शनिवार, २७ सप्टेंबर, २००८

सुसाईड नोट !

सुसाईड नोट !


मी, भीमराव जोंधळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वडाळा पोलीस ठाणे, कोणत्याही दबावाविना ही नोट लिहीत आहे। मी हे सर्व लिहीताना पुर्ण शुद्धीत आहे, या आत्महत्येसाठी मला कोणीही प्रवृत्त केलेले नाही, आणि माझ्या हातून जे पाप घडले आहे त्यानंतरही मी जिवंत राहणे माझ्याच सद्-सद्-विवेक बुद्धीला पटत नाही.


साधारण दीड एक महीन्यापुर्वी अनुप हा तरूण missing असल्याची तक्रार माझ्या ठाण्यात दाखल झाली होती। आता या महानगरीत या अशा तक्रारी निव्वळ नोंदवून ठेवण्यापुरत्याच असतात. आम्ही ही तेव्हा तेच केले होते. पण त्या नंतर अनुपच्या समाजाचे एक शिष्टमंडळ मला येउन भेटले. ही साधीसुधी केस नाही, मागासवर्गीय तरूणाचा हा खूनच आहे, तुम्ही याचे धागेदोरे उकला नाहीतर आम्ही सी.आय.डी. चौकशीची मागणी करू, अशा आशयाचे निवेदन देउन निघून गेले. पाठोपाठ कमिशनर साहेबांचा फोन वरून आदेश आला की या प्रकरणाची सखोल चौकशी करा, मला मुख्यमंत्र्यांना अहवाल द्यायचा आहे.


अनुपला शेवटचे पाहीले होते विकास देसाईने। तो अनुपचा लहानपणापासूनचा मित्र होता. एका खाजगी कंपनीत नुकताच कामाला लागला होता. अनुप त्याच्याहुन एक वर्ष लहान होता. दोघेही कंपनीच्या वसाहतीत आपल्या आई-वडीलांसोबत रहात होते. मी अनुपला बघताच ठरवले की हा मुलगा innocent आहे. अनेक वर्ष या खात्यात नोकरी करून आमची नजर तयार झालेली असते. 'त्या' दिवशी ते दोघे रोजच्या सारखेच वसाहतीतील क्लब मध्ये खेळायला गेले होते. रात्री नउ वाजता क्लब बंद झाल्यावर ते घरी परत यायला निघाले. रस्ता तसा ओसाडच आहे, कारण क्लब वस्तीच्या पार टोकाला आहे. बाजूला लागूनच रेल्वे लाईन आहे. बोलत बोलत चालले असते अचानक विकासला जाणवले की आपण एकटेच बडबडत चाललो आहेत, अनुप आपल्या सोबत नाही आहे. त्याला आधी वाटले, तो क्लबमध्ये परत फीरला असेल पण क्लब तर बंदच होता. कोठे गायब झाला काही कळलेच नाही. असेल गंमत करत असे वाटून तो घरी पोचला. दोघेही एकाच इमारतीत रहात होते. पहील्या आणि दूसर्या मजल्यावर. रात्री थोडे उशीरा अनुप घरी आला आहे का याची चौकशी करायला विकास बाहेर पडणार तोच अनुपची आईच त्याच्या घरी आली. अनुप घरी आलेला नव्हता तर. बरीच चौकशी करून रात्री उशीरा तक्रार दाखल झाली. त्या नंतर आठवडा भराने अनुपच्या वडीलांनी पत्रकार परीषद घेउन, जी त्यांच्याच समाजाने आयोजित केली होती, आरोप केला की अनुपचा खून विकासनेच केलेला आहे व मृतदेह सुद्धा गायब केला आहे. पोलीस पैसे खाउन हे प्रकरण दाबत आहेत. खूनी विकास मोकळा फीरतो आहे त्याला अटक करून त्याची चौकशी व्हावी. मग मी त्या क्लबमध्ये गेलो. तिकडे समजले की दोघे अगदी जानी मित्र होते, त्यांच्यात त्याच दिवशी सोडाच, आधीही कधी भांडण झाले नव्हते. तसे अनुपच्या मानाने विकास फारच किरकोळ होता व मारामारी झाली असते तरी अनुपला ठार मारून त्याचा मृतदेह विकास नष्ट करणे निव्वळ अशक्य होते. दोघांचे कसले प्रेम-प्रकरण पण नव्हते. त्या घटनेनंतर बेवारसी मृतदेह मिळाले पण ते अनुपचे नव्हतेच. पण अनुप बेपत्ता होता व त्याला शेवटचे पाहणारा विकासच होता. मी विकासला नाईलाजाने अटक केली. पण त्याला थर्ड डीग्री दाखवायची खरच काही गरज नव्हती. पण माझ्यावरचा दबाव वाढत गेला, राजकारण आले की आम्ही तर काय करणार. चांगले पोस्टींग सोडून गडचिरोलीला बदली करून घ्यायची मला का हौस होती. मी विकासला सात दिवसाच्या रीमांडवर 'आत' घेतले. पोलीसी खाक्या वापरून सुद्धा तो काही बोलला नाही. मी मात्र खोटेनाटे पुरावे देत त्याचा रीमांड वाढवत राहीलो. पण त्याच्या नजरेला नजर मी कधीच देउ शकलो नाही. स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी मी हे करत होतो. वातावरण थंड होण्याची वाट बघत होतो, तसाही ३० दिवसाच्या वर रीमांड मिळत नाहीच, तो आपोआपच जामिनावर सूटला असता.अचानक काळे वकीलांनी त्याचे वकीलपत्र घेतले. त्यांच्यावर पण हल्ला झाला, त्यांनी वकीलपत्र घेउ नये म्हणून निदर्शने झाली. पण ते हटले नाहीत. माझ्याशी अनेकवेळा ते या केस संदर्भात बोलले. मी त्यांना काय सांगणार होतो की तो निर्दोषच आहे पण माझे हात बांधलेले आहेत ते ? एव्हाना विकास विरूद्ध कोणताही पुरावा नाही हे पेपरात छापून आले होते, आता तो जामिनावर मोकळा होणार हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ होते. राजकारणाने आता मात्र कहर केला, मोर्चे, निदर्शने, निवेदने यांनी कळस गाठला. रोजचे काम करणे अशक्य झाले. आणि त्यातच वरून फोन आला, काहीही करा पण विकासला अडकवा, तो जर उद्या जामिनावर सूटला तर तुमची बदली गडचिरोलीला करू.


आता मात्र माझा धीर संपला, मती भ्रष्ट झाली। रात्री अकरा वाजता मी विकासच्या कोठडीत शिरलो. सोबत दोन हवालदार. काय करायचे ते आधीच ठरले होते. दोघांनी विकासचे हातपाय धरले. त्याच्या कोठडीच्या हूकावर फास लटकवला. त्याला स्टूलावर उभे करून त्याच्या गळ्यात फास अडकवला. त्याचवेळी मला मोबाइलवर sms आल्याची सूचना मिळाली. स्टूल ढकलून आम्ही सगळे कोठडीबाहेर पडलो. मी माझ्या खुर्चीत बसून sms open केला. तो काळे वकीलांचा होता, त्यात फक्त "he is innocent" एवढाच मजकूर होता. मी ताबडतोब विकासची कोठडी गाठली, पण तो पर्यंत त्याचे प्राण गेलेले होते. आत्महत्येचा बनाव आम्ही सहज पार पाडला. पण माझे मन मला खात होते. मी 'आत्महत्येची' खबर देण्यासाठी काळे वकीलांना फोन लावला, पण ते फोन घेत नव्हते. दूसर्या दिवशीही ते आले नाहीत तेव्हा मी चमकलो. तिसर्या दिवशी त्यांच्या घरी गेलो तर घरचे ही काळजीत पडले होते, कारण ते घरी आलेच नव्हते. मी मोबाईल कंपनीशी संपर्क साधून काळ्यांच्या मोबाईल वरून आलेला शेवटचा कॉल, संदेश कोणत्या भागातुन आला असेल हे शोधायला सांगितले. मला रात्री आठ वाजता कळले की तो भाग साधारणपणे क्लबच्या आसपासचा असावा. आता त्यांचा नंबर लावल्यावर "out of coverage area or switched off" असा मेसेज मिळत होता. त्या रस्त्यावर मी जीप उभी केली व चालत चालत काही माग मिळतो का हे पाहू लागलो. अचानक मला आठवले, अनुपला पाय आपटत चालायची सवय होती, ही माहीती विकासने काळे वकीलांना दिली होती. नकळत मी पाय आपटला तो एका मॅनहोलच्या झाकणावरच . लोखंडी झाकण गरकन फीरले, तोल जाउन मी गटारात ओढला गेलो. माझ्या मोठ्या पोटाने मला थेट आत पडू दिले नव्हते. गाडीचा चालक चटकन खाली उतरला व त्याने मला बाहेर काढले. मग मी रस्सी मागवुन त्या गटारात सावकाश उतरलो. एका हूकात अडकवून ठेवलेला मोबाईल मला सापडला. अर्थात त्याची बॅटरी डाउन झालेली होती. अनुपही असाच मेला होता. त्याने गटारावर पाय आपटताच, ते त्याला आत घेउन परत बंद झाले होते. अंडाकृती झाकण एका रींग भोवती फिरवून बघा, तुम्हाला काय झाले असेल त्याचा अंदाज बांधता येईल. बोलत बोलत विकास पुढे गेला होता. झाकणाचा आवाज त्याला कळलाही नसेल आणि अनुप गडप झाला असणार. झाकण गरकन फिरुन परत जाग्यावर बसल्यामुळे तो गटारात पडला अशी विकास काय कोणालाच शंका यायचे कारण नव्हते. त्या रस्त्यावर तेव्हा हे बघणारे आणि कोणी असण्याची शक्यताही नव्हती. काळे वकीलही असेच मेले होते, पण लगेच नाही. त्यांना थोडा वेळ मिळाला असणार, त्या वेळात त्यांनी एक sms धाडला असणार. उचंदन केंद्राचे काम ओहोटी लागली की चालू होते, मग मैला मिश्रीत पाणी तूफान वेगाने समुद्रात ढकलले जाते, त्यात ते दोघेही वाहुन गेले असणार, त्यांची प्रेते कोणत्यातरी किनार्याला लागली असतीलच, पण त्यांची ओळख पटवणे निव्वळ अशक्यच.


अजून एक, अगदी राहवत नाही म्हणून नमूद करतो, त्या दिवशी मी सुद्धा मेलोच असतो जर मला माझ्या चालकाने पडताना पाहीले नसते तर व माझ्या सूटलेल्या पोटाने मला थोपवले नसते तर। पण मी ज्या वेगाने गटारात ओढलो गेलो, त्या मागे एखादी अमानवी शक्ती असावी असे मला राहून राहून वाटते. त्या मॅनहोलचे झाकण बदलावे पण तिथे काही गूढ, अघोरी असे काही असेल का याचाही शोध घेतला जावा.


आता हे सर्व कळल्यावर माझ्या जगण्याला खरच काही अर्थ उरला असता का ? हे पत्र मिळताच विकास निर्दोष असल्याचे खात्याने जाहीर करावे, बिचार्याला आपल्या सडलेल्या यंत्रणेने जिवंतपणी न्याय मिळाला नाही, मेल्यावर तरी त्याच्या कपाळावरचा 'संशयीत खूनी' हा शिक्का मिटावा।


शक्य असल्यास विकासच्या घरच्यांनी मला क्षमा करावी, आणखीन मी काय करू शकतो ?

मंगळवार, २३ सप्टेंबर, २००८

वाढता वाढता वाढे !

वाढता वाढता वाढे !
माझी आई पूर्ण वेळ गृहीणी व दोन मोठ्या बहीणी असल्यामुळे मला कधी घरात कोणते काम करावे लागले नाही. मग अशी सवय लागली तर माझे काही चूकले का ? पण आपणच आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतो म्हणतात ना ते अगदी खरे आहे. नको ते नको त्या वयात वाचल्यामुळे स्त्री-पुरूष समानतेच्या 'चकव्यात' मी कसा फसलो मला कळलेच नाही. पण स्वयंपाकघरातली माझी लुडबुड आई बिलकूल खपवून घेत नसे . वर लग्न करशील तेव्हा बायको राबवून घेणारच आहे, तेव्हा उगाच आत्तापासून का, असे काही द्रष्टेपण तिच्याकडे असावे ! असो !
लग्नानंतर पहीला सुसंवाद घडला, नाही झडला याच मुद्द्यावरून . अगदीच कसा तु लाडोबा, जरा घरातले इकडचे तिकडे करायला नको म्हणजे काय ? प्रत्येक गोष्ट हातात आणून द्यायची म्हणजे काय ? मग वेगळे रहायला लागल्यावर स्वत:ला प्रयत्न पुर्वक सुधारले. पहीला केर काढला तो दिवस मला अजूनही आठवतोय ! कोणी सांगितले हे नसते उपद्व्याप ? तरी मी कचरा काढलाच ! तेव्हा लगेच कचरा असा काढतात ? असे म्हणत परत झाडू फिरवायला लागली आणि काय आश्चर्य जिकडे झाडू फिरेल तिकडे कचराच कचरा ! कचरा काढणे म्हणजे झाडू फिरवणे नाही नुसते, जरा इकडचे सामान तिकडे हलवावे लागते, प्रत्येक कोपर्यात झाडू फिरला पाहीजे, आमच्या आईने आम्हाला असे नाही हो शिकवले (आयला, आता याचा ईथे काय संबंध ) पण पुढे जरा कोडगा झालो. ही कितीही घालून-पाडून बोलली तरी 'उतायचे नाही, मातायचे नाही, घेतला वसा टाकायचा नाही" असे ठरवले.
आणि परवड सुरू झाली हो-- कसे ते वाचा पुढे,
मशीद बंदरला म्हणे सामान स्वस्त मिळते, तुझा पास आहेच ना, तिकडूनच आणत जा !पण बाई यादी करून ठेव, म्हणजे सगळे एकदम आणीन . तसे नाही बाई मला जमत, मी आठवेन तसे फोनवरून सांगत जाईन---.
ATM मधून पैसे काढशील ? पण तुझे आहे ना ATM ? मला ना पासवर्ड wrong पडायची भीती वाटते, बरे ते कार्ड नक्की कसे टाकायचे ते कळत नाही, बरे वाटेत कोणी पैसे चोरले म्हणजे ?
तुला लस्सी किती छान करता येते, आजपासून ---
लसणीचे तिखट तुला हवे असते ना ? मग देत जा खोबरे खोउन !
या स्टूलावर उभे राहून पंखे पुसताना मान दुखते, खाली पडायची भीती वाटते , मी जर खाली पडले तर--आता पंखे पुसणारच आहेस तर लगे हात ट्युब , कपाट, TV, टीपॉय पण पुसत जा ना, आणि मग कचरा पण काढत जा, नाही बाई येइल पण तोपर्यंत ---. computer मी लावते का ? मग तो पुसणार कोण ?
हजारदा सांगितले गहु घरी आणून स्वत: दळायला टाकावा, तो प्रकाशवाला फसवतो. हो का, तुला हव्यात ना नरम-नरम पोळ्या, मग तुच दळून आणत जा !
गच्ची किती घाण झाली आहे---प्रचंड गदारोळ, तोफांचे आवाज (पक्षी भांड्यांचे)तुझेच मित्र असतात ना चकाट्या पिटायला मग -- लागलो गच्ची साफ-सूफ ठेवायला !
रविवारी लोळत पडलेला असतोस तर त्या मशीनचा कान पिळू जरा -- मग स्पिन टब मधून पिळून काढ -- पुढे वाळत घातलेस तर काय ---पुढे जरा एक दिवस घडी केलेस तर काय पाप लागणार नाही आहे ! मग हे ही दर रविवारचे आणि आता दूसर्या आणि चवथ्या शनिवारचे काम होउन बसले !
बंद कर ती ऑर्कुटगिरी, जरा हीला निबंध लिहून दे, प्रसादचा अभ्यास तपास--म्हणजे आता अभ्यास पण मीच घ्यायचा--गिळायला हवे ना रोज चांगले चुंगले मग - आईने जीभेचे चोचले पुरवले, बायको भोगतेय !आधी माहीत असते तर --
दर रविवारी गजर वाजतो, उठ दूध आण जा ! काल का नाही आणून ठेवलेस ? ताज्या दुधाचा चहा कोणाला हवा असतो ? मग --, संपायच्या आत जा आता--.
कधी कपाट आवरायला घ्यावे तर आत हा रद्दीचा गठ्ठा !अरे हो, सगळी रद्द देउन ये आज बाबा, आणि येताना समोसे आण, दूपारी तेच खाउ !
एवढे करून जेवायला काय तर आमटी भात, कधी भात आमटी, कधी वरण भात तर कधी भात वरण, कुरकुर केली तर शेपूची भाजी नाहीतर मॅगी नूडल्स ! नाहीतर खिचडी आहेच ! मग संध्याकाळी बाहेर फिरायला जाणे, येताना हमखास उशीर होणे, आता बाहेरच खाउ असे आर्जव करणे, मी पैसे नसल्याचे सांगणे आणि प्रियांकाच्या नजरेस ATM पडणे !
बरे कामे करायची पण त्याची वाच्यता अजिबात करायची नाही, चूकून जर हीची कोणी मैत्रीण रविवारची आली आणि मी काही आवरा-आवर करत असेल तर अशी तडी मिळते ! मुद्दाम हे केलेस, लोकांना (?) दाखवायला, मी कसे राबतो आणि बायको नुसती आराम करते. अरे तु सडसडीत आहेस ते मी तुझ्या खाण्या-पिण्याची चांगली बडदास्त ठेवते म्हणून हे लोकांना माहीत आहे, कळलं (कशाचा काय संबंध म्हणून नका हो विचारू !)
एखादा दिवस असतो बैल-पोळ्याचा म्हणा ! काही चांगल चुंगले खायला मिळते, काही कौतुकाचे चार शब्द कानी पडतात, तुझ्याशिवाय हक्काने रागवायला मला दूसरे कोणी आहे का, तुझ्याच भल्यासाठी बोलते . आणि मग लगेच हूकूम सूटतो, उद्या माझी आई पहाटे पनवेल डेपोला उतरणार आहे, तीला आणायचे ! नंदी बैल मान डोलावतो !
काय सांगू, किती सांगू, कसे सांगू ! रडगाणे तरी किती गायचे ? आणि कोणी ऐकणारा असेल तर ना ? तेव्हा पुरूषांनो, सहीष्णू वृत्ती सोडा, याने देश तर मोडलाच आहे, तुम्ही तरी सावध व्हा ! नोकरीवाली बायको करू नका आणि घरातले काम अज्याबात करू नका !
-- काय ? हो - नाही हो--हो - कळल - जी -- जी -- आलो आलो !

भेट !

भेट !
शनिवारची गोष्ट, संध्याकाळी ५:०० वाजता साहेब निघणार म्हणून वर्दी मिळाली, आज लवकर सूटका कोणार या आनंदात आवराआवर करायला घेतली पण लगेच निरोप आला, जाणे cancel ! साहेबांनी 'मुख्य अभियंता' आणि 'उपाध्यक्ष' यांना बोलावून घेतले आहे ! पुन्हा PC On केला. ५:३० वाजता सिक्युरीटीवाल्याने फोन केला , " पुसद वरून कोणी आलाय, सायबाला भेटायचे म्हणतो, काय करू ?". मी त्या माणसाला फोन द्यायला सांगितले. "तुम्ही साहेबांना कसे ओळखता ?".
त्याचे उत्तर " ते १९८४ मध्ये यवतमाळला 'मुख्य कार्यकारी अधिकारी' होते, त्यांच्या हस्ते मला बक्षिस मिळाले होते"
अहो, आता २५ वर्ष झाली या घटनेला, मध्ये कधी भेटला होतात का ?
नाय बा ? आमच्या गरीबाला काय पडतय कारण ?
अहो, मग आता का ?
असेच, सहज, सायबाच्या बंगल्यावर फोन लावला, बाईसाहेब बोलल्या साहेब कामावरच आहेत. पत्ता शोधत शोधत आलो, झालं ! नुसता एक वार भेटू द्या !
सोड बाबा त्याला आत, पण आधी मला भेटायला बोल !
जरा वेळाने, मराठे सायब कोण ? असे विचारत तो आला, बरोबर अजून एक.
मी विचारले, आता हे कोण अजून बरोबर ?
लगेच बरोबरचा म्हणाला "माझ काय नाही साहेब, आपला याच्या बरोबर आहे, याला भेटवा, मी बाहेरच थांबतो".
लगेच त्याने माझ्या हातात पेपरचे एक कात्रण टेकवले, "हे साहेब, आणि यो म्या"
त्या कात्रणावर निदान ५० तरी फोटो होतो. सगळ्यात मोठा फोटो आमच्या साहेबाचा, त्यांच्याच शब्दात ते 'तरूण आणि तडफदार' सनदी अधिकारी असतानाचा ! आणि मग सरपंच, जिल्हा परिषदेचे बाकी सदस्य, गट प्रमुख, आणि मग शेवटच्या ओळीत 'याचा' फोटो ! मी कपाळावर हातच मारणार होतो. कोठे ही नसती ब्याद पाठी लावून घेतली, आता साहेबाला सांगू तरी काय ? सहकारी खुणेने त्याला कटव (हाकल्) असे सूचवत होते !
"खरंच तुमचे अजून काही काम नाही", मी .
दोघात थोडी चलबिचल ! मग एक दूसर्याला म्हणतो, सांग की खरे काय ते.
साहेब, मुलीच्या नोकरी साठी सबूद टाकायचा होता. साहेब आधी महावितरण च्या संचालक पदी होते. त्यांचा एक फोन काम करून जाईल बघा ! तसे काम झालेलेच आहे, waiting list वर आहेच ती, हे बघा पत्र.
मी ते बघितले आणि थक्कच झालो. ती मुलगी चक्क MCA होती व सहायक अधिकार्याच्या पदासाठी निवडली गेली होती. आता माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पार बदलला. या खेड्वळ वाटणार्या माणसाने, मुलीला एवढे शिकवण्यासाठी किती खस्ता खाल्या असतील ? माझा बदललेला भाव बघून सोबतचा पण बोलला माझी याच्या पोरी बरोबरच waiting वर आहे. मी आता त्यांना बसा म्हटले. चहा सांगितला. चहा नको, नुसते पाणी पाजा, येथवर पोचेपर घशाला पार कोरड पडली आहे ! ती पाणी पीत असतानाच मी साहेबाला हे सांगण्यासाठी गेलो. तेवढ्यात उपाध्यक्ष आत गेले. परत १० मिनीट थांबावे लागले. मग आत गेलो, ते कटींग त्यांना दाखवले, दबक्या आवाजात "आता पाठवू ?" असा प्रश्न केला. साहेबानी नुसती मान हलवली. म्हणजे वांदा ! हो की नाही ! but be always positive, मी त्याचा अर्थ 'हो' असाच घेतला व त्यांना आत बोलावले. अगदी दोघांनाही ! त्यांनी चपला बाहेरच काढल्या, का तर सायबाच्या पाया पडायचय ! त्याच्या आत मी केबिनच्या बाहेर पडलो !
जरा वेळाने ते आले ते हात जोडूनच ! साहेब देवमाणूस हाय, कागद ठेउन घेतले, सबूद दिला आहे, काम व्हणार ! त्यांना अगदी कृतार्थ वाटत होते. माझ्या मात्र पाया पडायचा त्यांचा प्रयत्न फोल ठरवला व त्यांना निरोप दिला.
आत आल्यावर सिनीयर कातावले. मराठे, अशा लोकांना फूटवायला शिक आता !
मी शातपणे म्हटले, "लोक आपल्याला शंकरापुढचा नंदी म्हणतात ते योग्यच आहे, पिंडीवरच्या विंचवापेक्षा नंदीच बरा नाही का ? माझे काही चूकले असे मला तरी वाटत नाही. त्याच्या डोळ्यातले समाधान माझ्यासाठी एक ठेवा आहे !

रविवार, २१ सप्टेंबर, २००८

एन्ड गेम !

एन्ड गेम !
प्रकरण १ -

मी अंजली कुट्टी - वय ३० वर्षे, टीपिकल केरळीयन ! अर्थशास्त्रातला पद्व्युत्तर अभ्यासक्रम केला आहेच पण दाक्षिणात्य नृत्यकलांतही पारंगत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गीतेचा माझा अभ्यासही दांडगा आहे. नृत्याचे माझे भारतभर परफॉर्मन्स होत असतात. बहुतेक काळ मी स्टेजवर तरी असते नाहीतर विमान किंवा ट्रेन मध्ये नाहीतर ऑर्कुटॅगिरी ! माझे वडील फार मोठे बिझनेसमन आहेतच पण केरळच्या राजकारणातले पण वजनदार असामी आहेत. एकुलती एक मुलगी आणि पैसेवाला बाप यामुळे माझे बालपण मस्तच गेले. मोकळ्या वातावरणात मी वाढले . माझी मेन्टॅलीटी तद्दन पुरूषी आहे म्हणूनच की काय मला मैत्रीणी जवळपास नाहीच पण मित्र मात्र भरपूर ! अगदी जगाच्या काना कोपर्यात माझे मित्र पसरले आहेत ! अर्थात याला कारण ऑर्कुटच ! माझा प्रोफाईल सुद्धा माझ्या सारखाच, अगदी मोकळा ढाकळा आहे आणि DP सुद्धा कोणालाही भुरळ पाडणाराच आहे ! मी जेव्हा जेव्हा दौर्यावर जाते, तेव्हा तेव्हा माझ्या दोस्तांना भेट देतेच, बहुदा surprise visit ! फोटोपेक्षा मी जास्तच देखणी आहे असे बहुतेकांचे मत पडते. नवरेगिरीचा मला भयंकर तिटकारा आहे पण निव्वळ वडीलांना बरे वाटावे म्हणून मी ५ वर्षापुर्वी विवाहबद्ध झाले. तसे ते contract marraige च आहे.माझा नवरा अजय आणि माझी भेट एका पार्टीत झाली, तो ही मस्त मौला आहे आणि लग्न हे त्याच्या मते नस्ती ब्यादच ! पण त्याच्याही घरून 'लग्न कर लग्न कर' असा तगादा चालूच होता. हे कळल्यावर मीच त्याच्या पुढे असा प्रस्ताव ठेवला. तसे आमच्यात नुसते नवरा-बायकोचे कागदो-पत्रीच नाते आहे आणि आम्ही दोघेही स्वच्छंदी जीवन जगत आहोत. अजयचा छोटा बीझनेस आहे आणि त्यातच तो रमलेला असतो. त्याची माझी जवळीक केव्हा होणारच नाही कारण "साहीत्य संगीत कला" याचा त्याला जराही गंध नाही, संस्कृत सुभाषितकारांनी अशा मनुष्याला चक्क शींग नसलेला पशूच म्हटले आहे ! हो, संस्कृत सुभाषिते हा सुद्धा माझा आवडीचा विषय आहे. गीतेच्या अभ्यासात पण मी गढलेली असते आणि ऑर्कुटवरील गीतेच्या कट्ट्यावर सुद्धा मी बराच वेळ असते. त्यावर एक टॉपिक माझ्या वाचनात आला "गीता पाठांतराची राष्ट्रीय पातळीवरील big budget स्पर्धा असावी". ही स्पर्धा कशी घ्यायची याचा संपूर्ण draft त्यात होता. topic creator चे नाव होते १नाथ मराठे ! त्याचा प्रोफाइल बघायला गेले तेव्हा तो संपूर्ण मराठीत होता, जी मला अजिबात येत नाही. त्या मुळे हा १नाथ कोण याचे कुतुहल अजूनच वाढले व मी त्याला चक्क मैत्री प्रस्ताव धाडला. त्याने तो स्वीकारला. मग आमच्यात तासंतास chatting सुरु झाले व गाढ परीचय झाला. कमाल आहे नाही, एखाद्याला न भेटता सुद्धा त्याच्या विषयी एवढा विश्वास, जिव्हाळा कसा बरे वाटतो ? तो त्यांच्या जातीच्या कट्ट्यावरच पुढे सक्रीय झाला व पुढे त्याचा ब्लॉगही आला. त्यात त्याने जवळपास १५० सुभाषिते संकलीत केली होती. त्याच्या ब्लॉगवरचे मी वाचू शकेन असे एवढेच होते. पण तरीही त्याचा ब्लॉग मी रोज उघडते कारण त्यातील त्याचा चिकणा फोटो ! अल्बमच्या माध्यमातुन त्याच्या घरातली बाकी मंडळीही माझी चांगली परीचीत झाली आहेत. कधी मधी आम्ही फोनवरही गप्पा मारतो तेव्हा त्याचा आवाजही कानात घुमत राहतो, साठून राहतो. या माणसाला एकदा तरी भेटायचेच ! आणि तो योग ही आता फार लांब नाही. उद्याच मी नेत्रावतीने मावशीकडे , ठाण्याला जाणार आहे, कार्यक्रमही आहेच. गाडी पनवेलला येईल तेव्हा डब्यात तो मला भेटणार आहे. कळेलच तो खरा कसा आहे ते !

प्रकरण २

मी अजय नायर. माझा स्वत:चा व्यवसाय आहे आणि माझ्या सासर्याएवढा नसला तरी बर्यापैकी पैसा आहे। पण राजकारणाचे मात्र मला वावडे आहे. म वरून चालू होणार्या सगळ्याच गोष्टी मला मनापासून आवडतात. त्यात बाधा येउ नये म्हणून मी contract marraige केले खरे पण माझी बायको त्यातला प्रत्येक शब्द खरा करेल असे मात्र मला वाटले नव्हते. तीच्या जीवनात काही फरक पडलाच नाही पण लग्न झाल्यामुळे मला मात्र पहील्यासारख्या मैत्रीणी मिळत नाहीत. धंदा वाढवायचाय पण त्यासाठी पैसा सासरा काही देत नाही, बायको शब्द टाकत नाही. हे जाउ दे हो, पण ती मला जी कस्पटासमान वागणूक देते ती मात्र आता मला असह्य होत चालली आहे. एकाच घरात राहुनही ती मला वार्यालाही उभा करत नाही आणि मी तीचे काहीही वाकडे करू शकत नाही. मला पूर्ण अनाकलनीय विषयात ती गढलेली असते आणि ऑर्कुटींग का काय म्हणतात ते तर माझ्या डोक्यात शिरते. पुरूषांना खेळवण्यात तीला काय एवढा आनंद मिळतो ? आणि ते तरी कसे तिचा फोटो बघुन एवढे पागल होतात ? तीचा कसा ही का असेना मी नवरा आहे आणि हे मी आता खपवुन घेणार नाही. तीचा काटा काढायची नामी संधी आली आहे. थोड्याच वेळात मी तीला सोडायला स्टेशनवर जाणार आहे. ती मुंबईला जाणार आहे, खरच कार्यक्रम आहे का कोणी नवे सावज हेरेले आहे ? या वेळी कोण तीच्या गळाला लागलाय ? जाउ दे. माझा प्लान तर फूल प्रूफ आहे ! नेत्रावती ४:३० ची होती. आम्ही २० मिनीटे आधीच बाहेर पडलो. जाताना मी मुद्दामच गाडीच्या काचा उघड्या ठेवल्या होत्या, गेटवरच्या वॉचमनला 'आम्ही' बाहेर पडल्याचे कळावे म्हणून. थोडे पुढे गेल्यावर मी फोनवरून माहीती घेउन गाडी चार तास उशीरा असल्याचे अंजलीला सांगितले. अपेक्षेप्रमाणेच तीने गाडी परत घरी घ्यायला सांगितली. या वेळी मात्र मी उकडते आहे असे सांगून काचा बंद केल्या होत्या ! घरी आल्या आल्याच तीने पीसी ऑन केला व ऑर्कुटींग करत बसली ! मी आतल्या खोलीत जाउन माझा मास्टर प्लान परत परत तपासत होतो. धीर गोळा करत होतो. शेवटी निर्धार करून मी बाहेर आलो. ती चॅटींग करण्यात मग्न असतानाच मी तीचा गळा आवळला. थोड्याच वेळात तीची धडपड थांबली. संगणक मी डायेरेक्ट बंद केला. तीचे प्रेत बाथरूम मध्ये आणले व चॉपरने त्याचे बारीक बारीक तुकडे केले. ते सर्व एका प्लास्टीकच्या मोठया पिशवीत भरले व ती पिशवी रात्री गाडीच्या डिकीत ठेउन एका ओसाड रस्त्यावर आलो. एका मोठ्या मॅनहोल मध्ये ती पिशवी फेकून दिली ! लगेच घरी आलो. बाथरूम स्वच्छ धुतले. सगळे अगदी बिनबोभाट पार पडले. मग मस्त झोपी गेलो. दूसर्या दिवशी रात्री मुंबईवरून तीच्या मावशीचा फोन आला. अंजली अजून कशी आली नाही म्हणून काळजीत पडली होती ती. मी सुद्धा काळजी वाटल्यासारखे केले आणि अजून थोडावेळ वाट पाहू असे सूचवले. अर्थात तीला मी न परतीच्या वाटेला लावलेच होते ! दूसर्या दिवशी पहाटे सासर्या बरोबर पोलीस चौकीत जाउन तक्रार द्यायचा फार्स पण पार पडला.


प्रकरण ३

मी राजशेखर ! केरळ पोलीसांच्या विषेश पथकातला अधिकारी. तरूण, तडफदार आणि धडाडीचा. राजकारण्यांच्या खास मर्जीतला. पण अशा ओळखी कधी कधी उगाच चिल्लर कामात गुंतवतात. आता हेच बघ ना, कोणी मुंबईला जायला निघालेली अंजली missing होते तर तो तपास सुद्धा मीच करायचा ? अशी किती माणसे रोज हरवतात पण अंजली एका बड्या राजकारण्याची मुलगी, तपास वरच्या पातळीवरूनच नको का व्हायला ? तसा मिळेल ते काम आवडीने, पूर्ण रस घेउन करायचे हा तर माझा स्वभावच आहे. अर्थात अशा केस मधला सर्वात पहीला संशयीत तीचा नवरा अजय ! तेव्हा मी त्याच्या घरी धडकलो. आपण स्वत: अंजलीला स्टेशनवर सोडली हे सांगताना तो जरासा चलबिचल झालेला वाटला. मी तीला अगदी बोगीपर्यंत पोचवायला गेलो नव्हतो यावर त्याने भर का बरे दिला ? बोलण्याच्या ओघात अंजलीचे ऑर्कुट वेडही समजले. ती कायम फीरतीवरच असते व तेव्हा तिच्या मित्रांनाही भेटते हे सांगताना त्याच्या स्वरातला तिरस्कार लपला नाही. मग मी वॉचमनला भेटलो. त्याने त्या दिवशी मॅडम साहेबांबरोबरच गाडीत होत्या हे सांगितले, अर्थात गाडीच्या काचा उघड्या असल्यामुळेच तो हे सांगू शकला. थोड्यावेळाने साहेब परत आले व रात्री खूप उशीरा परत गेले तेव्हा मात्र काचा नेहमीसारख्याच बंद होत्या. मग मी रेल्वे स्टेशनला फोन करून त्या दिवशीचा reservation chart मागवुन घेतला व त्या बोगीत ड्युटी असलेल्या टीसीला पाचारण केले. टीसी ने त्या सीटवरील व्यक्तीने प्रवास केल्याचे सांगितले. म्हणजे अजय सध्या तरी संशयाच्या दायर्यात येत नव्हता. आता मी तीच्या आसपासच्या सीटवरील व्यक्तींची माहीती/ पत्ते काढले. काहींचे मोबाईल नंबरही मिळाले. अंजलीच्या बर्थ जवळच चार बायकांचा ग्रूप होता. फोनवरून त्यांनी दिलेली माहीती निश्चीत या प्रकरणाचे धागेदोरे देत होती. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्या बर्थवरची तरूणी पनवेलला उतरली होती. तसेच साधारण चाळीशीचा, मराठी वाटणारा माणूस बोगीत शिरून तीची चौकशी करत होता. ती आताच उतरली असे सांगितल्यावर, 'गाडी तिथून वेळेवर सूटली का ?' असे विचारून तो तिच्या मागे पळतच गेला होता ! this is interesting ! हा नक्कीच तीचा कोणी ऑर्कुटवरचा मित्र असणार , जो तिला घ्यायला आला होता, पण थोडा उशीरा ! मी लगेच सायबर सेल मध्ये गेलो. या वेळी मी अजयलाही बरोबर घेतले होते. आधी मी अंजलीचा प्रोफाइल शोधून काढला. मग प्रवासाच्या आधीच्या काही दिवसापासून तिच्या scrapbook ची एक फाइल बनवली. त्यात ती आपल्या मुंबई भेटी बद्द्ल फक्त १नाथ या माणसाशी बोलली होती. एकनाथच्या scrapbook ची पण मी फाईल बनवली. अंजलीबरोबर प्रवास करणार्याला बाईला मी MMS मार्फत १नाथ चा फोटो पाठवला व तीने लगेच 'हाच तो' म्हणून सांगितले. yes, i am on right track ! या माणसाचा प्रोफाइल मराठीत असल्याने फारसे काही हाती लागले नाही पण तो पनवेलला राहतो हे खूपच महत्वाचे होते. त्याचा ब्लॉगही होता आणि त्यात त्याने आपला मोबाईल नंबरही दिला होता ! म्हणजे पुढचा तपास आणि कदाचित शेवट सुद्धा पनवेललाच होणार होता ! दोघांच्या scrapbook ची फाइल मी प्रिंट करून घेतली पण मग प्रवासाच्या वेळे आधीचे prints लगेच काढून निघालो सुद्धा ! त्या मोबाईल नंबर वरून मला बरीच माहीती मिळणार होती. त्याचे खरे नाव शरद ओगले होते तर ! अर्थात ऑर्कुटॅवरचे अर्धे प्रोफाईल फेकच असतात म्हणा !
प्रकरण ४

अरे बापरे ! गळ्यात फास अडकलाच होता पण वाचलो ! पण टीसी असे काय सांगतोय की त्या सीटवरून एका तरूणीने प्रवास केला म्हणून ? बरेच आहे की ! हा राजशेखर पक्का वस्ताद आहे, जपून रहायला हवे. सायबर सेल मात्र बराच आधुनिक आहे हा, काय पटपट माहीती मिळाली. तो कोणी १नाथ आता चांगलाच लटकणार ! आणि या पानावर बरे काय माहीती आहे जी राजशेखरने बरोबर घेतली नाही. ती पाने वाचली आणि माझ्या समोर परत फासाचा दोर लटकायला लागला. एसी रूममध्ये पण मी घामाने डबडबून गेलो. साली xx मेली पण आता मला घेउनच मरणार बहुतेक. तेवढ्या वेळात तीने त्या १नाथशी चॅटींग करून , गाडी उशीरा सूटणार आहे, मला तू पनवेलला घ्यायला ये अशी गळ घातली आहे. राजशेखर जेव्हा एकनाथची चौकशी करेल तेव्हा ही माहीती उघड होणारच आहे आणि पनवेलचा तपास पुन्हा त्रिवेंद्रमला येणार आणी आपल्या गळ्यात फास पडणार. नाहीतर तीचा राजकारणी बाप आपला आधीच गेम करणार ! एक खून तर केलाच आहे तेव्हा तिच्या याराला पण संपवून टाकले तर ? तसे काही भाई लोग आपल्या परीचयाचे आहेतच, धंदा म्हटले की हे सगळे आलेच ना ? मोबाइल नंबर वरून १नाथचा नाव , पत्ता मला लगेच समजला. साला, नाव पण खोटेच होते तर ! माहीतीच्या मायाजालात सगळेच साले मुखवटे !
प्रकरण ५

मी कासिम , कासिम भाई ! आपला बी एक बिझनेस , धंदा है ! मौत का सौदागर हू मै ! कोणाचा गेम वाजवायचा असेल तर मला सांगा। एकदम व्यावसायिक असते आपले काम. माझ्या पे रोल वर अनेक शूटर आहेत. ऑर्डर आली की त्यातल्या एकाला मी पिटाळतो. सोबत कट्टा, ५०,००० रू. , १०० % advance देतो मी, मोटारसायकल (चोरलेलीच !), ज्याचा गेम वाजवायचाय त्याचा नाव व पत्ता ! थांबा हा, जरा मोबाईल वाजतोय, कोणाची तरी वाजवायची सुपारी असणार बहुदा. चला, शरद ओगले, राहणार नवीन पनवेल यांचे दिवस भरले आता. अबे वो कल्लू कहा गया बे, जा, उसको बुला जल्दी, अर्जेन्ट !
प्रकरण ६

मी कल्लू, नवीन पनवेल, सेक्टर ३ च्या, रागमालीका इमारती बाहेर सावजाची वाट पहात थांबलो आहे. वॉचमन सांगतो की साब के आना का कोई टॅम नही ! त्याला काय माहीत 'आता' तो जो येणार तो परत जाणारच नाही ते ! गाडीतुन तो उतरला की लगेच त्याला अगदी blank point वरून गोळ्या घालायच्या, मोटार सायकल वरून पसार व्हायचे ! मरण्यापुर्वी आता हा किती वाट पहायला लावतोय ते बघुया !
प्रकरण ७

मी शरद ओगले, रीलायन्स या बड्या कंपनीचा बडा अधिकारी. तशी नोकरी माझी फिरतीची आहे. महा-सेझ चे काम मीच तर बघतो आहे. नेहमीसारखेच संध्याकाळचे सात वाजले तरी काम काही संपत नाही, घरी जाताना होणारा उशीर काही चूकत नाही. आता यावेळा कोण आले आहे भेटायला बरे ! पोलीस ? आताच्या आता चौकशीसाठी बोलवत आहेत. कसली चौकशी, तर माहीत नाही, केरळ वरून कोणी साहेब आले आहेत, गेस्ट-हाउसला उतरले आहेत, तेव्हा लगेच निघा ! आता ही काय बाबा भानगड. राजशेखर हा तपास अधिकारी तसा बराच सभ्य वाटतो आहे, पोलीसी मग्रूरी त्याच्या बोलण्यात तरी जाणवत नाही. पण माझा चेहरा बघून तो बुचकळ्यात का बरे पडला ? ९९८७०३०६३७ हा मोबाईल नंबर माझाच आहे , पण माझा नाही, म्हणजे मी तो वापरत नाही. माझा मित्र एकनाथ तो वापरतो, त्याचे बिलपण तोच भरतो. ते सिमकार्ड मला माझ्या कंपनीने सवलतीच्या दरात दिलेले आहे. काय भानगड आहे ही. हो, तो जो फोटो दाखवत आहे, तो तर एकनाथ ! राजशेखरच्या आदेशावरून त्याला तातडीने बोलावून घेतले. आता तो येई पर्यंत थांबणे आले !
प्रकरण ८

मी श्रीलेखा, नवीन पनवेलला राहते. माझे एक लहानसे बुटीक आहे. त्यासाठी त्रिवेंद्रमला सतत ये-जा होत असते. दोन दिवसा पुर्वीची गोष्ट, मी नेत्रावतीचे एसी तिकीट गाडी सुटायच्या काही मिनीटे आधीच काढले. मला वाटले सिझन नसल्यामुळे निदान एसी बोगी तरी खाली असेल पण कसले काय ! पण हा बर्थ तर रिकामा दिसतो आहे, चला , सध्या तिकडेच बसून घेउ, पुढचे पुढे ! टीसी काही मला दिसलाच नाही आणि प्रवासही छान झाला. कोण असेल ही अंजली, माझ्याच वयाची दिसते पण आली का नाही ? खरी गंमत तर पुढेच आहे. गाडी तब्बल चार तास उशीराने पोचली व मी जड सामान घेउन जीना चढू लागले तेव्हाच एक साधारण चाळीशीचा मनुष्य आला, माझे सामान त्याने अगदी अदबीने घेतले. तो चेहर्यावरून तरी सभ्य वाटत होता . पण आमची तर अजिबात ओळख नव्हती. पुल पार करताना तो म्हणाला अंजली तुझा DP खूपच वेगळा आहे, का तो फोटोच फेक आहे ? म्हणजे हा मला अंजली समजत होता तर ! मी त्याचा गैरसमज दूर केल्यावर कसला शरमलाय तो, sorry असे पुटपुटुन तो झरकन पुढे गेला. त्याला सांगायला हवे होते की तुझी कोण ती अंजली का फंजली आलीच नाही ते ! चला मला आता जायचे आहे चकलीची ऑर्डर द्यायला, कोणी मराठे म्हणून आहे, हे आयटम छान बनवते, अगदी १००% home made !
प्रकरण ९

मी अनुजा एकनाथ मराठे, तशी मी गृहीणीच पण नावाला होम फूडसचा व्याप मांडला आहे. माझा संसार छान चालू आहे, प्रेमळ नवरा व दोन गोजिरवाणी मुले ! नवरा मात्र माझा भारी उचापती आहे. सतत त्याच्या डोक्यात काहीतरी किडा वळवळत असतो. हल्ली काय तर ऑर्कुट व ब्लॉग ! त्यातच अगदी तासंतास गढलेला असतो. कामावर पण तेच घरी पण तेच. त्या मीट काय, वाद-विवाद काय. आणि त्याच्या त्या मैत्रीणी ! वेळी-अवेळी फोन करून याच्याशी अघळ-पघळ गप्पा मारत असतात. मला बिलकूल आवडत नाही ही असली थेर ! हल्ली नवीन ठीकाणी बदली झाल्यापासून तर घरी यायची काही वेळच उरलेली नाही. आठ वाजले, आता कोण बरे आले, हा तर नाही ? चकल्या हव्यात या बयेला. ही काय यायची वेळ झाली का ? म्हणून हा धंदा नको वाटतो अगदी. ती बाई. श्रीलेखा, असे काय म्हणाली की ? म्हणजे आधी तीने प्रसाद आणि प्रियांकाला बघितले , मग 'हे' आहेत का विचारले . मग मुले वडीलांच्या चेहर्यावर गेली आहेत का ? माझ्या नवर्याने चक्क तीचे सामान घेतले व तीला अंजली म्हणून हाक मारली ? आता ही काय नवी भानगड ? थांब त्याला चांगला फैलावरच घेते ! नाही, आताच फोन लावते !
प्रकरण १०

मी १नाथ, sorry, एकनाथ मराठे ! मी कसा आहे ? माझा ब्लॉग किंवा ओर्कुट प्रोफाईल वाचा, तुम्हाला जर कळले तर मला जरूर कळवा ! या अंजलीचे काही खरे नाही। नेत्रावतीने मुंबईला येणार होती. पण गाडीची वेळ होउन गेल्यावर सुद्धा ही बया आपली on line ! गाडी लेटफे असे बोलली. मला पनवेलला घ्यायला आता तु येच असे म्हणत असतानाच अचानक log off झाली. हीला स्टेशनवर भेटेन पण घरी कशी आणू ? माझी बायको म्हणजे एक नंबरची संशयी, तीच्या प्रश्नांच्या सरबत्तीला मी कसे उत्तर देउ ? दूसर्या दिवशी कामावरून येताना सहजच annonuncement झाली की नेत्रावती सूटणार आहे व समोरच एसी कोच म्हणून डब्यात शिरलो तर ही बया आधीच पनवेलला उतरली सुद्धा होती. आणि गाडी तर तिकडून अगदी वेळेवर सूटली होती ! धावत पळत बाहेर आलो तर ती कोणी भलतीच निघाली. नशीब तिने काही गैरसमज करून नाही घेतला तो ! आज दोन दिवस झाले, अंजलीचा नंबर out of coverage आहे. ऑर्कुटवर पण दिसत नाही. दोन दिवसातल्या माझ्या सोडा , कोणाच्याच scraps ना तीने उत्तर दिलेले नाही. काय बरे झाले असेल ? चला काम संपले निघायला हवे. आजपण उशीर झाला आहे. शरद का बरे बोलवून घेत आहे ? ते पण पनवेलच्या गेस्ट हाउस मध्ये, लगेचच ? गेस्ट हाउस वर पोचलो. बाहेर दोन पोलीस शिपाई उभे होते. शरद बरोबर कोणी राजशेखर होता. केरळचा पोलीस अधिकारी. माझा ऑर्कुटवरचा फोटो त्याच्या हातात होता व मला बघुन तो भलताच खुश झाला होता. काय तर म्हणे मी अंजलीचे अपहरण केल आहे किंवा तीचा खून तरी. मला अटक करून तो केरळ गाठणार होता. त्याच्याकडे जी माहीती होती त्या वरून असा निश्कर्ष साध्या शिपुरड्यानेही काढला असता. मी आता पुरता अडकलो होतो. माझ्या घशाला कोरड पडली. शरद माझ्याकडे आता वेगळ्याच नजरेने बघत होता. पण संकटात हात पाय गळणारा मी नाहीच. आता माझे डोके वीजेच्या वेगाने चालत होते. राजशेखरच्या नजरेतुन अनेक गोष्टी सुटल्या होत्या, त्यात सगळ्यात मुख्य म्हणजे टीसी व त्या बायका यांना त्याने खर्या अंजलीचा फोटो दाखवला नव्हता, टीसीने त्या जागेवर बसलेल्या बाईचे तिकीट तपासले होते का हे ही बघितले नव्हते. हे केले असते तर कदाचित त्याला मुंबई गाठावी लागलीच नसती आणि सगळ्यात मुख्य म्हणजे गाडी सुटून गेल्यावरचा आमचा संवाद जो scrap book मध्ये होता, तो. मी राजशेखरला माझे scrap book उघडून दाखवले. आता मात्र तो वरमलाच. सिली मिसटेक त्याने केली होती. त्याने आणलेली प्रिंट बघताना मला आणि एक गोष्ट कळली. त्या कागदावर १/५, २/५, ३/५ असे नंबर होते, मग दोन पाने कोठे गेली, ज्या वर आमचा पुढचा संवाद होता ? भयानक म्हणजे त्या वेळी त्याच्या सोबत अजय सुद्धा होता. आधी दूसराच कोणी गोत्यात येतो म्हणून खुश झालेला अजय नक्कीच सावध झाला असणार. परंतु एवढे सांगुनही राजशेखर मला सोडायला तयार नव्हता. माझी अधिक चौकशी तो मला केरळला नेउनच करणार होता. ती पनवेलला उतरलेली बाई जर मला सापडली तरच मी यातुन सूटणार होतो. पण ते कसे शक्य होते ? एवढ्यात हीचा फोन आला. चायला, पनवेलला अंजली समजून भलत्याच बाईच्या पाठी पडलो होतो हे हीला कसे कळले ? अहो देवच पावला ! 'ती'च बाई चक्क चकलीची ऑर्डर द्यायला आली होती व अर्थातच तीने आपला मोबाइल नंबर पण दिला होता. मी उत्साहाने हे सगळे राजशेखरला सांगितले व तीचा नंबरही दिला. राजशेखरची मतीही आता गुंग झाली होती. हे प्रकरण वाटते तेवढे साधे नव्हते तर. त्याने श्रीलेखाचा नंबर लावला, मुद्दामच केरळी भाषेत तो तीच्याशी निदान अर्धा तास तरी बोलला. त्याने फोन कट केल्यावर लगेच त्याला एक mms आला, त्यात श्रीलेखाचा फोटो होता ! त्याने लगेच तो बोगीत, शेजारी बर्थ असलेल्या बाईला forward केला. लगोलाग तिला फोन करून त्या दिवशी प्रवास करणारी तरूणी हीच असल्याची स्वत:ची खात्री पटवली. आता तणाव, संशयाचे धुके जवळपास विरले होते. पण राजशेखर खमक्या पोलीस अधिकारी होता. जो पर्यंत तो टीसी श्रीलेखाचा फोटो ओळखत नाही तो पर्यंत आता तो मला सोडणार नव्हता. तसे त्याने त्रिवेंद्रम स्टेशनला फोन करून 'त्या' दिवशी, नेत्रावती सुटायच्या आधी, एखादे एसी वर्गाचे तिकीट विकले गेले होते का अशी विचारणा केली होती, त्याचेही उत्तर यायचे होते. मग मी शरद ओगले यांना तरी मोकळे करा अशी विनंती केली ती मात्र त्याने लगेचच मान्य केली. शरद मोठ्या अनिच्छेनेच निघाला. राजशेखर बरोबर आता माझ्या अवांतर गप्पा चालू झाल्या. आता त्याला माझ्या बद्दल आदर जाणवत होता. एवढ्यात माझा मोबाईल वाजला.
एन्ड गेम !

"ओगले साब, आप कब आ रहे है, मै आपके लिये कुरीयर लेके आया हू, ओर कितना रूकू" असे कोणीतरी बोलत होते। मी चमकलो, ओगले साहेब ? मी म्हटले " तो वॉचमन के पास देके निकल जाओ" तेव्हा तो म्हणाला "नही, आपकोही देना है, रूकता हू, दूसरा चारा ही तो नही है " परत माझे डोके भणभणू लागले व मी ताडकन बोललो, "सर. ओगलेसाब की जान खतरे मे है". मी लगेच शरदला फोन लावला, त्याने बर्याच वेळाने तो घेतला. तो वेळ मला अगदी जीवघेणा वाटला. मी शरदला स्पष्ट सांगितले की तुझ्या जीवाला धोका आहे, तुझा मारेकरी तुझी तुझ्या घराखालीच वाट पहात आहे तेव्हा आहे तिकडेच थांब. शरद त्याच्या घराच्या गल्लीवरच थांबला होता तेव्हा मी त्याला थोडे लांब, म्हणजे शबरी हॉटेल जवळ थांबायला सांगितले. कोणीतरी भाडोत्री मारेकरी, अर्थात अजयने नेमलेला, मी समजून शरदलाच उडवणार होता. अर्थात फासाचा दोर चुकवण्यासाठी माझा जीव घेणे त्याला भागच होते. मी आणि राजशेखर टॅक्सी करून निघालो. त्याच्या बरोबर त्याचे सर्व्हीस रीव्हॉल्वर होतेच. पोलीस नियंत्रण कक्षाला पण सतर्क केले गेले. शबरी हॉटेलच्या जवळ, आपल्या गाडीत थांबून शरद आमची वाट बघत होता. आम्ही पुढे निघालो. आम्ही वेगळ्या वाटेने त्याच्या घराजवळ पोचणार होतो. मारेकरी कोण ते हेरणार होतो व मगच शरद ने पुढे यायचे ठरले होते. मोटरसायकलजवळ उभा असलेला तो तरूण आम्ही लगेच हेरला. अजून खात्री पटण्यासाठी आम्ही त्याच्या नंबरला कॉल दिला. बेल वाजताच कट केला. आणि एवढ्यात गोंधळ झाला. शरद गाडी घेउन चक्क घराच्या फाटकापर्यंत पोचला सुद्धा ! मोटरसायकलचे इंजिन सुरू ठेउन तो तरूण आता झरझर चालत शरदच्या दिशेन जाउ लागला. आता कट्टापण त्याने तयार ठेवला होता. त्याला खरे तर आम्हाला जिवंत पकडायचे होते पण शरदचा जीव धोक्यात घालून नक्कीच नाही ! राजशेखरला त्याला आपल्या रेंज मध्ये ठेवण्यासाठी थोडे पळत जाउनच त्याच्यावर गोळी झाडावी लागली ती चुकलीच. लगेच तो त्याच्या मोटारसायकलच्या आडोशाला गेला. राजशेखर आता पूर्ण उघडा पडला होता !मी मोठयाने ओरडून शरदला गाडी पुढे घेउन राजशेखरला कव्हर दे असे सांगितले. शरदने गाडी वेळेवर पुढे आणली नसती तर त्या शूटरच्या गोळीने राजशेखरचा वेध घेतलाच असता. एकदा गाडीचे कव्हर मिळाल्यावर राजशेखरने फारसा वेळ लावला नाही. तेवढ्यात दूसर्या टोकाने पोलीसांची सशस्त्र कुमक सुद्धा आली. मोटरसायकलच्या पाठी लपलेल्या त्या सशस्त्र गुंडाची चाळण झाली. राजशेखर , शरद व मी एकमेकांना गळामीठी मारली. गोळीबाराचा आवाज ऐकुन आसपासचे लोक गोळा झाले होते. एवढ्यात राजशेखरला टीसीने श्रीलेखाचा फोटो ओळखल्याचे समजले. तसेच त्या दिवशी तो तपासणीसाठी गेला तेव्हा ती बाई झोपली होती, पण साधारण वय जुळत होते म्हणून तो जास्त खोलात शिरला नव्हता याचाही खुलासा झाला. राजशेखरने लगोलग केरळला फोन लावून अजयला ताब्यात घ्यायच्या सूचना दिल्या. त्याच्या चेहर्यावर आता अतीव समाधान होते. एका खुनाची उकल झाली होती तर एक हकनाक जाणारा जीवही वाचला होता. उद्याच्या मिळेल त्या फ्लाइटने तो त्रिवेंद्रम गाठणार होता. माझा निरोप घेताना हातात घेतलेला हात त्याने बर्याच कष्टाने सोडवला. संध्याकाळच्या कातरवेळी सुरू झालेल्या या नाटकाचा शेवट होई पर्यंत पहाट झाली होती ! एरवी मला हा दिवस अंधार कोठडीतच काढावा लागला असता. या पहाट-वार्याची मजा काही औरच होती !

शनिवार, २० सप्टेंबर, २००८

बॅक-अप नव्हे रोल-बॅक !

बॅक-अप नव्हे रोल-बॅक !
१९९८ मध्ये आमच्याकडे वेतन वाढीचा करार झाला. दोन वर्ष वाटाघाटी चालल्या व १९९६-२००६ असा १० वर्षाचा करार व्यवस्थानाबरोबर झाला. आता मागची दोन वर्षाची थकबाकी द्यावी लागणार होती. संगणकावर पगार-पत्रक आधीच घेतले असल्यामुळे थकबाकीचे काम सुद्धा संगणाकाच्याच सहाय्याने करायचे ठरले. त्या मुळे वेळ व जादा कामाचा भत्ता पण वाचणार होता. आमच्या ११ विभागात एकाचवेळी हे काम चालू करण्यात आले. साधारण महीन्याभरात काम पूर्ण करायचे होते. प्रत्येक विभागाने माझ्या कार्यालयात माणूस पाठवून आठवड्यातुन एकदा सेफ्टी बॅक-अप घ्यावे असेही ठरले. त्या प्रमाणे सगळे व्यवस्थित चालले होते. ठरल्या वेळेत सगळे काम आटोपले. अभियांत्रिकी(CE) विभाग थोडा मागेच होता पण शेवटच्या आठवड्यात त्यांनी जोर लावून सगळे काम पूर्ण केले. त्यांचा एक माणूस बॅक-अप घेण्यासाठी cartridge घेउन माझ्याकडे आला. मी कामात असल्यामुळे अतुलने ते काम आपल्याकडे घेतले.


CE विभाग सोडून बाक्या सगळ्या विभागांची थकबाकी पत्रके तयार झाली. CE वाले मात्र काहीतरी गोंधळ झाल्याचे सांगत होते. त्यांच्या विभगाची थकबाकी अगदीच कमी येत होती. अधिक तपास केल्यावर कळले की त्यांनी शेवटच्या आठवड्यात भरलेली माहीती गुल झाली होती. प्रकरण माझ्या संगणक विभागाकडे आले. मी बॅक-अप रजिस्टर तपासले. मग त्या विभागाच्या संगणकावर असलेल्या डाटा फाइलची तारीख तपासली आणि सगळा घोळ लक्षात आला ! शेवटच्या बॅक-अप चे आधीचे बॅक-अप नेमके त्याच तारखेला घेतले होते ! मी अतुलला बोलावले आणि बॅक-अप काय कमांड देउन घेतलेस ते विचारले. अतुल ने tar -xvf असे सांगितले. खरे तर ही कमांड cartridge वरचा डाटा हार्ड डिस्क वर घेण्यासाठी द्यायची असते. त्यामुळे नवीन केलेल्या कामाचे बॅक-अप घेतले जाण्या ऐवजी रोल-बॅक झाले होते आणि आता परत सगळे काम करण्यावाचून गत्यंतर नव्हते ! सगळेच नवे असल्यामुळे याची आम्ही फारशी वाच्यता केली नाही आणि computer mistake असे नमूद करून त्या प्रकरणावर पडदा टाकला. पण आता झोपेतही अतुल कधी कधी tar -cvf बॅक-अप घेण्यासाठी, tar -xvf री-स्टोर करण्यासाठी आणि tar -tvf बॅक-अप काय घेतले ते बघण्यासाठी असे घोकत असतो !

नानाचा चहा !

नानाचा चहा !
असाच एकदा एका मित्राला भेटायला दादरच्या चाळीत गेलो. दूपारची वेळ होती. मित्र घरी नव्हता पण बाजूच्या चाळीत गेल्याचे कळले, त्या चाळीकडे मोर्चा वळवला तेव्हा कळले की दूसर्या मजल्यावर पत्ते खेळतोय. दोन मजले वर चढलो तर कळले की तो पिक्चर बघायला गेला आहे. परत फिरणार तोच त्याच्या वडीलानी आवाज दिला , "अरे मराठे, एवढा आलाच आहेस तर चहा तरी पिउन जा, ये बस". चहाची टपरी खालीच दिसत होती. त्यांनी आवाज दिला, "नाना, अरे एक स्पेशल चहा पाठव, एकदम urgent !". मी डाव पाहत थांबलो पण चहाचा काही पत्ता नाही, असे 'प्रबोधन' चार वेळा करून झाले, पण नाना काही चहा पाठवेना. एवढ्यात खेळात अजून एक भिडू वाढला. त्याने बसतानाच "एक स्पेशल्" अशी हाक दिली आणि लगेचच पोर्या कपात चहा घेउन हजर !


आता मला नाना म्हणजे ना ना आहे हे लक्षात आले. मी मित्राच्या वडीलांना म्हणालो, "काका, मला उशीर होतोय, मी निघतो, जाताना तुमच्या मस्तवाल नानाला जरा धडा शिकवायचा म्हणतो, त्याला चांगला खडसावतो, तुम्ही फक्त एक करा, तो जेव्हा खालून तुम्हाला काही विचारील तेव्हा हो असे म्हणा !". खेळात रमलेल्या काकांनी मुंडी हलवली. मी त्या टपरीवर गेलो, एक स्पेशल चहा गळ्यात उतरवला. मग त्या चहावाल्याला म्हणालो की काकांना आज जॅकपॉट लागलाय, ते सगळ्यांना स्पेशल चहा पाजणार आहेत, या चहाचे पैसे पण ते तेव्हाच देतील. टपरीवाला हैराण ! अहो काय सांगता राव, सगळ्यांना नानाचा चहा पाजतो तो, लय खवट हाय, मला नाय पटत ! "मग विचार आवाज देउन ! " मी. त्याने आवाज दिला, "काय वो, यो म्हणतोय ते खर का ?" लगेच "हो" असा काकांचा होकार आला. मी लगेच कलटी मारली !


दूसर्या दिवशी मित्र विचारत होता की बाबा तुझ्यावर एवढे का पिनकले होते ? काय झाले तरी काय ? तुझ्या नावाने नुसता तळतळाट करत होते ! मी शांतपणे म्हणालो " मी काल त्यांना नानाचा चहा पाजला !"

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २००८

मेमो !

मेमो !
ऑस्करची मुंबै बंदरातली नोकरी व माझी संगणक विभागातली उमेदवारी बरोबरच सुरू झाली. वयात फारसा फरक नसल्याने मैत्री ही जमली. जसा कामाचा पसारा वाढला तसा कामत नावाचा अधिकारी आमच्याकडे नियुक्त झाला. त्याने ऑस्करला आम्हा बद्दल भलते सलते भरवायला सुरवात केली. हे गोदी विभागातले लोक पक्के लबाड, बनेल असतात. त्यांच्या बरोबर राहून तू बिघडशील ! हळू हळू ऑस्करने आमच्यात मिसळणे बंद केले. मग केव्हातरी दोन विभागांचे हीतसंबंध आडवे येउन आमच्या छुपे वैर निर्माण झाले. तांत्रिक ज्ञानात आम्ही कच्चे होतो आणि या मुळेच ऑस्कर येता जाता आमचा पाणउतारा करू लागला. हे सगळे असह्य झाल्यावर अभ्याने त्याला धडा शिकवायचे काम माझ्यावर सोपवले. मी लगेच ऑस्करची संपूर्ण माहीती गोळा केली. तो 'सहानुभुती तत्वावर' कामाला लागला होता. १२ वी पण पास नव्हता. त्याला बराच ओव्हर टाईम मिळत होता, तो काही बाहेरची कामेही करत होता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याला मिळत असलेल्या ओव्हरटाईमने त्याच्याच विभागाची माणसे त्याच्यावर खार खाउन होती.


सर्व माहीती काढल्यावर मी एकदा ऑस्करच्या कानावर घातले की तुझ्या विभागाची माणसे तुझी फारच खोलात चौकशी करत आहेत, तेव्हा सावध रहा, खोटा ओव्हरटाइम लिहू नकोस, गोत्यात येशील. पण ऑस्करने माझे बोलणे उडवून लावले. कामत साब मेरे पीछे है, मै किसको डरता नही ! नंतर एक आठवड्याने त्याला कामावर आल्या आल्या एक बंद पाकीट दिले, त्याच्याच नावाचे, आमच्या सतर्कता विभागाचे (vigilance)! घाबरतच त्याने ते उघडले. पत्र वाचताच त्याचा चेहरा साफ पडला, भेदरला पार तो. "सालो ने मेरा vigilance मे कंम्लेंट किया , अब क्या होगा? जरा पढो तुम भी ! मला पत्र वाचायची काय गरज होती, मीच तर ते लिहीले होते ! मी साळसूदपणे बोललो, "i have warned you, but -- जाओ, कामत साब को दिखाओ, तुम्हारे godfather है ना !" कामत एक नंबरचा टरक्या होता. vigilance चे नाव येताच त्याने ऑस्करची साथ सोडली ! मग अभ्याने त्याला कोपच्यात घेउन समजावले, " ये मराठे है ना, उसकी पहुंच बहुत है, वो ही तुम्हे बचा सकता है" झाले, ऑस्कर माझ्या खनपटीलाच बसला. "मेरा गलती हुआ, कामत ने मुझे भडकाया, पुराना सब भुल जाकर मुझे बचाओ!" मी पण गंभीर झाल्याचा आव आणला व ते पत्र आधी माझ्या ताब्यात घेतले. "मॅटर सिरीयस है, लेकीन अपने दोस्त के लिये जान भी हाजिर है , don't worry, i will study and reply to this memo !" ऑस्कर भलताच खुश झाला. मग संध्याकाळी हॉटेलात बसून आम्ही फराळ करत चर्चा करायचो, उत्तराचा draft बनवायचो, नीट नाही उतरला म्हणून फाडून टाकायचो. बिल आले की ते ऑस्करच्या पुढ्यात टाकायचो, बडीशेप खाउन चालू पडायचो ! असे ऑस्करला बरेच झुलवल्यावर, त्याचा खिसा हलका केल्यावर मी draft final केला, त्याची वर सही घेतली, बाजू मांडायची माझ्याकडे authority घेतली व मग महीनाभराने केस फाईल करून टाकली, म्हणजे, दोन्ही पत्र फाडून टाकली हो ! ऑस्कर अजूनही जो भेटेल त्याला "भटने मेरी नौकरी बचायी" असे सांगत असतो !

वाटाड्या !

सालं हे नेहमीचेच आहे ! 'ट्रेक काढा , ट्रेक काढा' म्हणून हाकारा करायचा आणि काढला की काहीतरी कारण सांगून टांग मारायची. आजही तेच झाले. विसापूर-लोहगड-लेणी असा कार्यक्रम ठरला होता. पंढरपूर पॅसेंजर सूटायची वेळ झाली तरी व्हीलर बुक-स्टॉल जवळ आम्ही तीघेच, मी, माझा मुलगा व उदय सावंत ! शेवटी तर तिकीट काढायलाही वेळ मिळणार नाही अशी वेळ आल्यावर आम्ही तसेच गाडी पकडली व सामान ठेवायच्या रॅकवर स्थानापन्न झालो।
रात्री केव्हातरी मळवली आले आणि घाबरत घाबरत आम्ही फलाटावर उतरलो पण टीसीच काय , चिटपाखरूही आमच्या स्वागताला नव्हते। रेल्वे स्टाफच्या खोल्यांसमोरच्या फूटपाथवर आम्ही ताणून दिली व भल्या पहाटे विसापूर कडे कूच केले. गडाच्या तटबंदीच्या दिशेने चालत राहलो पण वर जायची वाट काही सापडेना. चालून चालून पायाची चाळण व्हायची वेळ आली पण वाट काही सापडेना, वाटेत दूसरे कोणी माणूस दिसेना. मग गावात शिरलो व कोणी वाटाड्या मिळेल का याची चौकशी करू लागलो. एका बाईने आपल्या १० वर्षाच्या मुलाला ५० रू. च्या बोलीवर सोबत दिले. त्याला घेउन आम्ही निघालो. थोडे पुढे गेलो तर पाठून एक परकरातली मुलगी पण येउ लागली. हा मुलगा तिला जा असे सांगू लागला तरी पण ती आमचा पिच्छा सोडेना. वाटेत तिच्या त्या मुलाबरोबर काही कानगोष्टी झाल्या व मग ती सुद्धा आमच्या सोबत येउ लागली. पोरटे अवलीच होते व बोलघेवडे. अनेक गंमति तो आम्हाला सांगत होता, शाळेच्या, मास्तरांच्या, वाट चूकणार्या ट्रेकर्सच्या, शेरातल्या (शहरातल्या) मुलांच्या ! बोलण्याच्या ओघात त्याने एका ट्रेकरचा कसा कॅमेरा चोरला ते पण सांगून टाकले.
थोड्याच वेळात आम्ही गडावर पोचलो। पाठीवरच्या सॅक आम्ही बाजूला काढून ठेवल्या. मी बायकोला फोन करून मोहीम फत्ते झाल्याचे कळवले. फोन कट करून मागे वळताना तो मुलगा सॅकशी काहीतरी चाळा करताना दिसला, पण अगदी ओझरता, त्या मूळे त्याला काही विचारले नाही. सॅकच्याच मागच्या कप्प्यात मी पैसे ठेवले होते पण ते मोजले नव्हते, ५०, १००, ५०० अशा नोटा होत्या त्यात. काही वेळ तटबंदी दाखवल्यावर अचानक तो मुलगा घाई करू लागला. मी तुम्हाला परतीची वाट दाखवतो, मला जरा घाई आहे, माझे पैसे द्या व मला सोडा. शेवटी तर तुम्ही माझे पैसे नाही दिलेत तरी हरकत नाही, मी चाललो. असे म्हणून तो निघाला सुद्धा ! त्याच वेळी गावातल्याच तरूण-तरूणींचा एक मोठा ग्रूप वरती आला. त्यांच्या बरोबरच तो मुलगा परत फिरला. त्याच्या डोळ्यातली चमक मी बरोबर हेरली. तुम्हाला मी परतीच्या वाटेपर्यंत सोडतो व परत फिरतो, माझे पैसे द्या. आम्ही तयार झालो. आता तो आमच्या , खास करून माझ्या मागेच राहू लागला. मध्येच त्या परकरी मुलीबरोबर तो १० मिनीटे पाठी थांबला व भलत्याच वाटेने ती दोघे पुन्हा आमच्यात सामील झाली. माझा संशय आता चांगलाच बळावला. वाटेत मी त्याला चोरी कशी वाईट याची एक बोधकथा सांगितली पण पैशाच्या मोहाने तो पार आंधळा झाला होता. आता आम्ही सपाट वाटेवरून चालत होतो. सूर्याच्या स्थितीमुळे आमच्या सावल्या बाजूलाच पडत होत्या. त्याच्या सावलीवरून माझ्या सॅकमधेले पैसे काढायचा त्याचा विचार स्पष्ट झाला. त्याने सॅकला हात घातला की लगेच मी माझा वेग वाढवत होतो पण तरीही तो शहाणा, सावध होत नव्हता. आता त्याने एक लहान काठी हातात घेतली व सॅकची चेन उघडली. काठी फेकून दिली व अधीरपणे कप्प्यात हात घातला. त्या क्षणी मी पाठी वळून त्याची मानगूट पकडली. त्याला मी अजिबात मारणार नव्हतो , फक्त माझे आधी चोरलेले पैसे परत घेणार होतो पण त्याने उलटाच कांगावा केला. 'शेरातली मुले माझे पैसे देत नाहीत , वर मलाच चोर ठररवत्यात, मारत्यात, वाचवा' असे बोंबलू लागला. सोबतची मुलगी पण 'वाचवा, वाचवा' असे ओरडू लागली. आता मात्र माझी तार सटकली. गावातले तरूण बर्यापैकी लांब होते, ते जवळ येउन आम्हाला घेरे पर्यंत मी त्या मुलाला लाथा- बुक्क्यांनी मारून अर्धमेला केला. गाववाले बाह्या सरसावून तयार झाले. मी शांतपणे पण ठामपणे त्यांना सगळा प्रकार सांगितला. याने तुमच्या गावाचे नाव खराब होईल असे सुनावले. सोबतच्या तरूणींवर शायनिंग मारण्यासाठी असेल कदाचित, त्यांचा रोख त्या मुलाकडे वळला. त्याने त्याला 'गावाचे नाव खराब करतोस, लाज नाही वाटत चोरी करायला' असे म्हणत चांगलेच बदडले. माझे चोरलेले पैसे, जे त्याने एका दगडाखाली लपवून ठेवले होते, २०० रू, परत द्यायला लावले. मग ते सगळेच गावाकडे निघाले. आम्ही परत वाट चूकलो पण आमचा वाटाड्याच भलत्या वाटेने गेल्यावर आम्ही तरी काय करणार ? परत गावाच्या वाटेने पाठी फिरणे धोक्याचे होते तेव्हा आम्हीच हिंमत करून एका घळीत उतरलो, साधारण तासभर खाचा-खळग्यातुन उतरल्यावर एकदाची आम्हाला पायवाट सापडली व मग आम्ही तडक लोहगड गाठला !

तेव्हा ट्रेकर मित्रांनो वाटाड्या सोबत घेताना काळजी घ्या नाहीतर तोच तुमची वाट लावायचा !

गुरुवार, १८ सप्टेंबर, २००८

गुरू-घंटाळ - एक तीन अंकी नाट्य !

गुरू-घंटाळ - एक तीन अंकी नाट्य !
प्रवेश पहीला
काळ १९९३. माझी संगण विभागात उमेदवारी चालू होती. साहेब पण नवेच होते, नियोगी नावाचे बंगाली बाबू. चेन स्मोकर, धूरांडेच. जरा जोडून सुट्ट्या आल्या की साहेब त्यांचे गाव गाठायचे आणि आरक्षणाचे काम टाकायचे त्यांच्या शिपायावर, भोसलेवर ! बिचारा भोसले, भल्या पहाटे रांग लावून टोकन घ्यायचा, दूसर्या दिवशी तिकीटा करीता दोन-एक तास रांगेत थांबल्यावर मोठ्या कौतुकाने साहेबाला तिकीट दाखवायचा पण तो पर्यंत साहेबाचा विचार आणि प्रवासाची तारीख बदललेली असायची, किंवा सीट नंबर संडासजवळचे आहेत असे सांगून त्याला परत रद्द करण्याकरीता पिटाळत ! परत सगळा सव्यापसव्य ! असाच एकदा साहेबाच्या केबिनमधून बाहेर आलेला भोसले माझ्या समोर मटकन बसला आणि काकूळतीने म्हणाला, "यातुन मला सोडवा !" मी ही लगेच त्याला प्रसन्न झालो व त्याला एक कानमंत्र दिला. आधी नाही नको म्हणणारा भोसले 'तुम्ही साथ देणार ना ?" असे कन्फर्म करून तयार झाला.


प्रवेश २

दूसर्या दिवशी साहेबांनी 'भोसले अबतक कैसा नही आया' असे निदान चार वेळा तरी विचारले. साधारण ३ वाजता भोसले आला, आमची नेत्रपल्लवी झाली. मी धावत पळत साहेबाच्या केबिन मध्ये गेलो आणि घाबर्या-घुबर्या आवाजात 'साहेब भोसले' एवढेच बडबडत राहीलो. वैतागुन साहेब केबिन बाहेर येताच भोसलेने त्याचे पाय घट्ट पकडले आणि थोबडीत मारून घेउ लागला ! मी भोसलेला 'काय झाले ते सांग' असे सांगितले तेव्हा मोठ्या प्रयासाने भोसलेने सांगितले की मी रांगेत उभा होतो, साधारण दोन तासाने नंबर नंबर जवळ आला तेव्हा पैसे काढायला खिषात हात घातला तेव्हा कोणीतरी गर्दीत पाकीट मारल्याचे कळले. साहेबाला मी या सगळ्याचे इंग्रजी भाषांतर करून सांगितल्यावर त्याने नुसता थयथयाट चालू केला ! xxx च्या भाषेत कोकलून दमल्यावर त्याने मला त्याचा रीपोर्ट करायला फर्मावले. मी साळसूदपणे काय लिहायचे असे विचारले तर उतर आले जे झाले ते लिही. तो सस्पेंड झाला पाहीजे ! मी त्यांना समजावले की असे काही केलेत तर तुम्हीच सस्पेंड व्हाल कारण कामावरच्या कर्मचार्याला असे व्यक्तीगत कामासाठी पाठवता येत नाही ! आता मटकन बसायची पाळी साहेबाची होती ! मतलब मेरा ४००० रूपया ये xxx के xxx मे गया ? आता भोसले कसलेला अभिनेता बनला होता. वेड्यासारखे हातवारे करत होता, मध्येच 'मै पाई-पाई चूका दूंगा' असे बरळत होता आणि शेवटी गलीतगात्र झाल्यासारखा फतकल मारून बसला, मग गुडघ्यात डोक खुपसून रडू(?!) लागला. नाटक छान वटले, साहेब वरमला, शांत झाला. बादमे देखेंगे म्हणून निघून गेला. पुढचे काही दिवस भोसले अभिनयाचे नवे नवे रंग दाखवत होता आणि नियोगी साहेब पार हादरून गेला होता ! शनिवारी साहेबांना हाफडे असतो. ते गेल्यावर मी भोसलेला बोलावले व आता नाटक पुरे झाले , कामाला लाग म्हणून सांगितले. लगेच भोसलेने माझे पाय धरले व अजून काही दिवस थांबूया, लय मजा येते आहे असे म्हणू लागला. मी बोललो आता हा खेळ पुरे झाला. कामाला लाग. तर त्याने एकदम आक्रमक पवित्रा घेतला. तुम्हीच मंत्र दिलाय, मी आता असाच वागणार, कोण माझे काय करते (उखडते/उपटते) ते बघू अशी भाषा करू लागला ! भोसले असा उलटल्यावर माझा सगळा स्टाफ स्तंभितच झाला व आता मी काय करणार अशी चर्चा होउ लागली.


प्रवेश ३
काही क्षण गोंधळाचे गेले व मग शांतता पसरली. "भोसले बापाला xxxx शिकवतोस ? उपकाराची फेड अशी करतोस ? तुला काय वाटले असे ढोंग मी खपवून घेईन ? आता मी काय सांगतो ते नीट ऐक आणि मग काय ते सांग. माझ्या आवाजातली जरब, भाषा ऐकून भोसलेचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. शॉक बसावा तसा तो ताडकन उभा राहीला. अपेक्षित परीणाम साधल्यावर मी पुढे बोललो, "तुझे जॉब कार्ड बघ 'त्या' दिवसाची तुझी हजेरी मी लावलेली आहे पण लेबर रीटर्न मध्ये स्पष्ट रीमार्क पास केलाय , ८:०५ ते ३ वाजेपर्यंत मिसींग म्हणून तसेच तुझा मिसींग रीपोर्ट पण तयार आहे आणि वेड्याचे नाटक केलेस तर ambulance बोलावून तुला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवू शकतो, मग ३ महीने सक्तीची रजा आणि मग तू खरंच वेडा कसा होशील हे तुला पण कळणार नाही ! आणि हो , उद्या साहेबाचे ४००० रूपये माझ्याकडे आणून द्यायचे !" भोसलेला ५०० वोल्टचा शॉकच बसला जणू ! आता त्याने माझे पाय धरले पण तो अभिनय नक्कीच नव्हता ! भोसले सुतासारखा सरळ झाला. त्याने साहेबाचे पैसे आणून दिले व मी ते लगेच त्यांना परत केले. भोसले शहाणा झालेला बघून नियोगी साहेबाला वेड लागायची पाळी आली. 'मराठे ये कैसा हुआ ?', मी सांगितले की 'पागल आदमी कभी कभी शॉक देने के बाद सुधर जाता है' !

बुधवार, १७ सप्टेंबर, २००८

गेम (भाग १ )

गेम (भाग १ )
"मै अमिताभ बच्चन बोल रहा हूं" हा खर्जातला आवाज ऐकण्यासाठी लाखो लोक अगदी आतूर असायचे ! त्या नंबरला फोन लावणे, अचूक पर्याय डायल करणे, मग KBC चे बोलावणे, 'फास्टेस्ट फींगर फस्ट' मध्ये जिंकायचे आणि मग अमिताभ समोर हॉट सीट वर बसून काही लाख तरी जिंकायचेच अशी स्वप्ने अनेकांना पडत असत. तिथे पोचलेले अगदीच 'हे' आहेत, मला मिळाला चान्स तर मी करोड पण जिंकेन असे प्रत्येकालाच वाटायचे मला तर स्वत:च्या सामान्य ज्ञानाबद्दल अगदी असामान्य अभिमान होता/आहे आणि तशी खात्री निदान घरच्या माणसांची तरी पटलेली होती. ही रोज अगदी बोटं दुखे पर्यंत तो नंबर फीरवायची पण "इस समय सभे लायने व्यस्त है" हेच दर वेळी कानी पडायचे ! एकदा मला हीने भल्या पहाटे उठवले व फरफटतच फोन जवळ घेउन गेली, नंबर लागला आहे, पटकन उत्तर दे ! अर्धवट झोपेतच मी बरोबर उत्तराचा क्रमांक डायल केला आणि उत्तर बरोबर असल्याचा voice prompt ऐकूनच भानावर आलो. अरे, एक स्टेप तर पार पडली म्हणायची ! हा प्रसंग मी कामावर सांगितला आणि ज्यांचे अजून फोन एंगेजच लागत होते, त्यांची छान जळवली ! घरी प्रत्येक येणारा फोन उत्सूकता ताणून धरायचा, ही बहुतांश वेळ फोन जवळच बसलेली असायची ! पण 'तो' कॉल काही येत नव्हता. प्रतीक्षेचे तीन दिवस संपले आणि दूपारी हीने कामावर फोन केला. हीचा आवाज भयंकर उत्तेजित , excited वाटत होता. 'अरे तुला बोलावलय----' ! ऑस्कर आणि अभय प्रधान बाजूला घुटमळतच होते, काय झाले तरी काय, या त्यांच्या प्रश्नाला मी 'बुलावा आया है' चा वृत्तांत कथन केला ! ही बातमी वार्या सारखी पसरली, सगळे माझ्याकडे आत्तापासूनच पार्टी मागू लागले ! पुस्तके रीकमेंड करू लागले, 'फोन अ फेन्ड' साठी आपला नंबर देउन अर्धा वाटा कबूल करून घेउ लागले !

घरी परतताना लोकल मध्ये बसलो आणि 'खयालोंमे' अशी अवस्था झाली. तो भव्य सेट, उस्ताही प्रेक्षक, बाकी नउ स्पर्धकांबरोबर मी, अमिताभ प्रश्न फेकतो आणि पापणी लवायच्या आत मी उत्तर फीड करतो आणि जिंकतो ! आता समोर फक्त अमिताभ आणि पुरे १ करोड ! अमिताभ "तो एकनाथ जनार्दन मराठेजी, आपका यहा बहुत बहुत स्वागत, कैसा लग रहा है यहा पहुंचने के बाद ?" चायला, याला आपले सगळे नाव कसे कळले ? आणि मग विचारांचा ट्रॅक एकदम बदलला ! संध्या बोलली होती त्याप्रमाणे फोन करणार्याने माझे संपूर्ण नाव घेतले होते, हे कसे ? कारण त्या फोन करण्याच्या प्रक्रीयेत असे काही नव्हतेच ! मग सगळी बनवाबनवी लक्षात यायला वेळ लागला नाही ! पण घरी पोचलो तर काय, घराबाहेर चपलांचा हा ढीग होता. ओळखी-पाळखीची सगळी माणसे गोळा झाली होती ! 'आवो, आवो, अब तो आप करोडपती बनही गये' पासून जी सुरवात झाली ते 'जोश मे होश मत उडा देना, वैसे पहीले पाडाव के ३ लाख भी कम नही होते' असे बजावण्यापर्यंत गेली ! सोबतीला शिरा होताच ! हीचा आणि मुलांचा उत्साह तर काय विचारता, आणि डोळ्यातले कौतुक ? निदान त्यासाठी तरी करोडपती व्हायलाच हवे होते ! सगळ्यांना निरोप दिल्यावर , कॉलर आयडी वरचा नंबर आणि वेळ बघून माझ्या संशयाचे खात्रीत रूपांतर करून घेतले, ते बदमाश कोण हे ही नक्की केले आणि हीला सगळी कल्पना दिली. हीच्या चेहर्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत गेले, आधी अविश्वास, मग चीड आणि शेवटी एवढे कसे सहज फसलो आपण म्हणून दु:ख आणि डोळ्यात टचकन पाणी !

माझी कोणी थट्टा केली तर मी ती कधीच गंभीरपणे घेत नाही कारण त्याचा वचपा मी पुरेपूर काढणारच असतो पण हीची थट्टा करणार्याला मी जन्माचा धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणे शक्यच नव्हते ! फोन घेताना आसपास घुटमळणारे ते दोन महा-खलनायक आणि त्यांच्या हो ला हो मिळवणारे चौघे, लक्ष ठरले होते आणि योजना सुद्धा ! कोब्राच्या शेपटावर पाय दिलात ?

गेम - भाग २

गेम - भाग २
दूसर्या दिवशी कामावर गेलो तेच पेढे घेउन ! सर्व विभागाला केबीसीत बोलावले आहे म्हणून पेढे वाटले. अभय आणि ऑस्करला दोन-दोन पेढे दिले कारण बातमी त्यांना 'सगळ्यात आधी' कळली होती म्हणून ! आता जनरल नॉलेज अजून वाढवायला हवे म्हणून सर्व मित्रांना किमान २५ प्रश्न तयार करायची विनंति केली, अभ्यासाचा भाग म्हणून ! मग आनंदचे गोल्ड प्लेटेड पेन काढून घेतले, विनोदचे गोल्डन वॉच, माझे फाटलेले बूट अमोलला दिले व त्याचे चांगले बूट मी घातले, प्रदीपचा सापाच्या कातडीचा पट्टा आता माझ्या कंबरेला लटकत होता ! अर्थात हे सगळे कार्यक्रमात घालुन तर जाणार होतो ना ? मग कशाला कोण नाही म्हणेल ? तसेच ज्यांच्या घरी, जनरल नॉलेजची पुस्तके होती ती ती मला आणून द्यायची लाडीक गळ घातली ! शनिवारी सगळ्यांना हॉटेल सम्राट, चर्चगेट, येथे पार्टीची घोषणा केली ! कोणीतरी सूचवले की मराठे पार्टी मागाहून ठेव तेव्हा मी सांगितले की ही निवड झाली म्हणून पार्टी आहे, अमिताभ समोर बसायला मिळणार, लाखो लोक मला टी.व्ही. वर बघणार ही काही लहान सहान गोष्ट आहे काय ? आणि निवड झाल्यावर तर मोठी पार्टी होणाराच आहे ना ? सगळ्यांचे आ वासलेले ! ऑस्कर आणि अभय जाम खुश ! डोळ्यात आसूरी आनंद, कसा भटाला उल्लू बनवला ! आणि हो, ऑस्कर तेरा वो नेवी ब्लु कलर का ब्लेझर कल लेके आओ, please , वही पहनके जाउंगा और अमिताभको तेरा है करके बताउंगा, तु भी क्या याद करेगा ! मग लगेचच अभ्यासाला लागायला हवे असे सांगून थेट घरची वाट धरली ! पुढचे तीन दिवस सही करण्यापुरते कामावर यायचे व नाष्ता, चहा मित्रांच्या पैशाने झोडून घर गाठणे हा उपक्रम चालू ठेवला ! अभय कुरकूर करायचा पण थोडेच दिवस कळ काढ मित्रा , असे विनवून त्याला उगी केले ! शुक्रवारी अभय मला लटकवायला कामावर आलाच नाही. मी लगेच डेपुटी साहेबांना गाठून मला कशी केबीसीत संधी मिळाली आहे , मला लवकर जायचे आहे आणि अभय उगाच घरी बसलाय असे सांगून त्याचा मोबाईल नंबर लावून दिला. साहेबाने त्याला "report within 20 minutes" चा आदेश दिला ! आला झक मारत ! शनिवार, पार्टीचा वार ! आज अगदी कामावर न येणारेही आलेले होते, अभय आणि ऑस्करचे आवतणच होते, भट पार्टी देतोय, सगळे या ! मी ही सगळ्यांचे तोंड भरून स्वागत केले ! दूपारी सगळे गेटवर जमलो, पहील्या बॅच मध्ये सगळी व्हीलन मंडळी होती, तयारी साठी पुढे गेलेली ! एकूण २४ टाळकी भरली. मी सगळ्यात शेवटी पोचलो. मेनु ठरला आणि खादाडी सुरू झाली ! 'जो जे वांछील तो ते लाहो' असे सगळे चालले होते ! सगळ्यांचा आत्मा अगदी तृप्त झाला ! अचानक माझा मोबाईल खणखणला. रेंज मिळत नाही असे सांगून मी हॉटेलच्या बाहेर पडलो. थेट टॅक्सी पकडून स्टेशन गाठले. अभयचे एक दोन कॉल कट केले, मग त्याचा कॉल एकदाचा घेतला आणि सांगितले "extremely sorry, अरे केबीसीत आताच बोलावणे आले आहे, एकदम urgent ! तेव्हा लगेच निघालो आहे, तू आणि ऑस्कर बिल द्या, क्रेडीट कार्डाने, बिल + १०० रूपये टीप, जे काय होईल ते मला sms करून कळव, मी लगेच तुझ्या खात्यात पैसे फीरवतो ! thanks !" अभयचा आलेला sms मग उघडायचेही कष्ट घेतले नाहीत. घरी पोचल्यावर त्याचे कॉल घेउन मोठ्याने हॅलो, ऐकू येत नाही, रेंज नाही असे सांगून त्याला हैराण केले ! दूसर्या दिवशी रविवार, अगदी सकाळीच सहकुटुंब- सहपरीवार अभयच्या घरी धडकलो ! त्याच्या मुलीच्या हातात कॅडबरी ठेवली, हीने त्याच्या बायकोला गजरा देउन खुष करून टाकले ! माझ्या खिशातुन चेक डोकावत होता म्हणून अभयही खुष झाला ! मग मी आणि हीने त्याच्या बायको आणि मुलीचे इतके काही कौतुक केले की विचारू नका ! मग या अभ्यात काय बघितलस असे विचारून कळस गाठला ! वर पाहुणचार कराव तर तुम्हा सीकेप्यांनीच हे पण पालुपद चालू होतेच ! आधी अल्पोपहार आणि मग चार ठाव सीकेपी प्रकारचे भोजन ! प्रत्येक घासाबरोबर त्याच्या बायकोचे कौतुक ! अभयच्या दिलदार पणाला आणि मेहमान नवाजीला दाद ! आता संध्याकाळी कोठे हॉतेलात बिटेलात नको रे बाबा नेउस असा leading thread ! लगेच अभयच्या बायकोचे, "ते काही नाही भावोजी, वहीनी काय घरी जाउन स्वंयंपाक करणार का ? प्रथमच घरी येताय तेव्हा आजची संध्याकाळ तुम्हाला जिप्सीत पार्टी ! हॉटेलात निघताना आम्हा सगळ्यांचे यथाशक्ती मान-पान झालेच ! जिप्सीचे बिल १००० च्या वरच झाले ! ते अर्थात अभयनेच भरले ! निघताना अभयने मला सम्राटच्या बिलाची आठवण केली तेव्हा मी वैतागुन "ही काय वेळ आहे का ? उगाच का दुधात मीठाचा खडा टाकतोस ? मैत्रीत पैशाच्या गोष्टी नको" असे सांगून त्याला गप्प केले ! हाच प्रकार थोड्या प्रमाणात ऑस्करकडे झाला ! त्याच्या कडे गोव्याचे कौतुक, मग हॉटेलात जेवण, त्याच्या wife कडून गोवा भेटीचे आवतण, मग हीची खणा-नारळाने ओटी. (अर्थात via अभयच्या बायकोचा कल्चर सांगणारा आगाउ फोन !) अगदी pre-planned ! मग कुजबुज मोहीम. सगळ्यांना कळून चूकले की या दोघांनी मराठेची खोडी काढली व त्याची सजा आता पुरेपुर भोगत आहेत. मी त्याचे सम्राटचे पैसे त्याच्या घरी जाउन दिलेत तरी हा उगाच खोटारडेपणा करतो आहे ! महीला वर्गाची फूल सहानूभूती माझ्या पाठी ! मी सांगून टाकले आहे, जेव्हा केबीसीतुन बोलावणे येईल तेव्हाच हॉटेलचे बिल, सापाच्या कातड्याचा पट्टा, बूट, घड्याळ, ब्लेझर या गोष्टी परत मिळतील !

शनिवार, १३ सप्टेंबर, २००८

लोकलमधले संघी !

लोकलमधले संघी !


संघ किंवा रा.स्व.संघ म्हटले की आपल्या समोर, अर्ध्या चड्डीतले, दक्ष - आरम करणारे, चपला रांगेत ठेवणारे, हवेत(?) लाठ्या-काठ्या फिरवणारे उभे राहतात ! पण लोकलमधले संघी म्हणजे कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच, तसा प्रसिद्धी परा:मुख हा गुण दोघात कॉमन आहेच म्हणा !

होते असे की---


कोणत्याही लोकल सेवेचा सुरवातीचा टप्पा ! गाडी उलटी भरून आलेलीच असते पण जी काही चवथी, नववी सीट रिकामी असते तिच्यासाठी पण रण होते आणि यात हरलेले की 'जळो जीणे चौथ्या सीटचे' असे मानणारे, गुमान दोन सीटच्या मधल्या जागेत , खिडकी जवळ उभे राहतात. तशी आशाळ्भूत नजर खिडकीजवळ बसलेल्यांच्या हालचाली टीपत असतेच ! पण अशी माणसे बहुदा 'फेव्हीकॉलका मजबूत जोड' बुडाला लावूनच आलेली असतात, हल्ली गाडी कुलाब्यापर्यंत जात नाही म्हणूनच ते नाईलाजाने छ.शि.ट ला उतरतात !


मग कोणीतरी आपली बॅग, झोळी, ब्रीफकेस, पिशवी असे काही बाही त्याच्याजवळ देतो आणी न सांगताच तो ते वरच्या रॅकवर लावून ठेवतो. हा सिलसिला रॅक भरूनही थांबत नाहीच. मग 'हा' जागा करून, एकावर एक राशी रचून, हे extra सामान सुद्धा accomodate करतो. त्यात सुद्धा कोण 'काच का सामान है, उसके उपर कुछ मत रखो' म्हणून दरडावतो, तर कोणी डब्यात सांबार आहे,उलटे ठेउ नकोस म्हणून अलर्ट करतो. कोणाला आपल्या सामानाला हातही लावलेला खपत नाही तर सीटखाली बसलेल्याला हा 'उभा' डोक्यावर काहीतरी पाडून आपला गेम करणार अशी शंका भेडसावत असते !


कोकणातल्या मातीचा जसे भांडणे हा गुण आहे तसा लोकलमधल्या 'त्या ' जागेचा 'सेवाभावी-परोपकार' असा गुण असावा कारण एवढ्या वर्षाच्या लोकलप्रवासात या जागेवर उभ्या असणार्या माणसाला 'नाही' म्हणताना मी तरी ऐकले नाही, पाहीले नाही ! तसेच त्याला तोंडदेखले का होईना , thank you, आभारी आहे, धन्यवाद असे म्हटलेलेही मी ऐकले नाही. जसा काही रेल्वेने त्याला त्या कामासाठीच नियुक्त केले आहे व त्या साठी त्याला पासात भारी सूट दिली आहे ! चांगले कोणी म्हणत नाहीच उलट त्याला शिव्या घालणारी, त्याला आदेश सोडणारी माणसेच बघितली आहेत. पण हा मात्र संयम सोडत नाही, घेतला वसा टाकत नाही ! ज्या नम्रतेने सामान चढवतो, त्याच नम्रतेने ते उतरवूनही देतो !


तर अशा या 'रेल्वेप्रवासी सेवा सदस्याला' माझा सलाम !

चेन पुलींग !

घाई-गडबडीत लोकल पकडायच्या नादात अनेक जण अनेक गोष्टी विसरतात. काही तिकीट काढायलाच विसरतात तर काहींचा पास घरीच राहतो आणि हे नेमके समोर तिकीट तपासनीस दिसल्यावरच लक्षात येते ! अजून एक गोष्ट लोक बर्यापैकी विसरतात ती म्हणजे पॅंण्टची चेन वरती ओढणे ! इतकी लोकांना काय आणि कशाची घाई होते कोणास ठाउक ! बरे एखादे चेन वरती ओढायला विसरला तर लोकांना त्याला ते सांगायचे कसे हा प्रश्न का बरे पडावा ? लोकलची चेन कारणाशिवाय ओढली तर दंड किंवा/आणि कारावास होईल हे ठीक आहे पण दूसर्याला तुझी चेन वर ओढ हे सांगायला सुद्धा लोक घाबरतात, न जाणो त्याला आवडेल, नाही आवडेल, त्याहून तो आणि त्याची चेन, तो काय ते बघेल. आपण बरे आणि आपली चेन बरी !

असाच प्रथमवर्गाचा पास असताना माझ्या समोर एकजण बसला होता. त्याने पॅन्टची चेन वर ओढली नाही हे माझ्या लक्षात आले. तो अगदीच जंटलमन वाटत होता, नीटनेटके कपडे, टायपण बांधला होता व टाईम्स वाचण्यात अगदी गढून गेला होता. त्याला ही गोष्ट सांगावी असे मला अगदी राहून राहून वाटत होते ,पण कसे सांगावे ? त्याला मी आधी डब्यात कधी बघितलेही नव्हते. अनेक वेळा त्याची माझी नजरानजर होत होती पण कोंडी काही फूटत नव्हती. शेवटी गाडी बोरीबंदर स्थानकात विसावली. डबा हळूहळू खाली झाला. तो अजूनही बसूनच होता. मी ही शेवटी माझी बॅग घेतली आणि त्याला तसाच सोडून दाराकडे निघालो ! त्यानेच आता पाठून आवाज दिला, 'excuse me, if you don't mind---, plese try to understand,--- , i don't wan't to hurt you----' अरे बाबा एकदा काय ते सांग बाबा, किती लांबण लावशील (मी मनात !)--- आपके पॅन्ट की चेन--- झिप--- खुली है ! अरे बापरे ! मी घाईने परत पाठी फिरलो, त्याच्या समोरच बसून चेन वर ओढली आणि मग त्याला म्हणालो "मै भी आपको कबसे यही बताना चाहता था, आपके भी--- ! आता चमकायची पाळी त्याची होती ! म्हणून तू माझ्याकडे बघत होतास होय--मला वाटले--- तूला पेपर वाचायला हवा होता की काय ! झाले, चेन पुलींग झाल्यावर आम्ही दोघेही मनसोक्त हसलो आणि मार्गस्थ झालो !