रविवार, १४ डिसेंबर, २००८

नानक कथा !

आशीर्वाद आणि शाप !

नानक धर्म प्रचारासाठी गावोगाव फ़िरत असत. असेच एका गावात ते आपल्या शिष्यांसह पोचले. त्या गावातले लोक महा-बिलंदर होते. नानकांना त्यांनी गावात अजिबात थारा दिला नाही. घराच्या ओसरीवर सुद्धा त्यांना कोणी उभे करी ना मग आदरातिथ्याची बात तर दूरच राहीली ! शेवटी नानकांनी नाइलाजाने आपल्या शिष्यगणांसह आपला मुक्काम एका वटवृक्षाखाली हलवला. पण गावकर्यांना ते ही बघवले नाही ! सगळा गाव लाठ्या-काठ्या घेउन त्यांच्यावर चालून गेला ! शेवटी नानकांनी ते गाव सोडले. थोडे पुढे गेल्यावर त्यांनी प्रार्थना केली की या गावातली एकजूट अखंड राहू दे म्हणून.

दूसर्या गावात मात्र त्यांना अगदी उलटा अनुभव आला. गावकरी अतिशय अगत्यशील होते. नानकांना बघून त्यांना कोठे ठेउ नी कोठे नको अशीच त्यांची अवस्था झाली. त्यांची व त्यांच्या शिष्यगणांची राजेशाही बडदास्त ठेवण्यात आली. सारा गावच जणू एक दिलाने त्यांच्या सेवेत रममाण झाला होता. त्यांच्या प्रवचनाला तर झाडून सारा गाव हजेरी लावत होता. त्या गावातला त्यांचा मुक्काम लोकांच्या प्रेमळ आग्रहामुळे लांबतच चालला पण शेवटी त्यांनी निरोप घ्यायचे ठरवल्यावर गाववाल्यांचा नाईलाज झाला. अख्खा गावच साश्रू नयनांनी त्यांना निरोप द्यायला गावाच्या वेशीपर्यंत आला होता.

या ही गावाच्या वेशीबाहेर पडल्यावर त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की या गावातली माणसे काना-कोपर्यात विखुरली जावोत, भले गाव ओस पडला तरी हरकत नाही ! बरोबरचे शिष्य आता मात्र बुचकळ्यात पडले. त्यांनी नानकांना विचारले की ही कसली तुमची प्रार्थना ? हाकलून दिले त्या गावासाठी एकोपा व पायघड्या घालून स्वागत करणार्यांचे गाव मात्र ओस पडो !

नानक हसून म्हणाले की त्या भांडकूदळ , अधर्मी गावातील लोक बाहेरच्या जगात न मिसळतील तर चांगलेच नाही का ? कारण ते जिकडे जातील तिकडे द्वेषच पसरवतील ! पण या गावातले सज्जन जिकडे जातील तिकडे सौदार्हाचे वातावरण करतील, जग प्रेममय करून टाकतील की नाही ? म्हणून त्यांनी काना-कोपर्यात जावे अशी पार्थना केली !

२) जागरण मात्र मला झाले !

नानकांनी आपल्या एका शिष्याला जसा असशील तसा भेटायला ये असा निरोप धाडला. जेव्हा निरोप पोचला तेव्हा तो शिष्य घोड्यावर बसून वरातीने निघाला होता, स्वत:च्याच लग्नासाठी ! पण गुरू आज्ञा आधी, लगीन मग ! तो लगोलग नानकांच्या गावी निघाला ! वाटेत रात्र झाली म्हणून त्याने एका धर्मशाळेत मुक्काम ठोकला. तिकडून नानकांचे गाव फ़ारसे लांब नव्हतेच. सकाळी उठून तिकडे जाउ असे त्याने ठरवले. धर्मशाळेच्याच बाजूला एक कोठी होती व तिकडूनच नाच-गाण्याचे आवाज त्याच्या कानावर पडू लागले. घुगरांच्या आवाजाने गडी नादावला व तडक आवाजाच्या दिशेने, त्या कोठीकडे त्याची पावले आपसूकच पडू लागली. कोठीच्या आत शिरणार तोच एक धिप्पाड, क्रूर चेहऱ्याचा, हातात सोटा घेतलेला , त्याच्या मार्गात आडवा आला. त्याचे रूप पाहून त्या शिष्याची बोबडीच वळली व तो गुमान आपल्या धर्मशाळॆत येउन आडवा झाला. पण घुंगरांचा आवाज काही त्याला झोपू देईना ! परत त्याची पावले वाकडी पडलीच पण याही वेळी तो उग्र चेहर्याचा पहारेकरी त्याला आडवा आलाच ! घुंगरांचा आवाज थांबेपर्यंत हे असे बरेचदा झाले पण त्या पहारेकर्याच्या धाकाने त्याचे पाउल काही वाकडे पडले नाही.

सकाळी उठून मग तो शिष्य नानकांच्या घरी पोचला. अजूनही बरेच शिष्य तिकडे जमले होते पण नानक मात्र अजून झोपूनच होते. शिष्यांना वाटले की त्यांची प्रकृती बहुदा बिघडली असावी. जरा वेळाने नानक आले पण त्यांचे डोळे मात्र तारवटलेलेच होते, झोप पूर्ण झाली नसावी बहुतेक. शिष्यांनी कारण विचारले तेव्हा नानक ’त्या’ शिष्यावर कटाक्ष टाकत म्हणाले की ’आपल्यातल्या एकाचे पाउल वाकडे पडू नये म्हणून मला काल जागरण झाले व चक्क एका कोठीवर पहारा द्यावा लागला’ ! तो शिष्य काय ते समजला व वरमला सुद्धा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: