सोमवार, ११ एप्रिल, २०११

अठराहजारी मनसबदारीच्या निमित्ताने.

3 वर्षापुर्वी टॅलिनामा लिहायला घेतला तेव्हा तो मी सोडून किती जण वाचतील असाच प्रश्न पडला होता ! ( माझ्या बायकोनेच तो दोन वर्षानंतर वाचला होता ! असो ! ). मराठी माणूस भलताच सहनशील असावा किंवा एवढे लिहून तरी लेकाचा सुधारतो आहे का बघुया – असे वाटल्यामुळेही असेल, तब्बल 18,000 पेक्षा जास्त लोकांनी हा ब्लॉग वाचला, जगाच्या पाठीवर जिकडे कोठे मराठी माणूस पोहचला आहे त्या प्रत्येक भागातून टॅलिनामा वाचला गेला आहे. अर्थात तो आवडला असे कळवायची तसदी फार थोड्या लोकांनी घेतली आहे. सकारात्मक दृष्टीकोन बाळगून, ज्या अर्थी कोणी काही वाईट कळविले नाही त्या अर्थी तो लोकांना आवडला असावा असा अर्थ मी घेत आहे. तसा समज बळकट व्हायला अजून एक कारण घडले. “स्टार माझा”ने त्यांच्या “ब्लॉग माझा” या मराठी ब्लॉगर्सच्या स्पर्धेत माझ्या ब्लॉगची दखल यंदा घेतली आहे. नुकतेच त्या कार्यक्रमाच्या चित्रिकरणाचे प्रसारण स्टार माझा वाहिनीवरून झाले. इथे टीचकी मारल्यास त्यातल्या माझ्या भागाचे चित्रीकरण तुम्हाला बघता येइल (पहिला विवेक तवटे, त्यानंतर माझा ).

ब्लॉग लिहिणे अगदी सोप्पे आहे. मला जमले तर तुम्हाला नक्की जमेल, ते ही माझ्याहून चांगले ! आपल्यातल्या प्रत्येकाचे स्वत:चे व्यक्तीमत्व आहे, स्वत:ची काही ओळख आहे, स्वत:चे अनुभवविश्व आहे. मी मांडलेले अनेक विचार अनेकवार अगदी याच शब्दात तुमच्या मनात साचले असतील, माझा ब्लॉग वाचल्यावर तुम्ही म्हणाला सुद्धा असाल, अरे, मला तर अगदी हेच , असेच वाटायचे ! असे असेल तर आता फक्त कृतीचा अवकाश आहे ! तुम्हीसुद्धा ब्लॉगर बनू शकता ! मनातल्या मनात कुढत बसू नका, मन मोकळे करा, धीट बना. ब्लॉगवर काय लिहायचे याला काहीही घरबंद नाही, विषयाचे कोणतेही बंधन नाही, वयाचे बंधन नाही, कोणती नियमावली नाही, कोणाचे बॉसिंग नाही, कोणाची सेन्सॉरशिप सुद्धा नाही ! अगदी एका क्लिकसरशी तुमचे विचार जगाच्या कानाकोपर्यात पोचू शकतात ! सर्वाथाने हा खुला रंगमंच आहे ! इथे तुम्ही आपल्या मनाचे राजे आहेत ! ब्लॉग बनवायला एका पैचा सुद्धा खर्च येत नाही, उलट ब्लॉग या माध्यमाचा व्यापारी उपयोग करून तुम्ही कमाई सुद्धा करू शकता (अर्थात हे काही मला जमलेले नाही, तेव्हा या बाबततीत मला पीडू नका !).

मराठीत ब्लॉग लिहायचा असेल तर बरहा बरे नव्हे तर उत्तम ! पण मधल्या काळात बरहाकार प्रोफेशनल बनले आहेत. तुमच्या, माझ्याकडून टीप्स घेवून सतत सुधारण करून बरहाकारांनी सध्या त्याची व्यावसायिक आवृत्ती आणली आहे. लोक-लज्जेस्तव त्यांनी जे काही मोफत म्हणून दिले आहे ते “भीक नको पण कुत्रे आवर” असेच आहे. मी स्वत: बरहामध्ये किमान चार चांगल्या सुधारणा सुचवल्या होत्या व त्या त्यांनी अंमलात सुद्धा आणल्या होत्या. लोकसहभागातुन विकसित झालेली प्रणाली विकणे केव्हाही निषेधार्हच आहे. मराठी ब्लॉगरसाठी बरहाची शेवटची मोफत आवृती मी इथे उपलब्ध करून देत आहे. इथे टीचकी मारा.
मराठी ब्लॉगलेखनासंबंधी काहीही मदत हवी असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माय मराठीसाठी काही करता आल्यास आनंदच आहे !

“मराठी ब्लॉग विश्व” चे सुद्धा खास आभार ! माझा ब्लॉग सर्वदूर पोहचला तो निव्वळ यांच्यामुळेच !

सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार ! लोभ आहे तो असाच वृद्धींगत व्हावा !

धन्यवाद !

शनिवार, ९ एप्रिल, २०११

विषम, सम, विषम, विषम !

नवीन पनवेल झपाट्याने डेवलप होत आहे व त्याचा थेट पुरावा म्हणजे रेल्वे स्थानकालगतचे सतत ओसंडून वाहणारे पार्किंग ! सकाळी आठच्या पुढे जर तुम्ही तिकडे गेलात तर दुचाकी लावायची कोठे हा प्रश्न तुम्हाला पडेल ! शेवटी वाहतुक विभागाने सम-विषम पद्धतीने रस्त्यालगत दुचाकी वाहने उभी करायची परवानगी दिली व नवीन पनवेलकरांना दिलासा मिळाला. पण माझ्या सारख्या मुलखाच्या वेंधळ्या माणसाच्या त्रासात त्याने भरच पडली. आज तारीख कोणती ते मी कामावर गेल्यावरच ठरवतो ! मग ती सम आहे का विषम हा प्रश्न निदान जाताना तरी येत नाही. एक मित्राला मी रोज स्कूटरवरून बरोबर आणतो. मग तो सांगायचा आज या बाजूला लाव म्हणून ! पण तो नसेल तेव्हा काय ? यावर सुद्धा त्यानेच उपाय सांगितला, काल कोणत्या बाजूला स्कूटर लावली ते लक्षात ठेव, आज त्याच्या उलट दिशेला लाव ! सो सिंपल !

त्या दिवशी अशीच कालची बाजू लक्षात ठेवून स्कूटार लावली व निर्धास्तपणे स्टेशन गाठले. काम सुरू झाल्यावर जेव्हा जेव्हा तारीख लिहायचा प्रसंग आला तेव्हा काहीतरी अजब वाटत होते. अर्थात त्याचा खुलासा परत पनवेल स्थानकावर उतरल्यावरच झाला ! काल तारीख होती ३१ तर आज आहे १ ! मी चुकीच्या बाजूला स्कूटर लावली होती व वाहतुक पोलिस ती उचलून नेणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ होती ! दोनशे रूपयाला फोडणी बसणार होती. तरी विचार आला की कदाचित आज त्या बाजूला आले पण नसतील, पुलावर निदान चढून बघू तरी स्कूटर दिसते का ते. पण नाही, त्या बाजूला एकही दुचाकी उभी नव्हती ! म्हणजे गाडीची उचलबांगडी झाली होती हे नक्की ! मागच्या वेळी पनवेल डेपोच्या बंद केलेल्या पार्किंगच्या जागेत गाडी उभी केली होती व ती वाहतुक पोलिसांनी पनवेलला शिवाजी पुतळ्याजवळ नेली होती. या अनुभवाने मी थेट रीक्षा करून ते ठाणे गाठले. निदान पन्नास विविध प्रकारच्या दुचाकी पुढच्या चाकातून साखळी ओवून ठेवलेल्या अवस्थेत तिकडे आपल्या मालकाची वाट बघत बसलेल्या होत्या. त्यात माझी स्पिरीट नव्हती ! चौकीत चौकशी केल्यावर कळले की नवीन पनवेल भागातून उचललेली वाहने कळंबोलीला नेतात. परत रीक्षा केली व कळंबोली गाठले ! माझी स्पिरीट तिकडे पण नव्हती. कळंबोलीच्या चौकीत कळले की नवीन पनवेल परीसरातुन उचललेली वाहने रात्री ९ वाजेपर्यंत आय.डी.बी.आय. बँकेजवळ लावून ठेवलेली असतात, ९ वाजले की ती इकडे आणतात ! साडे आठ वाजले असल्याने मी परत आय.डी.बी.आय. बँकेजवळ जाण्यसाठी रीक्षा केली. बँकेच्या परिसरात एकही वाहन नव्हते , पोलिसही कोणी दिसत नव्हता. बँकेच्या वॉचमनने मग सांगितले की फ्लायओवर खाली हल्ली गाड्या उभ्या करतात, तिकडे जा आणि शोधा ! म्हणे पर्यंत ९ वाजले व उरलेली वाहने कळंबोलीला नेण्याचे काम संपत आले होते. मी धावत माझी स्कूटर उतरवा म्हणून त्या पोलिसाला गळ घातली. त्याने माझ्या स्कूटरचा नंबर तपासला तर अशी कोणतीही गाडी उचललीच नव्हती ! माझी गाडी कोणी चोरली तर नव्हती ? माझी ही शंका त्या पोलिसाने साफ धूडकावून लावली. अहो आठ वर्षे जुनी, ती सुद्धा स्पिरीट ,कोणता मुर्ख चोर पळवेल ? जा, तिकडे जावून नीट बघा व मगच तक्रार द्यायला या. असे समजावून मला त्याने वाटेला लावले. मी परत रीक्षा केली व स्टेशनलगतच्या रस्त्यावर आले तेव्हा रात्रीचे साडेनऊ वाजल होते.

मी ज्या बाजूला स्कूटर उभी केली होती तिकडे ती नव्हतीच उभी, तो सगळा रस्ता नजरेखालून घातला तरीही स्पिरीट दिसेना तेव्हा रीक्षा करून घर गाठूया उद्या काय ते बघू असा विचार करत असतानाच कोणीतरी शुक शुक करीत असल्याचा आवाज आला. रस्त्याच्या दूसर्या बाजूला असलेला कोंबडी विक्रेता मला बोलवित होता व माझी स्पिरीट सुद्धा तिकडे असल्याचे खुणेने दाखवित होता ! कमाल झाली ! इकडे पार्क केलेली स्कूटर त्या तिकडे कशी गेली ? त्या कोंबडी विक्रेत्यानेच माझी स्कूटर तिकडे लावून ठेवली होती. सकाळी चुकीच्या बाजूला स्कूटर लावून मी गेलो. बाकी माणसे स्कूटर दूसर्या बाजूला लावत आहेत व माझीच स्कूटर त्या बाजूला आहे असे कळताच त्याने उचलून माझी स्कूटर योग्य बाजूला लावून ठेवली होती. त्याची खरे तर दूकान बंद करायची वेळ आठचीच आहे पण निव्वळ माझ्यासाठी तो थांबून राहिलेला होता. रीक्षाने हेलपाटे मारण्यात माझे दोनशे रूपये खर्च झालेले होतेच तरी सुद्धा मी त्याला शंभर रूपये देवू केले व त्याचे आभार मानले. पैसे काही त्याने घेतले नाहीत पण “मुर्गी लेनी है तो मेरे ही दूकाने से लेना” हा त्याचा आग्रह मात्र मुर्गीच काय अंडे सुद्धा न खाणार्या मला कसा पुर्ण करता येणार होता ?!

मंगळवार, ५ एप्रिल, २०११

मन करा थोर !

आफ्रिदीचा बांध अखेर फुटलाच ! मोठ्या मनाच्या माणसांचे हे असेच असते ! त्याचा देश भारताशी सतत मैत्रीसाठी हात पुढे करतो आहे, स्वत: कडे कमीपणा घेत आहे पण भारत मात्र त्याच्या या प्रयत्नांना साद देत नाही ! भारत-पाक मैत्रीसाठी आयपीएलच्या बाजारात अनमोल पाकी खेळाडूंनी स्वत:ला विकायला काढले पण कोत्या भारतीयांना त्यांचे मोल करता आलेच नाही ! 26/11 च्या कथित हल्ल्याचे निमित्त करून भारताने पाकच्या विरोधात बदनामीची मोहीमच उघडली आहे. कावेबाज भारताने पाकिस्तानातच श्रीलंकेच्या खेळाडूंवर हल्ला करून पाकमध्ये खेळास सुरक्षित वातावरण नाही अशी बोंब जगभर ठोकली. बिचार्या पाकिस्तानला विश्वकरंडकाच्या आयोजनावर व त्यातून मिळणार्या बख्खळ पैशावर पाणी सोडावे लागले. मोठ्या मनाच्या पाकने तरीही स्पर्धेतुन काढता पाय घेतला नाही. विश्वचषकात भारताने पाकशी गाठ पडू नये अशी फिल्डींग लावली होती पण मैत्रीसाठी आसुसलेल्या पाकने मोठा जिगरबाज खेळ करून, क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन्ही देशात सुसंवाद घडावा यासाठी क्रिकेट डिप्लोमसीचे गंजलेले दरवाजे उघडले. अगदीच नाइलाज झाला म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाकी पंतप्रधानांना मोहालीत सामना बघण्याचे आवतण द्यावे लागले. मोठ्या मनाच्या पाकने मग लगेच फक्त 27 वर्षे पाकी तुरूंगात असणार्या भारतीय कैद्याला , त्याच्या गुन्ह्याच्या मानाने दिल्या गेलेल्या अगदीच सौम्य शिक्षेचे तब्बल काही महिने बाकी असतानाही रीहा केले. यावर भारताने कसाब या भारतीय हद्दीत चुकून घुसलेल्या 16 वर्षाच्या बालकाला, ज्याला 26/11 च्या कटात भारतीय पोलिसांनी गोवले आहे, बाइज्जत रीहा करायला हवे होते, पण भारताचा नुसता आकार मोठा, मन मात्र कोते ते कोतेच !

पाकिस्तान स्वत:कडे कमीपणा घेवून मैत्री करण्याचे हर-एक प्रयत्न करत असताना , भारत मात्र सतत आपली कोती मनोवृत्ती दाखवित होता. खरेतर सामना मोहालीत घेण्या ऐवजी भारताने पाकसारखाच मनाचा मोठेपणा दाखवित पाक-अफगाण सीमेवर सामना खेळायला हवा होता. अमेरिकेला घाबरून विजनवासात असलेला संत ओसामा बिन लादेन याला सुद्धा या सामन्याचा आस्वाद लुटता आला असता ! गेला बाजार भारताने कराचीत खेळायला काहीच हरकत नव्हते. कारण तिकडे तर भारत-पाक मैत्रीचा खंदा पुरस्कर्ता दाउद इब्राहिम हा सुद्धा दोन्ही पंतप्रधानांना जॉइन झाला असता ! पण भारताकडे कोठे हो एवढे विशाल मन ? गंगेत घोडे न्हाले या उक्तीप्रमाणे एकदा काय तो भारत-पाक सामन्याचा दिवस उजाडला. मोठ्या मनाने आफ्रिदीने एक मैत्रीपुर्ण प्रस्ताव धोणीसमोर ठेवला. जो टॉस जिंकेल त्याने सामना हरायचा. कोत्याच नव्हे तर कुटील मनाच्या धोणीने टॉस तर जिंकलाच पण सामना सुद्धा खिषात घातला !

भारतातला मिडीयापण काही कमी नाही. “सचिनला शंभरावे शतक करूच देणार नाही असे आफ्रिदी म्हणाला” अशी पुडी मिडीयाने सोडली. परत पाकिस्तानने संयम पाळत मन मोठे केले. आफ्रिदीने आपण असे बोललोच नाही असा खुलासा केलाच वर भारत-पाक मैत्री होणार असेल तर करूदे सचिनला शतकांचे शतक याच सामन्यात असे मोठ्या मनाने जाहीर केले. मोठ्या मनाचा हा सज्जन नुसते एवढे बोलूनच थांबला नाही तर प्रत्यक्ष कृतीतुन पण त्याने ते जगाला दाखवून दिले. प्रत्यक्ष सामन्यात सचिनचे शतक व्हावे म्हणून पाकी खेळाडूंनी जंग-जंग पछाडले. गंमत म्हणजे सचिनला स्वत:च बाद होवून पाकला अपशकून करायचा होता म्हणून तो पाकच्या वेगवेगळ्या खेळाडूंकडे सोपे सोपे झेल देत होता पण पाकी खेळाडू सचिनचा, पर्यायाने भारताचा कावा ओळखून , सचिनच्या हुकलेल्या शतकाचे पातक आपल्या माथी नको , मैत्रीत बिब्बा नको म्हणून ते झेल टाकत होते. पाकचा विकेट कीपर अकमल तर ग्लोव्हजला अमूल बटर लावूनच तय्यार होता. शेवटी हाडामासाचे पाकी खेळाडूच ते, झेल तरी किती सोडणार ? एक, दोन, तीन, चार ? शिशुपालाचे शंभरच अपराध कृष्णाने माफ केले होते हो ! पण हे मात्र अतीच झाले ! सचिनने काय पण सॉलिड गेम केला होता ! कॅच सोडला तर जगभरातले कोट्यावधी प्रेक्षक पाकी क्षेत्ररक्षणाची खिल्ली उडवणार, पकडला तर भारत-पाक मैत्रीत खोडा घालायला भारताला आयते निमित्त मिळणार ! शेवटी सचिनने काडी केलीच. त्याने भोळ्या-भाबड्या आफ्रिदीकडेच सोपा झेल दिला ! बिचारा आफ्रिदी शहीद झाला. हाताला चिकटलेला चेंडू त्याने किडा झटकावा तसा आकाशात भिरकावला पण सचिन कसला थांबतोय पीचवर, त्याला तर बादच व्हायचे होते ना !

ठीक आहे, झाले ना तुमच्या मनासारखे, असे म्हणत हार-जीत पेक्षा भारत-पाक संबंध सुधारणे महत्वाचे असे म्हणत उमद्या आफ्रिदीने आधीचे कटू प्रसंग विसरून पराभवानंतरही भारताचे गोडवे गायले, किती हा मनाचा मोठेपणा ! पण भारताचे शेपूट वाकडे ते वाकडेच. संथ खेळून भारताला सामना जिंकू देणार्या मिसबाहला सामन्याचा मानकरी घोषित न करता भारताने चार झेल सुटूनही शतक पुरे करू न शकणार्या तेंडूलकरचा गौरव केला. खरे तर सचिनने स्वत:ची विकेट फेकून भारत-पाक मैत्री अध्यायाला नख लावले होते ! एखाद्याने मन तरी किती मोठे करावे ? ते सुद्धा कोत्या मनाचे भारतीय, सतत आपल्या कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन दाखवित असताना ? भारतात असेपर्यंत आफ्रिदीनेच काय त्याच्या लहानग्या मुलीने पण संयम बाळगला. तिनेसुद्धा सचिनला दोष न देता मिसबाहला दोषी ठरविले होते. मान सांगावा जनात, अपमान घालावा पोटात या उक्तीप्रमाणे पाकचा संघ मायदेशी परतला. भारत-पाक मैत्री कशी पुढे रेटायची याचीच चर्चा तिकडच्या मिडीयात होती पण गंभीरने मात्र या सगळ्या प्रयत्नावर बोळा फिरवला. भारताचा विश्वचषक त्याने 26/11 च्या शहीदांना समर्पित केला ! मातम झाला पाकिस्तानात ! भारताची 130 कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या थोडी कमी करण्यासाठी पाकने काही भली माणसे समुद्रमार्गे भारताच्या राजधानीत, मुंबईत पाठविली होती. भारत-पाक मैत्रीच्या आड येणार्यांचा खातमा हे सज्जन प्राणपणाने करत असताना, भारतीय सुरक्षा यंत्रणेने मात्र त्यांना चुन-चुनके टीपले ! किती हा अधर्म ? आणि हा गौतम असे नाव धारण करणारा गंभीर त्यांच्या नावाने खोटे अश्रूही न ढाळता भलत्याच शहिदांना आदरांजली वाहतो ? बस्स झाले हे आता शांतीची कबुतरे उडवणे ! कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच ! वाघ म्हटले तरे खातो, बाघोबा म्हटले तरी खातो ! मग वाघोबाच का म्हणून नये ! शेवटी भारतीयांशी मैत्री शक्य नाही याची जाहीर वाच्यता आफ्रीदीला करावीच लागली ! भारतीय किती कोत्या मनाचे आहेत हे आता तरी जगाला पटेल का ?

आजच्या पेपरात आफ्रिदीचे हे परखड बोल वाचून मी चांगलाच अंतर्मुख झालो आहे. गांधीच्या देशात हे चालले तरी काय आहे ? आपण भारतीय एवढ्या कोत्या मनाचे का ? खरा मित्र कोण, कोणाचे मन मोठे हे आपणाला कधी कळणार ? आपण पाकला एवढे पाण्यात का बघतो ? त्यांचे थोर मन बघा जरा. एकेकाळी अख्ख्या हिंदूस्थानावर त्यांचे राज्य होते. इंग्रजांशी संधान साधून आपल्या नेत्यांनी जमिनीचा एवढासा तुकडा पाकला दिला, 1971 मध्ये आपण त्याचे पण दोन तुकडे केले, लष्कराच्या टाचेखाली काश्मिर आपल्या ताब्यात ठेवला, पाकिस्तान 1965, 1971 व कारगिल या मैत्रीपुर्ण युद्धात पाकला मार दिला ! विश्वचषकाच्या एक नव्हे दोन नव्हे तर सलग पाच सामन्यात त्यांना मात दिली ! एवढा माज बरा नव्हे . अजून तरी शहाणे व्हा ! भारतीयांनो जरा मन करा थोर !