शनिवार, २६ सप्टेंबर, २००९

…. तो येक मुर्ख !

समर्थांनी ३०० वर्षापुर्वी दासबोध या अलौकिक ग्रंथाचे रचना केली. याच ग्रंथात त्यांनी मुर्खांची यच्चयावत लक्षणे एका वेगळ्या समासात दिली आहेत. ती वाचून हसूही येते आणि अंतर्मुखही व्हायला होते. यात समर्थानी “दूसर्यास म्हणे मुर्ख तो येक मुर्ख” असे सुद्धा नमुद केले आहे. अर्थात त्याचा प्रत्यय सुद्धा अनेकांना आला असेल. एखाद्याचे करायला जावे भले तो म्हणते आपलेच खरे !

तसे आपण मुर्ख आहोत हे दाखविण्याची एकही संधी आपण सोडत नाही ! आधुनिक युगात तर आपल्याला आपला मुर्खपण पाजळण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. आता समर्थ नाहीत तेव्हा ही आधुनिक मुर्ख लक्षणे संकलित करण्यासाठी त्यांचा हा सेवक सिद्ध झाला आहे.

श्रोतेहो , ऐका …

इनकमिंग कॉलवर उदंड बोले

स्वत: मात्र मिसकॉल देइ

तो येक मुर्ख !

चकटफ़ूला भुले,फ़्री मिळता धावे

विकतचे दुखणे पदरी घे़ई …

उदंड जमवी क्रेडीट कार्ड,

लिमिट न बघता करी खरेदी

५% भरून वेळ मारून ने़ई

मग कर्जाच्या सापळ्यात सापडे …

सेकंदा सेकंदाला चॅनल बदली

मालिकांवर उदंड चर्चा करी

रिमोट असता आपुल्याच होती

कार्यक्रमांच्या नावाने खडे फोडी …

प्रवासाचे नियोजन न करी

रेल्वे आरक्षण कधीही न करी

सहलीत सदा ओझी वाही,

फ़ुका खरेदीतच मन रमवी ..

असता स्मार्ट कार्ड वा कुपन

तिकिटासाठी लावी लाइन ..

बिल वेळेवर न भरी

अकारण भुर्दंड भरी ..

जे जे असे ऑनलाइन

त्यासाठी लावी लाइन …

लोकशाहीवर आग पाखडे

लोकप्रतिनिधींना भ्रष्ट म्हणणे

स्वत: मतदानास बाहेर न पडे ..

उदंड मिळवी संपत्ति

परी मृत्यूपत्र न बनवि ..

लोकशाहीचे फ़ायदे उपटी

ठोकशाहीचे गुणगान गाई ..

जिन्यामध्ये सोसायटीवर बोले

वार्षिक सभेमध्ये मात्र गप्प बैसे ..

दूसर्यास सांगे खुर्ची सोडावी

स्वत: सीएसटी पर्यंत बसून राही ..

स्वत: काही करू शकत नसे

स्वत: काही करण्यास न धजे

दूसरा करी तेही न बघवे

पाय ओढे सदा दूसर्याचे ..

विज्ञान शाळेत शिकला

तरीही भोंदूना भूलला

चमत्कार दिसता धावला ..

पर्यावरणाच्या नावाने गळा काढी

स्वत: मात्र प्लास्टिक थैली वाही ..

कामधाम सोडून देवदर्शनाला धावी

किती तिष्ठलो रांगेत त्याची कथा ऐकवी ..

स्वत: असूनी अखंड भ्रष्ट

जो दूसर्यास म्हणी भ्रष्ट …

ऋण काढून करी जो सण

कर्ज फ़ेडण्यासाठी घे़ई ऋण ..

दामदुप्पटच्या अमिशाला भुले

मग सिस्टीमला लावी बोले ..

मुलांना शिकवि कॉन्वेंटमधे

मायभाषेत बोलण्यास लाजे

मग मराठी मेली म्हणून बोंबले ..

करार न करता घर भाड्याने दे़ई

खोली परत घेण्या कोर्टात जाई..

भावनेच्या भरात मित्रास राहीला तारण

वसूलीची येता नोटीस ,बोल काय कारण ?

लाउड-स्पिकरवर गाणे वाजवी,

शेजार्यां-पाजार्याचे डोके उठवी ..

नेट वापरता सारासार विचार न करी

जे जे फ़ूकट मिळे ते ते उतरवुन घे़ई ..

बहु असता फ़ूकट सॉफ़्टवेयर

पायरेटेड आवृत्ति वर दे़ई भर ..

स्वत: विकत पेपर नाही कधी घेतला

दूसर्याचा ओढून घेतसे फ़ूकट वाचायला ..

स्वत:चे घर ठेवी आरशासारखे लख्ख

सोसायटीच्या आवारातच मारी पिंक ..

नाही दिली कधी दूसर्याला लिफ़्ट

आपणास न मिळता म्हणे तो शिष्ट …

करण्या वटपोर्णिमेची पूजा, नाही मिळे स’वड’

विकतची फ़ांदी आणून, भागवते मनाची निकड …ती येक मुर्ख !

मनातच ठेवी विचार, न केला कधी उच्चार

सदैव कुढतचि राहीला, शंकेला घातला आवर

न रमला ऑर्कुटवर, न केला ब्लॉगचा वापर …

जय जय रघुवीर समर्थ !!

बुधवार, २३ सप्टेंबर, २००९

डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृति रूग्णालय, पनवेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची, जनकल्याण समिती (महाराष्ट्र ) हा प्रकल्प राबवित आहे.

स्व. डॉ. प्रभाकर पटवर्धन हे नामवंत शल्य-विशारद होतेच पण रायगडमधील एक हाडाचे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा होते. त्यांच्याच मृत्युपत्रानुसार त्यांच्या पत्नी नीलाताईंनी या रूग्णालयाची जबाबदारी, संघ परिवारातील, जनकल्याण समिती कडे सोपवली. समितीने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडल्याचे बघून दानशूर नीलाताईंनी सात वर्षानी हे रूग्णालय जमिनीसकट संस्थेला दान दिले आहे ! गेली ३५ वर्षे हे रूग्णालय गरींब व गरजू रूग्णांना वैद्यकिय मदर करत आहे. २२ डॉक्टर तिकडे अहोरात्र सेवा देत आहेत. आजतागायत ५०,००० रूग्णांना सेवा देणारे हे रूग्णालय आता कात टाकणार आहे. आहे त्याच जागी अत्याधुनिक सुविधांनी युक्त सुसज्ज चार मजली रूग्णालयाचे काम सुरू झाले आहे. यात ३५ खाटांचे रूग्णालय, सीटी स्कॅनची सुविधा, आयसीयु युनिट आणि वैद्यकिय संशोधन केंद्र सुद्धा असेल. साधारण ४.५ कोटी रूपयाचा हा प्रकल्प येत्या २ वर्षात लोकार्पित करायचा आहे. या प्रकल्प तुम्ही प्रत्यक्ष काम करू शकता. तसे शक्य नसल्यास इमारत निधी साठी देणगी देउ शकता, काही विशिष्ट उपचारांवर, जसे डायलिसीस, निधीला मदत करून हातभार लावू शकता. रूग्णालयाला उपयोगी पडेल अशी वस्तुरूप मदत सुद्धा करू शकता.

संस्थेचा पत्ता:

डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृति रूग्णालय,

१९६/१, डॉ. आंबेडकर रोड, पनवेल,

रायगड – ४१० २०६

फ़ोन नंबर – ०२२-२७४६ २८८२, २७४८०१७९

चेक किंवा ड्राफ़्ट या नावाने काढावा – “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती”

सर्व देणग्यांना आयकराच्या ८०जी कलमाखाली मिळणारी वजावट लागू

त्यासाठीचा एफ़.सी.आर.ए. नंबर – ०८३९३०३२१.

इंटरनेट द्वारे थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी;

1. Bank of India, Panvel Branch

A/c Name : R.S.S.J.K.S.Prabhakar Patwardhan Smruti Rugnalaya

A/c No. : 121210110001931

MICR No. : 400013110

2. Bank of Maharashtra, Panvel Branch

A/c Name : R.S.S.J.K.S.Prabhakar Patwardhan Smruti Rugnalaya

A/c No. : 20121787182

MICR No. : 400014117

वि.सू . २५,००० वा त्याहुन जास्त देणग्या देउ इच्छीणार्यांनी कृपया आधी संपर्क साधावा. त्यांना १०० % करमुक्त देणगीचा लाभ मिळू शकेल. मोठ्या देणगीदारांच्या काही अटी असतील तर त्यावर सुद्धा नक्की विचार केला जाईल.

धन्यवाद !

काही समाज सुहितार्थ कृती घडावी !

आपण सगळेच आपापल्या व्यवसायात अगदी आकंठ बुडालेले असतो. एवढे की कधी कधी प्रपंचाकडे सुद्धा आपल्याला पुरेसे लक्ष देता येत नाही. अशा स्थितीत समाजाकरता आपण काही तरी करावे ही रूखरूख अस्वस्थ करत असतेच ! समाजाचे आपण काही देणे निश्चित लागतो. ते फ़ेडायचे अनेक मार्ग आहेत. अनेक सामाजिक संस्था आपल्या कार्यकर्त्यामार्फ़त या कामात स्वत:ला झोकून देउन काम सुद्धा करत असतात. कधी तरी आपला या संस्थांशी संबंध येतो. त्यांच्या कामाचा आवाका बघून आपण नतमस्तक होतो. आपण या कामाला वेळ देउ शकत नाही याची खंत मग अधिकच बोचते !

सध्या खरी चणचण आहे ती झोकून देउन काम करणार्या कार्यकर्त्यांची. संघ परिवारातील अनेक संस्था या बाबतीत मात्र नशिबवान आहेत ! तळमळीच्या कार्यकर्त्यांची या संस्थाना कधी उणीव भासत नाही. या संस्थांनी अनेक दशके चांगले काम करून आपणा सर्वांचा विश्वास कमावला आहे. आपल्या कामाचा डंका पिटण्याची या संस्थांना सवय नाही व ते त्यांच्या तत्वात पण बसत नाही ! स्वत:हुन ते कधी तुमच्याकडे हात पसरणार नाहीत. पहिले आमचे काम बघा, आमच्या अमक्या प्रकल्पाला भेट द्या, मग तुमच तुम्हीच ठरवा काय ते ! असा त्यांचा खाक्या ! या संस्थाना पैसा कधी कमी पडत नाही तो या विश्वासापोटीच ! मागच्या वर्षी मी स्वत: उरणला वनवासी आश्रम संचालित एका आश्रम शाळेत गेलो होतो. निमित्त होते एका आदिवासी शाळेच्या नव्या वर्गाच्या उद्‌घाटनाचे ! जैन समाजाचे लोक बस भाड्याने करूनच तिकडे आले होते. प्रकल्प बघुन ते थक्कच झाले. काही नवीन प्रकल्प काही आहे का ? अशी विचारणा त्यांनी केली. संचालकांनी २० ते ३० लाख खर्च असलेल्या काही योजनांचा आढावा त्यांच्यापुढे मांडताच त्यांनी हा खर्च आम्ही करणार हे लगेच जाहिर करून टाकले ! त्यांनी बोलून दाखवले की तुमच्या बरोबर फ़ावडी-कुदळी घेउन काम करण्यात जास्त आनंद आहे पण ते आम्हाला व्यवसायामुळे शक्य नाही , पण चांगल्या कामाला पैसा कमी पडणार नाही याची आमच्याकडून हमी घ्या !

काही चांगले भावले की मी लगेच मित्रांपर्यंत तो विषय पोचवतो. काही अनिवासी मित्र मला अधूनमधून विचारत असतात, अमक्या तमक्याच्या स्मरणार्थ देणगी द्यायची आहे, कोठेही वाच्यता न करता , एखादी संस्था सूचव ! दान करण्यासाठी पैशाची श्रीमंती एक वेळ नसेल तरी चालेल , मनाची मात्र हवी ! मग अनेक फ़ालतु खर्च वाचवुन मदत करता येते. आपल्या वा आपल्या मुलांच्या वाढदिवसांचे आपण केवढे स्तोम वाजवतो, केवढा खर्च करतो ! हेच पैसे योग्य हाती पडले तर अनेकांच्या आयुष्यात सोनेरी पहाट उगवेल. हा विचार मी एकदा कामावर ऐकवला, झाली त्याला ५ वर्षे, माझी एक मैत्रीण तिच्या मुलीच्या वाढदिवसाला स्व. बाबा आमटे यांच्या “आनंदवन” या संस्थेला, देणगी देत आहे. मला सुद्धा हे माहित नव्हते ! कट्ट्यावरच्या एका मित्राने चॅट मार्फ़तच विचारले, अमक्या संस्थेला देणगी द्यायची आहे, पत्ता सांग ! मी लगेच “महार्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे” यांचा नंबर शोधून दिला. लगेच त्याने फ़ोनवरच संस्थेचा खाते नंबर घेउन इ-बँकिंगने पैसे जमा सुद्धा केले !

आपण केलेले दान , या हाताचे त्या हाताला सुद्धा कळता नये असे आपल्याकडे मानतात. त्या मागे काही कारणे असतीलही, पण आता त्याचा फ़ेरविचार करण्याची गरज आहे. चांगले काम लोकांपर्यंत पोचविण्यात गैर काय ? मी स्वत: मध्यमवर्गीय नोकरदार आहे. १९९३ साली साने गुरूजी स्मारकाचा एक कार्यकर्ता माझ्या घरी देणगीसाठी आला. माझ्या जडण घडणीत साने गुरूजींच्या लेखनाचा फ़ार मोठा वाटा आहे. ते ऋण अंशत: फेडण्याची ही संधी मी कशी बरे दवडली असती ? मदत केल्यावर मला काही तरी अजब , आगळे समाधान मिळाले. अनेक अनावश्यक खर्चाला फ़ाटा देउन मी दरवर्षी १०,००० रूपये दान करायचे हा संकल्पच सोडला. या निमित्ताने अनेक संस्थाची, त्यांच्या कामाची माहिती अनायसेच मिळत गेली. दहा वर्षात मी १,००,००० रूपयाहुन जास्तच , वेगवेगळ्या संस्थांना दान केले आहेत. मला कधीही काहीही कमी पडले नाही उलट कधी कधी तर “देता किती घेशील दो करांनी” असा अनुभव आला ! आज मलाच मी हे कसे करू शकलो याचे नवल वाटते. एकरकमी १ लाख तर मी स्वप्नातही देउ शकलो नसतो ! अर्थात याचे श्रेय माझ्या बायकोला सुद्धा आहेच, पण मुलांनी सुद्धा आम्हाला फ़टाके नको, वाढदिवस नको असे म्हणत माझ्या संकल्प सिद्धीस हातभार लावला ! गुजरात भूकंप, कारगिल निधी, आनंदवन, लांजा गावातील चाकरमान्यांची एक संस्था, विवेकानंद स्मारक , कन्याकुमारी, साने गुरूजी स्मारक, वनवासी कल्याण आश्रम, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, हिंगणे . ही त्यातल्या काही मान्यवर संस्थाची नावे !

याच सदराखाली मी तुम्हाला चांगले काम करणार्या सामाजिक संस्थांची माहिती देत जाईन, त्यांचे पत्ते देत जाईन. तुम्हाला योग्य वाटल्यास तुम्ही थेट अशा संस्थांना मदत करू शकता. अधिक माहिती घेउ शकता. यातल्या बहुतेक देणग्यांवर तुम्हाला करसवलत सुद्धा मिळेल. काही संस्थांचे प्रकल्प तर १०० % कर वजावट देणार्या योजनेतले आहेत. मदत चेक द्वारे, संबंधित संस्थेच्या नावाने चेक काढूनच करावी.

देणार्याने देत जावे

घेणार्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणार्याचे हात घ्यावे !

अहो , म्हणजे त्या हातांचा देण्याचा गुण घ्यावा !! बघा मग तुमची अवस्था सुद्धा;

देणार्याचे हात हजारो,

दुबळी माझी झोळी !

किंवा -

तुम एक पैसा दोगे,

वो दस लाख देगा !

… अशी होईल ! काय, मग ? अनुभवणार ना देण्यातला आनंद ?

सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

मराठी द्वेषाची गरळ ओकणार्या संजय निरूपमच्या पेकाटात लाथ घाला !

गेली अनेक दशके परप्रांतिय रोजी-रोटीसाठी मुंबईत, महाराष्ट्रात येत आहेत. या प्रदेशाचे लचके तोडत आहेत. एकही फ़ूटपाथ, मैदाने, मोकळी जागा यांच्या आक्रमणातुन सूटलेली नाही. यांचे व्यवसाय कायदेशीर नाहीत. जे काही करायचे ते कायदे तोडूनच असाच त्यांचा खाक्या ! प्रांत-भाषा भेदाच्या पलिकडे गेलेले आपले (?) शेक्युलर नेते मतपेटीवर डोळा ठेउन त्यांची बेकायदा बांधकामे १९८५, ९०, ९५, २००० आणि आता २००५ अशी कायदेशीर करत चालले आहेत. तुमच्या माझ्यासारखा आयुष्यभर घराचे हप्ते फ़ेडत झीजत-झीजत मरतो पण या परप्रांतियांना फ़ूकट घरे दिली जात आहेत. त्यात पण त्यांचा माज एवढा की आम्हाला अमूक एवढ्या फ़ूटाचीच घरे हवीत असे ते सरकारच्या छाताडावर बसून सांगतात व सरकार पण ते गुमान मान्य करते. गुजराती-मारवाडी निदान भांडी घासायला, दूकानात नोकर म्हणून तरी मराठी माणसे ठेवतात. यांचे मात्र १०० % आउटसोर्सिंग, युपी-बिहार मधून ! गुजराती-मारवाड्यांनी इथे काहीतरी सामाजिक कामे केली, शाळा, रूग्णालये, बगिचे उभारले, यांनी मात्र इथे नुसती गु-घाण केली, नाले तुंबवले, मुंबई बुडवली, इकडे कमावलेला प्रत्येक पैसा युपी-बिहारला पाठवला ! मुंबईवरून कधीकाळी मराठी-गुजराती भांडले असतील, पण तो आता इतिहास झाला ! आज मराठी टक्का अवघा २० पण भरणार नाही, गुजराती-मारवाडी जेमेतेम तेवढेच असतील पण युपी-बिहारी मात्र ३० ते ४० % आहेत. दक्षिणेतल्या अनेक राज्यांनी आर्थिक विकासामार्फ़त आपल्याच राज्यात रोजगार निर्मिती करून आपल्या प्रांतातुन जाणारे लोंढे थांबवले आहेत, उलट आज हजारोंच्या संख्येने मराठी संगणक अभियंते बंगलोर, हैदराबादला स्थायिक झाले आहेत. युपी-बिहार मात्र बकाल-भकास झाला आहे आणि तिथली जनता महाराष्ट्राचेच लचके तोडायला येत आहे. गझनीच्या आक्रमणापेक्षाही हे भयंकर आक्रमण आहे !

परवा मात्र संयमाचा कडेलोट व्हावा असेच घडले. शिवसेनेतुन फ़ुटून बाहेर पडलेला दळभद्री संजय निरूपम काँग्रेसच्या तिकिटावर मुंबईतुन निवडून आला आहे. विधानसभेचे जागा वाटप अंतिम स्वरूप घेत असतानाच याने गरळ ओकली आहे. तो म्हणतो की मुंबईत आम्ही ४० % आहोत , तेव्हा त्या प्रमाणात आम्हाला जागा मिळायलाच हव्यात ! गरीब-बापुडे म्हणून एखाद्या प्रदेशात लाचार होउन जायचे, तिकडे आधी आपले बस्तान बसवायचे, कोपराने खणून म़उ लागते असे दिसताच आपला कुटंब कबिला बोलवायचा, मग सगे-सोयरे गोळा करायचे, इथेल एकूण एक नियम पायदळी तुडवायचे, कोणी विरोधी आवाज काढला की आधी रडगाणे गायचे, मग घटनेतले १३ वे कलम दाखवायचे आणि मग दादागिरी चालू करायची ! आज यांना ४० % जागा हव्यात, उद्या मुख्यमंत्री पद मागतिल, परवा मराठीला दुय्यम भाषा ठरवून हिंदीला मखरात बसवतील, तेरवा महाराष्ट्राच्या बजेट मधून युपी-बिहारमधल्या पुतळ्यांसाठी अनुदान मागतील ! मुंबईसह महाराष्ट्र युपी-बिहारची बटीक व्हायला मग कितीसा वेळ लागेल ? शेवटी मुंबई केंद्रशासित करून युपी-बिहारसह महाराष्ट्राचे द्वैभाषिक सुद्धा होईल !

या बनारसी पानाच्या पिचकारीचे शिंतोडे उद्धव, राज यांच्यावरच नाही तर मुंढे-गडकरी, विलासराव, अशोकराव, आबा व दिल्लीत थेट सुशीलकुमार व ग्रेट मराठा सरदार शरद पवारांच्या अंगावर उडाले असतील . शिंतोड्याची एक गंमत असते. कोठे-कोठे ? मला तर काहीच दिसत नाही ! असे म्हणत त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येते नाहीतर पिचकारी मारणार्याचे थोबाड फ़ोडावे लागते, पेकाटात लाथ घालावी लागते ! पहिले खूपच सोपे आहे, दूसर्यासाठी मात्र हिंमत लागते ! स्वत:ला ग्रेट मराठा समजणार्यांच्यात ती आहे का ? मला तर वाटले होते की सर्व मराठी राजकारणी या एकाच मुद्दयावर पक्षभेद विसरून एकत्र येतील. संजय निरूपमच्या पेकाटात लाथ घालतील. आपली औकात ओळख म्हणून कान हग्या दम भरतील, सत्तेतला स जरी परत काढलात, वाटा मागितलात तर लोटासुद्धा ठेउन घेउन, गांडीवर लाथ मारून जिकडून आलात तिकडे हाकलू अशी एकमुखी तंबी देतील ! पण यातले काहीही झाले नाही. सगळे कसे शांत शांत !! सत्ता सुंदरीचे स्वप्न बघत सगळ्यांनीच पहाट झोपेचे सोंग घतलेले ! सत्तेसाठी लाचार झालेल्या माणसांकडून अर्थातच ही अपेक्षा नाही. तशी धरणे म्हणजे हिजड्याकडून अपत्याची अपेक्षा करण्यासारखेच आहे ! पण ज्यांनी मराठी माणसाच्या नावाने हातात शिवधनुष्य घेतले आहे त्यांची थोबाडे बंद का ? मराठीचे वेगळे दूकान उघडणार्यांनी सुद्धा तोंडात तोबरे धरले का बरे धरले आहेत ?

मला राजकारणातले काही समजत नाही पण एवढे मात्र कळते की हा एकमेव मुद्दा जर कोणी मराठीवादी मांडेल तरी प्रचंड बहुमत मिळवेल . शिवसेनेने भाजपाशी युती खुषाल तोडावी व या एकमेव मुद्दयाचे भांडवल करून सत्तेचा सोपान चढावा एवढी या मुद्दयात ताकद आहे. स्वत: राज हा एकमेव मुद्दा घेउन निवडणुकित उतरला तरी बहुमत मिळवू शकेल ! एक जळता निखारा सर्व मराठी-प्रेमींच्या हाती या मराठी द्वेषाची गरळ ओकणार्याने दिला आहे. हा निखारा सत्तेच्या लालसेपायी विझू द्यायचा की त्याच्यावर फ़ूंकर मारून त्याच्या आगीत मराठी द्वेष्ट्यांची होळी पेटवायची हा निर्णय मराठी राजकारण्यांनी घ्यायचा आहे. राजकारणी काही करोत न करोत, माझ्या तमाम मराठी बांधवानो, एकच कळकळीची विनंती, या निवडणुकित १०० % मतदान करा व ते सुद्धा मराठी माणसालाच. अगदी २८८ आमदार मराठीच निवडून आले पाहिजेत. मराठी या एकाच मुद्दयावर एकत्र या ! मराठी उमेदवारालाच मत द्या. लचके तोडून वाटा मागणार्यांना युपी-बिहारची वाटच दाखवा ! आपल्याच नादानपणामुळे ही विषवल्ली आपण पोसली, तिला खतपाणी घातले. आज ती आपल्याच नरडीचा घोट घेण्याएवढी फ़ोफ़ावली आहे, माजली आहे. तिला आत्ताच समूळ उखडा, ही अखेरची संधी आहे असे समजूनच कृती करा !

जय महाराष्ट्र !

रविवार, २० सप्टेंबर, २००९

किस्सा खुर्सी का !

एकदा अचानक काहितरी काम निघाले म्हणून मी हापिसला दांडी मारली होती. दूसर्या दिवशी कामावर जाताच श्रॉफ म्हणाला, “मराठे, तुझी खुर्ची बरोबर नाही. तू एवढे महिने तिच्यावर बसून काम करतोस म्हणजे नवलच आहे. माझी तर पाठ काल एक दिवसातच कामातुन गेली. तक्रार दिली आहे माणसे येतीलच एवढ्यात.” खुर्ची हा एकच शब्द मला थेट भूतकाळात, १९८६ मध्ये घेउन गेला.

१९८६ मध्ये गोदी विभागात कामाला लागलो. डॉकयार्ड ते बॅलार्ड पियर एवढ्या विस्तीर्ण भागात जहाजांचे धक्के आहेत. धक्क्याजवळ तेवढ्याच अवाढव्य शेड. जहाजाने आणलेला माल त्यात ठेवला जातो. निर्यात करायचा माल सुद्धा तिकडेच आधी उतरवला जातो. टॅली घेणे म्हणजे या मालाच्या चढ-उताराची व्यवस्थित नोंद ठेवणे. आमच्यासाठी घडी करता येणार्या खुर्च्या असायच्या. शेड मधुन त्या ताब्यात घेउन धक्क्यापर्यंत न्यायला लागायच्या. अनेक क्लार्क त्या फ़रफ़टत नेणेच पसंत करत ! खुर्ची एक, त्यावर बसणार दोघे ! मुंबई बंदराचे प्रतिनीधी म्हणून आम्ही, टॅलीक्लार्क आणि जहाज एजंटाचे प्रतिनिधित्व करणारे बोर्डाचे क्लार्क ! हे क्लार्क एक नंबरचे कामचूकार ! शिफ़्ट सुरू होताना ते जे तोंड दाखवुन काळे करत ते काम संपतानाच उगवत. आमच्या नोंदीची नक्कल करून ते मोकळे होत. हेच काम विमा कंपन्याचे सर्व्हेयर सुद्धा करत. त्या बिचार्यांची अवस्था अगदीच खराव होती. पंधरा रूपये रोजावर ते काम करत. बोर्डाचा माणूस गुल असला तरी यांना आम्हाला माणुसकी म्हणून अर्धी खुर्ची द्यावीच लागे. ती खुर्ची शेवटी मोडायची. आमचेच अनेक क्लार्क काम संपल्यावर खुर्ची अशीच धक्क्यावर सोडून देत व मग ती अनायसेच भुरट्या चोरांच्या ( ट्रकचे क्लिनर ती सरळ गाडीत टाकून देत ! ) हाती पडे. कितीही वेळा नव्या खुर्च्या दिल्या तरी एका आठवड्यात “खुर्ची नाही” अशी स्थिती असायची ! मग हातगाडीवर, धान्याच्या गोणीवर कोठेही बसून टॅली घ्यायला लागायची. अर्थात प्रामाणिक पणे काम करणार्यांनाच याचा त्रास होई, अनेक जण सर्व्हेयरच्या जिवावर क्लबमध्ये खेळत बसत व शिफ़्ट संपताना परत येउन शेवटचा स्ट्रोक मारून मोकळे होत. एखादा दिवस जरी संपूर्ण खुर्ची, ती पण धड अवस्थेत असलेली बसायला मिळाली तरी चैन वाटायची ! तशी खुर्चीकरता अनेकदा आंदोलने झाली पण “आपलेच दात आणि आपलेच ओठ” अशी अवस्था असल्याने ती कधी तडीस गेली नाहीत.

१९९२ साली संगणक विभागात आल्यावर पहिले समाधान होते स्वत:ची चांगल्या स्थितीत असलेली लाकडी खुर्ची, ती सुद्धा पुर्णवेळ मिळाल्याचे ! संगणकावर काम करण्यासाठी वेगळी खुर्ची असते हे तेव्हा नुसते ऐकुनच ठावकी होते ! दोन वर्षानंतर नव्या इमारतीतला एक संपूर्ण मजलाच संगणक विभागाला देण्यात आला. माझे बस्तान इथे हलले. सेंट्रल एयरकंडीशनिंगचे मला एवढे नवल वाटले नाही पण साधारण ३७०० रूपयाची, गोदरेजची व्हील असलेली खुर्ची बघुन मी अगदी हरखुनच गेलो ! त्या खुर्चीत बसल्यावर जणू इंद्रपदच मिळाल्यासारखे वाटले ! खुर्चीत बसून स्वत: भोवती गिरक्या मारणे, ती खालीवर करून बघणे, व्हिलचा वापर करून एका जागेवरून दूसरीकडे जाणे हे सगळे आमचे खेळच झाले होते. तिची पाठ सुद्धा हवी तशी पाठी-पुढे करता येत असे. असल्या खुर्चीत बघून आम्हाला काम करताना बघून अनेकांचा तेव्हा जळफ़ळाट होत असे ! खुर्चीचा मान व माज म्हणजे काय असतो हे मला तेव्हा कळले ! मी तिकडे आठ वर्षे मनमुराद अधिकार गाजवला. अनेक जण त्याचा उल्लेख पेशवाई असाच करतात. नंतर माझी रवानगी त्याच इमारतीत चवथ्या मजल्यावर झाली. तिकडचे वातावरण अगदी उबग आणणारे होते. अपुर्या जागेत तब्बल १० माणसे काम करीत. अगदी एकमेकांच्या पाठीला पाठ लावुनच काम करावे लागे. सर्वत्र पसारा पडलेला होता. एसी नुसते नावाला होते. आणि हो , संगणक खुर्च्या पार मोडलेल्या होत्या. व्हील मोडलेली, बॅलन्स गेलेली होती, कुशन निघालेले होते, आर्म रेस्ट मोडलेले होते, खुर्चीची उंची कमी जास्त करणारी यंत्रणा बाद झालेली होती.

त्या वातावरणात काम करणे अगदीच असह्य व्हायचे. अगदी घुसमट हो़उ लागली. एका शनिवारी एक तास आधी कामावर येउन , सगळा पसारा बाहेर फ़ेकून दिला. मोडके संगणक, भंगारात निघालेले रॅक बाहेर काढले. नुसता एसी हवा म्हणून आत बसणार्यांना बाहेर हुसकावुन लावले. बसायची रचना बदलली. एवढे झाल्यावर आधीची कोंदट जागा अगदी ऐसपैस व हवेशीर वाटू लागली. एसी सुद्धा दुरूस्त करून घेतला. मग लक्ष वळले खुर्च्यांकडे ! गेली १० वर्षे नव्या खुर्च्या आल्याच नव्हत्या, तसा कोणी प्रयत्न सुद्धा केला नव्हता. आधीचा इन-चार्ज स्वत:पुरती चांगली खुर्ची (त्यातल्या त्यात) घेउन बसायचा, शक्य असूनही त्याने दूसर्यांना खुर्ची देण्यासाठी काहीही केले नाही. सनदशीर मार्गाने मी नव्या खुर्च्यांची मागणी लावुन धरली. बरेच कागदी घोडे नाचल्यावर मायबाप व्यवस्थापनाने प्लास्टिक खुर्च्या देण्याची तयारी दाखविली. मी तो प्रस्ताव धुडकावला व संगणक खुर्ची ही चैन नव्हे हे त्यांना समजावले. मी खूपच ताणून धरले तेव्हा माझ्याच जुन्या कार्यालयातुन एक खुर्ची मला देउ करण्यात आली. अर्थात मी त्याला सुद्धा नकार दिला. खुर्ची मिळत नाही म्हटल्यावर मी स्टुलावर बसून काम करण्याचा निर्णय घेतला व त्याची भरपूर बोंब सुद्धा केली. मोडक्या खुर्चीत बसून काम करण्यापेक्षा स्टुलावर बसून करणे खूपच सोपे होते. आमचा साहेव जेव्हा जेव्हा कामासाठी माझ्याकडे यायचा तेव्हा तेव्हा मला स्टुलावर बसलेले बघुन तो जरा वरमायचाच. त्याच्या बरोबर अनेक बडे अधिकारी सुद्धा असायचे. संगणक विभागाचा प्रमुख स्टुलावर बसून काम करतो म्हटल्यावर ते सुद्धा चमकायचेच ! शेवटी स्वत:च्या खास अधिकारात ५००० रूपये मंजूर करून खुर्च्या द्यायला ते तयार झाले. अर्थात सगळे पेपर-वर्क मी करायचे अशी अट घालूनच ! मला एकूण ६ खुर्च्या हव्या होत्या. गोदरेजची एक खुर्चीच ४००० रूपयाची होती. तेव्हा मी मशीदबंदर जवळील अनब्रँडेड खुर्च्यांच्या बाजारात गेलो. चांगल्या दर्जाची खुर्ची निदान १८०० रूपयाच्या खाली नव्हती. तेव्हा आधी दोन घेउ, अशा दोन दोन करत सगळा कोटा पुर्ण करायचे ठरले. सगळे सोपस्कार पार पडल्यावर जेव्हा पैसे घ्यायला गेलो तेव्हा ऑडीटने खुसपट काढून, खुर्ची फ़र्निचर मध्ये मोडते, आकस्मिक निधीतुन ती घेता येणार नाही असा नियम दाखवला ! सगळे मूसळ केरात !

याच काळात माझ्या खास ओळखीचे शेख साहेब बढती मिळून उप-गोदी प्रबंधक झाले. त्यांच्या कानावर सगळा प्रकार घालताच त्यांनी लागलीच गोदी विभाग प्रमुखांकडून १०,००० रूपये मंजूर करायचे आश्वासन दिले. मी लगेच माझ्या कार्यालयातुन तशी शिफ़ारस रवाना केली. एका आठवड्याने स्वत: शेख साहेबांनी फ़ोन करून १०,००० रूपये मंजूर झाल्याची खूषखबर दिली ! परत बाजार पालथा घातला. आधी १८०० रूपयाला उपलब्ध असलेल्या खुर्च्या आता २२०० रूपये झाल्या होत्या ! वॅट - मुल्यावर्धित विक्रीकर लागू झाल्याचा तो फ़टका होता ! निराश हो़उन मी दूकानातुन बाहेर पडत असतानाच मालकाने मला बोलावणे धाडले. मी त्याला दहा हजारात सहा खुर्च्या बसवायची गळ घातली. या वर त्याने सरकारी काम असल्याने पावती तर करावीच लागणार, पण तुम्ही रोख पैसे द्यायला तयार असाल तर जमेल कारण चेक घ्यायला आम्हाला महीनाभर खेटे घालावे लागतात वर वीस टक्के कट द्यावा लागतो असे सूचित केले. मी लगेच मला तुमची फ़ूटकी कवडी सुद्धा नको, पावतीसह ६ खुर्च्या तुम्ही पोचत्या करणार असाल तर मी तुम्हाला सगळे पैसे आगाउ द्यायला तयार आहे असे सांगितले. त्याने लगेच हसून ’डन’ केले ! अर्थात त्यासाठी त्याला हजार रूपयाचा ऍडवान्स मला माझ्या खिषातुनच द्यावा लागला. त्याच्याकडून मी रितसर कोटेशन घेतले व मोठ्या उत्साहात कामावर परतलो. सगळ्यांनी एकच जल्लोश केला. पण खरी लढाई पुढेच होती !

झारीतले शुक्राचार्य म्हणजे काय याचा अनुभव मला लेखा विभागात टेबलो-टेबली आला. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी “खांब खांब खांबोली खेळावे” लागले. जसे काही खुर्च्या मी माझ्या घरीच घेउन चाललो होतो. एवढा उत्साह दाखविलास तर सतर्कता विभाग तुझी चौकशी करेल असेही धमकावले गेले. ( चौकशी चालु आहे ती इतरांनी ४००० रूपयाला घेतलेल्या खुर्च्या मी त्याच्याही अर्ध्या किमतीत व त्याहून चांगल्या दर्जाच्या कशा घेतल्या याची ! कदाचित यालाच सगळे संबंधित घाबरले असावेत ! ) मी या सगळ्यांना पुरून उरलो. तब्बल तिन दिवस खेटे, हेलपाटे घातल्यावर , टक्के-टोमणे सहन केल्यावर हातात दहा हजार रोख पडले एकदाचे ! मग त्या दूकानात फ़ोन करून खुर्च्या तयार ठेवायला सांगितले. सहा खुर्च्या टॅक्सीच्या टपावर बांधून मी विजयी वीराच्या थाटात गेटवर आलो. इकडे पांढरा बगळा म्हणजे कस्टमचा अधिकारी आडवा आला. एक तास त्याच्याशी हुज्जत घातल्यावर मला त्याने खुर्च्या आत घेउन जायला मोकळिक दिली. लिफ़्टने खुर्च्या वर जात असताना सगळा स्टाफ़ ते दृष्य विस्मयाने बघत होता. कोणाच्या नजरेत कौतुक होते तर कोणाच्या असूया ! कामावर त्या खुर्च्यांची चक्क पूजा करण्यात आली. मोठ्या जल्लोशात आम्ही सगळे त्या खुर्च्यांवर स्थानापन्न झालो. माझ्या चिकाटीचे अनेकांनी खुल्या मनाने कौतुक केले पण त्यात सुद्धा “आता मराठेच्या घरी सुद्धा अशी खुर्ची असेल” असे कोणी फ़ूत्कार सोडलेच ! दुर्दैवाने त्याच आठवड्यात आमच्यातल्या चार जणांची बदली झाली, मला मुदतवाढ मिळाली. नव्या आलेल्यांना अनायसेच नव्या खुर्च्या मिळाल्या. मुदतवाढ मला सुद्धा मानवली नाही. खुर्चीच्या लढाईत अनेकांशी वैर पत्करावे लागले होतेच. कोणेतीही सूचना न देता माझी बदली तडकाफ़डकी श्रम विभागात झाली. इथे लाकडी खुर्च्या होत्या. परत संघर्ष करून नव्या खुर्च्यांसाठी मंजूरी मिळवली पण शेवटच्या टप्प्यात सायबाचीच बदली झाली व तो प्रस्ताव दफ़्तरजमा झाला ! लगोलग माझी सुद्धा नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पात बदली झाली. माझ्या सुरवातीच्या कार्यालयातच ! माझ्या खुर्चीचा प्रश्न आला नाही ! पण इकडे मी “जिकडे संगणक तिकडे संगणक खुर्ची हवी” असा पण करून पाठपुरावा चालु केला. युनियनच्या मदतीने तो आता अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच तब्बल ३०० नव्या संगणक खुर्च्या सगळ्यांना मिळतील !

तिकडून झालो थेट चेयरमनचा पीए ! या खुर्चीचा दरारा तो काय वर्णावा ! माझी खुर्ची बिघडली आहे असे कळताच एखाद्या गंभीर आजारी रूग्णाला बघायला जशी गर्दी होते तसे अनेक जण गंभीर चेहर्याने ये़उन गेले. थोडे तेलपाणी केल्यास आहे तिच खुर्ची चांगली होईल हे माझे सांगणे कोणी मनावर घेतले नाही. शेवटी नवी खुर्ची मला देण्याचा निर्णय झाला. अवघ्या १० मिनिटात मी नव्या कोर्या खुर्चीवर स्थानापन्न झालो होतो ! संस्कृत सुभाषितात कळसावर बसल्याने कावळा गरूड होत नाही असे भले म्हटले असेल, सरकारी कार्यालयात मात्र अधिकाराच्या खुर्चीवर बसलेला आपोआपच महान होतो ! खुर्चीमुळे माणूस मोठा समजला जातो की कामामुळे ? कोणी सांगेल का मला ?

शनिवार, १२ सप्टेंबर, २००९

बावळट , अगदी बाय डीफ़ॉल्ट !

चि.प्रसादची आणि माझी गाठ हल्ली जाता-येताच पडत असते. म्हणजे तो जात असतो तेव्हा मी घरी येत असतो व मी जात असतो तेव्हा तो घरी येत असतो ! मुलगा मोठा झाला याची अजून एक खूण ! तर, कामावरून आल्यावर जरा विसावत होतो तेवढ्यात चिरंजीव बाहेर जाताना दिसले. अर्धवट इन केलेला, पट्टयाचे एक टोक बाहेर लोंबकळत होते, जीनचा एक पाय अर्धवट वर दुमडलेला होता. त्याच्या निदर्शनास या बाबी आणताच त्याने, अरे बाबा .. असे म्हणून अटलजींप्रमाणे एक जीवघेणा पॉज घेतला .. मी तसे मुद्दामच केले आहे, बावळट दिसायची हल्ली फ़ॅशन आहे ! माझे प्रबोधन करून बाहेर सटकण्यापुर्वी “तू बनियन उलटा घेतला आहेस – (पॉज) – नेहमीसारखाच !” असा तोफ़गोळा टाकलाच त्याने !

बावळट दिसायची फ़ॅशन ? तरीच हल्ली बरेच तरूण केस अर्धवट कापलेले, दाढीची खुंट वाढलेले, ढगाळ शर्ट घातलेले, शर्ट अर्धवट खोचलेले, विजारींचे पाय खालीवर असणारे, चप्पल सुद्धा थोडी आत-बाहेर असलेले दिसतात – म्हणजे हे सगळे मुद्दाम केले जाते तर ! अर्थात हे माझ्या हातुन जेव्हा व्ह्यायचे तेव्हा मात्र न्हाव्याने फ़ूकटात डोई केली आहे का ? वडीलांचा शर्ट घातला आहे का ? कापड कमी पडले का ? चप्पल देवळातुन आणली आहे का ? असे टोमणे कानावर आघात करायचे. अर्थात मी कधी हे ठरवून करत नव्हतोच ! वेंधळेपणा, विसरभोळेपणाच्या जोडीला बावळटपणाचा शिक्का माझ्यावर अगदी बालपणापासूनच बसला आहे. या मुळे मला कधीच कोणी गंभीरपणे घेत नाही. माझ्याकडे बघून प्रथमदर्शनी तरी हा काही कामाचा आहे असे अगदी कोणा-कोणालाच वाटत नाही ! मी कोणी आहे / असू शकेन अशी धूसर शक्यता सुद्धा कोणाच्या मनात कधी येत नाही. बूटकेपणामुळे मी अगदी कॉलेजात जाउ लागलो तरी अनेकांना मी चवथी-पाचवीत, फ़ारतर सातवीतला विद्यार्थी वाटत असे. नंतर उंची बर्यापैकी वाढली पण त्या मानाने शरीरयष्टी अगदीच किरकोळ आहे. अगदी १९ व्या वर्षी नोकरी लागल्यावर सुद्धा गेटवर मला अडवून माझ्या ओळखपत्राचे बारकाईने निरीक्षण होत असे.

“यंदा कर्तव्य आहे” असे जाहिर केल्यावर अनेक कन्यका आगाउ सूचना न देता घरी येत, मी तेव्हा हमखास बनियन व लुंगीवर असे. बराच वेळ शांततेत गेल्यावर मुलीकडचा कोणीतरी नवरा-मुलगा कोठे आहे ? असे विचारत ! लग्न ठरल्यावर पार्ल्यात एका दूकानात चि.सौ.का. ला साडी घ्यायला गेलो होतो. जाताना रखवालदाराने हीच्यासाठी दार उघडले, कडक सलाम ठोकला व जाताना खरेदीच्या पिशव्या मात्र माझ्या हातात कोंबल्या होत्या ! “देखणी बायको दूसर्याची” हे दूसर्या अर्थाने सुद्धा बरोबर आहे. अर्थात लग्न झाल्यावर या गोष्टींची सवयच जडली. मुले झाली, ती शाळेत जाउ लागली. त्यांना कधी शाळेत सोडायचा प्रसंग यायचा. तेव्हा प्रियांका खूप श्रीमंत आहे, नोकर तिला सोडायला येतो अशी कुजबुज व्ह्यायची. त्या नंतर मला शाळेत नेण्यापुर्वी प्रियांका माझी १० मिनिटे आधी तयारी करून घ्यायची, आता मात्र तू माझ्या शाळेत यायचेच नाही असे तिने बजावुन सांगितले आहे ! कधी काळी फ़स्ट क्लासचा तिमाही पास काढायचो तेव्हा सुद्धा “विदाउट तिकिट घुमते है, वो भी फ़स्ट क्लास मे ? क्या डेरींग है ! असे ऐकायला लागायचे. चुकून कधी टीसी आलाच तर तो माझ्याकडे विजयी मुद्रेने यायचा. आसपासचे “बरी अद्दल घडली” असे म्हणायचे. अर्थात मी तिमाही पास दाखवल्यावर मात्र नक्की कार्यालयाकडून फ़ूकट मिळाला असणार असे तर्क व्हायचेच ! सेकंड एसीने सहकुटूंब प्रवास करताना टीसी माझ्याकडे “गडी माणसाला कशाला एसीने न्यायचे ? तो आला असता की जनरल मधून “ असा अविर्भाव चेहर्यावर आणतात . एकदा इस्त्रीचे कपडे आणायचा प्रसंग आला. कामावरून परस्परच गेलो होतो. इस्त्रीवाल्याने विचारले, मालकिणबाई बाहेरगावी गेल्या आहेत वाटते , साल्या बिनधास्त मालकाचे कपडे घालून मिरवतोयस ते ?” चक्की वाल्याकडे दळण न्यायला एकदा गेलो होतो तेव्हा तर “तुम नौकर लोग पीठ बदली करते हो और मेमसाब हमे डाटती है” असे एकावे लागले होते !

घरी असताना मी कधी सहसा दार उघडायच्या फ़ंदात पडत नाही. कारण “साब घरमे है क्या ?” असा किंवा मेमसाब को बुलाव, असा आदेश ऐकायला लागतो . असून मालक खास घरचा, नोकर समजती त्याला ! याचा एक मात्र फ़ायदा होतो, देणगी मागायला कोणी आले असेल तर मी बिनधास्त “साब और मेमसाव घर मे नही है !” असे सांगून दणकन दार लावून टाकतो. एकदा ब्राह्मण सभेची माहिती घ्यायला एक जोडपे घरी आले होते. मी त्यांचे आगत-स्वागत केले. त्यांना सगळी माहिती दिली. यावर ते म्हणाले, “तुझ्याकडूनच एवढी माहिती मिळाली, आता अध्यक्ष काय वेगळे सांगणार ? तरी आलोच आहोत तर निदान त्यांची तोंड-ओळख तरी करून दे.” मी ते बाहेरगावी गेले आहेत असे सांगून त्यांची बोळवण केली.

मुंबई बंदरात काम करताना संगणक युग आणणार्या टीम मध्ये माझा मोठा वाट होता. मला भेटायला अनेक जण तेव्हा यायचे. चूकूनही कोणी मला “तुम्हीच मराठे का ?” असे विचारले नाही. प्रश्न यायचा “मराठे साहेव आज कामावर नाही आले वाटते ?” आता चेयरमनचा पीए आहे, पण तसे काय बोर्ड घेउन फ़िरू का ? अगदी सुरवातीला सिक्युरिटी वाले पास विचारून हैराण करायचे. आता सलाम मारतात पण तो जुलमाचा वाटतो ! सालं काय पण नशीब असते एकेकाचे, असा चेहरा करून ! रजा, क्लेम असे काही काम असेल तर ते फ़ोनवर सुद्धा हो़उ शकते. पण मी मात्र स्वत:च त्या करीता हेलपाटे घालतो. संबंधित क्लार्क माझी मस्त बोळवण करतो. मी परत जात असताना त्याला कोणीतरी खाणाखुणा करून मी कोण आहे ते सांगतो. मग तो धावत पळत मला गाठतो , अगदी माफी सुद्धा मागतो पण चेहर्यावर मात्र प्रश्नचिन्ह असतेच !

अर्थात हा बावळटपणाचा शिक्का पुसायचा मी कोणताही प्रयत्न करत नाही. दैवी देणगी म्हणून मी ती स्वीकारली आहे. बावळट वाटावे म्हणून सुद्धा मला काही वेगळे करावे लागत नाही. मी आहे हा असाच आहे, दिसायला अगदी बा व ळ ट ! उलट हे सगळे मी मस्त एंजॉय करतो ! माझी खरी ओळख पटल्यावर समोरच्याचा तोंडात मारल्यासारखा झालेला चेहरा बघितला की मस्त मजा येते ! अर्थात माझ्या बरोबर काम केले की माझी खरी ओळख त्यांना होतेच व ती ते कधीही विसरणार नसतात. समर्थांनी म्हटलेच आहे, “वेष असावा बावळा परी अंतरी नाना कळा !”

गीतेकडे आता तरी पाठ करू नका ! ती पाठ करा !!

श्रीमदभवत्‌गीता ! आपला धर्मग्रंथ. पण त्याची प्रत सुद्धा आपल्या घरात नसते , तर तो वाचला असायची व पाठ करायची बातच सोडा ! गीता पाठ करण्यापेक्षा तिच्याकडे पाठ करणेच अनेकांना सोपे वाटते. गीता पाठ करून तसा व्यवहारात काहीच उपयोग नसतो. नोकरी शोधताना अतिरीक्त पात्रता म्हणून ”गीता पाठ आहे” ला काहीही किंमत नाही. माझे वडील गेली ४० वर्षे गीता प्रसाराचे काम अव्याहतपणे करीत आहेत. त्या साठी त्यांनी “स्पष्ट आचार, स्पष्ट विचार, स्पष्ट उच्चार, प्रचार” ही चतू:सूत्री समोर ठेउन सुगीता मंडळाची स्थापना केली. दर रविवारी सकाळी आमच्या घरी ३०-४० मुले गीता शिकण्यासाठी येत. आम्ही चार भावंडे त्यात असायचोच. गीता शिकण्यापेक्षा त्यानंतर मिळणारा लाडू हाच तेव्हा जास्त जिव्हाळ्याचा असायचा. दर वर्षी गीता जयंतीला काहीतरी कार्यक्रम असतो. गीता पाठांतर, वाचन अशा स्पर्धा सुद्धा होत असतात. मुख्य म्हणजे यासाठी बाबांनी कधी कोणा कडून फ़ूटकी पै सुद्धा घेतली नाही ! गीतेचा प्रचार व्हावा म्हणून दरवर्षी गीता प्रेस गोरखपुरच्या गिरगाव कार्यालयात जाउन ते गीतेवरील उत्तमोत्तम साहित्य घेउन येतात व त्याचे अगदी फ़ूकट वाटप करतात. बाबांनी गीतेवर अनेक प्रवचने, किर्तने दिलेली आहेत. आणीबाणीचा अंमल चालू असताना, बाबांची एका देवळात गीतेवर प्रवचने होती. बाबांच्या बोलण्याने सरकारचा रोष ओढवेल व तुरूंगात जावे लागेल या भयाने आईची तेव्हा झोप उडाली होती. किर्तनाला मला ते सोबत घेउन जात पण परत मी आपल्या पायाने क्वचितच आलो असेन ! बाबा घरी जेव्हा मला गीता शिकवायचा प्रयत्न करायचे तेव्हा हमखास मला जांभई यायची. गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता ! पण बाबा गीता कोळून प्यायलेले, कर्म करत राहण्यावर त्यांचा विश्वास, फ़लाची अपेक्षा कशाला ?

गीता शिका असे म्हटल्यावर पहिला प्रश्न येतो, त्याने मला काय मिळेल ? या प्रश्नाचे उत्तर बाबांकडे नसायचे. अगदी अलिकडे ते त्यावर “संडासला जाउन आल्यावर तुम्हाला काय मिळते ?” असा उलट प्रश्न विचारत पण अचानक गीता फ़ाऊंडेशनच्या गीता पाठांतर परीक्षा योजनेची त्यांना माहिती मिळाली. गीता संपूर्ण पाठ म्हणून दाखविणार्याला स्वत: श्रुंगेरीचे शंकराचार्य रोख २१,००० रूपये व प्रशस्तिपत्र देउन गौरव करतात ! ही बातमी त्यांनी बहुतेक मराठी वृत्तपत्रांना पाठवली व बहुतेकांनी ती खूप त्रोटक स्वरूपात छापली. एका कार्यक्रमात कोणा वक्त्याकडून मला ही योजना कळली व ती राबवणारे श्री. आपटे गुरूजी यांचा फ़ोन नंबर सुद्धा मिळाला. मी स्वत: त्यांच्याशी बोलून या योजनेची माहिती घेतली. त्यांनी मला पत्रक सुद्धा पाठवून दिले. ती योजना आपल्या समोर मांडत आहे.

शाळा/कॉलेजातील मुला-मुलींसाठीची योजना

१) गीतेतील कोणताही एक अध्याय स्वच्छ, शुद्ध व बिनचूक पाठ म्हणणार्या विद्यार्थ्यास जागच्या जागी २५० रूपये रोख बक्षिस दिले जाईल. ( त्यांच्याशी बोलताना त्यांनी खुलासा केला आहे की निव्वळ १२ वा, १५ वा अध्याय म्हणणार्याला बक्षिस मिळणार नाही, त्या जोडीने दूसरा कोणताही अध्याय म्हणावा लागेल, कारण हे दोन्ही अध्याय खूप लहान आहेत व अनेकांचे ते अनेक कारणांनी पाठ सुद्धा असतात.) एका अध्यायला २५० रूपयाचे रोख बक्षिस !

२) पाठांतराऐवजी एखाद्याने अध्यायाचे स्वच्छ, शुद्ध व बिनचूक वाचन केल्यास त्याला जागच्या जागी १०० रूपये रोख बक्षिस दिले जाईल. एका अध्यायला १०० रूपयाचे रोख बक्षिस !

३) कोणीही पुढाकार घेउन (शाळा / कॉलेज / संस्था / व्यक्ती ) किमान ४०-५० जणांचा गट तयार करून या स्पर्धेचे आयोजन करू शकतो.

४) जून ते नोव्हेंबर या काळात दोन वेळा ही स्पर्धा घेतली जाईल.

५) तुमच्या सोयीच्या ठीकाणी स्पर्धेचे आयोजन करता ये़ईल.

६) कोणतीही प्रवेश फ़ी नाही. गट तयार झाल्यावर फ़क्त संस्थेला फ़ोन करा, परीक्षक स्वत:च्या खर्चाने ठरवलेल्या स्थळी हजर राहतील.

मोठ्यांसाठी – गीता संपूर्ण पाठ असलेला कोणीही खालील पत्त्यावर संपर्क साधून अधिक माहिती घेउ शकतो. संपूर्ण गीता पाठ म्हणून दाखविणार्याला स्वत: शंकराचार्य २१,००० रूपयाचे रोख इनाम व प्रशस्तिपत्रक देउन गौरवतिल ! जरी पहीले सहा अध्याय पाठ म्हणता आले तरी ५००० रूपयाचे रोख इनाम मिळेल. शाळा - कॉलेजातला कोणीही संपूर्ण गीता पाठ असेल तर १८ गुणिले २५० असे ४,५०० बक्षिस घेउन शंकाराचार्यांकडून सुद्धा २१,००० चे इनाम घ्यायला पात्र असेल !

या स्पर्धेसाठी पू. जगत्‌गुरू शंकाराचार्य शारदापीठा शृंगेरी यांचे आशीर्वाद व प्रेरणा आहे. मुला-मुलीने आपले शिक्षण स्वावलंबनाने करावे ही दृष्टी सुद्धा याच्या पाठी आहेच. अधिक माहिती साठी येथे संपर्क साधावा;

श्री. आपटे गुरूजी

गीता फ़ाऊंडेशन,

चैतज्ञ, लोकमान्य सोसायटी, पंढरपूर रोड , मिरज – ४१६ ४१०.

फ़ोन नंबर – ०२३३ – २२३२०८२ , मोबाईल ०९८६००३२०८२.

geetafoundation@gmail.com

चला तर, गीता पाठ करायला लागा !

बुधवार, ९ सप्टेंबर, २००९

तमाशापटांचे सुवर्णयुग !

कोणे एके काळी मराठी सिनेमा म्हणजे तमाशापट हे समीकरणच बनले होते. पब्लिकने ’बंद करा हा तमाशा’ असे बजावूनही तुणतुणे चालूच होते. शेवटी मायवाप प्रेक्षकांनीच शिणुमाकडे पाठ फ़िरवली व मराठी सिनेमाला घरघर लागली. करमाफ़ी योजना सरकारने आणली पण मराठी माणूस मात्र माफ़ि द्यायला तयार नव्हता. गेल्या पाच-एक वर्षात मात्र मराठी सिनेमाने कात टाकली आहे. बंद पडलेला श्वास चालू झाला आहे. नव्या दमाचे निर्माते, दिगदर्शक , कलाकार, खाजगी वाहिन्यांची गुंतवणुक, जागी झालेली मराठी अस्मिता या मुळे पुन्हा मराठी सिनेमा प्रकाशझोतात आला आहे. अनेक नवे विषय मराठीत हाताळले जात आहेत व मराठी सिनेमातील प्रयोगाची दखल राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे.

दोन-एक वर्षापुर्वी मित्राने मला एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, सांगते ऐका, सवाल माझा ऐका या चार मराठी तमाशापटांच्या ( प्रदर्शन काल साधारणे पणे ५० च्या दशकातील असावा )वीसीडी दिल्या होत्या, त्याला त्या राइट करून हव्या होत्या. असली कामे मी अगदी उत्साहाने करतो ! पण नंतर त्याने मला त्यातली फ़क्त गाणीच वेगळी राइट करून द्यायची गळ घातली. गुगलमधून सर्च करून त्या साठी योग्य आणि चकटफ़ू असलेले सॉफ़्टवेयर मी शोधून काढले व उद्योगाला लागलो. तमाशा हा माझ्या आवडीचा विषय केव्हाच नव्हता पण ही गाणी वेगळी करताना मला ती ऐकणे भागच पडले व नकळत तमाशाच्या प्रेमातच पडलो. त्या दिवशी रात्री दोन पर्यंत जागुन त्यातली बहुतेक गाणी मी पाहिली व तबियत खुष झाली !

ब्लॅक आणि व्हाइट ची एक वेगळीच जादू असते. त्या काळी सिनेफ़ोटोग्राफ़ीचे तंत्र अगदीच बाल्यावस्थेत असताना एवढे सुरेख छायाचित्रण व ध्वनिमुद्रण करणार्या तंत्रज्ञांना मनसे दाद ! तमाशाचे चित्रण करताना तंत्रावरील हुकमत सतत जाणवते. तिकिटबारीवरची लगबग, सुरवातीचे नमन, तमासणींचे नृत्यकौशल्य , विविध वाद्ये वाजविणार्यांच्या लकबी, सोंगाड्याची लुडबुड, पब्लिकची गावरान दाद, शिट्या, पाटलाचा रूबाब – या सर्व गोष्टी अगदी बारकाईसह टीपल्या गेल्या आहेत. कलाकारात जयश्री गडकर, माया जाधव, लिना गांधी, अरूण सरनाइक, गणपत पाटील , चंद्रकांत, सुर्यकांत बंधू खरेच .. काय बाप कलाकार होते ! भूमिकेत अगदी झोकून द्यायचे ! तमाशा त्यांनी पडद्यावर अगदी जिवंत केला होता. मी वर उल्लेख केलेले चारही चित्रपटांनी तमाशापटाचा सुवर्णकाळ आणला असणार यात शंकाच नाही. मला वाटते शांतारामबापूंचा पिंजरा हा शेवटचा तमाशापट असावा व त्यानंतर तमाशापटाला उतरती कळा लागली, त्यानंतर मराठीत आलेला तमाशा प्रधान चित्रपट मला तरी आठवत नाही. हे चित्रपट बघताना मात्र खरेच त्या काळात गेल्याचा फ़िल येतो व तमाशापटांनी बराच काळ तरी मराठी माणसाचे भाव-विश्व कसे व्यापून टाकले होते त्याचा प्रत्यय येतो.

हे सर्व मराठीचे वैभव / तमाशा युग युट्युबच्या माध्यमातुन सगळ्या दोस्तांबरोबर शेयर करायची मुराद आता पुर्ण होत आहे. दर्दींनी या गाण्यांचा चित्रपट कोणता, (अर्थात वरील चार पैकीच असणार तो ) , गीतकार, संगीतकार, प्रकाशन काल यावर प्रकाश टाकल्यास तो सुद्धा अपडेट केला जाइल. लावण्यात सुद्धा खडी लावणी, बैठकिची लावणी, सवाल जबाब, कलगी-तुरा हे सर्व प्रकार हाताळले गेले आहेत. त्याचा गावरान बाज सांभाळून ! अर्थात यात सगळ्याच लावण्या नाहीत, काही पारंपारिक गीते सुद्धा आहेत पण ती सुद्धा अवीट गोडीची आहेत.

गाण्याचा मुखडा आणि खाली दुवा दिलेला आहे.

वि.सूचना :- हे सर्वच चित्रपट निदान ५० वर्षापुर्वीचे आहेत. त्यांच्या गाण्यांच्या स्वामित्व हक्काबद्दल मला काहिही माहिती नाही. ही गाणी शेयर करण्यात माझा कोणताही व्यापारी हेतू नाही. कोणाकडे याचे स्वामित्व हक्क असल्यास आणि तसे कळवल्यास ही गाणी ताबडतोब उडवली जातील. तसेही ही गाणी दाखवणे म्हणजे चित्रपटाचे प्रमोशन करण्यासारखेच आहे. गाणी बघून लोकांना हे चित्रपट बघायची इच्छा होईलच !

आली आली फ़ळवाली आली हो
http://www.youtube.com/watch?v=uCjak0GNcQo
राम राम पाव्हण तुम्ही नाव सांगा ..
http://www.youtube.com/watch?v=R8GkB21LxVM
राजसा घ्यावा गोविंद विडा
http://www.youtube.com/watch?v=C6Ks2tRkGvE
चंद्र आणि प्रीतीचे
http://www.youtube.com/watch?v=vlxc3GnmWOA
बुगडी माझी सांडली ग
http://www.youtube.com/watch?v=d6s9JjfmE_U
दिलवरा दिल माझे ओळखा
http://www.youtube.com/watch?v=EJTyaxQBbRw
ऐका ऐका गोष्ट
http://www.youtube.com/watch?v=-zW0nZ8ElDI
इष्काचा इंगा
http://www.youtube.com/watch?v=cKAUbjMeK4Q
सांगा या वेडीला
http://www.youtube.com/watch?v=idFWzTZ2wII
सोळाव वरीस धोक्याचे
http://www.youtube.com/watch?v=EU_pY12ajCk
मला वसंतसेना दिसली
http://www.youtube.com/watch?v=PsF82OKk1ys

तु देवांचा देव
http://www.youtube.com/watch?v=WRKd8XgpKpg
आल्या नाचत नाचत मेनका रंभा
http://www.youtube.com/watch?v=lwr6YHQ55wc
नाचतो डोंबारी
http://www.youtube.com/watch?v=EegDwhcZ4v0
आता लग्नाच वय माझे झाले ग
http://www.youtube.com/watch?v=jXo9vpKpTp4
कशी गौळण राधा बावरली
http://www.youtube.com/watch?v=T3X0-LqDsdI
छुमक छुम नाचे नाचे नर्तकी
http://www.youtube.com/watch?v=l0yoAm0zNDk
लाखामधून सख्या तुम्हाला
http://www.youtube.com/watch?v=bMusIa9aQQM
अशी मी खिडकित राहते उभी
http://www.youtube.com/watch?v=RbjH8qBb2io
काल रात सारी मजसि झोप नाही आली
http://www.youtube.com/watch?v=QUaN4VCsQ1o
झाली भली पहाट
http://www.youtube.com/watch?v=_cSw7xQolpI
आम्ही निघालो रे बाजारा
http://www.youtube.com/watch?v=VCd6utrdNS8

रविवार, ६ सप्टेंबर, २००९

पन्नास रूपयाची उसनवारी !

मी –

सकाळी ८:२४ ची लोकल दहा मिनिटे आधीच लागलेली होती. स्वाइन फ़्लुचा धसका व त्यातच गणपतीसाठी गावाला गेलेले चाकरमानी यामुळे गर्दी नव्हतीच. मस्त खिडकिजवळची जागा मिळाली. नेहमीचे दिसणारे चेहरे सगळ्या कोपर्यात पांगलेले होते. तेवढ्यात एक तरूण धावत धावत, धापा टाकत नेमका माझ्यासमोर आला. पन्नास रूपये ताबडतोब द्या, प्लीज, खूप घाई आहे ! मी पण कोण, कोठला याचा काहीही विचार न करता त्याच्या हातावर पन्नासची नोट टेकवली. आला तसाच तो धूम गायब पण झाला ! आता कोपर्यातले लोक माझ्याजवळ आले, तुम उसे पहचानते हो क्या ? यावर मी नाही असे सांगताच , नाव, गाव काहिही न विचारता तुम्हा त्याला पन्नास रूपये दिलेतच कसे ? नेमके तुमच्यापुढेच त्याने कसे हात पसरले ? पैसे काढायची नवी ट्रीक दिसते ही, तुमचे पैसे बुडाले, परत मिळायची आशाच सोडा – असे डोस पाजले गेले. मला सुद्धा नवल वाटले. त्या माणसाला आधी केव्हातरी नक्की लोकलमध्ये पाहिलेले होते. त्याने मागितले मी दिले, परतीची बोली झालीच नव्हती. खरेच कोणी गरजू असेल तो, उद्या परत करेल, आणि नाही केले परत तरी पन्नास रूपयाने आपण काही रस्त्यावर नक्कीच येत नाही. अक्कल खाती अजून पन्नास रूपयाची भर !

दूसर्या दिवशी मी ती गोष्ट विसरून सुद्धा गेलो. मुंबईत पाउस पडल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते. गच्च भरून आलेल्या दोन गाड्या सोडल्यावर जी लोकल आली ती अर्थातच रिकामी होती , त्यात बसून कार्यालय गाठले. पुढचे चार दिवस बरोबरचा सहकारी रजेवर असल्याने, दोन लोकल आधीची म्हणजे ८:०१ ची गाडी पकडत होतो. पाचव्या दिवशी नेहमीची लोकल पकडल्यावर एकाने विचारले की “उसने आपका पैसा दिया क्या ?” तेव्हा मला त्या पन्नास रूपयाची आठवण झाली ! पण मीच रोजची गाडी पकडत नव्हतो तेव्हा त्याला दोष देण्यात काही अर्थ नव्हता. दूसर्या दिवशी महिन्याचा दूसरा शनिवार आल्याने कार्यालयाला सुट्टी होती. थेट सोमवारीच कामावर गेलो. त्या दिवशी व दूसर्या दिवशीही रोजच्या लोकलमध्ये काही तो दिसला नाही. थोडी चुटपुट नक्की लागुन राहिली. पैशाचा प्रश्न नव्हता पण एवढ्या लोकात नेमके मलाच त्याने कसे हेरले याचे नवल वाटत होते ! बुधवारी आधीची, ८:१३ ची लोकल थोडी उशीरा सूटली व मला अनायसेच मिळाली.

तो

अमरावतीला माझे गाव आहे. जमिनीच्या वादासंदर्भात मला अचानक गावाला जायचे होते. रेल्वेचे आरक्षण उपलब्ध नव्हते म्हणून तात्काळमध्ये तिकिट काढायला बुकिंग क्लार्कला सांगितले. त्याने तिकिट काढले व ९५२ रूपये द्या म्हणून सांगितले. माझ्या खिषात तर मोजून ऩउशे रूपये व थोडी चिल्लर होती. क्लार्कने तिकिट काढले सुद्धा होते ! तात्काळ तिकिट रद्द सुद्धा करता येते नाही, म्हणजे वांदाच झाला होता. करायचे काय ? कोणी मित्र इतक्या सकाळी इकडे यायची काहीच शक्यता नव्हती. शेवटी असलेले पैसे व तिकिट त्या क्लार्क कडेच ठेउन मी रोज पकडतो तो डबा गाठला. मागचा पुढचा विचार न करता एकदम कोपर्यात बसलेल्या, नेहमीच्या पहाण्यातल्या माणसाकडे पन्नास रूपये मागितले, त्याने सुद्धा ते कोणतीही खळखळ न करता दिले ! तिकिट खिडकीवर जाउन मी तिकिट ताब्यात घेतले. त्याच रात्रीच्या गाडीने अमरावती गाठले. दूसर्या दिवशी परत फ़िरलो व नेहमीची लोकल पकडली. पन्नास रूपये ज्याने दिले त्याला साभार परत करण्यासाठी सगळा डबा पालथा घातला पण तो काही दिसला नाही. त्याचा शोध घेण्यात शनिवार सुद्धा निघुन गेला. आता मात्र मला चांगलीच खंत वाटू लागली. ज्याने आपल्याला मदत केली त्याचा नक्की आता गैरसमज होणार, खरेतर आपणच त्याचा निदान नंबर तरी घ्यायला हवा होता. पैसे परत तर करायचे आहेत पण कसे ? सोमवारी एक गाडी लवकरची पकडली व मंगळवारी थोडे त्याच्याही आधीची लोकल पकडली. पण त्याची काही गाठ पडलीच नाही. बुधवारी पुलावरच थांबून त्याला शोधले पण व्यर्थ ! रोजच्या लोकलमध्ये , नेहमीच्या डब्यात एकाला विचारले, तो अमका हल्ली कोणती गाडी पकडतो, तेव्हा त्याने हल्ली या लोकलला असत नाही पण तो कामाला मुंबई बंदरात असल्याचे सांगितले ! चला निदान तो कोठे कामाला आहे हे तरी कळले होते. कामावर पोचल्यावर लगेच गुगल मध्ये “Mumbai Port” टायपुन , सर्च वर क्लिक केले. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटची लिंक मिळाली. साइट उघडल्यावर “Contact Us” वर क्लिक करताच पहीलाच नंबर होता, 2261 1234 ! मोठया उत्साहाने तो नंबर लावला …. !

मी

कामावर पोचताच फ़ोन खणखणला. नेहमी प्रमाणेच “Good Morning ! This is chairman’s Office, Mumbai port Trust, what can I do for you sir ?” असे म्हणताच पलिकडून बराच वेळ काही उत्तर आले नाही. मग मोठ्याने हॅलो असे म्हटल्यावर, माफ़ करा, पण तुमचा कोणी कर्मचारी पनवेलला राहतो का ? अशी विचारणा झाली. मग मात्र वैतागुन मी “अहो, हे चेयरमनचे कार्यालय आहे, आणि आमच्याकडे १८,००० माणसे तीन शिफ़्टमध्ये काम करतात, एवढ्या माहितीवर तुम्हाला काय सांगू ? तसा मी सुद्धा पनवेललाच राहतो, तुम्हाला तिकडचा जागेचा भाव हवा आहे का ?” असे तिरसटासारखे विचारल्यावर त्याने फ़ोन कटच केला. मी कामात गढून गेलो.

तो

फ़ोन करून निराशा पदरी पडल्यावर रोजचा पेपर बघत असताना, मुंबई पोर्टच्या स्टोअर्स विभागाची नोटीस बघितली. डॉकयार्डचा पत्ता माझ्या कार्यालया कडून जवळचा होता. लगेच तिकडे पोचलो. तिकडेच एकाला पनवेलचा कोणी आहे का ? असे विचारताच सकाळसारखीच “१८००० कामगार …”, टेप ऐकावी लागली पण एक प्रोग्रामर पनवेलचा आहे. पण त्यासाठी तुम्हाला गोदी विभागाच्या हद्दीत जावे लागेल व त्यासाठी परवाना हवा असेही समजले. पण त्याचा नंबर घ्या, गेटवरून त्याला फ़ोन लावा , तो तुमची आत यायची व्यवस्था करेल असेही सांगितले. चला काहितरी मार्ग सापडला तर ! भले तो ’तो’ नसेल पण कदाचित ’त्याला’ ओळखत सुद्धा असेल ! गेटवरून फ़ोन करताच, मोजून दूसर्या मिनिटाला तो खाली आला, तो, ’तो’ नव्हता ! पण त्याच्यासारखाच पनवेलला राहणारा व त्याच गाडीने सकाळी प्रवास करणारा एक त्याला माहित होता. मराठे त्याचे नाव, पण सध्या त्याची पोस्टींग हमालेज विभागात होती. ती इमारत मला तिकडूनच त्याने दाखविली. गोदीत असलेल्या धक्क्याच्या बाजूने चालत गेल्यास मी तिकडे दहा मिनिटात पोचलो असतो. तिकडे पाचव्या मजल्यावर त्या मराठेचे कार्यालय होते. पावसाने केव्हाच पाठ फ़िरवल्याने कडक उन्ह पडले होते. मुंबई गोदी नुसती आधी ऐकुनच माहित होती पण आता बघायला मिळत होती. बाप रे ! केव्हढ्या प्रचंड या बोटी, त्यावरच्या अजस्त्र क्रेन्स, मालाची अखंड चालू असलेली चढ-उतार ! अगदी हरखूनच गेलो सगळे बघून ! चला या निमित्ताने का होईना गोदी बघायला मिळाली. त्या कार्यालयात गेल्यावर कळले की इथे मराठे होते , ते पनवेलचेच आहेत पण साधारण वर्षभरापुर्वीच त्यांची चेयरमनच्या कार्यालयात बदली झाली आहे. ते कार्यालय बॅलार्ड पियरला आहे. मी तिकडे निघालो, पण गोदीचे काम जवळून बघायला मिळावे, शेवटचे, हो ना, पुन्हा कधी असा योग येणार आहे म्हणा, धक्क्यावरूनच निघालो !

( स्पेशल ड्युटीवर असणारा हवालदार मोरे, गोदीच्या धक्क्यावर कोणी गिर्हाईक हेरत होता. आज दूपारी यलोगेटला चिकन पार्टी होती. तिच्या बिलासाठी जमवाजमव करायचे काम त्याच्यावरच तर होते. धक्क्यावरून जाणार्या एकाला त्याने बरोबर हेरले ! सावजाला पोलीसी खाक्यात त्याने पास विचारला, त्याच्याकडे तो अर्थातच नव्हता. त्याचे काहिही ऐकून न घेता, त्याने त्याला यलोगेटला आणले ! तोवर पार्टी चालु झालीच होती. त्याला दम देउन बाजूच्या बाकड्यावर बसवले गेले. तासाभराने पार्टी संपल्यावर खाणाखुणा झाल्या, पोर्याने आणलेले बिल त्याच्याजवळ दिले गेले व बिल देउन जावा गुमान म्हणून सांगितले गेले ! )

तो

पोलीस ठाण्यातुन बाहेर पडल्यावर पहिली जाणीव भूकेची झाली ! पण खिषात परत करायचे पन्नास रूपये सोडले तर काहिच शिल्लक रहात नव्हते. तेव्हा तो विचार झटकून टाकून पायीच मराठेच्या नव्या कार्यालयात निघालो. उन्हातुन २० मिनिटे तंगडतोड केल्यावर पत्त्यात सांगितल्याप्रमाणे कोपर्यावर सेंन्ट्रल बँक, त्याच्या बाजूला, विजय-दीप ही ७ मजली इमारत व तिला लागुनच दगडी बांधणीची पोर्ट भवन ही इमारत दिसली. आत शिरण्यासाठी पास घेण्यासाठी रांगेत पाच माणसे उभी होती. मी चेयरमनच्या कार्यालयात असणार्या मराठेंना भेटायचे आहे असे सांगताच थेट त्या शिपायाने थेट फ़ोनच लावला …. .

मी

नेहमीप्रमाणेच कामाच्या रगाड्यातुन डबा खायला दोन वाजलेच. जेवण आटोपल्यावर जरा निवांतपणा मिळाला पण ’त्याचा’ विचार काही जात नव्हता ! खरेच तो कोणी लफ़ंगा असेल ? असेच माझ्यासारखे भोळसट हेरून तो दिवसाला आरामात पन्नास-शंभर रूपये कमवत असेल ? चांगुलपणा कोणाला दाखवायचाच नाही का ? कोणावर विश्वास ठेवायचाच नाही का ? इतक्यात फ़ोन वाजला. सुरक्षा रक्षकाने कोणी भेटायला येत आहे, सोडू का ? असे विचारले, मी सोडा असे सांगितले. दारातुन आत येचात त्याची माझी नजरभेट झाली व तोच ’तो’ अशी खात्री पटली ! कमाल आहे, आपल्यापर्यंत कसा पोचला हा ? का काही वेगळ्याच कामासाठी आला आहे व योगायोगाने आपली गाठ पडते आहे ? त्याच्या डोळ्यात मात्र जत्रेत हरवलेल्या मुलाला बराच वेळ ताटातूट झाल्यावर एकदाची आई दिसल्याचे भाव दिसत होते. धावतच तो माझ्याकडे आला. त्याचा अवतार अगदी बघण्यासारखा झाला होता, उन्हात पायपीट करून तो पार विस्कटला होता. धपकन तो खुर्चीवर बसला, काय बोलावे हेच त्याला समजत नव्हते ! त्याच्यासाठी मी पाणी मागवले, चहा समोर ठेवला. मग त्याच्या चेहर्यावर जरा तरतरी आली, हसू फ़ूटले. सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेली त्याची शोध-मोहिम ऐकताना मी हरखून गेलो ! अहो, कमाल करता, साधी पन्नास रूपयाची तर बात, त्याने मी काही रस्त्यावर येणार नव्हतो व तुम्ही काही घर घेणार नव्हतात, कधीतरी गाठ पडली असतीच ना ? या माझ्या प्रश्नावर मात्र तो गंभीर झाला. साहेव, पैशाचा प्रश्न नाही, तुम्ही अगदी एका शब्दानेही चौकशी न करता मला मदत केलीत, मी मात्र आठवडा झाला तरी तुमचे पैसे परत करू शकत नव्हतो. माझे मन मला खात होते. जगात देणारी माणसे किती उरली आहेत ? अशाने त्यांचासुद्धा माणसावरचा विश्वास उडेल, त्यासाठीच मला तुमचे पैसे परत करायचेच होते, आजच आणि ऍट एनी कॉस्ट ! ये बात पतेकी थी ! त्याने पाकिटातुन पन्नासची नोट काढून मला देताच ते आता रिकामे झाल्याचे माझ्या लक्षात आले. आता हा बाहेर खाणार तरी काय ? मी लगेच शिपायाला बोलवुन त्याच्या साठी एक राइस प्लेट मागविली. आमच्या पॅन्ट्रीरूम मध्ये त्याला जेवायला बसवले. जेवण झाल्यावर मला हात जोडून तो म्हणाला, अन्नदाता सुखी भव ! साहेब, याचे किती रूपये झाले ? पोटात भूकेने कावळे ओरडत होते ! आता माझ्याकडे द्यायला एक छदाम पण नाही, मी तुम्हाला ते उद्या परत करेन ! ते का मला माहित नव्हते ? पन्नास रूपये देण्यासाठी तो चार तास उन्हात भटकत होता, पोलिस ठाण्याची हवा खाउन, स्वत:च्या पोटात कावळे ओरडत असताना त्यांच्या चिकनपार्टीचे ७०० रूपयाचे बिल देउन बिचार्याने सूटका करून घेऊन एकदाचे मला गाठले होते. मी म्हटले याचे पैसे माझे कार्यालय भरणार आहे, तुम्ही काळजी करू नका. त्याला सुद्धा ते पटले, परत आभार मानून तो जायला निघताच मला काहितरी आठवले –

“सकाळी तुम्हीच फ़ोन केला होतात ना ? मग काही न सांगताच कट का केला फ़ोन ? अजब योगायोगाने तुम्ही चक्क मलाच फ़ोन लावला होतात ! हे सगळेच मग टळले असते ना ?” आता मात्र तो पार ओशाळला, “साहेव, काय सांगू – एवढ्या मोठ्या कार्यालयात असणारा सेकंड क्लासने कसा प्रवास करेल – हा विचार मनात आला व मी फ़ोन कट केला !

गुरुवार, ३ सप्टेंबर, २००९

शंकर दिग्विजयाचे अग्रलेखांच्या बादशहाकडून अनोखे कौतुक !


माझ्या वडिलांनी विद्यारण्यविरचित शंकर दिग्विजय या संस्कृत काव्य ग्रंथाचे मराठीत भावांतर केले आहे. त्याची माहिती मी तुम्हाला आधी दिलेली आहेच.

वेगळ्या विषयावरचे पुस्तक असल्याने वितरक त्याला हात सुद्धा लावणार नाहीत हा आमचा कयास खराच ठरला. तसे हा ग्रंथ थेट पद्धतीनेच वितरीत करायचा व तो सुद्धा कोणाला भीड न पडता हे आधीच ठरवले होते. कोणीही तो भीडेखातर न घेणेच चांगले. जाणकारांच्या घरीच त्याचे योग्य स्थान आहे. या ग्रंथाची प्रेस नोट मी महाराष्ट्रात प्रसिद्ध होणार्या तब्बल ११ दैनिकांना पाठवली होती. चार ओळींची ही प्रेस नोट फ़क्त प्रहार व लोकमत ने छापली ! पुस्तकावर यथायोग्य परिक्षण लिहावे म्हणून सर्व संबंधिताना त्याची प्रत भेट म्हणून पाठवलि होती पण त्याची पोच सुद्धा कोणी दिली नाही. आणि अचानक नवाकाळच्या संपादकांनी स्वत: वडीलांच्या घरी फ़ोन करून उद्याचा अग्रलेख वाचा, तुमच्या ग्रंथावरच लिहेलेला आहे, असे शुभ वर्तमान दिले ! एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तुमच्या ग्रंथाचे छापील ५०० रूपयाचे मुल्य मी तुम्हाला बक्षिस म्हणून देणार आहे असेही घोषित केले ! माझ्या मते एखाद्या ग्रंथावर अग्रलेख लिहायचा प्रसंग विरळाच व तो बहुमान माझ्या वडीलांना मिळाला !

३१ ऑगस्टच्या नवाकाळमध्ये, आद्य शंकराचार्यांच्या रंगीत छायाचित्रासह पहिल्या पानवर छापलेला अग्रलेख दिसताच आम्ही सगळॆ हरखूनच गेलो. विरारला अंक सकाळी ९ च्या पुढे मिळतो, मला स्वत:ला अंक सीएसटीला मिळेपर्यंत १० वाजले ! पण विरारचा फ़ोन मात्र सकाळी ६ वाजल्यापासूनच अखंड खणखणत होता ! माझी १२ वर्षाची पुतणी, तिच्या नावानेच (’सानिका प्रकाशन’) ग्रंथ प्रकाशित झाला आहे, फ़ोनजवळच बसून होती, अगदी पुढचे २ दिवस ! त्या दिवसात तब्बल १०० पेक्षा जास्त प्रतींची विक्री झाली ! घरी येउनच तीसएक प्रती दर्दी वाचक घेउन गेले ! अनेक पुस्तक विक्रेते, अगदी दादरचा आयडीयल बुक डेपो सुद्धा, प्रती पाठवुन द्या म्हणून आर्जवाने सांगत होते ! पुस्तक विक्रीतुन फ़ायदा कमवायचा हेतु नव्हताच, तेव्हा शंकाराचार्यांचे सगळेच साहित्य माय मराठीत आणण्याचा वडीलांचा संकल्प दृढ झाला आहे. आता छोटीशी जाहिरात मोहीम सुद्धा राबवायचा विचार चालु आहे.

नवाकाळशी तसा आमचा घरोब्याचा संबंध आहे. वडील तब्बल १६ वर्षे नवाकाळ-संध्याकाळ साठी राशी-भविष्य लिहित होते. त्यांच्या खुशखुषीत लेखन शैलीवर वाचक फ़िदा होते व ते वाचण्यासाठी लोकांच्या उड्या पडत. वडीलांचे बोट धरून मी सुद्धा अनेकवेळा नवाकाळमध्ये जात असे. भाउंनी कधीतरी पाठीवर धपाटा सुद्धा मारला असेल तर कधी गाल ओढले असतील ! अर्थात या जवळकीतुन मी आमच्या कॉलेजातील मराठी. वाङय मंडळाचा वृत्तांत छापायला दिला होता. नवाकाळने तो कौतुकाने छापला होता व कॉलेजमध्ये प्राचार्यांनी कौतुक केल्याने माझी जी घौडदौड चालु आहे ती अगदी आजतागायत ! नवाकाळकारांना लाख लाख धन्यवाद ! तुम्ही आम्हाला कायमचे ऋणी करून ठेवले आहे !

मित्रांनो तुमचा प्रतिसाद सुद्धा हुरूप वाढवणारच आहे, धन्यवाद ! कृपया आपल्या भागातील ग्रंथालयाचा नाव, पत्ता, फ़ोन नंबर कळवत रहावा ही मात्र कळकळीची विनंती !

कळावे लोभ आहेच, तो उत्तरोत्तर वृद्धींगत व्हावा ही बिनती !!