शनिवार, १८ जुलै, २००९

आद्य शंकराचार्यांवरील ग्रंथ – श्रीशंकर दिग्विजय – मराठी अनुवाद.

वैदिक धर्माचे पुनर्जीवन करणार्या आद्य शंकराचार्यांबद्दल दुर्दैवाने आज फ़ारच थोड्या लोकांना माहीती आहे. मराठीत त्यांच्यावर फ़ारशी पुस्तके / ग्रंथ पण उपलब्ध नाहीत. आठव्या शतकात हिंदू धर्मात बजबजपुरी माजून अनेक पंथाचा, त्यात काही अघोरी सुद्धा होते, उदय झाला होता. बौद्धांचे आक्रमण सुद्धा जबरदस्त होते. चार्वाकादी चंगळवादी विचारसरणी लोकांना जवळची वाटू लागली होती. सर्वत्र अनागोंदी माजली होती. आपल्याच पंथाच्या वाढीसाठी भरपूर रक्‍तपात सुद्धा होत होता.

अशा काळात शंकराचार्यांचा अवतार झाला. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीच संन्यास घेउन शंकराचार्य आसेतु-हिमाचल फ़िरले. विविध पंथाच्या आचार्यांना वाद-विवादात जिंकून त्यांनी त्यांना आपले शिष्य बनवले व वैदीक धर्माची मुहुर्तमेढ पुन्हा रोवली. देशाच्या चार भागात चार धर्मपीठांची स्थापना करून आचार्य परंपरा निर्माण केली, जी आजतागायत चालू आहे. समन्वयाची भूमिका स्वीकारून त्यांनी विविध पंथात चाललेला भीषण रक्‍तपात थांबवला.

अवतार कार्य संपल्यावर, वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी त्यांनी समाधि (कैलासारोहण) घेतली. शंकराचार्यांचा हा जीवन प्रवास अलौकिक असाच आहे. त्यांना मिळालेली जगत्‌गुरू ही पदवी सार्थच आहे.

नंतर १३ व्या शतकात शृंगेरी पीठाचे शंकराचार्य श्री. विद्यारण्य तीर्थ, जे विजयनगर साम्राज्याचे मंत्री सुद्धा होते, आद्य शंकाराचार्यांचा हा विजय श्लोकबद्ध केला. शंकर दिग्विजय या संस्कृत ग्रंथात एकूण १६ सर्ग असून त्यात शंकराचार्यांच्या जन्माआधीची स्थिती ते सर्वज्ञानपीठाधिरोहणा पर्यंतचा सगळा प्रवास अतिशय ओघवत्या, रसाळ भाषेत आला आहे.

माझे वडील आद्य शंकराचार्यांच्या जन्मगावी (केरळ मधील कालडी ) गेले असताना, या ग्रंथाचे हिंदी भाषांतर त्यांना मिळाले. ती प्रत साधारण ७० वर्षापुर्वीची होती ! बाबांनी एका दमात हा सगळा ग्रंथ वाचून काढला व याचे मराठी भाषांतर करण्याचा ध्यासच घेतला. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी अवघ्या एक-महीन्यात, दिवस-रात्र बसून त्यांनी हे कार्य तडीस नेले ! एकूण १६४३ संस्कृत श्लोकांचे त्यांनी ओघवत्या मराठीत भाषांतर केले आहे. ६०-७० वर्षापुर्वी खिळ्याच्या सहाय्याने छपाई होत असे. अनेक संस्कृत श्लोक छपाईतील दोषामुळे नीट लागत नव्ह्ते. संस्कृतचा वडीलांचा व्यासंग दांडगा असल्याने ते सर्व श्लोक त्यांनी निर्दोष करून घेतले आहेत व ही आवृत्ति निर्दोष अशीच आहे, तरीही जाणकाराने चूक दाखवून दिल्यास पुढील आवृत्तित त्याची दखल नक्की घेतली जाईल. अर्थात एवढ्यावरच काम संपणार नव्हते. याची डीटीपी करणे सुद्धा तेवढेच किचकट काम होते. आचार्य कृपेनेच , डोंबिवलीचे संस्कृत अभ्यासक व अनेक धार्मिक ग्रंथाचे लेखक श्री. मुकुंद जोग यांनी हे काम आपल्या शीरावर घेउन अगदी थोड्या वेळात पार पाडले. पुढे पुस्तकाच्या निर्दोष छपाईची जबाबदारीसुद्धा त्यांनीच पार पाडली !

आद्य शंकाराचार्यांवरील मराठीतील अशा प्रकारचा हा पहीलाच व दुर्मिळ ग्रंथराज सादर करताना आम्हा सर्वानाच एक अनोखा आनंद होत आहे. ग्रंथाच्या निर्मितीत आम्ही कोणतीही तडजोड केलेली नाही. मजबूत बांधणी, आकर्षक मुखपृष्ठ, उच्च दर्जाचा पेपर व छपाई, अनोख्या बुकमार्कसह हा ५८० पानांचा ग्रंथ सजला आहे. सोबत प्लास्टीकचे आवरण सुद्धा आहे. ग्रंथाला श्री. मुकुंद जोग यांचीच प्रस्तावना आहे. संस्कृतची आवड, अभ्यास असलेल्यांसाठी, शंकराचार्यांच्या भक्तांसाठी, वैदिक धर्माच्या अभ्यासकांना हा ग्रंथ म्हणजे एक मेजवानीच आहे. खरेतर स्वत:ला हिंदू समजणार्या प्रत्येकाच्या घरी हा ग्रंथ हवाच हवा !

ग्रंथाची दर्शनी किंमत जरी ५०० रूपये असली तरी थेट विक्री योजनेत आम्ही हा ग्रंथ अवघ्या ३०० रूपयात उपलब्ध करून देत आहोत, थेट घरपोच ! साधारणपणे वितरक ३० ते ४० % कमिशन मागतात, तेव्हा थेट वाचकालाच परवडणार्या दरात विकायची आमची योजना आहे, अर्थात ३०० रूपये ही किमत पोस्टेज धरूनच आहे ! पुस्तक विक्रेते वा इतर कोणीही ग्रंथ प्रसारक पाचशे रूपयापर्यंत ग्रंथ विकू शकतात. या ग्रंथाच्या निर्मितीवर साधारण १,२५,००० रूपये खर्च आला आहे. शंकराचार्यांवरील निस्सिम भक्‍तीपोटीच वडीलांनी वयाच्या पाउणशेवाव्या वर्षी हे साहस केले आहे. यातुन काही लाभ झाल्यास अशाच प्रकारच्या ग्रंथसेवेत तो घातला जाईल हे निश्चित.

हा ग्रंथ महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रंथालयात उपलब्ध व्हावा अशीही इच्छा आहे. आपल्या भागातल्या ग्रंथालयांचे पत्ते मला कळवल्यास त्यांच्याशी संपर्क साधणे सोपे जाईल व या मदतीबद्दल मी आपला सदैव ऋणी राहीन.

ज्यांना कोणाला हा ग्रंथ संग्रही हवाच असे वाटत असेल त्यांना खालीलपैकी कोणताही पर्याय निवडता येइल ;

१) मनी-ऑर्डर, ड्राफ़्ट, मुंबईत देय असलेला लोकल चेक - अनुजा एकनाथ मराठे या नावाने - आपल्या संपूर्ण पत्त्यासह खालील पत्यावर पाठवावा.

२) जर आपले आयसीआयसीआय बँकेत खाते असेल वा इंटरनेट बँकिंग

सुविधा असलेले खाते असल्यास आपण खालील खात्यात पैसे जमा करून आपले नाव व पत्ता मला इमेलने कळवू शकता.

आयसीआयसीआय बँक A/C :- 0032 01 013132 दादर, पूनमवाडी शाखा.

३) जर आपण हार्बर लाइनवर रहात असाल तर मला फ़ोन करून आपल्या सोयीची वेळ

कळवल्यास मी प्रत घेउन आपल्या घरी स्वत: पोचती करीन.

पैसे मिळाल्यावर साधारण पणे एका आठवड्यात ग्रंथ आपल्याला घरपोच केला जाईल.

ज्यांना या ग्रंथाचे वितरण करायचे असेल त्यांनी कृपया मोबाईल वा इमेल द्वारे संपर्क साधावा. माझा पत्ता व मोबाईल, इमेल आयडी तसेच घरचा दूरध्वनी क्रमांक खाली दिलेला आहे.

जसा जसा वेळ मिळत जाईल, मी यातला वेचक भाग वाचकांसाठी माझ्या ब्लॉग वर देत जाईन.

श्री. एकनाथ जनार्दन मराठे

A/३०१, हरी-प्रेम ,भूखंड क्र.१३५/१३६,प्रभाग ४, नवीन पनवेल (पुर्व) ४१०२०६

Mobile Number +919869710424

Residential Number +91 22 27483287

इमेल - ejmarathe@gmail.com

२ टिप्पण्या:

निनाद गायकवाड म्हणाले...

अतिशय उत्कृष्ट प्रयत्न.....
अभिनन्दन......!!!

Unknown म्हणाले...

खूप स्तुत्य उपक्रम
हा ग्रंथ आपल्या संग्रही असावा अस वाटत.मी सद्या परदेशी आहे,नोव्हेंबर मध्ये संपर्क करेन.