शनिवार, ८ सप्टेंबर, २०१२

स्वामीत्व हक्कासंबंधी !


सोशल नेटवर्किंग साइटसवर अनेक प्रकारची माहिती कॉपी पेस्ट करून शेयर केली जाते. या वरून अनेकदा वादंग निर्माण होतात. मी मला आलेले इमेल जसेच्या तसे  फॉरवर्ड केले असे सांगून जबाबदारी झटकून मोकळे होण्याचा प्रयत्न केला जातो. पण अप्रत्यक्षपणे का होइना आपण चोरीला प्रोत्साहनच देत असतो. चोरी करणारा जसा दोषी असतो तसा मदत करणारा सुद्धा असतोच असतो.

कायद्याच्या बडग्यापेक्षा मला नैतिकता जास्त महत्वाची वाटते. "उचलली जीभ लावली टाळ्याला" या धर्तीवर आलेले इमेल कोणतीही शहानिशा न करता मित्रांना फॉरवर्ड केले जाते. अनेकदा लेखकाचे नाव सोडून बाकी सगळी पोस्ट कॉपी पेस्ट केली जाते. नकळत का होइना असे केल्याने संभ्रम निर्माण होतोच. अशा प्रसंगी, तळ टीप म्हणून "इदं न मम ( हे मी लिहिलेले नाही )" असे लिहिणे अधिक नैतिक आहे. (टीप - असे लिहायची  कल्पना माझी नाही !)

KCBC Cafe Reunion -  या फेसबुकच्या फोरमवर स्वामीत्व हक्कासंबंधी चर्चा चालू असतानाच माझे मित्र व नेहरू तारांगणचे संचालक श्री. अरविंद परांजपे यांनी एक वेगळाच विचार मांडला. त्यांनी त्यांचे सगळे लेखन स्वामीत्व हक्क मुक्त ठेवले आहे. कोणीही ते कॉपी-पेस्ट करावे, त्यांच्या नावाचा उल्लेख केला तर आनंदच आहे, आग्रह वा सक्ती नाही !मला स्वत:ला हा विचार खूपच भावला. लेखन हे काही माझ्या पोटा-पाण्याचे साधन नाही. स्वान्त-सुखाय मी लिहित असतो, एखाद्याला ते आवडले व आपल्या नावावर खपवावे असे वाटले तर काय हरकत आहे ! माझा विचार अनेकांपर्यंत पोहचत तर आहे ? विचारांचा प्रसार होणे जास्त महत्वाचे आहे. सुर्य कोणाच्याही आरवण्याने का होइना उगवला हे जास्त महत्वाचे !

या क्षणापासून मी माझे ( तसे माझे म्हणून तरी काय आहे ? हे सर्व तुमचेच आधी केव्हातरी घेतलेले आहे ते या माध्यमातुन तुम्हाला परत करतो आहे ! ) म्हणून या ब्लॉगवर टाकलेले सर्व लेखन स्वामीत्व हक्काच्या बेडीतुन मुक्त करीत आहे. ज्या कोणाला हे आवडेल त्याने त्याला जसे वाटेल तसे ते शेयर करावे, त्याला कोणतीही आडकाठी नाही. 

धन्यवाद !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: