शुक्रवार, ११ जुलै, २००८

लोकलमधले लोक !

लोकलमधले लोक !

रेल्वे स्थानकाच्या परीसरात किंवा लोकलमध्ये आपल्याला दिसतो कोणतीही ओळख नसलेला जमाव (मॉब) पण नीट निरीक्षण केल्यास त्यातल्या प्रत्येकाची वेगळी ओळख तुम्हाला दिसू लागते. ज्यांच्या डोक्यात लोकलचे वेळा-पत्रक नीट बसले आहे ते गाडी पकडताना कधीही धावपळ करणार नाहीत, नवखा माणूस मात्र गाडी स्थानकात उभी आहे एवढे बघूनच ती पकडण्यासाठी पळत सूटेल. तिकीट काढण्यासाठी सुद्धा गर्दी असतेच पण त्यातही अनुभवी लोकांना कोणती खिडकी कधी उघडणार , कोणती कधी बंद होणार, साधारण रांग बघून तिकीट मिळायला किती वेळ लागणार याचा अंदाज बांधता येतो. हल्ली तर कूपन आणि स्मार्ट कार्ड मुळे रांगेत उभ्या असणार्या माणसांची किवच करावीशी वाटते. ९ ते १२ डब्यांच्या गाडीत महीलांचा डबा कोणता, लगेजचा कोणता, फर्स्ट-क्लासचा कोठे येणार, घुडघुड्या डबा कोठे येणार याची रोजच्या माणसांना कल्पना असते. तसे यातही वर्षानुवर्ष रेल्वेने प्रवास करून सुद्धा गाडी आल्यावर तीच्या सोबत झुलणारेही असतातच म्हणा ! गाडी स्थानकात शिरताना 'उतरणार्या प्रवाशांना आधी उतरू द्या' ही घोषणा कोणीच गंभीरपणे घेत नाही. अनेकवेळा तर गाडी पूर्ण थांबायच्या आधीच भरते ! उतरणारी माणसे अंग चोरून बाजूला उभी राहतात, सगळे आत चढले की उतरतात ! हवेच्या दिशेच्या मोठ्या खिडक्या पहील्या भरतात, मग लहान खिडक्या, मग दूसर्या, मग तिसर्या, मग हवेच्या विरूद्ध दिशेच्या जागा, मग आठव्या मग चवथ्या व सर्वात शेवटी नवव्या सीट भरतात ! मग दोन सीटच्या मध्ये माणसे उभी राहू लागतात. ग्रूपने प्रवास करणार्यातला कोणी अपडाउन करत असतो किंवा आधी येउन, गाडी लागत असतानाच आत शिरून कोठे बॅग, कोठे रूमाल, कोठे पेपर तर कोठे पेन ठेउन आपल्या टोळीतल्या इतर सदस्यांसाठी जागा अडवून ठेवतो ! मग जसेजसे टोळके येत जाते, एकेक वस्तू उचलल्या जाउन त्या जागी माणसे स्थानापन्न होतात. गाडी सूटते व मग माणसे निरखण्याचा माझा अभ्यास चालू होतो.


कोणी आल्याआल्याच पेपर, कादंबरी, पोथी काढून वाचू लागतो, कोणी कागदावर जप लिहू लागतो, कोणी पेपर न आणलेला समोरच्याच्या पेपरची एखादी पुरवणी न विचारताच काढून घेउन वाचू लागतो, कोणी समोरच्याच्या उघड्या पेपरची उलट बाजू वाचू लागतो. कोणी भांडणे उरकून काढतो, मग अनेक रिकामटेकड्यांना हात साफ करायची संधी मिळते तर कोणाला दिलजमाई करायची संधी मिळते. बसलेल्या प्रवाशांच्या पायात उभ्या असलेल्या प्रवाशांची सम-दु:खी लोकांबरोबर पटकन मैत्री जमते व मग बसलेल्यांना टोमणे मारून हैराण केले जाते. ते ही कमी नसतात म्हणा, या रहायला पनवेलला किंवा करा अप-डाउन, आम्ही का तुम्हाला अडवले असे सुनावले जाते. हल्ली तर मोबाईल हा रेल्वे प्रवाशांचा मित्रच बनला आहे. मोबाईल वर गेम खेळणे, FM वर गाणी ऐकणे, आपल्या आवडीची गाणी ऐकणे किंवा तशी कोणती सोय नसेल तर विविध रिंग टोन्स ऐकत बसणे यात कसा वेळ जातो हेच कळत नाही. ( आता मात्र मोबाईलला स्पीकरची सोय झाल्यापासून मोबाईलखोरी हा नवाच उपद्रव जन्माला आला आहे ! तसे पत्ते कूटणार्या टोळक्यांनी व तारस्वरात भजने म्हणणार्यांनी प्रवाशांना बराच काळ दे माय धरणी ठाय करून सोडले होतेच !)खिडकीजवळ बसलेली माणसे झोपी जातात किंवा झोपेचे सोंग तरी घेतात, न जाणो कोणी ओळखीचा दिसला तर त्याला जागा द्यायला लागेल ना ! काहींना बसल्या जागी झोपायची कला अवगत असते तर काही शेजार्याचा खांदा हाच उशी समजतात. असे काही शेजारी मग अचानक खांदा काढून घेउन त्या झोपाळूची गंमत करतात तर काही सहन करतात. प्रत्येक स्टेशनागणिक गाडी दुधडी भरलेल्या नदीसारखी माणसांनी वाहू लागते, गर्दी असह्य होते मग माणसांचा खरा चेहरा समोर येउ लागतो. कधी पसरून बसून चवथ्या सीटवर बसलेल्याचे 'जळो जीणे लाजिरवाणे' करून टाकले जाते तर कधी तोच शिरजोर होउन खिडकीत बसलेल्याला पार जखडून टाकतो. त्यातही एखादा आडव्या सीटवर आठच माणसे बसल्याचे दाखवून, हक्काची नववी जागा पदरात पाडून घेतो. बहुतेक माणसांच्या हातात काहीतरी असतेच. कोणी ते आपल्याच मांडीवर घेउन बसतो, कोणी पायाशी ठेवतो , कोणी सीटखाली घालतो, कोणी ते रॅक वर ठेवतो, कोणी ते लांबूनच रॅक वर भिरकावतो, कोणी ते पास करत, खिडकीजवळ उभ्या असलेल्या माणसाकरवी रॅकवर ठेववतो. रोजच्या माणसांना बसलेल्यापैकी कोणाची विकेट कधी पडणार आहे हे माहीत असते त्याप्रमाणे त्यांनी पोझिशन घेतलेल्या असतात. खाणाखुणा करून ओळखीच्या माणसांना प्लेस केले जात असते. ज्याला आपले स्टेशन कधी येणार ते माहीत नसते तो आसपासच्या लोकांना 'अगला स्टेशन कौनसा' हे विचारत असतो, तसेच फलाट कोणत्या बाजूला येणार हा यक्ष प्रश्न असतोच !


हे कमी म्हणून की काय,नुसती भीक मागणारे , गाणी म्हणून भीक मागणारे ( त्यात पण फिल्मी गाणी म्हणणारे, भक्ती-गीते म्हणणारे, नुसतेच वाजविणारे, duet म्हणणारे , यात सुद्धा स्त्री-पुरूष किंवा दोन्ही पुरूष असे उप-प्रकार असतात ! कधी तर अख्खे कुटुंबच लोकांना रिझवण्यासाठी तत्पर असते. मग काय विचारता राव, बाप वाजवत / बडवत असतो, बायको गात असते, मोठी मुले सुर धरत असतात तर लहान मुले पब्लीक पुढे भीकेचा कटोरा फिरवत असतात ! धन्य तो सोहळा !) अंगातल्या शर्टाने फरशी पूसून भीक मागणारे, चित्र-विचित्र आवाज काढून नाना प्रकारच्या ( गीतेच्या पुस्तकापासून ते जडी-बुटी पर्यंत , या वस्तूंची यादी द्यायची म्हटली तरी काही scrap सहज भरतील !) वस्तू डेमो देउन विकणारे विक्रेते सीन अधिकच रंगतदार करत असतात. मध्येच केव्हातरी तृतीयपंथीय टाळी वाजवून हात पसरतात.


कशी असतात ही माणसे ? अर्धवट झोप झालेली, जीवाला वैतागलेली, प्रचंड काळजीत पडलेली, रॅक वर ठेवलेली बॅग आपल्याच कपाळावर पडणार या काळजीत असलेली ! कोणी माजोरडे, आपल्याच गुर्मीत असलेले, कोणी सर्वज्ञ, कोणी अडाणीपणाचे सोंग पांघरलेले, कोणी तिकीट नसल्यामुळे तिकीट तपासनीस चढत नाही ना या विवंचनेत असलेला, कोणी आपल्या सामानावर नजर ठेउन असलेला, कोणी एवढ्या गर्दीत आपल्याला उतरायला जमेल ना या काळजीत बुडालेला, कोणी आज पण आपल्याला उशीर होणार म्हणून धास्तावलेला, कोणी तोंडातल्या पानाची पिचकारी खिडकी बाहेर सोडून मोकळे होणारा, कोणी तंबाखूची गोळी दाढेखाली धरून निवांत बसलेला ! कोणी संधीसाधूपणे दोन सीटवर डोळे लावून बसलेला, चवथ्या सीटला बसलेला कोणी प्रत्येक गर्दीबरोबर रेटा वाढवून स्वत:साठी अधिक स्पेस करत असतो. क्रीकेट , चित्रपट, आणि राजकारण हे 'लोकल'करांचे अगदी आवडते विषय. त्यात आता TV वरील मालिकांची भर पडली आहे ! हे सगळे आपले लंगोटी यार असल्याप्रमाणे वा कधी काळी चवथ्या सीटवर बसणारे असल्याप्रमाणे त्यांचा एकेरी उल्लेख करीत , कधी उद्धार केला जातो तर कधी उदो-उदो ! कोण कसा चूकला, कोणी निवृत्त व्हायला पाहीजे, कोणती मॅच फिक्स झाली होती, कोणी कसा कोठे आणि किती पैसा कमावला याचा हिशोब सुद्धा अनेकांना पाठ असतो ! गंमत म्हणजे सरकारच्या कोणत्याच निर्णयाचे समर्थन कोणी केल्याचे मी निदान ट्रेन मध्ये तरी ऐकले नाही !हे सर्व enjoy करत माझा प्रवास कधी संपतो हेच मला कळत नाही. दिवसेगणिक माझ्या ज्ञानात मौलिक भरच पडत असते. रोज काही ना काही तरी घडत असतेच असते( अगदी happening !). अजून १८ वर्षानी मी निवृत्त होईन आणि या आनंदाला मुकेन ! काय बरे करावे ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: