बुधवार, २९ ऑक्टोबर, २००८

स्वतंत्र, सार्वभौम (पण) पत्नीसत्ताक राष्ट्राची वाटचाल !

मराठ्यांच्या राष्ट्रातील एक घटक राज्य, चि. एकनाथ उर्फ बंड्या यांचे राज्य नीट चालत नाही, आर्थिक शिस्त नाही, काडीची अक्कल नाही , कसला म्हणून पोच नाही असे दिल्लीकरांना वाटू लागले होते. त्यांच्या मनमानी कारभाराला वेसण घालावी म्हणून कोणीतरी खमके हवे असे दिल्लीकरांनी ठरवले व उप-मुख्यमंत्री म्हणून चि.सौ.का. संध्या हीची नेमणूक झाली. शपथविधी सोहळ्यात पंतप्रधानांनी आश्वासन तर दिले होते की कोणाच्याही विकासाच्या आड केंद्र सत्ता येणार नाही व संघातील सर्वच घटकांचा योग्य तो मान राखला जाइल पण इतर अनेक आश्वासनांनाप्रमाणेच हे ही आश्वासन हवेतच विरून गेले ! मुख्यमंत्र्याला आवरण्यासाठी आणलेल्या उप-मुख्यमंत्री केंद्रीय सत्तेलाच ललकारू लागला ! अवाजवी हस्तक्षेप थांबवा असे बजावू लागल्या. केंद्राला ते आपल्या स्वायत्ततेला दिलेले आवाहन वाटले व हिंमत असेल तर वेगळे होउनच दाखवा असे आव्हान दिले गेले ! राज्याची स्थिती चांगली होती पण वेगळे राष्ट्र स्थापण्या एवढी मजबूत पण नव्हती. त्यात उप-मुख्यमंत्री पण उत्पादक निवडावा या सर्वमान्य रूढीला फाटा दिला होता ! तोंड दाबून बुक्क्यांचा मार चालूच होता , त्यात परकीय शक्ती तेल ओतत होत्या. सर्वमान्य तोडग्याची शक्यता मावळल्यावर घटक राज्याने संघराज्यातून आधी फूटून निघावे, विजनवासातील सरकार स्थापन करावे पण अस्मिता जपावी असे ठरले !
मुंबई बंदराच्या कर्मचारी वसाहतीत नवीन राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली गेली तेव्हा गंगाजळी होती अवघी १०,००० रूपडे ! त्यातले सर्वच अत्यावश्यक साधन-संपत्ति आणण्यातच खर्ची पडले. मुख्यमंत्री आता पंतप्रधान बनले तर उप-मुख्यमंत्री , गृहमंत्र्याच्या भूमिकेत शिरल्या ! पंतप्रधानांना फक्त नोकरी व उडाणटप्पूगिरी सोडली तर बाकी कशातच गति नसल्यामुळे आपसूकच घरात गृहमंत्र्याचा एकछत्री अंमल चालू झाला. गृहमंत्री भलत्याच कर्तबगार व खमक्या निघाल्या. स्वाभिमान जपून , काटकसरीचा मंत्र स्वीकारून, पर-राज्यांशी उत्तम संबंध ठेउन त्यांनी अल्पावधीतच गाडा रूळावर आणला व तूटीचा अर्थसंकल्प शिलकी होउ लागला ! देशत्याग करताना राजकूमार जेमतेम वर्षाचे होते तर मोठ्या (पण भाड्याच्याच ) जागेत बस्तान बसविताना राजकूमारीच्या आगमनाचा पायरव ऐकू येत होता ! तिच्या जन्मा बरोबरच , आर्थिक सुबत्ता जणू चालतच आली. अनेक मूलभूत सुविधांबरोबरच लोकरंजन करणारे प्रकल्प मार्गी लागले. अल्पावधीतच झालेली देशाची भरभराट बघून शेजारी देश कौतुक करू लागले. अनेक देशांची शिष्टमंडळे, मंत्री व प्रधानमंत्री व राष्ट्राध्यक्ष यांची पायधूळ लागू लागली. अनेक नवे मित्र मिळाले, शत्रूंना जरब बसली. नव्या देशाला मान्यता मिळाली ती कर्तबगारी दाखवल्यावरच. आर्थिक पाया मजबूत असल्यामुळे देशाला बाहेर हवा तिकडे आदर मिळू लागला व जागतिक प्रश्नांत वेटोचा अधिकारपण प्राप्त झाला. पण एक सल होतीच. ती म्हणजे स्वत:ची भूमी हवी, नाहीतर या सार्वभौमत्वाला काय अर्थ ? आर्थिक सुबत्ता असतानासुद्धा आमचा देश हे पाउल का उचलत नाही अशी अन्य देशात चर्चा सुरू झाली. जनमताचा आदर व गृहमंत्र्याचा दबाब आल्यामुळे शेवटी पनवेलला स्वत:च्या जागेत राजधानी वसवली गेली ! त्या वेळी झालेल्या सोहळ्यात अनेक देशांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष सामील झाले होते. त्या सर्वाचांच यथोचित मान राखला गेला. सर्वानीच नव्या राजधानीत सुख, शांती, भरभराट सदैव नांदो असे तोंडभरून आशीर्वाद दिले व गृहमंत्र्याच्या कर्बगारीला सलाम केला !
उण्यापुर्या सहा वर्षातच नवी राजधानी वैभवाच्या शिखरावर पोचली आहे. याची पावती म्हणूनच की काय, राष्टृकूलाच्या प्रमुखाचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्याचा सन्मान देशाला प्राप्त झाला आहे. परत एकवार राजधानी नटून-थटून या सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. या सोहळ्याला चार चांद लावण्यासाठी अनेक मित्र देश आपली पथके पाठवणार आहेत. त्यांची उत्तम बडदास्त ठेवण्यासाठी, स्वागतात कोणतीही उणीव राहू नये म्हणून स्वत: गृहमंत्री राबत आहेत. त्यांच्या हाताशी आता राजकूमार व राजकूमारी सुद्धा आहेतच. अनेक देशांची पाहणी पथके येउन सर्व व्यवस्था चोख असल्याचा निर्वाळा देत आहेत, अनेक फोनवरून संपर्क साधून माहीती घेत आहेत व समाधान व्यक्त करत आहेत. हा सोहळा यशस्वी करून नव्या स्वतंत्र, सार्वभौम, (पण) पत्नीसत्ताकाची द्वाही सर्वत्र फीरवण्यास आम्ही सर्वच सज्ज आहोत !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: