सोमवार, ६ एप्रिल, २००९

कर नाही त्यालाच डर !

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणताही का असेना सायबाच्या क्रीकेटने येथील जनमानसावर करणीच केली आहे. क्रीकेट हाच आमचा धर्म असे मानणारेही काही कमी नसतील. राष्ट्रीय संघातुन खेळण्याचा आनंदही काही औरच असतो ! अर्थात १०० कोटींच्या देशात असा टीळा लागणे दैव-दुर्लभच. राष्ट्रीय संघात कधी काळी ११ पैकी ६ खेळाडू मुंबईकर असायचे, अनेक कारणाने हा दबदबा ओसरला असला तरी मुंबई भारतीय क्रीकेटची पंढरीच आहे ! मुंबईने देशाला अनेक उत्तमोत्तम खेळाडू दिले, त्यांची नावे आठवायचीही गरज नाही एवढे त्यांचे योगदान प्रचंड आहे. त्यांच्या नावावर एक ’धावती’ नजर टाकूया, खंडू रांगणेकर, अजित वाडेकर, एकनाथ सोलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, विजय व संजय मांजरेकर, संदीप पाटील , अजित आगरकर आणि सचिन तेंडूलकर ! यांच्यात काही साम्य आहे का ? हो, एक दोन अपवाद सोडले तर सगळे फ़लंदाज आहेत. अजून एक, त्यांच्या आडनावात कर आहे ! संदीप पाटील अपवाद समजा, तसेच रवी शास्त्री हा रविशंकर शास्त्री आहे हे ही लक्षात घ्या ! सगळीच नावे खणखणीत वाजलेली, नावाजलेली आहेत यात दुमत व्हायचे कारणच नाही. म्हणजे एक नियम असा बनतो की ज्या मुंबईकर खेळाडूंच्या नावात, आडनावात कर असतो तेच भारतीय संघात काहीतरी करतात ! तसेही क्रीकेट या खेळात कराचे महत्व अनन्यसाधारणच, तो कर जर नावात आला तर कर्तबगारी बहरणारच ना !

आता ज्यांच्या नावात कर नव्हता त्यांची करणी (कर्तृत्व) बघुया, रणजी सम्राट अशोक मांकड, चंद्रकांत पंडीत, अमोल मुझुमदार, सलील अंकोला, राजू, निलेश व अलीकडचा धवल कुलकर्णी (तसा लपलेला कर आहे म्हणूनच गुणवत्ता पण दडलेलीच राहीली !), विनोद कांबळी, प्रवीण आमरे, राजेश पवार, रमेश पोवार…. . या सगळ्यांनीच रणजी व तत्सम देशांतर्गत स्पर्धात धावांचा रतीब व बळींचा नैवेद्य दिला . तसा काहीना टीळा लागला पण गंध नाही लागले, निवडसमिती काही त्यांना पावली नाही, सिस्टीमचे ते बळी ठरले का नावात नसलेल्या कराची करणी ? ! कर नाही त्यालाच डर !

तरीही तुमच्या भुवया उंचावलेल्याच असतील, काही नावे तुम्ही माझ्या तोंडावर फ़ेकायला तयार असाल ना ? हो, रामनाथ पारकर, गुलाम पारकर, अजून एक सणसणीत नाव म्हणजे पद्माकर शिवलकर, चक्क करवर्ग (दोन कर !) , पण कसोटी टीळा काही लागला नाही तो नाहीच. मान्य आहे, पण अपवादानेच तर नियम सिद्ध होतो ना ? काय म्हणता, गावस्करांचा रोहन --- अहो तो मुंबईच्या वाटेने गेलाच नाही, बंगालच्या आडवाटेने तो गेला आणि त्याची वाट लागली, ही बंगाली करणी त्याच्या करीयरला भोवली !

अजून एक अजब योगायोग, क्रीकेटवर खुमासदार लेखन, रोखठोक टीका करणारे, अचूक मीमांसा करणारे, ओघवते धावते समालोचन करणारे, विविध पेपरातले स्तंभलेखक यांची नावे जरा डोळ्यासमोर आणा. वि.वि. करमरकर, शिरीष कणेकर व दिलीप प्रभावळकर ! यांनी आपल्या लेखंदाजीने भल्याभल्यांना कर (हात) टेकायला लावले आहेत ! झालेच तर क्रीकेटची आकडेवारी तोंडपाठ असलेले सांख्यिकी तज्ज्ञ शशिकांत(?) झारापकर आठवा !

हा करमहीमा मी या आधी बहुतेक मराठी वृत्तपत्रांना छापण्यासाठी पाठवला होता पण त्याला कचऱ्याची टोपली दाखवली गेली, माझ्याही नावात कर कोठे आहे म्हणा ! कर नाही त्यालाच डर, निदान मुंबईकर असाल तर, हे आता तरी पटले ना ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: