शनिवार, २८ फेब्रुवारी, २००९

खिडकी उघडली – लोकलची आणि मनाची सुद्धा !

थंडीच्या दिवसात पनवेलला लोकलमध्ये आगळेच दृष्य दिसते. सगळ्या खिडक्या आणि पंखे बंद असतात व कॉर्नर चक्क रिकामे ! मला अनायसेच खिडकी मिळते व मी ती मस्त उघडून बसतो ! त्या दिवशी सुद्धा खिडकी उघडणार एवढ्यात एक चार-एक वर्षाचा मुलगा आणि त्याच्या बरोबर त्याचा काका (ते मागाहुन समजले) आत शिरले. मुलगा खिडकीजवळ माझ्या समोरच बसला व काका माझ्या शेजारी. त्यांच्या चेहर्यावरून ते बिहारी आणि मुसलमान वाटत होते. आधीच भय्ये-बिहारी त्यात मुसलमान म्ह्टल्यावर माझ्या कपाळाला आठी पडलीच. त्यात तो मुलगा उतावीळपणे खिडकी उघडायला लागला म्ह्टल्यावर मी डोळे मोठे करून त्याच्याकडे बघितले. तेवढा इशारा त्याच्या काकाला पुरला व त्याने त्या मुलाला ’अंकल को ठंडी बज रही है, मत खोलो’ म्हणून त्याला दटावले. तो मुलगा हिरमुसला व गाल फ़ुगवून बसला. त्याचा तो बहुतेक पहीलाच ट्रेन प्रवास असावा, कदाचित मुंबईत सुद्धा तो पहील्यांदाच आला असावा. त्या बिहारी-मुसलमान मुलाची गोची झाली हे बघून मला मात्र अगदी आनंदाच्या उकळ्या फ़ूटल्या. साले, कोण कोठले येतात, महाराष्ट्राच्या उरावर बसतात, जाइल तिकडे उकीरडा करून टाकतात, यांच्याशी असेच वागले पाहीजे नाहीतर हा सुद्धा इथेच बस्तान ठोकेल !


थोड्याच वेळात गाडीने फ़लाट सोडला. काचेतुन दिसणारी पळती दृष्ये त्या मुलाची उत्सुकता चाळवत होती व सारखे त्याचे हात खिडकी उघडण्यासाठी शिवशिवत होते. त्याचा काका लगेच माझ्याकडे बोट दाखवून त्याला नजरेने दटावत होता. त्या मुलाच्या काळ्याभोर डोळ्यातली निरागसता, असहायता मला जाणवू लागली व माझ्या मनातच संघर्ष उडाला. चार वर्षाच्या मुलाला कसला आलाय प्रांतवाद, धर्मवाद, भाषावाद, का त्याच्या आनंदावर विरजण घालतो आहेस, का लहानपणीच त्याचे मन कुलुषित करतो आहेस, थंडीच्या ढालीआड आपला आसूरी आनंद लपवत आहेस ? हिमालयात तिनदा पदभ्रमण करणार्या व बारा महीने थंड पाण्याने आंघोळ करणार्याला कसली आलीय थंडीची भीती, उघड ती खिडकी ! बराच वेळ ’उघड’ शब्दाचा एको माझ्या मनाच्या पटलावर आदळत राहीला व शेवटी कोणत्यातरी अनामिक प्रेरणेने मी ती खिडकी खाडकन उघडली ! लगेच त्या मुलाच्या डोळ्यात पाहीले. आधी दिसला तो अविश्वास मग त्याचे विस्मयात रूपांतर झाले. लगेच त्याचे डोळे खिडकीच्या गजाला चिकटले. थोड्याच वेळात बाहेर काय दिसते आहे, त्याची रनिंग कॉमेंट्री सुरू झाली. काही क्षणातच तो पळती दृष्ये पाहण्यात हरखून गेला व मी ? मी त्याच्या डोळ्यात ! तो बाहेर काय बघत आहे ते मला त्याच्या डोळ्यात आधी दिसू लागले व मग काही काळ तर त्याची रनिंग कॉमेंट्री मला ऐकू येइनाशीच झाली ! आता तो माझ्याशी पण संवाद साधू लागला होता, अंकल वो देखा क्या ? वो देखो ! वो क्या है ? हजार प्रश्न‍ व कुतुहल मिश्रीत उद्‌गार, मी त्यातल्या एकाचेही उत्तर दिले नाही, जसा काही मी सुद्धा प्रथमच लोकलमध्ये बसलो होतो व त्याच्या डोळ्यातले जग माझ्या मनात साठवत होतो ! आता गाडी वाशीच्या पुलावर आली. बाहेरचे दृष्य बघून आता त्याने तोंडाचाच आ वासला होता व डोळे तर एवढे मोठे केले होते की ते अख्खे दृष्य जणू त्याचा डोळ्यात मावणार होते. बाजुलाच वाहनांसाठी असलेला महाकाय पुल, त्यावरून अव्याहत चाललेली विविध प्रकारच्या वाहनांची यातायात, खाली खाडीचे पाणी, त्यात संथ डोलणार्या होड्या, रबर टायरची बोट करून त्यात बसून मासेमारी करणारे कोळी, पंख पसरून पाण्याला समांतर उडणारे समुद्रपक्षी…., अचानक एक मोठे विमान रोरावत त्या दृष्यात शिरले व एक अद्‌भूत, भव्य निसर्गचित्र पूर्ण झाले. विमान बघून तो मुलगा अगदी हरखून गेला, सीट सोडून तो खिडकीजवळ उभा राहीला, जागच्या जागी उड्या मारत, टाळ्या वाजवत त्याने ’अंकल विमान’ चा घोषा लावला. खिडकीला गज असूनही त्याने शक्य तेवढे डोके बाहेर काढून ते विमान नजरेच्या टप्प्याच्या पार बाहेर जाईपर्यंत उडवत ठेवले. एक अपूर्व समाधान त्याच्या नजरेत तरळत होते.


चलो मुन्ना, अब हमे उतरना है, या वाक्याने आता ’आम्ही’ भानावर आलो. त्याच्या बरोबर कोणी होता याचाच मला विसर पडला होता. त्याच्या काकाने त्याचा एक हात घट्ट आपल्या हातात धरला होता व त्याला घेउन गर्दी कापत तो दरवाजाकडे निघाला होता. जाता जाता तो मुलगा माझ्याकडे डोळॆ भरून बघत होता, त्याचा मोकळा हात बहुदा मला टाटा करण्यासाठी उत्सुक होता पण तसे काही त्याने केले नाही. गाडी मानखुर्दला काही क्षण थांबली. गाडी सूटण्याचा भोंगा वाजला. त्याला आपण तरी टाटा करायला हवे होते अशी टोचणी लागून राहीली. अचानक दूसर्या दिशेच्या खिडकीत तो प्रकटला , खिडकीत त्याने आपला चिमूकला पंजा घुसवला व ’अंकल शुक्रीया, खुदा हाफ़िज’ असे पंजा हलवत जोरात म्हणू लागला, गाडी वेग घेत असतानाच त्याच्या काकाने त्याला पाठी खेचून घेतले , नाहीतर ---- !


खिडकीच्या बाहेरची दृष्ये आता मला धुरकट दिसू लागली होती. खरेच , शुक्रगुजार तर मी त्याचाच होतो, त्याला मी लोकलचीच खिडकी उघडून दिली होती, त्याने मात्र माझ्या मनाची कवाडे मोकळी केली होती !

रविवार, ८ फेब्रुवारी, २००९

विघ्नहर्ता !


शनिवार असला तरी एवढी कमी गर्दी ? गाडी पनवेलला लागून काही मिनीटे झाली तरी खिडक्या रिकाम्या ? असा विचार करीत मी खिडकी जवळ बसलो. मग लक्षात आले की या बाजूला उन लागेल म्हणून बाजू बदलली पण तेवढ्यात कोणीतरी शिताफ़ीने तिकडची खिडकी पकडली. झक मारत मला त्याच्या बाजूला बसावे लागले. इतक्यात त्या मुसलमान तरूणाने माझे लक्ष वेधून घेतले. अहो मुसलमानच कशावरून ? नाही, निव्वळ दाढी ठेवली होती, डोक्यावर मुसलमानी टोपी होती आणि अंगात पठाणी पोषाख होता म्हणूनच नाही काही, पण एरवीही मला मुसलमान नक्की ओळखता येतो ! त्याने जेव्हा हातातले गिफ़्ट पॅक रॅकवर ठेवले आणि जागा असूनही दाराकडे उभा राहीला म्हटल्यावर मी अधिकच सतर्क झालो. तशी गाडी सूटायला अजून अवकाश होता व गर्दीही नव्हती, त्याचा कोणीतरी मित्र येणार असेल म्हणून उभा असेल अशी मी स्वत:ची समजूत घालून घेतली. पण आता तर गाडीही सूटली, खांदेश्वर स्थानक आले तरी काही हा तरूण आत येत नव्हता आणि आता तर तो मोबाईलवर कोणाशी तरी बोलत सुद्धा होता ! तेव्हा संशय बळावला नसता तरच नवल. काय असेल तरी काय त्या गिफ़्ट पॅक मध्ये ? फ़ोनवर कोणाशी बोलत असेल ?


मानसरोवर, खारघर, बेलापूर मागे पडले, गाडी आता गर्दीने अगदी फ़ुलून गेली. तो दारावर उभा आहे की नाही आणि त्याची ती रॅक वरची गिफ़्ट बघत राहणे मला फ़ारच त्रासदायक होउ लागले, पण त्याची मुसलमानी टोपी त्याचे अस्तित्व दाखवत होती आणि जरासे हायसे वाटत होते. त्यात काही बॉम्ब-बिम्ब असेल तर इतक्यात तरी काही त्याचा धमाका होणार नव्हता. पण तो आत्मघातकी पथकातला असेल तर ? बापरे !! का त्याला हवी तेवढी गर्दी अजून झाली नव्हती ? काय करावे ? माझ्या डोक्यात नुसते विचारांचे चक्र चालू होते आणि मेंदू प्रमाणाबाहेर दमल्यामुळे चक्क मध्येच डोळा लागला. त्या अवधीत गाडीने वाशी सोडले होते. आता तो तरूण दिसत नव्हता व ती गिफ़्ट सुद्धा ! हायसे वाटले, उगीच आपण संशय घेतला असेही वाटले.


याच समाधानात कुर्ला आले, गाडी बदलणार्यांचे लोंढे उतरून गाडी परत भरण्याच्या आत मला ते गिफ़्ट पॅक परत तिकडॆच दिसले. म्हणजे तिकडे होतेच ते पण वर अजून सामान पडल्यामुळे मला दिसत नव्हते ! पण मग तो कोठे गेला ? जागेवरून अर्धवट उभे राहुन मी सगळा डबा स्कॅन केला आणि परत भीतीने धडकी भरली. तो कोठेही दिसत नव्हता ! आता मात्र काहीतरी करायलाच हवे, पण काय ? साखळी ओढावी का ? का ओरडून सगळ्यांना सावध करूया ? पण मग लोक पॅनिक हो़उन चालत्या गाडीतुन उड्या तरी मारतील नाहीतर चेंगरून सुद्धा मरतील . नकोच ते ! मग पोलीसांना फ़ोन लावायचा का ? पण खरेच त्या पॅक मध्ये बॉम्ब असेल का ? नाहीतर उगाच आपले हसे होईल. का आपणच उतरून जावे ? छे, काय करावे हेच नक्की होत नव्हते. बरे, समजा बॉम्ब असला, फ़ूटलाच तर तो काही एवढा त्रीव्र नसेलही, अगदी जवळची माणसे मरतील आपल्याला फ़ारतर खरचटेल. आणि एवढी वर्षे मुंबईत आहोत, आता पर्यंत काही झाले नाही ना ? मग ? जे व्हायचे ते होणारच आहे ना ? आणि बॉम्ब जर फ़ूटायचा असेल तर आपल्याला थोडेच तो सांगून फ़ूटणार आहे, अगदी आपण उतरायला निघतानासुद्धा तो फ़ूटू शकतोच !


याच वैचारीक कल्लोळात गाडी एकदाची सीएसटीला लागली ! डबा रिकामा झाला. पण ते गिफ़्ट पॅक तसेच रॅक वर होते. निदान ते आता पोलीसात तरी जमा केले पाहीजे. पण ते आताच फ़ूटले म्हणजे, आधी आपण बाहेर पडू , पोलीसच काय ते करू देत , पण गाडी परत सूटली म्हणजे ? शेवटी मी ते पॅक घेतले हातात. पुढच्या कंपार्टमेंट मध्ये काय गडबड चालली आहे ? कोणीतरी झोपले होते व गदागदा हलवूनही उठत नव्हते. भीतीने माझी बोबडी वळली होती आणि हा कोण कुंभकर्ण ? अरे – हाच ’तो’ ! आत येउन झोपला कधी ? नक्की झोपला की याचा कोणी गेम केला आहे ? त्याच्याच साथीदारांनी ? कामगिरी पार नाही पाडली म्हणून ? ते पॅक मी माझ्या बॅगेत भरले व त्याला उठवायचा प्रयत्न केला आणि चपापलोच ! त्याचे अंग गार पडत चालले होते. गळ्याखाली हात लावून बघितले तर ठोके अगदी मंद झाले होते. एकाला सोबत घेउन मी त्याला उचलून गाडीबाहेर आणले. फ़लाटावरील एका बाकावर त्याला आडवे करून ठेवले. गडबड एकून पोलीसपण आले. कोणीतरी स्ट्रेचर सुद्धा आणला. आमची वरात आता चौकीत पोचली. आता रखडपट्टी होणार ! पोलीस दहा प्रश्न विचारणार, जावे निघून तडक असे वाटत असतानाच तिकडच्या अधिकार्याने ’तुम्ही जा , आम्ही काय ते बघून घेतो’ असे सांगून आश्चर्याचा धक्काच दिला ! मी लगेच निघालो आणि मोबाईल खणखणला, लगेच कामावर ये म्हणून. धावतपळत मग शेयर टॅक्सी करून कार्यालय गाठले.


दिवसभराच्या रामरगाड्यात मग तो प्रसंग मी पार विसरूनच गेलो. रोजच्यासारखेच कामावर सात वाजले व रात्री ऩउला घरी पोचलो. तरी बरे , उद्या रविवार होता. थोडा आराम मिळणार होता. रविवारी अगदी दिवसभर लोळावे असे अनेकदा वाटते पण सात वाजले आणि आपसूकच उठलो. मटा हातात घेतला आणि हादरलोच. सीएसटी स्थानक उडवून देण्यासाठी आलेल्या एका दहशतवाद्याला पोलीसांनी कंठस्नान घातले होते. त्याच्या जवळ एके ५६ मशीनगन व आरडीक्स असलेले बॉम्ब होते. संशयावरून त्याला पोलीसांनी हटकले तेव्हा तो पोलीसांवरच गोळीबार करून पळताना त्याला टीपले गेले. फ़ार मोठा धोका, प्रचंड जिवीतहानी टळली होती. त्या पोलीसांना लाखा-लाखाची बक्षिसे जाहीर झाली होती, त्यांच्यावर अगदी कौतुकाचा वर्षाव होत होता. दिवस-रात्र मग मिडीया तोच विषय चघळत होता. तो म्हणे सीमेपलीकडून आला होता, कडवे प्रशिक्षण घेउन व फ़िदायीन होता म्हणे !


सोमवार, आज डबा मिळणार नव्हता आणि मग यामुळेच बॅग पण धुतली जाणार होती ! कामावर पोचलो आणि लगेच हीचा फ़ोन आला, कोणासाठी गिफ़्ट आणली होतीस ? गिफ़्ट ? बापरे ! मी ताडकन जागेवरच उडालो, तो बॉम्ब चक्क माझ्या घरी होता आता ! ते फ़ेकून दे आधी लांब, असे मी तिला अगदी ओरडून सांगत होतो तर ती शांतपणे म्हणाली की आत तर गणपतीची मुर्ती आहे, पत्रिका , लग्न पत्रिका आहे. तू कोणालातरी लग्नात भेट द्यायला ती घेतली असणार आणि नेहमीप्रमाणेच विसरलास ! म्हणजे त्यात गणपतीची मुर्ती होती तर. परत हायसे वाटले. पण मग लगेच तो तरूण समोर आला . मुसलमान आणि गणपतीची मुर्ती ? काय संबंध असेल ? काय बरे त्याचे झाले असेल ? पोलीसांनी त्याला उपचारासाठी नेले असेल ना लगेच ? दिवसभर उलट-सूलट विचारांनी कामात अजिबात लक्ष लागत नव्हते. अगदी अधीरपणे घर गाठले व लगेच ती मुर्ती व लग्न-पत्रिका बघितली.


ओके, म्हणजे त्याचा कोणीतरी हिंदू मित्र असावा. त्याच्या लग्नाला तो जात असणार हे मुर्ती भेट घेउन, आणि फ़ोन पण त्यालाच, किंवा आणखी कोणा मित्राला केला असणार ! त्या पत्रिकेवर एक मोबाइल नंबर लिहीलेला होता. चला, काहीतरी माग मिळाला तर ! त्या नंबर वरून फ़ोन करून त्या तरूणाची माहीती मिळणार होती, नाहीतर पत्रिकेतील कार्यालयाच्या पत्त्यावरून ज्याचे लग्न होते, तो तरी नक्कीच काही सांगू शकणार होता. मी त्या नंबरला फ़ोन लावला. कोणीतरी तरूण होता, त्याला मी सगळी स्टोरी कथन केली व त्या तरूणाचा नंबर अथवा पत्ता दिल्यास ती मुर्ती परत करायला मी तयार आहे , हे ही सांगितले. यावर बराच वेळ पलीकडून शांतता होती. मग एकदम अधीर प्रश्न आला, आप कहा रहते हो ? मै अभी आपको मिलना चाहता हूँ ! तो पनवेललाच रहात होता, व फ़ोन ठेवल्याच्या दहाव्या मिनीटाला घरी हजर झाला होता. त्याचा चेहर्यावर संमिश्र भाव होते, भेदरलेले, गोंधळलेले ! अंकल, रफ़ीक दो दिनसे घरमे आया ही नही है ! ना उसका नंबर लग रहा है, ना उसने किसीको कॉल किया है ! घरवाले काळजीत आहेत आणि पोलीसात तक्रार सुद्धा नोंदवली आहे, मिसींग म्हणून ! तो रफ़ीकचा मित्र होता. दोघे एकत्रच कामाला होते. रफ़ीक तसा मुंबईत नवाच होता. एका हिंदू मित्राच्या लग्नाला ते दोघे बरोबरच जाणार होते पण चूकामूक झाली व मग फ़ोनवर बोलून ठरल्याप्रमाणे रफ़ीक वडाळ्याला उतरून याची वाट बघणार होता. त्याला लहानपणापासूनच डायबेटीस होता. घाइ-घाइत तो काही न खाताच बाहेर पडला होता व म्हणूनच काळजी वाटत होती घरच्यांना. पण मग काही केल्या त्याचा संपर्क झाला नव्हता. त्याने आपल्या मोबाईलवर त्याचा एक फ़ोटो मला दाखवला. हो तोच तो , म्हणजे रफ़ीक होता. रफ़ीकला आपण ज्या दिवशी बेशुद्धावस्थेत चौकीत नेले त्याच रात्री चकमकीत एक अतिरेकी मारला जातो याचा काही संबंध तर नसेल ?


शरीफ़, रफ़ीकचा दोस्त, दूसर्याच दिवशी सीएसटी पोलीस ठाण्यात दाखल झाला. दोन-एक दिवसापुर्वी सकाळी, ज्या तरूणाला बेशुद्धावस्थेत येथे आणले त्याचे काय झाले पुढे, इतकाच त्याचा साधा प्रश्न होता. या साध्या प्रश्नाने पोलीस चौकीत स्मशान शांतता का पसरावी ? त्याला काहीच कळेना. वारंवार तोच प्रश्न विचारूनही त्याला काही उत्तर मिळत नव्हते. असा कोणी तरूण येथे आणला गेलाच नव्हता या उत्तराने मात्र तो उसळलाच ! त्याने मग ज्याने त्याला येथे आणले त्यानेच मला हे सगळे सांगितले आहे, कोठे आहे तो, काय केलेत त्याचे ? असे चढ्या आवाजात विचारायला सुरवात केली. आता बखोटीला धरून त्याला एका पोलीस अधिकार्यासमोर उभे केले गेले. हा जरा सज्जन वाटत होता. अगदी थंड स्वरात त्याने अगदी सविस्तर माहीती घेतली, काही कागदावर लिहुन सुद्धा घेतली. त्याला थोडावेळ बाहेर बसायला फ़र्मावले गेले, चौकशी करून सांगतो या हवाल्यावर तो बाहेर थांबायला तयार झाला. आतुन बरीच फ़ोनाफ़ोनी झाली. मग तो अधिकारी बाहेर आला. चलो, तुम्हे उसका ठीकाणा बताते है, असे सांगून त्याला जीपमध्ये घातले गेले. जीप सूटल्यावर वाटेत अजून दोन जण आत शिरले. त्याला ठीकाणा दाखवायलाच हवा होता …..


….. त्या ’मुसलमान’ तरूणाला बेशुद्धावस्थेत आणले तेव्हा फ़ौजदार राणे रात्रपाळी संपून निघायच्या तयारीत होते. त्या तरूणाला बघताच तो मेला असल्याचे लगेच त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या डोक्यात काही वेगळाच विचार चमकून गेला. त्याला आपल्या गाडीत घेउन ते निघाले. वाटेत फ़ोन करून त्यांनी आपले सहकारी, काळे व पाटील यांना बरोबर घेतले व सगळा प्लान समजावून सांगितला. काही पोलीस खोट्या चकमकी करतात, आपण तर एका मेलेल्या माणसाचीच तर खोटी चकमक घडवणार आहोत. हो ना करत ते ही तयार झाले. त्याची ओळख पार मिटवली गेली, मोबाईल, आयकार्ड नष्ट केले गेले. चेहरा ओळखता येणार नाही एवढा विरूप केला गेला. आधीच्या कोणत्यातरी प्रकरणात पकडलेली पण रीतसर जमा न केलेली एके ५६ व दारूगोळा वापरून बनाव छान वटवला गेला. बढती, पारीतोषिक, सरकारी घर, प्रचंड प्रसिद्धी यात ते तिघे अगदी न्हाउन निघाले. पोलीसी सेवेत एवढा सन्मान फ़ार कमी लोकांच्या नशीबी येतो ! कोणाला कोणता संशय यायचे कारणच नव्हते आणि अचानक हा तरूण टपकला. एरवी ’खुनाला वाचा फ़ूटतेच’ असे आपणच म्हणत असतो पण पोलीसांनी केलेल्या खूनाला पण कशी वाचा फ़ूटली ? आपले बिंग फ़ूटू नये म्हणून याचा सुद्धा बंदोबस्त करणे भागच होते ! याचाच नाही तर ’त्याचा’ सुद्धा बंदोबस्त करणे भागच होते ! त्याचा मोबाइल नंबर तर शफ़ीककडून मिळाला होताच. त्यावर फ़ोन करून त्याचा कार्यालयाचा पत्ता पण त्यांना कळला होता. संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच ते फ़ील्डींग लावून बसले होते. सावज नजरेच्या टप्प्यात आले की ----


पोलीसांनी फ़ोन करून मला जेव्हा कळवले की रफ़ीकला रूग्णालयात दाखल केले आहे. शफ़ीकची आणि त्याची ’गाठ’ घालून दिली आहे तेव्हा किती हायसे वाटले. खरेच पोलीस आपले काम करतच असतात, आपण उगीच त्यांच्याबद्दल भलते सलते बोलत असतो. चला सहा वाजले, निघायला हवे आता, असे म्हणून बाहेर पडणार तोच दिल्लीला गेलेल्या साहेबांचा फ़ोन आला, मला काही माहीती हवी आहे, ती लगेच इमेल करा ! म्हणजे निदान दोन तास तरी जागचे हलताही येणार नव्हते !


बाहेर जीप मध्ये सावजाची वाट पहात असणार्या त्या तिघांचा संयम आता संपू लागला होता. साला करतो काय आत इतका वेळ ? सात म्हणता म्हणता आठ-ऩउ वाजत आले. पण वाट तर बघावीच लागणार होती. एका रात्रीत केवढा मानसन्मान मिळाला होता ! तो टीकवण्यासाठी एवढे कष्ट काही फ़ार नव्हतेच ! राण्यांचा मोबाईल एवढ्यात खणखणला. हो – हो – ते सुद्धा आहेत – लगेच निघतोच, असे म्हणत त्यांनी जीप स्टार्ट केली व लगेच निघायला हवे, असे सगळ्यांना फ़र्मावत त्यांनी सूसाट वेगाने जीप व्ही.टी.च्या दिशेने पिटाळली.


मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सुरक्षा यंत्रणेच्या अब्रूचे पार धिंडवडे निघाले होते. अत्याधुनिक शस्त्रे असलेल्या आत्मघातकी पथकाने सीएसटीवर हल्ला बोल केला होता. शेकडो निरपराध मेले होते. त्यांच्या मागावर निघालेले पोलीस अधिकारी राणे, काळे व पाटील शहीद झाले होते. सारा देश हळहळत होता त्या वृत्त्ताने ! अनेकांच्या डोळ्यातुन अश्रूधारा वहात होत्या. माझेही डोळे पाणावले होते, अग याच निधड्या छातीच्या अधिकार्यांनी काही दिवसापुर्वीच सीएसटी स्थानकात स्फ़ोट करायला आलेल्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता आणि तेच आता ----- ? या गोंधळाअतून सावरून, रात्री खूप उशीरा घरी पोचलेला मी जड आवाजात बायकोला सांगत होतो. आणि हो, तो रफ़ीक, गणपतीची मुर्ती-- तोच तो, सुखरूप आहे अगदी, शफ़ीक त्याला भेटला सुद्धा ! मला पोलीसांनीच कळवले, गणपती म्हणजे विघ्नहर्ताच तो, त्याचीच मुर्ती भेट म्हणून द्यायची त्याला बुद्धी झाली व त्यानेच त्याला तारले. उगाच जीवाला घोर लागून राहीला होता. ती काळजी मिटली तर आता ही बातमी, खरेच , ’त्याला’ वाचवणारा विघ्नहर्ता यांना वाचवायला का बरे धावला नाही ? इश्वराची लिला अगाध आहे म्हणतात ते उगाच नाही !

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २००९

क्रीकेटने घेतली गोलंदाजांचीच विकेट !

क्रीकेट वा मराठमोळे नाव चेंडूफ़ळी , निदान नावात तरी गोलंदाजी व फ़लंदाजी या त्याच्या दोन्ही अंगात समानांतर राखून आहे. अकरा खेळांडूच्या संघात ५ फ़लंदाज व ५ गोलंदाज, एक यष्टीरक्षक एके यष्टीरक्षक. बराबर का हिसाब ! फ़लंदाजांनी फ़लंदाजी करावी, गोलंदाजांनी गोलंदाजी, ५ विकेट पडल्या की डाव आटोपल्यातच जमा असायचा ! आता जरा मैदानावर उतरूया ! फ़लंदाजी करणारा फ़लंदाज आणि त्याची विकेट घ्यायला टपलेले ११ जण (तसा कवा कवा १ पंच सुद्धा !). लाल-चूट्टूक चेंडू घेउन दाण दाण धावत येणारे , आग्यावेताळ, ताडमाड वाढलेले गोलंदाज, भोवताली टोमणे मारून हैराण करणारे क्षेत्ररक्षक ! ताशी १०० मैलाच्या वेगाने अंगावर सोडलेले चेंडू, फ़लंदाजांच्या बरगड्याचा वेध घेणारे. कानशीलाला वारा घालून चेंडू विकेटकीपरच्या हातात विसावतो आहे . चेंडू फ़लंदाजाच्या पायावर आपटायची खोटी, तारस्वरात ओरडून , अर्वाच्य शिव्या देत अंगावर धावून येणारे अकरा दैत्य. फ़लंदाजाच्या बॅटची कड चेंडूने कड घेताच त्याला झेलायला सज्ज असलेले चित्त्यासारखे क्षेत्ररक्षक ! अशा प्रतिकुल वातावरणात धीरोदात्तपणे उभा असलेला वामनमुर्ती फ़लंदाज, कधी ब्रॅडमन, कधी गावस्कर, गोंडस-गोजिरवाणा गोवर, कधी गुंडाप्पा तर कधी तेंडल्या. या स्थितीत पब्लीकची फ़ुल सहानुभूति फ़लंदाजाला न मिळती तरच नवल ! तोफ़ेचा गोळा सोडल्यासारखी गोलंदाजी जेव्हा हे वामनमुर्ती फ़ोडून काढू लागले तेव्हा अर्थातच पब्लीक जाम खुष व्हायला लागली. त्यात आली बॉडीलाइनची भानगड ! झाले, पब्लीकला गोलंदाजांबद्दल वाटणारे ममत्व संपलेच. प्रेक्षक मैदानात येउ लागला तोच चौकार, षटकारांची आतषबाजी बघण्यासाठी. क्रीकेट हा खेळ अधिकाधिक फ़लंदाज धार्जिणा होउ लागला. कसोटी क्रीकेटची लोकप्रियता उतरणीला लागल्यावर आले मर्यादीत षटकांचे , झटपट क्रीकेटचे युग ! त्यातही आधी साठ षटकांचे असणारे सामने मग पन्नास व आता तर २० षटकांएवढे मर्यादीत झाले. पाच दिवसाच्या कसोटीत आधी दिवसाला २५० धावा पण खूप वाटायच्या आता त्या किमान ४०० झाल्या तर पब्लीकला पैसा वसूल झाला असे वाटते. ६० षटकांच्या स्पर्धेत जास्तीत जास्त धाव नोंदल्या गेल्या होत्या २८०, पण पन्नास षटकात एक संघ ४०० प्लस धावांचे आव्हान देतो व दूसरा त्याचा यशस्वी पाठलागही करतो असाही इतिहास रचला गेला आणि इथेच गोलंदाजांचे खच्चीकरण करण्याची बराच काळ चाललेली प्रक्रीया पूर्ण झाली ! आधी फ़लंदाज गोलंदाजांपुढे गुढगे टेकायचे, गांगुली सारखे भागुबाई तर पळायचे, आता मात्र फ़लंदाज शिरजोर झाले आहेत व गोलंदाज दाती तृण धरून शरण आले आहेत ! तळाचा फ़लंदाज जेव्हा दांडपट्टा फ़िरवुन धावा उकळतो ( खंडणी उकळणे असाच शब्द प्रयोग आहे नाही का ?) तेव्हा ही खेळपट्टी दुभंगुन मला पोटात घेइल तर बरे असेच त्यांना वाटत असणार ! जितक्या जास्त धावा तितकी विजयाची जास्त संधी हे गणित पक्के झाले व मग ५+५+१ अशी संघाची रचना ७+४ तर कधी ८+३ अशी झाली ! यष्टीरक्षक-फ़लंदाज व अष्टपैलू फ़लंदाज कम गोलंदाज अशा हायब्रीड जाती जन्माला आल्या. अर्थात हे सगळॆ एका रात्रीत नक्कीच घडले नाही. क्रीकेटचे धुरीण, जे बहुतेक माजी फ़लंदाजच होते, उदा. गावस्कर, बॉर्डर, चॅपेल बंधु, बॉयकॉट ,त्यांनी गोलंदाजांची कबर खणण्यास सुरवात केली. सगळयात आधी, फ़लंदाजाच्या काळजाचे पाणी करणारा लाल भडक गोळा पांढरा हो़उन जणू फ़लंदाजांना शरण गेला ! त्याची हातबांधणीची शिवण, मशीनवर बांधली जाउ लागली व धारदार इनस्विंगर व आ़उटस्विंगर, झपकन आत येणारे कटर इतिहासजमा झाले. डे-नाइटच्या जमान्यात, दूसरी गोलंदाजी करताना दवामुळे चेंडूवर ग्रीपसुद्धा घेता येत नाही. गोलंदाजाला क्रीजच्या मर्यादेत काटेकोरपणे जखडण्यात आले, जरा मर्यादा ओलांडली की नो किंवा वाइड. लेग स्टंपला चाटून जरी बॉल गेला तरी तो ठरणार स्वैर ! नो बॉलवर चौका , छक्का मारल्यास आता तर पाच किंवा सात धावा मिळतात, वर फ़्री हिट सुद्धा बहाल केली जाते, हान तिच्या मायला ! जादा अपील करायचे नाय, नाहीतर दंड किंवा सक्तीची विश्रांती ! बीमर टाकायचाच नाय ,बंपर एकच टाकायचा, तो बी खांद्याच्या वरून गेला तर 'नो' ! मैदानाची लांबी अगदी ६० यार्ड एवढी कमी ठेवता येते, पडूदे चौकार , षटकारांचा पा़उस ! मैदानाचा आकार सुद्धा षटकोनी वा पंचकोनी चालू लागला. दहा, वा पाच षटके टाकून झाली की त्या गोलंदाजाने पुन्हा हातात बॉल घ्यायचा नाही, फ़लंदाज मात्र अगदी सलामीला येउन शेवटपर्यंत नाबाद राहीला तर त्याचे कोण कौतुक ! संशयाचा फ़ायदा द्यायचा झाला तरी तो सुद्धा फ़लंदाजालाच द्यायचा. चेंडू बॅटला लागुन पॅडवर आदळला तर पायचीत नाही पण जर तो थेट पायालाच लागून गेला तर मात्र लेगबाय ! गोलंदाजाने चेंडू स्टंपातच टाकला पाहीजे पण फ़लंदाजाने मात्र कशीही वेडीवाकडी बॅट, दांडपट्टा फ़िरवल्यागत धावा काढल्या तरी पब्लीक खुष ! वर समालोचक म्हणणार , 'धावा बनणे मुख्य, मग त्या कशाही का बनेनात' ! हाणामारीच्या षटकात, क्षेत्ररक्षणावरील मर्यादेमुळे बरेचदा चेंडू बॅटची कड घेउन, स्लीप मधून सीमापार जातो. गोलंदाज कपाळावर हात मारतो तर फ़लंदाज खिदळतो ! उंच उडालेला एखादा झेल एखादा कोंबडी फ़ील्डर टाकतो, गोलंदाजाला त्याला धड शिव्याही घालता येत नाहीत पण अगदी मधली यष्टी उखडली गेली पण बेल नाही पडली, तर मात्र फ़लंदाज नॉट आ़उट ! गोलंदाजाने बॉलींग सुरू करण्यापुर्वी तो कोणत्या हाताने, कोणत्या अंगाने गोलंदाजी करणार ते सांगितलेच पाहीजे, फ़लंदाज मात्र कोणताही चेंडू कोठेही मारायला मोकळा, त्याने रीव्हर्स वा बॅक हॅण्ड स्वीप मारला तरी चालते, (आता तर उजवा खेडाळू डावरी पोझीशन घेउन सुद्धा बॉल फ़टकारतो !), स्कूप करा वा सरसावत खेळपट्टीच्या मध्यापर्यंत या, चेडूचा टप्पा पडेपर्यंत तरी का थांबा ? पब्लीक धावाच तर बघायला येते ! एकच मंत्र, गोलंदाजीची पीसे काढा, फ़ोडा ती उभी आडवी , उभारा धावांचा टोलेजंग टॉवर ! खेळपट्टी पण कशी हवी तर 'पाटा' ! जरा जरी ती सम-पातळीत नसली, चेंडू असमान उसळतोय वा घसटी जातोय असे दिसले की करा सामनाच रद्द ! फ़लंदाजाला कोणी सांगते का की बाबा दहा षटके खेळलास की तू तंबूत परतायचे – नाही ! जखमी झाला तरी पठ्ठ्याला रनर घेउन खेळायला मोकळीक ! का असे म्हणते की तू ज्या दिशेला मारला असेल त्याच दिशेला बॉल गेला तर धावा मिळतील, चक्री , अकडम-तकडम धावा नाही चालणार म्हणून ? कड लागून चेंडू सीमापर गेल्यास निदान धावा तरी बहाल होणार नाहीत अशी सुधारणा होईल ? दोन पावलांच्यावर क्रीज सोडायचे नाही, एका षटकात एक फ़टका एकदाच मारायचा, वेडे-वाकडे शॉट सांगून खेळायचे असे नियम का नाहीत ? पण काय सांगावे धावांचा टॉवर हवा म्हणून गुगली टाकायचा नाही, हातभर बॉल वळवायचा नाही, यॉर्कर षटकात एकच टाकायचा, १०० च्या हुन जास्त वेगात बॉल पडला तर तो 'नो' , क्षेत्ररक्षकाने सुद्धा हातात आला (का ओंजळीत ?) तरच झेल पकडायचा अशा सुधारणा(?) मात्र नक्की होतील ! आधुनिक तंत्रज्ञान आले खेळात पण साले ते पण फ़लंदाज धार्जिणेच निघाले. वेगवेगळ्या गियर मुळे फ़लंदाज अधिकाधीक निर्घोर, निर्धोक झाले. कितीही वेगात चेंडू शरीराच्या कोणत्याही भागावर आदळला तरी फ़लंदाजाला अंगावर पिस फ़िरल्यासारखेच वाटते ! त्या मुळे गोलंदाजांची दहशतच संपली. सर्व गियर चढवून फ़लंदाज मैदानात उतरतो तेव्हा तो अगदी बॉम्ब निकामी करणार्या पथकातलाच वाटतो. माझे कोनीबी कायबी वाकडे करणार नाही हे त्याला चांगले ठावकी असते ! बॅटच्या तंत्रात पण खूप सुधारणा झाल्या, आता तर दोन्हीबाजूनी सपाट बॅट वापरता येणार आहे ! का तर अकडम-तकडम फ़टके चांगले बसावेत म्हणून ! गोलंदाजीचा वेग अजून ताशी १०० मैल या कमाल मर्यादेतच आहे पण फ़लंदाजांचे फ़टके मात्र खणखणीत हो़उ लागले आहेत. बराच काळ षटकार मारणारे भारतीय हा दुर्मिळ प्रकार होता पण हल्ली युवी काय लीलया छकडी चढवतो ! पण बॉल मात्र गोल गरगरीतच हवा, तो करा की अंडाकृती. पण नाही ! त्याचा शेप जरा बदलायची खोटी, फ़लंदाज आकाश पाताळ एक करून तो बदलणे भाग पाडतो ! मैदानावरचे पंच फ़लंदाजावर अन्याव करतात म्हणून त्यांना तिसरा डोळा दिला गेला (त्रयस्थ पंच असतातच). धावचीत, यष्टीचीत देताना त्याचा सढळ वापर केला जातो पण पायचीतचा निर्णय , जो खेळात सर्वात कळीचा मुद्दा आहे , तो मात्र असे पंच देत नाहीत. मग अनेक वेळा सी-हॉक तंत्राने मोठ्या पडद्यावर रीप्ले बघताना आपल्या चेंडूने मधला लकडा उडवला होता हे बघत हळहळणेच बॉलरच्या नशीबी येते ! हे सर्व कमी म्हणून की काय, मॅन ऑफ़ दी मॅच / सिरीज निवडताना सुद्धा गोलंदाजाला डावलले जाते. खरे तर एखाद्या सामन्यात फ़लंदाजाने शतक काढले असेल तर कोणा गोलंदाजाने पाच किंवा अधिक बळी घेतलेले असतातच पण बहुमान मात्र फ़लंदाजालाच मिळतो. तसे पाच बळी ही कामगिरी शतकाच्या, सात ते आठ बळी द्वीशतकाच्या तर ९ वा परफ़ेक्ट टेन ही कामगिरी त्रिशतकाच्या बरोबरीची असते. पण लक्षात कोण घेते ? निदान कसोटी सामन्यात तरी सामना जिंकण्याकरीता सर्व फ़लंदाज दोनदा बाद करणे अनिवार्य असते व ही कामगिरी गोलंदाजच पार पाडतात ना ? का म्हणूनच मर्यादीत षटकांच्या सामन्यात या नियमाला फ़ाटाच दिला गेला ? बहुसंख्य कर्णधार सुद्धा फ़लंदाजच असतात. निव्वळ गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळणे आता अवघडच झाले आहे. बिचारे झहीर, हरभजन व पठाण , काल-परवाचा इषांत शर्मा, हे सुद्धा हल्ली गुमान फ़लंदाजी करतात ! पहील्या पाच खेळाडूंनी नांगी टाकल्यावर बिचार्यांना कसलेल्या फ़लंदाजाप्रमाणे उभे रहावे लागते. एखादा फ़लंदाज शतक काढल्यावर दमलो म्हणून तंबूतच आराम करू शकते वा स्लीपमध्ये झोपा काढू शकतो पण ते भाग्य कोठले गोलंदाजाच्या नशीबी ? कधी पठाण किंवा झहीरला स्लीपमध्ये उभा(?) बघितला आहे कोणी ?पुढे सरसावत ठोकलेला उत्तुंग षटकार, खणखणीत कव्हर ड्राइव्ह, नजाकतभरी लेटकट वा ग्लान्स, गोलंदाजाचा फ़ॉलो थ्रू पूर्ण व्हायच्या आत अगदी समोरच्या स्टंपला वारा घालत, गवत कापत मारलेला स्ट्रेट ड्राइव्ह, बंपर छातीवर घेउन केलेला हूक यातच क्रीकेटचे सौंदर्य आहे का ? हे म्हणजेच क्रीकेट का ? रोरावत येणारा यॉर्कर, कानशीले लाल करून जाणारा वा बरगड्या शेकवणारा बंपर, गलीतगात्र करणारा बीमर, झपकन आत आलेल्या बॉलवर तीन-ताड उडणारी यष्टी, अचानक खाली राहुन यष्ट्यांचे वेध घेणारी वा पायावर आदळणारी डीलीवरी, हात टेकणारे फ़लंदाज हे बघताना नाही तुमच्या अंगावर रोमांच उभे रहात ? हे नाही तुम्हाला बघायला आवडत ?भविष्यकाळ स्पष्ट आहे , हाडामासाच्या गोलंदाजाची गरजच काय अस एक खुळ येइल ! यांत्रिक गोलंदाज साचेबद्ध गोलंदाजी करेल, क्षेत्ररक्षक सुद्धा "आता उरला उपचारापुरते" या भावनेने , चेंडूच्या पाठी नुसते पळतील, तो थांबला की(च) थांबतील, सीमारेषेवरून फ़क्त बॉल आणून देतील, फ़लंदाज धावांचा रतीब घालतील, संघ धावांचा टॉवर उभारतील, मैदाने अधिक आकसतील, अगदी गिरगावच्या गल्लीत सुद्धा 'बल्ले-बाजी'चा विश्वकप भरेल, तेव्हा दूर कोठेतरी क्रीकेटच्या पंढरीत माझ्या सारखा क्रीकेट रसिक गोलंदाजांच्या कबरीवर मुकपणे आसवे ढाळत असेल !