शुक्रवार, ११ जुलै, २००८

लोकल मधल्या झोपा !

लोकल मधल्या झोपा !
तशी ट्रेन मध्ये बसल्यावर मला झोप लागत नाही पण जेव्हा कधी झोपलो आहे तेव्हा तेव्हा खूपच धमाल झाली आहे.
वडाळ्याला असताना अंतर कमी असल्यामुळे मी बहुदा दरवाजातच उभा रहायचो. एकदा असाचा रात्रपाळी करून पहाटे घरी परतत होतो. आमची ईमारत रेल्वे लाईनला समांतरच होती. लोकलच्या खिडकीतून मी आमचे घरही बघितले, दूध केंद्रासमोरची रांगही बघितली आणि मग कसा कोणास ठाउक पण डोळा लागला. जाग आली तेव्हा कुर्ला कारशेडमध्ये होतो !
एकदा अशीच दूपारी खरेदीची धावपळ करून मशीद बंदर स्टेशनला आल्यावर indicator वर पनवेल लोकल लागलेली दिसली. तशी दोन मिनीटे होउन गेली होती पण असेल ट्रेन लेट म्हणून येत असलेली ट्रेन धावतपळत पकडली. खिडकी मिळाली, सामान रॅक वर टाकून बसलो आणि दमल्यामुळे पेंगू लागलो. कोणीतरी उठवले तेव्हा बांदर्याला पोचलो होतो. ती गाडी पनवेल नसून बांद्रा होती. स्टेशनच्या कर्मचार्याने झोप लागल्याने इंडीकेटर बदलला नव्हता आणि मला संकटात टाकले होते. माझा त्या रूटचा पासपण नव्हता तेव्हा पहीली भीती तिकीट तपासनीसाची होती. उलटी गाडी तब्बल २० मिनीटांनी आली. वडाळ्याला पोचलो आणि काही सेकंदाने पनवेल लोकल चूकली. परत ३० मिनीटांनी पुढची गाडी मिळाली. मशीदला गाडी पकडताना बायकोला फोन करून लवकर येत आहे म्हणून सांगितले पण या उलट-सूलट प्रवासात दोन तास गेल्यामूळे नेहमीपेक्षा उशीराच घरी पोचलो.


असेच एकदा मानखुर्दला कोणीतरी खिडकीच्या बाहेरून गदागदा हलवून , भेदरलेल्या चेहर्याने बाहेर ये असे खुणावत होता. डोळे नीट उघडल्यावर दिसले की मीच एकटा डब्यात शिल्लल राहीलो होतो, आणि फलाटावर तूफान गर्दी. मी आता काय करावे या विचारात असतानाच ट्रेन हलली व उतरलेली माणसे धडाधड परत डब्यात चढली ! काय प्रकार आहे असे शेजार्याला विचारले तेव्हा तो बोलला की ट्रेन मानखुर्दला आली अणि कोणीतरी धूर धूर असे ओरडला ! आग लागली असे समजून सगळे लोक खाली उतरले होते, सगळी ट्रेनच खाली झाली होती. मोटरमनने सगळे तपासले. त्याची खात्री पटल्यावर सरळ हॉर्न वाजवून त्याने लोकल चालू केली. खाली उतरलेले सगळे परत आत शिरले. झोप लागल्यामुळे मला या गोंधळाची काही कल्पनाच नव्हती. मागाहून काही जणांनी संकटात सुद्धा शांत राहण्याच्या माझ्या वृत्तीचे कौतुक केले !


पुलंचे पुस्तक वाचताना एकदा ब्रह्मानंदी टाळी लागूल्याने प्रवास फार लांबला होता. झाले असे की मी दादरला भाईदर लोकल पकडली. मग मीरा-रोडला गाडी बदलून मला विरार लोकल पकडायची होती. पुलंचे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक वाचण्यात रंगून गेलो. किती वेळ गेला कळलेच नाही. अचानक गाडीत लोकांचा लोंढा शिरल्यामुळे माझी तंद्री भंगली. मला वाटले विरारच आले. पण गाडी सुरू झाली व उलट दिशेने का जात आहे म्हणून मी हैराण झालो. नीट बघितल्यावर कळले तर मीरा-रोड सूटले होते व गाडी चर्चगेटॅच्या दिशेने चालली होती ! म्हणजे गाडी भाईदरला पोचली, निदान वीस मिनीटे उभी होती, परत उलट दिशेने निघून मीरा-रोड गेले तरी मला कळले नव्हते !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: