मराठी ब्लॉग - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीतले अनुभव, स्वत:चे विचार, संस्कृत सुभाषिते, मुंबईच्या लोकलने रोज कराव्या लागणार्या प्रवासाचे अनुभव, इंग्रजीतले जे भावले त्याचा माय मराठीत अनुवाद आणि बरेच काही, जुन्या व गाजलेल्या हिंदी,मराठी गीतांच्या एम.पी.३ खजिन्याची किल्ली! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे.
शनिवार, १६ जुलै, २०११
“एन्ड गेम” चे पुनर्प्रकाशन.
गोष्ट वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
रविवार, १२ जून, २०११
बिनडोक बंडू !
अर्थात स्वस्थ बसेल तो बंड्या कसला. त्याने त्या एजंटलाच कळवून टाकले की काही दिवस कळ काढा, बाबांचे काही चेक जमा झाले की आपण हा व्यवहार पुरा करू. एजंटने लगेच कळवून टाकले की ७५००० हजार दिलेत तरी हरकत नाही, स्पेशल केस म्हणून मी माझ्या अधिकारात हा व्यवहार पुरा करू शकतो. आजच व्यवहार पुरा करा नाहीतर तुमचा क्लेम रद्द होईल !
बंड्या कसाही असला तरी दिल्या शब्दाला पक्का होता व व्यवहाराला अगदी चोख ! त्याने कळविले की व्यवहार म्हणजे व्यवहार, तुम्हाला लाखापेक्षा मी एक पैही कमी देणार नाही पण तुम्ही काही दिवस थांबणार असाल तर तुम्हाला मी लाखच काय दहा लाख द्यायला तयार आहे. काहीही करा पण या व्यवहाराला थोडी वाढीव मुदत मिळवा. सोबत पुरावा म्हणून बाबांच्या खाते उतार्याची पीडीफ प्रत त्याने अटॅच केली होतीच व सोबत एजंटने दिलेले खाते पेयी लिस्ट मध्ये अॅड केल्याची व त्या नावावर चार दिवसानंतर १ लाख ट्रान्सफर करायची सूचना नोंदविल्याची नोंद सुद्धा त्याने जोडली होती.
एजंटला सुद्धा बंड्याची सच्चाई कोठेतरी भिडली असावी. त्याने स्वत:हून बंड्याच्या बाबांच्या खात्यात २५००० रूपये जमा करायची तयारी दर्शविली. बंड्याने सुद्धा संकोच वाटत असला तरी हा प्रस्ताव मान्य केला पण या उपकाराच्या ओझ्याखाली दबलो गेल्यामुळे एक लाखाच्या ऐवजी दोन लाख त्या एजंटला देवू केले व तशी सूचना दुरूस्त केल्याचा पुरावा सुद्धा त्याला इमेलने सत्वर धाडला ! एजंटने सुद्धा लगोलग त्याच्या बाबांच्या खात्यात रूपये २५००० जमा केले.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आधीच्या एका प्रकरणातले २५००० व हे २५००० हजार मिळून बंड्याने बजाजची भारी बाइक घेतली आहे व बबलीला बॅकसीटला बसवून तो भटकत असतो हल्ली बेलापुर पर्यंत ! बंड्या बिनडोक आहे असे म्हणणार्या बाबांची बोलती बंद झाली आहे !
रविवार, १९ डिसेंबर, २०१०
दळवी काकांचे काय बरे झाले असेल ? ( भाग 2 )
दळवी काका युनियनचे काम करीत व त्यांच्या ओळखीही खूप होत्या. दळवी काकांची मी एक फाइलच बनविली व ओळख काढून थेट एका एसीपीलाच भेटलो. हा एसीपी खरेच भला माणूस निघाला. माझे म्हणणे त्याने अगदी शांतपणे ऐकून घेतले. काही मुद्दे क्लियर झाल्यावर त्यांनी मला थेट प्रश्न विचारला की तुम्हाला खरेच याच्या अगदी तळाला जायचे आहे ? मी हो असे ठामपणे सांगताच त्यांनी मग तुम्हीच दळवीकाका बेपत्ता असल्याची लेखी तक्रार आधी आम्हाला द्या असे सांगितले. मी तक्रार लागोलाग कागदावर लिहून काढली व त्यांना दिली. काही विचार करून त्यांनी हा तपास आता सीआयडी मार्फतच केला पाहिजे असे ठरविले. फोनाफोनी झाल्यावर हा तपास गुप्तचर विभागात नव्यानेच दाखले झालेले तरूण अधिकारी संग्राम भोसले यांच्याकडे सोपवायचे ठरले. मी भोसलेंशी तासभर चर्चा केली. भोसलेंनी सगळे शांतपणे ऐकून घेतले व तो आय.पी अॅड्रेस कोणाचा हे शोधणे व त्या घराच्या विक्रीच्या व्यवहाराचे सर्व पेपर तपासणे हे मुख्य काम असेल व मगच तपासाला नक्की दिशा मिळेल असे सांगितले. आम्ही दोघांनी परस्परांचे मोबाइल नंबर सेव केले व निरोप घेतला. भोसले मला मधून मधून फोन करून अपडेटस देणार होतेच.
इन्स्पेक्टर भोसले तडफेने कामाला लागले. मीरा-रोडच्या निबंधक कार्यालयातुन त्यांनी जागेच्या व्यवहाराची फाइल मागविली. सायबर सेलला आय.पी. अॅड्रेसवरून तो कोणाचा आहे ती माहिती मागविली. आमच्या पेन्शन विभागातुन दळवींच्या सही व अक्षराचे नमुने गोळा केले. पासपोर्ट कार्यालयाकडून त्यांनी जेडी दळवी व त्यांच्या मुलीचा पासपोर्ट आहे का व असल्यास त्याच्यावरच्या नोंदी मागविल्या. बोगस कागदपत्रांच्या आधारे जागेचे हस्तांतरण केले गेले होते व ज्या इस्टेट एजंटाने हा व्यवहार केला होता त्याचा आय.पी. अॅड्रेस, पोस्ट वर दळवी जिवंत असल्याची कॉमेंट देणार्याशी तंतोतंत जुळत होता. जागेचे हस्तांतरण सोसायटीच्या मंजूरी शिवाय होतच नसल्याने संस्थेच्या सचिवाचे वागणे सुद्धा संशयास्पद होते. पोलीसी पाश आता सर्व संशयितांभोवती आवळले जावू लागले होते. गुप्तपणे त्यांची प्रत्येक हालचाल टीपली जात होती. प्रकाश घोडके हा इस्टेट एजंट त्या भागात भाईगिरी सुद्धा करीत होता. अनेकांना दमबाजी करून, प्रसंगी मारहाण करून सुद्धा त्याने जागा खाली करून घेतलेल्या होत्या. त्याच्या गुंडगिरीमुळे याची कोणी वाच्यता केली नव्हती किंवा पोलिस ठाणेसुद्धा त्याने बांधून ठेवले असावे. दळवी व त्यांच्या मुलीचे बेपत्ता होणे व त्यांच्या जागेची बोगस कागदपत्रांच्या आधारे विक्री करणे हे दोन वेगवेगळे गुन्हे होते. घोडके बनावट कागद बनवून फ्लॅट विकण्याच्या कटात सहभागी होता हे निश्चित पण त्याने दळवी वा त्यांच्या मुलीचे अपहरण, खून केला असे सिद्ध करणे कठीण होते. बरेच दिवस जागा बंद बघून त्याने ती विकली असेल हे सुद्धा गृहित धरायला हवे होते. दरम्यानच्या काळात पासपोर्ट विभागाकडून मागितलेली माहिती मिळाली. त्यावरून दळवींकडे वैध पासपोर्ट होता तरी ते देशाबाहेर गेल्याची नोंद नव्हती पण त्यांची मुलगी मात्र आपल्या नवर्याबरोबर अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी रवाना झाली. तारीख होती दळवी बेपत्ता झाल्याचा दूसराच दिवस ! पासपोर्ट कार्यालयाकडून दळवींच्या जावयाचा भारतातला पत्ता मिळाला. पोलिस त्या पत्त्यावर गेले तेव्हा त्यांना माहिती मिळाली की दळवींना हे आंतरजातीय लग्न अजिबात पसंत नव्हते. एकुलत्या एक मुलीने कायमचे परदेशात सेटल व्हावे हे त्यांना साफ नामंजूर होते. मुलीच्या सासर्यांशी त्यांनी अजिबात सख्य ठेवले नव्हते. दळवींच्या मुलीला नवर्याने परदेशात बोलाविले होते. अगदी शेवटच्या दिवशी ती हे सर्व काकांना सांगणार होती पण त्या दिवशी सकाळी घराबाहेर पडलेले काका रात्री उशीरापर्यंत घरी आले नव्हते. दूसर्या दिवशीच्या विमानाने अमेरिकेला जायचे असल्याने घरी चिठी सोडून ती सासरच्या घरी आली होती. शेवट पर्यंत अर्थात दळवी तिला भेटलेच नाहीत. अमेरिकेत गेल्यावर सुद्धा मुलगी वडीलांनी काहीच संपर्क न साधल्याने काळजीत होती. सासर्यांकरवी तिने वडील बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. अर्थात त्याचा पाठपुरावा करायला सासरचे कोणीच उत्सूक नव्हते. घोडके या एजंटाने दळवींच्या नावाने कॉमेंट टाकताना मुलीबरोबर अमेरिकेत असल्याचा नेमका उल्लेख कसा केला मग ? त्याला हे कसे कळले असेल ?
भोसलेंनी मग मध्यरात्री प्रकाश घोडके, त्याचे तीन साथीदार, सदनिका हस्तांतरणाला ना हरकत प्रमाणपत्र देणारा सोसायटीचा सचिव यांना उचलले व लॉकअप मध्ये टाकले. घोडकेच्या घरावर धाड टाकून अनेक गोष्टी जप्त केल्या गेल्या. त्यात होते एक चांदीचे नाणे, मुंबई बंदरातील कामगारांच्या पतसंस्थेने आपल्या रौप्य महोत्सवाबद्दल ते सर्व सभासदांना दिलेले होते ! म्हणजे घोडके व दळवी एकमेकांना भेटले होते याची शक्यता खूपच जास्त होती. पहिली विकेट पडली सोसायटीच्या सचिवाची ! पोलिसांच्या प्रश्नांच्या फैरीने तो पार गारद झाला व 25000 रूपयाच्या मोहापायी फारशी विचारपूस न करता या सर्व व्यवहाराला आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र त्याने जारी केले होते. अर्थात ज्याने जागा विकत घेतली तो मात्र या सर्वांविषयी अनभिज्ञ होता. घोडके व त्याचे तिन साथीदार मात्र चांगलेच निर्ढावलेले होते. ते ताकास तूर लागू देत नव्हते. सचिवानेच आम्हाला हा व्यवहार करायला भाग पाडले असा त्यांचा बिनतोड बचाव होता. चांदीचे नाणे म्हणे गोदीतल्या एका मित्राने त्याला दिले होते ! मला ब्लॉगबिग काहीही माहीत नाही, मी कोणतीही पोस्ट वाचलेली नाही, कोणीतरी माझे कनेक्शन हॅक करून हे सगळे केले असावे. त्या जागेचा सगळा व्यवहार रोखीत केला असे त्याने सांगितल्यावर जागेच्या विक्रीच्या पैशाचा माग काढायचा मार्ग सुद्धा खुंटला होता. पण भोसले हार मानाणार्यातले नव्हते. प्रकरणात काहीतरी काळेबेरे नक्की होते. त्यांनी घोडके व त्याच्या तिन साथीदारांना वेगवेगळ्या खोलीत डांबले. घोडकेकडे अजिबात लक्ष दिले नाही पण त्याच्या तिन साथीदारांना बोलते केले. केसचा गुंता आता उलगडू लागला होता. त्याच रात्री बाराच्या ठोक्याला भोसले दोन साथीदार घेवून घोडकेच्या लॉक अप मध्ये घूसले. आपल्या साथीदारांनी कबुली दिली असे समजूनही घोडके तोंड उघडायला तयार नव्हता. तेव्हा थर्ड डीग्री वापरण्याशिवाय गत्यंतर नव्हते. थोड्याच वेळात इस्टेट एजंट घोडकेचे उरलेसुरले अवसान गळाले व तो पोपटासारखा बोलू लागला.
’त्या’ काळरात्री घोडके व त्याचे साथीदार मीरा रोड स्टेशनजवळच जमले होते. रात्री उशीरा दळवींना त्यांनी घरी जाताना बघितले व घोडकेला शोधत असलेली नामी संधी मिळाली. या आधी त्याच्या विनंतीला व मग दमदाटीला काकांनी अजिबात भीक घातली नव्हती व जीव गेला तरी जागा विकणार नाही, तुझ्यासारखे छप्पन बघितले असे त्याला सुनावले होते. आता दळवी एकटे होते व रस्तासुद्धा निर्मनुष्य होता. दळवींना त्याच्या साथीदारांनी धरले व फरफटत मोटारीत कोंबले. निर्जन जागी गाडी उभी करून त्यांनी दळवींना अमानुष मारहाण केली. मार देताना मात्र मुका दिला गेला. शरीरावर मारहाणीची कोणतीही खूण दिसणार नाही याची काळजी घेतली होती.पण दळवी कोर्या कागदावर सही करायला तयार झाले नाहीत, म्हातारे असले तरी दळवी हाडापेराने मजबूत होते, त्यांना तावडीत ठेवणे सोपे नव्हते. आता दळवींना जिवंत सोडणे सुद्धा धोक्याचे होते. लोखंडी कांब त्यांच्या डोक्यात घालून त्यांना संपविले गेले. त्यांचे सर्व खिसे उलटपालटे करून त्यातल्या सगळ्या वस्तू त्यांनी ताब्यात घेतल्या. त्यात घराची किल्ली सुद्धा होतीच. मग त्यांचा मृतदेह रूळावर टाकून ते रात्री दोन एकच्या सुमारास त्यांच्या घरात शिरले. घरात मुलीने सोडलेली चिठ्ठी त्यांना मिळाली. घरातले सोने-नाणे, रोख रक्कम त्यांनी लंपास केली व थेट शिर्डी गाठली. सात दिवसाने ते मीरा-रोडला परतले. नंतरचे चार महिने काहीही गडबड झालेली नाही हे बघून जागा विकण्यासाठी ते सज्ज झाले. बाप मेलेला, मुलगी अमेरिकेला गेलेली इतर कोणीही नातेवाइक नाही, तेव्हा बोगस पेपर बनवून ती जागा विकून टाकणे त्यांना जड गेले नाही. सचिवाचे तोंड बंद केले होतेच. ती जागा विकून त्यांनी तब्बल 40 लाख रूपये कमाविले होते. जागेची विक्री केल्यावर त्या व्यवहारासंबंधी चौकशी करायला काकांच्या मित्राचा मुलगा आला होता त्याला त्यांनी पटेलशी कारणे देवून वाटेला लावले होते. काही दिवसापुर्वी मात्र त्याचा साथीदार अशोक कांबळेने त्याला ब्लॉगवर असलेली एक गोष्ट दाखविली. इतरांना ती गोष्ट काल्पनिक वाटली तरी घोडके चांगलाच टरकला. चोराच्या मनात चांदणे. अमेरिकेत असलेली मुलगी हा ब्लॉग नक्की वाचणार व चौकशीच्या भोवर्यात आपण अडकणार अशी भीती त्याच्या मनावर अशोकने ठसविली. फोन करण्यात धोका होता तेव्हा त्या पोस्टवरच दळवी जिवंत आहेत अशी कॉमेंट टाकण्याची बिनतोड आयडीया त्याला सूचली ! अर्थात असे करताना आय.पी. लॉग होतो हे त्यांच्या डोक्यात आलेच नाही. त्या कॉमेंट मुळेच आपले पाप उघडकीला आले यावर एरवी त्याचा विश्वासही बसला नसता ! पोलिसांनी दळवींच्या मुलीच्या सासर्याला व मग सासर्यांनी तिच्या नवर्याला या सर्व प्रकरणाची कल्पना फोन करून दिली. दळवींची मुलगी गरोदर असल्याने धक्का बसेल म्हणून तिला सध्या याची काहीही कल्पना द्यायची नाही असे ठरले.
त्यांनी खून तर व्यवस्थित पचविला होता, जागा विक्रीचा व्यवहारही बिनबोभाट पार पडला होता, अगदी कोणताही पुरावा त्यांनी मागे सोडला नव्हता. त्यांनी जरी काही माग सोडला नाही तरी जेडीकाकानीच माग मागे सोडला होता. एरवी ते कार्ड जर मी त्यांना परत केले असते तर अशी अभद्र शंका माझ्या मनात यायचे काहीही कारणे नव्हते. माझी पोस्ट वाचून ते गुन्हेगार गप्प राहिले असते तरी फारसे काही होणार नव्हते. कदाचित त्यांचा गुन्हा उघडकिला आलाच नसता. एवढे सगळे होवूनही भोसले समाधानी नव्हते. त्यांच्या मते गुन्हा उघडकीला येणे वेगळे व तो न्यायालतात सिद्ध होणे वेगळे. सगळे धागे-दोरे नीट जुळले असते तरी दळवींचा मृतदेह जो पर्यंत हाती लागत नाही, अगदी त्याचा अवशेष , तो पर्यंत खुनाचा आरोप शाबित करणे कठीण आहे. घोडकेने जरी मृतदेह रेल्वे रूळावर ठेवल्याची कबूली दिली असली तरी कोणत्याच पोलिस स्टेशनातल्या रूळावरील मरणाच्या नोंदीत त्याचा पडताळा येत नव्हता. कदाचित घोडकेने मृतदेहाची दूसर्या मार्गाने विल्हेवाट लावली का हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्याचा कमालीचा छळ केला पण तरीही घोडके रेल्वे मार्गावर मृतदेह टाकला या म्हणण्यावर ठाम राहिला. आरोपपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पोलिस थांबले पण कोणताही इनपुट न मिळाल्याने पोलिसांनी प्रत्यक्ष मारहाणीत कमी सहभाग असलेल्याला माफीचा साक्षीदार केले. पोलिसांनी पत्रकार परिषद घेवून या सर्व गुन्ह्याची उकल कशी केली ते कथन केले. सर्वच क्षेत्रातुन पोलिसांचे कौतुक झाले. आपली पहिलीच केस तडफेने सोडविणार्या निरीक्षक भोसलेंना पोलिस पदक मिळाले. घोडके व त्याच्या दोन साथीदारांवर फसवणुक, अपहरण, मारहाण, जबरी चोरी, खून व मृतदेहाची विल्हेवाट लावणे असे आरोप लावले गेले. सोसायटीच्या सचिवावर सुद्धा खटला चालविला गेला. खटला कोर्टात भयंकर गाजला. त्याची रोजची सुनावणी अनेक वर्तमानपत्रे पहिल्या पानावर छापत होती. दळवी काकांचा खून झाला असे उघड झाले असले तरी त्यांच्या मृतदेहाचे काय झाले या विचाराने मी मात्र अस्वस्थच होतो.
खटल्याची सर्व सुनावणी पुर्ण झाली, निकालाला अजून थोडा अवधी होता. गुन्हेगारांना जबर शिक्षा होणार याची खात्री असली तरी त्यांना फाशी होणार नाही याचे दु:ख होतेच. अचानक इन्स्पेक्टर भोसल्यानी फोन करून मला ताबडतोब त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले, त्यांचा आवाज भलताच उत्तेजित वाटत होता. मी टॅक्सी करून पोलिस मुख्यालय गाठले. भोसल्यांना भेटायला कोणी मारवाडी आला होता. सुरतमध्ये एक मोफत रूग्णालय व त्याला जोडूनच एक अनाथाश्रम तो चालवित होता. त्याने सांगितलेली माहीती विस्मयकारक होती. त्याला नक्की तारीख आठवत नसली तरी साधारण वर्षापुर्वी शेवटची लोकल पकडून तो विरारला चालला होता. गाडी आधी सिग्नलला थांबली होती. पिवळा सिग्नल मिळताच गाडी वेग घेत असतानाच मोटारमन जोरजोरात हॉर्न वाजवित होता म्हणून त्यांनी दारातुन बघितले. रूळावर कोणी व्यक्ती आडवी पडली होती व हॉर्नचा आवाज ऐकून सुद्धा बाजूला होत नव्हती.गाडी हळू असल्याने ती थांबविणे मोटारमनला शक्य झाले. या मारवाड्याने गाडीतुन उडी मारली व त्या माणसाला रूळातुन बाजूला काढले. तो अर्धवट शुद्धीत होता. त्यांनी त्याला डब्यात घेतले. विरारला गाडी आल्यावर रीतसर तक्रार नोंदवून उपचारासाठी त्याला संजीवनी रूग्णालयात त्या मारवाड्याने दाखल केले. रूग्ण बरा झाला तरी डोक्याला मार लागल्याने त्याला बोलता येत नव्हते. त्याच्या खिषात काहीच नव्हते, मुका मार व बसलेला धक्का या मुळे तो आपल्या संवेदनाच हरवून बसला होता. शेवटी या मारवाड्यानेच त्याला आपल्या अनाथाश्रमात आणले. पेपरात रोज येत असलेली केसची सुनावणी त्याच्या कानावर आली होती व तो थेट भोसल्यानांच भेटायला आलेला होता. आम्ही लगेचच त्या मारवाड्याच्या गाडीतुन सुरतला निघालो. व्हिलचेयर बसलेला ’तो’ माणूस म्हणजे दळवी काकाच होते ! खरेच काका जिवंत होते. डोक्यात रक्ताच्या गुठळ्या झाल्याने त्यांना स्मृती दगा देत होती. बोलता येत नव्हते व हाता पायात त्राण उरले नव्हते. मला बघितल्यावर त्यांच्या चेहर्यावरचे भाव झरझर बदलत गेले व शेवटी तो ताण त्यांना असह्य झाला व हाताने त्यांनी डोके गच्च दाबून धरले व मला निघायची खूण केली. डॉक्टरांच्या मते थोडी खर्चिक शस्त्रक्रीया केल्यास गुण येण्याची खूप शक्यता होती. दळवी जिवंत असल्याने त्यांच्या मुलीला सगळी कल्पना दिली गेली. तिने लगेचच भारतातच यायचे ठरविले. वडीलांवर शस्त्रक्रीया करण्यास तिने परवानगी दिली व पैशाची सुद्धा सोय केली.
दळवी जिवंत असल्याने पोलिसांनी नवीन घडामोडींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले व सुधारीत आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी व मुदत मागितली ती अर्थातच न्यायालयाने मान्य केली. आपल्या मुलीला त्यांनी लगेच ओळखले . दरम्यान दळवींवरील शस्त्रक्रीया यशस्वी झाली. ते चांगले चालते-बोलते झाले, भूतकाळातील गोष्टी त्यांना हळूहळू आठवू लागल्या. भारतातले सर्व सोपस्कार झटपट उरकून मुलगी त्यांना घेवून सरळ अमेरिकेलाच रवाना झाली. मधल्या काळात न्यायालयाने आरोपींना 2 ते 10 वर्षाच्या सश्रम कारावासाच्या सजा सुनावल्या, या तपासासाठी पोलिसांनी घेतलेल्या परीश्रमाची न्यायालयाने खास दखल घेवून त्यांचे मुक्त कंठाने कौतुक केले. भारतात प्रथमच आय.पी. अॅसड्रेसचा वापर पुरावा म्हणून केला गेला होता व न्यायालयाने सुद्धा त्याची दखल घेतली होती. माझ्या ब्लॉगगिरीचे सुद्धा कौतुक झालेच !
आता माझ्या मनात काहीही शंका उरली नाही ! नि:शंक पणे मी आता लिहू शकतो की हो, की दळवी काका जिवंत आहेत, अमेरिकेत आहेत आपल्या मुलीकडे --- व हो आता नातवासोबत सुद्धा, मजेत आयुष्य घालवित आहेत !
शुक्रवार, १७ डिसेंबर, २०१०
दळवी काकांचे काय बरे झाले असेल ?
त्यानंतर साधारण महीना झाला असेल. मी नवीन पाकिट घेतले व पहिल्या पाकिटातल्या सर्व कामाच्या वस्तू नवीन पाकिटात भरू लागलो. दळवी काकांचे कार्ड सुद्धा त्यात दिसताच मी चमकलो, कमाल झाली, म्हणजे त्या दिवशी मी ते कार्ड त्यांना परत केलेच नाही व त्यांनी सुद्धा परत मागितले नाही. दळवी काकांच्या घरी मी लगेच फोन लावला. बेल तर वाजत होती पण कोणी फोन उचलत नव्हते. दूसर्या दिवशी वेगवेगळ्या वेळी मी त्या नंबरावर फोन लावत होतो व कोणी तो घेत नाही म्हटल्यावर मी जरा चरकलोच. काय झाले असेल ? या घटनेने माझी अस्वस्थता एवढी वाढली की शेवटी मीरा-रोडला त्यांच्या घरी जायचे मी ठरवले. तिकडे गेल्यावर मात्र अधिकच चक्रावलो. घराला कुलुप होते म्हणून शेजार्यांकडे चौकशी केली तर कळले की ते बराच काळ , निदान एक महिना घरी आलेलेच नाहीत. त्यांची नोकरी करणारी मुलगी सुद्धा आलेली नाही. दार बंदच आहे. हे सांगत असतानाच पेपरवाला अजूनही त्यांच्या दारात टाकत असलेल्या पेपरचा ढीग त्यांनी दाखविला. मी ते जुने पेपर चाळले तेव्हा मला अजून एक धक्का बसला, माझ्या घरून ते रात्री जे निघाले होते ते अजून घरी पोहचलेच नव्हते ! कोणा नातलगाकडे गेले म्हणावे तर मुलीचे काय ? ती का घरी येत नाही अजून ? त्यांची ओळख पटविणारे कार्ड माझ्याकडेच राहिले म्हणून मला एकापेक्षा एक अभद्र शंकांनी पार पोखरून टाकले. माझ्या घरून निघताना त्यांना अपघात झाला असल्यास त्यांची ओळख कशी पटणार होती ? मदत करणारा वा पोलिस तरी कोणाशी संपर्क साधणार होते ? कदाचित ओळख पटविणारी अजून एखादी खूण त्यांच्या खिषात असू सुद्धा शकते, उदा. पास – पण नाही, ते तर निवृत्त झाले आहेत पाच वर्षापुर्वीच, आता कशाला पास ठेवत असतील ? त्यांच्याकडे एखाद्या बँकेचे कार्ड असण्याची शक्यता सुद्धा कमीच होती – आणि तसे असते तर त्यांच्या घरी निरोप घेवून कोणीतरी आले असतेच ना ? शेजार्यांकडे नक्की चौकशी झाली असती, पण तसे काहीही झाले नव्हते. काय बरे झाले असेल दळवी काकांचे ?
जसे जसे दिवस जात होते , माझ्या डोक्यातुन दळवीकाकांचे काय झाले असावे हा किडा जरा कमी वळवळू लागला होता. पण केव्हातरी अकस्मात ही गोष्ट आठवून खंत वाटायचीच. असेच एकदा मला सूचले की दळवी काका महिन्याचे पेन्शन तरी घेत असतील , त्यावरून काही तपास लागू शकेल. मी लगेच आमची पेन्शन ब्रँच गाठली. दळवी काकांनी पेन्शन न घेता फंडच घेतला होता तेव्हा तो मार्ग सुद्धा बंद झाला ! त्यांच्या सोबत निवृत्त झालेल्यांना जसे जमेल तसे गाठून दळवींचा पत्ता विचारला पण दुर्दैवाने काका त्या कोणाच्याच संपर्कात नव्हते. परत पुढचे काही दिवस दळवी काकांचे काय झाले असेल या प्रश्नाने पोखरून टाकले ! मग मी अनेक पोलिस ठाणी पालथी घातली, त्या दिवशी नोंदलेल्या गेलेल्या अपघाती मृत्यूंच्या सर्व केसेस तपासल्या. ज्यांची ओळख पटली नाही अशा एक-दोन केस सापडल्या पण फोटोवरून काहीही ठोस निष्कर्श मात्र मला काढणे शक्य झाले नाही. असेच एकदा त्यांच्या मुलीचा नेटवरून धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला, ऑर्कुट, फेसबुक, ट्वीटर – सगळे ट्राय करून बघितले पण हाती काहीही लागले नाही. असेच वर्ष उलटले. वाटणारी टोच, खंत बरीच कमी झाली होती आणि अचानक कळले की युनियनने डी.ए संबंधीची एक जुनी केस जिंकली. तिचा परीणाम म्हणून 1985 ते 1988 या काळात निवृत्त झालेल्यांना लाखभराची थकबाकी मिळणार आहे. म्हणजे दळवींच्या घरी सुद्धा चेक गेला असणारच, काय झाले असेल त्याचे ? मी परत पेन्शन विभागात गेलो. परत धक्का बसला – पत्र चक्क “या नावाचा कोणी इथे रहात नाही” असे लिहून परत आले होते ! कदाचित मधल्या काळात काकांनी जागा विकली सुद्धा असेल , याचा अर्थ माझ्या घरून गेल्यावर तरी निदान ते बराच काळ जिवंत होते. म्हणजे स्वत:ला दोषी मानायची काही गरज नाही, मनावरचे ओझे अचानक हलके झाल्यासारखे वाटले पण तरीही एकदा मीरा-रोडला जावून आल्या शिवाय मला चैन पडणार नव्हतीच.
मीरा रोडला दळवींच्या घरावर आता पाटी नव्हती. म्हणजे ते इकडे राहत नाही हे तर नक्की झाले ! नवीन घर घेतलेली व्यक्ती त्यांना नक्की भेटली असणारच तेव्हा त्यांच्याशी बोललो की सगळ्या शंका फिटल्याच ! पण नाही – नवीन राहात असलेला भाडोत्री होता, त्याने एका एजंट मार्फत ही जागा भाड्याने घेतलेली होती. सोसायटीच्या सचिवाने पॉवर ऑफ अॅलटॉर्नीच्या सहाय्याने सगळा व्यवहार झाला असल्याने दळवी इथे यायचा प्रश्नच उपस्थित होत नाही असे सांगितले. एजंटने फार कामात असल्याचे दाखवून मला बाहेरचा रस्ता दाखविला तेव्हा मात्र मला अजून एका शंकेने घेतले. नक्कीच काहीतरी काळेबेरे असले पाहिजे. एकटा म्हातारा माणूस बघून कोणीतरी षडयंत्र रचून त्यांचे घर बळकाविले असण्याची शक्यता होतीच शिवाय त्यांचा जीव सुद्धा कशावरून घेतला नसेल ? पैशाकरीता हल्ली कोण काय करेल याची आपण कल्पनासुद्धा करू शकणार नाही. पण मग त्यांच्या मुलीचे काय झाले असेल ? ती कोठे गायब झाली ?
पोलिसात तक्रार तरी काय आधारावर द्यायची ? निव्वळ त्यांची ओळख पटविणारे कार्ड ते माझ्या घरी विसरले व मग त्यांचा पत्ता लागत नाही अशी तक्रार दिली तर पोलिस मलाच आत टाकतील , वर्षभर का गप्प बसलात असे विचारल्यावर काय सांगायचे ? परत त्यांची तरूण मुलगी गायब आहे असे सांगितले तर अजून गोत्यात येवू ! या निमित्ताने मी त्यांची जी महिती काढली ती पोलिस माझ्या विरूद्धच पुरावा म्हणून वापरतील ! नकोच ते !
बस झाल्या या शंका-कुशंका ! दळवी काकांचे काय झाले हा विचार आता मनातुन काढून टाकायलाच हवा ! नाहीतर मलाच वेड लागेल वेड ! पण तुम्हाला काय वाटते ? काय झाले असेल ’त्यांचे’ ? काय अजून करायला हवे होते मी ? त्यांचे कार्ड जर मी त्यांना लगेच परत केले असते तर हा सगळा गुंता झालाच नसता ! तसेही मग दळवी कधी आपल्या घरी आले होते हे सुद्धा मी विसरलो असतो ! पण ------ खरेच काय झाले असेल दळवीकाकांचे ?
रविवार, २१ मार्च, २०१०
युजर आय.डी. D1O115 !
संगणकाचा आमच्या गोदी विभागात बर्यापैकी वापर सुरू झाला होता पण त्यातल्या माहितीची सुरक्षा व गैरप्रकार टाळणे या बाबतीत मात्र सगळे पुर्णपणे अनभिज्ञ होते. त्याने काही फारसे बिघडले नाही कारण संपूर्ण सिस्टीमची माहिती माझ्यासकट दोघा-तिघांनाच होती. जेव्हा सर्वच काम ऑनलाइन झाले तेव्हा मात्र हा व्याप सांभाळणे आमच्या आटोक्याबाहेरचे झाले. तिन पाळ्यात चालणार्या संगणक कक्षाची धुरा सांभाळण्यासाठी निदान १० माणसे तरी हवी होती व त्यातल्या चौघांना सिस्टीमची आमच्याएवढीच माहिती असणे आवश्यक होते. आज काही गैरप्रकार झाला नाही पण पुढे होणारच नाही असेही नाही, तेव्हा संगणक सुरक्षा धोरण आखले गेले. सुपर युजरला सर्वाधिकार, त्याच्या खाली कोर ग्रूपला थोडे कमी अधिकार व एन्ड युजरला फक्त त्याच्या कामापुरत्या मोड्युलचा पर्याय, त्यातही एडीट, डिलिट असे पर्याय न देता. युजर आय.डी म्हणून अनेक पर्याय तपासल्यावर शेवटी प्रत्येक कर्मचार्याचा पीएफ नंबर घ्यायचे ठरले. एक डीफॉल्ट पासवर्ड युजर बनवताना ठेवायचा व पहिल्याच वेळी त्याला तो बदलायला लावायचा अशीही सोय केली गेली. पासवर्ड हवा तेव्हा बदलायची सोय सुद्धा मागाहून दिली गेली व “पासवर्ड विसरलो “ ला उपाय म्हणून आम्हाला फोन केल्यावर रीसेट करून देण्याची सुद्धा सोय होती. युजर लॉग हा प्रकार बर्याच उशीरा सुरू झाला पण तो सुद्धा खूप मर्यादित स्वरूपाचा होता. एखादी नोंद ज्याने शेवटची एडीट केली असेल त्याच्या युजर आय.डीची नोंद संगणक करायचा. नक्की काय बदल केला हे मात्र समजायला काही मार्ग नव्हता ! हे सर्व लोकांच्या पचनी पडायला खूप महिने जावे लागले व प्रचंड गोंधळाला आम्हाला तोंड द्यावे लागले होते. एवढे होउनही संगणकापासून दूर जाताना लॉग ऑफ व्हायची सवय मला सुद्धा नव्हती. सुरवातीला सिस्टीम हँग होण्याचे प्रकार खूप होत पण आम्हाला फोन करायची तसदी न घेता स्विच ऑफ-ऑन तंत्राने लोक काम सुरू करीत. या मुळे संपूर्ण प्रणालीचा वेग मंदावत असे. यावर उपाय म्हणून एक युजर एका वेळी एकाच ठीकाणी काम करू शकेल अशी सोय आम्ही करून घेतली. यामुळे जोपर्यंत आम्ही लटकलेली प्रोसेस किल करीत नाही तो पर्यंत त्या युजरला दूसरीकडून काम करणे अशक्य झाले ! एकाने दूसर्याचा पासवर्ड वापरून काम करण्याला त्याने आपसूकच आळा बसला ! पासवर्ड सुद्धा आद्याक्षरे व १२३ असेच बहुतेकांचे असायचे व अजूनही असतील ! पासवर्ड तुम्हीच द्या असे सांगणारे सुद्धा महाभाग होते. मी व अजून तिघांना सिस्टीमचे पूर्ण अधिकार होते व बाकी सहा जण कोर ग्रूपमध्ये होते व तिन शिफ़्टमध्ये कामाला येत.देवाच्याच दयेने काही गैरप्रकार घडला नव्हता … निदान उघड तरी झाला नव्हता !
त्या दिवशी एक नोंद दुरूस्त करायला माझ्याकडे शिपायामार्फत आली. खरेतर ती आदल्या दिवशीच कोणीतरी दुरूस्त केली होती पण शेरा भलत्या ठीकाणी टाकला होता. मी ही चूक करणारा मुर्ख कोण हे बघितले तेव्हा ते काम मीच केल्याची नोंद मिळाली ! असे काही निदान काल तरी केल्याचे मला आठवत नव्हते पण मग … ? पुढे कामाच्या रगाड्यात मी ती बाब पार विसरून गेलो. दूसर्या दिवशी रविवार होता पण मला आमच्या रोटेशन प्रमाणे कामावर यायचे होते. कामावर येताच मला आमच्या प्रोग्रामरने ठेवलेली नोट मिळाली. त्यात म्हटल्याप्रमाणे “MOST URGENT” असे लिहिलेले पाकिट त्याला अगदी निघताना मिळाले होते. त्यात दिलेल्या १३ नोंदीचा युजर लॉग हवा होता. रविवारी कामावर मीच येणार आहे म्हटल्यावर त्याने ते काम माझ्यावरच सोपविले होते. छोटे मोठे प्रोग्राम लिहायचे म्हणजे मला उत्साहाचे भरते येते. १३ नोंदी एक-एक करून शोधण्यापेक्षा मी एक रीपोर्ट प्रोग्राम लिहिला. त्या नोंदीची एक बॅच फाइल बनवून घेतली. एक-दोन प्रयत्न केल्यावर रीपोर्ट बनला. युजर आय.डी, तारीख, जहाजाचे नाव हे सगळे बरोबर आले पण युजर आय.डी वरून नाव काही आले नव्हते. मी परत एकदा सगळे तपासले, चूक तर काहीच नव्हती. मग त्या नोंदींबरोबरच अजून काही नोंदी तपासल्या, नवीन टाकलेल्या नोंदीमध्ये नाव आले हव्या असलेल्या नोंदीचे नाव मात्र आले नाही ! आता मात्र मी चक्रावलो ! साला प्रकार काय आहे ! बघू तरी कोण आहे हा युजर ज्याचे नाव येत नाही ते ! युजर आय.डी. चेक करताच मला अजून एक धक्का बसला ! तो पी.एफ. नंबर माझाच होता, D10115 ! मी मग माझा युजर आय.डी टाकून तोच प्रोग्राम परत रन केला, उगीच वेळ वाया जाऊ नये म्हणून साधारण मागचा एक आठवडाच तपासला. या वेळी मात्र माझे नाव आले ! डोक्यात कोठेतरी धोक्याची घंटा वाजू लागली. नक्की काय बदल केले असतील हे कळण्यासाठी मी त्या सर्व जहाजांच्या कस्टम्सकडून आलेल्या मूळ फाइल चेक केल्या. जेव्हा माझा तपास पूर्ण झाला तेव्हा मात्र कोणीतरी मला चांगलेच अडकविले होते याची खात्री पटली. हव्या असलेल्या सर्वच नोंदीत वजन कमी केले गेले होते. गोदीत आयात केलेला माल ठराविक मुदतीतच सोडवून घ्यायचा असतो अन्यथा जबरी भूर्दंड आकारला जातो व हा मालाच्या वजनावर, प्रति टन आकारला जातो ! सर्व आयात पोलादाची होती व त्यात कमी वजन करून करोडो रूपयाचा भूर्दंड बुडविला गेला होता. हा प्रकार केव्हातरी कळणार होताच व तसेच झाले होते. चौकशी सुरू झाली होती व तिचाच भाग म्हणून ही माहिती मागविली गेली असणार ! माझेच नाव त्यात गोवले जाणार होते व मग पोलिस चौकशी, अटक, खटला, निलंबन, हकालपट्टी , बदनामी या गोष्टी अटळ होत्या !
मी असे काही केले नाही याची मला खात्री असली तरी ते पटविणे, सिद्ध करणे शक्य नव्हते. माझा पासवर्ड वापरून कोणीतरी हे केले असे म्हणणे चौकशीत कोणी ऐकून घेणार नव्हते. बरे मी काम करत असताना दूसरा कोणी तोच युजर आय.डी वापरून काम करणे सुद्धा अशक्य होते. एकदा एका युजर आय.डीची नोंद झाल्यावर तसाच दूसरा आयडी बनविणे सुद्धा शक्य नव्हते ! बरे मी नाही मग कोणी हे सुद्धा कळणे गरजेचे होते. याच्यापुढे त्या युजर आयडीचा वापर करता येणार नाही असे करणे शक्य होते पण आधी गफला झाला होता त्याचा खुलासा मी काय देणार होतो ? अजून एक गोष्ट सूचली, युजर कोणी बनविला याचा लॉग तपासणे --, पण दुर्दैवाने तशी काही सोय नव्हती ! अर्थात मीच संगणकापासून लांब असताना कोणी तसा बनविला असेल तर ? पण तसे कसे शक्य होते ? माझा आय.डी. होताच ना आधीपासून ! विचार करून करून डोक्याचा पार भुगा झाला. चक्रव्युहात पुरता अडकलो होतो व बाहेर जायची वाट काही सापडत नव्हती. काही वेळाने मी तिन महिन्यापुर्वीच्या नोंदीचा लॉग रीपोर्ट बनविला. त्या इतर सर्वाच्या नावाबरोबरच माझे नाव सुद्धा आलेले होते पण ४० नोंदीत माझा पी.एफ. नंबर होता पण नाव नव्हते ! प्रणालीत एकाच युजर आयडीच्या दोन नोंदी टाळण्यासाठी टाकलेला चेक काम करत नव्हता असा त्याच्या अर्थ घ्यायचा का ? मी लगेच तसे करून बघितले तेव्हा “User I.D. already exists!” असा मेसेज मिळाला. एका टर्मिनलवर लॉगिन केले व बाजूच्या टर्मिनलवर त्याच आयडीने लॉगिन करायचा प्रयत्न केला तेव्हा “User already active, contact core group” असा मेसेज मिळाला. म्हणजे सर्व चेक तर व्यवस्थित काम करीत होते. मग माझ्याच आय.डीच्या दोन नोंदी कशा ? आणि जिकडे काही गैरप्रकार झालेला आहे त्या सर्वच नोंदीत माझाच आयडी कसा ?
काहीच उपाय सूचेना तेव्हा मी प्रोग्रामरला ताबडतोब कामावर यायची विनंती केली. तासाभराने तो आला. आता मी बराच सावरलो होतो व कोणत्याही प्रसंगाला सामोरे जायची माझी मानसिक तयारी झालेली होती. आधी चहा मागविला व तो आल्यावर त्याचे घोट घेत मी सर्व प्रकार त्याला कथन केला. एकाच आयडीच्या दोन नोंदी कशा झाल्या असतील याचेच उत्तर मला त्याच्याकडून हवे होते. चहा संपल्यावर प्रोग्रामरने हे सर्व मला कालच कळले होते पण त्यात तुझा आयडी होता, तू असे काही करणार नाहीस असा ठाम विश्वास होता म्हणूनच आज तू काय करतोस हे मला बघायचे होते. तू जर या गैरव्यवहारात असतास तर त्या सर्व नोंदीतुन तुझा आयडी बदलला असतास व पुरता अडकला असतास. तू ज्या अर्थी मला सगळे सांगितलेस त्या अर्थी तू काही गैरप्रकार केला नाहीस याची निदान माझी तरी खात्री आहे, पण तसे इतरांना पटवून देणे अशक्य आहे ! उद्या कसेही करून मला अहवाल द्यावाच लागणार आहे, फारतर अजून दोन चार दिवस मी थांबू शकेन पण मग काय ? त्याचे सुद्धा बरोबरच होते. इतक्यात त्याचे डोळे चमकले, संगणकाला तो अगदी चिकटूनच बसला व काही कोड लिहू लागला. जरा वेळाने पडद्यावर जो आउटपुट मिळाला त्याने त्याला अगदी हर्षवायूच झाला. त्याने त्या दोन्ही युजर आयडीच्या ASCII किमती काढल्या होत्या व त्यातुन दोन सारख्या आयडींचे कोडे उकलले होते ! सारखे वाटत असलेले ते आय.डी. D10115 व D1O115 असे होते ! इंग्रजी मोठा ओ (O) व शून्य (0) यातला फरक पटकन लक्षात येत नाही. ( ही गोष्ट १९९० ची आहे, तेव्हा आम्ही VT220 या टर्मिनलवर काम करत होतो, इंग्रजी लहान एल (l) व इंग्रजी एक (1), यातला फरक सुद्धा चटकन लक्षात येत नसे, पुढे मात्र पोटफोड्या झीरो दाखविणारी टर्मिनल आली , DMP मध्ये तशी सेटींग सुद्धा असायची ). अर्थात ही उकल होउन सुद्धा माझ्यावर संशयाची सुई रोखलेलीच होती. कशावरून मीच तसा आयडी बनविला नसेल ? परत मी शांतपणे विचार केला. एकदा पैशाची चटक लागलेला त्यातुन सूटत नाही. मी व प्रोग्रामरने विचार करून एक योजना बनविली. अर्थात त्याला यश आले नाही तर चार दिवसाने तो मूळ रीपोर्ट वर पाठविणार होता ! त्या दिवशी घरी निघायला आम्हाला रात्रीचे १० वाजले होते.
सोमवारी सकाळी आठच्या ठोक्याला आम्ही चारी सुपर-युजर कामावर आलो होतो. सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व युजर्स नव्याचे बनवायचे होते. ही सुधारणा तातडीने अमलात आणण्याचे आदेश शनिवारी उशीरा मिळाल्याने रविवारीच प्रोग्रामरने येऊन सर्व सुधारणा करून ठेवल्या होत्या. संगणक चालू करताच सुरक्षेच्या कारणास्तव परत युजर आयडी घेण्यासाठी आम्हाला फोन करण्याचा संदेश झळकत होता. आम्हा सुपरयुजरचे व कोर ग्रूपचे आयडी त्याने कालच करून ठेवले होते पण पासवर्ड आमचे आम्हालाच घ्यायचे होते. पहिले तिन दिवस आम्हाला अपेक्षित काही घडले नाही. आता मात्र मी काटेकोरपणे संगणकापासून थोडे जरी लांब जायचे असले तरी तो लॉक करून जात होतो. चवथ्या दिवशी दूपारनंतर मला एका बैठकीला जायचे होते. तिकडेच पाच वाजले. मला दिलेली मुदत संपली होती. मी अगदी कासावीस झालो होतो. जे तिन दिवस झाले नाही ते या ३ तासात झाले असेल का ? बैठक संपल्यावर मी थेट प्रोग्रामरला गाठले. मला बघताच त्याने थम्स-अपची खूण केली ! संगणकावर मला त्याने User Creation Log दाखविला. आमच्यातल्याच एकाने D1O115 असा युजर बनविला होता, त्यात तर तारीख व वेळ सुद्धा होती व त्या वेळी मी मिटींगमध्ये विभागप्रमुखांबरोबरच असल्याने माझी बाजू भक्कम झाली होती. तोच आयडी वापरून त्याने काही नोंदीचे वजन सुद्धा कमी केले होते !
गुरुवार, १८ मार्च, २०१०
जैसी करनी वैसी भरनी !
मी –
नागपूरला मित्राच्या लग्नाला हजेरी लावून मी हल्दीरामचे दूकान गाठले. हल्दीरामची संत्रा बर्फी आणल्याशिवाय घरी स्वागत होणार नव्हते व कामावर सुट्टी पास होणार नव्हती ! नुकत्याच आलेल्या संत्रा बर्फीवर पब्लिक तुटून पडले होते. ऑर्डर घेणार्यांची त्रेधा उडाली होती, मी चार-पाच प्रकारच्या मिठाईची ऑर्डर देत असतानाच हीचा फोन आला. थेट मुंबई न गाठता , नाशिकला उतरून एका नातलगाच्या बाराव्याला हजर रहायचा व लगे हाथ ,तिकडे जातच आहे म्हटल्यावर तिकडच्या हीच्या बहीणीसाठी व बाराव्याला येणार्या आईसाठी सुद्धा मिठाई घ्यायचा आदेश मिळाला. ओझी वहायचा मला अगदी मनस्वी तिटकारा आहे पण करतो काय ? तसेही हे ओझे मुंबईला परतताना अर्धे होणार होतेच. नाशिकचे कार्य आटोपल्यावर मेव्हण्याने कल्याणच्या एसटीत बसवून दिले. पण बस भिवंडी मार्गे आहे तेव्हा ती सोड दूसरी पकड हा त्याचा सल्ला काही मी मानला नाही. तब्बल पास तासाने , संध्याकाळी ७ वाजता, कल्याण आले तेव्हा बसमधली गर्दी, वाहतुकिची प्रचंड कोंडी यामुळे मी पार अर्धमेला झालो होतो. सोबतच्या सामानाचे ओझे सांभाळत मी बसमधून सगळ्यात शेवटी उतरलो. एसटीच्या सगळ्या डेपोत घाणेरडा डेपो कोणता असेल तर तो कल्याणचा ! भयंकर अस्वच्छ, काळोखाचे साम्राज्य, पावलो-पावली पडलेले खड्डे व अनागोंदी कारभाराची हद्द म्हणजे कल्याण डेपो ! मला पनवेलला जाणारी एसटी पकडायची होती. जिकडे तिकडे लोकांचे घोळके उभे होते. कोणतीही सूचना मिळत नसल्याने गाडी लागली रे लागली की लोकांची झुंड त्या दिशेने सामानासकट धावत सूटत होती. एकाच बसवर तिन वेगळेवेगळे फलक होते व खडूने सुद्धा भलतेच ठीकाण लिहीलेले होते. जो तो आपल्या सोयीने अर्थ लावून त्या बसमध्ये शिरत होता. मग एखादा माजोरडा वाहक पानाची पिचकारी मारत वेगळ्याच ठीकाणी गाडी जाणार असल्याचे सांगत होता ! मग प्रचंड रेटारेटीत आतले बाहेर पडत होते व बाहेरचे आत शिरत होते ! हिन्दीत प्रवासाला यातायात का म्हणतात त्याचा प्रत्यय येत होता. एकंदरीत परीस्थिती बघून मी घरी बायकोला फोन करून “कल्याणला पोचलो आहे, प्रचंड गोंधळ आहे, घरी कधी परतेन हे सांगता येणार नाही, काळजी करू नकोस व जेवून घे” असे सांगितले. अर्धा तास वाट बघून सुद्धा एसटी मिळाली नाही व गर्दी अजून वाढली तेव्हा मला सुद्धा नाइलाजाने त्या घोळक्यात सामील व्हावे लागले. एका हातात सामानाचे ओझे व एका हातात हल्दीरामची पिशवी सांभाळत मी उभ्या असलेल्या प्रत्येक बसची चौकशी करत होतो. एवढ्यात पनवेल – पनवेल असा पुकारा झाला. त्या दिशेने धावणार्या घोळक्यात मी सुद्धा सामील झालो.
मुन्ना
कल्याण स्टेशन म्हणजे माझ्यासारख्या मोबाइल चोरांची मक्का-मदीनाच ! गाडीत घुसायच्या नादात असलेल्याचा मोबाइल मारणे सगळ्यात सोपे. त्यात त्याच्या दोन्ही हातात सामान असेल तर सोने पे सुहागा ! अर्थात “त्याच्यावर” माझे बराच काळ लक्ष होते. नुकताच त्याने घरी फोन सुद्धा लावला होता म्हणजे लगेच काही तो मोबाइलसाठी खिषात हात घालणार नव्हता. पनवेल बसमध्ये शिरत असतानाच त्याच्या खिषातला मोबाइल मी उडविला. उडविलेला मोबाइल स्विच ऑफ करून मी एका टपरीवर आलो आतले सिमकार्ड काढून दूसरे टाकले तेव्हा कळले की त्या xx ने फोन सुद्धा लॉक करून ठेवला होता ! म्हणजे विकताना अजून तिनशे रूपयाची खोट बसणार होती. भोळसटच असावा तो ! आपल्या घरचा नंबर त्याने फोनवरच मागे लिहून ठेवला होता. कोणाला सापडला तर तो फोन करून कळवेल अशी भाबडी आशा त्याला वाटत असावी ! पण या नंबरावरूनच एक भन्नाट आयडीया माझ्या टकूर्यात क्लिक झाली ! साल्याने आपल्याला तिनशे रूपयाचा खोडा घातला ना ? अब देखो मेरे खोपडी का कमाल !
मी
दोन्ही हातातल्या सामानामुळे बसमध्ये शिरताना खूपच हाल झाले. अरूंद दारातुन सामान घेउन आत शिरताच येत नव्हते. प्रचंड धक्के पचवित बसमध्ये शिरलो तर बसमध्ये बसायला जागाच नव्हती. गर्दीच्या रेट्याबरोबर पार टोकाला बसलो तर एक तरूण शेजारच्या जागेवर सॅक टाकून ती मित्रासाठी बुक करून बसला होता. माझे टाळके सणकले ! माझे सामान रॅकवर ठेवून मी सरळ ती सॅक त्याच्या अंगावर भिरकावली व त्या जागेचा ताबा घेतला. खुन्नस, वादावादी , धमकावणी हे टप्पे पार पडल्यावर हाणामारी अपरीहार्य होती. एवढयात त्या त्याच्या मित्राने ’मला जागा मिळाली’ असे कोठूनतरी ओरडूनच सांगितले व दोघेही थंडावलो ! आता बसमध्ये बसलोच आहोत तर हिला कळवावे म्हणून खिषात हात घातला आणि हादरलोच ! कोणीतरी मोबाइल चोरला होता ! तरी एक आशा होती, कदाचित बसमध्येच पडला असेल तर ? भांडण विसरून शेजारच्या तरूणाने लगेच मोबाइल काढला व माझा नंबर विचारून त्याला फोन लावला. स्विच ऑफ असल्याचा मेसेज मिळताच तो चोरला आहे यावर शिक्कामोर्तब झाले. मोबाइल चोरल्याची घटना बसभर पसरली व जो तो कल्याणला मोबाइलचोरांनी कसा उच्छाद मांडला आहे व कोणाचा आधी कसा असाच मोबाइल मारला गेला होता त्याच्या सुरस कथा सांगू लागला. शेजारच्या तरूणाने अजून मिसकॉल द्यायचा नाद सोडला नव्हता. मध्येच मला त्याने घरी हे कळवायला सांगितले पण मी त्याची गरज नाही असे सांगितले. मोबाइल चोरीला गेल्याचे सत्य आता मला पचवायलाच लागणार होते.
माझी ही
हा एव्हाना बसमध्ये बसला असेल असा विचार मी करीत असतानाच फोन वाजला. पलिकडून कोणाचातरी अपरीचित आवाज कानी पडला. मी जे काही सांगतो आहे ते आधी शांतपणे ऐकून घ्या, घाबरायचे मात्र काहीही कारण नाही असे दोनदा सांगून तो जे सांगू लागला ते मात्र धडकी भरविणारेच होते.
मुन्ना
मला मराठी अगदी अस्खलित बोलता येते व धादांत खोटे सुद्धा ! मोबाइलवर लिहिलेला नंबर मी कनेक्ट केला. अर्थात पीसीओ वरून ! अपेक्षेप्रमाणेच बाईचा आवाज ऐकू आला. मी अतिशय शांतपणे माझा प्रत्येक शब्द उच्चारत होतो.
“कल्याण डेपोच्या बाहेर एका व्यक्तीला अपघात झालेला आहे. त्या व्यक्तीच्या मोबाइलवर मला हा नंबर मिळाला. मी त्या व्यक्तीला अर्धवट बेशुद्धावस्थेत एका खाजगी रूग्णालयात आणले आहे. डॉक्टरांनी तपासून काही धोका नसल्याचे सांगितले आहे. वेळेत उपचार सुरू झाले तर सकाळ पर्यंत डिसचार्ज सुद्धा मिळेल पण मी तिथपर्यंत थांबू शकणार नाही. प्लिज माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही अजिबात काळजी करू नका, घाबरू नका व उगाच धावपळ करू नका, कोणा शेजार्या - पाजार्याला अवेळी त्रास द्यायची सुद्धा गरज नाही. पण एक अडचण आहे. मला वीस हजार रूपये ताबडतोब भरावे लागणार आहेत. तसे माझ्याकडे वीस हजार आहेत पण ती ऑफीसची कॅश आहे व सकाळी मला जमा करावीच लागणार . तुम्ही एक करता का ? माझा एक मित्र पनवेललाच राहतो, तुमचा पत्ता द्या, त्याला तुमच्या घरी पाठवतो , विश्वास असेल वाटत तर द्या त्याला पैसे म्हणजे सकाळी कामावर येतानाच तो ते मला पोचते करेल. मला पैसे पोचल्याचा निरोप मिळाला की मी लगेच माझ्याकडची कॅश भरतो व तुम्हाला रूग्णालयाचा पत्ता देतो. नाहीतर मग नाइलाजाने मला त्यांना सरकारी रूग्णालयात हलवावे लागेल , मग पोलिस सोपस्कार झाल्याशिवाय उपचार मिळणार नाहीत व बहुमुल्य वेळ वाया जाईल.”
पलिकडे काही सेकंद भन्नाट शांतता होती पण मग , “माझ्याकडे घरी एवढी कॅश नाही पण तुमचा मित्र एचडीएफसीच्या एटीएम बाहेर आल्यास मी तिकडूनच पैसे काढून त्याला देते” असे उत्तर मिळाल्यावर मला जरा वाइटच वाटले , वीस हजार जरा कमीच झाले निदान पन्नास तरी मागायला हवे होते ! ठीक है , जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया ! माझा पनवेलचा दोस्त कुट्टीला मी मोबाइलवरून पैसे ताब्यात घेण्याचे कळविले व जास्त तोंड उघडायचे नाही असेही बजावले ! कुट्टीचे एक बरे होते, त्याला मराठी अजिबात समजत नव्हते व त्याचे हिन्दी सुद्धा जेमतेमच होते !
माझी ही
फोन ठेवल्यावर मला प्रचंड टेन्शन आले. सोसायटीची पूजा असल्याने मुले खालीच होती व मला सुद्धा थोड्या वेळाने खाली जेवायला उतरावे लागणार होते. पूजेच्या उत्साही वातावरणात नवर्याच्या अपघाताची बातमी सांगितली तर सगळ्यांचाच विरस होईल. कल्याणला आपला कोणी नातलग सुद्धा नाही. समोरून बोलणार्यावर अविश्वास दाखवावा असे सुद्धा काही नव्हते कारण एरवी प्रवास सुरू झाला की येणारा याचा एसेमेस आला नव्हता. अपघाताची वेळ व ठीकाण सुद्धा पटणारेच होते. खाजगी रूग्णालयात पैसे भरल्याशिवाय पेशंटला हात सुद्धा लावला जात नाहीच ! विचार करीत व लोकांना विचारत वेळ वाया घालविणे निदान तेव्हा तरी योग्य नव्हते. खाली खेळत असलेल्या मुलांना येते पाच मिनिटात असे सांगून एटीएम गाठले. बाहेर उभा असलेला एक तरूण मला बघून सरसावला. एटीएम मधून पैसे काढून ते मी त्याच्या हवाली केले. त्याच्याकडे मोबाइल नव्हता, त्याचा तो कल्याणचा मित्रच त्याला जरा वेळाने शेजार्याकडे फोन करणार होता. त्याला काही विचारले तर त्याचे आपले एकच उत्तर होते “तुम्हारा लॅन्ग्वेज नही आता, लेकिन फिकर मत करो”. सोसायटीत परतले पण कोठेच लक्ष लागत नव्हते. त्याच्या फोनची वाट बघत होते. का बरे अजून फोन नाही आला ? की आता तरी कोणाला सांगावे काय झाले ते ?
मुन्ना
कुट्टीकडून पैसे ताब्यात आल्याचे कळताच मी स्वत:वरच जाम खुष झालो ! माझा प्लान कल्पनेबाहेर यशस्वी झाला होता. खरे तर कुट्टी मला उद्या बारमध्ये भेटणारच होता पण मला तेवढा धीर नव्हता. कधी एकदा ते रूपये माझ्या ताब्यात घेतो असे झाले होते. तसेही तो लॉक्ड मोबाइल खोलण्यासाठी मला कुट्टीच मदत करणार होता. मी लगेच बाइकवरून पनवेलला निघालो. वाटेत प्रचंड ट्रॅफिक जाम होते पण बाइक असल्याने इकडून तिकडून कट मारत मी पनवेलला पोचलो. कुट्टीला तो मोबाइल दिला व नोटांचे पुडके पाकिटात घालून मी बाइक पिटाळली.
मी
साला आजचा दिवसच खराब होता. मोबाइल मारला गेला होताच पण ट्रॅफिक जाम काही पाठ सोडत नव्हते. एरवी कल्याण ते पनवेल पाउण तासाचा प्रवास पण आज त्याला तब्बल दोन तास लागले होते ! नवीन पनवेलला जाणार्या उड्डाण पुलाजवळ मी बसमधून उतरलो. सामान सांभाळत रीक्षात बसत असतानाच सेक्टर ४, नवीन पनवेल असे सांगितले. या वर रीक्षावाल्याने पंचवीस रूपये होतील असे सांगितले. साले एकतर मीटर लावत नाहीत . नाहीतर हे भाडे मिनिममचे पण नाही, तसे एरवी आम्ही १३ रूपये देतोच, रात्र आहे तर १५ घे असे सांगून सुद्धा त्याचा हेका कायमच होता. थांब मोबाइलवरून पोलिसांना बोलावतो व तुझा माज उतरवतो असे म्हणत मी मारे खिषात हात तर घातला पण ---- ! मी तणतणत ती रीक्षा सोडली व सामान घेउन पायीच जायचे ठरवले. तेवढयात पुलावरून भन्नाट वेगाने बाइकवरून येणारा एक तरूण वळणावर तोल जाउन रस्त्याच्या मधोमध असणार्या सिग्नलवरच धडकला. मी सामान तिकडेच बाजूला ठेवले व त्याला मदत करायला धावलो. त्याला चांगलाच मार बसला होता. रक्ताच्या थारोळ्यात तो तडफडत होता. त्याची शुद्ध हरपत होती. लगेच वैद्यकिय मदत मिळणे गरजेचे होते. मी मदतीला कोण येतो का हे बघत असतानाच तो रीक्षावाला माझे सामान रीक्षात घाकून आला व मदतीला लागला. त्या तरूणाला आम्ही जवळच असलेल्या खाजगी रूग्णालयात नेले. रीक्षात बसवताना त्याच्या खिषातुन बाहेर डोकावणारे पाकिट व मोबाइल मी खबरदारी म्हणून माझ्या ताब्यात घेतला. दूसर्या एका रीक्षावाल्याने त्याची बाइक रूग्णालयाबाहेर लावून ठेवली. थोड्याच वेळात डॉक्टरी उपचार चालू झाले. तो रीक्षावाला सुद्धा माझ्याबरोबर होताच. रक्त बरेच गेल्यामुळे त्याला रक्ताची गरज होती. सुदैवाने त्याचा रक्तगट ओ निघाला व माझ्या ओळखीने दोन बाटल्या रक्त पाठवायची सोय साई ब्लड बँकेने त्वरीत केली. मी मदत करतो आहे म्हटल्यावर पोलिस सुद्धा उपचार चालू करा उद्या येउन स्टेटमेंट घेतो असे सांगून मोकळे झाले. सगळॆ सुरळीत झाल्यावर त्याच्या मोबाइलवरून मी त्याने शेवटचा कॉल कोणाला केला आहे हे तपासले. सलग तिन कॉल त्याने एकाच नंबरला थोड्या थोड्या अंतराने केले होते म्हटल्यावर मी त्याच नंबरला उलट फोन करून झाल्या प्रकाराची माहिती दिली व रूग्णालयात बोलावले. अर्थात हे सगळे त्याला समजवायला मला बराच त्रास झाला ! त्याचे हिन्दी भयानक होते ! तो १० मिनिटातच हजर झाला तेव्हा मला तिकडे थांबायचे काहीच कारण नव्हते. आता तोच रीक्षावाला मला घरी सोडायला तयार होताच !
माझी ही
१० वाजत आले तरी काही फोन नव्हता तेव्हा मला काळ्जी वाटणे स्वाभाविकच होते. इकडे जो तो नवरा कधी येणार असे विचारून मला भंडावून सोडतच होता. बहुतेकांची जेवणे सुद्धा आटोपली होती व आवाराआवर सुरू झाली होती. मुले सुद्धा झोपायला निघून गेली. मला मात्र काय करावे हेच सूचत नव्हते. सोसायटीच्या अगदी दारात रीक्षा थांबली तेव्हा सगळ्यांचेच तिकडे लक्ष गेले ! नवरा त्यातुन उतरताच त्यांचे नाव घेत मुलांनी ’काका, काका’ असा एकच गोंधळ केला. मी बघतच राहिले. याला तर काहीही धाड भरलेली नाही ! एरवी रीक्षावाल्याशी उभा दावा मांडणारा आज त्याला शंभर रूपये देत होता व तो ते घेत नव्हता हे बघून चांगलीच करमणुक झाली माझी ! टेन्शन खल्लास ! पण त्या मुर्खासारखे देउन बसलेल्या वीस हजाराचे काय ? मी इकडे कोणत्या अवस्थेतुन गेले होते हे त्याच्या अर्थात गावीही नव्हते. त्या रीक्षावाल्याला त्याने सोबत जेवायला घेतले व तो कसा भला आहे, त्याने अपघातात सापडलेल्या तरूणाला कशी मदत केली याचे वर्णन करण्यातच तो रंगून गेला होता. याला घराची काही आठवण आहे की नाही ?
मी
सोसायटीतल्या मित्रांबरोबर गप्पात जरी रंगलो होतो तरी तिच्याकडे माझे लक्ष होतेच. अजून खाली उभी आहे म्हणजे आपण आल्याशिवाय ती घरी जाणार नाही हे नक्की ! चेहरा पण जरा चिंतातुर दिसतोय, काहितरी खास सांगायचे आहे असे दिसते तेव्हा तिच्या रागाचा भडका उडायच्या आत निघाले पाहिजे हे खरे पण तसे कृतीत उतरायला अंमळ उशीरच झाला खरा ! तिच्याकडून सगळी स्टोरी समजल्यावर मी हैराणच झालो ! साल्याने माझा मोबाइल तर मारला होताच वर घरच्या नंबरचा त्याने भलताच दुरूपयोग केला होता. अर्थात प्राप्त परीस्थितीत जे योग्य तेच तिने केले होते. तसेही एटीएम मधून जास्तीत जास्त वीस हजारच काढता येतात हे किती बरे नाही ! एवढ्यात मला त्या अपघातग्रस्त तरूणाच्या ताब्यात घेतलेल्या वस्तूंची आठवण झाली. त्याच्या पाकिटात वीस हजाराच्या कोर्या करकरीत नोटा होत्या पण कोणत्याही बँकेचे कार्ड मात्र सापडले नाही. मग त्याच्याकडून हे नोटांचे कोरे पुडके आले कसे ? ते पण नेमके वीस हजाराचे ? घरच्या नंबरवरून अपघाताची खोटी कहाणी सांगून पैसे मागणारा आलेला कॉल सुद्धा पीसीओ वरून केलेला होता. पण कल्याणला चोरी करणारा पनवेलला कशाला कडमडायला येईल ? पैसे घ्यायला ? त्याने स्वत: पैसे घेतले असणे वेळॆचा विचार करता शक्यच नव्हते. तेव्हा त्याचा कोणीतरी मित्र इथे असलाच पाहिजे होता. अरे होता की ! तोच, ज्याला आपण त्या मोबाइलवरून केलेले शेवटचे कॉल बघून बोलावले ! दहा मिनिटाच्या आत तो पोचला म्हणजे स्थानिकच असला पाहिजे. त्या कॉलच्या वेळा सुद्धा याची पुष्टीच करत होत्या. So everything is in control ! चोर तर निदान दोन आठवडे उठू शकणार नव्हता. त्याच्या गुन्ह्याची पुरेपुर सजा त्याला मिळालीच होती, अगदी काव्यगत न्याय झाल्याप्रमाणेच, त्याने जशी स्टोरी माझ्या बाबतीत रचली होती , अगदी तशीच त्याच्या बाबतीतच घडली होती ! हीने दिलेले वीस हजार रूपये (वर थोडे अधिकचेच ! ) मला मिळाले होते ! आता प्रश्न फक्त मोबाइल हॅण्डसेटचाच होता. अर्थात तो तरी कोठे जाणार होता ? आता मला झोपेची नितांत गरज होती, सकाळी बघू काय ते !
सकाळी दोन मित्रांना सोबत घेउन रूग्णालय गाठले. हिला लांबूनच कुट्टीला ओळखायला सांगितले. हीचा ग्रीन सिग्नल मिळाल्यावर कुट्टीला विजिटींग रूम मध्ये बोलावले. भाषेचा अडथळा येउ नये म्हणून त्याच्या दोन आधी सणसणीत कानफटात ओढल्या. तो भेलकांडत असतानाच त्याला सगळी ष्टोरी ऐकवली व बर्या बोलाने तुझ्या मित्राकडून मोबाइल परत मिळवून दे नाहीतर तुला सुद्धा पोलिसात देतो असे म्हणताच कुट्टीनेच खिषातुन माझा मोबाइल काढून दिला ! मुन्ना बर्यापैकी शुद्धीवर आलेला दिसत होता तेव्हा त्याला सुद्धा त्याचा खेळ संपल्याचे सुनावले व इकडून बरा झालास की जेलची हवा काही चुकणार नाही याची जाणीव करून दिली !
रविवार, ८ फेब्रुवारी, २००९
विघ्नहर्ता !
शनिवार असला तरी एवढी कमी गर्दी ? गाडी पनवेलला लागून काही मिनीटे झाली तरी खिडक्या रिकाम्या ? असा विचार करीत मी खिडकी जवळ बसलो. मग लक्षात आले की या बाजूला उन लागेल म्हणून बाजू बदलली पण तेवढ्यात कोणीतरी शिताफ़ीने तिकडची खिडकी पकडली. झक मारत मला त्याच्या बाजूला बसावे लागले. इतक्यात त्या मुसलमान तरूणाने माझे लक्ष वेधून घेतले. अहो मुसलमानच कशावरून ? नाही, निव्वळ दाढी ठेवली होती, डोक्यावर मुसलमानी टोपी होती आणि अंगात पठाणी पोषाख होता म्हणूनच नाही काही, पण एरवीही मला मुसलमान नक्की ओळखता येतो ! त्याने जेव्हा हातातले गिफ़्ट पॅक रॅकवर ठेवले आणि जागा असूनही दाराकडे उभा राहीला म्हटल्यावर मी अधिकच सतर्क झालो. तशी गाडी सूटायला अजून अवकाश होता व गर्दीही नव्हती, त्याचा कोणीतरी मित्र येणार असेल म्हणून उभा असेल अशी मी स्वत:ची समजूत घालून घेतली. पण आता तर गाडीही सूटली, खांदेश्वर स्थानक आले तरी काही हा तरूण आत येत नव्हता आणि आता तर तो मोबाईलवर कोणाशी तरी बोलत सुद्धा होता ! तेव्हा संशय बळावला नसता तरच नवल. काय असेल तरी काय त्या गिफ़्ट पॅक मध्ये ? फ़ोनवर कोणाशी बोलत असेल ?
मानसरोवर, खारघर, बेलापूर मागे पडले, गाडी आता गर्दीने अगदी फ़ुलून गेली. तो दारावर उभा आहे की नाही आणि त्याची ती रॅक वरची गिफ़्ट बघत राहणे मला फ़ारच त्रासदायक होउ लागले, पण त्याची मुसलमानी टोपी त्याचे अस्तित्व दाखवत होती आणि जरासे हायसे वाटत होते. त्यात काही बॉम्ब-बिम्ब असेल तर इतक्यात तरी काही त्याचा धमाका होणार नव्हता. पण तो आत्मघातकी पथकातला असेल तर ? बापरे !! का त्याला हवी तेवढी गर्दी अजून झाली नव्हती ? काय करावे ? माझ्या डोक्यात नुसते विचारांचे चक्र चालू होते आणि मेंदू प्रमाणाबाहेर दमल्यामुळे चक्क मध्येच डोळा लागला. त्या अवधीत गाडीने वाशी सोडले होते. आता तो तरूण दिसत नव्हता व ती गिफ़्ट सुद्धा ! हायसे वाटले, उगीच आपण संशय घेतला असेही वाटले.
याच समाधानात कुर्ला आले, गाडी बदलणार्यांचे लोंढे उतरून गाडी परत भरण्याच्या आत मला ते गिफ़्ट पॅक परत तिकडॆच दिसले. म्हणजे तिकडे होतेच ते पण वर अजून सामान पडल्यामुळे मला दिसत नव्हते ! पण मग तो कोठे गेला ? जागेवरून अर्धवट उभे राहुन मी सगळा डबा स्कॅन केला आणि परत भीतीने धडकी भरली. तो कोठेही दिसत नव्हता ! आता मात्र काहीतरी करायलाच हवे, पण काय ? साखळी ओढावी का ? का ओरडून सगळ्यांना सावध करूया ? पण मग लोक पॅनिक हो़उन चालत्या गाडीतुन उड्या तरी मारतील नाहीतर चेंगरून सुद्धा मरतील . नकोच ते ! मग पोलीसांना फ़ोन लावायचा का ? पण खरेच त्या पॅक मध्ये बॉम्ब असेल का ? नाहीतर उगाच आपले हसे होईल. का आपणच उतरून जावे ? छे, काय करावे हेच नक्की होत नव्हते. बरे, समजा बॉम्ब असला, फ़ूटलाच तर तो काही एवढा त्रीव्र नसेलही, अगदी जवळची माणसे मरतील आपल्याला फ़ारतर खरचटेल. आणि एवढी वर्षे मुंबईत आहोत, आता पर्यंत काही झाले नाही ना ? मग ? जे व्हायचे ते होणारच आहे ना ? आणि बॉम्ब जर फ़ूटायचा असेल तर आपल्याला थोडेच तो सांगून फ़ूटणार आहे, अगदी आपण उतरायला निघतानासुद्धा तो फ़ूटू शकतोच !
याच वैचारीक कल्लोळात गाडी एकदाची सीएसटीला लागली ! डबा रिकामा झाला. पण ते गिफ़्ट पॅक तसेच रॅक वर होते. निदान ते आता पोलीसात तरी जमा केले पाहीजे. पण ते आताच फ़ूटले म्हणजे, आधी आपण बाहेर पडू , पोलीसच काय ते करू देत , पण गाडी परत सूटली म्हणजे ? शेवटी मी ते पॅक घेतले हातात. पुढच्या कंपार्टमेंट मध्ये काय गडबड चालली आहे ? कोणीतरी झोपले होते व गदागदा हलवूनही उठत नव्हते. भीतीने माझी बोबडी वळली होती आणि हा कोण कुंभकर्ण ? अरे – हाच ’तो’ ! आत येउन झोपला कधी ? नक्की झोपला की याचा कोणी गेम केला आहे ? त्याच्याच साथीदारांनी ? कामगिरी पार नाही पाडली म्हणून ? ते पॅक मी माझ्या बॅगेत भरले व त्याला उठवायचा प्रयत्न केला आणि चपापलोच ! त्याचे अंग गार पडत चालले होते. गळ्याखाली हात लावून बघितले तर ठोके अगदी मंद झाले होते. एकाला सोबत घेउन मी त्याला उचलून गाडीबाहेर आणले. फ़लाटावरील एका बाकावर त्याला आडवे करून ठेवले. गडबड एकून पोलीसपण आले. कोणीतरी स्ट्रेचर सुद्धा आणला. आमची वरात आता चौकीत पोचली. आता रखडपट्टी होणार ! पोलीस दहा प्रश्न विचारणार, जावे निघून तडक असे वाटत असतानाच तिकडच्या अधिकार्याने ’तुम्ही जा , आम्ही काय ते बघून घेतो’ असे सांगून आश्चर्याचा धक्काच दिला ! मी लगेच निघालो आणि मोबाईल खणखणला, लगेच कामावर ये म्हणून. धावतपळत मग शेयर टॅक्सी करून कार्यालय गाठले.
दिवसभराच्या रामरगाड्यात मग तो प्रसंग मी पार विसरूनच गेलो. रोजच्यासारखेच कामावर सात वाजले व रात्री ऩउला घरी पोचलो. तरी बरे , उद्या रविवार होता. थोडा आराम मिळणार होता. रविवारी अगदी दिवसभर लोळावे असे अनेकदा वाटते पण सात वाजले आणि आपसूकच उठलो. मटा हातात घेतला आणि हादरलोच. सीएसटी स्थानक उडवून देण्यासाठी आलेल्या एका दहशतवाद्याला पोलीसांनी कंठस्नान घातले होते. त्याच्या जवळ एके ५६ मशीनगन व आरडीक्स असलेले बॉम्ब होते. संशयावरून त्याला पोलीसांनी हटकले तेव्हा तो पोलीसांवरच गोळीबार करून पळताना त्याला टीपले गेले. फ़ार मोठा धोका, प्रचंड जिवीतहानी टळली होती. त्या पोलीसांना लाखा-लाखाची बक्षिसे जाहीर झाली होती, त्यांच्यावर अगदी कौतुकाचा वर्षाव होत होता. दिवस-रात्र मग मिडीया तोच विषय चघळत होता. तो म्हणे सीमेपलीकडून आला होता, कडवे प्रशिक्षण घेउन व फ़िदायीन होता म्हणे !
सोमवार, आज डबा मिळणार नव्हता आणि मग यामुळेच बॅग पण धुतली जाणार होती ! कामावर पोचलो आणि लगेच हीचा फ़ोन आला, कोणासाठी गिफ़्ट आणली होतीस ? गिफ़्ट ? बापरे ! मी ताडकन जागेवरच उडालो, तो बॉम्ब चक्क माझ्या घरी होता आता ! ते फ़ेकून दे आधी लांब, असे मी तिला अगदी ओरडून सांगत होतो तर ती शांतपणे म्हणाली की आत तर गणपतीची मुर्ती आहे, पत्रिका , लग्न पत्रिका आहे. तू कोणालातरी लग्नात भेट द्यायला ती घेतली असणार आणि नेहमीप्रमाणेच विसरलास ! म्हणजे त्यात गणपतीची मुर्ती होती तर. परत हायसे वाटले. पण मग लगेच तो तरूण समोर आला . मुसलमान आणि गणपतीची मुर्ती ? काय संबंध असेल ? काय बरे त्याचे झाले असेल ? पोलीसांनी त्याला उपचारासाठी नेले असेल ना लगेच ? दिवसभर उलट-सूलट विचारांनी कामात अजिबात लक्ष लागत नव्हते. अगदी अधीरपणे घर गाठले व लगेच ती मुर्ती व लग्न-पत्रिका बघितली.
ओके, म्हणजे त्याचा कोणीतरी हिंदू मित्र असावा. त्याच्या लग्नाला तो जात असणार हे मुर्ती भेट घेउन, आणि फ़ोन पण त्यालाच, किंवा आणखी कोणा मित्राला केला असणार ! त्या पत्रिकेवर एक मोबाइल नंबर लिहीलेला होता. चला, काहीतरी माग मिळाला तर ! त्या नंबर वरून फ़ोन करून त्या तरूणाची माहीती मिळणार होती, नाहीतर पत्रिकेतील कार्यालयाच्या पत्त्यावरून ज्याचे लग्न होते, तो तरी नक्कीच काही सांगू शकणार होता. मी त्या नंबरला फ़ोन लावला. कोणीतरी तरूण होता, त्याला मी सगळी स्टोरी कथन केली व त्या तरूणाचा नंबर अथवा पत्ता दिल्यास ती मुर्ती परत करायला मी तयार आहे , हे ही सांगितले. यावर बराच वेळ पलीकडून शांतता होती. मग एकदम अधीर प्रश्न आला, आप कहा रहते हो ? मै अभी आपको मिलना चाहता हूँ ! तो पनवेललाच रहात होता, व फ़ोन ठेवल्याच्या दहाव्या मिनीटाला घरी हजर झाला होता. त्याचा चेहर्यावर संमिश्र भाव होते, भेदरलेले, गोंधळलेले ! अंकल, रफ़ीक दो दिनसे घरमे आया ही नही है ! ना उसका नंबर लग रहा है, ना उसने किसीको कॉल किया है ! घरवाले काळजीत आहेत आणि पोलीसात तक्रार सुद्धा नोंदवली आहे, मिसींग म्हणून ! तो रफ़ीकचा मित्र होता. दोघे एकत्रच कामाला होते. रफ़ीक तसा मुंबईत नवाच होता. एका हिंदू मित्राच्या लग्नाला ते दोघे बरोबरच जाणार होते पण चूकामूक झाली व मग फ़ोनवर बोलून ठरल्याप्रमाणे रफ़ीक वडाळ्याला उतरून याची वाट बघणार होता. त्याला लहानपणापासूनच डायबेटीस होता. घाइ-घाइत तो काही न खाताच बाहेर पडला होता व म्हणूनच काळजी वाटत होती घरच्यांना. पण मग काही केल्या त्याचा संपर्क झाला नव्हता. त्याने आपल्या मोबाईलवर त्याचा एक फ़ोटो मला दाखवला. हो तोच तो , म्हणजे रफ़ीक होता. रफ़ीकला आपण ज्या दिवशी बेशुद्धावस्थेत चौकीत नेले त्याच रात्री चकमकीत एक अतिरेकी मारला जातो याचा काही संबंध तर नसेल ?
शरीफ़, रफ़ीकचा दोस्त, दूसर्याच दिवशी सीएसटी पोलीस ठाण्यात दाखल झाला. दोन-एक दिवसापुर्वी सकाळी, ज्या तरूणाला बेशुद्धावस्थेत येथे आणले त्याचे काय झाले पुढे, इतकाच त्याचा साधा प्रश्न होता. या साध्या प्रश्नाने पोलीस चौकीत स्मशान शांतता का पसरावी ? त्याला काहीच कळेना. वारंवार तोच प्रश्न विचारूनही त्याला काही उत्तर मिळत नव्हते. असा कोणी तरूण येथे आणला गेलाच नव्हता या उत्तराने मात्र तो उसळलाच ! त्याने मग ज्याने त्याला येथे आणले त्यानेच मला हे सगळे सांगितले आहे, कोठे आहे तो, काय केलेत त्याचे ? असे चढ्या आवाजात विचारायला सुरवात केली. आता बखोटीला धरून त्याला एका पोलीस अधिकार्यासमोर उभे केले गेले. हा जरा सज्जन वाटत होता. अगदी थंड स्वरात त्याने अगदी सविस्तर माहीती घेतली, काही कागदावर लिहुन सुद्धा घेतली. त्याला थोडावेळ बाहेर बसायला फ़र्मावले गेले, चौकशी करून सांगतो या हवाल्यावर तो बाहेर थांबायला तयार झाला. आतुन बरीच फ़ोनाफ़ोनी झाली. मग तो अधिकारी बाहेर आला. चलो, तुम्हे उसका ठीकाणा बताते है, असे सांगून त्याला जीपमध्ये घातले गेले. जीप सूटल्यावर वाटेत अजून दोन जण आत शिरले. त्याला ठीकाणा दाखवायलाच हवा होता …..
….. त्या ’मुसलमान’ तरूणाला बेशुद्धावस्थेत आणले तेव्हा फ़ौजदार राणे रात्रपाळी संपून निघायच्या तयारीत होते. त्या तरूणाला बघताच तो मेला असल्याचे लगेच त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या डोक्यात काही वेगळाच विचार चमकून गेला. त्याला आपल्या गाडीत घेउन ते निघाले. वाटेत फ़ोन करून त्यांनी आपले सहकारी, काळे व पाटील यांना बरोबर घेतले व सगळा प्लान समजावून सांगितला. काही पोलीस खोट्या चकमकी करतात, आपण तर एका मेलेल्या माणसाचीच तर खोटी चकमक घडवणार आहोत. हो ना करत ते ही तयार झाले. त्याची ओळख पार मिटवली गेली, मोबाईल, आयकार्ड नष्ट केले गेले. चेहरा ओळखता येणार नाही एवढा विरूप केला गेला. आधीच्या कोणत्यातरी प्रकरणात पकडलेली पण रीतसर जमा न केलेली एके ५६ व दारूगोळा वापरून बनाव छान वटवला गेला. बढती, पारीतोषिक, सरकारी घर, प्रचंड प्रसिद्धी यात ते तिघे अगदी न्हाउन निघाले. पोलीसी सेवेत एवढा सन्मान फ़ार कमी लोकांच्या नशीबी येतो ! कोणाला कोणता संशय यायचे कारणच नव्हते आणि अचानक हा तरूण टपकला. एरवी ’खुनाला वाचा फ़ूटतेच’ असे आपणच म्हणत असतो पण पोलीसांनी केलेल्या खूनाला पण कशी वाचा फ़ूटली ? आपले बिंग फ़ूटू नये म्हणून याचा सुद्धा बंदोबस्त करणे भागच होते ! याचाच नाही तर ’त्याचा’ सुद्धा बंदोबस्त करणे भागच होते ! त्याचा मोबाइल नंबर तर शफ़ीककडून मिळाला होताच. त्यावर फ़ोन करून त्याचा कार्यालयाचा पत्ता पण त्यांना कळला होता. संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच ते फ़ील्डींग लावून बसले होते. सावज नजरेच्या टप्प्यात आले की ----
पोलीसांनी फ़ोन करून मला जेव्हा कळवले की रफ़ीकला रूग्णालयात दाखल केले आहे. शफ़ीकची आणि त्याची ’गाठ’ घालून दिली आहे तेव्हा किती हायसे वाटले. खरेच पोलीस आपले काम करतच असतात, आपण उगीच त्यांच्याबद्दल भलते सलते बोलत असतो. चला सहा वाजले, निघायला हवे आता, असे म्हणून बाहेर पडणार तोच दिल्लीला गेलेल्या साहेबांचा फ़ोन आला, मला काही माहीती हवी आहे, ती लगेच इमेल करा ! म्हणजे निदान दोन तास तरी जागचे हलताही येणार नव्हते !
बाहेर जीप मध्ये सावजाची वाट पहात असणार्या त्या तिघांचा संयम आता संपू लागला होता. साला करतो काय आत इतका वेळ ? सात म्हणता म्हणता आठ-ऩउ वाजत आले. पण वाट तर बघावीच लागणार होती. एका रात्रीत केवढा मानसन्मान मिळाला होता ! तो टीकवण्यासाठी एवढे कष्ट काही फ़ार नव्हतेच ! राण्यांचा मोबाईल एवढ्यात खणखणला. हो – हो – ते सुद्धा आहेत – लगेच निघतोच, असे म्हणत त्यांनी जीप स्टार्ट केली व लगेच निघायला हवे, असे सगळ्यांना फ़र्मावत त्यांनी सूसाट वेगाने जीप व्ही.टी.च्या दिशेने पिटाळली.
मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सुरक्षा यंत्रणेच्या अब्रूचे पार धिंडवडे निघाले होते. अत्याधुनिक शस्त्रे असलेल्या आत्मघातकी पथकाने सीएसटीवर हल्ला बोल केला होता. शेकडो निरपराध मेले होते. त्यांच्या मागावर निघालेले पोलीस अधिकारी राणे, काळे व पाटील शहीद झाले होते. सारा देश हळहळत होता त्या वृत्त्ताने ! अनेकांच्या डोळ्यातुन अश्रूधारा वहात होत्या. माझेही डोळे पाणावले होते, अग याच निधड्या छातीच्या अधिकार्यांनी काही दिवसापुर्वीच सीएसटी स्थानकात स्फ़ोट करायला आलेल्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता आणि तेच आता ----- ? या गोंधळाअतून सावरून, रात्री खूप उशीरा घरी पोचलेला मी जड आवाजात बायकोला सांगत होतो. आणि हो, तो रफ़ीक, गणपतीची मुर्ती-- तोच तो, सुखरूप आहे अगदी, शफ़ीक त्याला भेटला सुद्धा ! मला पोलीसांनीच कळवले, गणपती म्हणजे विघ्नहर्ताच तो, त्याचीच मुर्ती भेट म्हणून द्यायची त्याला बुद्धी झाली व त्यानेच त्याला तारले. उगाच जीवाला घोर लागून राहीला होता. ती काळजी मिटली तर आता ही बातमी, खरेच , ’त्याला’ वाचवणारा विघ्नहर्ता यांना वाचवायला का बरे धावला नाही ? इश्वराची लिला अगाध आहे म्हणतात ते उगाच नाही !
रविवार, ५ ऑक्टोबर, २००८
सही रे सही !
सही रे सही !
शेयर बाजारात तेव्हा उमेदवारी चालू होती.अर्थात थोबाड तेव्हाही फूटत होते आताही फूटतेच पण अनुभव नाही असे म्हणता येत नाही एवढेच. प्रत्यक्ष अनुभव घेउनच अनेक गोष्टींचे ज्ञान होत होते. १९९१ चा काळ असावा. सुधारणा पुर्व ! शेयर बाजार म्हणजे मूठभर गुजराती मारवाड्यांचा अड्डा होता. मराठी ब्रोकर होते अवघे दोन, नाबर आणि कारखानीस. मी माझे व्यवहार दादरच्या, कारखानीस यांच्या poplular investments मधून करायचो. शेयर विकत घेउन ते आपल्या नावावर करणे ही एक प्रदीर्घ प्रक्रीया असायची. यात कधी कधी सहा-सहा महीने सुद्धा जायचे, व तेवढे थांबून सही जूळत नाही म्हणून प्रमाणपत्रे परत यायची ! असेच एकदा मी reliance capital चे १०० शेयर ५० रू दराने घेतले. हाती प्रमाणपत्र मिळाले व सोबत share transfer form. सट्टा खेळणारे बहुतेक व्यवहार transfer form, कोरा ठेउन करत. एखाद्या बेअरर चेक सारखा तो बाजारात फीरत राही. कंपनीनी बुक क्लोजर जाहीर केले की तो ज्याच्या ताब्यात असेल त्याला ते शेयर आपल्या नावावर चढवून घ्यावेच लागत. (passing the ball खेळ आठवा !) माझ्यासारखा मध्यमवर्गीय गुंतवणुकदार मात्र शेयर आपल्या नावावर चढवून घेत असे. कंपनीचे नोंदणी कार्यालय मेट्रो सिनेमाजवळ होते. तिकडे गेलो पण अर्ज घेतला नाही , का तर १५ % लाभांष वाटपासाठी book closure घोषित झाले होते. म्हणजे १५० रूपयाचा फटका बसला होता ! परत तिकडे गेल्यावर trasnfer form एक वर्ष जुना आहे, चालणार नाही, नवा आणा म्हणून पिटाळला गेलो. ब्रोकरकडे परत आलो तर तो मलाच दोष देउ लागला की 'खाते बंद' तारखेच्या आधी का नाही गेलात म्हणून ! त्याच वेळी बाजारात हर्षद मेहता प्रणीत तेजी चालू झाली होती व सर्वच ब्रोकर माजले होते. त्यांचा धंदा अनेक पटीने वाढला होता. याच काळात कंपनी हक्क भाग देणार अशी घोषणा झाली आणि मला लवकर हालचाल करणे भाग पडले. परत ब्रोकरला गाठले. त्याने काम करतो पण बाजार भावाच्या २५ % कमिशन मागीतले व कामाला दोन महीने लागतील म्हणून सांगितले. मी कपाळावर हातच मारला. या काळात मी हक्क भागांनाही मुकलो असतो. त्या प्रमाणपत्रा सोबत कॉलमनी नोटीस सुद्धा होती व त्यावरून जयपूरची कोणी महीला त्याची मालकीण होती. मी तीला एक पत्र लिहीले व सोबत एक कोरा transfer form, या transfer form ची झेरॉक्स पाठवली. सोबत एक आवश्यक ते टपाल शूल्क लावलेले पाकीट पाठवले. सर्व प्रसंग नमूद करून सही करून अर्ज पुन्हा पाठवायची विनंती केली. दोन आठवडे वाट पाहीली पण उत्तर आले नाही.
मग मी हा सर्व प्रकार माझा शेयर बाजारातला गुरू व कामावरचा मित्र मुकादम याच्या कानी घातला. मी जेव्हा हजारात हरत होतो तेव्हा हा मियां लाखाने कमवत होता ! त्याने ती केस आपल्याकडे घेतली. दूसर्या दिवशी त्याने त्या फॉर्मवर सही आणली होती. सही तर अगदी तंतोतंत जुळत होती पण ती खरी नक्कीच नव्हती ! हे म्हणजे आगीतुन फुफाट्यात ! मुकादम म्हणाला की अशा केस मध्ये हे अगदी सर्रास चालते, घाबरू नकोस, मी स्वत: असे अनेकदा केले आहे. नाहीतर हक्क भाग गमावून बसशील. पण माझी काही हिंमत होई ना. शेवटी मुकादमने माझ्याकडून ५० रूपये घेतले व ती सही चक्क नोटरी कडून प्रमाणीत करून आणली ! आधी वाटले की या मियाचा काय भरवसा, सही बनावट तसा कोणी बनावट नोटरी पण त्याने बाळगला असेल ! मग मात्र मी ते शेयर घेउन मेट्रोजवळचे कंपनीचे कार्यालय गाठले पण मधल्या काळात ते चेंबूरला शिफ्ट झाले होते ! चेंबूरच्या कार्यालयात मग ते प्रमाणपत्र व सोबत 'तो' transfer form दिला. मधल्या काळात शेयरची किंमत ३० रूपयाने वाढली होती, मी मात्र मी घेतलेल्या ५० रू च्या दराने share transfer stamp लावले होते. अर्ज नवीन तारखेचा असल्याने मी ते आधीच विकत घेतले आहेत असा दावाही करता येत नव्हता ! वाढीव दराने share transfer stamp डकवून मी परत चेंबूर गाठले. का कोणास ठाउक पण त्या कार्यालयातला प्रत्येक जण माझ्याकडे संशयाने बघत आहे असे उगाचच मला वाटत होते. एकदाचा अर्ज स्वीकारला गेला व माझी सूटका झाली. महीनाभराच्या विलंबाने प्रमाणपत्रे माझ्या नावावर होउन घरी आली. दूसर्याच दिवशी पेपरात बातमी होती की रीलायन्स कॅपीटलचे अनेक बनावट शेयर बाजारात आले आहेत आणि त्यासाठी सेबीने कंपनीला जबरी दंड ठोठावला आहे ! परत माझे धाबे दणाणले. नक्कीच 'ते' शेयर बनावट असणार आणि आता आपल्याला पोलीस पकडणार या भयाने माझी झोप पार उडाली. पण तसे काही सुदैवाने झाले नाही. मला तेवढेच शेयर हक्कभाग म्हणून मिळाले. चढ्या बाजारात मी ते सर्व शेयर विकून ३०,००० रू. चा फायदा कमावला, पण २०० रू. ला विकलेले शेयर पुढच्या काही महीन्यातच ४०० रू. च्या वर गेले आणि परत हळहळ, चडफड झाली ती वेगळीच !
शनिवार, २७ सप्टेंबर, २००८
सुसाईड नोट !
सुसाईड नोट !
मी, भीमराव जोंधळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वडाळा पोलीस ठाणे, कोणत्याही दबावाविना ही नोट लिहीत आहे। मी हे सर्व लिहीताना पुर्ण शुद्धीत आहे, या आत्महत्येसाठी मला कोणीही प्रवृत्त केलेले नाही, आणि माझ्या हातून जे पाप घडले आहे त्यानंतरही मी जिवंत राहणे माझ्याच सद्-सद्-विवेक बुद्धीला पटत नाही.
साधारण दीड एक महीन्यापुर्वी अनुप हा तरूण missing असल्याची तक्रार माझ्या ठाण्यात दाखल झाली होती। आता या महानगरीत या अशा तक्रारी निव्वळ नोंदवून ठेवण्यापुरत्याच असतात. आम्ही ही तेव्हा तेच केले होते. पण त्या नंतर अनुपच्या समाजाचे एक शिष्टमंडळ मला येउन भेटले. ही साधीसुधी केस नाही, मागासवर्गीय तरूणाचा हा खूनच आहे, तुम्ही याचे धागेदोरे उकला नाहीतर आम्ही सी.आय.डी. चौकशीची मागणी करू, अशा आशयाचे निवेदन देउन निघून गेले. पाठोपाठ कमिशनर साहेबांचा फोन वरून आदेश आला की या प्रकरणाची सखोल चौकशी करा, मला मुख्यमंत्र्यांना अहवाल द्यायचा आहे.
अनुपला शेवटचे पाहीले होते विकास देसाईने। तो अनुपचा लहानपणापासूनचा मित्र होता. एका खाजगी कंपनीत नुकताच कामाला लागला होता. अनुप त्याच्याहुन एक वर्ष लहान होता. दोघेही कंपनीच्या वसाहतीत आपल्या आई-वडीलांसोबत रहात होते. मी अनुपला बघताच ठरवले की हा मुलगा innocent आहे. अनेक वर्ष या खात्यात नोकरी करून आमची नजर तयार झालेली असते. 'त्या' दिवशी ते दोघे रोजच्या सारखेच वसाहतीतील क्लब मध्ये खेळायला गेले होते. रात्री नउ वाजता क्लब बंद झाल्यावर ते घरी परत यायला निघाले. रस्ता तसा ओसाडच आहे, कारण क्लब वस्तीच्या पार टोकाला आहे. बाजूला लागूनच रेल्वे लाईन आहे. बोलत बोलत चालले असते अचानक विकासला जाणवले की आपण एकटेच बडबडत चाललो आहेत, अनुप आपल्या सोबत नाही आहे. त्याला आधी वाटले, तो क्लबमध्ये परत फीरला असेल पण क्लब तर बंदच होता. कोठे गायब झाला काही कळलेच नाही. असेल गंमत करत असे वाटून तो घरी पोचला. दोघेही एकाच इमारतीत रहात होते. पहील्या आणि दूसर्या मजल्यावर. रात्री थोडे उशीरा अनुप घरी आला आहे का याची चौकशी करायला विकास बाहेर पडणार तोच अनुपची आईच त्याच्या घरी आली. अनुप घरी आलेला नव्हता तर. बरीच चौकशी करून रात्री उशीरा तक्रार दाखल झाली. त्या नंतर आठवडा भराने अनुपच्या वडीलांनी पत्रकार परीषद घेउन, जी त्यांच्याच समाजाने आयोजित केली होती, आरोप केला की अनुपचा खून विकासनेच केलेला आहे व मृतदेह सुद्धा गायब केला आहे. पोलीस पैसे खाउन हे प्रकरण दाबत आहेत. खूनी विकास मोकळा फीरतो आहे त्याला अटक करून त्याची चौकशी व्हावी. मग मी त्या क्लबमध्ये गेलो. तिकडे समजले की दोघे अगदी जानी मित्र होते, त्यांच्यात त्याच दिवशी सोडाच, आधीही कधी भांडण झाले नव्हते. तसे अनुपच्या मानाने विकास फारच किरकोळ होता व मारामारी झाली असते तरी अनुपला ठार मारून त्याचा मृतदेह विकास नष्ट करणे निव्वळ अशक्य होते. दोघांचे कसले प्रेम-प्रकरण पण नव्हते. त्या घटनेनंतर बेवारसी मृतदेह मिळाले पण ते अनुपचे नव्हतेच. पण अनुप बेपत्ता होता व त्याला शेवटचे पाहणारा विकासच होता. मी विकासला नाईलाजाने अटक केली. पण त्याला थर्ड डीग्री दाखवायची खरच काही गरज नव्हती. पण माझ्यावरचा दबाव वाढत गेला, राजकारण आले की आम्ही तर काय करणार. चांगले पोस्टींग सोडून गडचिरोलीला बदली करून घ्यायची मला का हौस होती. मी विकासला सात दिवसाच्या रीमांडवर 'आत' घेतले. पोलीसी खाक्या वापरून सुद्धा तो काही बोलला नाही. मी मात्र खोटेनाटे पुरावे देत त्याचा रीमांड वाढवत राहीलो. पण त्याच्या नजरेला नजर मी कधीच देउ शकलो नाही. स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी मी हे करत होतो. वातावरण थंड होण्याची वाट बघत होतो, तसाही ३० दिवसाच्या वर रीमांड मिळत नाहीच, तो आपोआपच जामिनावर सूटला असता.अचानक काळे वकीलांनी त्याचे वकीलपत्र घेतले. त्यांच्यावर पण हल्ला झाला, त्यांनी वकीलपत्र घेउ नये म्हणून निदर्शने झाली. पण ते हटले नाहीत. माझ्याशी अनेकवेळा ते या केस संदर्भात बोलले. मी त्यांना काय सांगणार होतो की तो निर्दोषच आहे पण माझे हात बांधलेले आहेत ते ? एव्हाना विकास विरूद्ध कोणताही पुरावा नाही हे पेपरात छापून आले होते, आता तो जामिनावर मोकळा होणार हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ होते. राजकारणाने आता मात्र कहर केला, मोर्चे, निदर्शने, निवेदने यांनी कळस गाठला. रोजचे काम करणे अशक्य झाले. आणि त्यातच वरून फोन आला, काहीही करा पण विकासला अडकवा, तो जर उद्या जामिनावर सूटला तर तुमची बदली गडचिरोलीला करू.
आता मात्र माझा धीर संपला, मती भ्रष्ट झाली। रात्री अकरा वाजता मी विकासच्या कोठडीत शिरलो. सोबत दोन हवालदार. काय करायचे ते आधीच ठरले होते. दोघांनी विकासचे हातपाय धरले. त्याच्या कोठडीच्या हूकावर फास लटकवला. त्याला स्टूलावर उभे करून त्याच्या गळ्यात फास अडकवला. त्याचवेळी मला मोबाइलवर sms आल्याची सूचना मिळाली. स्टूल ढकलून आम्ही सगळे कोठडीबाहेर पडलो. मी माझ्या खुर्चीत बसून sms open केला. तो काळे वकीलांचा होता, त्यात फक्त "he is innocent" एवढाच मजकूर होता. मी ताबडतोब विकासची कोठडी गाठली, पण तो पर्यंत त्याचे प्राण गेलेले होते. आत्महत्येचा बनाव आम्ही सहज पार पाडला. पण माझे मन मला खात होते. मी 'आत्महत्येची' खबर देण्यासाठी काळे वकीलांना फोन लावला, पण ते फोन घेत नव्हते. दूसर्या दिवशीही ते आले नाहीत तेव्हा मी चमकलो. तिसर्या दिवशी त्यांच्या घरी गेलो तर घरचे ही काळजीत पडले होते, कारण ते घरी आलेच नव्हते. मी मोबाईल कंपनीशी संपर्क साधून काळ्यांच्या मोबाईल वरून आलेला शेवटचा कॉल, संदेश कोणत्या भागातुन आला असेल हे शोधायला सांगितले. मला रात्री आठ वाजता कळले की तो भाग साधारणपणे क्लबच्या आसपासचा असावा. आता त्यांचा नंबर लावल्यावर "out of coverage area or switched off" असा मेसेज मिळत होता. त्या रस्त्यावर मी जीप उभी केली व चालत चालत काही माग मिळतो का हे पाहू लागलो. अचानक मला आठवले, अनुपला पाय आपटत चालायची सवय होती, ही माहीती विकासने काळे वकीलांना दिली होती. नकळत मी पाय आपटला तो एका मॅनहोलच्या झाकणावरच . लोखंडी झाकण गरकन फीरले, तोल जाउन मी गटारात ओढला गेलो. माझ्या मोठ्या पोटाने मला थेट आत पडू दिले नव्हते. गाडीचा चालक चटकन खाली उतरला व त्याने मला बाहेर काढले. मग मी रस्सी मागवुन त्या गटारात सावकाश उतरलो. एका हूकात अडकवून ठेवलेला मोबाईल मला सापडला. अर्थात त्याची बॅटरी डाउन झालेली होती. अनुपही असाच मेला होता. त्याने गटारावर पाय आपटताच, ते त्याला आत घेउन परत बंद झाले होते. अंडाकृती झाकण एका रींग भोवती फिरवून बघा, तुम्हाला काय झाले असेल त्याचा अंदाज बांधता येईल. बोलत बोलत विकास पुढे गेला होता. झाकणाचा आवाज त्याला कळलाही नसेल आणि अनुप गडप झाला असणार. झाकण गरकन फिरुन परत जाग्यावर बसल्यामुळे तो गटारात पडला अशी विकास काय कोणालाच शंका यायचे कारण नव्हते. त्या रस्त्यावर तेव्हा हे बघणारे आणि कोणी असण्याची शक्यताही नव्हती. काळे वकीलही असेच मेले होते, पण लगेच नाही. त्यांना थोडा वेळ मिळाला असणार, त्या वेळात त्यांनी एक sms धाडला असणार. उचंदन केंद्राचे काम ओहोटी लागली की चालू होते, मग मैला मिश्रीत पाणी तूफान वेगाने समुद्रात ढकलले जाते, त्यात ते दोघेही वाहुन गेले असणार, त्यांची प्रेते कोणत्यातरी किनार्याला लागली असतीलच, पण त्यांची ओळख पटवणे निव्वळ अशक्यच.
अजून एक, अगदी राहवत नाही म्हणून नमूद करतो, त्या दिवशी मी सुद्धा मेलोच असतो जर मला माझ्या चालकाने पडताना पाहीले नसते तर व माझ्या सूटलेल्या पोटाने मला थोपवले नसते तर। पण मी ज्या वेगाने गटारात ओढलो गेलो, त्या मागे एखादी अमानवी शक्ती असावी असे मला राहून राहून वाटते. त्या मॅनहोलचे झाकण बदलावे पण तिथे काही गूढ, अघोरी असे काही असेल का याचाही शोध घेतला जावा.
आता हे सर्व कळल्यावर माझ्या जगण्याला खरच काही अर्थ उरला असता का ? हे पत्र मिळताच विकास निर्दोष असल्याचे खात्याने जाहीर करावे, बिचार्याला आपल्या सडलेल्या यंत्रणेने जिवंतपणी न्याय मिळाला नाही, मेल्यावर तरी त्याच्या कपाळावरचा 'संशयीत खूनी' हा शिक्का मिटावा।
शक्य असल्यास विकासच्या घरच्यांनी मला क्षमा करावी, आणखीन मी काय करू शकतो ?
रविवार, २१ सप्टेंबर, २००८
एन्ड गेम !
एन्ड गेम !
प्रकरण १ -
मी अंजली कुट्टी - वय ३० वर्षे, टीपिकल केरळीयन ! अर्थशास्त्रातला पद्व्युत्तर अभ्यासक्रम केला आहेच पण दाक्षिणात्य नृत्यकलांतही पारंगत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गीतेचा माझा अभ्यासही दांडगा आहे. नृत्याचे माझे भारतभर परफॉर्मन्स होत असतात. बहुतेक काळ मी स्टेजवर तरी असते नाहीतर विमान किंवा ट्रेन मध्ये नाहीतर ऑर्कुटॅगिरी ! माझे वडील फार मोठे बिझनेसमन आहेतच पण केरळच्या राजकारणातले पण वजनदार असामी आहेत. एकुलती एक मुलगी आणि पैसेवाला बाप यामुळे माझे बालपण मस्तच गेले. मोकळ्या वातावरणात मी वाढले . माझी मेन्टॅलीटी तद्दन पुरूषी आहे म्हणूनच की काय मला मैत्रीणी जवळपास नाहीच पण मित्र मात्र भरपूर ! अगदी जगाच्या काना कोपर्यात माझे मित्र पसरले आहेत ! अर्थात याला कारण ऑर्कुटच ! माझा प्रोफाईल सुद्धा माझ्या सारखाच, अगदी मोकळा ढाकळा आहे आणि DP सुद्धा कोणालाही भुरळ पाडणाराच आहे ! मी जेव्हा जेव्हा दौर्यावर जाते, तेव्हा तेव्हा माझ्या दोस्तांना भेट देतेच, बहुदा surprise visit ! फोटोपेक्षा मी जास्तच देखणी आहे असे बहुतेकांचे मत पडते. नवरेगिरीचा मला भयंकर तिटकारा आहे पण निव्वळ वडीलांना बरे वाटावे म्हणून मी ५ वर्षापुर्वी विवाहबद्ध झाले. तसे ते contract marraige च आहे.माझा नवरा अजय आणि माझी भेट एका पार्टीत झाली, तो ही मस्त मौला आहे आणि लग्न हे त्याच्या मते नस्ती ब्यादच ! पण त्याच्याही घरून 'लग्न कर लग्न कर' असा तगादा चालूच होता. हे कळल्यावर मीच त्याच्या पुढे असा प्रस्ताव ठेवला. तसे आमच्यात नुसते नवरा-बायकोचे कागदो-पत्रीच नाते आहे आणि आम्ही दोघेही स्वच्छंदी जीवन जगत आहोत. अजयचा छोटा बीझनेस आहे आणि त्यातच तो रमलेला असतो. त्याची माझी जवळीक केव्हा होणारच नाही कारण "साहीत्य संगीत कला" याचा त्याला जराही गंध नाही, संस्कृत सुभाषितकारांनी अशा मनुष्याला चक्क शींग नसलेला पशूच म्हटले आहे ! हो, संस्कृत सुभाषिते हा सुद्धा माझा आवडीचा विषय आहे. गीतेच्या अभ्यासात पण मी गढलेली असते आणि ऑर्कुटवरील गीतेच्या कट्ट्यावर सुद्धा मी बराच वेळ असते. त्यावर एक टॉपिक माझ्या वाचनात आला "गीता पाठांतराची राष्ट्रीय पातळीवरील big budget स्पर्धा असावी". ही स्पर्धा कशी घ्यायची याचा संपूर्ण draft त्यात होता. topic creator चे नाव होते १नाथ मराठे ! त्याचा प्रोफाइल बघायला गेले तेव्हा तो संपूर्ण मराठीत होता, जी मला अजिबात येत नाही. त्या मुळे हा १नाथ कोण याचे कुतुहल अजूनच वाढले व मी त्याला चक्क मैत्री प्रस्ताव धाडला. त्याने तो स्वीकारला. मग आमच्यात तासंतास chatting सुरु झाले व गाढ परीचय झाला. कमाल आहे नाही, एखाद्याला न भेटता सुद्धा त्याच्या विषयी एवढा विश्वास, जिव्हाळा कसा बरे वाटतो ? तो त्यांच्या जातीच्या कट्ट्यावरच पुढे सक्रीय झाला व पुढे त्याचा ब्लॉगही आला. त्यात त्याने जवळपास १५० सुभाषिते संकलीत केली होती. त्याच्या ब्लॉगवरचे मी वाचू शकेन असे एवढेच होते. पण तरीही त्याचा ब्लॉग मी रोज उघडते कारण त्यातील त्याचा चिकणा फोटो ! अल्बमच्या माध्यमातुन त्याच्या घरातली बाकी मंडळीही माझी चांगली परीचीत झाली आहेत. कधी मधी आम्ही फोनवरही गप्पा मारतो तेव्हा त्याचा आवाजही कानात घुमत राहतो, साठून राहतो. या माणसाला एकदा तरी भेटायचेच ! आणि तो योग ही आता फार लांब नाही. उद्याच मी नेत्रावतीने मावशीकडे , ठाण्याला जाणार आहे, कार्यक्रमही आहेच. गाडी पनवेलला येईल तेव्हा डब्यात तो मला भेटणार आहे. कळेलच तो खरा कसा आहे ते !
प्रकरण २
मी अजय नायर. माझा स्वत:चा व्यवसाय आहे आणि माझ्या सासर्याएवढा नसला तरी बर्यापैकी पैसा आहे। पण राजकारणाचे मात्र मला वावडे आहे. म वरून चालू होणार्या सगळ्याच गोष्टी मला मनापासून आवडतात. त्यात बाधा येउ नये म्हणून मी contract marraige केले खरे पण माझी बायको त्यातला प्रत्येक शब्द खरा करेल असे मात्र मला वाटले नव्हते. तीच्या जीवनात काही फरक पडलाच नाही पण लग्न झाल्यामुळे मला मात्र पहील्यासारख्या मैत्रीणी मिळत नाहीत. धंदा वाढवायचाय पण त्यासाठी पैसा सासरा काही देत नाही, बायको शब्द टाकत नाही. हे जाउ दे हो, पण ती मला जी कस्पटासमान वागणूक देते ती मात्र आता मला असह्य होत चालली आहे. एकाच घरात राहुनही ती मला वार्यालाही उभा करत नाही आणि मी तीचे काहीही वाकडे करू शकत नाही. मला पूर्ण अनाकलनीय विषयात ती गढलेली असते आणि ऑर्कुटींग का काय म्हणतात ते तर माझ्या डोक्यात शिरते. पुरूषांना खेळवण्यात तीला काय एवढा आनंद मिळतो ? आणि ते तरी कसे तिचा फोटो बघुन एवढे पागल होतात ? तीचा कसा ही का असेना मी नवरा आहे आणि हे मी आता खपवुन घेणार नाही. तीचा काटा काढायची नामी संधी आली आहे. थोड्याच वेळात मी तीला सोडायला स्टेशनवर जाणार आहे. ती मुंबईला जाणार आहे, खरच कार्यक्रम आहे का कोणी नवे सावज हेरेले आहे ? या वेळी कोण तीच्या गळाला लागलाय ? जाउ दे. माझा प्लान तर फूल प्रूफ आहे ! नेत्रावती ४:३० ची होती. आम्ही २० मिनीटे आधीच बाहेर पडलो. जाताना मी मुद्दामच गाडीच्या काचा उघड्या ठेवल्या होत्या, गेटवरच्या वॉचमनला 'आम्ही' बाहेर पडल्याचे कळावे म्हणून. थोडे पुढे गेल्यावर मी फोनवरून माहीती घेउन गाडी चार तास उशीरा असल्याचे अंजलीला सांगितले. अपेक्षेप्रमाणेच तीने गाडी परत घरी घ्यायला सांगितली. या वेळी मात्र मी उकडते आहे असे सांगून काचा बंद केल्या होत्या ! घरी आल्या आल्याच तीने पीसी ऑन केला व ऑर्कुटींग करत बसली ! मी आतल्या खोलीत जाउन माझा मास्टर प्लान परत परत तपासत होतो. धीर गोळा करत होतो. शेवटी निर्धार करून मी बाहेर आलो. ती चॅटींग करण्यात मग्न असतानाच मी तीचा गळा आवळला. थोड्याच वेळात तीची धडपड थांबली. संगणक मी डायेरेक्ट बंद केला. तीचे प्रेत बाथरूम मध्ये आणले व चॉपरने त्याचे बारीक बारीक तुकडे केले. ते सर्व एका प्लास्टीकच्या मोठया पिशवीत भरले व ती पिशवी रात्री गाडीच्या डिकीत ठेउन एका ओसाड रस्त्यावर आलो. एका मोठ्या मॅनहोल मध्ये ती पिशवी फेकून दिली ! लगेच घरी आलो. बाथरूम स्वच्छ धुतले. सगळे अगदी बिनबोभाट पार पडले. मग मस्त झोपी गेलो. दूसर्या दिवशी रात्री मुंबईवरून तीच्या मावशीचा फोन आला. अंजली अजून कशी आली नाही म्हणून काळजीत पडली होती ती. मी सुद्धा काळजी वाटल्यासारखे केले आणि अजून थोडावेळ वाट पाहू असे सूचवले. अर्थात तीला मी न परतीच्या वाटेला लावलेच होते ! दूसर्या दिवशी पहाटे सासर्या बरोबर पोलीस चौकीत जाउन तक्रार द्यायचा फार्स पण पार पडला.
प्रकरण ३
मी राजशेखर ! केरळ पोलीसांच्या विषेश पथकातला अधिकारी. तरूण, तडफदार आणि धडाडीचा. राजकारण्यांच्या खास मर्जीतला. पण अशा ओळखी कधी कधी उगाच चिल्लर कामात गुंतवतात. आता हेच बघ ना, कोणी मुंबईला जायला निघालेली अंजली missing होते तर तो तपास सुद्धा मीच करायचा ? अशी किती माणसे रोज हरवतात पण अंजली एका बड्या राजकारण्याची मुलगी, तपास वरच्या पातळीवरूनच नको का व्हायला ? तसा मिळेल ते काम आवडीने, पूर्ण रस घेउन करायचे हा तर माझा स्वभावच आहे. अर्थात अशा केस मधला सर्वात पहीला संशयीत तीचा नवरा अजय ! तेव्हा मी त्याच्या घरी धडकलो. आपण स्वत: अंजलीला स्टेशनवर सोडली हे सांगताना तो जरासा चलबिचल झालेला वाटला. मी तीला अगदी बोगीपर्यंत पोचवायला गेलो नव्हतो यावर त्याने भर का बरे दिला ? बोलण्याच्या ओघात अंजलीचे ऑर्कुट वेडही समजले. ती कायम फीरतीवरच असते व तेव्हा तिच्या मित्रांनाही भेटते हे सांगताना त्याच्या स्वरातला तिरस्कार लपला नाही. मग मी वॉचमनला भेटलो. त्याने त्या दिवशी मॅडम साहेबांबरोबरच गाडीत होत्या हे सांगितले, अर्थात गाडीच्या काचा उघड्या असल्यामुळेच तो हे सांगू शकला. थोड्यावेळाने साहेब परत आले व रात्री खूप उशीरा परत गेले तेव्हा मात्र काचा नेहमीसारख्याच बंद होत्या. मग मी रेल्वे स्टेशनला फोन करून त्या दिवशीचा reservation chart मागवुन घेतला व त्या बोगीत ड्युटी असलेल्या टीसीला पाचारण केले. टीसी ने त्या सीटवरील व्यक्तीने प्रवास केल्याचे सांगितले. म्हणजे अजय सध्या तरी संशयाच्या दायर्यात येत नव्हता. आता मी तीच्या आसपासच्या सीटवरील व्यक्तींची माहीती/ पत्ते काढले. काहींचे मोबाईल नंबरही मिळाले. अंजलीच्या बर्थ जवळच चार बायकांचा ग्रूप होता. फोनवरून त्यांनी दिलेली माहीती निश्चीत या प्रकरणाचे धागेदोरे देत होती. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्या बर्थवरची तरूणी पनवेलला उतरली होती. तसेच साधारण चाळीशीचा, मराठी वाटणारा माणूस बोगीत शिरून तीची चौकशी करत होता. ती आताच उतरली असे सांगितल्यावर, 'गाडी तिथून वेळेवर सूटली का ?' असे विचारून तो तिच्या मागे पळतच गेला होता ! this is interesting ! हा नक्कीच तीचा कोणी ऑर्कुटवरचा मित्र असणार , जो तिला घ्यायला आला होता, पण थोडा उशीरा ! मी लगेच सायबर सेल मध्ये गेलो. या वेळी मी अजयलाही बरोबर घेतले होते. आधी मी अंजलीचा प्रोफाइल शोधून काढला. मग प्रवासाच्या आधीच्या काही दिवसापासून तिच्या scrapbook ची एक फाइल बनवली. त्यात ती आपल्या मुंबई भेटी बद्द्ल फक्त १नाथ या माणसाशी बोलली होती. एकनाथच्या scrapbook ची पण मी फाईल बनवली. अंजलीबरोबर प्रवास करणार्याला बाईला मी MMS मार्फत १नाथ चा फोटो पाठवला व तीने लगेच 'हाच तो' म्हणून सांगितले. yes, i am on right track ! या माणसाचा प्रोफाइल मराठीत असल्याने फारसे काही हाती लागले नाही पण तो पनवेलला राहतो हे खूपच महत्वाचे होते. त्याचा ब्लॉगही होता आणि त्यात त्याने आपला मोबाईल नंबरही दिला होता ! म्हणजे पुढचा तपास आणि कदाचित शेवट सुद्धा पनवेललाच होणार होता ! दोघांच्या scrapbook ची फाइल मी प्रिंट करून घेतली पण मग प्रवासाच्या वेळे आधीचे prints लगेच काढून निघालो सुद्धा ! त्या मोबाईल नंबर वरून मला बरीच माहीती मिळणार होती. त्याचे खरे नाव शरद ओगले होते तर ! अर्थात ऑर्कुटॅवरचे अर्धे प्रोफाईल फेकच असतात म्हणा !
प्रकरण ४
अरे बापरे ! गळ्यात फास अडकलाच होता पण वाचलो ! पण टीसी असे काय सांगतोय की त्या सीटवरून एका तरूणीने प्रवास केला म्हणून ? बरेच आहे की ! हा राजशेखर पक्का वस्ताद आहे, जपून रहायला हवे. सायबर सेल मात्र बराच आधुनिक आहे हा, काय पटपट माहीती मिळाली. तो कोणी १नाथ आता चांगलाच लटकणार ! आणि या पानावर बरे काय माहीती आहे जी राजशेखरने बरोबर घेतली नाही. ती पाने वाचली आणि माझ्या समोर परत फासाचा दोर लटकायला लागला. एसी रूममध्ये पण मी घामाने डबडबून गेलो. साली xx मेली पण आता मला घेउनच मरणार बहुतेक. तेवढ्या वेळात तीने त्या १नाथशी चॅटींग करून , गाडी उशीरा सूटणार आहे, मला तू पनवेलला घ्यायला ये अशी गळ घातली आहे. राजशेखर जेव्हा एकनाथची चौकशी करेल तेव्हा ही माहीती उघड होणारच आहे आणि पनवेलचा तपास पुन्हा त्रिवेंद्रमला येणार आणी आपल्या गळ्यात फास पडणार. नाहीतर तीचा राजकारणी बाप आपला आधीच गेम करणार ! एक खून तर केलाच आहे तेव्हा तिच्या याराला पण संपवून टाकले तर ? तसे काही भाई लोग आपल्या परीचयाचे आहेतच, धंदा म्हटले की हे सगळे आलेच ना ? मोबाइल नंबर वरून १नाथचा नाव , पत्ता मला लगेच समजला. साला, नाव पण खोटेच होते तर ! माहीतीच्या मायाजालात सगळेच साले मुखवटे !
प्रकरण ५
मी कासिम , कासिम भाई ! आपला बी एक बिझनेस , धंदा है ! मौत का सौदागर हू मै ! कोणाचा गेम वाजवायचा असेल तर मला सांगा। एकदम व्यावसायिक असते आपले काम. माझ्या पे रोल वर अनेक शूटर आहेत. ऑर्डर आली की त्यातल्या एकाला मी पिटाळतो. सोबत कट्टा, ५०,००० रू. , १०० % advance देतो मी, मोटारसायकल (चोरलेलीच !), ज्याचा गेम वाजवायचाय त्याचा नाव व पत्ता ! थांबा हा, जरा मोबाईल वाजतोय, कोणाची तरी वाजवायची सुपारी असणार बहुदा. चला, शरद ओगले, राहणार नवीन पनवेल यांचे दिवस भरले आता. अबे वो कल्लू कहा गया बे, जा, उसको बुला जल्दी, अर्जेन्ट !
प्रकरण ६
मी कल्लू, नवीन पनवेल, सेक्टर ३ च्या, रागमालीका इमारती बाहेर सावजाची वाट पहात थांबलो आहे. वॉचमन सांगतो की साब के आना का कोई टॅम नही ! त्याला काय माहीत 'आता' तो जो येणार तो परत जाणारच नाही ते ! गाडीतुन तो उतरला की लगेच त्याला अगदी blank point वरून गोळ्या घालायच्या, मोटार सायकल वरून पसार व्हायचे ! मरण्यापुर्वी आता हा किती वाट पहायला लावतोय ते बघुया !
प्रकरण ७
मी शरद ओगले, रीलायन्स या बड्या कंपनीचा बडा अधिकारी. तशी नोकरी माझी फिरतीची आहे. महा-सेझ चे काम मीच तर बघतो आहे. नेहमीसारखेच संध्याकाळचे सात वाजले तरी काम काही संपत नाही, घरी जाताना होणारा उशीर काही चूकत नाही. आता यावेळा कोण आले आहे भेटायला बरे ! पोलीस ? आताच्या आता चौकशीसाठी बोलवत आहेत. कसली चौकशी, तर माहीत नाही, केरळ वरून कोणी साहेब आले आहेत, गेस्ट-हाउसला उतरले आहेत, तेव्हा लगेच निघा ! आता ही काय बाबा भानगड. राजशेखर हा तपास अधिकारी तसा बराच सभ्य वाटतो आहे, पोलीसी मग्रूरी त्याच्या बोलण्यात तरी जाणवत नाही. पण माझा चेहरा बघून तो बुचकळ्यात का बरे पडला ? ९९८७०३०६३७ हा मोबाईल नंबर माझाच आहे , पण माझा नाही, म्हणजे मी तो वापरत नाही. माझा मित्र एकनाथ तो वापरतो, त्याचे बिलपण तोच भरतो. ते सिमकार्ड मला माझ्या कंपनीने सवलतीच्या दरात दिलेले आहे. काय भानगड आहे ही. हो, तो जो फोटो दाखवत आहे, तो तर एकनाथ ! राजशेखरच्या आदेशावरून त्याला तातडीने बोलावून घेतले. आता तो येई पर्यंत थांबणे आले !
प्रकरण ८
मी श्रीलेखा, नवीन पनवेलला राहते. माझे एक लहानसे बुटीक आहे. त्यासाठी त्रिवेंद्रमला सतत ये-जा होत असते. दोन दिवसा पुर्वीची गोष्ट, मी नेत्रावतीचे एसी तिकीट गाडी सुटायच्या काही मिनीटे आधीच काढले. मला वाटले सिझन नसल्यामुळे निदान एसी बोगी तरी खाली असेल पण कसले काय ! पण हा बर्थ तर रिकामा दिसतो आहे, चला , सध्या तिकडेच बसून घेउ, पुढचे पुढे ! टीसी काही मला दिसलाच नाही आणि प्रवासही छान झाला. कोण असेल ही अंजली, माझ्याच वयाची दिसते पण आली का नाही ? खरी गंमत तर पुढेच आहे. गाडी तब्बल चार तास उशीराने पोचली व मी जड सामान घेउन जीना चढू लागले तेव्हाच एक साधारण चाळीशीचा मनुष्य आला, माझे सामान त्याने अगदी अदबीने घेतले. तो चेहर्यावरून तरी सभ्य वाटत होता . पण आमची तर अजिबात ओळख नव्हती. पुल पार करताना तो म्हणाला अंजली तुझा DP खूपच वेगळा आहे, का तो फोटोच फेक आहे ? म्हणजे हा मला अंजली समजत होता तर ! मी त्याचा गैरसमज दूर केल्यावर कसला शरमलाय तो, sorry असे पुटपुटुन तो झरकन पुढे गेला. त्याला सांगायला हवे होते की तुझी कोण ती अंजली का फंजली आलीच नाही ते ! चला मला आता जायचे आहे चकलीची ऑर्डर द्यायला, कोणी मराठे म्हणून आहे, हे आयटम छान बनवते, अगदी १००% home made !
प्रकरण ९
मी अनुजा एकनाथ मराठे, तशी मी गृहीणीच पण नावाला होम फूडसचा व्याप मांडला आहे. माझा संसार छान चालू आहे, प्रेमळ नवरा व दोन गोजिरवाणी मुले ! नवरा मात्र माझा भारी उचापती आहे. सतत त्याच्या डोक्यात काहीतरी किडा वळवळत असतो. हल्ली काय तर ऑर्कुट व ब्लॉग ! त्यातच अगदी तासंतास गढलेला असतो. कामावर पण तेच घरी पण तेच. त्या मीट काय, वाद-विवाद काय. आणि त्याच्या त्या मैत्रीणी ! वेळी-अवेळी फोन करून याच्याशी अघळ-पघळ गप्पा मारत असतात. मला बिलकूल आवडत नाही ही असली थेर ! हल्ली नवीन ठीकाणी बदली झाल्यापासून तर घरी यायची काही वेळच उरलेली नाही. आठ वाजले, आता कोण बरे आले, हा तर नाही ? चकल्या हव्यात या बयेला. ही काय यायची वेळ झाली का ? म्हणून हा धंदा नको वाटतो अगदी. ती बाई. श्रीलेखा, असे काय म्हणाली की ? म्हणजे आधी तीने प्रसाद आणि प्रियांकाला बघितले , मग 'हे' आहेत का विचारले . मग मुले वडीलांच्या चेहर्यावर गेली आहेत का ? माझ्या नवर्याने चक्क तीचे सामान घेतले व तीला अंजली म्हणून हाक मारली ? आता ही काय नवी भानगड ? थांब त्याला चांगला फैलावरच घेते ! नाही, आताच फोन लावते !
प्रकरण १०
मी १नाथ, sorry, एकनाथ मराठे ! मी कसा आहे ? माझा ब्लॉग किंवा ओर्कुट प्रोफाईल वाचा, तुम्हाला जर कळले तर मला जरूर कळवा ! या अंजलीचे काही खरे नाही। नेत्रावतीने मुंबईला येणार होती. पण गाडीची वेळ होउन गेल्यावर सुद्धा ही बया आपली on line ! गाडी लेटफे असे बोलली. मला पनवेलला घ्यायला आता तु येच असे म्हणत असतानाच अचानक log off झाली. हीला स्टेशनवर भेटेन पण घरी कशी आणू ? माझी बायको म्हणजे एक नंबरची संशयी, तीच्या प्रश्नांच्या सरबत्तीला मी कसे उत्तर देउ ? दूसर्या दिवशी कामावरून येताना सहजच annonuncement झाली की नेत्रावती सूटणार आहे व समोरच एसी कोच म्हणून डब्यात शिरलो तर ही बया आधीच पनवेलला उतरली सुद्धा होती. आणि गाडी तर तिकडून अगदी वेळेवर सूटली होती ! धावत पळत बाहेर आलो तर ती कोणी भलतीच निघाली. नशीब तिने काही गैरसमज करून नाही घेतला तो ! आज दोन दिवस झाले, अंजलीचा नंबर out of coverage आहे. ऑर्कुटवर पण दिसत नाही. दोन दिवसातल्या माझ्या सोडा , कोणाच्याच scraps ना तीने उत्तर दिलेले नाही. काय बरे झाले असेल ? चला काम संपले निघायला हवे. आजपण उशीर झाला आहे. शरद का बरे बोलवून घेत आहे ? ते पण पनवेलच्या गेस्ट हाउस मध्ये, लगेचच ? गेस्ट हाउस वर पोचलो. बाहेर दोन पोलीस शिपाई उभे होते. शरद बरोबर कोणी राजशेखर होता. केरळचा पोलीस अधिकारी. माझा ऑर्कुटवरचा फोटो त्याच्या हातात होता व मला बघुन तो भलताच खुश झाला होता. काय तर म्हणे मी अंजलीचे अपहरण केल आहे किंवा तीचा खून तरी. मला अटक करून तो केरळ गाठणार होता. त्याच्याकडे जी माहीती होती त्या वरून असा निश्कर्ष साध्या शिपुरड्यानेही काढला असता. मी आता पुरता अडकलो होतो. माझ्या घशाला कोरड पडली. शरद माझ्याकडे आता वेगळ्याच नजरेने बघत होता. पण संकटात हात पाय गळणारा मी नाहीच. आता माझे डोके वीजेच्या वेगाने चालत होते. राजशेखरच्या नजरेतुन अनेक गोष्टी सुटल्या होत्या, त्यात सगळ्यात मुख्य म्हणजे टीसी व त्या बायका यांना त्याने खर्या अंजलीचा फोटो दाखवला नव्हता, टीसीने त्या जागेवर बसलेल्या बाईचे तिकीट तपासले होते का हे ही बघितले नव्हते. हे केले असते तर कदाचित त्याला मुंबई गाठावी लागलीच नसती आणि सगळ्यात मुख्य म्हणजे गाडी सुटून गेल्यावरचा आमचा संवाद जो scrap book मध्ये होता, तो. मी राजशेखरला माझे scrap book उघडून दाखवले. आता मात्र तो वरमलाच. सिली मिसटेक त्याने केली होती. त्याने आणलेली प्रिंट बघताना मला आणि एक गोष्ट कळली. त्या कागदावर १/५, २/५, ३/५ असे नंबर होते, मग दोन पाने कोठे गेली, ज्या वर आमचा पुढचा संवाद होता ? भयानक म्हणजे त्या वेळी त्याच्या सोबत अजय सुद्धा होता. आधी दूसराच कोणी गोत्यात येतो म्हणून खुश झालेला अजय नक्कीच सावध झाला असणार. परंतु एवढे सांगुनही राजशेखर मला सोडायला तयार नव्हता. माझी अधिक चौकशी तो मला केरळला नेउनच करणार होता. ती पनवेलला उतरलेली बाई जर मला सापडली तरच मी यातुन सूटणार होतो. पण ते कसे शक्य होते ? एवढ्यात हीचा फोन आला. चायला, पनवेलला अंजली समजून भलत्याच बाईच्या पाठी पडलो होतो हे हीला कसे कळले ? अहो देवच पावला ! 'ती'च बाई चक्क चकलीची ऑर्डर द्यायला आली होती व अर्थातच तीने आपला मोबाइल नंबर पण दिला होता. मी उत्साहाने हे सगळे राजशेखरला सांगितले व तीचा नंबरही दिला. राजशेखरची मतीही आता गुंग झाली होती. हे प्रकरण वाटते तेवढे साधे नव्हते तर. त्याने श्रीलेखाचा नंबर लावला, मुद्दामच केरळी भाषेत तो तीच्याशी निदान अर्धा तास तरी बोलला. त्याने फोन कट केल्यावर लगेच त्याला एक mms आला, त्यात श्रीलेखाचा फोटो होता ! त्याने लगेच तो बोगीत, शेजारी बर्थ असलेल्या बाईला forward केला. लगोलाग तिला फोन करून त्या दिवशी प्रवास करणारी तरूणी हीच असल्याची स्वत:ची खात्री पटवली. आता तणाव, संशयाचे धुके जवळपास विरले होते. पण राजशेखर खमक्या पोलीस अधिकारी होता. जो पर्यंत तो टीसी श्रीलेखाचा फोटो ओळखत नाही तो पर्यंत आता तो मला सोडणार नव्हता. तसे त्याने त्रिवेंद्रम स्टेशनला फोन करून 'त्या' दिवशी, नेत्रावती सुटायच्या आधी, एखादे एसी वर्गाचे तिकीट विकले गेले होते का अशी विचारणा केली होती, त्याचेही उत्तर यायचे होते. मग मी शरद ओगले यांना तरी मोकळे करा अशी विनंती केली ती मात्र त्याने लगेचच मान्य केली. शरद मोठ्या अनिच्छेनेच निघाला. राजशेखर बरोबर आता माझ्या अवांतर गप्पा चालू झाल्या. आता त्याला माझ्या बद्दल आदर जाणवत होता. एवढ्यात माझा मोबाईल वाजला.
एन्ड गेम !
"ओगले साब, आप कब आ रहे है, मै आपके लिये कुरीयर लेके आया हू, ओर कितना रूकू" असे कोणीतरी बोलत होते। मी चमकलो, ओगले साहेब ? मी म्हटले " तो वॉचमन के पास देके निकल जाओ" तेव्हा तो म्हणाला "नही, आपकोही देना है, रूकता हू, दूसरा चारा ही तो नही है " परत माझे डोके भणभणू लागले व मी ताडकन बोललो, "सर. ओगलेसाब की जान खतरे मे है". मी लगेच शरदला फोन लावला, त्याने बर्याच वेळाने तो घेतला. तो वेळ मला अगदी जीवघेणा वाटला. मी शरदला स्पष्ट सांगितले की तुझ्या जीवाला धोका आहे, तुझा मारेकरी तुझी तुझ्या घराखालीच वाट पहात आहे तेव्हा आहे तिकडेच थांब. शरद त्याच्या घराच्या गल्लीवरच थांबला होता तेव्हा मी त्याला थोडे लांब, म्हणजे शबरी हॉटेल जवळ थांबायला सांगितले. कोणीतरी भाडोत्री मारेकरी, अर्थात अजयने नेमलेला, मी समजून शरदलाच उडवणार होता. अर्थात फासाचा दोर चुकवण्यासाठी माझा जीव घेणे त्याला भागच होते. मी आणि राजशेखर टॅक्सी करून निघालो. त्याच्या बरोबर त्याचे सर्व्हीस रीव्हॉल्वर होतेच. पोलीस नियंत्रण कक्षाला पण सतर्क केले गेले. शबरी हॉटेलच्या जवळ, आपल्या गाडीत थांबून शरद आमची वाट बघत होता. आम्ही पुढे निघालो. आम्ही वेगळ्या वाटेने त्याच्या घराजवळ पोचणार होतो. मारेकरी कोण ते हेरणार होतो व मगच शरद ने पुढे यायचे ठरले होते. मोटरसायकलजवळ उभा असलेला तो तरूण आम्ही लगेच हेरला. अजून खात्री पटण्यासाठी आम्ही त्याच्या नंबरला कॉल दिला. बेल वाजताच कट केला. आणि एवढ्यात गोंधळ झाला. शरद गाडी घेउन चक्क घराच्या फाटकापर्यंत पोचला सुद्धा ! मोटरसायकलचे इंजिन सुरू ठेउन तो तरूण आता झरझर चालत शरदच्या दिशेन जाउ लागला. आता कट्टापण त्याने तयार ठेवला होता. त्याला खरे तर आम्हाला जिवंत पकडायचे होते पण शरदचा जीव धोक्यात घालून नक्कीच नाही ! राजशेखरला त्याला आपल्या रेंज मध्ये ठेवण्यासाठी थोडे पळत जाउनच त्याच्यावर गोळी झाडावी लागली ती चुकलीच. लगेच तो त्याच्या मोटारसायकलच्या आडोशाला गेला. राजशेखर आता पूर्ण उघडा पडला होता !मी मोठयाने ओरडून शरदला गाडी पुढे घेउन राजशेखरला कव्हर दे असे सांगितले. शरदने गाडी वेळेवर पुढे आणली नसती तर त्या शूटरच्या गोळीने राजशेखरचा वेध घेतलाच असता. एकदा गाडीचे कव्हर मिळाल्यावर राजशेखरने फारसा वेळ लावला नाही. तेवढ्यात दूसर्या टोकाने पोलीसांची सशस्त्र कुमक सुद्धा आली. मोटरसायकलच्या पाठी लपलेल्या त्या सशस्त्र गुंडाची चाळण झाली. राजशेखर , शरद व मी एकमेकांना गळामीठी मारली. गोळीबाराचा आवाज ऐकुन आसपासचे लोक गोळा झाले होते. एवढ्यात राजशेखरला टीसीने श्रीलेखाचा फोटो ओळखल्याचे समजले. तसेच त्या दिवशी तो तपासणीसाठी गेला तेव्हा ती बाई झोपली होती, पण साधारण वय जुळत होते म्हणून तो जास्त खोलात शिरला नव्हता याचाही खुलासा झाला. राजशेखरने लगोलग केरळला फोन लावून अजयला ताब्यात घ्यायच्या सूचना दिल्या. त्याच्या चेहर्यावर आता अतीव समाधान होते. एका खुनाची उकल झाली होती तर एक हकनाक जाणारा जीवही वाचला होता. उद्याच्या मिळेल त्या फ्लाइटने तो त्रिवेंद्रम गाठणार होता. माझा निरोप घेताना हातात घेतलेला हात त्याने बर्याच कष्टाने सोडवला. संध्याकाळच्या कातरवेळी सुरू झालेल्या या नाटकाचा शेवट होई पर्यंत पहाट झाली होती ! एरवी मला हा दिवस अंधार कोठडीतच काढावा लागला असता. या पहाट-वार्याची मजा काही औरच होती !