रविवार, १४ डिसेंबर, २००८

नानक कथा !

आशीर्वाद आणि शाप !

नानक धर्म प्रचारासाठी गावोगाव फ़िरत असत. असेच एका गावात ते आपल्या शिष्यांसह पोचले. त्या गावातले लोक महा-बिलंदर होते. नानकांना त्यांनी गावात अजिबात थारा दिला नाही. घराच्या ओसरीवर सुद्धा त्यांना कोणी उभे करी ना मग आदरातिथ्याची बात तर दूरच राहीली ! शेवटी नानकांनी नाइलाजाने आपल्या शिष्यगणांसह आपला मुक्काम एका वटवृक्षाखाली हलवला. पण गावकर्यांना ते ही बघवले नाही ! सगळा गाव लाठ्या-काठ्या घेउन त्यांच्यावर चालून गेला ! शेवटी नानकांनी ते गाव सोडले. थोडे पुढे गेल्यावर त्यांनी प्रार्थना केली की या गावातली एकजूट अखंड राहू दे म्हणून.

दूसर्या गावात मात्र त्यांना अगदी उलटा अनुभव आला. गावकरी अतिशय अगत्यशील होते. नानकांना बघून त्यांना कोठे ठेउ नी कोठे नको अशीच त्यांची अवस्था झाली. त्यांची व त्यांच्या शिष्यगणांची राजेशाही बडदास्त ठेवण्यात आली. सारा गावच जणू एक दिलाने त्यांच्या सेवेत रममाण झाला होता. त्यांच्या प्रवचनाला तर झाडून सारा गाव हजेरी लावत होता. त्या गावातला त्यांचा मुक्काम लोकांच्या प्रेमळ आग्रहामुळे लांबतच चालला पण शेवटी त्यांनी निरोप घ्यायचे ठरवल्यावर गाववाल्यांचा नाईलाज झाला. अख्खा गावच साश्रू नयनांनी त्यांना निरोप द्यायला गावाच्या वेशीपर्यंत आला होता.

या ही गावाच्या वेशीबाहेर पडल्यावर त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की या गावातली माणसे काना-कोपर्यात विखुरली जावोत, भले गाव ओस पडला तरी हरकत नाही ! बरोबरचे शिष्य आता मात्र बुचकळ्यात पडले. त्यांनी नानकांना विचारले की ही कसली तुमची प्रार्थना ? हाकलून दिले त्या गावासाठी एकोपा व पायघड्या घालून स्वागत करणार्यांचे गाव मात्र ओस पडो !

नानक हसून म्हणाले की त्या भांडकूदळ , अधर्मी गावातील लोक बाहेरच्या जगात न मिसळतील तर चांगलेच नाही का ? कारण ते जिकडे जातील तिकडे द्वेषच पसरवतील ! पण या गावातले सज्जन जिकडे जातील तिकडे सौदार्हाचे वातावरण करतील, जग प्रेममय करून टाकतील की नाही ? म्हणून त्यांनी काना-कोपर्यात जावे अशी पार्थना केली !

२) जागरण मात्र मला झाले !

नानकांनी आपल्या एका शिष्याला जसा असशील तसा भेटायला ये असा निरोप धाडला. जेव्हा निरोप पोचला तेव्हा तो शिष्य घोड्यावर बसून वरातीने निघाला होता, स्वत:च्याच लग्नासाठी ! पण गुरू आज्ञा आधी, लगीन मग ! तो लगोलग नानकांच्या गावी निघाला ! वाटेत रात्र झाली म्हणून त्याने एका धर्मशाळेत मुक्काम ठोकला. तिकडून नानकांचे गाव फ़ारसे लांब नव्हतेच. सकाळी उठून तिकडे जाउ असे त्याने ठरवले. धर्मशाळेच्याच बाजूला एक कोठी होती व तिकडूनच नाच-गाण्याचे आवाज त्याच्या कानावर पडू लागले. घुगरांच्या आवाजाने गडी नादावला व तडक आवाजाच्या दिशेने, त्या कोठीकडे त्याची पावले आपसूकच पडू लागली. कोठीच्या आत शिरणार तोच एक धिप्पाड, क्रूर चेहऱ्याचा, हातात सोटा घेतलेला , त्याच्या मार्गात आडवा आला. त्याचे रूप पाहून त्या शिष्याची बोबडीच वळली व तो गुमान आपल्या धर्मशाळॆत येउन आडवा झाला. पण घुंगरांचा आवाज काही त्याला झोपू देईना ! परत त्याची पावले वाकडी पडलीच पण याही वेळी तो उग्र चेहर्याचा पहारेकरी त्याला आडवा आलाच ! घुंगरांचा आवाज थांबेपर्यंत हे असे बरेचदा झाले पण त्या पहारेकर्याच्या धाकाने त्याचे पाउल काही वाकडे पडले नाही.

सकाळी उठून मग तो शिष्य नानकांच्या घरी पोचला. अजूनही बरेच शिष्य तिकडे जमले होते पण नानक मात्र अजून झोपूनच होते. शिष्यांना वाटले की त्यांची प्रकृती बहुदा बिघडली असावी. जरा वेळाने नानक आले पण त्यांचे डोळे मात्र तारवटलेलेच होते, झोप पूर्ण झाली नसावी बहुतेक. शिष्यांनी कारण विचारले तेव्हा नानक ’त्या’ शिष्यावर कटाक्ष टाकत म्हणाले की ’आपल्यातल्या एकाचे पाउल वाकडे पडू नये म्हणून मला काल जागरण झाले व चक्क एका कोठीवर पहारा द्यावा लागला’ ! तो शिष्य काय ते समजला व वरमला सुद्धा !

शनिवार, १३ डिसेंबर, २००८

निर्मळचे शंकराचार्य.

काही वर्षापुर्वी कोल्हापुरच्या शांकरपीठाचे शंकाराचार्य श्रीमत शंकर विद्याभारती हे वस‌ई परीसरात चार दिवस पाद्यपूजेसाठी आले होते. विरारचे सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. वामनराव सामंत (आप्पा सामंत) यांनी विश्व हिंदू परीषदेच्या वतीने त्यांचा दौरा आयोजित केला होता. या दौर्यात माझे वडील ज.गो. मराठे हे त्याच्या बरोबर चार दिवस होते. ज्या ज्या ठीकाणी त्यांचा सत्कार झाला त्या त्या ठीकाणी त्यांनी श्रीमत दासबोधाबद्दल माहीती दे‌उन, तो विषेशत: तरूणानी वाचावा असा प्रचार केला. त्यांच्या सोबत विश्व हिदू परीषदेचे एक प्रसिद्ध कार्यकर्ते होते. त्या प्रवासात त्यानी निर्मळ क्षेत्राच्या शंकराचार्यांबद्दल माहीती विचारली. तेव्हा, गाडीमध्येच त्यांनी त्या बद्दलची सविस्तर माहीती त्यांना ऐकवली. पुढे त्यांनी ती शब्दबद्ध करून त्यांना दाखवली व ही माहीती शंकराचार्यांच्या पीठाने प्रसिद्ध करावी यासाठी पीठाकडे पाठवली. या सबंधीची पुस्तके पीठाने प्रसिद्ध केल्यास तीला अधिकृतता ये‌इल असा त्या मागचा हेतू होता.
वस‌ईचे एक सुप्रसिद्ध इतिहास संशोधक श्री. रा.बा.जोशी त्यांना त्याची एक प्रत दिली. पुढे या संबधी काही हालचाल झाली नाही. मग शंकराचार्य यांनी ती माहीती खालील प्रमाणे दिली होती ती अशी,
शृंगेरी पीठाचे शंकराचार्य विद्यारण्य स्वामी, हे पीठावर असताना, त्यांच्या वृद्धापकाळात आपला उत्तराधिकारी म्हणून श्री गोसावी यांची नियुक्ती केली. त्या नंतर गुरूची आज्ञेने तीर्थ यात्रेसाठी निघाले. हिमालयातील यात्रा करून झाल्यावर ते , हिमालयातील ज्या गुहेत आद्य शंकराचार्यांनी प्रवेष केला होता, त्या गुहेजवळ आले आणि त्यांना त्या गुहेत प्रवेष करण्याची प्रेरणा झाली. त्यांनी आपल्या बरोबरच्या अंतेवासींना काही मुदत दे‌उन , तेवढ्या काळात मी आलो नाही तर आपण परत जा अशी आज्ञा दिली. दिलेल्या वेळेपर्यंत वाट पाहुन ते शिष्य परत शृंगेरीला गेले आणि त्यांनी हा वृतांत पीठस्थ विद्यारण्य स्वामीना सांगितला. विद्यारण्या स्वामीची प्रकृती खालावत चालली होती व अधिकृत घोषणा झालेले शंकराचार्य उपस्थित नाहीत असे पाहुन त्यांनी दुसर्या एका शिष्याची निवड केली व ते पुढे शंकाराचार्य झाले. पुढे गोसावी हिमालयातून निघाले व थोडयाच काळात शृगेरीजवळ आले. त्या वेळी त्यांना शृगेरी पीठावर शंकराचार्यांची निवड झाली आहे असे कळेले. तेव्हा शृगेरीला न जाता कोल्हापुरच्या जवळच असलेल्या () एका ठीकाणी आपली स्वतंत्र गादी स्थापन केली. आणि त्या पीठामधून धर्मप्रचाराची सुरवात केली. आणि त्याचीच एक उप-पीठ म्हणून कोल्हापुरचा शांकरमठाची स्थापना झाली. शंकराचार्य गोसावी फ़िरत फ़िरत वस‌ईच्या निर्मळ क्षेत्री आले व तिथेच त्यांनी समाधि घेतली. त्या टेकडीवर फ़ार मोठे जंगल वाढले. पुढे पेशव्यांनी वस‌ईची मोहीम यशस्वी केल्यानंतर ही जागा, साफ़सफ़ा‌ई करताना सापडली. पुढे ती जागा आद्य-शंकराचार्यांची समाधि म्हणून प्रसिद्धीला आली. पेशव्यांनी त्यानंतर त्या ठीकाणी आज असलेले मंदीर बांधून पूजा-अर्चेची व्यवस्था केली. आज हे निर्मळ क्षेत्र, आद्य शंकराचार्यांचे समाधिस्थळ म्हणून मानले जाते. आता विश्व हिंदू परीषदेने, प्रतिवर्षी होत असलेल्या यात्रेला विषेश रूप दिले आहे. ही समाधि आद्य शंकराचार्यांची नसूनही तसे सांगितले जाते, त्याचे कारण, शृगेरी पीठाचे नियुक्त शंकराचार्य ही हिमालयातील आद्य शंकराचार्यांच्या गुहेतुन आले असल्यामुळे तसा प्रवाद निर्माण झाला. अजून एक समज असा आहे की शंकराचार्यांना एक शाप होता की तुझी समाधि कंटकवनात हो‌ईल. योगायोगाने या परीसरात काटेरी झुडपे वाढलेली होती त्या मुळॆही या समजाला बळकटी मिळाली. या संबंधात अधिक संशोधनाची गरज आहे. आपली धर्मपीठे या सबंधात कमालीची उदासीनता दाखवतात हे ही आपल्या लक्षात येते.

मराठे चौथर्याचे रहस्य.

हिंदू समाजातील ब्राह्मणवर्गाची उपासना ही मुख्यत: वेदाधीष्ठीत अशी होती. किंबुहना ’वर्णानां ब्राह्मणो गुरू:’, म्हणजे सर्व वर्णात ब्राह्मण हा गुरूस्थानी होता. निरनिराळ्या कालखंडात समाजात अनेक स्थित्यंतरे झाली. परीणामत: ब्राह्मणवर्गाचाही अध:पात झाला. त्याच्या उपजीवनाचे साधन म्हणून असेलेल ज्ञानदान आणि आपतकालीना भीक्षा वृत्ती या सुद्धा धोक्यात आल्या. अशावेळी समाजातील सामान्य माणसाप्रमाणे त्याला आपला जीवन निर्वाह करावा लागला. अति दूर अंतरावर ग्रामीण जीवनापासून वेगळा राहुन जगणार ब्राह्मण राजाश्रयाअभावी ग्रामीण जीवनात येउ लागला. साहजिकच त्याला त्या समाजाशी जवळीक ठेवण्यासाठी त्यांच्या उपासना पद्धती अपरीहार्य पणे स्वीकाराव्या लागल्या. या संबंधात, समर्थानी, दासबोधात ही व्यथा व्यक्त केली आहे. ’ब्राह्मणास ग्रामीणीने बुडविले, अन्न मिळेन ऐसे झाले, आपुल्या प्रचीतीस आले किंवा नाही असे विचारून ते म्हणतात , ’आम्हीही तेचि ब्राह्मण, वडील गेले ग्रामीणी करून , आम्हा भोवते’

अशाच एका कालखंडात, ब्राह्मणांनी आप्ले नित्यकर्म करत असता, आपल्या उपासनेला, ग्रामीण देव-देवतांची, उपासना जोडून घेतली. अति प्राचीन काळी, कुलदेवता नावाची देवता होती की नाही हा संशोधनाचा विषय आहे. या संबंधात, एक ज्येष्ठ विचारवंत असे म्हणतात की ब्राह्मणांना गायत्रीशिवाय अन्य कोणत्याही देवतेची गरज नाही. गायत्रीचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळॆ आजही शोडश संस्कारापैकी उपनयन म्हणजे मुंज आणि विवाह हे दोनच संस्कार तग धरून राहीले आहेत. वास्तविक ते तसे अर्थहीन झाले आहेत. आज केल्या जाणार्या उपासनांना वैदीकांची शास्त्रनिष्ठ ज्ञानाची चौकट राहीलेली नाही. आजचा समाज स्वार्थासाठी कुणाचेही नामस्मरण करून मुह मे राम और बगल मे छुरी असा व्यवहार करताना दिसतो.

कुलस्वामीनी संबंधीच्या अज्ञानामुळे कुलाच्या उत्कर्षास बाधा येते असे आजकाल सर्वत्र मानले जाते. आजच्या काळातही, प्रत्येक हिंदू आपली कुलस्वामिनी आणि कुलदेव यांचे स्मरण ठेवतो वत्याची नित्यनैमित्तिक पूजा-अर्चा करीत असतो. अर्थात यातुन ब्राह्मणही सूटलेला नाही. आजही एखाद्या मंगल कार्याच्या आरंभी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून , विडा-सुपारी ठेवावी लागते. असे असले तरी, आजही, कितीतरी ब्राह्मण कुलाना आपल्या कुलदेवतेचे विस्मरण झाले आहे.

अशा स्थितीत मराठे कुलवृत्तांतात कोकणस्थांच्या अनेक कुलस्वामिनी दिलेल्या आहेत. त्यात प्रत्येक कुलाची कुलस्वामिनी वेगळीही दिलेली आहे. कपिकुलामध्ये एकूण एकोणपन्नास कुले ज्ञात आहेत. त्या पैकी आमच्या मराठेकुळाची कुलस्वामिनी कोण हे निश्चित माहीत नव्हते. ते ज्ञान व्हावे म्हणून मी कुलस्वामिनीचा बोध व्हावा म्हणून एका वि्शिष्ट पद्धतीने देवतेला उपासना करून या संबंधि मार्गदर्शन मिळावे अशी प्रार्थना केली. परीणामत: थोड्याच काळात स्वप्न व अन्य दृष्टांताने मला माझ्या कुलस्वामिनीचा बोध झाला. या प्रसंगात, एका विशिष्ट क्षणी कृपाछत्र ही कविता मला स्फ़ुरली. ती कृपाछत्र या कविता संग्रहात दिली आहे.

श्रावण महीन्यातील सकाळची आठ-साडे आठची वेळ. मेट्रो सिनेमाकडून मी धोबीतलावच्या रस्त्याने जात असता, रीमझीम पाउस पडत होता, एक दहा-बार वर्षाची मुलगी हातात लेडीज छत्री घेउन येत असताना समोर दिसली. तिला पहाताच, कृपाछत्र ही कविता स्फ़ुरली ती अशी,

कृपा-छत्र गे उघडी शिरी ते
मिटूनी असे का धरीसी करी ते ॥धृ॥
कमल-नेत्र तव बघण्या आई
धावत आलो करूनी घाई
परी मीटसी का कमलनेत्र ते
खाली करीसी अन अभय कराते ॥१॥
दूर बहू मी तुजला सोडून
गेलो आई नावही विसरून
अंगाराची वृष्टी वरती
त्रिविध तापी या त्रेधा उडाते ॥२॥
तूच ठेविले नाव मुलाला
तुलाच का गे विसरच पडला
पोटापाठी वणवण फ़िरता
कसे आठवू तव नामा ते ॥३॥
पाठी घालशिल ना गे माते
विसरून माझ्या अपराधाते
करूणा धन ती हसते म्हणते
’पहा वरी रे छत्र शिरी ते” ॥४॥


कुलस्वामिनीचा बोध झाल्यावर त्या स्थानास जाण्याच्या उद्देशाने ए्के दिवशी, मी राजापुरवरून आडीवर्याच्या दिशने प्रयाण केले. तिथे गेल्यावर मी, महाकाली देवस्थानात गेलो आणि देवीचे दर्शन घेतले. नवीनच असल्यामुळे मला काहीच माहीती नव्हती. जवळपास विशेष घरेही नाहीत. म्हणून चौकशी केल्यावर थोड्या दूर अंतरावर काही ब्राह्मणांची घरे आहेत असे कळले. सहज ज्यांच्याकडे मी गेलो, ते श्री. रानडे, महाकालीचे नैवैद्य अधिकारी होते. त्यांनी मला थोडी माहीती दिली आणि अभिषेक आणि महाप्रसाद अशी सेवा करता येइल असे सांगितले. दूसर्या दिवशी त्यांनी त्या दोन्हीही गोष्टी पुर्या करून मला देवीचा महाप्रसाद व तीचा फ़ोटो दिला. थोडीशी विश्रांती घेउन मी माझ्या घरी आलो आणि देवीच्या फ़ोटोची देवघरात स्थापना करून तीचे नित्यस्मरण करू लागलो. परीणामत: माझ्या मार्गातील अनेक अडचणी हळूहळू कमी होत गेल्या. अनुभव आल्यामुळे माझी देवीवरीला श्रद्धा वाढली. मी नवरात्रानिमित्त पतिवर्षी काही पैसे देवस्थानाकडे सेवेसाठी पाठवू लागलो. मध्यंतरीच्या काळात तिथे माझे काहीवेळा सह्कुटुंब जाणेही झाले. या सर्व घडामोडी तिथे एक गोष्ट मला सतत रहस्यमय वाटत राहीली. ती म्हणजे तिथे दाखवला जाणारा ’मराठ्यांचा चौथरा’. प्रत्यक्ष पाहीले तर हा चौथरा आज एखाद्या मोठ्या वाड्याच्या चौथर्यासारखा दिसतो, परंतु या गावात एकही मराठे आडणावाच्या व्यक्तीचे घर नाही. अशा स्थितीत, एक जिज्ञानासा म्हणून मी हा प्रश्न, अनेक मान्यवर व्यक्तींसमोर उपस्थित केला. परंतु याबाबतीत कोणीही बोलण्याचे धैर्यही दाखवत नाही. प्रसिद्ध गायिका, अनुराधा मराठे या, मराठ्यांच्या कुलवृत्तातील ३४ व्या घराण्याच्या आहेत, त्यांच्याशी पत्रव्यवहार केला पण उत्तर मिळाले नाही.

अधिक चौकशीत असे लक्षात आले की मराठे जवळच्या एका गावी रहायला गेले. त्यांच्याशी संपर्क साधल्यास यावर काही प्रकाश पडू शकेल. या एकाकी प्रयत्नात मला अपेक्षित यश आले नाही. देवस्थानांच्या इतिहासातील काही तज्ञ व्यक्तींची ’कोकणातील देवस्थाने’ अशा अर्थाचे पुस्तक लिहीले आहे. पण त्यात सुद्धा ही माहीती मिळत नाही. जिज्ञासूंनी लक्ष घालून माहीती उपलब्ध करावी.

रविवार, ७ डिसेंबर, २००८

भरवसा !

२५ नोव्हेंबर, पाच केव्हाच वाजून गेले होते पण समोरचा फ़ायलींचा ढीग काही कमी होत नव्हता. जरा मोकळे होतोय असे वाटेपर्य‍ंत नव्या फ़ायली येतच होत्या. अर्थात काम संपवून टाकल्याशिवाय मी कार्यालय सोडत नाही, सकाळी आल्यावर टेबल साफ़ हवे हा माझा उसूल ! एकदाचे सगळे काम संपले, मोकळा श्वास घेतला व विजयी मुद्रेने कॉफ़ी मागवली. कडक कॉफ़ीचे गरम गरम घोट गळ्याखाली उतरत असतानाच धावत पळतच एक कामगार आत घुसला. समोरच्या खुर्चीवर फ़तकल मारूनच तो बसला व धापा टाकू लागला. त्याने बरीच धावपळ केलेली दिसत होती. त्याला आधी पाणी दिले. शांत झाल्यावर त्याने फ़ाइल पुढे केली. त्याच्या ७० वर्षाच्या वडीलांची बायपास सर्जरी होती २७ तारखेला. त्या साठी त्याला ३ लाखाचे अनुदान पास झाले होते, पण नेहमीसाखीच ती फ़ाइल लाल फ़ीतीत सापडली. गरजव‍ंताला अक्कल नसते या उक्तीप्रमाणे त्यानेच धावपळ करून सर्व अडथळे पार करून आता ती फ़ाइल औपचारीक मंजुरीसाठी अध्यक्षांच्या कार्यालयात स्वत: आणली होती. शस्त्रक्रीयेच्या एक दिवस आधी, दूपारी २ च्या आत चेक जमा केला तर शस्त्रक्रीया होणार होती नाहीतर महीनाभरान‍ंतरची तारीख मिळणार होती, त्याच्या वृद्ध वडीलांच्या तब्येतीला हा विलंब धोकादायक ठरला असता.


साहेब नाही आहेत, दिल्लीला गेले आहेत, हे कळल्यावर मात्र त्याचा धीर खचला व तो धाय मोकलून रडू लागला. त्याचा शोक मग संतापात बदलला व सर्व यंत्रणाच कशी सडली आहे, माणसाच्या जीवाची कदर कोणालाच नाही, तुमच्यावर वेळ आली म्हणजे कळेल असे सुनवू लागला. मला ऐकून घेणे भागच होते. बरेच काही बोलल्यावर तो शांत झाला व शून्यात नजर लावून बसला. मग मी त्याला शांतपणे म्हटले उद्या दूपारी बाराच्या आत तुम्हाला चेक द्यायची जबाबदारी माझी. आधी आपण काय ऐकले यावर त्याचा विश्वासच बसला नाही तेव्हा तेच वाक्य मी त्याला अधिकच ठामपणे सांगितले. मग मात्र तो ओशाळला. माझे आभार मानून निघून गेला.


रात्री उशीरा घरी पोचलो, पण सुदैवाने मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याच्या आत. हल्ल्याची तीव्रता बघता उद्या कामावर इच्छा असूनही जाउ शकू का हा विचार पहीला डोक्यात आला. पाठोपाठा विमानतळाबाहेर स्फ़ोट झाल्याची बातमी वाचली व साहेब तरी दिल्लीवरून त्यांच्या मलबारहीलच्या बंगल्यात पोचतील का याचीही काळजी वाटू लागली. सतत त्या कामगाराचा चेहरा समोर येत होता व त्याचे कधीही न बघितलेले वृद्ध वडील. सकाळी लोकल सेवा सुरू झाल्याचे कळले व कामावर निघायची तयारी केली. पाठोपाठ आई-बहीण-सासू यांचे फ़ोन आले व आज कामावर जाउ नये असे सूचवले गेले. अर्थात कोणत्याही परीस्थितीत घरी बसणे मला आवडत नाही. १९९३ च्या दंगलीत मुंबई जळत असताना सुद्धा मी व माझा भाउ विरार वरून कामावर जातच होतो, कधी-कधी तर अख्ख्या डब्यात आम्ही सगळे मिळून पाच-सहा जणच असायचो ! मग आज तरी का घरी बसा ? इतक्या वर्षाच्या संसारानंतर बायको सुद्धा मला चांगले ओळखून आहे तेव्हा तीने सुद्धा माझा डबा तयार ठेवला होताच ! घराबाहेर पडताना मात्र मुलीने घट्ट धरून ठेवले व आज जायचे नाही असे निक्षून सांगितले. शणभर माझा सुद्धा निश्चय डळमळीत झाला पण परत समोर त्या कामगाराचा चेहरा आला.. नाही.. मला कामावर गेलेच पाहीजे. माझ्या भरवशावर तर तो आहे ! मोठ्या निग्रहाने मी तीच्या हातांची मिठी सोडवली , कामावर पोचल्यावर फ़ोन करतो असे सांगून पाठी वळून न बघता चालू पडलो. नेहमी सारखी टाटा करायला मुलगी बाल्कनीत आली नाहीच !


जवळपास रीकाम्या लोकलने कामावर पोचलो. फ़ोर्ट विभागावर शब्दश: अवकळा पसरली होती. रस्त्यावर शुकशुकाट, हे मुंबईचे रूप मला तरी नवीनच ! आमच्या मुख्यालयाचा दरवाजा बंदच होता. त्याला लागुनच असलेल्या ’पोर्ट भवन’चा दरवाजा सुद्धा बंदच होता. मला बघून सुरक्षा रक्षकांनी दरवाजा उघडला. माझा सिनीयर सहकारी, गिरगावला राहतो, तो सुद्धा आला होता. त्यानेच साहेब रात्री दिडला घरी पोचले पण आता कामावर यायला निघाले आहेत असा निरोप मिळाल्याचे सांगितले. गोदी विभाग, जेथे प्रत्यक्ष मालाची चढ-उतार होते, तिकडेही सामसूम होती. विविध वाहीन्यांचे प्रतिनीधी, पत्रकार फ़ोन करून गोदीची हाल-हवाल विचारत होते. त्यांच्या प्रश्नांच्या फ़ैरींना उत्तरे देणे जड जात होते. साहेब साधारण साडे अकरा वाजता कार्यालयात आले. ते आल्या आल्याच गोदीचा आढावा घ्यायला निघणार होते पण मी लगेच त्यांचाकडून ’त्या’ फ़ाइल वर सही घेतली व शिपायाला ती फ़ाइल ताबडतोब अर्थ विभागात पोचवायला पिटाळले. हुश्श... अर्धे काम तर पार पडले होते ! आता शिपाई आला की अर्थ विभागाच्या प्रमुखांना गळ घालून चेक तयार करायला सांगितले की मला सूटकेचा आनंद मिळणार होता. पण थोड्या वेळाने शिपाई आला व अर्थ विभागात कोणी आलेलेच नाही आहे हे समजले. परत निराशेने मला ग्रासले. तेवढ्यात साहेबांनी फ़ोनवर सूचना दिली की सगळ्या विभाग प्रमुखांना तातडीच्या बैठकीसाठी बोलवून घ्या, जसे असतील तिथून, लगेच ! मी पडत्या फ़ळाची आज्ञा घेउन पहीला कॉल लावला अर्थ-विभागाच्या प्रमुखांनाच. आमचे सगळे अधिकारी कुलाबाच्या कार्यालयीन वसाहतीत राहतात आणि तिथे तर कर्फ़्यु पुकारला होता ! तरी मी सांगितले, ओळखपत्र दाखवा आणि या, पण याच ! पुढल्या वीस मिनीटात सगळे विभाग प्रमुख हजर झाले, अर्थ विभागाचे प्रमुख सुद्धा ! परत गाडी रूळावर आली होती तर ! आता तो कामगार आला की चेक बनणे कठीण नव्हते. परत सूटकेचा आनंद साजरा करता आला, माझ्याकडून सगळी तयारी बाकी होती. आता फ़क्त ’त्याची’ वाट बघणे. पण अगदी पाच पर्यंत वाट बघून सुद्धा तो काही फ़िरकला नाही. दूसर्या दिवशी साहेब मंत्र्यांबरोबरच्या उच्चस्तरीय बैठकीसाठी दिल्लीला जाणार होते त्यामुळे त्यांची सही घेतली हे चांगलेच झाले होते. दूसर्या दिवशी तो नक्की येणार म्हणून कामावर जाणे भागच होते पण तो नाहीच आला ! आता मला वेगळीच काळजी वाटू लागली, त्याचेच तर काही बरे-वाईट झाले नसेल ? तरी मी चेक तयार असल्याची खात्री करूनच घर सोडले. आता मात्र मी पुरता निर्धास्त होतो. तो कधीही का येईना, मी माझा शब्द तर खरा केला होता !


तिसर्या दिवशी तो अगदी सकळीच प्रगटला, अगदी निवांत वाटला, घाई त्याला अजिबातच नव्हती जणू ! “काय, झाली का सही साहेबांची ? मीच नेतो फ़ाईल अर्थ विभागात, शस्त्रक्रीया पुढे ढकलली आहे, काय व्हायचे ते होउ दे आता ! ज्याला त्याला आपल्या जीवाची काळजी, दोन दिवस बायकोने बाहेर सोडलेच नाय बगा, डोळ्याला पदरच लावून बसली होती बगा ! मी बी म्हटलं, कशापारी आनी कोनासाठी जीव धोक्यात घालायचा ? म्हातारं काय , आज नाही परवा खपनारच आहे, पन माझ्यापाठी भरला संसार आहे नव ? आनी मी जरी आयलो असतो तरी तुम्ही थोडीच कोनी येणार होता, , भरोसा तरी कसा बाळगायचा ? खात्रीच होती मला , कोनी कामावर नसणार याची, तेवा म्हणल जाव निवांत, द्या ती फ़ाइल द्या , तशी काय बी घाय नाय म्हना आता !”


त्याला बरच काही सुनवायचे होते, पण शब्दच बाहेर नाही पडले, ’तुमचा चेक अर्थ विभागात तयार आहे, जा आता’ एवढेच मी कसेबसे बोलू शकलो !

शनिवार, ६ डिसेंबर, २००८

अपेक्षाभंग !

मशीद ब‍दर वरून निव्वळ चार पैसे वाचतात म्हणून हमाली करून, गर्दीतुन सामान आणायचे मी हल्ली टाळतोच. कारण चार पैसे वाचतात म्हणून हा सव्यापसव्य करायचा आणि होते भलतेच ! दूकानदार एखादा नग कमीच देतो किंवा वजन तरी कमी देतो. माल खराब असला तर घरी परत अक्कल काढली जातेच. बहुदा ’लेने के देने पड गये’ असेच होते ! पण वडीलांची ७५ वी करायची होती. कार्यक्रमाच्या आगेमागे किमान ३० ते ५० माणसे घरी असणार होती. असे काही असली की घरातली कामवाली बाई दांडी मारणारच ना ? बहुतेक पाहुणे कोकणातले, म्हणजे निदान ५ ते ६ वेळा चहा होणारच ! त्रास नको म्हणून थर्माकोलचे ग्लास व प्लेट आणायचे ठरले व मी नाईलाजाने सकाळीच मशीद बंदर गाठले.

दूकाने नुकतीच उघडू लागली होती. थोडा फ़ेरफ़टका मारल्यावर एका दूकानात हव्या असलेल्या सगळ्या वस्तू लटकवलेल्या दिसल्या. धडाधड यादीप्रमाणे ऑर्डर दिली व सहज आठवले म्हणून एक सेलोटेप सुद्धा द्या म्हणून सांगितले. सगळ्या सामान एका पिशवीत भरून दूकानदाराने दिले, कच्चे बिल खिषात ठेउन मी परत लोकल पकडली. सहज शंका आली, तपासल्यावर खात्री पटली की त्या दूकानदाराने सेलोटेप दिलीच नाही आहे. पावतीवर मात्र त्याचे ३० रूपये लावले होतेच ! माझीच चूक होती, सगळे सामान तपासून मगच दूकान सोडायला हवे होते. मरो, अक्कल खाती जमा झालेल्या रकमेत अजून थोडी भर, बरे हे घरी सांगायची काही सोय नव्हतीच !

पण दूसरे मन मात्र काही केल्या शांत होते नव्हते. ते बजावत होते, गप्प बसू नकोस, जा त्या दूकानात, त्याला चांगला खडसाव, त्याने मुद्दामच ती सेलोटेप आत भरली नसणार, तुला त्याने ’गि़ऱ्हाईक’ बनवले आहे, त्याला सोडू नकोस. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही , पण काळ सोकावतो. असेच तीन-चार दिवस गेले. अगदी हॅम्लेट झाला होता ! शेवटी निदान ती पावती घेउन त्या दूकानात जायचे असे ठरले. सकाळी परत त्या बाजारात शिरलो पण गंमतच झाली. नेमेके कोणत्या दूकानात सामान घेतले तेच समजेना. सगळॆच गुजराती तसेही गोल-मटोल, तुपकट चेहर्याचेच असतात म्हणा ! अनेक फ़ेर्या मारून पण दूकान नक्की कोणते तेच काही समजत नव्हते. उगीच कोणाला तरी विचारण्यात सुद्धा अर्थ नव्हता. निराश होउन परत फ़ीरत असतानाच कोणीतरी खांद्यावर हात ठेउन ’आपको हमारे शेठजी बुला रहे है’ असे म्हणाला. दूकानात शेठनीने मला बसायला दिले. हा काय मला कोणी बडा गिऱ्हाईक समजला की याचे कोणी पैसे बुडवलेला आपल्यासारखा दिसतो या विचाराने मी हैराण झालो !

माझ्या चेहर्यावरची प्रश्नचिन्हे वाचत तो शेठ म्हणाला, तुमी मला वळखल नाय वाटते, चार दिसापुर्वी तुम्ही इथेच तर आला होतात ना, प्लेटी – गिलास घ्यायला ? त्याचे तुपाळलेले मराठी कानाला खरच गोड वाटत होते, ’ तवा घाई गडबडीत या राम्याने तुमची शेलोटेप आत भरलीच नाय बगा, तुमी गेल्यावर मला ते कलले, मग एवढा वाईट वाटला शेट म्हनून सांगू, सगळा बाजार पालथा घातला, तुम्हाला सोधण्यासाठी, पन तुमचा तर काय बी पता नाय, चार दिवस झोप नाय बगा, हरामाची एक पै पन ठेवत नाय मी, कवा तुमची गाठ पडते व तुमची चीज तुम्हाला देते असे झाले होते, सर्व पोर्यांना सांगूनच ठेवले होते, त्यो सेठ कवा बी दिसला तरी त्याला घेउन या म्हनून , श्रीजीची कीरपाच झाली बगा, लई मोठा बोज हलका झाला !” असे म्हणत त्याने ती टेप मला सुपूर्द केली.

मी दूकान सापडत नाही म्हणून परतच फ़ीरणार होतो पण जर सापडले असते तरी ती टेप मिळण्याची वा पैसे परत मिळण्याची मला कोणतीही अपेक्षा नव्हतीच, पण त्या दूकानदाराला सत्य परीस्थिती सांगून टाकायची इतकेच माझ्या मनात होते, त्याला चांगला फ़ैलावर सुद्धा घेणार होतो व हरामाचा पैसा पचणार नाही अशी शापवाणीही उच्चारणार होतो, पण झाले काही तिसरेच ! चला सगळॆच अपेक्षाभंग यातना देत नाहीत इतके तर कळले !

What an !dea सरजी !

“संध्या जरा तुझा मोबाइल दे, मला एक नंबर हवा आहे. “, तसे आता हे रोजचेच झाले आहे. माझा जुना नंबर मी हॅण्डसेट सकट हीच्या गळ्यात मारला आहे व जुन्या सीमकार्ड मधले नंबर हवे असल्यास हेच करावे लागते. सीमकार्ड मधले सगळे नंबर कॉपी करायला असा कितीसा वेळ लागणार आहे ? पण ’काय घाई आहे, काही अडत तर नाही ना ? असेच चालू होते.
दहा मिनीटानी हीने सांगितले की मोबाईल सापडत नाही आहे. लगेच प्रसादने माझ्या मोबाईलवरऊन मिसकॉल देउन बघितला पण उलट उत्तर न मिळता ’out of coverage or switched off’ असा जबाब मिळाल्यावर मी चमकलो. मोबाईल हरवला तर नाही ना ? शेवटचा मोबाईल कधी बघितलेला आठवतोय ? दोन दिवसापुर्वी, बाजारात घेउन गेले होते. पण बाहेर काढलाच नव्हता, पर्स मध्येच होता ! हीचे स्पष्टीकरण. मग झाली रडारड सुरू, तरी मी सांगत होते, मला मोबाईल नको म्हणून, तरी तू माझ्या गळ्यात तुझा जुना मोबाईल मारलास व आपण नवा घेतलास ! (नक्की दु:ख कशाचे होते ?) तसे मी ही मोबाईल बरेच हरवले होते, मला बरेच वाटले, कारण भांडणात आता हा मुद्दा काढून ती मला निरूत्तर करू शकणार नव्हती ! पण झाले तरी काय असेल, भर रस्त्यावर कोणी चोर पर्समधला मोबाईल उडवणे अशक्यच होते. दुपारी ही नेहमीच्या भाजीवालीकडून भाजी घेउन मिठाइच्या दूकानात गेली होती व मग सरळ घरी आली होती. पैसे द्यायला तीने पर्स काढली होती, तेव्हाच मोबाईल बहुदा खाली पडला असणार. भाजीवाली टपरीवर बसते, म्हणजे पर्समधून मोबाईल बाहेर पडला असताना तीला कळले नसणारच. पण मिठाईच्या दूकानात जर पडला असणार तर दूकानातल्याच कोणीतरी नोकराने तो ताब्यात घेतला असणार. मोबाईल घेणारा प्रामाणिक असता तर त्याने तो परत केलाच असता पण तसे नव्हेतच कारण मोबाईलच्या मागेच आमचा पूर्ण पत्ता व घरचा फ़ोन नंबर असलेला स्टीकर होता, तसेच त्याने तो निदान स्वीच ऑफ़ तरी केला नसता. आणि लगेच मला स्ट्राईक झाले की आपण त्यातला ’फ़ोन सिक्युरीटी कोड’ पर्याय ऍक्टीव केलेला होता, तो टाकल्या शिवाय मोबाईल सुरूच होणार नव्हता ! पण ३०० रूपये घेउन असा कोड ओपन करून देणारे महाभाग असतातच की !
मला एक आयडीया सूचली. आधी रीतसर पोलीस तक्रार नोंदवली व मग ’त्या’ मिठाइच्या दूकानात शिरलो. ठरल्याप्रमाणे , थोड्या वेळाने हीनेच मला कॉल दिला. व मग, दूकानातल्या सर्व नोकरांना स्पष्ट ऐकू जाईल अशा जागी उभा राहून मी संभाषण चालू केले- - -,
देखिये मेमसाब, मै मोबाईल का लॉक खोलके देता हूँ, मगर आपको मेरे घरपे आना पडेगा—
सिर्फ़ ५० रूपया, बाहर लोग ३०० के नीचे ये काम नही करेंगे-
अभी मै घर ही निकल रहा हूँ, पाच मिनीट के बाद कभी भी आना—

संभाषण संपवून, दूकानात काही न घेताच, ’अर्जंट कॉल है, बाद मे आता हूँ’ असे म्हणत बाहेर पडलो-

थोडे पुढे जाताच अपेक्षेप्रमाणेच पाठून आवाज आला – साबजी जरा रूकीये, हमरा भी मोबाईल गलतीसे लॉक हुआ है, क्या आप खोलगे देगे ? तो कोणीतरी त्याच दूकानातला नोकर होता.
देखो, कोई लफ़डेवाला काम तो नही है ना ? –मी
नही साब, मेरा ही है, बच्चे ने खेलते खेलते लॉक कर दीया- तो
तो फ़ीर अभी मेरे साथ चलो, मोबाईल साथ ले आना. – मी
त्याला घरी आणले. बसवले, पाणी पाजले व मोबाईल दे म्हणून सांगितले. मोबाईलच्या मागचा स्टीकर खरडून काढला असला तरी तो माझाच मोबाईल आहे हे लगेचच कळले ! त्याच्या समोरच त्याचा कोड टाकून तो मी चालू केला. तो थक्कच झाला !
साब, आप तो कमाल के है, शुक्रीया, ये लो आपका ५० रूपया, लेकीन ये तो आप बाहर भी कर सकते थे ना ? – तो.
अटलजींप्रमाणे पॉज घेउन मी डायलॉग मारला, “बराबर है, लेकीन मुझे आपकी चोरी पकडनी थी, वो भी मेरे ही घरमे आपको बुलाकर. ये मोबाईल मेरी बीबी की पर्स से आपके दूकान मे गिरा, लेकीन आपने उसे वापिस किया नही —एवढे म्हणेपर्यंत ही बाहेर आली ! आपकी चोरी पकडने के लिये ये सब नाटक मैने किया था.”
त्याचा चेहरा आता पांढरा-फ़टक पडला, घशाला कोरड पडली, काय बोलावे तेच त्याला सूचेना. मी मग त्याच्या समोर पोलीस तक्रार, फ़ोनचे बील ठेवले व कडक आवाजात विचारले,
अभी भी आपको लगता है की ये आपका मोबाईल है ?
आता मात्र त्याचा धीर सूटला. त्याने माझे पाय धरले. पोलीसाच्या ताब्यात देउ नका, असे म्हणत तोंडात मारून घेउ लागला, रहम करो, असे म्हणत तो खरेच रडू लागला. माझा मोबाईल परत मिळाला होता, प्रकरण मला तरी कोठे वाढवायचे होते ? मी त्याला मोबाईल ठेउन हाकलून लावले व मोबाईल बाईसाहेबांच्या चरणी अर्पण केला !
What an !dea सरजी !