रविवार, २१ सप्टेंबर, २००८

एन्ड गेम !

एन्ड गेम !
प्रकरण १ -

मी अंजली कुट्टी - वय ३० वर्षे, टीपिकल केरळीयन ! अर्थशास्त्रातला पद्व्युत्तर अभ्यासक्रम केला आहेच पण दाक्षिणात्य नृत्यकलांतही पारंगत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गीतेचा माझा अभ्यासही दांडगा आहे. नृत्याचे माझे भारतभर परफॉर्मन्स होत असतात. बहुतेक काळ मी स्टेजवर तरी असते नाहीतर विमान किंवा ट्रेन मध्ये नाहीतर ऑर्कुटॅगिरी ! माझे वडील फार मोठे बिझनेसमन आहेतच पण केरळच्या राजकारणातले पण वजनदार असामी आहेत. एकुलती एक मुलगी आणि पैसेवाला बाप यामुळे माझे बालपण मस्तच गेले. मोकळ्या वातावरणात मी वाढले . माझी मेन्टॅलीटी तद्दन पुरूषी आहे म्हणूनच की काय मला मैत्रीणी जवळपास नाहीच पण मित्र मात्र भरपूर ! अगदी जगाच्या काना कोपर्यात माझे मित्र पसरले आहेत ! अर्थात याला कारण ऑर्कुटच ! माझा प्रोफाईल सुद्धा माझ्या सारखाच, अगदी मोकळा ढाकळा आहे आणि DP सुद्धा कोणालाही भुरळ पाडणाराच आहे ! मी जेव्हा जेव्हा दौर्यावर जाते, तेव्हा तेव्हा माझ्या दोस्तांना भेट देतेच, बहुदा surprise visit ! फोटोपेक्षा मी जास्तच देखणी आहे असे बहुतेकांचे मत पडते. नवरेगिरीचा मला भयंकर तिटकारा आहे पण निव्वळ वडीलांना बरे वाटावे म्हणून मी ५ वर्षापुर्वी विवाहबद्ध झाले. तसे ते contract marraige च आहे.माझा नवरा अजय आणि माझी भेट एका पार्टीत झाली, तो ही मस्त मौला आहे आणि लग्न हे त्याच्या मते नस्ती ब्यादच ! पण त्याच्याही घरून 'लग्न कर लग्न कर' असा तगादा चालूच होता. हे कळल्यावर मीच त्याच्या पुढे असा प्रस्ताव ठेवला. तसे आमच्यात नुसते नवरा-बायकोचे कागदो-पत्रीच नाते आहे आणि आम्ही दोघेही स्वच्छंदी जीवन जगत आहोत. अजयचा छोटा बीझनेस आहे आणि त्यातच तो रमलेला असतो. त्याची माझी जवळीक केव्हा होणारच नाही कारण "साहीत्य संगीत कला" याचा त्याला जराही गंध नाही, संस्कृत सुभाषितकारांनी अशा मनुष्याला चक्क शींग नसलेला पशूच म्हटले आहे ! हो, संस्कृत सुभाषिते हा सुद्धा माझा आवडीचा विषय आहे. गीतेच्या अभ्यासात पण मी गढलेली असते आणि ऑर्कुटवरील गीतेच्या कट्ट्यावर सुद्धा मी बराच वेळ असते. त्यावर एक टॉपिक माझ्या वाचनात आला "गीता पाठांतराची राष्ट्रीय पातळीवरील big budget स्पर्धा असावी". ही स्पर्धा कशी घ्यायची याचा संपूर्ण draft त्यात होता. topic creator चे नाव होते १नाथ मराठे ! त्याचा प्रोफाइल बघायला गेले तेव्हा तो संपूर्ण मराठीत होता, जी मला अजिबात येत नाही. त्या मुळे हा १नाथ कोण याचे कुतुहल अजूनच वाढले व मी त्याला चक्क मैत्री प्रस्ताव धाडला. त्याने तो स्वीकारला. मग आमच्यात तासंतास chatting सुरु झाले व गाढ परीचय झाला. कमाल आहे नाही, एखाद्याला न भेटता सुद्धा त्याच्या विषयी एवढा विश्वास, जिव्हाळा कसा बरे वाटतो ? तो त्यांच्या जातीच्या कट्ट्यावरच पुढे सक्रीय झाला व पुढे त्याचा ब्लॉगही आला. त्यात त्याने जवळपास १५० सुभाषिते संकलीत केली होती. त्याच्या ब्लॉगवरचे मी वाचू शकेन असे एवढेच होते. पण तरीही त्याचा ब्लॉग मी रोज उघडते कारण त्यातील त्याचा चिकणा फोटो ! अल्बमच्या माध्यमातुन त्याच्या घरातली बाकी मंडळीही माझी चांगली परीचीत झाली आहेत. कधी मधी आम्ही फोनवरही गप्पा मारतो तेव्हा त्याचा आवाजही कानात घुमत राहतो, साठून राहतो. या माणसाला एकदा तरी भेटायचेच ! आणि तो योग ही आता फार लांब नाही. उद्याच मी नेत्रावतीने मावशीकडे , ठाण्याला जाणार आहे, कार्यक्रमही आहेच. गाडी पनवेलला येईल तेव्हा डब्यात तो मला भेटणार आहे. कळेलच तो खरा कसा आहे ते !

प्रकरण २

मी अजय नायर. माझा स्वत:चा व्यवसाय आहे आणि माझ्या सासर्याएवढा नसला तरी बर्यापैकी पैसा आहे। पण राजकारणाचे मात्र मला वावडे आहे. म वरून चालू होणार्या सगळ्याच गोष्टी मला मनापासून आवडतात. त्यात बाधा येउ नये म्हणून मी contract marraige केले खरे पण माझी बायको त्यातला प्रत्येक शब्द खरा करेल असे मात्र मला वाटले नव्हते. तीच्या जीवनात काही फरक पडलाच नाही पण लग्न झाल्यामुळे मला मात्र पहील्यासारख्या मैत्रीणी मिळत नाहीत. धंदा वाढवायचाय पण त्यासाठी पैसा सासरा काही देत नाही, बायको शब्द टाकत नाही. हे जाउ दे हो, पण ती मला जी कस्पटासमान वागणूक देते ती मात्र आता मला असह्य होत चालली आहे. एकाच घरात राहुनही ती मला वार्यालाही उभा करत नाही आणि मी तीचे काहीही वाकडे करू शकत नाही. मला पूर्ण अनाकलनीय विषयात ती गढलेली असते आणि ऑर्कुटींग का काय म्हणतात ते तर माझ्या डोक्यात शिरते. पुरूषांना खेळवण्यात तीला काय एवढा आनंद मिळतो ? आणि ते तरी कसे तिचा फोटो बघुन एवढे पागल होतात ? तीचा कसा ही का असेना मी नवरा आहे आणि हे मी आता खपवुन घेणार नाही. तीचा काटा काढायची नामी संधी आली आहे. थोड्याच वेळात मी तीला सोडायला स्टेशनवर जाणार आहे. ती मुंबईला जाणार आहे, खरच कार्यक्रम आहे का कोणी नवे सावज हेरेले आहे ? या वेळी कोण तीच्या गळाला लागलाय ? जाउ दे. माझा प्लान तर फूल प्रूफ आहे ! नेत्रावती ४:३० ची होती. आम्ही २० मिनीटे आधीच बाहेर पडलो. जाताना मी मुद्दामच गाडीच्या काचा उघड्या ठेवल्या होत्या, गेटवरच्या वॉचमनला 'आम्ही' बाहेर पडल्याचे कळावे म्हणून. थोडे पुढे गेल्यावर मी फोनवरून माहीती घेउन गाडी चार तास उशीरा असल्याचे अंजलीला सांगितले. अपेक्षेप्रमाणेच तीने गाडी परत घरी घ्यायला सांगितली. या वेळी मात्र मी उकडते आहे असे सांगून काचा बंद केल्या होत्या ! घरी आल्या आल्याच तीने पीसी ऑन केला व ऑर्कुटींग करत बसली ! मी आतल्या खोलीत जाउन माझा मास्टर प्लान परत परत तपासत होतो. धीर गोळा करत होतो. शेवटी निर्धार करून मी बाहेर आलो. ती चॅटींग करण्यात मग्न असतानाच मी तीचा गळा आवळला. थोड्याच वेळात तीची धडपड थांबली. संगणक मी डायेरेक्ट बंद केला. तीचे प्रेत बाथरूम मध्ये आणले व चॉपरने त्याचे बारीक बारीक तुकडे केले. ते सर्व एका प्लास्टीकच्या मोठया पिशवीत भरले व ती पिशवी रात्री गाडीच्या डिकीत ठेउन एका ओसाड रस्त्यावर आलो. एका मोठ्या मॅनहोल मध्ये ती पिशवी फेकून दिली ! लगेच घरी आलो. बाथरूम स्वच्छ धुतले. सगळे अगदी बिनबोभाट पार पडले. मग मस्त झोपी गेलो. दूसर्या दिवशी रात्री मुंबईवरून तीच्या मावशीचा फोन आला. अंजली अजून कशी आली नाही म्हणून काळजीत पडली होती ती. मी सुद्धा काळजी वाटल्यासारखे केले आणि अजून थोडावेळ वाट पाहू असे सूचवले. अर्थात तीला मी न परतीच्या वाटेला लावलेच होते ! दूसर्या दिवशी पहाटे सासर्या बरोबर पोलीस चौकीत जाउन तक्रार द्यायचा फार्स पण पार पडला.


प्रकरण ३

मी राजशेखर ! केरळ पोलीसांच्या विषेश पथकातला अधिकारी. तरूण, तडफदार आणि धडाडीचा. राजकारण्यांच्या खास मर्जीतला. पण अशा ओळखी कधी कधी उगाच चिल्लर कामात गुंतवतात. आता हेच बघ ना, कोणी मुंबईला जायला निघालेली अंजली missing होते तर तो तपास सुद्धा मीच करायचा ? अशी किती माणसे रोज हरवतात पण अंजली एका बड्या राजकारण्याची मुलगी, तपास वरच्या पातळीवरूनच नको का व्हायला ? तसा मिळेल ते काम आवडीने, पूर्ण रस घेउन करायचे हा तर माझा स्वभावच आहे. अर्थात अशा केस मधला सर्वात पहीला संशयीत तीचा नवरा अजय ! तेव्हा मी त्याच्या घरी धडकलो. आपण स्वत: अंजलीला स्टेशनवर सोडली हे सांगताना तो जरासा चलबिचल झालेला वाटला. मी तीला अगदी बोगीपर्यंत पोचवायला गेलो नव्हतो यावर त्याने भर का बरे दिला ? बोलण्याच्या ओघात अंजलीचे ऑर्कुट वेडही समजले. ती कायम फीरतीवरच असते व तेव्हा तिच्या मित्रांनाही भेटते हे सांगताना त्याच्या स्वरातला तिरस्कार लपला नाही. मग मी वॉचमनला भेटलो. त्याने त्या दिवशी मॅडम साहेबांबरोबरच गाडीत होत्या हे सांगितले, अर्थात गाडीच्या काचा उघड्या असल्यामुळेच तो हे सांगू शकला. थोड्यावेळाने साहेब परत आले व रात्री खूप उशीरा परत गेले तेव्हा मात्र काचा नेहमीसारख्याच बंद होत्या. मग मी रेल्वे स्टेशनला फोन करून त्या दिवशीचा reservation chart मागवुन घेतला व त्या बोगीत ड्युटी असलेल्या टीसीला पाचारण केले. टीसी ने त्या सीटवरील व्यक्तीने प्रवास केल्याचे सांगितले. म्हणजे अजय सध्या तरी संशयाच्या दायर्यात येत नव्हता. आता मी तीच्या आसपासच्या सीटवरील व्यक्तींची माहीती/ पत्ते काढले. काहींचे मोबाईल नंबरही मिळाले. अंजलीच्या बर्थ जवळच चार बायकांचा ग्रूप होता. फोनवरून त्यांनी दिलेली माहीती निश्चीत या प्रकरणाचे धागेदोरे देत होती. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्या बर्थवरची तरूणी पनवेलला उतरली होती. तसेच साधारण चाळीशीचा, मराठी वाटणारा माणूस बोगीत शिरून तीची चौकशी करत होता. ती आताच उतरली असे सांगितल्यावर, 'गाडी तिथून वेळेवर सूटली का ?' असे विचारून तो तिच्या मागे पळतच गेला होता ! this is interesting ! हा नक्कीच तीचा कोणी ऑर्कुटवरचा मित्र असणार , जो तिला घ्यायला आला होता, पण थोडा उशीरा ! मी लगेच सायबर सेल मध्ये गेलो. या वेळी मी अजयलाही बरोबर घेतले होते. आधी मी अंजलीचा प्रोफाइल शोधून काढला. मग प्रवासाच्या आधीच्या काही दिवसापासून तिच्या scrapbook ची एक फाइल बनवली. त्यात ती आपल्या मुंबई भेटी बद्द्ल फक्त १नाथ या माणसाशी बोलली होती. एकनाथच्या scrapbook ची पण मी फाईल बनवली. अंजलीबरोबर प्रवास करणार्याला बाईला मी MMS मार्फत १नाथ चा फोटो पाठवला व तीने लगेच 'हाच तो' म्हणून सांगितले. yes, i am on right track ! या माणसाचा प्रोफाइल मराठीत असल्याने फारसे काही हाती लागले नाही पण तो पनवेलला राहतो हे खूपच महत्वाचे होते. त्याचा ब्लॉगही होता आणि त्यात त्याने आपला मोबाईल नंबरही दिला होता ! म्हणजे पुढचा तपास आणि कदाचित शेवट सुद्धा पनवेललाच होणार होता ! दोघांच्या scrapbook ची फाइल मी प्रिंट करून घेतली पण मग प्रवासाच्या वेळे आधीचे prints लगेच काढून निघालो सुद्धा ! त्या मोबाईल नंबर वरून मला बरीच माहीती मिळणार होती. त्याचे खरे नाव शरद ओगले होते तर ! अर्थात ऑर्कुटॅवरचे अर्धे प्रोफाईल फेकच असतात म्हणा !
प्रकरण ४

अरे बापरे ! गळ्यात फास अडकलाच होता पण वाचलो ! पण टीसी असे काय सांगतोय की त्या सीटवरून एका तरूणीने प्रवास केला म्हणून ? बरेच आहे की ! हा राजशेखर पक्का वस्ताद आहे, जपून रहायला हवे. सायबर सेल मात्र बराच आधुनिक आहे हा, काय पटपट माहीती मिळाली. तो कोणी १नाथ आता चांगलाच लटकणार ! आणि या पानावर बरे काय माहीती आहे जी राजशेखरने बरोबर घेतली नाही. ती पाने वाचली आणि माझ्या समोर परत फासाचा दोर लटकायला लागला. एसी रूममध्ये पण मी घामाने डबडबून गेलो. साली xx मेली पण आता मला घेउनच मरणार बहुतेक. तेवढ्या वेळात तीने त्या १नाथशी चॅटींग करून , गाडी उशीरा सूटणार आहे, मला तू पनवेलला घ्यायला ये अशी गळ घातली आहे. राजशेखर जेव्हा एकनाथची चौकशी करेल तेव्हा ही माहीती उघड होणारच आहे आणि पनवेलचा तपास पुन्हा त्रिवेंद्रमला येणार आणी आपल्या गळ्यात फास पडणार. नाहीतर तीचा राजकारणी बाप आपला आधीच गेम करणार ! एक खून तर केलाच आहे तेव्हा तिच्या याराला पण संपवून टाकले तर ? तसे काही भाई लोग आपल्या परीचयाचे आहेतच, धंदा म्हटले की हे सगळे आलेच ना ? मोबाइल नंबर वरून १नाथचा नाव , पत्ता मला लगेच समजला. साला, नाव पण खोटेच होते तर ! माहीतीच्या मायाजालात सगळेच साले मुखवटे !
प्रकरण ५

मी कासिम , कासिम भाई ! आपला बी एक बिझनेस , धंदा है ! मौत का सौदागर हू मै ! कोणाचा गेम वाजवायचा असेल तर मला सांगा। एकदम व्यावसायिक असते आपले काम. माझ्या पे रोल वर अनेक शूटर आहेत. ऑर्डर आली की त्यातल्या एकाला मी पिटाळतो. सोबत कट्टा, ५०,००० रू. , १०० % advance देतो मी, मोटारसायकल (चोरलेलीच !), ज्याचा गेम वाजवायचाय त्याचा नाव व पत्ता ! थांबा हा, जरा मोबाईल वाजतोय, कोणाची तरी वाजवायची सुपारी असणार बहुदा. चला, शरद ओगले, राहणार नवीन पनवेल यांचे दिवस भरले आता. अबे वो कल्लू कहा गया बे, जा, उसको बुला जल्दी, अर्जेन्ट !
प्रकरण ६

मी कल्लू, नवीन पनवेल, सेक्टर ३ च्या, रागमालीका इमारती बाहेर सावजाची वाट पहात थांबलो आहे. वॉचमन सांगतो की साब के आना का कोई टॅम नही ! त्याला काय माहीत 'आता' तो जो येणार तो परत जाणारच नाही ते ! गाडीतुन तो उतरला की लगेच त्याला अगदी blank point वरून गोळ्या घालायच्या, मोटार सायकल वरून पसार व्हायचे ! मरण्यापुर्वी आता हा किती वाट पहायला लावतोय ते बघुया !
प्रकरण ७

मी शरद ओगले, रीलायन्स या बड्या कंपनीचा बडा अधिकारी. तशी नोकरी माझी फिरतीची आहे. महा-सेझ चे काम मीच तर बघतो आहे. नेहमीसारखेच संध्याकाळचे सात वाजले तरी काम काही संपत नाही, घरी जाताना होणारा उशीर काही चूकत नाही. आता यावेळा कोण आले आहे भेटायला बरे ! पोलीस ? आताच्या आता चौकशीसाठी बोलवत आहेत. कसली चौकशी, तर माहीत नाही, केरळ वरून कोणी साहेब आले आहेत, गेस्ट-हाउसला उतरले आहेत, तेव्हा लगेच निघा ! आता ही काय बाबा भानगड. राजशेखर हा तपास अधिकारी तसा बराच सभ्य वाटतो आहे, पोलीसी मग्रूरी त्याच्या बोलण्यात तरी जाणवत नाही. पण माझा चेहरा बघून तो बुचकळ्यात का बरे पडला ? ९९८७०३०६३७ हा मोबाईल नंबर माझाच आहे , पण माझा नाही, म्हणजे मी तो वापरत नाही. माझा मित्र एकनाथ तो वापरतो, त्याचे बिलपण तोच भरतो. ते सिमकार्ड मला माझ्या कंपनीने सवलतीच्या दरात दिलेले आहे. काय भानगड आहे ही. हो, तो जो फोटो दाखवत आहे, तो तर एकनाथ ! राजशेखरच्या आदेशावरून त्याला तातडीने बोलावून घेतले. आता तो येई पर्यंत थांबणे आले !
प्रकरण ८

मी श्रीलेखा, नवीन पनवेलला राहते. माझे एक लहानसे बुटीक आहे. त्यासाठी त्रिवेंद्रमला सतत ये-जा होत असते. दोन दिवसा पुर्वीची गोष्ट, मी नेत्रावतीचे एसी तिकीट गाडी सुटायच्या काही मिनीटे आधीच काढले. मला वाटले सिझन नसल्यामुळे निदान एसी बोगी तरी खाली असेल पण कसले काय ! पण हा बर्थ तर रिकामा दिसतो आहे, चला , सध्या तिकडेच बसून घेउ, पुढचे पुढे ! टीसी काही मला दिसलाच नाही आणि प्रवासही छान झाला. कोण असेल ही अंजली, माझ्याच वयाची दिसते पण आली का नाही ? खरी गंमत तर पुढेच आहे. गाडी तब्बल चार तास उशीराने पोचली व मी जड सामान घेउन जीना चढू लागले तेव्हाच एक साधारण चाळीशीचा मनुष्य आला, माझे सामान त्याने अगदी अदबीने घेतले. तो चेहर्यावरून तरी सभ्य वाटत होता . पण आमची तर अजिबात ओळख नव्हती. पुल पार करताना तो म्हणाला अंजली तुझा DP खूपच वेगळा आहे, का तो फोटोच फेक आहे ? म्हणजे हा मला अंजली समजत होता तर ! मी त्याचा गैरसमज दूर केल्यावर कसला शरमलाय तो, sorry असे पुटपुटुन तो झरकन पुढे गेला. त्याला सांगायला हवे होते की तुझी कोण ती अंजली का फंजली आलीच नाही ते ! चला मला आता जायचे आहे चकलीची ऑर्डर द्यायला, कोणी मराठे म्हणून आहे, हे आयटम छान बनवते, अगदी १००% home made !
प्रकरण ९

मी अनुजा एकनाथ मराठे, तशी मी गृहीणीच पण नावाला होम फूडसचा व्याप मांडला आहे. माझा संसार छान चालू आहे, प्रेमळ नवरा व दोन गोजिरवाणी मुले ! नवरा मात्र माझा भारी उचापती आहे. सतत त्याच्या डोक्यात काहीतरी किडा वळवळत असतो. हल्ली काय तर ऑर्कुट व ब्लॉग ! त्यातच अगदी तासंतास गढलेला असतो. कामावर पण तेच घरी पण तेच. त्या मीट काय, वाद-विवाद काय. आणि त्याच्या त्या मैत्रीणी ! वेळी-अवेळी फोन करून याच्याशी अघळ-पघळ गप्पा मारत असतात. मला बिलकूल आवडत नाही ही असली थेर ! हल्ली नवीन ठीकाणी बदली झाल्यापासून तर घरी यायची काही वेळच उरलेली नाही. आठ वाजले, आता कोण बरे आले, हा तर नाही ? चकल्या हव्यात या बयेला. ही काय यायची वेळ झाली का ? म्हणून हा धंदा नको वाटतो अगदी. ती बाई. श्रीलेखा, असे काय म्हणाली की ? म्हणजे आधी तीने प्रसाद आणि प्रियांकाला बघितले , मग 'हे' आहेत का विचारले . मग मुले वडीलांच्या चेहर्यावर गेली आहेत का ? माझ्या नवर्याने चक्क तीचे सामान घेतले व तीला अंजली म्हणून हाक मारली ? आता ही काय नवी भानगड ? थांब त्याला चांगला फैलावरच घेते ! नाही, आताच फोन लावते !
प्रकरण १०

मी १नाथ, sorry, एकनाथ मराठे ! मी कसा आहे ? माझा ब्लॉग किंवा ओर्कुट प्रोफाईल वाचा, तुम्हाला जर कळले तर मला जरूर कळवा ! या अंजलीचे काही खरे नाही। नेत्रावतीने मुंबईला येणार होती. पण गाडीची वेळ होउन गेल्यावर सुद्धा ही बया आपली on line ! गाडी लेटफे असे बोलली. मला पनवेलला घ्यायला आता तु येच असे म्हणत असतानाच अचानक log off झाली. हीला स्टेशनवर भेटेन पण घरी कशी आणू ? माझी बायको म्हणजे एक नंबरची संशयी, तीच्या प्रश्नांच्या सरबत्तीला मी कसे उत्तर देउ ? दूसर्या दिवशी कामावरून येताना सहजच annonuncement झाली की नेत्रावती सूटणार आहे व समोरच एसी कोच म्हणून डब्यात शिरलो तर ही बया आधीच पनवेलला उतरली सुद्धा होती. आणि गाडी तर तिकडून अगदी वेळेवर सूटली होती ! धावत पळत बाहेर आलो तर ती कोणी भलतीच निघाली. नशीब तिने काही गैरसमज करून नाही घेतला तो ! आज दोन दिवस झाले, अंजलीचा नंबर out of coverage आहे. ऑर्कुटवर पण दिसत नाही. दोन दिवसातल्या माझ्या सोडा , कोणाच्याच scraps ना तीने उत्तर दिलेले नाही. काय बरे झाले असेल ? चला काम संपले निघायला हवे. आजपण उशीर झाला आहे. शरद का बरे बोलवून घेत आहे ? ते पण पनवेलच्या गेस्ट हाउस मध्ये, लगेचच ? गेस्ट हाउस वर पोचलो. बाहेर दोन पोलीस शिपाई उभे होते. शरद बरोबर कोणी राजशेखर होता. केरळचा पोलीस अधिकारी. माझा ऑर्कुटवरचा फोटो त्याच्या हातात होता व मला बघुन तो भलताच खुश झाला होता. काय तर म्हणे मी अंजलीचे अपहरण केल आहे किंवा तीचा खून तरी. मला अटक करून तो केरळ गाठणार होता. त्याच्याकडे जी माहीती होती त्या वरून असा निश्कर्ष साध्या शिपुरड्यानेही काढला असता. मी आता पुरता अडकलो होतो. माझ्या घशाला कोरड पडली. शरद माझ्याकडे आता वेगळ्याच नजरेने बघत होता. पण संकटात हात पाय गळणारा मी नाहीच. आता माझे डोके वीजेच्या वेगाने चालत होते. राजशेखरच्या नजरेतुन अनेक गोष्टी सुटल्या होत्या, त्यात सगळ्यात मुख्य म्हणजे टीसी व त्या बायका यांना त्याने खर्या अंजलीचा फोटो दाखवला नव्हता, टीसीने त्या जागेवर बसलेल्या बाईचे तिकीट तपासले होते का हे ही बघितले नव्हते. हे केले असते तर कदाचित त्याला मुंबई गाठावी लागलीच नसती आणि सगळ्यात मुख्य म्हणजे गाडी सुटून गेल्यावरचा आमचा संवाद जो scrap book मध्ये होता, तो. मी राजशेखरला माझे scrap book उघडून दाखवले. आता मात्र तो वरमलाच. सिली मिसटेक त्याने केली होती. त्याने आणलेली प्रिंट बघताना मला आणि एक गोष्ट कळली. त्या कागदावर १/५, २/५, ३/५ असे नंबर होते, मग दोन पाने कोठे गेली, ज्या वर आमचा पुढचा संवाद होता ? भयानक म्हणजे त्या वेळी त्याच्या सोबत अजय सुद्धा होता. आधी दूसराच कोणी गोत्यात येतो म्हणून खुश झालेला अजय नक्कीच सावध झाला असणार. परंतु एवढे सांगुनही राजशेखर मला सोडायला तयार नव्हता. माझी अधिक चौकशी तो मला केरळला नेउनच करणार होता. ती पनवेलला उतरलेली बाई जर मला सापडली तरच मी यातुन सूटणार होतो. पण ते कसे शक्य होते ? एवढ्यात हीचा फोन आला. चायला, पनवेलला अंजली समजून भलत्याच बाईच्या पाठी पडलो होतो हे हीला कसे कळले ? अहो देवच पावला ! 'ती'च बाई चक्क चकलीची ऑर्डर द्यायला आली होती व अर्थातच तीने आपला मोबाइल नंबर पण दिला होता. मी उत्साहाने हे सगळे राजशेखरला सांगितले व तीचा नंबरही दिला. राजशेखरची मतीही आता गुंग झाली होती. हे प्रकरण वाटते तेवढे साधे नव्हते तर. त्याने श्रीलेखाचा नंबर लावला, मुद्दामच केरळी भाषेत तो तीच्याशी निदान अर्धा तास तरी बोलला. त्याने फोन कट केल्यावर लगेच त्याला एक mms आला, त्यात श्रीलेखाचा फोटो होता ! त्याने लगेच तो बोगीत, शेजारी बर्थ असलेल्या बाईला forward केला. लगोलाग तिला फोन करून त्या दिवशी प्रवास करणारी तरूणी हीच असल्याची स्वत:ची खात्री पटवली. आता तणाव, संशयाचे धुके जवळपास विरले होते. पण राजशेखर खमक्या पोलीस अधिकारी होता. जो पर्यंत तो टीसी श्रीलेखाचा फोटो ओळखत नाही तो पर्यंत आता तो मला सोडणार नव्हता. तसे त्याने त्रिवेंद्रम स्टेशनला फोन करून 'त्या' दिवशी, नेत्रावती सुटायच्या आधी, एखादे एसी वर्गाचे तिकीट विकले गेले होते का अशी विचारणा केली होती, त्याचेही उत्तर यायचे होते. मग मी शरद ओगले यांना तरी मोकळे करा अशी विनंती केली ती मात्र त्याने लगेचच मान्य केली. शरद मोठ्या अनिच्छेनेच निघाला. राजशेखर बरोबर आता माझ्या अवांतर गप्पा चालू झाल्या. आता त्याला माझ्या बद्दल आदर जाणवत होता. एवढ्यात माझा मोबाईल वाजला.
एन्ड गेम !

"ओगले साब, आप कब आ रहे है, मै आपके लिये कुरीयर लेके आया हू, ओर कितना रूकू" असे कोणीतरी बोलत होते। मी चमकलो, ओगले साहेब ? मी म्हटले " तो वॉचमन के पास देके निकल जाओ" तेव्हा तो म्हणाला "नही, आपकोही देना है, रूकता हू, दूसरा चारा ही तो नही है " परत माझे डोके भणभणू लागले व मी ताडकन बोललो, "सर. ओगलेसाब की जान खतरे मे है". मी लगेच शरदला फोन लावला, त्याने बर्याच वेळाने तो घेतला. तो वेळ मला अगदी जीवघेणा वाटला. मी शरदला स्पष्ट सांगितले की तुझ्या जीवाला धोका आहे, तुझा मारेकरी तुझी तुझ्या घराखालीच वाट पहात आहे तेव्हा आहे तिकडेच थांब. शरद त्याच्या घराच्या गल्लीवरच थांबला होता तेव्हा मी त्याला थोडे लांब, म्हणजे शबरी हॉटेल जवळ थांबायला सांगितले. कोणीतरी भाडोत्री मारेकरी, अर्थात अजयने नेमलेला, मी समजून शरदलाच उडवणार होता. अर्थात फासाचा दोर चुकवण्यासाठी माझा जीव घेणे त्याला भागच होते. मी आणि राजशेखर टॅक्सी करून निघालो. त्याच्या बरोबर त्याचे सर्व्हीस रीव्हॉल्वर होतेच. पोलीस नियंत्रण कक्षाला पण सतर्क केले गेले. शबरी हॉटेलच्या जवळ, आपल्या गाडीत थांबून शरद आमची वाट बघत होता. आम्ही पुढे निघालो. आम्ही वेगळ्या वाटेने त्याच्या घराजवळ पोचणार होतो. मारेकरी कोण ते हेरणार होतो व मगच शरद ने पुढे यायचे ठरले होते. मोटरसायकलजवळ उभा असलेला तो तरूण आम्ही लगेच हेरला. अजून खात्री पटण्यासाठी आम्ही त्याच्या नंबरला कॉल दिला. बेल वाजताच कट केला. आणि एवढ्यात गोंधळ झाला. शरद गाडी घेउन चक्क घराच्या फाटकापर्यंत पोचला सुद्धा ! मोटरसायकलचे इंजिन सुरू ठेउन तो तरूण आता झरझर चालत शरदच्या दिशेन जाउ लागला. आता कट्टापण त्याने तयार ठेवला होता. त्याला खरे तर आम्हाला जिवंत पकडायचे होते पण शरदचा जीव धोक्यात घालून नक्कीच नाही ! राजशेखरला त्याला आपल्या रेंज मध्ये ठेवण्यासाठी थोडे पळत जाउनच त्याच्यावर गोळी झाडावी लागली ती चुकलीच. लगेच तो त्याच्या मोटारसायकलच्या आडोशाला गेला. राजशेखर आता पूर्ण उघडा पडला होता !मी मोठयाने ओरडून शरदला गाडी पुढे घेउन राजशेखरला कव्हर दे असे सांगितले. शरदने गाडी वेळेवर पुढे आणली नसती तर त्या शूटरच्या गोळीने राजशेखरचा वेध घेतलाच असता. एकदा गाडीचे कव्हर मिळाल्यावर राजशेखरने फारसा वेळ लावला नाही. तेवढ्यात दूसर्या टोकाने पोलीसांची सशस्त्र कुमक सुद्धा आली. मोटरसायकलच्या पाठी लपलेल्या त्या सशस्त्र गुंडाची चाळण झाली. राजशेखर , शरद व मी एकमेकांना गळामीठी मारली. गोळीबाराचा आवाज ऐकुन आसपासचे लोक गोळा झाले होते. एवढ्यात राजशेखरला टीसीने श्रीलेखाचा फोटो ओळखल्याचे समजले. तसेच त्या दिवशी तो तपासणीसाठी गेला तेव्हा ती बाई झोपली होती, पण साधारण वय जुळत होते म्हणून तो जास्त खोलात शिरला नव्हता याचाही खुलासा झाला. राजशेखरने लगोलग केरळला फोन लावून अजयला ताब्यात घ्यायच्या सूचना दिल्या. त्याच्या चेहर्यावर आता अतीव समाधान होते. एका खुनाची उकल झाली होती तर एक हकनाक जाणारा जीवही वाचला होता. उद्याच्या मिळेल त्या फ्लाइटने तो त्रिवेंद्रम गाठणार होता. माझा निरोप घेताना हातात घेतलेला हात त्याने बर्याच कष्टाने सोडवला. संध्याकाळच्या कातरवेळी सुरू झालेल्या या नाटकाचा शेवट होई पर्यंत पहाट झाली होती ! एरवी मला हा दिवस अंधार कोठडीतच काढावा लागला असता. या पहाट-वार्याची मजा काही औरच होती !

१३ टिप्पण्या:

प्रशांत म्हणाले...

बडे भैय्या,
खरोखर "एन्ड गेम"च आहे. ही सत्यकथा आहे का? असल्यास केव्हा घडली? किती चित्तथरारक आहे!

Unknown म्हणाले...

superb Eknath kaka
mastach jamley story..
ekdum achambit karnari ahe..

hats off to your imagination.. ani swatala ya kathemadhe gumphane.. ekdum awesome...

Hardik abhinandan

Abhiram म्हणाले...

आता बासच. बस झाली ती गोदीतली क्ष्रुद्र नोकरी. उचला लेखणी. साहेबा, लेखनाचा जर्म आहे रे तुझ्यात. फुकट नको घालवू. बाकी पैसा, उदर्निवाह असल्या फालतू गोष्टींचा बाउ करु नकोस. इतके बावनकशी लेखन कसब आहे की दिडक्या अडिचक्या बनून नाचत येतील. काळजी कशाला?
-- अभिराम साठे

अनामित म्हणाले...

एक्सलंट!! बडे भैय्या.....अशाच आणखीन कथा लिहीत जा....वेगळेपणा खुप आवडला..

Shrirang Gore म्हणाले...

faarach chhaan. very very well written. didnt find one loose end. abhiram sathe yanni je lihile ahe tyaas anumodan.

Unknown म्हणाले...

Nice Blog Eknath Kaka.. . this can be turned into a Movie Script

Aditya म्हणाले...

Eknath kaka

Tumhi mhanje kharokharach Guru Ghantal ahat. Hi jsr satyakatha asel na tar tumhi James Bond zalayt agdi. Ani nasli tari katha farach manoranjak ahe. Shevat pharach lavkar zala pan . Thoda tanayla hava hotat.

अनामित म्हणाले...

khup aawadali katha. Pudhachyaa kathechi waaT baghatey.

अश्रांत प्रवासी.... ( ashrantprawasi) म्हणाले...

khup chaan aahe katha, aaj purna vachli ekdam mastaaaaaa

Bhushan म्हणाले...

EJM... CBI or FBI join kar...

mind blowing story..

Bhushan म्हणाले...

mindblowing story.

EJM... CBI kivva FBI join kar.

meghana apte म्हणाले...

Wow! Nice suspense.Please continue writing!

Unknown म्हणाले...

mast aahe Kaka..keep writing.. :)