बुधवार, १२ मे, २०१०

विश्वनाथ आनंदच भारतरत्नचा सुयोग्य मानकरी !

विश्वनाथ आनंदने बुद्धीबळातील जगज्जेतेपद राखले व भारताची मान जगात उंचावली आहे. सचिनला भारतरत्न पुरस्कार देण्याच्या हालचालींना राजधानीत वेग आला आहे. सचिनला हा पुरस्कार मिळायलाच हवा पण विश्वनाथ आनंदचा सुद्धा या पुरस्कारावर सचिनएवढाच हक्क आहे, खरेतर आनंदला हा पुरस्कार सचिनच्या आधीच मिळायला हवा होता एवढी त्याची कामगिरी महान आहे. आनंदने बुद्धीबळाचे धडे गिरवले फिलिपाइन्समध्ये. त्या देशाने आनंदला आपले सन्माननीय नागरिकत्व आधीच बहाल केले आहे व त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सुद्धा बहाल केलेला आहे याची आठवण सुद्धा ठेवली पाहिजे.

क्रिकेटला भारतात लोकाश्रय, राजाश्रय दोन्ही आहे व त्यामुळेच पैसा सुद्धा उदंड आहे. बुद्धीबळाला पोषक वातावरण मात्र भारतात अजिबात नाही. मी सचिन होणार असे म्हणणारे लाखो असतील पण मी विश्वनाथ आनंद होणार असे म्हणणारे शोधूनही सापडणार नाहीत ! जगज्जेतेपद राखणार्या आनंदला ११ कोटीचा पुरस्कार मिळाला. ही रक्कम आयपीएल स्पर्धेत फक्त एक मौसम खेळून मिळणार्या पैशापेक्षा कमी असेल पण त्या जेतेपदाचे महत्व खूपच जास्त आहे. इन-मिन ८ देश क्रिकेट खेळतात व ते सुद्धा ब्रिटीशांचे गुलाम असलेले देश ! या उलट बुद्धीबळ खर्या अर्थाने जागतिक खेळ आहे व त्यातले विजेतेपद क्रिकेटच्या तथाकथित विश्वविजेपेपदापेक्षा अधिक गौरवास्पद आहे.

तेव्हा भारत सरकारने विश्वनाथ आनंदला विनाविलंब भारतरत्न प्रदान करावे व या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा बहुमान वाढवावा ही विनंती.

५ टिप्पण्या:

Naniwadekar म्हणाले...

तेव्हा भारत सरकारने विश्वनाथ आनंदला विनाविलंब भारतरत्न प्रदान करावे
----

मराठे साहेब : तुमचा लेख विवेकशून्य आहे. एका रवि शंकरला 'भारतरत्न' सन्मान दिल्यावर बिस्मिल्लालाही द्‌या, अलि अकबरलाही द्‌या, विलायतलाही द्‌या या मागण्या सुरु झाल्या. बिस्मिल्लानी आपल्या धर्माचं तुणतुणं वाज़वून आपली पोळी भाज़ली आणि पुढे तर फारच निर्लज्ज दीनवाणेपणा केला. निव्वळ कलाकारीचा निकष असता तर अलि अकबरच्या तोडीचा एकही वादक गेल्या १०० वर्षांत झालेला नाही. पण तरी रवि शंकरला प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान मिळायला मला हरकत वाटत नाही. संगीत क्षेत्रातल्या फक्त लतालाच सन्मान द्‌यायलाही हरकत नव्हती. पण गायक-वादकांनी भारत-रत्न देण्याची आता फ़ॅशनच झाली आहे.

कुठल्याही महत्त्वाच्या सन्मानाची अशी खिरापत वाटणे योग्य नसते. एखाद्‌या क्षेत्राच्या वाट्याला असे पुरस्कार किती यावेत याचेही तारतम्य ठेवायचे असते. म्हणूनच भीमसेनला पुरस्कार मिळाल्यावर त्यानी पुरस्कार 'सर्व ख्यालगायकांच्या वतीनी मी स्वीकारतो' अशी योग्य भावना मांडली. आणि भीमसेननी दारु पिऊन झिंगून १९७०-१९७५ कडे बोर्‍या वाज़वलेल्या मैफिली 'क्षम्य दोष' म्हणून मी स्वीकारू शकेन; मात्र पैशाच्या आणि प्रसिद्‌धीच्या मोहानी भीमसेननी जी गायनकलेची अब्रू अनेक वर्षं लुटली ती पाहता भीमसेनलाही तो सन्मान द्‌यायला नको होता. मी भीमसेनच्या अनेक गचाळ मैफिली ऐकल्या आहेत. पण एकदा का कशाची फ़ॅशन झाली की तिचा रेटा ज़ोरदार असतो.

भारत ब्रिटनचा गुलाम देश आहे, ही नवीनच माहिती तुमच्या क्रिकेटद्‌वेषामुळे मला मिळाली. मात्र एके काळी त्यांचा देश गुलाम होता याबाबत ब्रॅडमन, वॉरेल, सोबर्स, गावस्कर यांनी नक्की काय करावं याबद्‌दलच्या तुमच्या अपेक्षाही मला कळलेल्या नाहीत. ज़गातल्या १००-२०० देशांत ज़ो खेळ १०००-१२०० लोक थोडाफार खेळतात त्यापेक्षा २-३ देशांतले १०-१५ हज़ार लोक ज़ो खेळ जीव तोडून खेळतात त्यात इतरांपेक्षा सरस ठरणे कठीण, हे तुमच्या गांवीही नाही.

मुख्य प्रश्न वयाचा आणि खेळाडूंना किती महत्त्व देणे योग्य या दोन बाबींचा आहे. अण्णासाहेब कर्वे, डॉ काणे, विश्वेश्वरय्या, विनोबा, टाटा, सुब्बुलक्ष्मी, लता यांनी थोर कर्तृत्व गाज़वल्यावर अनेक वर्षांनी त्यांना भारतरत्न सन्मान मिळाला. यांतही विनोबांना सन्मान मिळाला तो विद्‌वत्तेसाठी आणि सार्वजनिक कार्यासाठी की इन्दिराबाईंच्या चमचेगिरीसाठी ही शंका आहेच, पण ती आपण काही काळ दूर ठेऊ. तेंडुलकर, बुद्‌धिबळवाला आनन्द ही तशी अज़ूनही पोरंच आहेत. शिवाय एक खेळ बर्‍यापैकी खेळणार्‍याला भारत-रत्न देणे हा प्रकारच मूर्खपणाचा आहे.

संग्राम पाटील म्हणाले...

नानीवडेकर ,
हेमामालिनी, हेलन , तो सैफ खान ला भारत रत्न दिले जाते तेंव्हा आपल्याला त्रास होत नाही. परंतु ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद वारंवार मिळवणारा आपल्या दृष्टीने कमी दर्जाचा ठरतो हे पाहुन गम्मत वाटली. त्या मुर्ख धोनी आणि हरभजनला ज्या पुरस्काराबद्दल अजिबात किम्मत नाही तरी पण त्याला दिले तरीही तुमचा आक्षेप नाही. पण बुद्धिबळ म्हंटलं की तुम्हाला का त्रास होतो तेच समजत नाही.

तुम्हाला भीमसेन जोशी आवडत नसतील म्हणुन त्यांचे कर्तुत्व कमी होत नाही. त्यांना शिव्या दे‌ऊन किंवा एकेरी उल्लेख करुन आपण काय सिद्ध करू इच्छिता? संगीत क्षेत्रात लता -आशा व्यतिरिक्त लोकं पण आहेत.

भीमसेन जोशींनी पैशासाठी गायनकलेची अब्रू लुटली हे तुम्ही कशाचा जोरावर म्हणता? उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला..?? भीमसेन जोशींच्या बद्दल काही माहिती असती तर तुम्ही अशी मुक्ताफळे उधळली नसती. या वरुन तुमचीच लायकी दिसून येते.

क्रिकेट माझा पण आवडता खेळ आहे. म्हणुन आनंदचं महत्व कमी होत नाही.

जाऊ द्या.तुला अशी सवय आहेच नको तिथे पिचकाऱ्या मारायची. भीमसेन जोशींचा एकेरी उल्लेख करणारा तुझ्या सारखा दळभद्री तूच रे नानी.

अनामित म्हणाले...

Are boss, buddhibal khelayala budhdi lagate mhanun kadachit nanila avadat nasel.

Amolkumar म्हणाले...

ekdam barobar aahe

संदीप म्हणाले...

आपल्याअ देशातील किकेटच्या अतिरेकामुळेच हे असे वाद उद्भवतात.माझ्यामते असा कुठलाही खेळ,कला-कौशल्य जरी खूप मोठे असेल तरी जोपर्यंत त्या कलाकाराने वा खेळाडूने त्याचे अमाप उत्पन्न घेतले आहे त्याने त्या कौशल्याचा व्यवसाय म्हणून उपयोग केला आहे,तोपर्यंत ती राष्ट्रसेवा म्हणता येणार नाही.तेव्हा फक्त नि:स्वार्थ देशसेवा वा समाजसेवा करणार्यांनाच असा सर्वोच्च सन्मान मिळावा-स्विस बेंकेत पैसा ठेवणार्या राजकारण्यांना याची पर्वा मात्र मुळीच असत नाही आणि ते लोकप्रियतेसाठी या पदांचा वापर करत असतात-आपल्या देशाचे हे दुर्दैव होय.