसेल तर रात्र तरी कशी असेल ?
विद्यार्थी – सर, तुम्ही परत चूकता आहात. अंधार म्हणजे कशाचा तरी अभावच ! जसे कमी प्रकाश, साधारण प्रकाश , प्रखर प्रकाश, विजेचा प्रकाश – प्रकाश नाही अशी सतत स्थिती असल्यास तुम्ही तिला अंधार आहे असे म्हणता ! हो ना ? तेव्हा प्रत्यक्षात काळोख असे काही नाहीच. तसे काही खरेच असते तर अंधार तुम्हाला अधिक गहीरा करता आला असता. आला असता ना करता ?
प्राध्यापक – तुला नक्की म्हणायचे तरी काय आहे ?
विद्यार्थी – मला म्हणायचे आहे की तुमचे पदार्थ विज्ञानाचे सिद्धांत हेच एक थोतांड आहे !
प्राध्यापक – थोतांड ? ते कसे काय बुवा ?
विद्यार्थी – तुम्ही द्वैतवाद हा सिद्धांत मानता. तुमचे असे म्हणणे आहे की जीवन आहे तसाच मृत्यूही आहे. देव चांगला असेल तर वाईटही असतोच. तुम्ही देव ही कल्पना वस्तूप्रमाणे मोजू पाहता. सर, शास्त्राला अजून विचार म्हणजे काय ते ही सांगता आलेले नाही. तुम्ही शास्त्रात विद्युत आणि चुंबकिय शक्तींचा वापर करता पण ती तरी कोणी कधी बघितली आहे ? त्याचे तरी तुम्हाला कोठे धड आकलन झाले आहे ? तुम्ही जन्म आणि मरण एकमेकांच्या विरूद्ध समजता तेव्हा तुम्ही मरणाचा वेगळा पुरावा देवू शकत नाही या सत्याकडे डोळेझाक करता ! मरण म्हणजे जगण्याच्या विरूद्ध स्थिती नाही तर जिवंतपणाचा अभाव म्हणजे मरण !
सर, आता मला जरा सांगा की तुम्ही विद्यार्थांना डार्विनचा उत्क्रांदीवाद, माकडापासून माणूस झाला, असे शिकविता ना ?
प्राध्यापक – तुला जर नैसर्गिक उत्क्रांतीवाद असे म्हणायचे असेल तर होच मुळी , मी हेच शिकवितो.
विद्यार्थी – मग ही जी काही उत्क्रांतीवादाची प्रक्रीया, माकडाचे माणूस होणे, तुम्ही कधी आपल्या डोळ्याने बघितली आहे का ?
(प्राध्यापक नुसतेच हसून मानेने नकार देतात, त्यांना आता हा वाद कोठे जाणार हे लक्षात येते )
विद्यार्थी – उत्क्रांतीवादाची प्रक्रीया कोणी बघितली नाही, यात सातत्य आहे असेही कोणी सिद्ध करू शकत नाही तर मग सर तुम्ही तुमचे मत मुलांवर लादत आहात असे म्हणायचे का ? मग तुम्ही शास्त्रज्ञ आहात की धर्मगुरू ?
(वर्गात एकच खळबळ माजते )
विद्यार्थी – या वर्गातल्या कोणीतरी प्राध्यापकांचा मेंदू बघितला आहे का ?
( सगळा वर्ग हास्य कल्लोळात बुडून जातो )
विद्यार्थी – असा कोणीतरी आहे का जी ज्याने यांचा मेंदू ऐकला, अनुभवला, त्याला स्पर्श केला, त्याचा गंध घेतला ? कोणीही नाही. मग अनुभवजन्य, वस्तुस्थितीजन्य वा प्रत्यक्षप्रमाणाच्या आधारे शास्त्र म्हणते की तुम्हाला मेंदूच नाही ! सर, तुमच्या विषयी पुर्ण आदर ठेवून विचारतो की मग तुमच्या शिकविण्यावर आम्ही विश्वास का ठेवायचा ?
( वर्ग एकदम शांत. प्राध्यापक त्या विद्यार्थाकडे एकटक पाहत आहे, त्यांचा चेहरा भंजाळलेला. )
प्राध्यापक – मला वाटते की या विश्वासाच्या गोष्टी आहेत.
विद्यार्थी – अगदी बरोबर सर – विश्वास हाच देव व माणूस यातला दुवा आहे. विश्वासावरच जग चालले आहे, हा विश्वासच चराचरांना प्रेरणा देतो, जीवन देतो !

(टीप – हा इंग्रजी संवाद कोणीतरी खूप वर्षापुर्वी मला फॉरवर्ड केला होता, पण काही महीन्यापुर्वी मात्र आलेल्या इमेलमध्ये हाच संवाद प्रत्यक्ष वर्गात घडला असल्याची व तो विद्यार्थी दूसरा तिसरा कोणी नसून एपीजे अब्दूल कलाम आझाद असल्याची पुस्ती जोडली आहे. माझ्या माहीतीप्रमाणे हे खरे नसावे. कोणी यावर अधिक प्रकाश टाकू शकेल का ? )

जेते आणि पराभूत – मनोवृत्तीतला नेमका फरक !

1. विजेते उत्तरावर लक्ष केंदीत करतात तर पराभूत समस्येवर !
2. विजेते दोष स्वीकारतात तर पराभूत झालेले दोषारोप करत सूटतात !
3. विजेत्यांना संकट हीच संधी वाटते तर पराभूत संकटांची रडकथा सांगत बसतात !
4. जेत्यांना भविष्यात जगायला व भूतकाळातून शिकायला आवडते तर हरलेले भूतकाळाच्याच आठवणीत रमलेले असतात !
5. जेते वचनाला जागतात, पक्के असतात तर पराभूत बोल-बचन !
6. जेते असाध्य ते साध्य करायचा प्रयास करीत असतात तर पराभूत कारणे शोधत बसतात !
7. जेते नेहमीच व्यक्तीमत्व विकासाला प्राधान्य देतात तर पराभूतांना त्याला महत्व द्यावे असे वाटतच नाही !
8. जेते संकटाला शिंगावर घेतात व भिरकावून देतात पराभूत मात्र संकटाच्या चाहुलीनेच अर्धमेले होतात !
9. जेत्यांच्या आकांशापुढे गगन ठेंगणे असते, पराभूत मात्र डबक्यातच सुखी असतात !
10. जेते सतत काही सकारात्मक करण्यात मग्न असतात तर पराभूत कृतीशून्य असतात !
11. जेते अपयशसुद्धा पचवतात, त्यातुन शिकतात, पराभूत मात्र अपयशी होण्याचा भयगंड सतत बाळगून असतात !
12. ध्येय साध्य करण्यासाठी जेते अनेक युक्त्या-प्रयुक्त्या योजतात तर पराभूत मात्र घसीटे-पसीटे मार्ग चोखाळून वेगळ्या परीणामाची अजब अपेक्षा बाळगतात !
13. जेते आपले उद्दीष्टे ठरवितात , पराभूतांपुढे कसले उद्दीष्टच नसते !
14. जेते नियोजन करतात तर पराभूत नियोजन शून्य असतात !
15. जेते म्हणतात की शिकणे ही कधीही न संपणारी प्रोसेस आहे तर पराभूत मात्र अर्धवट ज्ञानातच धन्यता मानतात !
16. जेते नम्र असतात तर पराभूतांना अहंगंड असतो !
17. जेते रोजच्या रोज आपले काम अजून कुशलतापुर्वक करायला बघतात तर पराभूत अल्प संतूष्ट असतात !
18. जेते कष्टाळू असतात तर पराभूत कष्ट टाळू !
19. जेते एकदा एखादी जबाबदारी घेतेली की त्यात तन मन धन झोकून देतात तर पराभूत मात्र धरसोड वृत्तीचे असतात !
20. जेते सातत्याने व नैतिकता पाळून आपले ध्येय साध्य करतात तर पराभूत पहिल्या अडथळ्यालाच काढता पाय घेतात !
21. जेत्यांना वेळेचे योग्य नियोजन जमते व आपल्या धेयपुर्तीसाठी ते वेळ देऊ शकतात, पराभूतांना वेळेचे नियोजन जमत नाही व नको त्या गोष्टीत ते वेळ वाया घालवित असतात.

22. जेते जागेपणी स्वप्ने बघतात तर पराभूतांना मात्र स्वप्नातच जगायला आवडते !
23. जेते शक्यतांचा विचार करतात तर पराभूत अशक्य काय ते बघून काम टाळतात !
24. जेते नि:शंक असतात तर पराभूत शंकासूर !
25. जेते आपले भाग्य विधाते असतात तर पराभूत भाग्यवश !
26. जेते आपल्याला जेवढे मिळते त्याहुन जास्त देतात, पराभूत मात्र सतत आशाळभूत असतात !
27. पब्लिक जर योग्य मार्गाने जात नसेल तर जेते आपला वेगळा मार्ग निवडतात, पराभूत समूहाबरोबर फरफटले जातात !
28. जेते विचार करून नेतृत्व स्वीकारतात तर पराभूत त्या पेक्षा गुमामगिरी पत्करतात !
29. जेते उत्तम श्रोते असतात, पराभूत दूसर्याला बोलूच देत नाहीत !
30. एकच काम अनेक प्रकारे करायचे कसे हे जेत्यांना माहीत असते तर पराभूत धोपट मार्गाला सोडत नाहीत !
31. विविध प्रकारे आपले ज्ञान जेते अद्ययावत ठेवत असतात त्या करीता पैसे गुंतवितात, पराभूतांना मात्र हा खर्च उधळपट्टी वाटते व छानछोकीच्या वस्तूंवर पैसा उधळून ते खोटी प्रतिष्ठा मिळवू पाहतात !
32. जेते दूसर्यांना जिंकायला मदतीचा हात पुढे करतात, पराभूताला स्वार्थापुढे दूसरा कोणी दिसतच नाही !
33. जेते समविचारी माणसांना मित्र बनवून समूहाचा विकास साधतात तर पराभूत मात्र आपल्या सारख्याच लोकांचा कंपू बनवून एकमेकांच्या पायात पाय घालत राहतात !

नात्यांचा गुंता – अमेरिकन इश्टायल !

एक भारतीय तरूण संगणक अभियंता एका बारमध्ये मद्याचे पेल्यावर पेले रिचवत असतो. एक अमेरिकन त्याचे पिणे बघून काळजीत पडतो. अर्थात तो सुद्धा लास झालेलाच असतो. भारतीय तरूणाला तो त्याचा गम आपल्याशी बोलून हलका करायला सांगतो. बांध फूटल्यासारखा भारतीय तरूण आपली ष्टोरी त्याला सांगतो. त्याच्या आई-वडीलांनी भारतात त्याचे लग्न एका सो कॉल्ड खानदानी मुलीशी ठरविलेले असते. अर्थात यात त्या तरूणाची संमती घ्यायचा प्रश्न येतोच कोठे ? त्यांनी परस्पर मुहुर्त काढून त्याला थेट लग्नालाच बोलाविलेले असते. त्याने आपल्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करणार असे सांगताच मोठा ड्रामा होतो, आम्ही ठरविलेल्या मुलीशी लग्न न केल्यास खानदानची इज्जत जाइल व मग आमची अर्थीच उचलायला तुला यावे लागेल अशी फिल्मी डायलॉगबाजी सुद्धा होते. ज्या मुलीला कधी बघितले सुद्धा नाही त्या मुलीशी लग्न करायला भारतीय तरूण अजिबात तयार नसतो पण आई-वडीलांच्या विरोधात जायची धमक तरी त्याच्यात कोठे असते ! भारतीय विवाह पद्धती कशी व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करते हे तो त्या अमेरिकेनला अगदी पोट तिडीकीने सांगत असतो. अमेरिकेतले मोकळे ढाकळे वातावरण , प्रेमात कोणाचीही आडकाठी नसणे, डेटींग, झट मंगनी, पट शादी , तितक्याच झटकन घटस्फोट याचे तो अगदी तोंडभरून कौतुक करीत असतो. प्रेम विवाह हीच विवाहाची आदर्श पद्धत आहे हे तो अगदी ठासून सांगतो.


तुला आमची संस्कृती एवढी आवडते ? अमेरिकन त्याला विचारतो. आता अमेरिकन तरूण त्याला आपली ष्टोरी सांगू लागतो. त्याने एका प्रौढ विधवेबरोबर 3 वर्षे संबंध ठेवून, अगदी आपण मेड फॉर इच अदर असल्याची खात्री पटल्यावर लग्न केलेले असते. त्याला घरचा विरोध बिरोध काही होत नाही हे कळल्यावर भारतीय तरूण परत अमेरिकन संस्कृतीचा उदो उदो करतो ! अमेरिकेन त्याचे बोलणे पुढे चालू करतो. काही वर्षानी त्याचे वडील त्याच्या सावत्र मुलीच्या अर्थात त्याच्या बायकोच्या मुलीच्या प्रेमात पडतात ! अर्थात यथासांग कोणताही विरोध न होता त्यांचेही लग्न होते ! या नाते संबंधामधून त्याचे वडील त्याचे जावई होतात तर तो वडीलांचा जावई होतो ! आता कायद्याने त्या अमेरिकनाची मुलगी (सावत्र ) त्याची आई होते आणि बायको तर चक्क त्याची आजी ठरते ! पुढे त्याला मुलगा झाल्यावर अजून धमाल होते ! त्याचा मुलगा होतो त्याच्या वडीलांचा भाउ व अर्थात त्याचा काका ! भारतीय तरूणाच्या डोळ्यासमोर या नात्यांच्या गुंत्यामुळे काजवे चमकू लागलेले असतानाच अमेरिकन कथा पुढे सुरू करतो. खरा गुंता होतो त्याच्या वडीलांना मुलगा होतो तेव्हा ! आता वडीलांना झालेला मुलगा त्याचा भाउ सुद्धा असतो तसेच नातु सुद्धा ! म्हणजे तो आता एकाच वेळी आजोबा सुद्धा असतो आणि नातु सुद्धा ! आता बोला ! काय कप्पाळ बोलणार भारतीय तरूण ? तो लगोलग इंड्यात फोन करून लग्नाला तयार असल्याचे कळ्वून टाकतो !

शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

मन:शांती मिळविण्याची 10 तत्वे.

1) दूसर्याच्या भानगडीत नाक खूपसू नका.
अनेकदा आपण दूसर्यांच्या भानगडीत वरचेवर नाक खुपसून स्वत:च गोत्यात येत असतो. अर्थात याला कारण असते “माझा मार्गच बरोबर आहे , माझ्या विचाराची दिशाच योग्य आहे आणि जे याच्याशी सहमत नाहीत त्यांच्या गळी आपले म्हणणे कसेही करून उतरवले पाहिजे” ही विचारसरणी. ही विचारसरणी दूसर्या व्यक्तीचे अस्तित्वच अमान्य करते, तसेच देवाच्या अस्तित्वालाच आव्हान देते. दैवत:च प्रत्येक व्यक्तीची जडणघडण वेगळी आहे, दोन माणसे एकच विचार किंवा कृती करतील असे होत नाही. देवाने जशी बुद्धी दिली आहे तसा प्रत्येकजण विचार करीत असतो. आपले काम ध्यान देवून केले तरी खूप झाले !
2) क्षमा करा आणि विसरून जा !
मन:शांती मिळविण्याचे हे खूप प्रभावी तत्व आहे. आपला अपमान करणार्या वा आपल्याला दुखविणार्या व्यक्तीचा आपण आतून राग राग करीत राहतो, सूडभावना जोपासतो. यातुनच मग निद्रानाश, पोटाचे विकार, अति-रक्तदाब असे विकार जडतात. आपला अपमान तर एकदाच झालेला असतो पण सूडभावना धगधगत मात्र कायम राहते. सूडभावना सोडा. आयुष्यात करायच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत, सूडाने जळत राहून आपलेच आयुष्य का जाळायचे ? झाले गेले गंगेला मिळाले या उक्तीप्रमाणे वागा.
3) स्तुतीपुंजक बनू नका !
जगात सगळीकडे नुसता स्वार्थ भरलेला आहे. तोंडपुंजेपणा करणारे का कमी आहेत ? आज तुमची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणारे संधी मिळताच तुमच्यावर चिखलफेक करतील. तेव्हा मला मोठा म्हणा हा अट्टाहास का ? तुमच्या भोवती दिवे ओवाळणार्यांना जराही महत्व देवू नका. तुमचे काम नीतीची चाड न सोडता आणि प्रामाणिकपणे करीत रहा.

4) द्वेष करू नका !
द्वेष करणार्यांमुळे मनाची शांती कशी बिघडते याचा अनुभव प्रत्येकाने घेतला असेलच. असेही होते की कामात अधिक मेहनत घेवून सुद्धा बढती मात्र भलत्यालाच मिळते. धंद्यात सुद्धा आपला पुरेसा जम बसत नसताना नव्याने शिरकाव केलेला बस्तान बसवितो. असे अनेकदा होतच असते. यासाठी आपण द्वेषभावना जोपासायची का ? नाही. प्रत्येकाच्या कपाळावर सटवाईने जे लिहिले आहे ते होणारच आहे, ज्याला यश मिळाले ते त्याचे विधीलिखीत होते. विधीलिखीत टळू शकत नाही, कोणी ते बदलू शकत नाही किंवा त्यापासून कोणी पळू शकत नाही. तुमच्या नशिबात एखादी गोष्ट नाही त्याला दूसर्याला दोष देण्यात काय हशील ? द्वेष करून काहीही साध्य होणार नाही उलट त्या आगीत तुमच्या मनाची शांतीच राख होवून जाईल.

5) प्रवाहाबरोबर चाला.
तुम्ही एकटे प्रवाहाची दिशा नक्कीच बदलू शकणार नाही. यात बुडायची शक्यताच जास्त. त्यापेक्षा प्रवाहाबरोबर गेल्यास तुम्हाला अकस्मात प्रवाहाबरोबर जुळवून घेता घेताच आगळ्या एकात्मतेची प्रचीती येइल.

6) संकटांचा धैर्याने मुकाबला करा.
प्रत्येक अपयश ही पुढील यशाची पायरी असते. दर दिवशी आपण अनेक अडथळ्यांचा, व्याधींचा, उद्रेकाचा, अपघातांचा सामना करीतच असतो. यावर जेव्हा काही उपाय सापडत नसतो तेव्हा काही वेळ संकटांशी जुळवुळ घ्यायला शिका. या सगळ्यांना खंबीरपणे तोंड द्या. संकटांसमोर शरणागती पत्करून उमेद जगण्याची हरवून बसू नका. स्वत:वर विश्वास ठेवा. धैर्य, आंतरीक शक्ती आणि दांडगी इच्छाशक्तीच तुम्हाला विजयाप्रत नेइल.

7) अंथरूण पांघरून हातपाय पसरा.
ही म्हण खरेतर कायमच लक्षात ठेवायला हवी. आपण आपली क्षमता न ओळखता खोट्या मोठेपणासाठी नको ती जबाबदारी डोक्यावर घेत असतो. याने आपला अहंकार कुरवाळला जातो. आपल्या मर्यादा ओळखायला शिका. नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था का करून घ्यायची ? भौतिकसुखाच्या मागे लागल्यास मन:शांती कधीही मिळणार नाही.भौतिक सुखाच्या मृगजळामागे न धावता तो वेळ प्रार्थनेला द्या, स्वत:च्या आत डोकावून बघा, ध्यान करा. याने तुमचे चित्त टाळ्यावर येइल. निर्मळ मन तुम्हाला अधिक मानसिक समाधान देइल.

8) नित्यनेमाने ध्यानधारणा करा.
ध्यानाने मन शांत होते व अस्वस्थ करणार्या विचारांपासून तुमची सूटका होते. यातुन तुम्ही परमशांती प्राप्त करू शकता.प्रामाणिकपणे रोज अर्धा तास जरी ध्यान केले तरी बाकी साडेतेवीस तास तुमचे मन प्रसन्न राहील. या ना त्या कारणाने ढळणारा मनाचा तोल सावरेल. ध्यानाचा वेळ थोडा थोडा वाढवित नेल्यास अधिक समाधान मिळेल. तुम्हाला असे वाटणे स्वाभाविक आहे की ध्यानधारण करीत बसल्यास बाकीची कामे रेंगाळतील. पण या उलट तुमची कार्यक्षमता वाढून तुमची सर्व कामे अधिक कुशलतेने तुम्ही कमी वेळात करू शकाल.

9) मनाला कोठेतरी गुंतवून ठेवा.
इंग्रजीत “An Empty Mind is Devil’s Workshop” असे म्हणतात. रिकाम्या मनात जगातले सगळे वाईट विचार येतात. मन चिंती ते वैरी न चिंती. काहीतरी सकारात्मक, विधायक कार्य करण्यात मनाला गुंतवून ठेवा.एखादा छंद जोपासा. तुम्हाला आवडणारे काहीतरी करा. पैसा की समाधान यात तुम्हाला काय जास्त प्रिय ते एकदा ठरवा.तुम्ही जोपासलेला छंद किंवा समाजसेवा, देवाधर्माचे काम यातुन तुम्हाला पैसा मिळेलच असे नाही पण भरून पावल्याचे , काही केल्याचे समाधान मात्र नक्कीच मिळेल.अगदी शरीर थकल्याने विश्रांती घेत असाल तेव्हा सुद्धा काही चांगले वाचा नाहीतर नामस्मरण तरी करा.

10) धरसोड वृत्ती सोडा , खंत करू नका.
“करू की नको” असा विचार करीत राहिल्यास कृती काही होणार नाही मात्र दिवस, आठवडे, महिने, वर्ष वाया जाइल व डोक्याला ताप मात्र होइल. नियतीने तुमच्या पुढ्यात काय वाढलेले आहे याचा थांगपत्ता तुम्हाला कधीही लागणार नाही. तेव्हा उगीच घोळ न घालता ज्या वेळी जे करणे योग्य आहे त्या वेळी ते करा. जरी अपयश आले तरी त्यातुनच तुम्हाला मार्ग सापडेल. डोक्याला हात लावून बसाल तर मात्र कार्यनाश होणार. तसेच भूतकाळातली मढी उरकू नका. जे झाले त्याची खंत बाळगू नका. जो हो गया सो हो गया ! तकदीर मे लिखा था वही हुवा ! कोळसा कितीही उगाळला तरी काळाच ! सकारात्मक दृष्टीकोन बाळगा !


Think ++ve !

रविवार, ८ ऑगस्ट, २०१०

बायकांना नक्की हवे तरी काय असते ?

तरूण , तडफदार सत्वशील राजाच्या राज्यावर परचक्र येते. शेजारी असलेला सम्राट दगा-फटका करून त्याला बंदी बनवतो. जेता सम्राट सत्वशीलाला ठारच मारणार असतो पण त्याच्या आदर्शवादाची छाप त्याच्यावर पडतेच ! तो त्याला एक वर्षाच्या आत, एका जटील प्रश्नाचे उत्तर शोधायला सांगतो व त्या बदल्यात त्याला अभय देवू करतो. अर्थात प्रश्नाचे उत्तर एका वर्षात न देता आल्यास मृत्यूदंड अटळ असतोच ! असतो तरी काय तो जटील प्रश्न ? बायकांना नक्की हवे तरी काय असते ?

भल्याभल्यांना या प्रश्नाचे उत्तर जन्मात सापडले नाही तिकडे तरूण सत्वशील राजा तरी काय करणार असतो ? पण दूसरा काही उपायच नसल्याने तो सम्राटाचा प्रस्ताव मान्य करतो. आपल्या राज्यात परतल्यावर तो भले भले विद्वान आणतो, सगळ्या स्तरातील लोकांना या समस्येचे आकलन करण्याचे आवाहन करतो, पण कोणालाच समाधानकारक उत्तर देता येत नाही. असेच त्याला कोणीतरी सुचवते की त्याच्याच राज्यात एक चेटकीण आहे व ती या प्रश्नाचे उत्तर चूटकीसरशी देइल – पण – पण मोबदला मात्र ती अवाच्या-सव्वा मागते, कधी कधी तिची मागणी अगदी विक्षिप्तपणाची सुद्धा असते ! आधी राजा या भानगडीत न पडण्याचे ठरवितो पण जेव्हा दिवसा मागुन दिवस जात वर्ष संपण्यास एकच दिवस बाकी राहतो तेव्हा मात्र त्याला नाइलाजाने उत्तरासाठी त्या चेटकीणीकडे जावेच लागते.

चेटकीणीकडे या समस्येचे उत्तर तयारच असते पण त्या पुर्वी राजाकडून तिला एक वचन हवे असते. राजाचा जिवलग मित्र धैर्यशीलाबरोबर तिला लग्न करायचे असते ! स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आपल्या मित्राचे आयुष्य बरबाद करण्याचा प्रस्ताव राजा धूडकावून लावतो पण स्वत: धैर्यशील मात्र “लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा जगो” या उक्तीप्रमाणे स्वत: चेटकीणीकडे जावून तिची अट मान्य असल्याचे सांगतो व उत्तर सांगायची विनंती करतो. चेटकीण सांगते , बायकांना हवे तरी काय असते ते - “तिला तिच्या पद्धतीने स्वत:चे जीवन जगायचे असते”. त्रिकालाबाधित सत्यच चेटकिणीने सांगितलेले असते व सर्वानाच ते मान्य होते, हो, अगदी त्या सम्राटाला सुद्धा व सत्वशील मुक्त होतो !

शब्दाला जागून सत्वशील राजा आपल्या मित्राचे, धैर्यशीलाचे लग्न चेटकीणीबरोबर अगदी थाटामाटात लावून देतो. लग्नाच्या पहिल्याच रात्री धैर्यशील धडधडत्या छातीने शयनगृहात शिरतो, चेटकीणीबरोबर लग्न, किती भयंकर प्रसंग ! पण शयनगृहात शिरताच त्याला आश्चर्याच धक्काच बसतो ! आत साक्षात अप्सरा भासावी अशी तरूणी पहुडलेली असते ! रंभा, मेनका, उर्वशी या तिघींचे एकत्रित सौंदर्य सुद्धा तिच्यापुढे फिकेच भासले असते ! हा प्रकार तरी काय आहे असा प्रश्न स्वाभाविकपणेच त्याला पडतो. यावर चेटकीणीचे उत्तर तयारच असते. “मी चेटकीण आहे हे माहित असूनही तू माझ्याशी लग्नाला तयार झालास म्हणून मी तुझ्यावर खुष आहे ! माझ्या मंत्रशक्तीने मी २४ तासात अर्धा वेळ अप्सरेच्या रूपात असेन व अर्धा वेळ चेटकीणीच्या. आता तू ठरव मी दिवसा वा रात्री तुला कोणत्या रूपात हवी ते ! अप्सरेच्या की चेटकेणीच्या ?” क्षणभर का होईना, धैर्यशील दुविधेत पडतो ! दिवसा , लोकात मिरविताना अप्सरा पण मग रात्रीच्या एकांतात मात्र चेटकीण ? का दिवसा सर्वांसमोर चेटकीणीसोबत रहायचे पण रात्री मात्र अप्सरेबरोबर स्वर्ग सुखाचे बेधुंद क्षण अनुभवायचे ?

धैर्यशीलाची उत्तर जाणून घेण्यापुर्वी …..

छोटासा ब्रेक –

तुम्ही जर पुरूष असाल तर काय निर्णय घ्याल ?

बायकांना सवाल , त्यांनी निवडलेल्या पुरूषाने कोणता निर्णय घेतलेला त्यांना आवडेल ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
काय ठरले ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
धैर्यशील खरेच हुषार होता. चेटकीणीने राजाला दिलेले उत्तर त्याच्या डोक्यात होतेच. त्याचे या प्रश्नाचे उत्तर तिच्यावरच सोडले. साहजिक आहे, स्त्रीला तिचे जीवन तिच्या मताने जगायची मोकळीक तर हवी असते ! प्रसन्न होवून चेटकीणीने आपण २४ तास अप्सरेच्या रूपात राहू असे जाहीर केले !

तात्पर्य काय तर ----
१) स्त्री कितीही सुंदर असेना का ? तिच्यात एक चेटकीण दडलेली असते !
२) तुम्ही जर तिला तिच्या मताने वागायची मुभा दिली नाहीत तर सगळा इस्कोट होणार.

तेव्हा एक तर “तिच्या मताने जगा” नाही तर “जगणे हराम” करून घ्या !

(मला आलेल्या इमेलचा अनुवाद )

बायकांची मर्जी कशी राखावी ?

अगदी सोप्पे आहे ! मित्रांनो, तुम्ही फक्त एवढेच करा,
१) तिचा मित्र बना
२) तिचा सहकारी बना
३) प्रेमळ बना.
४) तिचा भाउ बना.
५) तिचे पालक बना.
६) तिचे शिक्षक बना.
७) चांगला स्वयंपाक करायला शिका.
८) वायरींगचे जुजबी काम करायला शिका.
९) थोडेफार सुतारकाम सुद्धा जमले पाहिजे !
१०) थोडेफार प्लंबरचे काम सुद्धा जमले पाहिजे !
११) यंत्रज्ञ असाल तर बरेच आहे.
१२) सजावटकार व्हा.
१३) स्टायलिस्ट बना.
१४) स्रीरोग तज्ञ बना.
१५) मानसशास्त्रज्ञ व्हा
१६) उंदीर, झुरळ, पाली आदींचा नायनाट करता यायला हवा.
१७) मानसोपचार तज्ञ व्हा.
१८) दु:ख निवारक व्हा.
१९) उत्तम श्रोता बना.
२०) कुशल संघटक व्हा.
२१) चांगला बाप बना.
२२) स्वच्छता अंगी बाणवा.
२३) आपुलकीने वागा.
२४) शरीर दणकट हवे.
२५) उबदारपणा हवा.
२६) लक्ष वेधून घेता आले पाहिजे.
२७) शूर बना.
२८) बुद्धीमान बना.
२९) विनोदाचे इंद्रीय हवे.
३०) सर्जनशीलता हवी.
३१) हळूवारपणा हवा.
३२) कणखरपणा आवश्यक.
३३) समजूतदारपणा हवाच.
३४) क्षमाशील असा.
३५) हुशारी हवी.
३६) महत्वाकांक्षा हवी.
३७) काम करण्याची पात्रता हवी.
३८) धैर्यवान बना.
३९) निर्धार हवा.
४०) खरेपणा हवा.
४१) विश्वसनीयता हवी.
४२) भावनाप्रधान

आणि हे सगळे असलात तरी या गोष्टी विसरून चालणार नाही -
४३) तिचे कायम कौतुक करायला हवे.
४४) खरेदीत रस दाखविला पाहिजे.
४५) प्रामाणिकपणा हवा.
४६) खूप खूप पैसा हवा.
४७) तिला टेन्शन देवू नका.
४८) ( ती असताना तरी ) दूसर्या बायकांकडे बघू नका.

त्या बरोबरच हे सुद्धा मस्ट –
४९) तिची काळजी घ्या अर्थात तिच्याकडून अशी कोणतीही अपेक्षा न बाळगता.
५०) तिला भरपूर वेळ द्या – खासकरून तिच्या नटण्या-थटण्यासाठी.
५१) तिला पुर्ण मोकळीक द्या, ती कोठे जाते याची काळजी न करता.
….. आणि हो, हे सुद्धा अजिबात विसरू नका –
५२) वाढदिवस
५३) वार्षिक कार्यक्रम
५४) तिने आखलेले प्लान
फक्त ५४ बाबी लक्षात ठेवायच्या ! किती सोप्पे !!

या उलट पुरूषाला सुखी ठेवण्यासाठी बायकांना काय काय दिव्य करावे लागते ! बघाच –
१) शांतता राखा.
२) त्याच्या जीभेचे चोचले पुरवा.
३) रिमोट कंट्रोल त्याच्या जवळच राहू दे !

म्हणतात ना – कठीण कठीण कठीण किती पुरूष ह्रुदय बाई !
(मला आलेल्या एका इंग्रजी इमेलचा स्वैर अनुवाद )