शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

जेन्टसच्या डब्यातले पुरूष , हिजडा व “तो” !

नेहमीसारखेच काम संपवून घरची वाट धरायला त्याला पावणे सहा वाजले. आता कितीही धावपळ केली तरी ६:०२ चीच लोकल मिळणार होती. तो जेव्हा सीएसटीमच्या फलाटावर नेहमीच्या टोकाला आला तेव्हा नेहमीप्रमाणेच ५:५८ ची मात्रूभूमी स्पेशल फलाटाला लागली होती. पुरूष प्रवासी नेहमीसारखेच त्या लोकलच्या नावाने बोटे मोडत होते. कशाला पाहिजे महिला स्पेशल ? हार्बरवर तर तिची काहीच गरज नाही ! यातले निदान एरवी महिलांसाठी असलेले डबे तरी पुरूषांसाठी ठेवायचे ! नेहमी हे ऐकून त्याला त्याचे हसू सुद्धा येते नव्हते ! महिला लोकलला गर्दी खूपच कमी असते हे जरी मान्य केले तरी जेन्टस मंडळीनी एवढा शिमगा करायची काही गरज नव्हती. त्यात तुमच्याच आया, बहीणी, बायका असणार आहेत ना ? पोचल्या जरा निवांत बसून घरी तर घरी गेल्यागेल्याच तुमच्या हातात वाफाळता चहाचा कप पुढे करीत असतीलच ना ? काही टवाळके उगीच महिला डब्यात घुसून आपण अनभिन्य असल्याचा आव आणत होते व आतील महिला प्रवाशांनी “उतरो, ये लेडीज स्पेशल है” असा गलका केल्यावर उगीच “”असे का ?” असे चेहर्यावर भाव आणून उतरत होते व आपल्या दोस्तांकडून टाळी घेत होते ! लेडीज स्पेशल सुटत असतानाच ६:०२ ची पनवेल फलाटात शिरली. सगळे जेन्टस जागा मिळविण्यासाठी पवित्रा घेवून उभे राहिले. नेहमीसारखेच उतरू पाहणारे प्रवासी त्यांच्या प्रवाहापुढे अगतिकपणे आत रेटले गेले. धडाधड आधी वार्याच्या दिशेच्या खिडक्या, मग उरलेल्या खिडक्या, मग दूसरी, तिसरी सीट, मग चवथा बसू पाहणार्याची कोंडी असे रोजचे जेन्टस डब्यातले खेळ सुरू झाले. त्याला मात्र जागा पटकवायची घाई केव्हाच नसायची. सगळे उतरले की तो अगदी निवांतपणे गाडीत चढत असे. चवथी किंवा नववी सीट सोडून कोणतीही जागा मिळाली तरी त्याला चालायची. एरवी तो दोन सीटच्यामध्ये खिडकीजवळ आपल्या पायावर उभा रहात असे. आजही तो असाच उभा राहिला व गंमत म्हणजे मोठ्या खिडकीजवळचा प्रवासी, ज्याला खरे म्हणजे उतरायचे होते तो सावकाश तिथून उठला. त्याला काहीही धडपड न करता ती खिडकी मिळाली म्हणून धक्काबुक्की करून आत शिरलेल्यांचा नुसता जळफळाट झाला ! गाडी सुटताच त्याने आपल्या घरी मेसेज पाठवला व मोबाइलचा इयर-फोन कानाला लावून , डोळे मिटून तो श्रवणानंदात तल्लीन झाला !

मशीदबंदरला झालेल्या गलक्याने त्याची तंद्री भंग पावली. एक महिला खुप सामान-सुमान घेवून त्या डब्यात कशीबशी शिरले होती व दाराजवळ उभ्या असलेल्या जेन्टस प्रवाशांचे धक्के खात खात ती आत यायला बघत होती. जेन्टस चांगलेच खवळले होते. लेडीज स्पेशल गेली त्यात का नाही गेली ही बया, लेडीज डब्यात का नाही गेली असे अनेक प्रश्न तिला उद्देशून केले जात होते. ती अगदी कानकोंडी झाली होती. एकाने तर धक्के खायची अशा बायकांना हौस असते असेही एकाला कुजबुजत सांगितले. लेडीज डब्यात यांना बसायला मिळत नाही म्हणून त्या जेन्टसमध्ये शिरतात कारण इकडे त्यांनी कोणीतरी हमखास बसायला देणार हे ठावूक असते, असाही एकाने टोला लगावला. त्याला मात्र हे सहन झाले नाही. त्याने खुणेनेच तिला आपल्याकडे बोलावले. आपली सीट तिला बसायला दिली.
तिचे सामान रॅकवर लावून दिले व काही केलेच नाही अशा अविर्भावात परत गाणी ऐकण्यात गुंग झाला. डब्यातल्या जेन्टसमंडळींना हा प्रकार अजिबात सहन झाला नाही, ती पार खिडकीजवळच बसल्याने त्यांना आता तिच्या अंगचटीला जाता येणार नव्हते. त्यांच्या दृष्टीने तो एकतर नामर्द तरी होता नाहीतर सुमकोंबडी ! आधी त्याच्या बाजुला बसलेला जाडजुड माणूस चांगलाच भडकला होता. एकतर त्याला आधी घुसून सुद्धा खिडकी मिळाली नव्हती, या येड्याला नशिबाने मिळाली तर त्याने तिकडे बाई बसविली म्हणून तो सतत धुमसत होता. आसपासच्या लोकांना कुसकट नासकट बोलून हशा घेत होता. तो मात्र निश्चल होता. तिला मात्र हे आता सहन झाले नाही. उभ्या असलेल्या त्याला तुम्ही बसा, माझ्यामुळे उगीच तुम्हाला त्रास, मला व्यवस्थित उभे रहाता आले तरी पुरेसे आहे म्हणून ती उभी राहू लागली. त्याने हसतच तिला बसून रहायला सांगितले. बोलणार्यांना बोलू देत, मला पर्वा नाही असे त्याने अगदी बेधडक सांगून टाकले. त्या दोघांच्या आता चक्क गप्पा सुरू झाल्या. त्यांना असे मोकळेपणे बोलताना बघून जेन्टस डब्यातल्या पुरूषांचा अगदी तिळपापड झाला ! ती बाई चालू असणार व तो सुद्धा सुमकोंबडी असल्याचा त्यांचा अंदाज अगदी बरोबर आला होता !
गप्पात कुर्ला येत आहे याची तिला आठवण नव्हती पण तो सावध होता. चुनाभट्टी सुटताच त्याने तिला सामान खाली काढून दिले व उतरायला तयार केले. तिने हसून त्याचे आभार मानले ! जेन्टसमध्यल्या नियमाप्रमाणे खिडकीजवळची जागा आता त्यालाच मिळायला हवी होती पण जाड्याने लगेच तिकडे सरकून घेतले. बाईला बसायला देता ना ? मग रहा उभेच ! त्याने ती शिक्षा हसत हसत स्वीकारली ! दांडगोबा जाड्या सगळ्यांच्याच कौतुकाला पात्र ठरला होता. याला म्हणतात पुरूष !

चेंबूर सुटताच डब्याच्या कोपर्यातुन एक हिजडा टाळ्या वाजवित येवू लागला. त्याच्या टाळ्यांचा लयबद्ध आवाज कानावर पडताच जेन्टस डब्यातले वातावरण पार बदलले. अनेकांना झोप आली, अनेक कावरेबावरे झाले, अनेकांनी पेपरात तोंड खुपसले, यातले काहीच करू न शकणारे खिषात सुटे पैसे आहेत का याचा तपास करू लागले. डब्यात एकदम खामोशी पसरली. फक्त हिजड्याचा टाळ्यांचा आवाज व त्याचे गेंगण्या आवाजातले “निकाल ना रे पाच दस रूपया” ! हिजड्याने त्याला हात लावायच्या आधीच त्याने हिजड्याकडे अशा काही नजरेने बघितले की हिजडा त्याच्या वाटेला गेलाच नाही. खिडकीजवळचा जाडा मात्र हिजडा जवळ उभा राहताच पार गर्भगळीत झाला ! त्याला अगदी घामच फुटला ! हिजड्याने त्याच्या गालाला हात लावताच त्याने खिषात हात घालून लागेल ती नोट त्याच्या पुढे केली. पण हिजड्याने त्याचे पाणी ओळखले होते. “सेठ, इतनाही ? और एक नोट निकाल ना ? असे लडीवाळपणे म्हणताच तो खिसे चाचपू लागला. त्याची ही अवस्था बघून त्याला मात्र अगदी आनंद झाला. त्याने थेट त्याला ऐकविले “बायकोला गजरा देताना तुझा हात आखडत असेल पण हिजड्यावर मात्र दौलतजादा करतोस ? वा रे मर्दा !” या त्याच्या बोलण्यावर तो पार खल्लास झाला ! “जेन्टस डब्यात बाई आली तर तुम्ही तिला हैराण करता पण एक हिजडा टाळी मारून तुमच्याकडून खंडणी वसूल करतो ! तो हिजडा नाही पुरूष आहे व तुम्ही सगळे पॅन्टच्या आतले हिजडे आहात ! असेल मर्दानगी तर द्या या हिजड्याला गाडीबाहेर फेकून. एकही हिजडा पुन्हा गाडीत चढायची हिंमत करणार नाही !” त्याच्या बोलण्याने अख्खा डबा सुन्न झाला. कानात गरम शिसे ओतावे तसे त्याचे शब्द त्यांच्या कानात शिरत होते पण बधीर मेंदूपर्यंत पोचत नव्हते !

गाडीने मानखुर्द सोडले व आता खाडी पार केल्यावर तब्बल ९ मिनिटांनी वाशी येणार होते. हिजड्याला असे बंड चालणार नव्हते. टाळी मारून मिळणार्या पैशावर तो का म्हणून पाणी सोडेल ? याच्या बडबडीमुळे धंद्यावर परिणाम होणार होता. हिजड्याने त्याला लगेच चॅलेंज केले “ अबे, खुद तो एक कवडी नही दिया , पब्लिक को कायकू भडकाता है ? अबे तुममे दम है तो फेक मुझे गाडी के बाहर.” मघाशी झालेल्या अपमानाने बिथरलेले पब्लिकसुद्धा “दिखानाबे तू कितना मर्द है” असे त्याला सुनवू लागले. तो सडसडीत होता पण हिजडा चांगलाच उंचापुरा होता. मारामारी झालीच असती तर त्याची हाडे मोडणार असा पब्लिकचा कयास होता व त्यांना सुद्धा असेच हवे होते. पब्लिक आपल्या बाजूला आहे असे लक्षात येताच तो हिजडा त्याला ओढून दाराकडे खेचू लागला. क्षणभर तो सुद्धा बावरला, असे काही घडणार असे त्याला अजिबात अपेक्षित नसावे. पण क्षणात त्याच्या चेहर्यावरचे भाव बदलले. काही एक ठाम निर्धार त्याच्या चेहर्यावर दिसू लागला. तो स्वत:च दाराच्या दिशेने सरकू लागला. हिजडा जोरजोरात टाळ्या वाजवित डब्यात सगळ्यांना धमकावित होता “कोई बीचमे आया तो मां कसम ----- “.द्द डब्यात सन्नाटा पसरला. दाराजवळ येताच दोघात जबर हातापाई झाली. एखाद्या फिल्ममध्ये दाखवितात तसे दोघे जिवाच्या आकांताने एकमेकांवर तुटून पडले. तो हिजड्याच्या लाथा-बुक्क्यापासून स्वत:चा आधी बचाव करत होता व संधी मिळताच त्याच्या वर्मावर एखादा आघात करीत होता. तो मार खाणार अशी पब्लिकची अपेक्षा पार धुळीला मिळाली. हिजडा प्रतिकाराने हादरला आहे हे लक्षात त्याने निर्णायक हल्ला केला. कोपराचा एक दणका देवून हिजड्याला त्याने दरवाजालगत अससेल्या पत्र्यावर दाबले, पाय आडवा घालून त्याने हिजड्याला जखडून टाकले, दोन्ही हाताच्या मुठी वळून त्याने वीजेच्या वेगाने हिजड्याच्या ओटीपोटीत पंच लगावायला सुरवात केली. हिजडा पार लोळागोळा झाल्यावरच तो थांबला. तो आता दरवाजाजवळ उभा राहिला व छाती भरून त्याने मोकळा श्वास घेतला. खाडीची बोचरी हवा त्याला सुखावून गली. त्याचा सगळा शीण गेला व तो अगदी प्रसन्न दिसू लागला. अनेक वर्षे लोकलमध्ये खंडणी वसूल करणार्या हिजड्यांना धडा शिकवायची त्याची इच्छा आज सफळ संपूर्ण झाली होती. याच आनंदात त्याने क्षणभर डोळे मिटले, आपल्या भोवतीच्या जगाचा त्याला अगदी पुर्ण विसर पडला.

एवढ्या वेळात हिजडा सावरला होता. आपण अजून ट्रेनमध्येच आहोत ही जाणीव त्याला झाली. त्याने आपल्याला बाहेर फेकून दिले नाही पण तो आहे तरी कोठे ? दरवाजात उभे असलेला तो “तोच” होता. डोळे मिटलेल्या त्याच्या चेहर्यावरचे समाधान बघून हिजडा पिसाळल्यागत त्याच्या दिशेने झेपावला. सर्व ताकत एकवटून त्याने त्याच्यावर एकच आघात केला व -----

हिजड्याचा खुनशी चेहरा बघताच डब्यातले जेन्टस अगदी गर्भगळीत झाले. आपण काय बघितले यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. हिजड्याने सगळ्यांना धमकाविले “कोई भी कुछ बोलेगा नही, किसने कुछ देखाही नही, समझे ?” वाशी स्थानकात गाडी शिरत असतानाच तो उतरला. वाशीला ज्यांना उतरायचे होते ते सुद्धा पुतळ्यासारखे डब्यात खिळून राहिले होते. माणसांचा लोंढा डब्यात शिरला. डब्यात आधी काय झाले हे त्यांना कधी कळणारच नव्हते.

रेल्वे रूळालगत अड्डा असलेल्या गर्दुल्ल्यांना काहीतरी लोकलमधून पडलेले दिसले. अंधारात ते तसेच धडपडत त्या दिशेने निघाले. जरा चालल्यावर त्यांच्या कानावर मोबाइलची रिंगटोन ऐकू आली, लगेच त्यांच्या तारवटलेल्या डोळ्यात चमक आली. झडप घालून त्यातल्या एकाने मोबाइल ताब्यात घेतला व सिमकार्ड काढून फेकून दिले. काहीजण अजून थोडे पुढे गेले, त्यांना तो रूळात पडलेला दिसला. त्याच्या शर्टचे व पॅन्टचे खिसे उलटे-पालटे करून जे कामाचे होते ते त्यांनी काढून घेतले व बाकी पाकिट खाडीत भिरकावून दिले.

“ती” आता मात्र काळजीत पडली होती. मेसेज मिळून तर बराच वेळ झाला, एव्हाना हा घरी यायलाच पाहिजे होता. त्याचा मुलगा सुद्धा त्याला अधूनमधून रींग करीत होता. आधी काही वेळ रींग वाजल्याचा आवाज येत होता, आता तोही येणे बंद झाले होते. काय बरे झाले असेल ? मुलीला खात्री होती की बाबा खालीच आले असणार पण नेहमीसारखेच तहान-भूक विसरून जिन्यात कोणाशीतरी गप्पा मारीत असणार !

कालच्याच प्रसंगातला एकजण सकाळी लोकलमध्येच पेपर वाचत होता. अगदी आतल्या पानावरच्या “त्या” बातमीचे त्याला काहीच सोयरसुतक नव्हते. वाशी खाडी पुलावर लोकलमधून पडून कोणी मेला होता. त्याच्या शरीरावर ओळखीचे काहीच सापडले नव्हते. पोलीसांना ती आत्महत्या असावी असा प्राथमिक संशय होता. अर्थात तपास चालू होताच.

काल काही घडलेच नव्हते, कोणी काही ऐकलेच नव्हते, कोणी काही पाहिलेच नव्हते !

जेन्टसच्या डब्यात हिजडे टाळ्या मागून खंडणी वसूल करणारच होते व पॅन्टच्या आतले हिजडे ती गुमान देणारच होते, त्यांना अडविणारा कोणी मर्द शिल्लक उरलाच नव्हता !

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

--- पण थोबाड नाही फुटले !

काल दिल्लीत एका तरूणाने केंद्रीय मंत्री व हेवीवेट नेते श्री. शरद पवार यांच्या थोबाडीत मारली. अर्थात पवारांना काही लागलेच नाही ! तो तरूण माथेफीरू होता एवढेच सांगून त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला ! राजकारणी किती संवेदनाशून्य झाले आहेत त्यासाठी हे एक चांगले उदाहरण आहे ! तुम्ही हात जोडा, जोड्याने मारा वा तोंडात मारा, हम नही सुधरेंगे ! गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांना एका थपडीने काय होणार हो ? एकसे मेरा क्या होगा ? मिडीया नसता तर मुळात कोणी थोबाडीत मारलीच नाही असा खुलासा झाला असता ! त्या तरूणाने पवारांच्या कृषी-धोरणाचे कौतुक म्हणून गालगुच्चा घेतला असता असेही छापून आले असते ! असो !

पप्पु कलानीला पोलिस कोठडीत होणार्या मारहाणीने (की नुसत्या कल्पनेने ?) कळवळणारे तसेच दंगल पांगविताना पोलिसांच्या गोळीबारात मुस्लीमच कसे मरतात म्हणून मातम करणार्या पवारांनी खरेतर त्या तरूणाला सुद्धा समजून घ्यायला पाहिजे होते. अगदी दुसरा गाल पुढे करा असे मी म्हणणार नाही पण “बाबा का माझ्यावर हात उचललास ? काय दु:ख आहे तुझे ? इतके तरी विचारायची संवेदनाशीलता दाखवायला हवी होती. पवार मात्र त्या तरूणाला माथेफिरू ठरवून मोकळे झाले ! अशा प्रकारचा हल्ला कोणत्याही परिस्थीतीत, कोणाहीवर होणे 100 % निषेधार्ह पण अगदी 99.99% लोकांना हा प्रकार भलताच आवडला हे नक्की ! काल जाताना व आज येताना याच प्रकरणाची चर्चा लोकलमध्ये रंगली होती व सर्वांनाच पवारांचे थोबाड फोडले याचा आनंद झाला होता ! लोकांची प्रवृती आसुरी झाली आहे की राजकारणी माणसे लोकांच्या मनातुन पार उतरली आहेत ? संसदेवर हल्ला झाला तेव्हासुद्धा सगळे खासदार मारले गेले असते तर बरेच झाले असते अशा उघड प्रतिक्रीया व्यक्त होत होत्याच.

जे पेरले ते उगविले ! याच पवारांनी काही वर्षापुर्वी क्रिडा पत्रकार श्री. वि.वि.करमरकर यांच्यावर त्यांच्या अनुयायांनी केलेल्या हल्ल्याचे समर्थन केले होते. पुण्यातील बालेवाडी संकुलाच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात तेव्हा करमरकरांनी म.टा.त लेखमाला प्रसिद्ध केली होती, त्याचा हा राग होता. त्याही अलिकडे संभाजी ब्रिगेडच्या गुंडानी पुण्यातील भांडारकर संस्थेवर हल्ला करून तिची मोडतोड केली, अमूल्य ग्रंथसंपदेची होळी केली तेव्हाही त्या गुंडगिरीचे पवारांनी अप्रत्यक्ष समर्थनच केले होते ! गंमत म्हणजे तेलगी प्रकरणात छगन भुजबळ आकंठ रुतलेले असताना त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत होती. त्याच सुमारास भुजबळांची पत्रकार परिषद संपल्यावर एका पत्रकारावर हल्ला झाला व त्याचे निमित्त करून पवारांनी भुजबळांचा तडकाफडकी राजीनामा घेतला होता ! पवारांवर हल्ला झाल्यामुळे पवारांचे चेले चिडले आहेत पण या गोष्टींची आठवण त्यांना असेल का ?

1 % राजकारण व 99 % समाजकारण असे धोरण राबवून पवारांनी राजकारणात पाय रोवले. पंतप्रधान बनायची कुवत प्रमोद महाजनांपेक्षा त्यांच्यात नक्की जास्त होती. दुर्दैवाने सत्ता सुंदरीच्या मोहाने ते आंधळे झाले व त्यांच्या पतनाला कोणताही बंध उरला नाही. निवडणुका जिंकायच्या म्हणून त्यांनी भाई ठाकूर व कलानी सारखे गुंड निवडून आणले. पवार गॉडफादर झाले ! दिल्लीत पवारांचे मन कधी रमलेच नाही ! त्यांच्याच मर्जीने मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या सुधाकर नाईक यांनी जेव्हा ठाकूर - कलानी कंपनीच्या मुसक्या बांधल्या तेव्हा कलानीला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे वळ पवारांच्या पाठीवर उमटले ! किती ही संवेदनाशीलता ! लगेच त्यांनी दिल्लीवरून कळवळून सांगावा धाडला की कलनीला मारू नका ! पुढे सुधाकर नाइकांनाच शह देण्यासाठी मुंबईतली दंगल त्यांनी भडकत ठेवली. कर्तव्य कठोर पोलिस अधिकारी बापट यांना गोळीबारात मुस्लिमच कसे मरतात असा सवाल करून एका रात्रीत घरी बसवले गेले, त्याही आधी दंगलीला आळा घालण्यास लष्कर पाठवायच्या निर्णायावर बराच वेळ घेतला होताच ! जळेना का मुंबई, मरेनात का लोक ? माझी सत्तेची पोळी भाजली म्हणजे झाले ! सेना-भाजपाचा प्रचार जोशी-महाजन करीत होते म्हणून सहिष्णूतेचा बुरखा पांघरणारे पवार प्रचार सभेत “जोशी महाजनांचे राज्य येवू देणार का ? असा उघड चिथावणीखोर जातिय प्रचार करीत होते ! भाजपामधले मुंढे, खडसे, तावडे तेव्हा त्यांना दिसत नव्हते ! स्वत: पवारांचा सध्याचा राष्ट्रवादी पक्ष किती राष्ट्रवादी आहे ? राष्ट्र सोडा , किती महाराष्ट्रवादी आहे ? मराठावादी, त्यातही 96 कुळ्यांचा पक्ष असेच राष्ट्रवादीचे सध्याचे स्वरूप आहे !

येनकेन प्रकारेण सत्तेत राहणे ही एकमेव महत्वाकांशा त्यांनी जोपासली ! त्यासाठी कपडे बदलावे तसे पक्ष व निष्ठा बदलल्या. अनेकांच्या पाठीत खंजीर खुपसला. मुस्लिम मतांसाठी सुंता फक्त करायची बाकी ठेवली. दलित मते हवीत म्हणून आठवल्यांना सत्तेचे गाजर दाखवून झुलवले व वापरून सोडून दिले. सोनिया गांधी इटालियन म्हणून त्यांची साथ सोडली तेव्हा मोठा राणा भीमदेवी थाट आणला होता पण मग सत्ता हवी म्हणून तेवढ्याच निलाजरेपणे हातावर घड्याळ बांधून मोकळे झाले. त्यांच्या मागच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत ना शेतकरी आनंदी झाला ना ग्राहक, दलालांचे मात्र फावले ! महागाई आभाळाला भिडली ! सामान्य माणसाचे पार पेकाट मोडले ! कडधान्यांच्या किमती कडाडल्या, सामान्यांच्या जगणे हराम झाले पण तोपर्यंत पवारांची कातडी पार गेंड्याची झालेली होती. कलानीला मारतात म्हणून कळवळणारे पवार , महागाईने भरडलेल्या जनतेला मात्र काही दिलास देत नव्हतेच उलट गरिबाला ज्वारी, बाजरी स्वस्तात कशाला विकता ? ती गाळा व त्याची दारू बनवा दारू , पैका मिळेल पैका असे सांगत होते. लोकांची क्रयशक्ती वाढली आहे, ते खा खा खात सुटले आहेत व म्हणून किमती वाढतात असे महागाईचे निलाजरे समर्थनच त्यांनी केले होते. वा रे जाणता राजा !

आगलाव्या पत्रकारांनी पवारांचे थोबाड फुटले म्हणून तुम्हाला काय वाटते असा प्रश्न अण्णांना केला त्यावर म्हणे अण्णांनी “एकच लगावली का ?” असे आधी विचारून मग सारवासारव केली अशी बातमी छापली आहे. पवारांनी सुद्धा त्यावर खोचक प्रतिक्रीया दिली आहे. अण्णा अनेक वर्षे समाजकारणात आहेत व राजकारण्यांना ते अगदी जवळून ओळखतात. राजकारण्यांबाबतीत ते संवेदनाशून्य बनणे अगदी स्वाभाविक आहे. असे जर अण्णा खरेच बोलले असतील तर त्यांना म्हणायचे असेल की एकाने काय यांचे थोबाड फुटणार आहे आणि जरी थोबाड फुटले तरी ते फुटलेच नाही असे सुजलेल्या गालाने ते सांगणारच आहेत. हे बनेल राजकारणी कशानेही सुधारणार नाहीत, अंतर्मुख तर कधी होणारच नाहीत ! कितीही थोबाडीत मारल्या तरी यांचे थोबाड काही फुटणार नाही !

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०११

मला ते दतगुरू दिसले !

चमत्कार हा शब्दच माझ्या डोक्यात जातो. दगडातला देव मी केव्हाच टाकून दिला आहे. आजकालच्या काळात बोकाळलेल्या बुवा/बाबा बाजीला माझा तीव्र विरोध आहे ! समाजाला नागविणार्या बुवा/बाबांना तुरूंगात टाका ही माझी ठाम भूमिका आहे. पण याचा अर्थ मी देव मानत नाही असा नाही. देवळात मी जात नाही कारण देवाकडे काय मागायचे हाच मला प्रश्न पडतो. माझ्या व्यक्तिगत गरजा खूपच कमी आहेत. कोणापुढे हात पसरायची वेळ आजवर आली नाही ही त्या देवाची दयाच म्हणायची ! देवाचे सुद्धा माझ्यावाचून काही अडत नाही, तो त्याच्या जागी सुखी आहे मी माझ्या जागी ! बरे चालले आहे आमचे ! देव मला थेट दर्शन देइल असेही काही संभवत नाही, पण त्याची प्रचिती मात्र तो एखादवेळी देत असावा. मागच्याच आठवड्यात राजमाची ट्रेकला गेलो होतो, तेव्हा आलेला अनुभव जसाच्या तसा कथन करीत आहे.

लोणावळा ते उंदेवाडी अशी साधारण 20 कि.मीची पायपीट चालू होती. वाटेत एक नाला लागला. त्या नाल्याकाठी रस्ता दुरूस्तीचे काम करणारे कामगार विश्रांती घेत होते. नाल्याचे पाणी तोंडावर मारून थोडे ताजेतवाने झालो. फोटोसेशन चालू होतेच. तिकडेच एक कुत्रा निवांत बसलेला होता. मी त्याचाही एक फोटो काढला. मागचा ग्रूप आल्यावर आम्ही सगळे मार्गस्थ झालो. तो कुत्रा सुद्धा आमच्या बरोबर चालू लागला. मग लक्षात आले की तो फक्त माझ्याच मागे येत आहे. मी थांबलो की तो सुद्धा थांबत आहे ! मित्र गमतीने मला म्हणू लागले की तो त्याचा फोटो काढला म्हणून तुझ्यावर प्रसन्न झाला आहे ! एकाने त्याला बिस्किटे देवू केली ती सुद्धा त्याने घेतली नाहीत तेव्हा मात्र आमच्यात अनेक तर्क लढविले जावू लागले, कारण खायला दिल्यावर कुत्रा ते घेत नाही असा प्रसंग आधी कोणी बघितलाच नव्हता ! उंदेवाडीत आम्ही मुक्कामाच्या घरी आलो तिकडे सुद्धा तो कुत्रा बाहेर बसून राहिला. आश्चर्य म्हणजे गावातल्या एकाही कुत्र्याने त्याच्यावर ह्ल्लाबोल केला नाही !

थोडी विश्रांती घेवून आम्ही श्रीवर्धन बालेकिल्ल्याकडे कूच केले. हा कुत्रा परत आमच्या सोबत चालू लागला. गडाची दोन टोके आहेत. मी, माझा मुलगा प्रसाद व अजून एक सहकारी असे आम्ही तिघे पुढे होतो. किल्ल्यावर पोचल्यावर दोन वाटा लागल्या. एक वाट खालच्या टोकाकडे जात होती तर दूसरी वाट वरच्या मुख्य भागाकडे जात होती. तिकडे ध्वजस्तंभ सुद्धा उभारलेला आहे. आम्ही तिकडेच जायचे ठरवले व थोड्याच वेळात ते टोक गाठले. वरून बघितल्यावर कळले की बाकी सगळॆ खालच्या बुरजाकडे गेले आहेत. आम्ही वरून हाका मारून त्यांना मुख्य भागाकडे यायची वाट दाखविली. मग कळले की तिकडे एक भुमिगत भुयार आहे व ते बघण्यासारखे आहे तेव्हा परत जाताना ते बघायचे आम्ही ठरविले. सुर्यास्ताचा आनंद लूटताना वेळ कसा गेला कळलेच नाही व अंधार दाटू लागला. मित्रांची सूचना धूडकावून आम्ही त्या न बघितलेल्या टोकाकडे गेलो. याच वेळी परत तो कुत्रा आमच्या मागेपुढे घुटमळू लागला. भुयार बघेपर्यंत चांगलाच काळोख पडला. आमच्यातील एकाकडे बॅटरी होती , तिच्या प्रकाशात आम्ही खाली उतरायची वाट शोधू लागलो पण ती काही केल्या सापडेना. आम्ही तिघेच त्या काळोखात अडकून पडलो होतो. अचानक मला त्या कुत्र्याची आठवण झाली. माझ्या मित्राने बॅटरी सभोवती फिरवली तेव्हा तो कुत्रा एका ठीकाणी उभा असलेला दिसला. त्याच भागावर नीट प्रकाश टाकल्यावर तो खाली जाण्याचा वाटेवरच उभा होता हे लक्षात आले. जणू तो आम्हाला योग्य मार्गच दाखवित होता. आता मात्र आमचे कुतुहल जागे झाले. एकदा वाट कळल्यावर आम्ही मुद्दामच थांबू लागलो तेव्हा तो सुद्धा थांबू लागला. एकादा तर आम्ही मुद्दाम वेगळी वाट धरली तर हा पठ्ठ्या आमच्याबरोबर न येता योग्य मार्गावर थांबून राहिला !

काळोख वाढत चालला व कुत्र्याची परीक्षा बघताना शेवटच्या टप्प्यात आम्ही खरेच वाट चुकलो. अगदी भुलभुल्लयातच सापडलो. जणू एखाद्या चकव्यातच सापडलो ! गोल गोल भरकटून आम्ही परत त्याच जागी येवू लागलो. पुढे मुक्कामी पोचलेले मित्र आम्हाला बॅटरीचा प्रकाश दाखवित होते पण वाट मात्र आम्हाला काही केल्या सापडत नव्हती. बॅटरीच्या झोतात आम्ही वाट शोधत असतानाच अचानक तो कुत्रा एका ठीकाणी बसलेला दिसला. आधीच्या अनुभवाप्रमाणे आम्ही गुमान त्या वाटेने चालू लागलो व अचूक मुक्कामाला पोचलो. मी हा प्रसंग मित्रांना सांगितल्यावर ते सुद्धा विचारात पडले. अध्यात्माची आवड असलेल्या एका मित्राने मात्र “साक्षात दत्तगुरूंनीच कुत्रा पाठवून तुम्हाला वाट दाखविली” असे सांगितले. गंमत म्हणजे दूसर्या दिवशी आम्ही भल्या पहाटे मनरंजन गडावर गेलो तेव्हा मात्र तो आमच्या बरोबर अजिबात आला नाही. त्या दिवशी गडावरून दुपारी परत आल्यावर आम्ही त्याला झुणका-भाकर दिली ती मात्र त्याने म्हणता म्हणता फस्त केली !

हा अनुभव मला नक्कीच अंतर्मुख करणारा आहे ! कोणीतरी आपली काळजी घेत आहे ही जाणीव सुद्धा सुखावणारीच आहे !