शनिवार, २९ मे, २०१०

काही पटणेबल व्याख्या !

सिगारेट
तंबाखूची गोळी कागदाच्या गुंडाळलेली असते, जिच्या एका टोकाला आग असते तर दूसर्या टोकाला मूर्ख असतो !

लग्न
एक करार, ज्याने पुरूष आपली बॅचरल ही पदवी गमावतो तर स्त्री मास्टरी मिळविते.

व्याख्यान
माहिती देण्याची एक कला ज्यात व्याख्याता आपले म्हणणे विद्यार्थांच्या वहीत पाठवित असतो पण यात दोघांच्या मनाला मात्र अजिबात स्पर्श होत नाही !

परिषद
व्यक्तीगत गोंधळाचा सामुहिक गुणाकार.

तडजोड
केकची वाटणी करायची कला ज्यात सगळ्यांनाच आपल्यालाच मोठा तुकडा मिळाला असे वाटले पाहिजे.

अश्रू
जलशक्तीचे असे रूप ज्यात पुरूषी शक्ती बायकांच्या डोळ्यातुन वाहणार्या पाण्यापुढे शरणागती पत्करते.

शब्दकोश (डिक्शनरी )
अशी जागा जिकडे लग्नाआधीच घटस्फोट मिळतो.

परीषदेचे ठीकाण
अशी जागा जिकडे जमलेले सगळेच बोलत असतात, ऐकत कोणीच नसतो आणि शेवटी काहीच ठरत नाही.

उन्माद
अशी मनोवस्था ज्यात आपण असा अनुभव घेणार आहोत जो आपण आधी कधीही घेतला नसेल असे वाटणे.

धर्मग्रंथ
असे पुस्तक ज्याची सगळेच थोरवी गात असतात पण ते वाचलेले कोणीच नसते.


हास्य
ज्याने तोंड वाकडे करून अनेक गोष्टी सरळ करता येतात.

कार्यालय
घरच्या त्रासातुन विरंगुळा मिळण्याचे एक ठीकाण.

जांभई
लग्न झालेल्या पुरूषाला तोंड उघडण्यासाठी मिळणारा वेळ.

इत्यादी, इत्यादी.
आपल्या प्रत्यक्षात जेवढे समजते त्याहून जास्त समजते असे लोकांना वाटावे या साठी केलेला शब्दप्रयोग.

समिती
ज्यांना स्वतंत्रपणे काही करता येत नाही ती माणसे एकत्र बसून सुद्धा काही निर्णय होणार असे ठरविण्यासाठी एकत्र बसतात.

अनुभव
आपल्या चुकांना माणसाने दिलेले गोंडस नाव.

अणुबॉम्ब
असा शोध ज्याने आतापर्यंत लागलेल्या सर्व शोधांचा विनाश होणार आहे.

तत्ववेत्ता
असा मुर्ख जो मेल्यानंतर आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे म्हणून आयुष्यभर खस्ता खातो.

मुत्सुद्दी
जो तुम्हाला नरकात ढकलतो पण तुम्हाला मात्र आपण स्वर्गसफरीवर निघालो आहोत असे भासते.

संधीसाधू
असा माणूस जो अपघाताने पाण्यात पडला तरी आंघोळ उरकून घेतो.

आशावादी
असा माणूस जो आयफेल टॉवरवरून खाली पडत असताना सुद्धा मधल्या काळात “बघा, अजून मला काहीही झालेले नाही” असे म्हणत असतो.

निराशावादी
असा माणूस ज्याला झिरो मधला शेवटचा “O” दिसतो पण अपॉरच्युनिटी मधला पहिला “O” दिसत नाही.

कंजूष
असा माणूस जो श्रीमंतीत मरण्यासाठी आयुष्यभर गरीब राहतो.

बाप
निसर्गाने आपल्याला दिलेला अर्थपुरवठादार.

गुन्हेगार
पकडला जात नाही तो पर्यंत अगदी तुमच्या-आमच्यासारखाच असणारा इसम.

साहेब
असा माणूस जो तुम्ही कामावर उशीरा येता तेव्हा नेमका तुमच्या आधी हजर असतो आणि जेव्हा तुम्ही लवकर येता तेव्हा तो हटकून उशीरा येतो.

राजकारणी
जो निवडणुकीपुर्वी तुमच्या गळ्यात हात घालतो आणि निवडून आल्यावर त्याच हातानी तुमचा गळा दाबतो.

( मला आलेल्या एका इ-मेलचे भाषांतर ! )

शुक्रवार, २८ मे, २०१०

भाषावार प्रांतरचना आणि बाळासाहेब !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रकृती सुधारून परत सक्रीय होत आहेत ही चांगली बातमी आहे. १ मेच्या कार्यक्रमातली त्यांची उपस्थिती शिवसैनिकांना नवी उमेद देवून गेली असणार यात शंकाच नाही. बाळासाहेबांनी काही विधान केले की गदारोळ उडालाच पाहिजे व माध्यमांना पुढचे काही दिवस मथळा काय द्यायचा याची काळजी करावी लागत नाही. “अमरनाथ यात्रेला अडथळा आणाल तर हज यात्रा बंद पाडू” किंवा खलिस्तान प्रश्न पेटला असताना मुंबईत शीख समुदायावर बहिष्कार टाकण्याचे वक्तव्य चांगलीच गाजली होती. पण कधीतरी बाळासाहेबांचा बोलताना तोल सूटतो. यात बाळासाहेबांची गोची होतेच (अर्थात याने त्यांना काहीच फरक पडत नाही म्हणा ! ) पण मराठी भाषिक सुद्धा संभ्रमात पडतात. महाराष्ट्रात मराठीचे जे काही थोडेफार अस्तित्व आहे, अगदी फाटक्या कपड्यात का असेना, बाळासाहेबांमुळेच आहे हे नक्की ! पण याच बाळासाहेबांची अनेक वक्तव्ये आपल्याच तत्वाला हरताळ फासणारी असतात ! ,मराठीचा मुद्दा लोकांच्या पचनी पडत असतानाच अचानक सेनेने हिंदुत्वाची कास धरली व १.५० लाख झोपडट्टीवासियांना मोफत घरे देण्याची सवंग घोषणा करून १९९५ च्या निवडणुका जिंकल्या. मध्यमवर्गीय, कायदा पाळणारा मराठी माणूस घरासाठी घरघर करीत असतानाच कायदा धाब्यावर बसवून शहराला बकाल करणार्या युपी-बिहारींना सेनेने आपलेसे केले. संजय निरुपमला सेनेने मोठा केला व वेळ येताच त्याने सेनेला अंगठा दाखविला व युपी-बिहारींची टेंपररी वोट बँक काँग्रेसच्या दावणीला बांधली. दरम्यान ठाकरे घरातच भाउबंदकीचा प्रयोग रंगला व पुतण्या राज ठाकरे यांनीच सेनेचा सत्तेचा दोर यंदा कापला ! आता दोन भावांतच मराठीचे खरे कैवारी आपणच आहोत हे दाखविण्याची स्पर्धा लागली आहे.

खूप वर्षे आधी “माझी नातवंडे कॉनवेंट (इंग्रजी माध्यम नव्हे ! ) मध्ये शिकल्यामुळे स्मार्ट झाली आहेत “ असे उद्गार काढले होते. ( उद्धव यांचा मुलगा ज्या बॉम्बे स्कॉटीश हायस्कूलात शिकला त्या संस्थेने आपले नाव बदलायला ठाम नकार दिला आहे !) तेव्हा सुद्धा लोक चांगलेच संभ्रमात पडले होते. आजच्या पेपरात बाळासाहेबांनी जातवार जनगणनेला विरोध करतानाच “भाषावर प्रांतरचनेमुळे देशाचे वाटोळे झाले” असले परस्पर काहीही संबंध नसलेले विधान विधान केले आहे. मराठी भाषिकांचे वेगळे राज्य हवे ही मागणी फार जुनी होती. तसे भाषिक राज्याला काँग्रेसच्याच अनेक नेत्यांचा पाठींबा होता. फक्त आकसाने वेगळे मराठी भाषिक राज्य देण्यास मात्र नेहरू तयार नव्हते.. या साठी फार मोठी चळवळ झाली, अनेकांनी आपले रक्त सांडले, मराठी भाषिक राज्य हवे हा एककलमी कार्यक्रम घेवून काँग्रेस विरोधी पक्षांची एक मोठी ताकद उभी राहिली होती, निवडणुकित या आघाडीने चांगलाच हादरा दिल्यावर संयुक्त महाराष्ट्राचा जन्म झाला होता. तसे राज्य स्थापूनसुद्धा साठी उलटली. साठ वर्षाचा मराठी भाषिक राज्याचा ताळेबंद नक्कीच उत्साहवर्धक आहे. अनेक क्षेत्रात देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. दुर्दैवाने या विकासाचा लाभ मराठी माणसाला कमी मिळाला. हिंदुस्थानवर गझनीने केली नसतील एवढे भयंकर आक्रमणे पुढील काळात युपी-बिहारींनी महाराष्ट्रावर केली व महाराष्ट्राचे लचके तोडले, शहरे भकास व बकाल करून टाकली. देशाच्या इतर कोणत्याच राज्यात युपी-बिहारींना मोकळे रान मिळाले नाही, त्यातील अनेक राज्यात भाषिक अभिमान जागा असल्याने प्रादेशिक पक्षांची सरकारे आली. हिन्दीचा कोणत्याही प्रकारे मुलाहिजा या राज्यांनी राखला नाही ! आंध्रात तर रामारावांनी हिन्दी बातम्यांचे प्रसारणच बंद पाडले होते ! काँग्रजी मराठा नेत्यांनी मात्र महाराष्ट्राला दिल्लीची बटीग बनवून टाकले. मराठी माणसावर व भाषेवर केंद्र व राज्यातील काँग्रेस सरकार अन्याय करते, केंद्र सरकार आपल्या आस्थापनात मराठी भाषिकांना डावलते, दिल्लीत मराठी माणसाला मान नाही या मुद्द्यांवरच तर सेनेचा जन्म झाला. मराठी अस्मितेचा निखारा सेनेने सतत फूंकर मारून धगधगत ठेवला व त्याचा पुर्ण लाभ उठविला त्याच सेनेचा संस्थापक भाषावार प्रांतरचनेला ६० वर्षानी विरोध करतो आहे हे किती अजब ! असली बेछूट विधाने करून मिळते काय व गमावतो काय याचा बाळासाहेबांनी विचार करायची वेळ आली आहे. जर ते तसा करणार नसतील तर मराठी माणसाने तरी वेगळा विचार केला पाहिजे !

रविवार, २३ मे, २०१०

शिक्षणाच्या फीचा आयचा घो !

सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे लागणार असल्याने फी वाढीची मागणी संस्थाकडून होत आहे. म.टा.ने यावर ओपन हाउस भरविले आहे. महागाईचा भार सर्वानाच पेलावा लागणार आहे व फी वाढीची झळ सुद्धा सोसावी लागणार आहे. एखादी शिक्षण संस्था चालवायची म्हणजे नक्की किती खर्च येतो याचा अभ्यास आधी झाला पाहिजे. हा अभ्यास करताना काही किमान सोयी असणे बंधनकारक हवे. प्रत्येक शाळेला खेळाचे मैदान, मजबूत कुंपण, प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी, हवेशीर, नैसर्गिक प्रकाश असलेले वर्ग, सभागृह, वाचनालय, प्रयोगशाळा, जिमखाना या सोयी हव्याच. वर्गात भमरसाठ विद्यार्थी कोंबले जातात त्याला सुद्धा मर्यादा हवी. एका वर्गात ५० मुले असल्यास शिक्षकाला प्रभावी नियंत्रण ठेवता येईल. या सर्व सोयी पुरविण्यासाठी किती खर्च येतो याचा अभ्यास करून सरकारी अनुदान वजा करून त्यातला किती बोजा फी रूपाने वसूल करायचा याचे प्रमाण ठरवायला हवे. शाळेची पावती बघितल्यास प्रत्यक्ष फी नाममात्र दाखविली जाते व इतर उपक्रमांच्या नावाखाली पैसे उकळले जातात. शाळेत वाचनालय, जिमखाना, प्रयोगशाळा यातल्या काहीही सोयी नसताना त्या नावाखाली पैसे उकळले जातात. पालक सभेत आलेल्यांना चहासुद्धा न पाजणार्या शाळा त्याच्या आयोजनासाठी वेगळी फी वसूल करतात ! पालकसंघ नाममात्र असतो व सगळे अधिकार संस्थाचालकांच्या हाती एकवटलेले असतात.

संस्था मनमानी फी आकारतात हे जरी खरे असले तरे काही पालक सुद्धा कमी नसतात ! मुलांना महागड्या क्लासला घालणारे पालक शाळेत मात्र दर्जेदार शिक्षण नाममात्र पैशात मिळावे अशी अपेक्षा का व कशी बाळगतात ? खाजगी क्लासच्या महागड्या फीवरून पालक रस्त्यावर आल्याचे कधी कोणी वाचले आहे का ? सरकारने मात्र शिक्षण फूकट वा नाममात्र दरात द्यावे ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. घरात एसी बसविणारे पालक मुलाची शाळेची नाममात्र फी मात्र वर्षानुवर्षे थकवितात हे मी स्वत: अनुभवले आहे. आपण मागास जातीचे असल्याने आमच्या मुलांना मोफतच शिकविले पाहिजे अशी सुद्धा मागणी असते. सरकारी अनुदान न मिळणार्या शाळा जातीच्या आधारावर मोफत शिक्षण द्यायला बांधील कशा ठरतात ? सरकारने मुलींना फी माफी, सर्वाना मोफत पुस्तके अशा सवंग घोषणा करायच्या, त्या साठी संस्थाना दमडीसुद्धा द्यायची नाही हा काय प्रकार आहे ? बरे सरकार ज्या शाळांना अनुदान देते ते तरी वेळेत देते का ? चार-पाच वर्षे अनुदान तुंबल्यावर शिक्षकांचा पगार सुद्धा संस्था वेळेवर कशी देणार ? पालक फी भरत नाहीत, त्यांच्यावर कारवाई सुद्धा करता येत नाही, आहे ती फी वाढविता येत नाही , वर्ग वाढवायला सुद्धा परवानगी मिळत नाही, देणगी अधिकृतपणे घेता येत नाही, सरकार अनुदान देत नाही अशा कात्रीत प्रामाणिक संस्थाचालक सापडले आहेत. शिक्षण क्षेत्रातुन प्रामाणिकपणाच हद्दपार करण्याचे सरकारचे धोरण दिसते ! काही महिन्यापुर्वी कायमस्वरूपी विनाअनुदान तत्वावर चालणार्या शाळांना अनुदान देण्याचे सरकार दरबारी घाटत होते तेव्हा अशा तत्वावर चालणार्या शाळा चालविणार्या अनेक संस्थानी त्याला विरोध केला होता. भिक नको पण कुत्रे आवर !
शाळेचा खर्च भागविण्याचा फी व सरकारी अनुदान एवढाच मार्ग असतो का ? आजही अनेक संस्था शाळेचे मैदान, वर्ग, सभागृह भरमसाठ भाड्याने देतच असतात पण हा पैसा मात्र संस्थाचालकांच्या वा त्यांच्या गणगोतांच्या खिषात जात असतो ! ( दादरचे राजा शिवाजी विद्यालय शाळेचे सभागृह, मैदान भाड्याने देवून लाखाने पैसे मिळवते, यातुन मिळणार्या पैशातुन संस्था मुलांना अगदी फूकट सुद्धा शिकवू शकेल !) अमक्या दूकानातूनच गणवेष घेण्याची सक्ती केली जाते, वह्या-पुस्तके-मार्गदर्शक अवाजवी भावाने पालकांना घेणे भाग पाडले जाते, सहल काढताना सुद्धा भरमसाठ वर्गणी ठरवून पालकांची लूट केली जाते. शाळेची बससेवा संस्थाचालकांच्याच गणगोतांची असते व त्या मार्फत पालकांची लूट करून तक्रार केल्यास , बससेवा खाजगी आहे, तिचा शाळेशी काहीही संबंध नाही असा पवित्रा संस्थाचालक घेतात ! या सर्वच सेवा सहकारी तत्वाने वाजवी किमतीत पुरविल्यास पालकांवरचा आर्थिक बोजा कमी होईल व संस्थेला सुद्धा अधिकचे उत्पन्न मिळेल. संस्था चालक, शिक्षक, पालक व विद्यार्थी या सर्वाचा या सेवा देणार्या सहकारी समितीत समावेश केल्यास व्यवहार पारदर्शी होतील, सर्व घटकात जिव्हाळा, आत्मीयता निर्मांण होईलच पण मुलांना देखील लहान वयातच व्यवस्थापनाचे धडे मिळतील.

अजून एक उपाय आहे तो म्हणजे बिन-व्याजी ठेव योजनेचा. आजही संस्था देणगी म्हणून पालकांकडून हजार ते लाखभर रूपये सहज उकळतात. प्रवेश घेणार्या प्रत्येक पालकाकडून ५००० ते १०,००० रूपये बिनव्याजी ठेव म्हणून चेकने घ्यायचे व दहावीत शाळा सोडताना ते दाखल्याबरोबर चेकने परत करायचे. या मार्गाने शाळांना कोणताही बोजा न पडता काही लाख रूपये वापरायला मिळतील ! माझ्या माहितीप्रमाणे पार्ले टीळक शाळा हा उपक्रम खूप आधीपासूनच राबवित आहे. अनेक पालक शाळा सोडताना कृतज्ञपणे हे पैसे परत घेतही नाहीत ! या संस्थेची फी गेली अनेक वर्षे माफकच आहे.

ज्या शाळेने आपल्याला घडविले ती शाळा सोडणार्या विद्यार्थाने, कामाला लागल्यावर आपला पहिला पगार शाळेला देणगी म्हणून दिला तरी शाळांना प्रचंड आर्थिक बळ मिळेल ! आर्थिक दृष्ट्या मजबूत असलेली संस्था कोणाच्याही दबावाविना स्वायत्तपणे आपले कामकाज पार पाडू शकेल.

वरील सर्व उपायांच्या अंमलबजावणीसाठी शाळा चालकांना शिक्षणाविषयी तळमळ असणे व पालक-विद्यार्थ्यांना शाळेविषयी जिव्हाळा असणे गृहित धरले आहे ! आज नेमकी त्याचीच वानवा आहे. शिक्षण देणे हे व्रत राहिले नसून धंदा झाला आहे. शाळा काढणार म्हणून फूकट भूखंड घ्यायचा, सर्व सरकारी सवलती उपटायच्या, वीज, पाणी, फोनच्या वापराची बिले सुद्धा थकवायची ,शिक्षकांना अल्प पगारावर वेठबिगारासारखे राबवायचे, पगार द्यायचा एक व वाउचरवर दाखवायचा एक, प्रवेश देताना भरमसाठ देणग्या घ्यायच्या व कोणत्याही सबबीवर फी वाढवायची व बख्खळ फायदा कमवायचा ! समाजात शिक्षणमहर्षि म्हणून मिरवायचे पण यांचे खरे बिरूद सम्राटच आहे ! हे शिक्षण सम्राटच सरकार चालवित असल्याने शाळांनी फी वाढवून अधिक फायदा कमवायचा, सरकारने मारल्यासारखे करायचे व शाळाचालकांनी रडल्यासारखे करायचे व पालकांना मात्र खरोखरचे रडवायचे हा खेळ मात्र मस्त रंगला आहे ! या सर्वात शिक्षणाचा मात्र खेळखंडोबा होत आहे !

बुधवार, १२ मे, २०१०

विश्वनाथ आनंदच भारतरत्नचा सुयोग्य मानकरी !

विश्वनाथ आनंदने बुद्धीबळातील जगज्जेतेपद राखले व भारताची मान जगात उंचावली आहे. सचिनला भारतरत्न पुरस्कार देण्याच्या हालचालींना राजधानीत वेग आला आहे. सचिनला हा पुरस्कार मिळायलाच हवा पण विश्वनाथ आनंदचा सुद्धा या पुरस्कारावर सचिनएवढाच हक्क आहे, खरेतर आनंदला हा पुरस्कार सचिनच्या आधीच मिळायला हवा होता एवढी त्याची कामगिरी महान आहे. आनंदने बुद्धीबळाचे धडे गिरवले फिलिपाइन्समध्ये. त्या देशाने आनंदला आपले सन्माननीय नागरिकत्व आधीच बहाल केले आहे व त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सुद्धा बहाल केलेला आहे याची आठवण सुद्धा ठेवली पाहिजे.

क्रिकेटला भारतात लोकाश्रय, राजाश्रय दोन्ही आहे व त्यामुळेच पैसा सुद्धा उदंड आहे. बुद्धीबळाला पोषक वातावरण मात्र भारतात अजिबात नाही. मी सचिन होणार असे म्हणणारे लाखो असतील पण मी विश्वनाथ आनंद होणार असे म्हणणारे शोधूनही सापडणार नाहीत ! जगज्जेतेपद राखणार्या आनंदला ११ कोटीचा पुरस्कार मिळाला. ही रक्कम आयपीएल स्पर्धेत फक्त एक मौसम खेळून मिळणार्या पैशापेक्षा कमी असेल पण त्या जेतेपदाचे महत्व खूपच जास्त आहे. इन-मिन ८ देश क्रिकेट खेळतात व ते सुद्धा ब्रिटीशांचे गुलाम असलेले देश ! या उलट बुद्धीबळ खर्या अर्थाने जागतिक खेळ आहे व त्यातले विजेतेपद क्रिकेटच्या तथाकथित विश्वविजेपेपदापेक्षा अधिक गौरवास्पद आहे.

तेव्हा भारत सरकारने विश्वनाथ आनंदला विनाविलंब भारतरत्न प्रदान करावे व या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा बहुमान वाढवावा ही विनंती.

मंगळवार, ११ मे, २०१०

जबान संभालके !

काही क्षेत्रात वावरताना जिभेवर ताबा ठेवणे अपरीहार्य असते ! जेवढा माणूस उच्चपदस्थ तेवढे त्याने कमी बोलले पाहिजे आणि जे बोलले पाहिजे ते सुद्धा नेमके. बोलताना स्थळ-काळ-वेळ हे व्यवधान त्याने पाळलेच पाहिजे ! हे जमत नसेल तर थोबाड उघडू नये हेच चांगले ! राजीव गांधी पंतप्रधान असताना ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर गेले होते. तिकडे आदीवासी विभागात एक कार्यक्रम होता. भारतात आदिवासी व मागास हे शब्द लागूनच येतात तेव्हा राजीवनीपण “मागास आदिवासी” असा भाषणात उल्लेख करताच त्याची संतप्त प्रतिक्रीया तिथल्या मिडीयात उमटली व माफी मागावी लागली होती भारताला ! तोंड बंद ठेवणे हा सुद्धा एक दुर्मिळ गुणच आहे ! पण ज्यांना लायकी नसताना एखादे पद मिळालेले असते त्यांच्याकडून कसली अपेक्षा ठेवायची ?

PM raps blabbermouth Jayaram ! आज सकाळी पेपर चाळताना या मथळ्याने माझे लक्ष वेधून घेतले. सगळी बातमी वाचल्यावर blabbermouth ला मराठी शब्द काय बरे असावा हा प्रश्न पडला. सगळी बातमी वाचल्यावर तोंडाळ, वाचाळ, वावदूक, वाचावीर, बोलभांड असे शब्द आठवत गेले पण नेमका मराठी शब्द सापडला असे वाटत नव्हते. लोकल प्रवासात हाच एक विचार डोक्यात घोळत होता व भाषांतर ते भावांतर हा प्रवास किती खडतर आहे त्याची जाणीव झाली. “उचलली जीभ लावली टाळ्याला” या म्हणीने सुद्धा योग्य अर्थ धनित होत नव्हता. जीभ सैल सोडली, बरळला हे शब्दप्रयोग सुद्धा खटकत होते. जयराम या केंद्रीय मंत्र्याने नक्की काय केले होते ? एकतर त्यांचे खाते पर्यावरण, त्यांनी तोंडसुख घेतले भारताच्या गृहखात्याच्या धोरणावर व ते सुद्धा चीनमध्ये अधिकृत दौर्यावर असताना. या कृतीने भारताची जागतिक पातळीवर नाचक्की झाली व भारतात आल्यावर पंतप्रधानांनी त्यांची कानउघाडणी केली, खडसावले, फैलावर घेतले. ( अर्थात पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा स्वभाव बघता “हग्या दम दिला”, किंवा “थोबाड कोठे उचकायचे काही कळते का ?” किंवा “तोंड आहे की xx” – अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असणे शक्यच नाही ! असो ) जे बोलू नये ते जयराम बोलले, जिकडे बोलू नये तिकडे बोलले, विषय सोडून बोलले या सगळ्यांचा अर्थ इंग्रजी blabbermouth या शब्दात तरी येतो का ? वर्डवेब या इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे त्याचा अर्थ होतो “Someone who gossips indiscreetly”, तेव्हा या शब्दाचा वापरच इकडे चूकला आहे. या शब्दाला इंग्रजी समानार्थी शब्द आहेत talebearer, taleteller, tattletale आणि telltale. शेवटच्या शब्दाचा अर्थ आहे “Someone who reports another person's wrongdoings to someone in authority”. पर्यावरण खाते सांभाळणार्या जयराम यांनी गृहखात्याच्या धोरणावर बोल लावला पण तो आपल्या पंतप्रधानांकडे नाही तर चीमध्ये असताना चीनी अधिकार्यांसमोर, तेव्हा या शब्दाचे प्रयोजन सुद्धा योग्य नाही. काय बरे नेमका शब्द असावा या कृतीला ? मागचा पुढचा विचार न करता बकले म्हणून “उचलली जीभ लावली टाळ्याला”, वाचाळपणा केला, तोंडाचा पट्टा सोडला हे ठीक आहे पण यात काळ-वेळाचे भान सुद्धा पाळले नाही हे प्रतित होत नाही. आपला विषय नसताना टीपणी केली म्हणून नाक खुपसणे, भोचकपणा करणे, आगाउपणा करणे, चोंबडेपणा करणे, कागाळी करणे , अव्यापारेषु व्यापार हे ठीक आहे पण यात हे सर्व नको तिकडे, नको तेव्हा केले याचा बोध होत नाही ! मला वाटते बेछूट, बेलगाम वक्तव्य केले, ताळतंत्र सोडून बोलले ही शब्द रचना त्यातल्या त्यात ठीक वाटते !पुरे झाला हा शोध आता ! एखादा ताळतंत्र सोडून काही बोलला त्यासाठी मी तरी किती की-बोर्ड झिजवावा ?

रविवार, ९ मे, २०१०

दाद का हो चोरता ?

दुष्काळ हा तसा आपल्या पाचवीलाच पुजलेला असतो. वीजेचा , घरांचा, जीवनावश्यक वस्तुंचा, पाण्याचा, मासळीचा , लाच न खाणार्या नेत्यांचा व सरकारी नोकरांचा, न्यायाधीशांचा, चांगल्या कार्यक्रमांचा, चांगले साहित्य, याचा आणि त्याचा ! अकलेचा दुष्काळ सुद्धा सार्वत्रिकच आहे पण मला चिंता वाटते ती टाळ्यांच्या दुष्काळाची !

कानाचा पडदा फाटावा, सभागृहाचे छत खाली येते की काय असे वाटणारा टाळ्यांचा कडकडाट शेवटचा कधी ऐकला ते आता खरेच आठवत नाही ! नुसत्या टाळ्याच नाहीत तर त्याच्या जोडीला गडगडाटी हसणे, तोंडात बोटे घालून वाजविलेली सणसणीत शीळ (अशी शीळ वाजविता येणार्यांचा सुद्धा दुष्काळ आहे !), “वन्स मोअर” अशी दिलेली दिलखुलास दाद सुद्धा दुर्मिळ झाली आहे ! खूप खूप वर्षापुर्वी शाळा व महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन, गणपती उत्सव, राजकिय सभा, दिग्गज साहित्यीकांची भाषणे अशा ठीकाणी टाळ्या व हश्या यांचा महापूर असायचा ! एखादी गोष्ट थेट काळजाला भिडली की पब्लिक कोणतीही भीडभाड न बाळगता टाळ्यांचा कडकडाट करून दिलसे दाद द्यायचा ! संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील आठवणी बाबा आम्हाला सांगत तेव्हा त्यातली प्रत्येक व्यक्तीरेखा आमच्या समोर जिवंत उभी रहायची. अत्र्यांचे धिप्पाड व्यक्तीमत्व, त्यांच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी, त्यांच्या भाषणाला मिळणारी लोकांची उत्स्फुर्त दाद, सदोबा, यशवंतराव च”व्हाण”, ह.रा.महाजनी यांचा हराम असा उल्लेख, नरराक्षस मोर्या असा मोरारजींचा उल्लेख होताच पब्लिकचे पिसाळणे, शत्रूपक्षाच्या नावाने शिव्यांची लाखोली --- अगदी सगळे सगळे बाबा निव्वळ शब्दातुन आमच्या समोर उभे करीत ! या सर्वात कान फूटतील , आकाश खाली येते की काय असा टाळ्यांचा कडकडाट असायचाच ! त्यानंतर टाळ्या वसूल करणारे म्हणजे बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजनी, अटलजी ! लोकांचा टाळ्यांचा कडकडाट संपेपर्यंत वक्त्यांना थांबायला लागायचे एवढे लोक बेभान झालेले असत. मग बाळासाहेब म्हणायचे, “आता पुरे, ही काँग्रेसची सभा नाही !” नाटकातल्या कलाकारांची नावे वाचताना “…. आणि श्रीराम लागू वा काशिनाथ घाणेकर” असे कानावर पडायचा अवकाश, लोक नाट्यगृह डोक्यावर घेत ! पडद्यावर वा रंगमंचावर ज्यांच्या नुसत्या एंट्रीने टाळ्यांचा कडकडाट होत असे, असे दिग्गज कलाकार गेले तरी कोठे ? का बरे लोकांनी टाळ्या वाजविणे अगदी बंदच करून टाकले असावे ? टाळ्या वाजविणे हा प्रकारच संघात निषिद्ध आहे ! संघाच्या कार्यक्रमात, विशेषत: बौद्धिक चालू असताना टाळ्या वाजवायच्या नसतात अशी तंबी आधीच दिली जाते ! तसेही संघाचे बौद्धिक ऐकताना कोणी जागा राहू शकत असेल वा अगदी राहिलाच तर टाळ्या वाजवत असेल असे निदान मला तरी वाटत नाही. टाळ्या वाजविणे हा प्रकारच संघात निंदनीय आहे ! असो ! स्काउट - गाइडमध्ये टाळ्या वाजवायच्या असतात पण मोजून मापून व रीदम मध्ये ! एक-दोन-तिन, एक ---- दोन ---- तिन, एक-दोन-तिन अशा तालात !

फर्डे म्हणावे असे वक्ते काँग्रेसजवळ केव्हाच नव्हते ! नेहरू-गांधी परीवाराला पब्लिक पाहण्यासाठी गर्दी करायचे / करते, ऐकण्यासाठी केव्हाच नाही ! म्हणूनच सोनियाजी, प्रियांका व राहुल नुसते रोड शोच करतात ! गावातल्या सभेत गळ्यातले हार पब्लिकमध्ये भिरकावायचे, एखादे नागडे मुल उचलून चमकोगिरी करायची, एखाद्या झोपडीत शिरून शिळी भाकरी खायची की बास ! शहरात थोडी वेगळी ट्रीक, एटीमची रांग लावा, बेस्टने फिरा, प्रथमवर्गाच्या डब्यातुन साध्या वेषातल्या पोलिसांसह प्रवास ! जनता-पब्लिक खुष ! मतांचा पाउस व पुढची ५ वर्षे सत्तेच्या किल्ल्या ! पण तरीपण सभा तर लावाव्या लागतातच ना ? सभा म्हटली की पब्लिकसुद्धा हवेच ना ? नुसते पब्लिक नको, वक्त्यानी पॉज घेतला की टाळ्या सुद्धा वाजवायला हव्यात ना ? त्या शिवाय सभा यशस्वी झाली असे कसे म्हणणार ? यावर उपाय काय तर पैसे देवून गर्दी जमवायची , खुण झाली की टाळ्या वाजवायला पढवून ठेवायचे ! मग रोमनमध्ये लिहिलेले हिन्दी भाषण सोनियाजी वाचणार, मग मेरी सास मरी – टाळ्या, मेरा फति मरा – जोरदार टाळ्या व मै विधवा बनी असे वाचले की प्रचंड टाळ्या ! लोक पावसात भीजत असताना ही वाचणार “आप कडी धूप मे मुझे सुन रहे हो” लोक आपले मिळालेल्या पैशाला जागून टाळ्या वाजविणार ! आधी वक्ते आपल्या अमोघ वक्तृत्वाने टाळ्या वसूल करायचे आता पब्लिक टाळ्यांचे पैसे आधीच आयोजकांकडून वसूल करून ठेवते ! जे सभेत झाले तेच पडद्यावर , रंगमंचावर सुरू झाले. एखादा विनोदी कार्यक्रम बनवायचा, लोकांनी कोठे हसावे हे कळण्यासाठी त्यात लाफ्टर टाकून द्यायचा, लाफ्टर आहे म्हणजे आता आपण हसावे असे मग लोकांना निदान समजू तरी लागले ! मग छोट्या पडद्यावर लाइव लाफ शोचे खूळ आले ! या शोचे पितामह नवजोत सिद्धू व शेखर सुमनच एवढे खदाखदा हसतात की बघणार्याला यांचे डोके तर नाही ना फिरले अशी शंका येते ! मोले घातले रडाया हे ठीक आहे हो पण हसण्यासाठीचे मोल किती मिळत असेल या दुकलीला ? सारेगमपत पल्लवी जोशी पण प्रेशकांना वारंवार “टाळ्या वाजवा” असे विनवत असते. ( का दमात घेत असते ? ) पल्लवीला लाडे लाडे दाद मागण्यासाठी, अवधूत गुप्तेला बहुदा दाद देण्याचे नाटक करण्यासाठी पैसे मिळत असावेत, देवकी पंडीत सोबत झी ने केलेल्या करारात तसा क्लॉज नसावा बहुदा ! लोक सुद्धा पक्के बिलंदर ! आपल्यावर कॅमेरा रोखला गेला आहे असे वाटले तरच उगाच काहीतरी हात खाजविल्यासारखे करतात ! केव्हातरी पल्लवी “परत एकदा जोरदार टाळ्या हव्यात” असे सांगते तेव्हा मात्र मला जाम हसू येते ! अग बये आधी कधी टाळ्या वाजल्याच नव्हत्या तर आता परत कशा (आणि कशाला ) वाजतील ? कॅच पकडला तेव्हा जर तो कॅमेर्यात टीपला गेला नसेल तर रीप्लेत तरी तो कसा दिसणार ?

कार्यक्रमांचा दर्जा घसरला आहे म्हणून टाळ्यांची दाद मिळत नाही हे सुद्धा पुर्णपणे खरे नाही. आमच्या मुलांच्या शाळेचे स्नेहसंमेलन खरेच बहारदार असते. पटांगण अगदी तुडुंब भरलेले असते. दरवर्षी एक थीम घेवून कार्यक्रम केले जातात आणि ते सरसच असतात. पण आलेले रसिक पालक मात्र शोकसभेला बसल्यासारखे बसलेले असतात. जसे काही कार्यक्रम संपल्यावर शाळा फी डबल करणार आहे ! अर्धेअधिक लोक फूकट आहे म्हणून आलेले असतात, काही त्यांची मुले कार्यक्रमात असतात म्हणून तरी किंवा त्यांच्या पाल्याला एखादे बक्षिस मिळणार म्हणून आलेले असतात. अर्थात तेवढी इवेंट झाली की ते गुलच होतात ! माझ्यासारखा एखादा रसिक कार्यक्रम आवडला म्हणून बेहोश होवून टाळ्या वाजवू लागतो तेव्हा बायको कोपर ढोसते व डोळ्याने दटावून “पुरे आता” अशी खुन्नस देते, आसपासचे लोक याला काही मॅनर्स-बिनर्स आहेत की नाहीत का थोडी ढोसून आला आहे अशा नजरेने बघतात. लवंगी फटाके , ते सुद्धा ओले झालेले असल्यावर फूटताना जसा आवाज येते तसा टाळ्यांचा आवाज येतो व मग शांततेत पुढचा कार्येकम चालू होतो ! दाद देणे सुद्धा हल्ली मोजून मापून करावे लागते ! दिलखुलास दाद देणे म्हणजे अशिष्टपणा असा नवा संकेत रूढ झाला आहे ! हेच लोक छोट्या पडद्यावरची खोटी , घसीटी पसीटी ष्टोरी, पांचट विनोद, बटबटीत प्रसंग घराच्या चार भींतींत बघताना मात्र सुस्कारे सोडत असतात, अश्रू टीपून भिजलेला रूमाल व पदर वा ओढणी पिळत असतात वा खोटे खोटे हसत असतात ! लोकांची विनोदाची जाण कमी होत चालली आहे, काय चांगले व काय वाईट समजतच नाही , दर्जा म्हणजे काय याची व्याख्या सुद्धा बदलत चालली आहे. लोकांना फक्त कमरेखालचे इनोदच समजतात, शारिरीक विनोदाच्या पुढचा तरल विनोद इथे कोणाला कळतच नाही ! मध्यमवर्गीय कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमाला जातच नाही, तिकडे पैसे मोजूनच गर्दी जमवावी लागते. तिकिट काढून कार्यक्रम बघणारे, “आयला, आमचा वेळ व पैसा खर्च करून तुमच्या कार्यक्रमाची महागडी तिकिटे विकत घेवून आलो वर टाळ्या सुद्धा वाजवायच्या, दाद सुद्धा द्यायची ? बहोत नाइन्साफी है !” अशा तोर्यात कार्यक्रम बघतो. एखादी जाडी नटी पडद्यावर दिसली , कोणी घसरले, कोणाचे काही घसरले तरी लोक हसतात, शाब्दिक विनोदातले द्वयर्थी विनोदच लोकांना समजतात, चित्र-विचित्र अंगविक्षेप (किंवा तद्दन अश्लील हावभाव ) करणारा गोविंदा वा त्या कुवतीचा कलाकार महान अभिनेता गणला जातो ! मराठीत लक्ष्मीकांत बेर्डे स्टार होता व आता भरत जाधव वा मकरंद अनासपुरे. भरत जाधवला “गोरी गोरी पान” वर केलेला नाच अजून किती वर्षे पुरणार आहे व मकरंद अनासपुरेचा ग्रामीण बाज पब्किलला अजून किती वर्षे हसविणार आहे कोण ? मायबाप पब्लिकलाच माहीत ! दुरदर्शनमुळे घरातच दुरचे सर्व काही दिसू लागल्यामुळे सभा, कार्यक्रमांना सुद्धा कोणी जात नाही, गेले तर पुर्णवेळ थांबत नाही, थांबले तर टाळ्या वाजवायच्या फंदात कोणी पडत नाही. कार्यक्रम सुरू कधी होतो व संपतो कधी हेच समजत नाही !

कविवर्य बोरकरांनी दाद चोरणार्या पब्लिकला “सुर आम्ही का चोरतो ? मग दाद का हो चोरता ? अशा शब्दात फटकारले आहे. पण बोरकरांना जावून सुद्धा बरीच वर्षे झाली. तेव्हापासून भेडसावणारा टाळ्यांचा दुष्काळ आता अधिकच भीषण झाला आहे. माणूस नुसते घेत सूटला आहे पण देणे, दिलखुलास दाद देणे मात्र साफ विसरला आहे. जो तो कुढतो आहे आतल्या आत ! आता कोणी “भले शाब्बास “ म्हणून पाठीवर दणदणीत थाप सुद्धा घालत नाही, “दे टाळी” असे म्हणून कोणी पुढे हात केला तर त्याला साथच मिळत नाही. एका हाताने मग टाळी वाजणार तरी कशी ? “वन्स मोर” अशी फर्माइश सुद्धा कोणी करीत नाही आणि केली तर कलाकार ती पुर्ण करायच्या फंदात पडत नाही, त्याला एकदाच गायचे पैसे मिळालेले असतात ! हसरे चेहरे, दाद देणारे दर्दी आता दिसतच नाहीत. जो तो आपल्या चेहर्याची चौकोनी घडी व त्यावर चढवलेली मेक-अपची पुटे सांभाळण्यात दडलेला, मुखवटा व चेहरा आता एकच भासतो आहे. हल्ली फक्त हिजडेच टाळ्या वाजविताना दिसतात, म्हणूनच कदाचित टाळी कानावर पडली की दचकायलाच जास्त होते !

ता.क. कंटाळा आला असेल व भाषण बंद पाडायचे असेल तर टाळ्या वाजवायच्या असा नवा ट्रेंड सध्या आला आहे. बोलबचन अमिताभला पाहण्यासाठी व त्याचे भ्रष्ट “गर्जतो मराठी” ऐकण्यासाठी पुणेकरांनी याचा फारच प्रभावी वापर केला. सर्व सभासंकेत गुंडाळून अध्यक्ष, निमंत्रक अशा स्वकियांचीच भाषणे पुणेकरांनी टाळया वाजवून बंद पाडली ! धन्य जाहला असेल तो अमिताभ !

गुरुवार, ६ मे, २०१०

सजा ए मौत !

कसाबला, हा लेख लिहीपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावलेली नाही. “बाजारात तुरी आणि --- च्या “ चालीवर मिडीयाने कसाबच्या फाशीची अंमलबजावणी कशी / कधी होणार यावर रकानेच्या रकाने छापणे सुरू केले आहे. कसाबच्याही आधी फाशीची एकूण २६ प्रकरणे दया याचनेसाठी राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहेत. दया अर्जाची सगळ्यात जुनी याचिका ११९७ ची आहे. शेवटचा अर्ज २००७ चा आहे. म्हणजे ही २६ प्रकरणे कमाल १३ ते किमान ३ वर्षे प्रलंबित आहेत ! सरकारी काम नी दोन महिने थांब अशी म्हण आहे पण इकडे तर देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने निर्णय घेण्यात अनाकलनीय विलंब केला आहे. विरोधी पक्षांनी मध्ये अफझल गुरूच्या फाशी प्रकरणात सरकारला धारेवर धरले होते तेव्हा तत्कालिन गृहमंत्री शिवराज पाटलांनी “अफझलचे काय घेवून बसता राव ? अशी बरीच प्रकरणे पेंडींग असल्याचा खुलासा केला होता. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम अफझलच्या डेथ वारंटवर सही करू न शकल्याने बदमान झाले व त्यानंतर शिवसेनेच्या पाठींब्याने महाराष्ट्र कन्या प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला व मराठी राष्ट्रपती झाल्या. त्या आधी त्या गुजरात या मोदींच्या राज्याच्या राज्यपाल होत्या. गुजरात विधानभेने मंजूर केलेले धर्मांतरबंदी विधेयक व दहशतीला आळा घालण्यासाठी केलेला पोटा सारखा कायदा रोखून धरला ही त्यांची तेव्हाची कार्य तत्परता. अधिक गांधी घराण्याशी एकनिष्ठ म्हटल्यावर अजून काय हवे ? महाराष्ट्राच्या राजकारणात अडचण नको म्हणून गुजरातच्या राज्यपालपदी बसविलेली व्यक्ती मग चक्क राष्ट्रपती झाली ! अजूनही अफझलच्या अर्जावर त्यांना निर्णय घेता आलेला नाही.( मधल्या काळात त्यांचे चिरंजीव खासदार मात्र झाले.) राष्ट्रपतींना जाब विचारणारा कोणी आहे का ?

अफझल गुरूचे नाव चर्चेत असताना स्व. पंतप्रधान राजीव गांधीचे तिन्ही मारेकरी, ( मुरूगन, संथान, अरिवू, नलिनीला फाशीऐवजी जन्मठेप झाली आहे ) ज्यांना १९९१ मध्येच फाशी झालेली आहे त्यांचा दया अर्ज २००० सालापासून पेंडींग आहे ! माजी पंतप्रधानाच्या मारेकर्यांचा पब्लिकला विसर पडला असेल तर समजू शकते पण गांधी घरण्याचे काय ? स्व. राव पंतप्रधान असताना चाणक्याचे राजकारण खेळून गांधी घराण्याला त्यांनी सत्तेच्या परिघाबाहेर भिरकावून दिले होते. गांधी कुटुंबियांनी सत्तेतला स जरी काढला तरी बोफोर्स तोफा रोखून राव त्यांचा आवाज बंद करीत. सोनियांचे पत्र स्वीडनला देणार्या केंद्रीय मंत्री , बहुदा सोळंकी, यांना त्यांनी तडकाफडकी पदावरून बडतर्फ केले होते. सगळ्याकडून मुस्कटदाबी झाल्यावर अगतिक झालेल्या सोनियाजींनी अमेठीतील जाहिर सभेत आपल्याच सरकारवर तोंडसुख घेतले होते. माझ्या नवर्याच्या मारेकर्यांना अजून फाशी कशी होत नाही असा जाहिर सवाल त्यांनी सभेत केला होता. पुढे भाजप आघाडीचे सरकार आले, गेले, सोनिया काँग्रेस अधिक मजबुतीने दूसर्यांदा सत्तेत आलेली आहे , रबर स्टॅम म्हणावा असा “सांगकाम्या व हो नाम्या” राष्ट्रपति बसविला गेला आहे तरी राजीव गांधीचे मारेकरी फासावर चढलेले नाहीत ! आता तर त्याची आठवण सुद्धा कोणाला नाही, अगदी सोनिया व त्यांची मुले राहुल व प्रियांकाला सुद्धा नाही ! सगळे कुटुंबच सत्तेच्या नशेत चुर झाले आहे, बापाच्या मारेकर्यांना सजा देण्यात पण द्रविडी राजकारण खेळले जात आहे ! राजीवच्या मारेकर्यांना माफी द्यायचा गांधी घरण्याचा विचार आहे म्हणे ! त्या स्फोटात राजीव एकटेच मेले नव्हते, त्यांच्या अंगरक्षकांचे पथक सुद्धा त्यात मारले गेले होते, तेव्हा माफी देण्याचा एकाधिकार गांधी घराण्याला कोणी दिला ?

आता परत जरा रूळावर येतो ! भारतात फाशी अगदी अपवादात्मक प्रकरणात दिली जाते. अगदी सत्र न्यायालय ते दिल्लीतले सर्वोच्च न्यायालय , फाशी प्रकरणाचा अगदी किस पाडून मोठ्या नाइलाजाने फाशीवर शिक्कामोर्तब करते. या सहज ५ वर्षे मोडतात. हा सगळा सव्यापसव्य पार पडल्यावर मूळात राष्ट्रपतींना दयाधिकार देणेच लोकशाहीला मारक आहे. बरे एक विशेषाधिकार म्हणून हे मान्य केले तरी त्याला काही कालमर्यादा आखून दिलीच पाहिजे. साधारण ३ महिन्यांत दया अर्जावर निर्णय झाला नाही तर राष्ट्रपतींना या प्रकरणात दया द्यायची नाही असे गृहित धरून फाशीची अंमलबजावणी झाली पाहिजे. दया द्यायची असल्यास कोणत्या मुद्द्यांचा विचार करून दया दाखविली हे लेखी नमूद करणे सुद्धा बंधनकारक असावे. लागू हत्याकांड प्रकरणात फाशी झालेल्याला राष्ट्रपतींनी माफी दिली होती, सुशीलकुमार शिंदे काही काळ आंध्रचे राज्यपाल होते, तेव्हा एका प्रकरणात त्यांनी दिलेल्या माफीवर बराच गदारोळ झाला होता. अशा वेळी जाब विचारणार्यांची तोंडे विशेषाधिकाराची ढाल पुढे करीत “मेरी मर्जी” थाटात बंद केली जातात हे लोकशाहीला मारक आहे.

याच लेखाच्या निमित्ताने प्रशासन व न्यायालय सुद्धा आपल्या कायदा व सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे काढतात हे बघण्यासारखे आहे. न्यायमुर्तींना गुन्हा करणार्यांचा एवढा पुळका का बरे येतो ? खरे तर योजना आखून केलेल्या प्रत्येक खुनाला फाशीच हवी, नको तिकडे मानवता कशाला ? न्यायालयात न्याय मिळणार नसेल तर खून झालेल्या व्यक्तीच्या भूताने न्याय करायचा का ? का त्यांच्या नातलगांनी कायदा हाती घ्यायचा ? सगळ्यात कहर झाला होता तो पुण्यातील जोशी-अभ्यंकर हत्याकांडात. सर्व प्रकारचा अवलंब करून दोषी व्यक्तींनी सहा वर्षे काढली. मग त्यातल्या एकाने कुराणाचे भाषांतर करतो आहे या सबबीवर माफी मागितली होती ! मग खूपच विलंब झाल्याने मनस्ताप झाला तेव्हा सोडा असा अर्ज केला होता. सगळ्यात कहर म्हणजे गळ्याभोवती दोर आवळून सर्व खून करणार्या नराधमांनी फाशी देवून मारणे अमानुष असल्याचा दावा केला होता, दोर म्हणे मानेला खुपतो ! न्यायमुर्तीना सुद्धा दया आली व परत त्यांची फाशी लांबली होती. खरेतर दोरखंड गळ्याभोवती आवळून मारणे सर्वात कमी त्रासदायक असल्याचा निर्वाळा आधीच एका प्रकरणात दिला गेला होता मग या अर्जाची दखल घ्यायची गरजच काय होती ? शेवटी पुण्यातले लोक रस्त्यावर आल्यावर, त्यात पुल सुद्धा होते, एकदाचे त्या चौकडीला फासावर लटकावले गेले !

ब्रिटीशांनी एकाही शस्त्र हाती घेतलेल्या क्रांतिकारकाला जिवंत ठेवले नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे ! या उलट स्वतंत्र भारतात एकाही खलिस्तानवाद्याला (अपवाद जनरल वैद्य यांच्या मारेकर्यांचा ), एकाही काश्मिरी अतिरेक्याला (अपवाद मकबुल भटचा ), एकाही मावोवाद्याला , मिझो वा नागा अतिरेक्याला फासावर चढवले गेले नाही. सार्वत्रिक माफी मात्र दिली गेली ! अशाने देश द्रोह्यांना जरब बसणार तरी कशी ? अमेरिका पाताळात दडून बसलेल्या सद्दामला खेचून आणते व न्यायाचे नाटक वठवून तिन महिन्यात फासावर चढवते, याला म्हणतात महासत्ता ! आपला महान भारत काय करतो ? अतिरेक्यांना बिर्याणी खायला घालून पोसतो व पुढे एखाद्या विमान अपहरणात वा कोणा रूबियाच्या अपहरणात त्यांची गुढगे टेकून सूटका करतो ! कसा मिळेल जगात तुम्हाला मान व प्रतिष्ठा ? काही वर्षापुर्वी बंगाल मध्ये विमानातुन शस्त्रे टाकली गेली होती, पुरूलिया प्रकरण ! त्यातल्या परदेशी वैमानिकाला , त्या देशाशी संबंध सुधारावेत म्हणून हल्लीच माफी देण्यात आली ! हे असले आपले राज्यकर्ते !

बहुदा हा विलंब असह्य होवून फाशीची सजा झालेले स्वत:हुन गळ्यात दोर टाकून “भारतीय न्याय संस्था चिरायू होवो” अशी घोषणा देत मरतील अशी आशा राष्ट्रपतींना वाटत असावी ! म्हणजे आपल्या कपाळी हत्येचे पातक नको, सुंठीवाचून खोकला जावा हीच इच्छा असणार ताईंची !

मेरा भारत महान !

मंगळवार, ४ मे, २०१०

अक्षर न लगे मजला !

अगदी पहिल्या यत्त्तेपासून मला वाटायचे की मराठीत आपल्याला मिळणारे मार्क आपल्यातल्या गुणवत्तेला न्याय देणारे नाहीत ! अर्थात बाईंना तसे सांगायची हिंमत मात्र चवथीत आली. मला उत्तर देवून माझा गैरसमज दूर करावा असे बाईंना सातवीत वाटले. सातवीत जेव्हा मी मराठीच्या बाईंना मला मराठीत कधीही पन्नासच्या वर मार्क तुम्ही का देत नाही असे कळकळून विचारल्यावर बाईंनी एकदाचे मौन सोडले. बाईंच्या मते गाळलेल्या जागा भरणे, जोड्या लावणे, चूक की बरोबर, एका वाक्यात उत्तर देणे यात तुला पैकीच्या पैकी मार्क मिळतात म्हणून तू पास तरी होतोस पण तुझा उर्वरीत पेपर, निबंध, पत्रलेखन, सारांश लेखन , टीपा, मोठी उत्तरे हे वाचायचे सुद्धा मी कष्ट घेत नाही, इतके तुझे हस्ताक्षर गचाळ आहे. हस्ताक्षर हा शब्द सुद्धा तुझ्या अक्षराच्या बाबतीत वापरणे चूकीचे आहे. तू लिहिलेले वाचणे मानवी सहनशक्तीच्या बाहेरचे आहे. दहावीत तू मराठीत नापास झालास तरी मला आश्चर्य वाटणार नाही !

माझे अक्षर अगदी सुवाच्य नाही हे मलाही मान्य आहे पण “कोंबडीचे पाय” म्हणावे इतके खराब सुद्धा नाही. आपण एवढे मर मर लिहायचे आणि बाई ते वाचायचे सुद्धा कष्ट घेत नाहीत म्हणजे काय ? निबंध लेखन स्पर्धेत मला कधीही बक्षिस का मिळत नाही याचे कोडे सुद्धा मग आपसूकच उलगडले. तसे सावकाश मन लावून लिहिले की मी सुद्धा मोती पाडू शकतो पण विचारांचा फ्लो एवढा जबरदस्त असतो की हाताच्या वेगाशी मग त्याचा ताल जुळत नाही व लिंक तुटते व लिहिण्याचा आधीच कमी असलेला उत्साह पार मावळतो. माझ्या वडीलांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे व त्याला मोडीचे वळण आहे. दोन्ही बहिणींची सुद्धा अक्षरे सुंदर आहेत. भावाचे अक्षर “कोंबडीचे पाय” सुद्धा लाजतील एवढे गचाळ आहे पण लेखनकामाठी करण्याच्या फंदात तो कधी पडलाच नाही त्यामुळे त्याचे कोंबडे झाकलेलेच राहिले. वडील आणि बहीणींच्या अक्षराशी तुलना सतत होत राहिल्याने त्या तुलनेत माझे अक्षर गचाळ आहे असे जनमत तयार झाले. तसे बाबांनी त्यांच्यापरीने खूप प्रयत्न केले. अगदी बोरू धरण्यापासून आम्हा दोघा भावांना सुलेखनाचे धडे दिले. गचाळ अक्षर असलेल्या भावाला त्या वर्षी चक्क हस्ताक्षर स्पर्धेत पहिले बक्षिस सुद्धा मिळाले पण तो पावेतो मी सुधारण्याच्या पलिकडे गेलेलो होतो. म.गांधीचे अक्षर खराब होते असे कळल्यावर मी सुद्धा माझे अक्षर खराब असल्याचे मान्य केले. पुढे अजून चार बुके वाचल्यावर डॉक्टरांची अक्षरे सुद्धा गचाळ असतात व ती फक्त कंपाउंडरच वाचू शकतात अशी मौलिक माहिती मिळाली. मग पुढे लेखन बंदच केले व नुसते वाचतच सूटलो. अर्थात वाचल्यावर लिहायची उर्मी यायचीच पण ती कोणी वाचणारच नसल्यामुळे दाबून टाकावी लागायची.

जुन्या काळी निव्वळ अक्षर चांगले म्हणून अनेकांना नोकर्या लागलेल्या आहेत. अर्थात चांगल्या अक्षराची कदर अजून सुद्धा होतेच होते. अनेक नामांकित कंपन्या नोकरीसाठीचे अर्ज स्वहस्ताक्षरातच भरायला सांगतात. अक्षरावरून माणसाची पारख करणारे शास्त्र सुद्धा चांगलेच विकसित झाले आहे. निव्वळ अक्षर चांगले म्हणून माणूस चांगला असेल असेच काही नाही पण सुंदर अक्षर हा नक्कीच चांगला गुण आहे.त्यात ते शुद्ध असेल तर अजूनच चांगले. जुन्या काळी अक्षरे धूळ पाटीवर गिरवून, घोटवून घेत तेव्हा सगळ्यांच्याच अक्षराचे वळण चांगले असायचे. बोरू जावून फाउंटन पेन आली तरी सुद्धा यात फारसा फरक पडला नाही. सगळ्यांच्या अक्षराचे वाटोळे करण्याला जबाबदार जर कोण असेल तर बॉल-पेन वा हल्लीचे जेल पेन ! बोरू, पेन विशिष्ट कोनात पकडूनच लिहिता यायचे त्या मुळे अक्षराला आपसूकच एक डौल मिळायचा. बॉल-पेन वा जेलपेन कसेही धरले तरे खरडता येते व यामुळेच अक्षरांचा डौल संपला तो संपलाच ! बॉलपेनने झरझर लिहिता येते व पेनाने जलद लिहिता येत नाही त्यात नीप तुटणे, ऐनवेळी शाई संपणे, डाग पडणे या त्याच्या अवगुणांमुळे ते पब्लिकच्या मनातुन पार उतरले. सध्या बॉलपेन व जेलपेनचा उदो उदो होतो आहे पण सांगून खरे वाटणार नाही पण भारतात कोणे एके काळी बॉलपेनने चेक लिहिण्यास बंदी होती ! पुढे तंत्रात सुधारण होत गेली, बॉलपेनने नीट लिहिता येवू लागले तेव्हा मध्यवर्ती बँकेने खास पत्रक काढून बॉल-पेन वापरायची मुभा जनतेला दिली होती. हल्ली मात्र सही करण्यासाठी फाउंटन पेनच वापरायची क्रेझ आहे ! फाउंटन पेन वापरणे प्रतिष्ठीतपणाचे समजले जाउ लागले आहे. कालाय तस्मै नम: !

मुलांना चांगले वळण लागावे म्हणून निदान चवथीपर्यंत तरी बॉलपेन वर बंदी असायची, रोज निदान पाच ओळी शुद्धलेखन लिहायची सक्ती होती, मुख्य म्हणजे यच्चयावत शिक्षकांची अक्षरे मोत्यासारखी टपोरी असायची व काळ्या फळ्यावर ती बघताना मोत्यांची लड बघतो आहोत असेच वाटायचे. फळ्यावरची अशी अक्षरे पुसताना सुद्धा डस्टर धरलेला हात लयीत फिरायचा. हल्लीच्या शैक्षणिक धोरणात सुवाच्य अक्षर हा प्रकार ऑप्शनलाच टाकलेला दिसतो ! संगणक युगात त्याचे महत्व सुद्धा उरले नाही हे सुद्धा खरेच आहे. संगणकावर सुद्धा झोकदार वळण असलेले अनेक फॉण्ट उपलब्ध आहेत व ते वापरून लिहायला, वाचायला मजा येते. अर्थात शुद्धलेखन म्हणजे नुसते अक्षर वळणदार असून चालत नाही, व्याकरणाच्या दृष्टीने सुद्धा ते निर्दोष असावे लागते त्या बाबतीच मात्र अजून आनंदी आनंदच आहे. मराठी स्पेलचेकर अजून बाल्यावस्थेतच आहे. आजकाल हाती लिहिलेले काही वाचनी पडतच नाही. संगणकामुळे सगळ्यांची अक्षरे कशी एक टाकी, सुरेख झाली आहेत ! तंत्रामुळे खराब अक्षर आता शोधूनही सापडणार नाही. सुवाच्य अक्षरात लिहिलेले पत्र, तसे पत्रही कोण लिहिते म्हणा हल्ली, पण जेव्हा कधी नजरेस पडते तेव्हा मात्र तो अक्षरांचा डौल डोळ्यात साठवून घ्यावा असेच वाटते.

संगणकाशी माझी पहिली तोंडओळख झाली १९९२ साली. संगणकावर मराठीत लिहीण्यासाठी सर्वप्रथम मी किरण फॉण्ट वापरला २००० साली व पुरता किरणमय झालो. संपादकांना पाठवायची पत्रे मी किरणमध्ये टायपून पाठवू लागलो व ती छापून सुद्धा येउ लागली. तेव्हा मी अनेकांना किरणचे धडे दिलेले आहेत. एकदा एका मित्राचे मला मराठीत इमेल आले व मी थक्कच झालो. कसे बरे असे लिहिता येते ? किरणमध्ये लिहिलेले पत्र जर इमेलने पाठविले तर वाचणार्याला निव्वळ चौकोनच बघायला मिळतात. मग युनिकोडची भानगड समजली. मग “मराठी लिहा” या युटीलिटीचा वापर करू लागलो. ब्लॉगचा सुरवातीचा भाग असाच लिहिला आहे पण मग माहिती मिळाली बरहाची व या पेक्षा भारी काही असेल असे वाटत नाही. बरहामधली मराठी अक्षरे एवढी डौलदार नाहीत हे खरे असले तरी वापरायला याहून सोपे दूसरे काहीही नाही.

ज्याचा मराठी पेपर खराब अक्षरामुळे कधी पुर्ण वाचला सुद्धा गेला नाही त्याचा मायाजालातला ब्लॉग मात्र ११,००० पेक्षा जास्त लोकांनी वाचला या पेक्षा आनंद देणारे दूसरे काहीही नाही. खराब अक्षर म्हणून कोणी वाचत नाही व वाचत नाही तर लिहायचे कशाला , बसा कुढत , या गर्तेतुन बाहेर पडायला मराठी टंकलेखनाची ज्यांनी मला वाट दाखविली त्या सर्वांचे या निमित्ताने मन:पुर्वक आभार ! आपणा सर्वाचा लोभ असाच वाढत रहावा हीच प्रार्थना !

शनिवार, १ मे, २०१०

असा साकारला संयुक्त महाराष्ट्र !

आज आपण मुंबईसह स्थापन झालेल्या आपल्या मराठी भाषिक महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत. १मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तरी त्याची बीजे अगदी १९०६ पासून रोपली गेली होती. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील महत्वाचे टप्पे -

v १९०६ मधेच लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्र राज्याची संकल्पना मांडली होती

v १९१९ मध्ये लोकमान्य टिळकांनीच कॉंग्रेसच्या जहिरनाम्यात सुद्धा महाराष्ट्र राज्याची मागणी केली होती.

v १ ऑक्टोबर १९३८ मध्ये मध्य प्रांताच्या विधान परीषदेने मुंबई राज्यापासून विदर्भ वेगळा करण्याचा ठराव पास केला होता.

v याच वर्षी १५ ऑक्टोबर रोजी, स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या साहित्य संमेलनात विदर्भासह वेगळ्या मराठी भाषिक राज्याचा ठराव पास झाला होता.

v २८ जानेवारी १९४० मुंबईत स्थापन झालेल्या संयुक्त महासभेने साहित्य संमेलनात पास झालेल्या ठरावाचा पाठपुरावा केला होता.

v १९४० ते १९४५, दूसरे महायुद्ध व “चले जाव” चळवळ जोरात असल्याने संयुक्त महाराष्ट्राचा लढा मागे पडला होता.

v १२ मे १९४६ रोजी बेळगाव येथे भरलेल्या साहित्य संमेलनात, माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली परत एकदा संयुक्त महाराष्ट्राचा ठराव संमत झाला व सर्वश्री माडखोलकर, पोतदार, शंकरराव देव, केशवराव जेधे आणि नवरे यांच्या समितीवर ठरावाची अंमलबजावणी करण्याचे काम सोपविले गेले.

v २८ जुलै १९४६ – याच समितीने महाराष्ट्र एकिकरण परिषदेचे गठन केले. याचे आयोजक होते स.का. पाटील आणि अध्यक्ष होते शंकरराव देव. आचार्य दादा धर्माधिकारी यांनी मांडलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या ठरावाला, विविध भागातुन आलेल्या २०० प्रतिनिधींनी पाठींबा जाहीर केला.

v डिसेंबर १९४६ मध्ये भाषावर प्रांतरचनेला पाठींबा असलेल्या लोकांची दिल्लीत एक बैठक झाली , तिचे नेतृत्व केले होते पट्टाभि सीतारामय्या यांनी.

v १३ एप्रिल १९४६ रोजी “संयुक्त महाराष्ट्र एकिकरण परीषदेने जळगावात एक अधिवेशन भरवले होते.

v ऑगस्ट १९४७ मध्ये शंकरराव देव आणि माधव अणे यांच्यात झालेल्या अकोला करारानुसार “महाराष्ट्र एकिकरण परिषदेने” महा विदर्भ, मराठवाडा, मुंबई आणि महाराष्ट्रासह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी करण्याचे ठरले.

v १७ जुलै १९४८ रोजी केंद्र सरकारने श्री. धर यांच्या अध्यक्षतेखाली वेगळ्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ व कर्नाटक या राज्यांच्या स्थापनेच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी घटनात्मक समितीची स्थापना केली.

v १० डिसेंबर १९४८ मध्ये धर समितीने आपला अहवाल सादर केला व भाषेच्या आधारावर केली जाणारी वेगळ्या राज्यांची मागणी राष्ट्रविरोधी असल्याचे सांगून साफ फेटाळली.

v डिसेबर १९४८ रोजी जयपुर अधिवेशनात काँग्रेसने भाषावर राज्य रचनेला तत्वत: मान्यता दिली व नेहरू, पटेल व सितारामय्या यांची समिती धोरणाचा फेरविचार करण्यास नेमली.

v ऑक्टोबर १९५३ मध्ये वेगळ्या आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली.

v ४ नोव्हेंबर १९५३ रोजी शंकरराव देव यांनी नेहरूंना पत्र लिहून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्याची मागणी केली.

v २९ डिसेंबर १९५३ रोजी केंद्र सरकारने फाझल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य फेर-रचना आयोगाची स्थापना केली.

v ऑगस्ट १९५४ मध्ये नागपुर, चांदा, अकोला, अमरावती, पुणे आणि मुंबईचा दौरा करून फाजल अली यांनी आपला अहवाल सादर केला.

v १९ ऑक्टोबर १९५५ ला अहवाल जाहीर करण्यात आला. त्यात बॉम्बे व विदर्भ या दोन राज्यांच्या स्थापनेची शिफारस केली होती. बॉम्बे राज्यात दोन विभाग असतील, गुजरात विभागात कच्छ व सौराष्ट्र तर महाराष्ट्र विभागात मराठवाडा. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने हा अहवाल फेटाळला.

v १९ ऑक्टोबर १९५५ रोजी नेहरूंनी पुढाकार घेवून ३ राज्यांच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला. विदर्भ व मराठवाडा यांचा समावेष असलेला संयुक्त महाराष्ट्र, कच्छ, सौराष्ट्रसह महागुजरात व बॉम्बे. तथापि धनंजयराव गाडगीळ व शंकरराव देव यांनी मात्र मराठवाठा, विदर्भ, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आणि कच्छ, सौराष्ट्र असलेला महागुजरात अशी दोनच राज्यांची मागणी केली.

v ८ नोव्हेंबर १९५५ रोजी काँग्रेस कार्यकारीणीने नेहरूंनी प्रस्तावित केलेला त्रैभाषिकाचा ठराव संमत केला.

v १८ नोव्हेंबर १९५५ रोजी डाव्या पक्षांनी मुंबई बंद पाळला.

v २० नोव्हेंबर १९५५ रोजी मोरारजी देसाई व स.का. पाटलांनी गिरगाव चौपाटीवर सभा घेवून संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणार्यांना आवाहन दिले.

v २१ नोव्हेंबर रोजी डाव्या पक्षांनी विधानभवनावर मोर्चा काढला. फ्लोरा फाउंटन ( सध्याचे हुतात्मा स्मारक ) जवळ पोलिसांनी मोर्चा अडवायचा प्रयत्न करताच दगडफेक झाली व पोलिसी गोळीबारात १५ लोक हुतात्मा झाले तर २०० जण जखमी झाले. मोर्चाचे वार्तांकन करीत असलेला जन्मभूमि या गुजराती वर्तमानपत्राचा पत्रकार चिमणभाई शेठ या वेळी मारला गेला.

v नोव्हेंबर १९५५ मध्ये बिगर काँग्रेसी पक्षांनी “संयुक्त महाराष्ट्र समिती”ची पुण्यात स्थापना केली.

v १ डिसेंबर १९५५ रोजी यशवंतराव चव्हाण यांनी नेहरू की संयुक्त महाराष्ट्र असा प्रश्न असेल तर आपण नेहरूंचीच साथ करू असे जाहीर केले.

v १६ जानेवारी १९५६ रोजी नेहरूंनी बॉम्बे केंद्रशासित प्रदेश जाहीर करताच त्याच्या विरोधात हिंसक चळवळ उभी राहीली.

v २२ जानेवारी १९५६ रोजी केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या चिंतामणराव देशमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व नेहरूच्या मनात महाराष्ट्राविषयी आकस असल्याचा आरोप केला.

v ३ जुन १९५६ रोजी नेहरूंनी बॉम्बे पुढील ५ वर्षे केंद्रशासित प्रदेश राहिल असे जाहीर केले तसेच ती महाराष्ट्राची राजधानी असणार नाही असे सांगत तिन्ही राज्यांसाठी उच्च न्यायालय तसेच लोक सेवा आयोगाची घोषणा केली.

v ऑगस्ट १९५६ मध्ये लोकसभेने ठराव पास करून बॉम्बे या महा-द्वैभाषिकाची स्थापना केली. याच राज्यात संयुक्त महाराष्ट्र व महा-गुजरातचा समावेश केला गेला.

v नोव्हेंबर १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने सत्याग्रहाचे रणशिंग फुंकले.

v २८ मार्च १९६० रोजी बॉम्बे या महा-द्वैभाषिकाचे विभाजन करणारा प्रस्ताव मांडला गेला व २१ एप्रिल १९६० ला त्याला मान्यता मिळाली.

v १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

काही ठळक नोंदी -

Ø शिव सेनेची संकल्पना आचार्य अत्रे यांनी १९६० मध्येच मांडली होती. अशा संघटनेमार्फत तरूणांना एकत्र करून संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालवायचा त्यांचा मानस होता. बाळासाहेबांनी १९६६ मध्ये स्थापन केलेल्या राजकिय पक्षाचे नामकरण प्रबोधनकारांनी शिवसेना असेच केले.

Ø महाराष्ट्र राज्याची स्थापना १ एप्रिल १९६० रोजीच होणार होती, कामगार नेते श्रीपाद अमृत डांगे यांना मात्र १ मे हा जागतिक कामगार दिन असल्याने त्याच दिवशी स्थापना व्हावी असे वाटत होते. तसेच या लढ्यात कामगार वर्गच अग्रणी होता. पुढे नेहरूंची भेट झाल्यावर जगात १ एप्रिल हा मुर्खांचा दिवस म्हणून ओळखला जातो तेव्हा आम्हाला मुर्ख बनवायचा तुमचा विचार आहे का ? असे हसत हसत विचारल्यावर नेहरूंनी खिलाडूपणे १ मे हा दिवस निश्चित केला.

Ø मोरारजी व स.का पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्राला विरोध करण्यासाठी गिरगाव चौपाटीवर सभा घेतली होती. या सभेत सका पाटलांनी ५००० वर्षेच काय . आकाशात चंद्र सुर्य आहेत तोवर महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही असे फुत्कार काढले होते. अर्थात अशी गरळ ओकताच सभेला जमलेल्या गिरणी कामगारांनी त्यांच्यावर दगडांचा वर्षाव केला व त्यांना पळवून लावले. सभा उधळली ! चौपाटीच्या वाळूत दगड कसे आले हे आधी पोलिसांना उमजेना, मग कळले की कामगारांनी आपल्या जेवणाच्या डब्यातुनच दगड आणले होते !

Ø १५ सप्टेंबर १९५८ रोजी, संयुक्त महाराष्ट्र समितीने हुतात्मा स्मारक बांधण्याची मागणी केली होती पण तशी काही गरज नसल्याचे सांगत सरकारने ती फेटाळली होती. समितीने सत्याग्रह करून तात्पुरत्या स्वरूपाचे स्मारक २१ नोव्हेंबर १९६० रोजी हुतात्मा चौक येथे उभारले. सध्या असलेल्या स्मारकाचे उद्घाटन १ ऑगस्ट १९६३ रोजी झाले.

Ø इंदीरा गांधींचे पती फिरोझ गांधी मुंबईसह महाराष्ट्राच्या विरोधात होते. हिंदुस्तान टाइम्स मध्ये इन्साफ या टोपणनावाने ते लिहित. अत्रे त्यांना नवयुगमधून तोडीस-तोड उत्तर देत. मुंबई महाराष्ट्राला दिल्यास मुंबईतील गुजराती महिलांची सुरक्षितता धोक्यात येइल असे मत फिरोज गांधी मांडत. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी हुतात्मा चौकाजवळ झालेल्या गोळीबारात अनेक आंदोलक हुतात्मा झाले होते. या कामगिरीवर नेहरू खूष झाले असून सका पाटील व मोरारजी यांना लवकरच केंद्रात बढती मिळणार असल्याचा गौप्यस्फोट फिरोझनी केला होता.

Ø महाराष्ट्र राज्याचा स्थापना समारोह चार दिवस चालला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून निवड झालेल्या यशवंतराव चव्हाणांनी सर्वप्रथम २७ एप्रिल रोजी शिवनेरीवर जावून छ. शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली. दूसर्या दिवशी ओवल मैदानात फटाक्यांची आतषबाजी झाली. २९ तारखेला, क्रॉस मैदानात भरलेल्या, भविष्यातल्या महाराष्ट्राचा वेध घेणार्या एका प्रदर्शनाचे उद्घाटन यशवंतरावांनीच केले. १ मेच्या पुर्व संध्येला गिरगाव चौपाटी तसेच शिवाजी पार्कला झालेल्या महा-सभेत स्वत: नेहरू सामील झाले होते. आधी काळे झेंडे दाखविणार्या लोकांनीच यावेळी नेहरूंचे स्वागत, कटूता बाजूला ठेवून, फुलांची उधळण करीत केले.

Ø मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यासाठी महाराष्ट्राला ५६ कोटी व ३०० गावे गुजरातला देण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला होता. मुंबई महाराष्ट्रात जाणार तेव्हा तिकडे गुंतविलेल्या पैशाची नुकसान भरपाई गुजराती व्यापार्यांना हवी होती. अर्थतज्ज्ञ चिंतामणराव देशमुखांनी “एक छदाम सुद्धा देणार नाही” या शब्दात ही मागणी धुडकाविली होती. पण त्यांचा विरोध डावलून केंद्राने महाराष्ट्राला गुजरातला ५६ कोटी व ३०० गावे देणे भाग पाडले. अजब योगायोग बघा – पाकिस्तानला सुद्धा भारताने फाळणीनंतर ५६ कोटीच दिले होते.

Ø भाषावर प्रांत रचनेची मूळ कल्पना मोतीलाल नेहरू यांनी १९२९ मध्येच मांडली होती. त्यांच्याच अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या एका आयोगाने असा अहवाल सादर केला होता.

सौजन्य व आभार – डी.एन.ए.