मराठी ब्लॉग - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोकरीतले अनुभव, स्वत:चे विचार, संस्कृत सुभाषिते, मुंबईच्या लोकलने रोज कराव्या लागणार्या प्रवासाचे अनुभव, इंग्रजीतले जे भावले त्याचा माय मराठीत अनुवाद आणि बरेच काही, जुन्या व गाजलेल्या हिंदी,मराठी गीतांच्या एम.पी.३ खजिन्याची किल्ली! वि.सू - हा ब्लॉग स्वामीत्व हक्क मुक्त आहे.
गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४
लोकशाहीचा गाडा का अडला ? मतदार न फिरकल्यामुळे !
बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४
या व्यंगचित्रात वावगे काय ?
शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४
एकाच डोळ्यावर पट्टी ओढलेली न्यायदेवता !
शनिवार, ११ जानेवारी, २०१४
ती आणि तिचा बाप !
सोमवार, २४ डिसेंबर, २०१२
दिल्लीतील आगीत सचिनची आहुति की हौतात्म्य ?
बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२
पालघर पोलिसांचे निलंबन – एक अतिरेकी कारवाई !
रविवार, ५ ऑगस्ट, २०१२
कही दाग ना लग जाये !
मंगळवार, १ मे, २०१२
दुष्काळ - पाण्याचा व अकलेचा !
सोमवार, ९ जानेवारी, २०१२
जेव्हा गाढवच गीता वाचते !
मेघनाद देसाईंनी कोणा गाढवाकडून गीता शिकली याचा काही सकाळच्या (८/१/२०१२) बातमीत उल्लेख नाही तेव्हा या गाढवानेच गीता वाचली व थेट ती युद्धखोरांचे बायबल असल्याचा शिक्का मारून मोकळे झाले ! कदाचित हे त्यांचे संशोधन वाचूनच सैबेरीयात गीतेवर बंदी घालायची मागणी पुढे आली असावी.
मुळात गीतेतील विचार कोणाचा ? महाभारतीतल कृष्णाचा ? नाही. ती जरी लिहिली गणपतीने तरी त्याला ती डीक्टेट करीत होते महर्षि व्यास ! अनेक विद्वानांना गीता घुसडलेली वाटते. अनेकांना कृष्ण व अर्जुन नुसते निमित्तमात्र आहेत, जगद्गुरू व्यासांनी गीता , जी वेदांचे सार आहे, सामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांची योजना केली आहे. ऐन युद्धात असा काही प्रसंग घडला असेल असे संभवत नाही. आचार्य विनोबा भावे यांनासुद्धा तेच वाटते. गीतेच्या निमित्ताने व्यासांनी वैदीक तत्वज्ञानाचे सार सादर केले आहे. आत्म्याची अमरता, स्वधर्माप्रमाणे कर्माचरण, कर्म करताना फळाची अपेक्षा न ठेवता उत्तम कर्म करणे, व हे सर्व अभ्यासाने व संयमाने साध्य होते. देव मुर्तीतच नाही तर निसर्गात जे जे भव्य-दिव्य, उद्दात्त आहे अशा सर्व ठीकाणी आहे हे ही सांगितले आहे. एक तर माझ्यावर सर्व सोपवून निर्धास्त रहा किंवा जी जबाबदारी तुमच्यावर आहे ती उत्तम प्रकारे पार पाडा, बाकी काय ते मी बघून घेतो अशी हमी दिलेली आहे ! अशी गीतेची सरळ साधी शिकवण आहे. गीतेत हिंदू हा शब्द कोठेही नाही ! ही शिकवण समस्त मानवजातीसाठी आहे.
महाभारतात गीता घुसडण्यासाठी सुह्रदांना बघून अर्जुन शोकाकुल होतो, त्याचे धनुष्य गळून पडते, मेलो तरी चालेल पण स्वकीयांना मारून मिळणारे राज्य नको असे तो बोलू लागतो, असा प्रसंग केला गेला आहे. युद्धाला तो घाबरत असावा असे समजून कृष्ण त्याला गांडू अशी शिवी हासडतो पण अर्जून त्याला भीक घालत नाही व कृष्णालाच पट्टी पढवू लागतो तेव्हा त्याचा मोह नष्ट करण्यासाठी कृष्ण गीता सांगायला सुरवात करतो असा तो सगळा सीन आहे ! गीतेत जे काही करायचे ते समजून उमजून, पुर्ण ज्ञान प्राप्त करून करा असेही सांगितले आहे. “सम्यक विचार करून काय तो निर्णय घे “ असे कृष्णाने अर्जुनाला समजाविले आहे. युद्ध कर असे थेट सुरवातीला सांगितले असले तरी सगळा उपदेश करून झाल्यावर मात्र “तुला पटेल तसे कर” अशी मुभा त्याला दिलेली आहे. अर्जुनाने त्याचा सोयिस्कर अर्थ काढून युद्ध केले, ते जिंकले व त्यानंतर राज्यपद सुद्धा अगदी म्हातारा होइपर्यंत भोगले ! आता अर्जुनाला सुद्धा गीता समजली नाही असा याचा अर्थ काढायचा का ? खरेच जर त्याला संन्यासी व्हायचे होते तर युद्ध जिंकायचे कार्य सिद्ध झाल्यावर त्याला संन्यास घ्यायला कोणी अडविले होते ? या सर्वांवर कळस म्हणजे कृष्णाच्या परीवाराला द्वारकेवरून परत आणायच्या वेळचा आहे ! कृष्णाने देह सोडल्यावर अर्जुनाला निरोप देताना आपली अंतिम इच्छा कळविली होती. ती म्हणजे द्वारका आता नाश पावणार आहे, यादव कुलच नष्ट होणार आहे तेव्हा माझ्या परिवाराला इंद्रप्रस्थाला घेवून ये ! आपल्या जिवलग मित्राची ही अंतिम इच्छासुद्धा अर्जुनाला पुर्ण करता आली नाही. द्वारकेवरून इंद्रप्रस्थाकडे वाटेवर चोरा-टोरांनी त्यांच्यावर हल्ले केले. मित्र शोकाने व्याकूळ झालेल्या अर्जुनाला राज-परिवाराचे रक्षणही करता आले नाही ! साक्षात कृष्णाकडून गीता ऐकलेल्या अर्जुनाची अशी संभ्रमावस्था झाली असती का ? तेव्हा अर्जुन व कृष्ण हे निमित्तमात्र होते ! तेव्हा हिंसा कर म्हणून गीता सांगितली गेली या दाव्यात काही अर्थच राहत नाही.
मेघनाद देसाई या गाढवाला नक्की काय सिद्ध करायचे आहे ? गांधीची अहिंसेवरील निष्ठा संशयास्पद होती हे की गीता हिंसेचा संदेश देते हे ? या दोन्ही गोष्टींची अजब गुंफण करून या गाढवाने भलतेच तर्कट लढविले आहे !
रविवार, ११ डिसेंबर, २०११
बायकोच्या नावाने ओळखले जाणारे पुरूष !
ताईंचे नाव राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून जाहिर होईपर्यंत त्या शेखावत आहेत हे महाराष्ट्रात अगदी कोणाकोणाला ठावून नव्हते, अपवाद मान. पवार साहेब ! पवार साहेबांनी हा गौप्यस्फोट करून दोन शेखावतांत झुंज लावून दिली होती. तेव्हा डॉ. देवीसिंह शेखावत हे प्रतिभाताईंचे यजमान आहेत हे सर्वाना समजले ! डॉक्टर साहेबांना आपसूकच राष्ट्रपतिंचा नवरा अशी भारदस्त ओळख मिळाली. आपल्या पुरूष प्रधान व्यवस्थेत स्त्रीया बहुदा मम म्हणायचेच काम करीतात. लग्न झाल्यावर स्त्री आपसूकच पाटलीण, वकिलीण, इनामदारीण, मामलेदारीण,तलाठीण अशी होतच असते, तसे पदनाम मिरवायला तिला अभिमानच वाटतो पण डॉ. देवीसिंहाच्या बाबतीत मात्र जरा उलटेच झाले ! त्यांची बायकोच भारताच्या सर्वोच्च पदी विराजमान झाली. राज शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपतिचा नवरा म्हणून सर्व सुख-सोयी, मान-मरातब त्यांच्या चरणी लोळू लागले. दिल्लीतील वर्तुळात त्यांच्या मानापमानाच्या अनेक कथा चघळल्या जात असतात, बायकोमुळे आलेल्या पदाचा बडेजाव ते अगदी झोकात मिरवीत असतात. पण आपली ओळख अमकीचा नवरा अशी आहे हे काही त्यांच्या पचनी पडले नसावे. एरवी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंढरपूरला शासकिय पूजा करतात तेव्हा पेपरात येणार्या फोटोत त्यांच्या पत्नीचा “सुविद्य पत्नी” असा उल्लेख आपण अनेकदा वाचला असेल. लष्करात बड्या अधिकार्याबरोबर त्याची सुविद्य पत्नी असतेच असते व बहुदा तिच्याच हस्ते उद्घाटन केले जाते. डॉ. शेखावत राष्ट्रपतिंचा नवरा म्हणून सर्व सुविधा घेत असतात, मग तसे पेपरात जाहिरपणे छापण्यात त्यांना संकोच का वाटावा ? त्यांचा पुरूषी अहंकार दुखावत असेल तर खुशाल त्यांनी घरी बसावे ! राष्ट्रपति बायकोबरोबर मिरवायला तर हवे पण स्वत:चा पुरूषी अहंकार सुद्धा जपायला हवा, हे वागणे काही बरोबर नाही !
जाता जाता – भारत सरकारच्या वतीने जगातील सर्व देशांना आपल्या देशातील अती महत्वाच्या व्यक्तींची एक यादी पाठविली जाते. हाताच्या बोटावर मोजता येतील अशा या व्यक्तीत एक नाव आहे रॉबर्ट वढेरा ! हा कोण तर प्रियांका गांधीचा नवरा, ही कोण तर सोनिया गांधीची मुलगी, आता या सोनिया गांधी कोण तर स्व. राजीव गांधींची पत्नी, हे राजीव गांधी कोण तर स्व. इंदीरा गांधी यांचे सुपुत्र ! आता तरी ओळख पटली ना ? आता सदानंद सुळे कोण ते तुम्हीच शोधा !
शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११
--- पण थोबाड नाही फुटले !
पप्पु कलानीला पोलिस कोठडीत होणार्या मारहाणीने (की नुसत्या कल्पनेने ?) कळवळणारे तसेच दंगल पांगविताना पोलिसांच्या गोळीबारात मुस्लीमच कसे मरतात म्हणून मातम करणार्या पवारांनी खरेतर त्या तरूणाला सुद्धा समजून घ्यायला पाहिजे होते. अगदी दुसरा गाल पुढे करा असे मी म्हणणार नाही पण “बाबा का माझ्यावर हात उचललास ? काय दु:ख आहे तुझे ? इतके तरी विचारायची संवेदनाशीलता दाखवायला हवी होती. पवार मात्र त्या तरूणाला माथेफिरू ठरवून मोकळे झाले ! अशा प्रकारचा हल्ला कोणत्याही परिस्थीतीत, कोणाहीवर होणे 100 % निषेधार्ह पण अगदी 99.99% लोकांना हा प्रकार भलताच आवडला हे नक्की ! काल जाताना व आज येताना याच प्रकरणाची चर्चा लोकलमध्ये रंगली होती व सर्वांनाच पवारांचे थोबाड फोडले याचा आनंद झाला होता ! लोकांची प्रवृती आसुरी झाली आहे की राजकारणी माणसे लोकांच्या मनातुन पार उतरली आहेत ? संसदेवर हल्ला झाला तेव्हासुद्धा सगळे खासदार मारले गेले असते तर बरेच झाले असते अशा उघड प्रतिक्रीया व्यक्त होत होत्याच.
जे पेरले ते उगविले ! याच पवारांनी काही वर्षापुर्वी क्रिडा पत्रकार श्री. वि.वि.करमरकर यांच्यावर त्यांच्या अनुयायांनी केलेल्या हल्ल्याचे समर्थन केले होते. पुण्यातील बालेवाडी संकुलाच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात तेव्हा करमरकरांनी म.टा.त लेखमाला प्रसिद्ध केली होती, त्याचा हा राग होता. त्याही अलिकडे संभाजी ब्रिगेडच्या गुंडानी पुण्यातील भांडारकर संस्थेवर हल्ला करून तिची मोडतोड केली, अमूल्य ग्रंथसंपदेची होळी केली तेव्हाही त्या गुंडगिरीचे पवारांनी अप्रत्यक्ष समर्थनच केले होते ! गंमत म्हणजे तेलगी प्रकरणात छगन भुजबळ आकंठ रुतलेले असताना त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत होती. त्याच सुमारास भुजबळांची पत्रकार परिषद संपल्यावर एका पत्रकारावर हल्ला झाला व त्याचे निमित्त करून पवारांनी भुजबळांचा तडकाफडकी राजीनामा घेतला होता ! पवारांवर हल्ला झाल्यामुळे पवारांचे चेले चिडले आहेत पण या गोष्टींची आठवण त्यांना असेल का ?
1 % राजकारण व 99 % समाजकारण असे धोरण राबवून पवारांनी राजकारणात पाय रोवले. पंतप्रधान बनायची कुवत प्रमोद महाजनांपेक्षा त्यांच्यात नक्की जास्त होती. दुर्दैवाने सत्ता सुंदरीच्या मोहाने ते आंधळे झाले व त्यांच्या पतनाला कोणताही बंध उरला नाही. निवडणुका जिंकायच्या म्हणून त्यांनी भाई ठाकूर व कलानी सारखे गुंड निवडून आणले. पवार गॉडफादर झाले ! दिल्लीत पवारांचे मन कधी रमलेच नाही ! त्यांच्याच मर्जीने मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या सुधाकर नाईक यांनी जेव्हा ठाकूर - कलानी कंपनीच्या मुसक्या बांधल्या तेव्हा कलानीला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे वळ पवारांच्या पाठीवर उमटले ! किती ही संवेदनाशीलता ! लगेच त्यांनी दिल्लीवरून कळवळून सांगावा धाडला की कलनीला मारू नका ! पुढे सुधाकर नाइकांनाच शह देण्यासाठी मुंबईतली दंगल त्यांनी भडकत ठेवली. कर्तव्य कठोर पोलिस अधिकारी बापट यांना गोळीबारात मुस्लिमच कसे मरतात असा सवाल करून एका रात्रीत घरी बसवले गेले, त्याही आधी दंगलीला आळा घालण्यास लष्कर पाठवायच्या निर्णायावर बराच वेळ घेतला होताच ! जळेना का मुंबई, मरेनात का लोक ? माझी सत्तेची पोळी भाजली म्हणजे झाले ! सेना-भाजपाचा प्रचार जोशी-महाजन करीत होते म्हणून सहिष्णूतेचा बुरखा पांघरणारे पवार प्रचार सभेत “जोशी महाजनांचे राज्य येवू देणार का ? असा उघड चिथावणीखोर जातिय प्रचार करीत होते ! भाजपामधले मुंढे, खडसे, तावडे तेव्हा त्यांना दिसत नव्हते ! स्वत: पवारांचा सध्याचा राष्ट्रवादी पक्ष किती राष्ट्रवादी आहे ? राष्ट्र सोडा , किती महाराष्ट्रवादी आहे ? मराठावादी, त्यातही 96 कुळ्यांचा पक्ष असेच राष्ट्रवादीचे सध्याचे स्वरूप आहे !
येनकेन प्रकारेण सत्तेत राहणे ही एकमेव महत्वाकांशा त्यांनी जोपासली ! त्यासाठी कपडे बदलावे तसे पक्ष व निष्ठा बदलल्या. अनेकांच्या पाठीत खंजीर खुपसला. मुस्लिम मतांसाठी सुंता फक्त करायची बाकी ठेवली. दलित मते हवीत म्हणून आठवल्यांना सत्तेचे गाजर दाखवून झुलवले व वापरून सोडून दिले. सोनिया गांधी इटालियन म्हणून त्यांची साथ सोडली तेव्हा मोठा राणा भीमदेवी थाट आणला होता पण मग सत्ता हवी म्हणून तेवढ्याच निलाजरेपणे हातावर घड्याळ बांधून मोकळे झाले. त्यांच्या मागच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत ना शेतकरी आनंदी झाला ना ग्राहक, दलालांचे मात्र फावले ! महागाई आभाळाला भिडली ! सामान्य माणसाचे पार पेकाट मोडले ! कडधान्यांच्या किमती कडाडल्या, सामान्यांच्या जगणे हराम झाले पण तोपर्यंत पवारांची कातडी पार गेंड्याची झालेली होती. कलानीला मारतात म्हणून कळवळणारे पवार , महागाईने भरडलेल्या जनतेला मात्र काही दिलास देत नव्हतेच उलट गरिबाला ज्वारी, बाजरी स्वस्तात कशाला विकता ? ती गाळा व त्याची दारू बनवा दारू , पैका मिळेल पैका असे सांगत होते. लोकांची क्रयशक्ती वाढली आहे, ते खा खा खात सुटले आहेत व म्हणून किमती वाढतात असे महागाईचे निलाजरे समर्थनच त्यांनी केले होते. वा रे जाणता राजा !
आगलाव्या पत्रकारांनी पवारांचे थोबाड फुटले म्हणून तुम्हाला काय वाटते असा प्रश्न अण्णांना केला त्यावर म्हणे अण्णांनी “एकच लगावली का ?” असे आधी विचारून मग सारवासारव केली अशी बातमी छापली आहे. पवारांनी सुद्धा त्यावर खोचक प्रतिक्रीया दिली आहे. अण्णा अनेक वर्षे समाजकारणात आहेत व राजकारण्यांना ते अगदी जवळून ओळखतात. राजकारण्यांबाबतीत ते संवेदनाशून्य बनणे अगदी स्वाभाविक आहे. असे जर अण्णा खरेच बोलले असतील तर त्यांना म्हणायचे असेल की एकाने काय यांचे थोबाड फुटणार आहे आणि जरी थोबाड फुटले तरी ते फुटलेच नाही असे सुजलेल्या गालाने ते सांगणारच आहेत. हे बनेल राजकारणी कशानेही सुधारणार नाहीत, अंतर्मुख तर कधी होणारच नाहीत ! कितीही थोबाडीत मारल्या तरी यांचे थोबाड काही फुटणार नाही !
रविवार, २८ ऑगस्ट, २०११
…. पण राजा तर नागडा आहे !
गेले बारा दिवस दिल्लीच्या रामलीला मैदानावर अण्णा हजारे यांनी षड्डू ठोकला होता. दिल्लीतले केंद्र सरकार सुद्धा हादरले होते. समस्त देश , विशेषकरून तरूणाई अण्णांच्या साथीला होती. मिडीयाला सुद्धा टीआरपी वाढविण्यासाठी बिनपैशाचा तमाशा मिळाला होता. देशभर जणू दूसर्या स्वातंत्र्य लढ्याचाच माहोल होता. गेले दोन दिवस तर सरकारने ठाम भूमिका घेतली होती. कायदे करण्याचा अधिकार लोकांनी निवडून दिलेल्या खासदारांचा आहे. कोणीही दबाव आणून या अधिकारावर गदा आणू शकणार नाही. अण्णांचे जहाल असे जनलोकपाल डावलून सरकार सौम्य लोकपाल बिल आणू पाहत होती. भाजपा सारखा कसलेला विरोधीपक्ष सुद्धा निर्नायकी अवस्थेत होता. अण्णांच्या बाजूने कोणताही पक्ष अधिकृतपणे उभा नव्हता. आणखी ७ दिवस आपण उपोषण करू शकतो असे अण्णांनी जाहीर केल्यावर सरकारच्या नाकी नऊ आल्याचेच चित्र होते. काय होणार याची उत्सूकत अगदी शिगेला पोचली होती. सरकार अण्णांचा रामदेव बाबा करणार की सरकारच गडगडणार अशी स्थिती होती. कालपर्यंत उपोषण अजून किती चालवायचे याची अण्णा टीमला काळजी पडली होती तर अजून किती काळ सलाइनवर रहायचे असा सरकारपुढे प्रश्न होता. कोणीतरी पड घ्यायलाच हवी होती. पण कोणी पडल्याचे सोंग करायचे ? अण्णांनी उपोषण सोडले तर त्यांच्या मागे असलेली तरूणाई त्यांना कचखाऊ म्हणायचा धोका होता, सरकारने पडान घेतले तर विरोधी पक्ष त्याचा मुद्दा करणार होता. अर्थात मिडीयाला मात्र त्याने काहीही फरक पडणार नव्हता. ढोल काय कोठूनही वाजतो !
अति झाल्यावर दोन्हीकडून हालचाली सुरू झाल्या. पडान तर घ्यायचे पण दूसर्या पार्टीने पडला म्हणून हसायचे नाही ऊल्ट मीच माती खाल्ली असे म्हणायचे, असा काहीतरी मध्यममार्ग निवडण्यात आला. शेवटी महाराष्ट्रातले फिक्सर नेत दोन्ही बाजू लढू लागले. राजाला नागडा तर फिरवायचा पण बघणार्यांनी त्याला नागडा न म्हणता, वा, काय दिव्य वस्त्रे परिधान केली आहेत असे म्हणायचे असेही ठरले ! मिडीयासुद्धा हसत हसत या तोडग्यात सामील झाला. ठरल्याप्रमाणे अण्णांच्या तीन प्रमुख मागण्या संसदेत मान्य झाल्याचे फर्मान घेवून इलासराव रामलीला मैदानावर आले. त्यांनी अण्णांना डोळा मारला व अण्णांनी संकेत समजून उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले ! जनलोकपालाची दिव्य वस्त्रे घालून अण्णा रामलीला मैदानावर जमलेल्या जनसमुदायाला सामोरे गेले ! सर्व देशभर क्रांती यशस्वी झाल्याचा जयजयकार झाला. मिडीया अण्णा ट्यून आळवू लागला. जय हो !
म्या पाप्याला मात्र अण्णांची दिव्य वस्त्रे दिसत नाहीत बाबा ! अण्णांच्या तीन प्रमुख मागण्या होत्या १)पंतप्रधानांना जनलोकपालाच्या कक्षेत आणणे २) न्याययंत्रणा जनलोकपालाच्या कक्षेत आणणे ३) सर्व सनदी अधिकारी जनलोकपालाच्या कक्षेत आणणे. आज पेपरात, मिडीयात सगळीकडे ३ प्रमुख मागण्या मान्य झाल्याचा ढोल बडविला जात आहे. यातली एकही मागणी प्रमुख नाही ! पेपरात आज प्रमुख म्हणून मान्य झालेल्या मागण्या खरेतर अगदी तिय्यम दर्जाच्या आहेत. नागरिकांची सनद, कनिष्ठ नोकरशाही योग्य यंत्रणेद्वारे लोकपालाच्या कक्षेत आणणे व राज्यात लोकायुक्त या प्रमुख मागण्या कधी होत्या ? कनिष्ठ नोकरशाही चौकशीच्या फेर्यात आणणे ही प्रमुख मागणी ? अहो मुंगीला चिरडण्याकरीत एके ४७ कशाला हवी ? लोकांना बनवायचे तरी किती ? आणि या साठी अण्णांनी एवढा अट्टाहास केला होता ? सरकारने अण्णांना सरळ-सरळ गुंडाळले आहे, त्यांचा अगदी मामा केला आहे ! अण्णा जिंकले म्हणून जी दिव्य वस्त्रे घालून लोकांचे अभिवादन स्वीकारत चालले आहेत ती खरे तर वस्त्रच नाहीत ! राजा नागडा आहे ! पण सांगणार कोण ?
रविवार, १० जुलै, २०११
कच्चा माल !
महाराष्ट्र राज्याचा दहावीचा सरासरी निकाल यंदा ७६ % लागला आहे. त्यात मुंबई विभागाचा ८८ % तर पुणे विभागाचा निकाल ८६ % लागला आहे. बारावीचा सरासरी निकाल ७० % तर मुंबई व पुणे विभागाचा अनुक्रमे ७९ व ७७ टक्के आहे. उत्तीर्णांचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की महाराष्ट्रात बुद्धीमत्तेचा महापूर आलेला आहे व राज्याचा शैक्षणिक दर्जा चांगलाच उंचावला आहे असा कोणाचाही समज होइल. वस्तुस्थिती काय आहे ? सरकारनेच नेमलेल्या एका समितीने राज्याचा दौरा करून जो अहवाल दिला तो धक्कादायक असाच आहे. सातवी झालेल्या मुलांना साधी अक्षर ओळखही झालेली नाही ! मी स्वत: १९८२ मध्ये दहावी उत्तीर्ण झालो तेव्हा मुंबई विभागाचा निकाल जेमेतेम ५-५५ % होता, राज्याची सरासरी ४०-४५ % असावी. तेव्हा राज्यात किती मुलांना अकरावीला प्रवेश घेता यईल याचा अभ्यास करून दहावीला किती जणांना पास करायचे ते ठरायचे. तेव्हा दहावीला पहिल्या आलेल्या मुलाला ९१ का ९२ % गुण होते. आता पहिला येणारा मुलगा ९८% गुण घेतो. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व केंद्रात अर्थमंत्रीपद भूषविलेले सी.डी. देशमुख बोर्डात पहिले आले होते तेव्हा त्यांना अवघे ७७% गुण मिळाले होते असे कोठेतरी वाचल्याचे आठवते, म्हणजे आज मुले विद्वेत्तेत सीडींपेक्षा नक्कीच भारी असली पाहिजेत ! वस्तूस्थिती अशी आहे की अनेक तरूणांना साधा रजेचा अर्ज सुद्धा भरता येत नाही. पत्ता बदलला असेल तर कार्यालयाला नक्की कोणत्या शब्दात कळवायचे हे सुद्धा त्यांना जमत नाही ! अनेक नव पदवीधरांना "तुमची यत्ता कंची ?" असा विचारावे असे वाटते !
काही वर्षापुर्वी केंद्रीय परीक्षा मंडळ व राज्य मंडळ यांची म्हणे चांगलीच जुंपली होती. दोन्ही मंडळे, दूसरे मंडळ आपल्या विद्यार्थांना गुणाची खिरापत वाटते म्हणून 'त्या' मंडळाची मुले नामांकित विद्यालयातल्या जागा बळकावितात असे आरोप करीत होती. मराठी मुलांवर अन्याय होवू देणार नाही अशी हाळी देत मग राज्य सरकारने बाह्या सरसावल्या. टक्क्यावरच प्रवेश मिळतो ना ? मग सोपे आहे, करा गुणांची खैरात विद्यार्थांवर, करा की सगळ्यांनाच पास ! हे ही कमी पडेल म्हणून आधी पर्सेन्टाइल पद्धत, न्यायालयात ती टिकली नाही म्हणून मग सध्याची बेस्ट ऑफ ऑफ फाइव. अर्थात याने सुद्धा भागणार नव्हतेच. मग ३० % मार्कांची बेगमी शाळांतूनच केली गेली. लेखी परीक्षेत वस्तूनिष्ठ प्रश्न अधिक प्रमाणात विचारायचे ठरले. यंदा तर केंद्रीय मंडळाचा विज्ञान व गणिताचा अभ्यासक्रम राज्याच्या विद्यार्थांना जसाच्या तसा लावला गेला आहे. निदान नववीपर्यंत तरी पास-नापासाची भानगड ठेवायचीच नाही असे ठरले आहे ! राज्यातील शिक्षणाचा दर्जा कसा सुधारेल हा खरा प्रश्न आहे तर शासन किती विद्यार्थांच्या ढुंगणावर "पास " असा शिक्का मारता येइल याच वंचनेत आहे ! आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी असा प्रकार आहे. सरकारला एकूणच शिक्षण क्षेत्राशी काहीही देणे-घेणे नाही ! सरकारला खरी चिंता आहे ती सरकारात असलेल्यांच्या शिक्षणाच्या कारखानदारीला कच्चा माल कसा पुरवायचा ही !
गेली अनेक वर्षे एकही नव्या शाळेला राज्याने अनुदान दिलेले नाही. ज्यांना मिळते त्यांना ते किमान वर्षाच्या विलंबाने मिळते. शासनाकडे पैसा नाही म्हणून विना-अनुदान तत्वावरील शाळांना मायबाप सरकारला मोठ्या नाइलाजाने मान्यता द्यावी लागली. आज स्थिती अशी आहे की सरकार घ्या म्हणाले तरी या शाळा अनुदानाच्या भानगडीत पडणार नाहीत ! शिक्शानाची तळमळ असलेल्या नेत्यांना गल्लोगल्ली शाळा ,कॉलेजे, तंत्रनिकेतने काढता यावीत म्हणून मोक्याचे भूखंड नाममात्र दरात दिले गेले. एवढ्याने काय होणार ? कारखाना म्हटला की फायदा नको का ? सरकार तर अनुदान देवू शकत नाही मग पालकांना पिळून हवी तेवढी फी वसूल करायची मुभा मग या संस्थाना दिली गेली. आता शाळा म्हटली की शिक्षक आलेच ? पण त्यांचा पगार नाही परवडत ? उत्पादन खर्च वाढतो ना ! मग सरकारनेच शिक्षण सेवक योजना आणली, ३५०० रुपड्यात टेंपरवरी शिक्षक ! आता सरकारच ३५०० देते, तर कारखान्याने तेवढा तरी का द्यावा ? त्यात सुद्धा पगार किती दिला व सही कितीवर घेतली हे गुलदस्त्यातच ! चालवा तुमची कारखानदारी जोरात, शिक्षणाच्या नावान चांग भलं ! शिक्षणाचा प्रसार मात्र झाला पाहिजे. मागेल त्याला शिक्षण, पैका मोजेल त्याला पदवी !
राज्यात ही शैक्षणिक कारखानदारी मग चांगलीच फळफळली. कोणताही कारखानदार उत्पन्न वाढवायच्या मागे असतोच ना ? शिक्षणाच्या कारखान्यातले फिनिश प्रोडक्ट म्हणजे पदवीचा भेंडोळी घेतलेला युवक ! आणि कच्चा माल म्हणजे दहावी किंवा बारावी पास झालेला विद्यार्थी ! कारखानदारी चालवायची तर या कच्च्या मालाचा अव्याहत पुरवठा हवा. त्याची हमी कोण घेणार ? माय-बाप सरकारने ती सुद्धा जबाबदारी स्वीकारली ! लावा भरमसाठ निकाल ! करा सगळ्यांना पास ! काय , वर्ग कमी पडतायत ? भरा एका वर्गात ६० च्या एवजी १२५ मुले ? तेवढ्यानेही होत नाही ? मग वाढवा की तुकड्या ? काय कच्चा मालच कमी पडतोय ? अरे बापरे ! अजून मुले पास करा ! तरीही नाही ? नापासाला द्या की प्रवेश ? त्याचा बाप पैसा मोजतोय ना ? शिक्षण कसे अगदी तळागाळात पोहचले पाहिजे !
एकाच भागात अनेक उस कारखाने असले की उसाची कशी पळवा-पळवी होते ? ( उसाचे उदाहरण निव्वळ प्रतीकात्मक आहे, साखर सम्राटांच्या शिक्षण संस्था आहेत हा निव्वळ योगायोग समजावा ! )उत्पादन क्षमता आहे पण कच्चा मालच नाही मग कच्च्या मालाचे भाव भडकतात व पक्का माल बाजारभावाने विकणे सुद्धा अशक्य होवून बसते. या कारखानदारीतले तज्ज्ञ सुद्धा विना-अनुदानित शाळात शिकलेले, त्यांचे गणित कच्चे असणारच ! यंदा गंमतच झाली ! पुरेपुर काळजी घेवून सुद्धा कच्च्या मालाचा न भूतो असा तुटवडा निर्माण झाला ! सगळाच इस्कोट झाला बघा ! अभियांत्रिकीच्या जागांसाठी विद्यार्थीच उरले नाहीत ! मायबाप सरकार खडबडून जागे झाले. कच्च्या माला अभावी कारखाने बंद पडणार म्हणता ? असे कसे चालेल ? कोण आहे रे तिकडे ? पन्नास टक्के वाल्यानीच का बा विंजिनियर वायचे ? ४५ % वाल्यांनाबी द्या की एक चान्स ! अहो पण जिकडे ६० % वाला पैलतीर गाठू शकत नाहे तिकडे ४५ % वाला काय करणार ? काही तरी गुणवत्ता हवीच हो ! गुनवत्ता गुनवत्ता काय घेवून बसला राव, ती गेली भाडमध्ये ! पाण्यात पडले की आपसूकच पोहायला येते ! क्लास लावा, केट्या खा, पेपर फोडा, गुणात फेरफार करा, व्हा निवांत पास ! आमी कशाला नाय म्हटलय का ? तेवढी आमची कारखानदारी चालली म्हंजे झाले !
राव, पण एवढ्याने तरी भागेल ना ? का नापासांना पन एक चान्स द्यायचा ?
