शनिवार, ६ डिसेंबर, २००८

अपेक्षाभंग !

मशीद ब‍दर वरून निव्वळ चार पैसे वाचतात म्हणून हमाली करून, गर्दीतुन सामान आणायचे मी हल्ली टाळतोच. कारण चार पैसे वाचतात म्हणून हा सव्यापसव्य करायचा आणि होते भलतेच ! दूकानदार एखादा नग कमीच देतो किंवा वजन तरी कमी देतो. माल खराब असला तर घरी परत अक्कल काढली जातेच. बहुदा ’लेने के देने पड गये’ असेच होते ! पण वडीलांची ७५ वी करायची होती. कार्यक्रमाच्या आगेमागे किमान ३० ते ५० माणसे घरी असणार होती. असे काही असली की घरातली कामवाली बाई दांडी मारणारच ना ? बहुतेक पाहुणे कोकणातले, म्हणजे निदान ५ ते ६ वेळा चहा होणारच ! त्रास नको म्हणून थर्माकोलचे ग्लास व प्लेट आणायचे ठरले व मी नाईलाजाने सकाळीच मशीद बंदर गाठले.

दूकाने नुकतीच उघडू लागली होती. थोडा फ़ेरफ़टका मारल्यावर एका दूकानात हव्या असलेल्या सगळ्या वस्तू लटकवलेल्या दिसल्या. धडाधड यादीप्रमाणे ऑर्डर दिली व सहज आठवले म्हणून एक सेलोटेप सुद्धा द्या म्हणून सांगितले. सगळ्या सामान एका पिशवीत भरून दूकानदाराने दिले, कच्चे बिल खिषात ठेउन मी परत लोकल पकडली. सहज शंका आली, तपासल्यावर खात्री पटली की त्या दूकानदाराने सेलोटेप दिलीच नाही आहे. पावतीवर मात्र त्याचे ३० रूपये लावले होतेच ! माझीच चूक होती, सगळे सामान तपासून मगच दूकान सोडायला हवे होते. मरो, अक्कल खाती जमा झालेल्या रकमेत अजून थोडी भर, बरे हे घरी सांगायची काही सोय नव्हतीच !

पण दूसरे मन मात्र काही केल्या शांत होते नव्हते. ते बजावत होते, गप्प बसू नकोस, जा त्या दूकानात, त्याला चांगला खडसाव, त्याने मुद्दामच ती सेलोटेप आत भरली नसणार, तुला त्याने ’गि़ऱ्हाईक’ बनवले आहे, त्याला सोडू नकोस. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही , पण काळ सोकावतो. असेच तीन-चार दिवस गेले. अगदी हॅम्लेट झाला होता ! शेवटी निदान ती पावती घेउन त्या दूकानात जायचे असे ठरले. सकाळी परत त्या बाजारात शिरलो पण गंमतच झाली. नेमेके कोणत्या दूकानात सामान घेतले तेच समजेना. सगळॆच गुजराती तसेही गोल-मटोल, तुपकट चेहर्याचेच असतात म्हणा ! अनेक फ़ेर्या मारून पण दूकान नक्की कोणते तेच काही समजत नव्हते. उगीच कोणाला तरी विचारण्यात सुद्धा अर्थ नव्हता. निराश होउन परत फ़ीरत असतानाच कोणीतरी खांद्यावर हात ठेउन ’आपको हमारे शेठजी बुला रहे है’ असे म्हणाला. दूकानात शेठनीने मला बसायला दिले. हा काय मला कोणी बडा गिऱ्हाईक समजला की याचे कोणी पैसे बुडवलेला आपल्यासारखा दिसतो या विचाराने मी हैराण झालो !

माझ्या चेहर्यावरची प्रश्नचिन्हे वाचत तो शेठ म्हणाला, तुमी मला वळखल नाय वाटते, चार दिसापुर्वी तुम्ही इथेच तर आला होतात ना, प्लेटी – गिलास घ्यायला ? त्याचे तुपाळलेले मराठी कानाला खरच गोड वाटत होते, ’ तवा घाई गडबडीत या राम्याने तुमची शेलोटेप आत भरलीच नाय बगा, तुमी गेल्यावर मला ते कलले, मग एवढा वाईट वाटला शेट म्हनून सांगू, सगळा बाजार पालथा घातला, तुम्हाला सोधण्यासाठी, पन तुमचा तर काय बी पता नाय, चार दिवस झोप नाय बगा, हरामाची एक पै पन ठेवत नाय मी, कवा तुमची गाठ पडते व तुमची चीज तुम्हाला देते असे झाले होते, सर्व पोर्यांना सांगूनच ठेवले होते, त्यो सेठ कवा बी दिसला तरी त्याला घेउन या म्हनून , श्रीजीची कीरपाच झाली बगा, लई मोठा बोज हलका झाला !” असे म्हणत त्याने ती टेप मला सुपूर्द केली.

मी दूकान सापडत नाही म्हणून परतच फ़ीरणार होतो पण जर सापडले असते तरी ती टेप मिळण्याची वा पैसे परत मिळण्याची मला कोणतीही अपेक्षा नव्हतीच, पण त्या दूकानदाराला सत्य परीस्थिती सांगून टाकायची इतकेच माझ्या मनात होते, त्याला चांगला फ़ैलावर सुद्धा घेणार होतो व हरामाचा पैसा पचणार नाही अशी शापवाणीही उच्चारणार होतो, पण झाले काही तिसरेच ! चला सगळॆच अपेक्षाभंग यातना देत नाहीत इतके तर कळले !

1 टिप्पणी:

Kapil म्हणाले...

बहुतेक पाहुणे कोकणातले, म्हणजे निदान ५ ते ६ वेळा चहा होणारच !

हे मस्तच. आमच्याकडे सुद्धा सगळे पाहुणे कोकणातलेच आणि पक्के चहाबाज! कार्याला जमले की चहाची धार खळावते, ती एकदम कार्य संपल्यावरच.
एखादी मोठी किटलीच भरुन ठेवतो आम्ही अश्यावेळी.
मला अगदी गावाकडे एखद्या कार्यात घेउन गेलात.

( ह्म्म्म बरेच दिवसांनी प्रसवलात!!)