शुक्रवार, १५ मे, २००९

विक्रम आणि वेताळ कथा – अपेक्षाभंग !

विक्रमादित्य कोणालाही न जुमानता स्मशानात गेला. झाडावर लटकत असलेले प्रेत खांद्यावर घेउन तो झपाट्याने परत निघाला तेव्हा, प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला , “विक्रमा, का असा आयुष्यभर एकच ध्येय बाळगुन राहीला आहेस, तुझी पण अवस्था त्या इ-काकांसारखीच होणार हे नक्की !”. विक्रमाचे कुतुहुल चाळवले, त्याने वेताळाला इ-काकांची गोष्ट सांगायचा आग्रह केला. वेताळाने अट घातली की मध्ये बोललास तर मी परत झाडाला लटकायला मोकळा , बोल कबूल ? विक्रमाने अट कबूल करताच वेताळ सांगु लागला;

ऑर्कुटवरील कोब्रा कट्ट्यावर इ-काका सामील झाले आणि अल्पावधीतच कमालीचे लोकप्रिय झाले. रोज नवे नवे विषय मंचावर मांडून ते मस्त चर्चा घडवुन आणत. विषय पण सर्व हाताळत, सर्व वयोगटाला आपले वाटावे असे, कधी बंडखोर, कधी सुधारणावादी, कधी विचार करायला लावणारे, तर कधी मजेदार शब्द खेळ , कधी टीपी टाइप फ़ुलटू टाइमपास टॉपिक सुद्धा टाकत ! कट्ट्याला शिस्त लावण्यासाठी काही जण होते, उनाडपणा करणार्यांना ते तंबी देत, धाकात ठेवत. त्यात एक दादा सुद्धा होता पण तो विनाकारण अधिकार गाजवतो अशीही तक्रार होती काहींची. पण दादाच्या बेटकुळ्या व दंडावर मॉनिटरचा बॅच, यामुळे सगळॆ टरकून असत त्याला. एकदा असाच इ-काकांनी एक टॉपिक टाकला. ताईने टक्क्यांचे गणित तर स्टेप बाय स्टेप सोडवले, उत्तरही अचूक मांडले पण तळटीप लिहीली की माफ़ करा काही कळलेच नाही बघा. हेतु तरी काय हो तुमचा इ-काका ? लगे हात दादा पण पचकला, १०० % रतीब, हा हा हा, हो हो हो, खो खो खो, खी खी खी ! मग काय इ-काकांची सटकलीच की ! त्यांनी दादाला आडे हात घेतले, दरडावले. परीणाम मात्र भलताच झाला ! दादा दंड थोपटत व छाती काढून काकांना म्हणु लागला, “ताता, तुम्ही तान ताल्ले, ते पन दोड नाही तल मताला ! ताता तुमच्या वयाला हे षोबत नाय ! तान ताता ते ताता तर तिंत तारता ! “ इ-काका एकदम हैरान, परेशान झाले. अरे झाले काय याला ? हा असा काय बोलतो आहे, बोलताना अंगावर शिंतोडे उडल्यासारखे कसे वाटते आहे ? बघे अवाक झाले. दोन बड्यांच्या भांडणात बाजू तरी कोणाची घ्यायची ? बरे , पान कोण खात आहे ते सुद्धा स्पष्ट होत नव्हते. अचानक काडकन आवाज आला ! जशी वीज चमकावी तसा. मग दिसले के दादाचे थोबाड फ़ुटले आहे, दात घशात गेले आहेत. आणि हे काय ? पान तर तोच खात होता ! पण दादा पण कसलेला गडी होता, तो बाहीला तोंड पुसुन कांगावा करू लागला, “ तुम्हीच पान खाल्ले, छी, तुम्हाला झेपत नाही तर कशाला या वयात पान खायचे ? ते पण १२० नंबरी ? माझेच चुकले, तुम्ही कसले रतीब टाकता, तुम्ही तर पिंक टाकता टॉपिकची !

आता मात्र इ-काकांचा उरला सुरला संयम सुद्धा संपला, मग त्यांनी रूद्रावतार धारण करत स्टेनगनची फ़ैरच डागली, नुसती आग होती ती आग;

“शिंतोडे दिसले तेव्हाच दात घशात घातले होते. बदललेल्या स्मायलीज वरून ते पुरेसे स्पष्टही झाले होते . (का मी परत समजवण्यत कमी पडलो ?) जेव्हा कळले की पाठीवर पिंक मारली गेली आहे - तेव्हा परत दात पाडायची गरज निर्माण झाली. ज्या वयात धारोष्ण दूध प्यावे त्या वयात पहील्या धारेची का प्यावी ? बरे पहाटे उठून जो ते प्रामाणिक पणे रतीब म्हणून टाकतो त्याचा मान राखू नका निदान अपमान तरी करू नका ? बरे प्या वर ते नंबरी पान कशाला ? बरे पान खा, बोलताना शिंतोडे उडणार नाहीत याचे भान तरी बाळ्गा ? पिंक तरी कोपर्यात मारा ? बरे शिंतोडे उडाले हे दाखवुन दिल्यावर माफ़ी तरी मागा ? बरे ते ही जमत नाही तर तुम्हीच नको त्या वयात नको ते पान खाल्ले हा कांगावा कशाला ? अरे तोंड तुझे रंगले आहे, रस तुझ्या तोंडातुन टपकतो आहे, जीभ तुझी रंगली आहे, तुझ्या पिंका टाकायच्या सवयीशी सगळे परीचीत आहेत, हे सर्व १६६६२ सभासदांना दिसते आहे - तरी उलट्या बोंबा ? तुझ्या नाकातुनसुद्धा अजून पुरेसा शेंबूड बाहेर पडलेला नाही याचे तरी भान बाळग ! “

आता सांग विक्रमा, इ-काकांना एवढे चिडायचे कारणच काय होते ? या वयात एवढा राग ? या प्रश्नाचे उत्तर जर माहीत असूनही तू दिले नाहीस तर तुझ्याच डोक्याची शंभर शकले हो़उन ती तुझ्याच पायावर लोळू लागतील ! या अगदी अनपेक्षित प्रश्नांनी आधी विक्रमादीत्य हडबडला. मग मात्र शांतपणे उत्तर देता झाला , “इ-काकांचे चिडणे स्वाभाविक आहे. दादाने अकारण त्यांची खोडी काढली हे सुर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. पिंक मारणार्या दादाने इ-काकांवरच भलते-सलते आरोप करावेत हे सुद्धा डोस्के फ़िरवणारेच आहे. अन्याय सहन करणे हा सुद्धा गुन्हाच आहे, म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो.”

विक्रमादित्याचे बोलणे संपताच वेताळ खांद्यावरून उडाला व थेट वडाच्या पारंबीला लटकू लागला. सात मजली हास्य करत म्हणाला “विक्रमा, तू बोलसास आणि फ़सलास ! मी परत मोकळा झालो ! पण तुझे उत्तर मात्र यावेळी मात्र साफ़ चूकले ! विक्रम परत हैराण परेशान झाला ! “अरे वेताळा , गोष्ट पण जरा वेगळ्याच धाटणीची सांगितलीस आणि प्रश्न काही तिसराच विचारलास ? हा काय प्रकार आहे. माझे उत्तर चूकले असेल तर निदान खरे उत्तर तरी सांग ?” वेताळाने चक्क नवनीत बाहेर काढले, गोष्टीचा क्रमांक बघुन शेवटच्या, उत्तराच्या पानावरील, त्या क्रमांकाचे उत्तर वाचले, “अ पे क्षा भं ग” ! विक्रम आता पार भेलकांडलाच ? अरे पण कोणाचा ? कसा ? अपेक्षा तरी काय होती ? वेताळ अदृष्य होता होता म्हणाला, “मला काय माहीत, तिकडे एवढेच लिहीले आहे !” बुचकळ्यात पडलेला विक्रमादीत्य पनवेलची वाट धरता झाला ! उद्या परत स्मशानात जाउन या प्रश्नाची तड लावायचीच या निर्धाराने !

अर्पण पत्रिका :- माझे प्रेरणास्थान, आदीगुरूंना, सविनय !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: