प्रासंगिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रासंगिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

लोकशाहीचा गाडा का अडला ? मतदार न फिरकल्यामुळे !

घोडा का अडला ? भाकरी का करपली ? पाणी का अडले ? या सगळ्यांचे उत्तर एकच आहे “न फिरवल्यामुळे” ! तसेच लोकशाहीचेही आहे ! लोकशाहीचा गाडा का अडला ? मतदार न फिरकल्यामुळे ! जिकडे लोकशाही रूळली आहे अशा देशात मतदानाचे प्रमाण 94 ते 98 % आहे व आपल्याकडे ते अजूनही 60 % च्या वर जात नाही ! आपल्या एका मताची किंमत मतदाराला अजूनही कळलेली नाही व ती कळावी या साठी प्रयत्नही करायची गरज सत्ताधार्यांना वाटत नाही ! जेव्हा जेव्हा विक्रमी मतदान होते तेव्हा तेव्हा सत्तांतर होते हा इतिहास असताना मतदानाचा टक्का वाढावा म्हणून कोणता पक्ष प्रयत्न करेल ? ही जबाबदारी निवडणुक आयोगानेच घ्यायला हवी. नुसते मतदार यादीत नावे आले म्हणून समाधान मानण्यात काय अर्थ आहे, मतदानही दणदणीत व्हायला हवे.

आपल्याकडे मतदान सक्तीचे नाही. जेमेतेम 60 % मतदान होते. काही राज्यात, मुंबईसारख्या शहरात तर ते 40 % एवढे कमी होते. या उदासीनतेतुन निवडून येणारा काय लायकीचा असतो व त्यातुन बनणारे सरकार कसे काम करते हे आपण बघतोच आहोत.  देशात जर खर्या अर्थाने लोकांचे प्रातिनिधिक सरकार असेल तर सरकारच्या प्रत्येक निर्णयला जनता विरोध कसा करते / होतो ? याचा सरळ अर्थ आहे की उमेदवार + सरकार तांत्रिक दृष्ट्या बहुमत मिळवून झालेले असते. लोकांचा मनसे पाठींबा त्याला नसतोच. सध्याच्या निवडणुक पद्धतीतला हा दोष दूर करायलाच हवा.

सरासरी 50-60 % मतदान होते तेव्हा काय होते ? ज्याच्याकडे अगदी 10-15 % ( जात, धर्म, झोपडपट्टी, दादागिरी ) मतांची वोट-बँक आहे तो निवडून यायची शक्यता खूपच वाढते. 10-15% त्याची स्वत:ची मते, 10 % प्रचार करून, आश्वासने देवून व 2- 5% गैरमार्गाने ( विकत !) – अशी मतांची बेगमी केली की झाला विजय निश्चित ! निवडून यायची पात्रता हा एकमेव निकष तिकिट देताना पक्ष बघतात तेव्हा तिकिटे अभ्यासू उमेदवाराला मिळण्याची शक्यता उरतच  नाही व तो निवडून यायचा प्रश्नच येत नाही ! राजकारणातुन सज्जन माणसे हद्दपार होतात ती अशी ! मग गल्लोगल्लीचे गुंड, काळा पैसा असलेले धंदेवाइक, जाती-पातींचे पुढारी हेच निवडणुक रिंगणात उतरतात. मतदारसंघात किमान 10 उमेदवार असतात, त्यातले मात्तबर असे चार ते पाच असतात, बाकी सगळे मते खायला उभे असतात / केलेले असतात. म्हणजे 30 % मतांची बेगमी झाली की विजय निश्चित ! जाती-पातीचे राजकारण मग बंद कसे होणार ?  मतदारसंघात कोणत्या जातीचे किती प्राबल्य आहे हे बघूनच उमेदवार निवडला जातो. सर्वसाधारणपणे एखाद्या मतदारसंघात  30 ते 40 % मते एखाद्या जातीचीच असतात. आपल्या जात-भाईसाठी मतदार हिरीरीन मतदान करतातच ! बाकीचे उदासीन असतात. असा उमेदवार जेव्हा निवडून येतो व सरकार जेव्हा बनते तेव्हा तो / ते  आपली वोट-बॅंकच मजबूत करणार. 25-30 % मतदारांचे भले करणारे निर्णय बाकी 70 % लोकांवर लादले जाणार व त्याला विरोध होणार, विकास खुंटणार, जाती-पातीच्या दलदलीत लोकशाहीचा गाडा रूतत जाणार ! का ? तर  मतदार न फिरकल्याने !

हेच जर 80 % पेक्षा जास्त मतदान सातत्याने होत राहिले तर ? सगळ्यात मुख्य म्हणजे बोगस मतदान बंद पडेल वा त्याचा प्रभाव निकालावर पडणार नाही ! जाती-पातीची गणिते चालणार नाहीत, भावनिक आवाहनांचा परिणाम होणार नाही, मते विकत घेवूनही फायदा होणार नाही वा परवडणार नाही ! या सगळ्यांची गोळा-बेरीज म्हणजे चांगला उमेदवार, सर्व थरातुन पाठींबा असलेला, जातीच्या बाहेर विचार करणारा उमेदवार विजय होइल, असे उमेदवार देणारा  पक्ष सत्तेत येइल व मग व्यापक हिताचे निर्णय घेतले जातील. लोकशाही मजबूत होइल.

सध्या मतदानाच्या दिवशी रजा दिली जाते. याचा टक्का वाढण्यासाठी काहीही उपयोग होत नाही ती आधी बंद करायला हवी.  त्यातही गंमत म्हणजे एकाच दिवशी सगळ्या राज्यात मतदान नसेल तेव्हा येते. माझे कार्यालय आहे मुंबईत तर मुंबईत मतदान आहे तेव्हा मला सुट्टी मिळते व मी मतदान करणार पनवेलला तेव्हा तिकडे मतदान वेगळ्या दिवशी असेल तर परत मला 2 तासाचे कन्सेशन मिळते !  ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी दोन तासाची सवलत द्या , तेवढी पुरे आहे.  काम बंद ठेवल्याने करोडो रूपयांचे  नुकसान देशाचेच होते.

मतदानाची वेळ साधारण 7 ते 5 अशी असते. ती अशी मर्यादित ठेवण्यापेक्षा मतदारसंघात बुथ/केंद्र निहाय  80 % मतदान होइपर्यंत चालू ठेवायला हवीत ! भले दोन दिवस सुरू ठेवा की मतदान, काय प्रोब्लेम आहे ? एरवीही बंद मतपेट्या 5 दिवस कडी-कुलपात ठेवल्या जातातच ना ? मतदान केंद्राबाहेर फलक लावून मतदानाची टक्केवारी प्रदशित करावी, स्थानिक केबल नेटवर्क वापरून ती सर्वाना कळेल अशी सुद्धा व्यवस्था करता येइल. 7 ते 5 या वेळेत 80 % मतदान झाले तर ते केंद्र बंद करा नाहीतर सुरू ठेवा. काही दिवस थांबूनही टक्केवारी गाठली जात नसेल तर तिकडची प्रक्रीयाच स्थगित करा. याचा अर्थ त्या भागातल्या लोकांना लोकशाहीत रस नाही, तिकडचा कारभार प्रशासकावर सोडा ! त्या भागात कोणतीही विकासकामे करू नका ! आपले जात-भाईच नाही तर मतदारसंघातले  जास्तीत-जास्त मतदार मतदान करतील ही जबाबदारी आपसूकच उमेदवारावर व पक्षावर पडेल ! कोणतीही सक्ती न करता मतदानाचा टक्का वाढेल !

फिरवल्यामुळे भाकरी करपणार नाही, घोडा बुजणार नाही, पाणी अडणार नाही तसेच मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी फिरकला तर लोकशाहीचा गाडा सुद्धा अडणार नाही !

सर्व मतदारांना नम्र विनंती – स्वत: मतदानाचा हक्क बजावा व महाराष्ट्रात यंदा 80% + मतदान होइल या साठी प्रयत्न करा ! धन्यवाद !

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

या व्यंगचित्रात वावगे काय ?

गेले दोन दिवस टीके्ची झोड उठत असलेले व वंशवादी, भारतीयांची टींगल करणारे असा शिक्का बसलेले व्यंगचित्र मी अनेक कोनातुन पाहत आहे. यात आक्षेपार्ह काय आहे हे खरेच मला कळलेले नाही. उलट स्वत:ला "लय शहाणे" समजणार्या लोकांना शहाणपणाचे मार्मिक डोस यातून पाजले गेल आहेत. भारतीय पेहरावात भारतीय दाखविला तर तो अपमान कसा ? इंग्रजांच्या गुलामगिरीने आपण डोक्याचे सोडून कमरेला गुंडाळले व सायबासारखी शर्ट-पॅन्ट टाय घालू लागले हे जरी खरे असले तरी व्यंगचित्रात असे दाखवून भलताच गोंधळ उडला असता. भारतेयाचे कपडे टाप-टीप दाखविले आहेत, त्याला ठीगळे जोडलेली नाहीत. सोबत कृषिप्रधान देशाचे प्रतीक म्हणून गाय दाखविलेली आहे. भारतीय दारावर ठोठवतोय व बड्या धेंडाची झोप उडवतोय. अजीजी करीत नाही आहे, दखल घ्यायला भाग पाडतो आहे. यात भारताचा अपमान करण्याचा कोणताही हेतु मला तरी दिसत नाही ! भारतीयांची व्यंग समजायची कुवत नाही , तरल विनोद समजत नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते. बाळासाहेब ठाकरे व आर.के. लक्ष्मण सारखे थोर व्यंगचित्रकार याच भुमीतले ना ?
तरी ही न्यूयॉर्क टाइम्सने माफी मागावी याचा अर्थ भारताच्या खर्या-खोट्या रागाची सुद्धा दखल जगाला घ्यायला लागत आहे. हे मात्र स्वागतार्ह आहे !

शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

एकाच डोळ्यावर पट्टी ओढलेली न्यायदेवता !

गावित भगिनींच्या फाशीला कोर्टाने स्थगिती दिली हे वाचून मनस्वी चीड आली. न्यायदेवतेच्या दोन्ही डोळ्यावर पट्टी असते ती पक्षपातीपणा न करता न्यायनिवाडा होतो याचे प्रतीक म्हणून. हे वाचल्यावर मात्र न्यायदेवता एकाच डोळ्याने बघते आहे असा मला भास झाला.

गावित भगिनी व त्यांची आई रेणुका गावित या लहान मुलांचे अपहरण करीत, त्यांचा अमानुष छळ करून त्यांना भीकेला लावित व मग त्यांचे जीव घेत असत. निदान 40 मुलांचे बळी त्यांनी घेतले असावेत असा संशय आहे. पोलिस यातल्या 11 प्रकरणी गुन्हा दाखल करू शकले व त्यातल्या 6 प्रकरणात आधी सेशन कोर्टाने मग उच्च न्यायालयाने  त्यांना दोषी ठरवून फाशीची सजा फर्मावली. सर्वोच्च न्यायालतात सुद्धा ही शिक्षा कायम झाली. याचा अर्थ पोलिस यंत्रणांनी अपार मेहनत घेवून चिरेबंदी केस उभी केल्यामुळेच महिला असल्याची सहानुभूति न मिळता त्यांच्या गळ्या भोवती फास आवळायचे नक्की झाले. हा खटला तब्बल 8 वर्षे चालला. मधल्या काळात रेणुका गावित ही मरण पावली. तिच्या दोन्ही मुलींनी मग राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला. पाच वर्षानी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी ही विनंती धुडकावली. अर्थात या नंतर सरकारने कसाब व अफजल गुरू प्रमाणेच या शिक्षेची अंमलबजावणी करायला हवी होती पण दुर्दैवाने तसे झाले नाही. मधल्या काळात लहान मुलांना हाल-हाल करून मारणार्या गावित भगिनींनी कोर्टात याचिका दाखल केली की राष्ट्रपतींनी केस निकाली काढायला 5 वर्षे घेतली, त्यांनी हे काम 3 महिन्यात करायला हवे होते,  हा विलंब अमानुष आहे, या मुळे आम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागला. आता आम्हाला जन्मठेप हवी ! कोर्टाला सुद्धा हे म्हणणे पटले व फाशीला स्थगिती देवून सरकारलाच जाब विचारला गेला आहे.


प्राणाची भीक गावित भगिनींनी राष्ट्रपतींकडे मागितली होती, ते स्वत: त्यांच्याकडे गळ घालायला आले नव्हते. घटनेत अशा प्रकरणात कोणतेही वेळेचे बंधन नाही. कोर्टाने या विलंबामुळे तुम्हाला पाच वर्षाचे आयुष्य बोनस म्हणून मिळाले तेव्हा तक्रार कसली करता म्हणून हा अर्ज तडकाफडकी निकाली काढायला हवा होता पण राष्ट्रपतींनाच जाब विचारून कोर्टाने आपल्या अधिकाराची कक्षा ओलांडली आहे. माफीचा अर्ज हा सगळ्यात शेवटचा टप्पा आहे व त्यात कोर्टाने लक्ष घालायचे काहीही कारण नाही. ( अर्थात राष्ट्रपतींवर सुद्धा वेळेचे बंधन हवे हे मी माझ्या आधीच्या एका लेखात मांडलेले आहे व विहीत वेळेत अर्ज निकाली काढला नाही तर तो फेटाळला असे समजण्यात यावे असेही मी आधी मांडले आहे. ) ज्या निरपराध मुलांची हत्या झाली त्यांच्या पालकांचे म्हणणे कोर्टाने ऐकून घेतले काय ? आपल्या मुलांचे खुनी न्यायालयाची ढाल करून फाशीच्या दोरातुन आपली मान अलगद सोडवून घेत आहेत हे बघून त्यांना किती दु:ख झाले असेल याची जाणीव कोर्टाला झालेली दिसत नाही. एका उघड्या डोळ्याने न्यायदेवतेला फक्त खुन्यांचे दु:ख दिसले, वेदना समजल्या. भारतात फाशीची शिक्षा होणे जेवढे दुर्मिळात दुर्मिळ आहे त्या पेक्षा जास्त दुर्मिळ  तिची अंमलबजावणी होणे आहे. ज्यांचे खुन झाले त्यांच्या नातलगांची चीड व तडफड न्यायदेवतेला कधी दिसणार ?

शनिवार, ११ जानेवारी, २०१४

ती आणि तिचा बाप !

अमेरिकेतीतल भारतीय दूतावासातील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांची अमेरिकेने हकालपट्टी केलेली आहे. त्याला उत्तर म्हणून भारतानेही त्याच दर्जाच्या एका भारतीय दूतावासातील अमेरिकी अधिकार्याला 48 तासात देश सोडण्यास सांगितले आहे. गेला महिनाभर सुरू असलेले दोन देशातील राजनैतिक युद्ध आता थांबेल की यात नव्या युद्धाची बीजे असतील हे येणारा काळच सांगेल ! खोब्रागडेंच्या नजरेतुन जे झाले ते “उत्तम” असले तरी भारतासाठी ते “आदर्श” नक्कीच नाही !

देवयानी खोब्रागडे यांच्यावर विसा मिळविताना खोटी माहिती पुरविणे / दडविणे व मोकलरणीचे शोषण करणे हे आरोप ठेवून अमेरिकेत भर रस्त्यात बेड्या ठोकून अटक केले गेले. राजनैतिक अधिकार्याला अपमानास्पद प्रकारे अटक करणे हे अनुचित होते व त्याची तीव्र प्रतिक्रीया भारतात उमटणे स्वाभाविकच होते व तशी ती उमटलीही. पण निवृत्त सनदी अधिकारी व देवयानीचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी मात्र याचा लाभ भलत्याच प्रकारे उठवायचा प्रयत्न केला व त्यात ते यशस्वीही झाले !  चुकीच्या प्रकारे अटक झाली व त्या साठी माफीची मागणी राजनैतिक पातळीवरून भारताने करणे योग्य होते पण भारताने माफी + बिनशर्त सुटका अशी मागणी करून अमेरिकेला जशास-तसे उत्तर द्यायची तयारी केली. अमेरिका वा युरोपिय देश कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चोखंदळ आहेत. उच्चपदस्थ अधिकारी / नेते  वा त्यांचे नातलग सुद्धा कायद्याच्या कचाट्यातुन सुटू शकत नाहीत असे अनेक दाखले तिकडे आहेत. तेव्हा आरोप मागे घेवून बिनशर्त सुटकेला अमेरिकेने नकार देणे अगदी स्वाभाविकच होते. हे झाल्यावर उत्तम खोब्रागडे यांचा तोल सुटला व अमेरिकेवर वर्णद्वेशाचा आरोप त्यांनी केला. याची संतप्त प्रतिक्रीया अमेरिकेत उमटल्यावर तिकडच्या सरकारला आपल्या भूमिकेवर ठाम रहावेच लागले. मधल्या काळात भारताने एक धुर्त चाल करून देवयानी यांना संपूर्ण राजनैतिक अधिकार बहाल केले. यामुळे अमेरिकी सरकारला त्यांच्यावर कोणताही खटलाच चालविणे अशक्य झाले.  इतर अनेक पातळ्यांवर भारताने अमेरिकेवर हल्ला बोल केला व देवयानी अटक प्रकरण म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान आहे अशी हवा तयार झाली. दोन मोठ्या व लोकशाही देशांमधले संबंध किती ताणायचे यालाही काही मर्यादा होत्या तेव्हा पडद्यामागे बोलणी होवून अमेरिकेने देवयानी यांना पळून जायला मदत केली व अपमानास्पद प्रकारे केलेल्या अटकेवर मलमपट्टी केली व हे राजनैतिक वादळ आपल्या परीने थोपविण्याचा प्रयत्न केला.

भारतात परतल्यावर देवयानी यांना कंठ फुटला आहे व आपण निर्दोष असल्याचे व तसे पुरावेही असल्याचे त्या ओरडून सांगत आहेत व त्यांचे वडील मराठी पत्रकारांवर जातीय म्हणून तोंडसुख घेत आहेत. देवयानी जर स्वत:ला निरपराध समजत असतील व तसे त्यांच्याकडे पुरावेही असतील तर राजनैतिक ढाल वापरून भारतात पळून यायची त्यांना काहीही गरज नव्हती. भारतात जसे खटले वर्षानुवर्षे रेंगाळत राहतात तसे तिकडे होत नाही व महिनाभराच्या आतच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला असता. असे झाले असते तर भारताला दमदारपणे अमेरिकेला खडसावता आले असते व माफी मागायला भाग पाडता आले असते. जगभरात अमेरिकेची नाचक्की व छी-थू झाली असती आपल्या देशाचा सन्मान हजारपट वाढला असता. या आधी भारताच्या राष्ट्रपतींना व संरक्षण मंत्र्यांना अमेरिकन विमानतळावर नागडे केले गेले  होते तेव्हा भारताचा स्वाभिमान कोठे गहाण पडला होता ? खोब्रागडे कंपनी तेव्हा का गुमान बसली होती. या प्रकरणात घेतली त्या पेक्षा अधिक कडक व कठोर पावले देशाने तेव्हा घ्यायला हवी होती, पण यातले काहीही झाले नाही. या प्रकरणात मात्र खोटी माहिती देणार्या व महिला कामगाराचे शोषण करणार्या भारतीय राजनैतिक अधिकार्याला पाठीशी घालण्यासाठी भारताने आपली शक्ती खर्च केली व इभ्रत पणाला लावली. भारताने देवयानी यांना तिकडच्या न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी मदत केली असती तर ते समजण्यासारखे होते पण भारताने तसे ने करता खटला मागे घेवून त्यांना बाइज्जत रिहा करावे अशी अत्यंत चुकीची मागणी लावून धरली. अमेरिकेन सरकारने भारतात येवू घातलेल्या निवडणुका व निकालानंतर होणारे दुरगामी परिणाम लक्षात घेवून सुजाणपणा दाखविला व देवयानी यांच्या पलायनाचा मार्ग सुकर केला पण खटला मागे घेतलेला नाही. देवयानी आता देशाबाहेर कोठेही सुरक्षित नसतील कारण मित्र देशात राजनैतिक अधिकार नसताना देवयानी गेल्या तर त्यांची रवानगी अमेरिका त्या  देशाच्या मदतीने थेट अमेरिकी तुरूंगात करायचा धोका आहेच !

एखाद्या ब्राह्मणाने हयात समाजसेवेसाठी घातली तरी त्याच्या जानव्याची गाठ अनेकांच्या डोळ्यात खुपते. एखादा दलित “सनदी अधिकारी” म्हणून हयात घालवून निवृत्त झाला तरी तो स्वत:ला दलितच समजतो व त्याची वृत्ती व कृती मात्र आपल्यापेक्षा दुबळ्या व्यक्तीला पायदळी तुडविण्याचीच असते हे नागडे सत्य तरी या निमित्ताने बाहेर आले !

“मी आणि माझा बाप” हे पुस्तक ज्यांनी वाचले असेल त्यांना “ती आणि तिचा बाप”  प्रकरणातला विरोधाभास नक्कीच अंतर्मुख करायला लावेल !

सोमवार, २४ डिसेंबर, २०१२

दिल्लीतील आगीत सचिनची आहुति की हौतात्म्य ?



जवळचा कोणी अंथरूणाला खिळलेला असतो. प्रेमापोटी तो आज ना उद्या नक्की ठणठणीत बरा होइल या आशेवर चाहते  डोळे लावून बसलेले असतात. तसा आधीही तो कोमात जावून आलेला असतोच ! त्याची विल पॉवर जबराट आहे, त्याला स्वत:लाच आपण बरे होण्याची आशा आहे तोवर आशा आहे ! कोणी मात्र त्याला अंथरूणाला खिळलेल्या अवस्थेत बघण्यापेक्षा तो गेला तर बरे, एकदा काय ते दु:ख होईल पण त्याला असा बघणे जास्त वेदनादायक आहे असे हळू आवाजात बोलून दाखवित असतात ! त्याच्या आजारपणावर उतारा म्हणून औषध बदलून बघायचे ठरते. तो बरा होणार अशा आशेवर जगणार्यांची   आशा अजून एकदा पालवते, बाकीच्यांना मात्र “कशाला हा अट्टाहास, थोडे का उपाय झाले ? बरे आता वय तरी कोठे साथ देते आहे ? त्याचे हाल बघवत नाहीत हो “ असा सूर असतो !

अचानक तो गेल्याची खबर येते ! तो जगणार अशा आशेवर असणार्यांना हा धक्काच असतो पण “आता मरण हीच त्याची सूटका” असे वाटणार्यांना पण हळहळ वाटतेच ! तसा काही तो अकाली गेलेला नसतो, वय झाल्यावर कोणी गेला तर तेवढे दु:खही होत नसते पण अनेक वर्षे मर्दुमकी गाजवणार्याने असे अंथरूणाला खिळून मरावे याचा विषाद नक्कीच होतो. रणागणांतच त्याची अखेर झाली असती तर ?

पाकिस्तानच्या भारतातील दौर्याची निवड अवघ्या काही तासावर आलेली असताना सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ति जाहिर केलेली आहे. आज ना उद्या जे घडणार होतेच पण ते झाल्यावर मात्र मनात अनेक वादळॆ उठली आहेत !  50 षटकांच्या खेळात त्याच्या आसपास फिरकेल असाही कोणी नाही. त्याने खेळलेल्या शेवटच्या डावात पाकच्या 329 धावांचा पाठलाग करतान ढाक्यात 48 चेंडूत 52 धाव तडकावून विराट विजयाचा पाया रचला होता. पाकविरूद्ध तो वेगळ्याच इर्षेने खेळतो व विश्वचषकात पाक विरूद्धच्या जवळपास प्रत्येक विजयात त्याची बॅट तळपली आहे. त्याच पाकड्यांविरूद्ध घरच्या मैदानात त्याला दोन हात करायची संधी मिळणार होती. तो ही संधी दवडेल अशा सुतराम शक्यता नव्हती.

असे असताना हा निर्णय त्याने का घेतला ? उघडपणे निवड समितीने त्याच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणलेला दिसत नाही. पण पडद्यामागे बरेच काही झाले असावे. भारतात क्रिकेटचे राजकारणच  जास्त जोरात चालते. राजकारणी मंडळी क्रिकेटला मगरमिठी मारून बसली आहेत. सचिनने स्वीकारलेले राज्यसभेचे सदस्यत्व, त्याला “भारत रत्न” मिळावे अशी चर्चा व दिल्लीत माजलेली अनागोंदी या सर्वांची एक लिंक मला तरी स्पष्ट दिसते आहे !
राजधानीत दोन दिवस अनागोंदी माजली आहे. लोक कोणालाही न जुमानता रस्त्यावर उतरले आहेत. लाठी हल्ला, गोळीबार झाला म्हणून सर्व मिडीया सरकारवर तुटून पडलेला आहे. सत्तारूढ सरकार याने हादरले आहे. परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून निदान मिडीयाला दूसरीकडे  कोठेतरी गुंतविणे  भागच आहे ! मग यात सचिनची निवृत्ति जाहिर झाली तर ? मिडीयासाठी ही ब्रेकिंग न्युज ठरेल व त्यांचा अर्धा वेळ तरी सचिन संबंधित बाइटस टीपण्यात जाइल ! तितकाच सरकारला मोकळा श्वास घेता येइल ! पण हे व्हावे कसे ? सचिन निदान एकदिवसीय प्रकारातुन या वेळी निवृत्ति जाहिर करणे शक्यच नाही ! अर्थात जे काम सरळ होत नाही ते कोणत्याही मार्गाने करण्यास राजकारणी तरबेजच असतात ! सीधी उंगलीसे थोडेही घी निकलता है ? सचिनला आधी विनंती, मग प्रेमळ विनंती मग तुझी निवडच करीत नाही अशी धमकी व मग भारत रत्नचा मार्ग मोकळा करायचे वचन देवून त्याला निदान एकदिवसीय सामन्यातून निवृत्ति घ्यायला भाग पाडले हे स्पष्ट आहे ! त्याने जर हा निर्णय मनापासून घेतला असता तर कसोटी क्रिकेटला पण त्याने राम-राम ठोकला असता !

दिल्लीतील आग आटोक्यात आणण्यासाठी सचिनवर अर्धवट निवृत्ति एकतर लादली तरी गेली आहे किंवा एखादी ऑफर त्याला देवून त्याला हौतात्म्यासाठी तयार  केले गेले आहे ! दिल्ली संकटात असते तेव्हा सह्याद्रीने मदतीला धावायचे असते ही तर परंपराच आहे, यात मराठ्यांचे पानिपतच होणार !

बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२

पालघर पोलिसांचे निलंबन – एक अतिरेकी कारवाई !



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पालघरमधील एका मुस्लिम तरूणीने फेसबुकवर बाळासाहेबांचा अवमान करणारी एक टिपणी केली होती. पालघरमधील शिवसैनिकांनी त्याची पोलिसात रीतसर तक्रार नोंदविली व कारवाईची मागणी केली होती. पोलिसांनी सदर मुस्लिम तरूणीला अटक केलीच पण ती टिपणी  आवडली असे नमूद करणार्या तिच्या हिंदू मैत्रीणीलासुद्धा अटक केली. त्यांना रितसर न्याय दंडाधिकार्यापुढे हजर केले गेले व 24 तासात जामिनावर मुक्त सुद्धा केले गेले होते.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच झाला म्हणून मिडीयाने बरीच बोंब ठोकल्याने स्वत: मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले व या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेची चौकशी केली. अहवाल प्राप्त होताच दोन पोलिस अधिकार्यांना थेट निलंबित करण्यात आले आहे व त्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेने पालघर बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मी स्वत: अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता असलो तरी थेट निलंबनाची कारवाई हाच मला अतिरेक वाटतो आहे. अशाने पोलिस दलाचे मनोधैर्य खच्ची होईल यात शंकाच नाही. एकाने गाय मारली म्हणून दूसर्याने वासरू मारले असा प्रकार झाला आहे.
मिडीया आता अशी बोंब ठोकतो आहे की बंदला विरोध केला म्हणून अटक का केली ? त्या तरूणीने बंदला नुसता विरोध केला नव्हता तर बाळासाहेबांचा अवमान सुद्धा केला होता हे सोयीस्करपणे दडपले जात आहे ! तिची पोस्ट अशी होती “ बाळासाहेबांसारखी माणसे रोज जन्माला येतात व रोज मरतात, त्यांच्यासाठी बंद कशाला ?” ज्याच्या अंत्ययात्रेला 25 लाख लोक जमतात अशी किती माणसे या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात जन्माला आलेली आहेत ? हल्ली तर कोणाच्या मयताला 4 खांदेकरी सुद्धा मिळत नाहीत ! तेव्हा या टिपणीने बाळासाहेंबांचा अवमान करण्याचा हेतू होता हे स्पष्टच आहे. शिवसेनेने बंदची हाक दिली नव्हती, तो उत्स्फूर्त होता, तेव्हा बंदची सक्ती नव्हती हे सुद्धा स्पष्ट आहे.
बाळासाहेबांच्या निधनाने शोकाकुल वातावरणात अशी टिपणे करणे अयोग्यच होते, त्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरूपयोग केला गेला हे नक्की. टिपणी आवडली असे नोंदविणार्या हिंदू तरूणीवर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली हे सुद्धा नमूद करण्यासारखे आहे. आपल्या देशात पोलिस दल तपासाचे काम करते व न्यायालय सजा देण्याचे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या तरूणींना न्यायालयात उभे केले व तिकडे त्यांना जामिन मिळाला. त्यावेळची तणावपूर्ण  परिस्थिती बघता, अवमानास्पद टिपणीने दंगलीचा भडका उडू नये म्हणून पोलिसांनी केलेली अटक योग्यच होती असे मला वाटते. अटक केली नसती तर त्या तरूणींना जमावाच्या हिंसक हल्ल्याला सामोरे जावे लागले असते व त्यातून अधिकच भडका उडाला असता हे नक्की. अटकेने त्या तरूणींची सुरक्षितताच जपली गेली. बाळासाहेबांच्या निधना नंतरची अत्यंत तणावपुर्ण परिस्थिती पोलिसांनी अत्यंत कौशल्याने हाताळली म्हणून त्यांचे कौतुक होत असताना हे निलंबन आततायीपणाचे व पोलिसांच्या चांगल्या कामगिरीवर बोळा फिरवण्यासारखे आहे. निलंबन रद्द करावे त्या अधिकार्यांना सन्मानाने रूजू करून घ्यावे हेच योग्य !

      जय महाराष्ट्र !

रविवार, ५ ऑगस्ट, २०१२

कही दाग ना लग जाये !

आयुष्यात कोणताच दाग, डाग, कलंक, किटाळ लागू नये म्हणून जपायची आपली संस्कृति व संस्कार ! निष्कलंक चारीत्र्य ही अभिमानास्पद गोष्ट व सार्वजनिक जीवनात तर याला फारच महत्व. आपले वर्तनच असे असावे की कोणताही दोष, कलंक, आरोप आपल्याला लागणारच नाही, तसे खोटे आरोप सुद्धा करायची कोणी हिम्मत दाखविणार नाही, आपल्या चारित्र्यावर कोणी शिंतोडे उडविलेले सुद्धा आपण खपवून घेणार नाही. आणि असा काही कलंक लागलाच तर तोंड दाखवायला सुद्धा जागा रहाणार नाही याची जाणीव नक्कीच असते. 


 अर्थात हा सगळा आता बहुदा इतिहास झाला असावा. जमाना बदल गया है ! कलंक हाच अलंकार म्हणून मिरवायचे बाळकडू पाजले जात आहे. बदनाम हुए तो क्या ? नाम तो हुआ ! ही जन-रीत बनत आहे. कपडे धुवायची पावडर विकणार्या एका बहुराष्ट्रीय कंपनीने हा बदल नेमका हेरलेला आहे व “डाग अच्छे है” या नावाची जाहिरात मोहिम राबविली आहे. सदर कंपनी डबघाईला नक्कीच आलेली नव्हती. तसेही लोक दिवसभराच्या वापराने मळलेले कपडे या कंपनीचा साबण वापरून धूतच होते. पण कंपनीच्या विक्री विभागाला बाजारातला आपला हिस्सा वाढवायचा होता व त्यासाठी जरा हटके व आक्रमक अशा जाहिरात मोहिमेचा वापर करायचे ठरले. यातूनच मग ही मोहिम जन्माला आली. सुरवातीला या प्रकारच्या जाहिरातबाजीला विरोध झाला. ग्राहक पंचायत थेट जाहिरात नियामक प्राधिकरणाकडे गेली. डाग हे डागच असतात व ते वाईटच असतात अशी बाजू पंचायतीने मांडली व ही आक्रमक मोहिम कंपनीने काही काळ का होईना , थांबविली होती. आता मात्र, वाक्यरचनेत किरकोळ बदल करून ही मोहिम अधिक आक्रमकपणे राबविली जात आहे.

 “दाग अच्छे है” ही कंपनीची कॅच-लाइन आहे. अहो मग एवढे अच्छे आहेत तर ते धुवायचे तरी कशाला ? ठेवा की तसेच ! एखादी सैनिक जसा युद्धात छातीवर झेललेल्या शत्रूच्या गोळीची जखम अभिमानाने दाखवितो तसे ही डाग सुद्धा दाखवा की ! अर्थात कंपनीला फक्त आपला माल आक्रमकतेने खपवायचा आहे व नकळत का होईना आपण समाजात व त्यातही लहान मुलांसमोर कसले आदर्श ठेवतो आहोत याच्याशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही ! आतापर्यंत प्रसारित जाहिरातीत कधी शेतातले धान्य फस्त करणार्या पक्षांना पळविण्यासाठी मुलगा कपडे घाण करून बागुलबुवा बनतो, कधी शेजारच्या आजीचा कुत्रा हरवतो म्हणून मुलगा कपडे (कपडेच काय सगळे घरच ! ) घाण करून तो कुत्रा सुद्धा करत नसेल एवढे वेडे-वाकडे चाळे करतो. सध्या प्रसारित होत असलेल्या जाहिरातीत चिखलात ढकललेला मुलगा चिखलात लोळून सगळ्या अंगालाच चिखल लावून घेतो ! एवढ्या फडतूस कल्पना कोणत्या बरे सडक्या डोक्यात शिजत असतील ? असे काही जर आपल्या मुलाने केले तर आपण सरळ त्याच्या मुस्कटात भडकावू ! मग जाहिरातीतले हे वेडे-बिद्रे चाळे आपण का सहन करायचे ? मूळात कपड्यांना डाग लागू नये म्हणून काळजी घ्यायची असते, चुकून जर डाग लागलाच तर तो पसरू नये याची काळजी घेतली जाते व तो लवकरात लवकर कसे मिटेल याचे प्रयत्न केले जातात. इथे मात्र चिखलात पडल्यावर सगळे अंगच चिखलाने बरबटून घ्यायचा प्रकार दाखविला जातो, इतर मुले सुद्धा मग त्याचे अनुकरण करतात व चिखलात उड्या टाकतात ! हा प्रकार बघून डुकरेसुद्धा लाजत असतील ! खाजवून खरूज काढायचाच हा प्रकार झाला ! तुमची धुलाईची पावडर खपावी म्हणून काहीतरी भुक्कड प्रसंग घुसडून तुम्ही सांगणार की “दाग अच्छे है” तर हे बिलकूल खपवून घेतले जाणार नाही. याच कंपनीचे कर्मचारी उद्या असले डाग लागलेले कपडे घालून कामावर आले तर त्यांना गेटवर तरी घेतले जाइल का ?

 ही तद्दन भूक्कड , अर्थशून्य, चुकीचा संदेश देणारी जाहिरात जोपर्यंत कंपनी मागे घेत नाही तो पर्यंत संबंधित कंपनीच्या सर्वच उत्पादनांवर ग्राहकांनी कडकडीत बहिष्कार टाकावा असे माझे सर्व वाचकांना नम्र आवाहन आहे. “दाग अच्छे है” असे म्हणणार्या कंपनीला ताळे-बंदात लाल डाग उमटले तर चालेल का ? मग म्हणाल का “दाग अच्छे है ” ?

मंगळवार, १ मे, २०१२

दुष्काळ - पाण्याचा व अकलेचा !

पावसाळा काही आता नेमेचि येत नाही तसेच निरोपही वेळेवर घेत नाही पण दुष्काळ मात्र महाराष्ट्राच्या जणू पाचवीलाच पूजलेला आहे. मार्च महिना सुरू होताच दुष्काळाच्या बातम्या व फोटो पेपरात यायला लागतात. भेगा पडलेली जमीन, तळ गाठलेल्या विहीरी, कोरडे पडलेले तलाव, पाण्यासाठी कळशी घेवून मैलोन-मैल अंतर तुडविणार्या बायका ! गेली साठ वर्षे अगदी हेच चित्र आहे ! ज्या देशात बारमाही वाहणार्या नद्या आहेत, वर्षातले चार महिने जिकडे मेघ पाण्याचा वर्षाव करतात त्या देशात लोकांना धड पाणीही सरकार देवू शकत नाही. सुजलाम सुफलाम या ओळी राष्ट्रगीतातच उरल्या आहेत. नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे हा देशच वाळवंट होत चालला आहे.

 जनावर मेले की गिधाडे आपसूकच जमतात तशी द्ष्काळ पडला की नेते लगेच तिकडे धाव घेतात. दुष्काळी कामांच्या नावाखाली पैसा कसा जिरवता येइल हाच या दौर्यांचा खरा हेतू असतो. जाहिरातीवर डोळा ठेवून आपला आत्मा गहाण ठेवलेली वर्तमानपत्रे राहुल गांधींना युवराज म्हणतात. असे हे युवराज आपल्या लवाजम्याला घेवून दुष्काळाची पाहणी करायला महाराष्ट्राच्या दौर्यावर आले होते. मटामध्ये त्या दौर्याचा एक फोटो आला आहे. एक गरीब बाई छातीचा भाता फुटेस्तोवर हापसा उपसते आहे पण त्यातुन जेवढे थेंब पाणी येत आहे त्यापेक्षा जास्त पाणी तिच्या डोळ्यातुन येत आहे. हा फोटो बघितला आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली पण त्याच फोटोत युवराज व त्याचे हुजरे मख्खपणे उभे आहेत. ज्यांच्या अंगात पाणीच नाही ते महाराष्ट्राच्या जनतेची तहान कशी भागविणार ? पाण्याचा दुष्काळ बघायला अकलेचा दुष्काळ असलेल्या राहुलने यावे हाच एक मोठा विनोद आहे ! अर्थात या दौर्याने युवराजांच्या अब्रूची लक्तरे पुरती फेडली गेली ! एका तरूणाने युवराजाला सुनावले की ही नौटंकी बंद कर ! इथला दुष्काळ बघायला तुझी आई सुद्धा आली होती ! तरूणाच्या बापाला व आजाला नक्की आठवेल की बाप-लेकच काय गांधी घराण्याचे पणजोबा नेहरू, आजी इंदीरा व बाप राजीवसुद्धा इथे येवून गेले असतील ! कैक नेते आले व गेले दुष्काळ मात्र आहे तसाच आहे !

  लोकशाहीत सर्व लोकांना सर्व काळ फसविता येत नाही असे म्हणतात पण महाराष्ट्रात तरी त्याचा काही प्रत्यय येत नाही ! गांधी घराणे मराठी जनतेला गेली साठ वर्षे फसवित आहे व महाराष्ट्राची जनता दिल्लीश्वरांची रखेल म्हणून जगते आहे. मराठा नेतृत्व दिल्लीश्वरांनी फेकलेली शिळी भाकर चघळत व स्वाभिमान इटालियन मडमेच्या पदरात टाकून फक्त आपली सरदारकी सांभाळते आहे. गेली दहा वर्षे महाराष्ट्रात नुसता काळोख पसरला आहे. ना वीज, ना पाणी, ना चांगली आरोग्य सेवा, ना धड शिक्षण ना जगण्याची शाश्वती ! पण आघाडी सरकार मात्र सुखाने राज्य करते आहे ! विकासकामे करून सत्ता टीकवण्यापेक्षा “फोडा व राज्य करा” ही नीती वापरून राज्य करणे जास्त सोपे नाही का ? लोकांना पाणी मिळाले, वीज मिळाली तर ते सुखी होतील पण मग नेत्यांचे काय ? त्यांच्या उसाला बारमाही पाणी कसे मिळेल ? त्यांनी काढलेल्या वीज प्रकल्पाला स्वस्तात जमीन व भरमसाठ भाव कसा मिळेल ? त्यांच्या विना-अनुदान चाललेल्या शिक्षणाच्या दुकानदारीला कच्चा माला कसा मिळेल ? त्या पेक्षा यांना काळोखात ठेवलेले बरे , आपले धंदे त्यांना कळणारच नाहीत. काळोख असल्यावर गरीब माणून हात धरतोच व त्या हातावर घड्याळ असतेच ! बाजूच्या गुजरातकडे बघा ! मोदींनी विरोधकांना फाट्यावर मारून नर्मदा प्रकल्प पुरा केला व गुजरातची तहान भागविली आहे. आता तर नर्मदेच्या कालव्यावरच त्यांनी सौर प्रकल्प चालू केले आहेत. स्वच्छ वीज मिळेल पण त्याहून महत्वाचे म्हणजे पाण्याचे बाष्पीभवन होवून वाया जाणारे लक्षावधी लीटर पाणे वाचणार आहे ! आपल्याकडे मात्र पाणी अडवा व पाणी जिरवा ही घोषणा कागदावरच उरली आहे. दुष्काळ पडूदे , मग आधी टॅंकरने पाणी विकून पैका कमवू मग दुष्काळी कामे काढून पैसा आणू व जिरवू असा कारभार चालला आहे. दुष्काळ ही जणू सत्ताधार्यांसाठी सिंहस्थ पर्वणी झाली आहे व उन्हाने पोळलेल्या व तहानेने व्याकूळलेल्या महाराष्ट्राला नागवे करण्यातच नेते दंग आहेत. मोघलाईत ही स्थिती असतानाच शिवाजी जन्माला आला होता व त्याने “पाणी उदंड जाहले” अशी कामगिरी केली होती. आज याच शिवबाचे नाव घेणारे दिल्लीची हुजरेगिरी करून सत्ता ओरपत आहेत ! असेना का दुष्काळ मलबार हिल वर मात्र “पाणी उदंड झाले स्विमिंग पुल बांधायाला” अशी स्थिती आहे ! मुंबईत उडप्याकडे तुम्ही तोंडाला पाणी लावून ग्लास बाजुला ठेवताच तो उचलून नवीन भरलेले ग्लास ठेवले जात आहेत, मोटारी, रेल्वेचे डबे धुण्यासाठी हजारो लिटर पाणी रोज वाया चालले आहे. शहरी माणूस महापालिकेचे घरी नळाला येणारे शुद्ध पाणी महाग म्हणून बोंब मारतो. त्याचा भाव आहे हजार लिटरला दोन रूपये पण हाच माणूस एक लिटर बिसलेरीला 15 रूपये मोजतो आहे ! मुंबईसाठी जिकडून पाणी आणले जाते त्या गावातल्या लोकांना मात्र पाणी नाही ! मुंबईत मात्र पाइपलाइन फोडून पाणी विकणारे पाणी-माफिया फोफावले आहेत ! मुंबईला पुरविल्या गेलेल्या फक्त 30 % पाण्याचा हिशोब लागतो. बाकी 70 % पाणी झोपडपट्टीवाले हडप तरी करतात किंवा वाया तरी जाते ! अनेक घरातले नळ गळके असतात ते दुरूस्त करायची तसदी मालक घेत नाही, वाहत्या नळाखाली भांडी धुतली जातात, यंत्र वापरून कपडे धुणे सोपे जाते पण त्यासाठी तिप्पट पाणी वापरले जाते ! मोठ्या मोठ्या पिंपात साठवलेले पाणी सकाळी ताजे (?) पाणी आल्यावर चक्क ओतून दिल जाते ! हे सर्व राजरोस करणारे आपण सर्व “तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होणार” या वर मात्र सहमत असतो ! शाळेत आपली मुले पाण्याचा पुनर्वापर कसा करावा याचे प्रोजेक्ट सादर करीत असतातपण ते फक्त गुणासाठी असते ! घरी मात्र नळ पुर्ण सोडून तोंड धुत असतात, जरा पाणी तोंडाला लावून बाकी पाणी बेसिनमध्ये फेकून देतात ! शहरातल्या या पाण्याच्या उधळपट्टीला आळा घालायलाच हवा तरच महाराष्ट्राच्या काना-कोपर्यात पाणी मिळेल.

  रयतेचे कल्याण करण्याची इछाशक्ती असती तर दुष्काळ हा शब्दच इतिहासजमा झाला असता. पावसाचे फक्त 1 % पाणी जरी अडवले व जिरवले तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होइल असे तज्ज्ञ म्हणतात. मग 60 वर्षात ही साधी गोष्ट का नाही झाली ? प्रत्येक गावात छोटे सिंचन प्रकल्प, लहान बंधारे का नाही बांधले जात ? राळेगणसिद्धीत अण्णांनी जलस्वराज्य आणले मग हाच प्रयोग अण्णा इतर गावात का करीत नाहीत ? उन्हातान्हात पावलाना चटके बसत असताना व डोके तडकत असताना पाण्यासाठी वणवण भटकणार्या आया-बहिणींना बघून नेत्यांना जरा सुद्धा शरम कशी वाटत नाही ? तहानलेल्या महाराष्ट्राचा घडा कधी भरणार नाही तसेच यांच्या पापांचा घडाही कधी भरणार नाही !

सोमवार, ९ जानेवारी, २०१२

जेव्हा गाढवच गीता वाचते !

गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता ! अशी एक मराठी म्हण आहे. कालचा गोंधळ बराच बरा होता असे म्हणायची वेळ मेघनाद देसाई नामक गाढवाने आणली आहे ! या गाढवापुढे कोणी गीता वाचली नाही तर त्याने स्वत:च ती वाचली आहे ! नुसती वाचली नाही तर तिचे सार पण त्यांना समजले आहे ! गीतेचे सार काय तर “प्रत्येकाने मैदानात यावे व एकमेकांना मारून टाकावे” ! गीतेने कर्मयोग सांगितला की ज्ञानयोग हे अनेक विद्वांना हयात घालवूनही समजले नाही ! त्यासाठी अनेक ग्रंथाची रचना झाली. जवळ जवळ प्रत्येक भाषेत गीतेचे भाषांतर झाले आहे. हिंदूच नव्हे तर अनेक धर्माच्या लोकांनी गीतेचा अभ्यास केला आहे व गीतेमुळे आपल्या आयुष्याला दिशा मिळाली असे नमूद केले आहे. मेघनाद देसाई यांनी मात्र या सगळ्यांवर कडी केली आहे. गीता हिंसाचाराला महत्व देते, युद्धाचा प्रचार करते असा जावईशोध त्यांनी लावला आहे. बरे या संशोधनाचा वापर त्यांनी केला आहे तो महात्मा गांधीच्या अहिंसकपणाला आव्हान देण्यासाठी ! गांधीजी भगवत्गीतेला मानत, गीता हिंसेचा प्रसार करते , मग गांधीजी अहिंसक कसे ? असा प्रश्न मेघनाद देसाईंना पडला आहे.

मेघनाद देसाईंनी कोणा गाढवाकडून गीता शिकली याचा काही सकाळच्या (८/१/२०१२) बातमीत उल्लेख नाही तेव्हा या गाढवानेच गीता वाचली व थेट ती युद्धखोरांचे बायबल असल्याचा शिक्का मारून मोकळे झाले ! कदाचित हे त्यांचे संशोधन वाचूनच सैबेरीयात गीतेवर बंदी घालायची मागणी पुढे आली असावी.

मुळात गीतेतील विचार कोणाचा ? महाभारतीतल कृष्णाचा ? नाही. ती जरी लिहिली गणपतीने तरी त्याला ती डीक्टेट करीत होते महर्षि व्यास ! अनेक विद्वानांना गीता घुसडलेली वाटते. अनेकांना कृष्ण व अर्जुन नुसते निमित्तमात्र आहेत, जगद्गुरू व्यासांनी गीता , जी वेदांचे सार आहे, सामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांची योजना केली आहे. ऐन युद्धात असा काही प्रसंग घडला असेल असे संभवत नाही. आचार्य विनोबा भावे यांनासुद्धा तेच वाटते. गीतेच्या निमित्ताने व्यासांनी वैदीक तत्वज्ञानाचे सार सादर केले आहे. आत्म्याची अमरता, स्वधर्माप्रमाणे कर्माचरण, कर्म करताना फळाची अपेक्षा न ठेवता उत्तम कर्म करणे, व हे सर्व अभ्यासाने व संयमाने साध्य होते. देव मुर्तीतच नाही तर निसर्गात जे जे भव्य-दिव्य, उद्दात्त आहे अशा सर्व ठीकाणी आहे हे ही सांगितले आहे. एक तर माझ्यावर सर्व सोपवून निर्धास्त रहा किंवा जी जबाबदारी तुमच्यावर आहे ती उत्तम प्रकारे पार पाडा, बाकी काय ते मी बघून घेतो अशी हमी दिलेली आहे ! अशी गीतेची सरळ साधी शिकवण आहे. गीतेत हिंदू हा शब्द कोठेही नाही ! ही शिकवण समस्त मानवजातीसाठी आहे.

महाभारतात गीता घुसडण्यासाठी सुह्रदांना बघून अर्जुन शोकाकुल होतो, त्याचे धनुष्य गळून पडते, मेलो तरी चालेल पण स्वकीयांना मारून मिळणारे राज्य नको असे तो बोलू लागतो, असा प्रसंग केला गेला आहे. युद्धाला तो घाबरत असावा असे समजून कृष्ण त्याला गांडू अशी शिवी हासडतो पण अर्जून त्याला भीक घालत नाही व कृष्णालाच पट्टी पढवू लागतो तेव्हा त्याचा मोह नष्ट करण्यासाठी कृष्ण गीता सांगायला सुरवात करतो असा तो सगळा सीन आहे ! गीतेत जे काही करायचे ते समजून उमजून, पुर्ण ज्ञान प्राप्त करून करा असेही सांगितले आहे. “सम्यक विचार करून काय तो निर्णय घे “ असे कृष्णाने अर्जुनाला समजाविले आहे. युद्ध कर असे थेट सुरवातीला सांगितले असले तरी सगळा उपदेश करून झाल्यावर मात्र “तुला पटेल तसे कर” अशी मुभा त्याला दिलेली आहे. अर्जुनाने त्याचा सोयिस्कर अर्थ काढून युद्ध केले, ते जिंकले व त्यानंतर राज्यपद सुद्धा अगदी म्हातारा होइपर्यंत भोगले ! आता अर्जुनाला सुद्धा गीता समजली नाही असा याचा अर्थ काढायचा का ? खरेच जर त्याला संन्यासी व्हायचे होते तर युद्ध जिंकायचे कार्य सिद्ध झाल्यावर त्याला संन्यास घ्यायला कोणी अडविले होते ? या सर्वांवर कळस म्हणजे कृष्णाच्या परीवाराला द्वारकेवरून परत आणायच्या वेळचा आहे ! कृष्णाने देह सोडल्यावर अर्जुनाला निरोप देताना आपली अंतिम इच्छा कळविली होती. ती म्हणजे द्वारका आता नाश पावणार आहे, यादव कुलच नष्ट होणार आहे तेव्हा माझ्या परिवाराला इंद्रप्रस्थाला घेवून ये ! आपल्या जिवलग मित्राची ही अंतिम इच्छासुद्धा अर्जुनाला पुर्ण करता आली नाही. द्वारकेवरून इंद्रप्रस्थाकडे वाटेवर चोरा-टोरांनी त्यांच्यावर हल्ले केले. मित्र शोकाने व्याकूळ झालेल्या अर्जुनाला राज-परिवाराचे रक्षणही करता आले नाही ! साक्षात कृष्णाकडून गीता ऐकलेल्या अर्जुनाची अशी संभ्रमावस्था झाली असती का ? तेव्हा अर्जुन व कृष्ण हे निमित्तमात्र होते ! तेव्हा हिंसा कर म्हणून गीता सांगितली गेली या दाव्यात काही अर्थच राहत नाही.

मेघनाद देसाई या गाढवाला नक्की काय सिद्ध करायचे आहे ? गांधीची अहिंसेवरील निष्ठा संशयास्पद होती हे की गीता हिंसेचा संदेश देते हे ? या दोन्ही गोष्टींची अजब गुंफण करून या गाढवाने भलतेच तर्कट लढविले आहे !

रविवार, ११ डिसेंबर, २०११

बायकोच्या नावाने ओळखले जाणारे पुरूष !

१० डिसेंबरच्या बहुतेक सर्वच वर्तमानपत्रात मध्य रेल्वेने अर्धा पानी रंगीत जाहिरात दिली आहे. अमरावती या रेल्वे स्थानकाचे आदर्श स्थानकात रूपांतर करण्यात आले आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपति श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या शुभहस्ते आदर्श रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाबरोबरच अमरावती-तिरूपती एक्सप्रेसचा शुभारंभ सुद्धा होणार आहे. या कार्यक्रमाला अनेक थोर थोर नेत्यांची उपस्थिती आहे व त्यांची नावे व पद सुद्धा जाहिरातीत अगदी ठळकपणे दिले आहे. जसे, राज्यपाल, महाराष्ट्र श्री. के शंकरनारायणन, केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. दिनेश त्रिवेदी, श्री. अजित पवार, उप-मुख्यमंत्री ते अगदी पार सदस्य, विधान परिषद डॉ. रणजित पाटीलांपर्यंत सर्वाची मांदीयाळी आहे. एकच नाव असे आहे की त्याची काही ओळख दिलेली नाही, ते म्हणजे डॉ. देवीसिंह शेखावत !

ताईंचे नाव राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून जाहिर होईपर्यंत त्या शेखावत आहेत हे महाराष्ट्रात अगदी कोणाकोणाला ठावून नव्हते, अपवाद मान. पवार साहेब ! पवार साहेबांनी हा गौप्यस्फोट करून दोन शेखावतांत झुंज लावून दिली होती. तेव्हा डॉ. देवीसिंह शेखावत हे प्रतिभाताईंचे यजमान आहेत हे सर्वाना समजले ! डॉक्टर साहेबांना आपसूकच राष्ट्रपतिंचा नवरा अशी भारदस्त ओळख मिळाली. आपल्या पुरूष प्रधान व्यवस्थेत स्त्रीया बहुदा मम म्हणायचेच काम करीतात. लग्न झाल्यावर स्त्री आपसूकच पाटलीण, वकिलीण, इनामदारीण, मामलेदारीण,तलाठीण अशी होतच असते, तसे पदनाम मिरवायला तिला अभिमानच वाटतो पण डॉ. देवीसिंहाच्या बाबतीत मात्र जरा उलटेच झाले ! त्यांची बायकोच भारताच्या सर्वोच्च पदी विराजमान झाली. राज शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपतिचा नवरा म्हणून सर्व सुख-सोयी, मान-मरातब त्यांच्या चरणी लोळू लागले. दिल्लीतील वर्तुळात त्यांच्या मानापमानाच्या अनेक कथा चघळल्या जात असतात, बायकोमुळे आलेल्या पदाचा बडेजाव ते अगदी झोकात मिरवीत असतात. पण आपली ओळख अमकीचा नवरा अशी आहे हे काही त्यांच्या पचनी पडले नसावे. एरवी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंढरपूरला शासकिय पूजा करतात तेव्हा पेपरात येणार्या फोटोत त्यांच्या पत्नीचा “सुविद्य पत्नी” असा उल्लेख आपण अनेकदा वाचला असेल. लष्करात बड्या अधिकार्याबरोबर त्याची सुविद्य पत्नी असतेच असते व बहुदा तिच्याच हस्ते उद्घाटन केले जाते. डॉ. शेखावत राष्ट्रपतिंचा नवरा म्हणून सर्व सुविधा घेत असतात, मग तसे पेपरात जाहिरपणे छापण्यात त्यांना संकोच का वाटावा ? त्यांचा पुरूषी अहंकार दुखावत असेल तर खुशाल त्यांनी घरी बसावे ! राष्ट्रपति बायकोबरोबर मिरवायला तर हवे पण स्वत:चा पुरूषी अहंकार सुद्धा जपायला हवा, हे वागणे काही बरोबर नाही !

जाता जाता – भारत सरकारच्या वतीने जगातील सर्व देशांना आपल्या देशातील अती महत्वाच्या व्यक्तींची एक यादी पाठविली जाते. हाताच्या बोटावर मोजता येतील अशा या व्यक्तीत एक नाव आहे रॉबर्ट वढेरा ! हा कोण तर प्रियांका गांधीचा नवरा, ही कोण तर सोनिया गांधीची मुलगी, आता या सोनिया गांधी कोण तर स्व. राजीव गांधींची पत्नी, हे राजीव गांधी कोण तर स्व. इंदीरा गांधी यांचे सुपुत्र ! आता तरी ओळख पटली ना ? आता सदानंद सुळे कोण ते तुम्हीच शोधा !

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

--- पण थोबाड नाही फुटले !

काल दिल्लीत एका तरूणाने केंद्रीय मंत्री व हेवीवेट नेते श्री. शरद पवार यांच्या थोबाडीत मारली. अर्थात पवारांना काही लागलेच नाही ! तो तरूण माथेफीरू होता एवढेच सांगून त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला ! राजकारणी किती संवेदनाशून्य झाले आहेत त्यासाठी हे एक चांगले उदाहरण आहे ! तुम्ही हात जोडा, जोड्याने मारा वा तोंडात मारा, हम नही सुधरेंगे ! गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांना एका थपडीने काय होणार हो ? एकसे मेरा क्या होगा ? मिडीया नसता तर मुळात कोणी थोबाडीत मारलीच नाही असा खुलासा झाला असता ! त्या तरूणाने पवारांच्या कृषी-धोरणाचे कौतुक म्हणून गालगुच्चा घेतला असता असेही छापून आले असते ! असो !

पप्पु कलानीला पोलिस कोठडीत होणार्या मारहाणीने (की नुसत्या कल्पनेने ?) कळवळणारे तसेच दंगल पांगविताना पोलिसांच्या गोळीबारात मुस्लीमच कसे मरतात म्हणून मातम करणार्या पवारांनी खरेतर त्या तरूणाला सुद्धा समजून घ्यायला पाहिजे होते. अगदी दुसरा गाल पुढे करा असे मी म्हणणार नाही पण “बाबा का माझ्यावर हात उचललास ? काय दु:ख आहे तुझे ? इतके तरी विचारायची संवेदनाशीलता दाखवायला हवी होती. पवार मात्र त्या तरूणाला माथेफिरू ठरवून मोकळे झाले ! अशा प्रकारचा हल्ला कोणत्याही परिस्थीतीत, कोणाहीवर होणे 100 % निषेधार्ह पण अगदी 99.99% लोकांना हा प्रकार भलताच आवडला हे नक्की ! काल जाताना व आज येताना याच प्रकरणाची चर्चा लोकलमध्ये रंगली होती व सर्वांनाच पवारांचे थोबाड फोडले याचा आनंद झाला होता ! लोकांची प्रवृती आसुरी झाली आहे की राजकारणी माणसे लोकांच्या मनातुन पार उतरली आहेत ? संसदेवर हल्ला झाला तेव्हासुद्धा सगळे खासदार मारले गेले असते तर बरेच झाले असते अशा उघड प्रतिक्रीया व्यक्त होत होत्याच.

जे पेरले ते उगविले ! याच पवारांनी काही वर्षापुर्वी क्रिडा पत्रकार श्री. वि.वि.करमरकर यांच्यावर त्यांच्या अनुयायांनी केलेल्या हल्ल्याचे समर्थन केले होते. पुण्यातील बालेवाडी संकुलाच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात तेव्हा करमरकरांनी म.टा.त लेखमाला प्रसिद्ध केली होती, त्याचा हा राग होता. त्याही अलिकडे संभाजी ब्रिगेडच्या गुंडानी पुण्यातील भांडारकर संस्थेवर हल्ला करून तिची मोडतोड केली, अमूल्य ग्रंथसंपदेची होळी केली तेव्हाही त्या गुंडगिरीचे पवारांनी अप्रत्यक्ष समर्थनच केले होते ! गंमत म्हणजे तेलगी प्रकरणात छगन भुजबळ आकंठ रुतलेले असताना त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत होती. त्याच सुमारास भुजबळांची पत्रकार परिषद संपल्यावर एका पत्रकारावर हल्ला झाला व त्याचे निमित्त करून पवारांनी भुजबळांचा तडकाफडकी राजीनामा घेतला होता ! पवारांवर हल्ला झाल्यामुळे पवारांचे चेले चिडले आहेत पण या गोष्टींची आठवण त्यांना असेल का ?

1 % राजकारण व 99 % समाजकारण असे धोरण राबवून पवारांनी राजकारणात पाय रोवले. पंतप्रधान बनायची कुवत प्रमोद महाजनांपेक्षा त्यांच्यात नक्की जास्त होती. दुर्दैवाने सत्ता सुंदरीच्या मोहाने ते आंधळे झाले व त्यांच्या पतनाला कोणताही बंध उरला नाही. निवडणुका जिंकायच्या म्हणून त्यांनी भाई ठाकूर व कलानी सारखे गुंड निवडून आणले. पवार गॉडफादर झाले ! दिल्लीत पवारांचे मन कधी रमलेच नाही ! त्यांच्याच मर्जीने मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या सुधाकर नाईक यांनी जेव्हा ठाकूर - कलानी कंपनीच्या मुसक्या बांधल्या तेव्हा कलानीला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे वळ पवारांच्या पाठीवर उमटले ! किती ही संवेदनाशीलता ! लगेच त्यांनी दिल्लीवरून कळवळून सांगावा धाडला की कलनीला मारू नका ! पुढे सुधाकर नाइकांनाच शह देण्यासाठी मुंबईतली दंगल त्यांनी भडकत ठेवली. कर्तव्य कठोर पोलिस अधिकारी बापट यांना गोळीबारात मुस्लिमच कसे मरतात असा सवाल करून एका रात्रीत घरी बसवले गेले, त्याही आधी दंगलीला आळा घालण्यास लष्कर पाठवायच्या निर्णायावर बराच वेळ घेतला होताच ! जळेना का मुंबई, मरेनात का लोक ? माझी सत्तेची पोळी भाजली म्हणजे झाले ! सेना-भाजपाचा प्रचार जोशी-महाजन करीत होते म्हणून सहिष्णूतेचा बुरखा पांघरणारे पवार प्रचार सभेत “जोशी महाजनांचे राज्य येवू देणार का ? असा उघड चिथावणीखोर जातिय प्रचार करीत होते ! भाजपामधले मुंढे, खडसे, तावडे तेव्हा त्यांना दिसत नव्हते ! स्वत: पवारांचा सध्याचा राष्ट्रवादी पक्ष किती राष्ट्रवादी आहे ? राष्ट्र सोडा , किती महाराष्ट्रवादी आहे ? मराठावादी, त्यातही 96 कुळ्यांचा पक्ष असेच राष्ट्रवादीचे सध्याचे स्वरूप आहे !

येनकेन प्रकारेण सत्तेत राहणे ही एकमेव महत्वाकांशा त्यांनी जोपासली ! त्यासाठी कपडे बदलावे तसे पक्ष व निष्ठा बदलल्या. अनेकांच्या पाठीत खंजीर खुपसला. मुस्लिम मतांसाठी सुंता फक्त करायची बाकी ठेवली. दलित मते हवीत म्हणून आठवल्यांना सत्तेचे गाजर दाखवून झुलवले व वापरून सोडून दिले. सोनिया गांधी इटालियन म्हणून त्यांची साथ सोडली तेव्हा मोठा राणा भीमदेवी थाट आणला होता पण मग सत्ता हवी म्हणून तेवढ्याच निलाजरेपणे हातावर घड्याळ बांधून मोकळे झाले. त्यांच्या मागच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत ना शेतकरी आनंदी झाला ना ग्राहक, दलालांचे मात्र फावले ! महागाई आभाळाला भिडली ! सामान्य माणसाचे पार पेकाट मोडले ! कडधान्यांच्या किमती कडाडल्या, सामान्यांच्या जगणे हराम झाले पण तोपर्यंत पवारांची कातडी पार गेंड्याची झालेली होती. कलानीला मारतात म्हणून कळवळणारे पवार , महागाईने भरडलेल्या जनतेला मात्र काही दिलास देत नव्हतेच उलट गरिबाला ज्वारी, बाजरी स्वस्तात कशाला विकता ? ती गाळा व त्याची दारू बनवा दारू , पैका मिळेल पैका असे सांगत होते. लोकांची क्रयशक्ती वाढली आहे, ते खा खा खात सुटले आहेत व म्हणून किमती वाढतात असे महागाईचे निलाजरे समर्थनच त्यांनी केले होते. वा रे जाणता राजा !

आगलाव्या पत्रकारांनी पवारांचे थोबाड फुटले म्हणून तुम्हाला काय वाटते असा प्रश्न अण्णांना केला त्यावर म्हणे अण्णांनी “एकच लगावली का ?” असे आधी विचारून मग सारवासारव केली अशी बातमी छापली आहे. पवारांनी सुद्धा त्यावर खोचक प्रतिक्रीया दिली आहे. अण्णा अनेक वर्षे समाजकारणात आहेत व राजकारण्यांना ते अगदी जवळून ओळखतात. राजकारण्यांबाबतीत ते संवेदनाशून्य बनणे अगदी स्वाभाविक आहे. असे जर अण्णा खरेच बोलले असतील तर त्यांना म्हणायचे असेल की एकाने काय यांचे थोबाड फुटणार आहे आणि जरी थोबाड फुटले तरी ते फुटलेच नाही असे सुजलेल्या गालाने ते सांगणारच आहेत. हे बनेल राजकारणी कशानेही सुधारणार नाहीत, अंतर्मुख तर कधी होणारच नाहीत ! कितीही थोबाडीत मारल्या तरी यांचे थोबाड काही फुटणार नाही !

रविवार, २८ ऑगस्ट, २०११

…. पण राजा तर नागडा आहे !

गेले बारा दिवस दिल्लीच्या रामलीला मैदानावर अण्णा हजारे यांनी षड्डू ठोकला होता. दिल्लीतले केंद्र सरकार सुद्धा हादरले होते. समस्त देश , विशेषकरून तरूणाई अण्णांच्या साथीला होती. मिडीयाला सुद्धा टीआरपी वाढविण्यासाठी बिनपैशाचा तमाशा मिळाला होता. देशभर जणू दूसर्‍या स्वातंत्र्य लढ्याचाच माहोल होता. गेले दोन दिवस तर सरकारने ठाम भूमिका घेतली होती. कायदे करण्याचा अधिकार लोकांनी निवडून दिलेल्या खासदारांचा आहे. कोणीही दबाव आणून या अधिकारावर गदा आणू शकणार नाही. अण्णांचे जहाल असे जनलोकपाल डावलून सरकार सौम्य लोकपाल बिल आणू पाहत होती. भाजपा सारखा कसलेला विरोधीपक्ष सुद्धा निर्नायकी अवस्थेत होता. अण्णांच्या बाजूने कोणताही पक्ष अधिकृतपणे उभा नव्हता. आणखी ७ दिवस आपण उपोषण करू शकतो असे अण्णांनी जाहीर केल्यावर सरकारच्या नाकी नऊ आल्याचेच चित्र होते. काय होणार याची उत्सूकत अगदी शिगेला पोचली होती. सरकार अण्णांचा रामदेव बाबा करणार की सरकारच गडगडणार अशी स्थिती होती. कालपर्यंत उपोषण अजून किती चालवायचे याची अण्णा टीमला काळजी पडली होती तर अजून किती काळ सलाइनवर रहायचे असा सरकारपुढे प्रश्न होता. कोणीतरी पड घ्यायलाच हवी होती. पण कोणी पडल्याचे सोंग करायचे ? अण्णांनी उपोषण सोडले तर त्यांच्या मागे असलेली तरूणाई त्यांना कचखाऊ म्हणायचा धोका होता, सरकारने पडान घेतले तर विरोधी पक्ष त्याचा मुद्दा करणार होता. अर्थात मिडीयाला मात्र त्याने काहीही फरक पडणार नव्हता. ढोल काय कोठूनही वाजतो !


 

अति झाल्यावर दोन्हीकडून हालचाली सुरू झाल्या. पडान तर घ्यायचे पण दूसर्या पार्टीने पडला म्हणून हसायचे नाही ऊल्ट मीच माती खाल्ली असे म्हणायचे, असा काहीतरी मध्यममार्ग निवडण्यात आला. शेवटी महाराष्ट्रातले फिक्सर नेत दोन्ही बाजू लढू लागले. राजाला नागडा तर फिरवायचा पण बघणार्यांनी त्याला नागडा न म्हणता, वा, काय दिव्य वस्त्रे परिधान केली आहेत असे म्हणायचे असेही ठरले ! मिडीयासुद्धा हसत हसत या तोडग्यात सामील झाला. ठरल्याप्रमाणे अण्णांच्या तीन प्रमुख मागण्या संसदेत मान्य झाल्याचे फर्मान घेवून इलासराव रामलीला मैदानावर आले. त्यांनी अण्णांना डोळा मारला व अण्णांनी संकेत समजून उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले ! जनलोकपालाची दिव्य वस्त्रे घालून अण्णा रामलीला मैदानावर जमलेल्या जनसमुदायाला सामोरे गेले ! सर्व देशभर क्रांती यशस्वी झाल्याचा जयजयकार झाला. मिडीया अण्णा ट्यून आळवू लागला. जय हो !


 

म्या पाप्याला मात्र अण्णांची दिव्य वस्त्रे दिसत नाहीत बाबा ! अण्णांच्या तीन प्रमुख मागण्या होत्या १)पंतप्रधानांना जनलोकपालाच्या कक्षेत आणणे २) न्याययंत्रणा जनलोकपालाच्या कक्षेत आणणे ३) सर्व सनदी अधिकारी जनलोकपालाच्या कक्षेत आणणे. आज पेपरात, मिडीयात सगळीकडे ३ प्रमुख मागण्या मान्य झाल्याचा ढोल बडविला जात आहे. यातली एकही मागणी प्रमुख नाही ! पेपरात आज प्रमुख म्हणून मान्य झालेल्या मागण्या खरेतर अगदी तिय्यम दर्जाच्या आहेत. नागरिकांची सनद, कनिष्ठ नोकरशाही योग्य यंत्रणेद्वारे लोकपालाच्या कक्षेत आणणे व राज्यात लोकायुक्त या प्रमुख मागण्या कधी होत्या ? कनिष्ठ नोकरशाही चौकशीच्या फेर्यात आणणे ही प्रमुख मागणी ? अहो मुंगीला चिरडण्याकरीत एके ४७ कशाला हवी ? लोकांना बनवायचे तरी किती ? आणि या साठी अण्णांनी एवढा अट्टाहास केला होता ? सरकारने अण्णांना सरळ-सरळ गुंडाळले आहे, त्यांचा अगदी मामा केला आहे ! अण्णा जिंकले म्हणून जी दिव्य वस्त्रे घालून लोकांचे अभिवादन स्वीकारत चालले आहेत ती खरे तर वस्त्रच नाहीत ! राजा नागडा आहे ! पण सांगणार कोण ?

रविवार, १० जुलै, २०११

कच्चा माल !

महाराष्ट्र राज्याचा दहावीचा सरासरी निकाल यंदा ७६ % लागला आहे. त्यात मुंबई विभागाचा ८८ % तर पुणे विभागाचा निकाल ८६ % लागला आहे. बारावीचा सरासरी निकाल ७० % तर मुंबई व पुणे विभागाचा अनुक्रमे ७९ व ७७ टक्के आहे. उत्तीर्णांचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की महाराष्ट्रात बुद्धीमत्तेचा महापूर आलेला आहे व राज्याचा शैक्षणिक दर्जा चांगलाच उंचावला आहे असा कोणाचाही समज होइल. वस्तुस्थिती काय आहे ? सरकारनेच नेमलेल्या एका समितीने राज्याचा दौरा करून जो अहवाल दिला तो धक्कादायक असाच आहे. सातवी झालेल्या मुलांना साधी अक्षर ओळखही झालेली नाही ! मी स्वत: १९८२ मध्ये दहावी उत्तीर्ण झालो तेव्हा मुंबई विभागाचा निकाल जेमेतेम ५-५५ % होता, राज्याची सरासरी ४०-४५ % असावी. तेव्हा राज्यात किती मुलांना अकरावीला प्रवेश घेता यईल याचा अभ्यास करून दहावीला किती जणांना पास करायचे ते ठरायचे. तेव्हा दहावीला पहिल्या आलेल्या मुलाला ९१ का ९२ % गुण होते. आता पहिला येणारा मुलगा ९८% गुण घेतो. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व केंद्रात अर्थमंत्रीपद भूषविलेले सी.डी. देशमुख बोर्डात पहिले आले होते तेव्हा त्यांना अवघे ७७% गुण मिळाले होते असे कोठेतरी वाचल्याचे आठवते, म्हणजे आज मुले विद्वेत्तेत सीडींपेक्षा नक्कीच भारी असली पाहिजेत ! वस्तूस्थिती अशी आहे की अनेक तरूणांना साधा रजेचा अर्ज सुद्धा भरता येत नाही. पत्ता बदलला असेल तर कार्यालयाला नक्की कोणत्या शब्दात कळवायचे हे सुद्धा त्यांना जमत नाही ! अनेक नव पदवीधरांना "तुमची यत्ता कंची ?" असा विचारावे असे वाटते !

काही वर्षापुर्वी केंद्रीय परीक्षा मंडळ व राज्य मंडळ यांची म्हणे चांगलीच जुंपली होती. दोन्ही मंडळे, दूसरे मंडळ आपल्या विद्यार्थांना गुणाची खिरापत वाटते म्हणून 'त्या' मंडळाची मुले नामांकित विद्यालयातल्या जागा बळकावितात असे आरोप करीत होती. मराठी मुलांवर अन्याय होवू देणार नाही अशी हाळी देत मग राज्य सरकारने बाह्या सरसावल्या. टक्क्यावरच प्रवेश मिळतो ना ? मग सोपे आहे, करा गुणांची खैरात विद्यार्थांवर, करा की सगळ्यांनाच पास ! हे ही कमी पडेल म्हणून आधी पर्सेन्टाइल पद्धत, न्यायालयात ती टिकली नाही म्हणून मग सध्याची बेस्ट ऑफ ऑफ फाइव. अर्थात याने सुद्धा भागणार नव्हतेच. मग ३० % मार्कांची बेगमी शाळांतूनच केली गेली. लेखी परीक्षेत वस्तूनिष्ठ प्रश्न अधिक प्रमाणात विचारायचे ठरले. यंदा तर केंद्रीय मंडळाचा विज्ञान व गणिताचा अभ्यासक्रम राज्याच्या विद्यार्थांना जसाच्या तसा लावला गेला आहे. निदान नववीपर्यंत तरी पास-नापासाची भानगड ठेवायचीच नाही असे ठरले आहे ! राज्यातील शिक्षणाचा दर्जा कसा सुधारेल हा खरा प्रश्न आहे तर शासन किती विद्यार्थांच्या ढुंगणावर "पास " असा शिक्का मारता येइल याच वंचनेत आहे ! आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी असा प्रकार आहे. सरकारला एकूणच शिक्षण क्षेत्राशी काहीही देणे-घेणे नाही ! सरकारला खरी चिंता आहे ती सरकारात असलेल्यांच्या शिक्षणाच्या कारखानदारीला कच्चा माल कसा पुरवायचा ही !

गेली अनेक वर्षे एकही नव्या शाळेला राज्याने अनुदान दिलेले नाही. ज्यांना मिळते त्यांना ते किमान वर्षाच्या विलंबाने मिळते. शासनाकडे पैसा नाही म्हणून विना-अनुदान तत्वावरील शाळांना मायबाप सरकारला मोठ्या नाइलाजाने मान्यता द्यावी लागली. आज स्थिती अशी आहे की सरकार घ्या म्हणाले तरी या शाळा अनुदानाच्या भानगडीत पडणार नाहीत ! शिक्शानाची तळमळ असलेल्या नेत्यांना गल्लोगल्ली शाळा ,कॉलेजे, तंत्रनिकेतने काढता यावीत म्हणून मोक्याचे भूखंड नाममात्र दरात दिले गेले. एवढ्याने काय होणार ? कारखाना म्हटला की फायदा नको का ? सरकार तर अनुदान देवू शकत नाही मग पालकांना पिळून हवी तेवढी फी वसूल करायची मुभा मग या संस्थाना दिली गेली. आता शाळा म्हटली की शिक्षक आलेच ? पण त्यांचा पगार नाही परवडत ? उत्पादन खर्च वाढतो ना ! मग सरकारनेच शिक्षण सेवक योजना आणली, ३५०० रुपड्यात टेंपरवरी शिक्षक ! आता सरकारच ३५०० देते, तर कारखान्याने तेवढा तरी का द्यावा ? त्यात सुद्धा पगार किती दिला व सही कितीवर घेतली हे गुलदस्त्यातच ! चालवा तुमची कारखानदारी जोरात, शिक्षणाच्या नावान चांग भलं ! शिक्षणाचा प्रसार मात्र झाला पाहिजे. मागेल त्याला शिक्षण, पैका मोजेल त्याला पदवी !

राज्यात ही शैक्षणिक कारखानदारी मग चांगलीच फळफळली. कोणताही कारखानदार उत्पन्न वाढवायच्या मागे असतोच ना ? शिक्षणाच्या कारखान्यातले फिनिश प्रोडक्ट म्हणजे पदवीचा भेंडोळी घेतलेला युवक ! आणि कच्चा माल म्हणजे दहावी किंवा बारावी पास झालेला विद्यार्थी ! कारखानदारी चालवायची तर या कच्च्या मालाचा अव्याहत पुरवठा हवा. त्याची हमी कोण घेणार ? माय-बाप सरकारने ती सुद्धा जबाबदारी स्वीकारली ! लावा भरमसाठ निकाल ! करा सगळ्यांना पास ! काय , वर्ग कमी पडतायत ? भरा एका वर्गात ६० च्या एवजी १२५ मुले ? तेवढ्यानेही होत नाही ? मग वाढवा की तुकड्या ? काय कच्चा मालच कमी पडतोय ? अरे बापरे ! अजून मुले पास करा ! तरीही नाही ? नापासाला द्या की प्रवेश ? त्याचा बाप पैसा मोजतोय ना ? शिक्षण कसे अगदी तळागाळात पोहचले पाहिजे !

एकाच भागात अनेक उस कारखाने असले की उसाची कशी पळवा-पळवी होते ? ( उसाचे उदाहरण निव्वळ प्रतीकात्मक आहे, साखर सम्राटांच्या शिक्षण संस्था आहेत हा निव्वळ योगायोग समजावा ! )उत्पादन क्षमता आहे पण कच्चा मालच नाही मग कच्च्या मालाचे भाव भडकतात व पक्का माल बाजारभावाने विकणे सुद्धा अशक्य होवून बसते. या कारखानदारीतले तज्ज्ञ सुद्धा विना-अनुदानित शाळात शिकलेले, त्यांचे गणित कच्चे असणारच ! यंदा गंमतच झाली ! पुरेपुर काळजी घेवून सुद्धा कच्च्या मालाचा न भूतो असा तुटवडा निर्माण झाला ! सगळाच इस्कोट झाला बघा ! अभियांत्रिकीच्या जागांसाठी विद्यार्थीच उरले नाहीत ! मायबाप सरकार खडबडून जागे झाले. कच्च्या माला अभावी कारखाने बंद पडणार म्हणता ? असे कसे चालेल ? कोण आहे रे तिकडे ? पन्नास टक्के वाल्यानीच का बा विंजिनियर वायचे ? ४५ % वाल्यांनाबी द्या की एक चान्स ! अहो पण जिकडे ६० % वाला पैलतीर गाठू शकत नाहे तिकडे ४५ % वाला काय करणार ? काही तरी गुणवत्ता हवीच हो ! गुनवत्ता गुनवत्ता काय घेवून बसला राव, ती गेली भाडमध्ये ! पाण्यात पडले की आपसूकच पोहायला येते ! क्लास लावा, केट्या खा, पेपर फोडा, गुणात फेरफार करा, व्हा निवांत पास ! आमी कशाला नाय म्हटलय का ? तेवढी आमची कारखानदारी चालली म्हंजे झाले !

राव, पण एवढ्याने तरी भागेल ना ? का नापासांना पन एक चान्स द्यायचा ?