मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८

'आम्ही' शेयर विकत का घेतो ?

'आम्ही' शेयर विकत का घेतो ?


ज्याला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही, सिगारेट, बीडी कधी शिलगावत नाही, दारूच्या प्यालात जो कधी बुडत नाही, अफू-गांजा-चरस यांचे तर नावच नको आणि कोणत्याही 'बाजी' चा ज्याला शौक नाही त्याने शेयर तरी का विकत घ्यावेत बरे ?


वरील पैकी एक किंवा सर्व धंदे करणारे शेयर सुद्धा घेतात किंवा न करणारे 'मग करायचे तरी काय नरदेह मिळाल्यावर ?' म्हणून शेयर विकत घेतात। गुमा समाज काळ्याचे पांढरे व पांढर्याचे काळे करण्यासाठी, तसेच मराठी माणसाला पगार म्हणून दिलेले पैसे परत आपल्या तिजोरीत आणण्यासाठी शेयर घेतो तर मराठी माणसे पण त्यांना साथ द्यायला शेयर घेतात ! म्हणजे गुमा जेव्हा विकतो तेव्हा ममा (मराठी माणसे !) घेतात व vice versa !आम्ही मात्र त्यातलेही नाही !


आम्ही वाणिज्य शाखेत शिकत असल्यापासूनच या गुमांना पुरते ओळखून आहोत। स्वत:च्या स्वार्थासाठी शेयर बाजार ही मंडळी कसाही वाकवतात व यातुनच देशाच्या विकासाला खीळ बसते. चांगल्या कंपन्याना भाव मिळत नाही व फालतू कंपन्या भाव खाउन जातात. कोठेतरी, कोणीतरी हे बदलावे असा इश्वरी संकेतच असावा ! गुमांच्या मुजोरीला आळा घालण्यासाठी सरकारने राष्ट्रीय शेयर बाजाराची स्थापना केली, ती सुद्धा एका मराठी माणसाकडूनच, पण म्हणतात ना, सुंभ जळला पण पीळ नाही गेला याचा प्रत्यय येउन गुमांनी आपले धंदे चालूच ठेवले. चांगल्या कंपन्याचे शेयर पाडायचे व कंपूतल्या कंपन्याचे धावडवायचे !


अशीच त्यांची वाईट नजर 'महानगर टेलीफोन निगम' या सरकारी उपक्रमावर पडली। तेव्हा MTNL चा भाव होता ३२० रूपये, माझ्या अभ्यासाप्रमाणे तो ५०० असायला हवा होता. संघर्ष इथेच उडाला. सरकारी कंपनीचे नाक कापून गुमांना तो भाव ५० च्या खाली आणायचा होता. त्यामुळे त्यांनी विक्रीचा मारा सुरू केला पण त्यांना कोठे माहीत होते की आपली गाठ आता एका मर्द मराठ्याशी आहे ते ! या देशद्रोह्यांना धडा शिकवायची वेळ आता आलेली होती. मी व माझे अनुयायी मोठ्या प्रमाणावर MTNL खरेदी करू लागलो, म्हणजे ते लाखाने विकत असताना आम्ही शेकड्याने घेत होते ! हे युद्ध चांगलेच रंगले पण शत्रू चांगलाच मातबर होता. प्रचंड पैसा ओतून त्याने MTNL चा भाव ३००, २००, असा पाडत पाडत १०० च्या घरात आणला ! पण आम्ही हार मानणारे थोडेच होतो ? व्यक्तीगत फायद्यापेक्षा देशाची प्रतिष्ठा आम्हाला जास्त प्रिय होती. पैसे उभारण्यासाठी कोणी फंडातुन पैसे काढले, कोणी दागिने विकले, तर कोणी घर गहाण ठेवले , पण हार मानली नाही ! शेवटी MTNL आम्ही टेक-ओवर करू अशी स्थिती निर्माण झाली. पण भावातली घसरण काही थांबत नव्हती. बाजार संपल्यावर आम्ही बैठक घेउन 'बचेगे तो और भी लडेगे' असा निर्धार व्यक्त करत होतो पण बचणार तरी कसे हाच प्रश्न होता !


आता आर्थिक झळ घरीही बसू लागली। फोनची बेल जरी वाजली तरी छातीत धडकी भरू लागले. त्यातही वाईट म्हणजे फोनचे बिल न भरल्यामुळे अनेकांचे फोननिगमने कट केले ! किती हा कृतघ्नपणा ! असो ! राष्ट्राच्या गौरवाच्या लढाईत तुझे पण योगदान दे असे मी बायकोला विनवले। या देशकार्यासाठी तीने आपले दागिने द्यावे अशी मी अपेक्षा करताच धरणीकंप झाला जणू ! माझे काय चूकले हेच मला कळेना. मी देशासाठी लाख दोन लाख निछावर केले असताना हीला दागिन्यांचा एवढा सोस ? अग "दारू साठी पैसे हवेत म्हणून दागिने विक असे तर सांगत नाही ना, का जुगारात हरलो की मटक्यात बुडालो ? देशासाठीच तर पैसे मागतो आहे तर एवढा गहजब ?" या माझ्या डायलॉगवर बायको "मग ढोसा दारू हवी तेवढी आणि पडा गटारात, ते परवडले, पण आता हे देशप्रेमाचे भरते पुरे" असे बजावून माहेरी चालू पडली. घरोघरी त्याच चुली याचाही अनुभव मित्रांच्या घरी फोन केल्यावर आला. आता पैशाच्या मस्तीपुढे देशप्रेम आडवे होणार होते. दूसर्याच दिवशी आम्ही १० लाखाचे नुकसान सोसून या राष्टृ कार्यातुन माघार घेतली. आता पांढरे निषाण फडकावणार तोच चमत्कार झाला ! परकीय व देशी अर्थसंस्था आमच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी सपाट्याने MTNL चे शेयर खरेदी करून त्याचा भाव ३५० च्या वर नेउन ठेवला ! देरसे आये, लेकीन दुरूस्त आये ! आमचे १० लाख कुर्बान झाले पण देशाचा सन्मान तर राखला गेला ? आमच्या डोळ्यात पाणी तरळले पण पैसे बुडाल्याने नाही तर देश विजयी झाल्याने ! दागिन्यांना आता धोका नाही याची खात्री पटल्यावर, यथावकाश बायकोसुद्धा स्वगृही परतली !


त्यानंतर गुमा पण समजुन गेले की 'आम्ही' शेय्रर घेतो ते राष्ट्रीय कर्तव्य म्हणून, तेव्हा उगाच आमच्याशी पंगा घेण्यात काही अर्थ नाही। आम्ही जे शेयर घेतो त्याच्या वाट्याला ते बिलकूल जात नाहीत. ज्यांना बाजारात कोणी भाव देत नाही त्यांना हा एकनाथ हाच आपला नाथ वाटतो व आम्ही ही त्यांना योग्य तो भाव देतो ! हीर्याची कदर शेवटी जवाहरीच करणार ना ? मला ममांची या राष्ट्रकार्यात साथ मिळेल ना ? तर मग घ्या शपथ , "या पुढे माझा प्रत्येक पैसा मी शेयर खरेदीवरच खर्च करेन, कोणत्याही शूद्र लाभाची अपेक्षा न धरता, निव्वळ राष्टीय कर्तव्य म्हणून, गुमांसारख्या राष्ट्र-द्रोही शक्तींना वचक बसावा म्हणूनच ! अगदी घरा-दारावर नांगर फीरेपर्यंत मी मागे हटणार नाही"


कोणी वंदा किंवा निंदा बाजार सावरणे हाच आमचा धंदा !


जय हिंद ! भारत माता की जय ! शेयर बाजार की जय !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: