शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २००८

रेट !

रेट !
१९८६ ते १९९२ हा गोदीतल्या नोकरीचा काळ खरच परम-सुखाचा होता, त्यात दूसरी पाळी म्हणजे पर्वणीच असायची। आठवड्यातुन ३ दिवस तरी आमची सगळी बॅच संध्याकाळी ६ वाजताच सूटायची. मग मोर्चा वळायचा इंग्रजी चित्रपटगृहांकडे. पोस्टर बघून कोणता चित्रपट बघायचा ते ठरवले जाई ! अर्थात त्यातही अनेकदा फसगत होईच ! शो सूटला की कॅनन ची पावभाजी, ( किंवा कोणी एखाद्या खादाडीच्या नव्या-चांगल्या स्पॉटची माहीती दिलेली असेत तर तिकडे) , मग कालाखट्टा किंवा कूल्फी ! आझाद मैदान किंवा गेट-वे पर्यत फेरफटका आणि मग घर गाठायचे ! फोर्ट भागात सध्याकाळी फेरफटका मारताना लक्ष वेधून घेणारी अजून एक गोष्ट म्हणजे शरीर-विक्रय करणार्या बायका ! आम्ही सगळेच तेव्हा अविवाहीत होतो व 'तसल्या' बायकांबद्दल सुद्धा आमच्यात गप्पा व्हायच्या पण 'तिकडे' जावे असे मात्र कधीच वाटले नव्हते. आमच्यातला एक जण मात्र या विषयात भलताच रस दाखवायचा. एकदा असेच अति झाले आणि माझी तार खसकली. मी म्हटले 'ज्या गावाला जायचेच नाही त्याची वाट कशाला विचारायची ? तेवढी हिंम्मत आपल्यापैकी एकातही नाही, तेव्हा आता ही चर्चा पुरे !" या वर तो मला घाबरट, भागुबाई म्हणून चिडवू लागला. मी त्याला आव्हान दिले की तुझ्यात जर एवढी हिम्मत असेल तर त्यातल्या एकीला फक्त रेट विचारून दाखव ! जर नुसते विचारलेस तरी मी सगळ्यांना कॅनन मध्ये पावभाजी खायला घालीन नाहीतर तू तरी ! त्याने ते आव्हान स्वीकारले !


नगर चौकाकडे आमचा मोर्चा वळला। स्टॉपवर 'त्या' बायका घोळक्याने उभ्या होत्या. हा त्यांच्या दिशेने गेला पण तसाच थोडा टर्न घेउन पुन्हा आम्हाला सामील झाला. मी विचारले तर म्हणाला खूपच थोराड वाटल्या ! मग जीपीओ जवळच्या त्याला खूप लहान वाटल्या. कोठे काय तर कोठे काय ! सगळ्यांना कळून चूकले की गडी फाफलला आहे पण कबूल करत नाही आहे. शेवटी त्याला अल्टीमेटम दिले गेले ! सेंट्रल कॅमेर्यालगतची गोला-लेन बदनाम गल्ली आहे. आम्ही त्या गल्लीत शिरलो इतक्यात त्या भागातली बत्ती गुल झाली ! तिथले एक लॉज 'प्रसिद्ध' आहे, मित्र त्यात शिरला, कोणीतरी साक्षीदार हवा, म्हणून त्याच्या सोबत आणि एक जण गेला. तब्बल २० मिनीटे ते आत होते. मला खात्री पटली की आपले पैसे ढीले होणार आता ! ते दोघेही परत आले तेव्हा तो घाम पूसत होता. आम्ही सगळ्यानी एकदमच विचारले, काय झाले ? तो काही बोललाच नाही पण सोबत गेलेला म्हणाला "हा ना अगदी xx आहे ! याने बर्याच प्रयासाने तोंड तर उघडले, तब्बल दोनदा , पण आधी विचारले काय तर "लाइट केव्हा येणार" आणि नंतर आवंढा गिळत गिळत "तुझा -- तुझा -- काय -- काय -- टायम काय झाला ?" मराठे तू याचे पाणी बरोबर जोखलेस आणि पैज जिंकलास ! पण तो एवढा खजिल झाला होता व त्याचा चेहरा इतका रडवेला झाला होता की त्यावर आम्ही पुढे काहीच न बोलता घर गाठले !


या घटनेला दोन महीने झाले असतील. त्याच्या बरोबरचा 'त्या दिवशीचा' साक्षीदार व माझी एकत्र तिसरी पाळी होती. मागाहुन लोकल पटकन मिळत नाहीत म्हणून आम्ही घरून अर्धा-एक तास लवकरच निघायचो. जीपीओ समोरच एक इराणी आहे. तिकडे आम्ही पानीकम घ्यायचो व रमत-गमत धक्क्यावर जायचो. असेच बस स्टॉपवर उभे असताना याला काय लहर आली कुणास ठाउक, 'मराठे बघ माझी डेरींग' म्हणत त्याने जवळच घुटमळणार्या एकीला खुणेने बोलावले व रेट विचारला ! तीने तो संगितल्यावर याने तोंड फीरवले व आम्ही चालू पडलो. आता मात्र नाटकच झाले. तीने त्याचा हातच पकडला व खडसावून विचारले, "भाव करके कहा जाता है बे xxx, बोल तुझे क्या परवडता है ! " काही कळायच्या आत ३-४ भडव्यांनी आम्हाला घेरले ! प्रसंग बाका होता, हाडे मोडायचीच वेळ आली होती. तो तर पार हडबडून गेला होता. मी आता सावरलो होतो. मी आवाज चढवून माझे सरकारी ओळखपत्र उंच धरले व आम्हाला गोदीत धाड घालायला जायचे आहे, मागाहून काय ते बघू असे दरडावले. त्यांचा विश्वास बसेना, ते आमच्या पाठोपाठ येउ लागले. अर्थात गोदीच्या आत शिरायची हिंम्मत ते करणार नाहीत याची मला खात्री होती. गेट मधून आम्ही आत शिरलो आणि धक्क्याच्या दिशेने धूम ठोकली ! बरेच अंतर त्यांच्या अर्वाच्य शिव्या मात्र आमच्या कानावर आदळतच होत्या !

बुधवार, २९ ऑक्टोबर, २००८

स्वतंत्र, सार्वभौम (पण) पत्नीसत्ताक राष्ट्राची वाटचाल !

मराठ्यांच्या राष्ट्रातील एक घटक राज्य, चि. एकनाथ उर्फ बंड्या यांचे राज्य नीट चालत नाही, आर्थिक शिस्त नाही, काडीची अक्कल नाही , कसला म्हणून पोच नाही असे दिल्लीकरांना वाटू लागले होते. त्यांच्या मनमानी कारभाराला वेसण घालावी म्हणून कोणीतरी खमके हवे असे दिल्लीकरांनी ठरवले व उप-मुख्यमंत्री म्हणून चि.सौ.का. संध्या हीची नेमणूक झाली. शपथविधी सोहळ्यात पंतप्रधानांनी आश्वासन तर दिले होते की कोणाच्याही विकासाच्या आड केंद्र सत्ता येणार नाही व संघातील सर्वच घटकांचा योग्य तो मान राखला जाइल पण इतर अनेक आश्वासनांनाप्रमाणेच हे ही आश्वासन हवेतच विरून गेले ! मुख्यमंत्र्याला आवरण्यासाठी आणलेल्या उप-मुख्यमंत्री केंद्रीय सत्तेलाच ललकारू लागला ! अवाजवी हस्तक्षेप थांबवा असे बजावू लागल्या. केंद्राला ते आपल्या स्वायत्ततेला दिलेले आवाहन वाटले व हिंमत असेल तर वेगळे होउनच दाखवा असे आव्हान दिले गेले ! राज्याची स्थिती चांगली होती पण वेगळे राष्ट्र स्थापण्या एवढी मजबूत पण नव्हती. त्यात उप-मुख्यमंत्री पण उत्पादक निवडावा या सर्वमान्य रूढीला फाटा दिला होता ! तोंड दाबून बुक्क्यांचा मार चालूच होता , त्यात परकीय शक्ती तेल ओतत होत्या. सर्वमान्य तोडग्याची शक्यता मावळल्यावर घटक राज्याने संघराज्यातून आधी फूटून निघावे, विजनवासातील सरकार स्थापन करावे पण अस्मिता जपावी असे ठरले !
मुंबई बंदराच्या कर्मचारी वसाहतीत नवीन राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली गेली तेव्हा गंगाजळी होती अवघी १०,००० रूपडे ! त्यातले सर्वच अत्यावश्यक साधन-संपत्ति आणण्यातच खर्ची पडले. मुख्यमंत्री आता पंतप्रधान बनले तर उप-मुख्यमंत्री , गृहमंत्र्याच्या भूमिकेत शिरल्या ! पंतप्रधानांना फक्त नोकरी व उडाणटप्पूगिरी सोडली तर बाकी कशातच गति नसल्यामुळे आपसूकच घरात गृहमंत्र्याचा एकछत्री अंमल चालू झाला. गृहमंत्री भलत्याच कर्तबगार व खमक्या निघाल्या. स्वाभिमान जपून , काटकसरीचा मंत्र स्वीकारून, पर-राज्यांशी उत्तम संबंध ठेउन त्यांनी अल्पावधीतच गाडा रूळावर आणला व तूटीचा अर्थसंकल्प शिलकी होउ लागला ! देशत्याग करताना राजकूमार जेमतेम वर्षाचे होते तर मोठ्या (पण भाड्याच्याच ) जागेत बस्तान बसविताना राजकूमारीच्या आगमनाचा पायरव ऐकू येत होता ! तिच्या जन्मा बरोबरच , आर्थिक सुबत्ता जणू चालतच आली. अनेक मूलभूत सुविधांबरोबरच लोकरंजन करणारे प्रकल्प मार्गी लागले. अल्पावधीतच झालेली देशाची भरभराट बघून शेजारी देश कौतुक करू लागले. अनेक देशांची शिष्टमंडळे, मंत्री व प्रधानमंत्री व राष्ट्राध्यक्ष यांची पायधूळ लागू लागली. अनेक नवे मित्र मिळाले, शत्रूंना जरब बसली. नव्या देशाला मान्यता मिळाली ती कर्तबगारी दाखवल्यावरच. आर्थिक पाया मजबूत असल्यामुळे देशाला बाहेर हवा तिकडे आदर मिळू लागला व जागतिक प्रश्नांत वेटोचा अधिकारपण प्राप्त झाला. पण एक सल होतीच. ती म्हणजे स्वत:ची भूमी हवी, नाहीतर या सार्वभौमत्वाला काय अर्थ ? आर्थिक सुबत्ता असतानासुद्धा आमचा देश हे पाउल का उचलत नाही अशी अन्य देशात चर्चा सुरू झाली. जनमताचा आदर व गृहमंत्र्याचा दबाब आल्यामुळे शेवटी पनवेलला स्वत:च्या जागेत राजधानी वसवली गेली ! त्या वेळी झालेल्या सोहळ्यात अनेक देशांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष सामील झाले होते. त्या सर्वाचांच यथोचित मान राखला गेला. सर्वानीच नव्या राजधानीत सुख, शांती, भरभराट सदैव नांदो असे तोंडभरून आशीर्वाद दिले व गृहमंत्र्याच्या कर्बगारीला सलाम केला !
उण्यापुर्या सहा वर्षातच नवी राजधानी वैभवाच्या शिखरावर पोचली आहे. याची पावती म्हणूनच की काय, राष्टृकूलाच्या प्रमुखाचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्याचा सन्मान देशाला प्राप्त झाला आहे. परत एकवार राजधानी नटून-थटून या सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. या सोहळ्याला चार चांद लावण्यासाठी अनेक मित्र देश आपली पथके पाठवणार आहेत. त्यांची उत्तम बडदास्त ठेवण्यासाठी, स्वागतात कोणतीही उणीव राहू नये म्हणून स्वत: गृहमंत्री राबत आहेत. त्यांच्या हाताशी आता राजकूमार व राजकूमारी सुद्धा आहेतच. अनेक देशांची पाहणी पथके येउन सर्व व्यवस्था चोख असल्याचा निर्वाळा देत आहेत, अनेक फोनवरून संपर्क साधून माहीती घेत आहेत व समाधान व्यक्त करत आहेत. हा सोहळा यशस्वी करून नव्या स्वतंत्र, सार्वभौम, (पण) पत्नीसत्ताकाची द्वाही सर्वत्र फीरवण्यास आम्ही सर्वच सज्ज आहोत !

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८

'आम्ही' शेयर विकत का घेतो ?

'आम्ही' शेयर विकत का घेतो ?


ज्याला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही, सिगारेट, बीडी कधी शिलगावत नाही, दारूच्या प्यालात जो कधी बुडत नाही, अफू-गांजा-चरस यांचे तर नावच नको आणि कोणत्याही 'बाजी' चा ज्याला शौक नाही त्याने शेयर तरी का विकत घ्यावेत बरे ?


वरील पैकी एक किंवा सर्व धंदे करणारे शेयर सुद्धा घेतात किंवा न करणारे 'मग करायचे तरी काय नरदेह मिळाल्यावर ?' म्हणून शेयर विकत घेतात। गुमा समाज काळ्याचे पांढरे व पांढर्याचे काळे करण्यासाठी, तसेच मराठी माणसाला पगार म्हणून दिलेले पैसे परत आपल्या तिजोरीत आणण्यासाठी शेयर घेतो तर मराठी माणसे पण त्यांना साथ द्यायला शेयर घेतात ! म्हणजे गुमा जेव्हा विकतो तेव्हा ममा (मराठी माणसे !) घेतात व vice versa !आम्ही मात्र त्यातलेही नाही !


आम्ही वाणिज्य शाखेत शिकत असल्यापासूनच या गुमांना पुरते ओळखून आहोत। स्वत:च्या स्वार्थासाठी शेयर बाजार ही मंडळी कसाही वाकवतात व यातुनच देशाच्या विकासाला खीळ बसते. चांगल्या कंपन्याना भाव मिळत नाही व फालतू कंपन्या भाव खाउन जातात. कोठेतरी, कोणीतरी हे बदलावे असा इश्वरी संकेतच असावा ! गुमांच्या मुजोरीला आळा घालण्यासाठी सरकारने राष्ट्रीय शेयर बाजाराची स्थापना केली, ती सुद्धा एका मराठी माणसाकडूनच, पण म्हणतात ना, सुंभ जळला पण पीळ नाही गेला याचा प्रत्यय येउन गुमांनी आपले धंदे चालूच ठेवले. चांगल्या कंपन्याचे शेयर पाडायचे व कंपूतल्या कंपन्याचे धावडवायचे !


अशीच त्यांची वाईट नजर 'महानगर टेलीफोन निगम' या सरकारी उपक्रमावर पडली। तेव्हा MTNL चा भाव होता ३२० रूपये, माझ्या अभ्यासाप्रमाणे तो ५०० असायला हवा होता. संघर्ष इथेच उडाला. सरकारी कंपनीचे नाक कापून गुमांना तो भाव ५० च्या खाली आणायचा होता. त्यामुळे त्यांनी विक्रीचा मारा सुरू केला पण त्यांना कोठे माहीत होते की आपली गाठ आता एका मर्द मराठ्याशी आहे ते ! या देशद्रोह्यांना धडा शिकवायची वेळ आता आलेली होती. मी व माझे अनुयायी मोठ्या प्रमाणावर MTNL खरेदी करू लागलो, म्हणजे ते लाखाने विकत असताना आम्ही शेकड्याने घेत होते ! हे युद्ध चांगलेच रंगले पण शत्रू चांगलाच मातबर होता. प्रचंड पैसा ओतून त्याने MTNL चा भाव ३००, २००, असा पाडत पाडत १०० च्या घरात आणला ! पण आम्ही हार मानणारे थोडेच होतो ? व्यक्तीगत फायद्यापेक्षा देशाची प्रतिष्ठा आम्हाला जास्त प्रिय होती. पैसे उभारण्यासाठी कोणी फंडातुन पैसे काढले, कोणी दागिने विकले, तर कोणी घर गहाण ठेवले , पण हार मानली नाही ! शेवटी MTNL आम्ही टेक-ओवर करू अशी स्थिती निर्माण झाली. पण भावातली घसरण काही थांबत नव्हती. बाजार संपल्यावर आम्ही बैठक घेउन 'बचेगे तो और भी लडेगे' असा निर्धार व्यक्त करत होतो पण बचणार तरी कसे हाच प्रश्न होता !


आता आर्थिक झळ घरीही बसू लागली। फोनची बेल जरी वाजली तरी छातीत धडकी भरू लागले. त्यातही वाईट म्हणजे फोनचे बिल न भरल्यामुळे अनेकांचे फोननिगमने कट केले ! किती हा कृतघ्नपणा ! असो ! राष्ट्राच्या गौरवाच्या लढाईत तुझे पण योगदान दे असे मी बायकोला विनवले। या देशकार्यासाठी तीने आपले दागिने द्यावे अशी मी अपेक्षा करताच धरणीकंप झाला जणू ! माझे काय चूकले हेच मला कळेना. मी देशासाठी लाख दोन लाख निछावर केले असताना हीला दागिन्यांचा एवढा सोस ? अग "दारू साठी पैसे हवेत म्हणून दागिने विक असे तर सांगत नाही ना, का जुगारात हरलो की मटक्यात बुडालो ? देशासाठीच तर पैसे मागतो आहे तर एवढा गहजब ?" या माझ्या डायलॉगवर बायको "मग ढोसा दारू हवी तेवढी आणि पडा गटारात, ते परवडले, पण आता हे देशप्रेमाचे भरते पुरे" असे बजावून माहेरी चालू पडली. घरोघरी त्याच चुली याचाही अनुभव मित्रांच्या घरी फोन केल्यावर आला. आता पैशाच्या मस्तीपुढे देशप्रेम आडवे होणार होते. दूसर्याच दिवशी आम्ही १० लाखाचे नुकसान सोसून या राष्टृ कार्यातुन माघार घेतली. आता पांढरे निषाण फडकावणार तोच चमत्कार झाला ! परकीय व देशी अर्थसंस्था आमच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी सपाट्याने MTNL चे शेयर खरेदी करून त्याचा भाव ३५० च्या वर नेउन ठेवला ! देरसे आये, लेकीन दुरूस्त आये ! आमचे १० लाख कुर्बान झाले पण देशाचा सन्मान तर राखला गेला ? आमच्या डोळ्यात पाणी तरळले पण पैसे बुडाल्याने नाही तर देश विजयी झाल्याने ! दागिन्यांना आता धोका नाही याची खात्री पटल्यावर, यथावकाश बायकोसुद्धा स्वगृही परतली !


त्यानंतर गुमा पण समजुन गेले की 'आम्ही' शेय्रर घेतो ते राष्ट्रीय कर्तव्य म्हणून, तेव्हा उगाच आमच्याशी पंगा घेण्यात काही अर्थ नाही। आम्ही जे शेयर घेतो त्याच्या वाट्याला ते बिलकूल जात नाहीत. ज्यांना बाजारात कोणी भाव देत नाही त्यांना हा एकनाथ हाच आपला नाथ वाटतो व आम्ही ही त्यांना योग्य तो भाव देतो ! हीर्याची कदर शेवटी जवाहरीच करणार ना ? मला ममांची या राष्ट्रकार्यात साथ मिळेल ना ? तर मग घ्या शपथ , "या पुढे माझा प्रत्येक पैसा मी शेयर खरेदीवरच खर्च करेन, कोणत्याही शूद्र लाभाची अपेक्षा न धरता, निव्वळ राष्टीय कर्तव्य म्हणून, गुमांसारख्या राष्ट्र-द्रोही शक्तींना वचक बसावा म्हणूनच ! अगदी घरा-दारावर नांगर फीरेपर्यंत मी मागे हटणार नाही"


कोणी वंदा किंवा निंदा बाजार सावरणे हाच आमचा धंदा !


जय हिंद ! भारत माता की जय ! शेयर बाजार की जय !

रविवार, २६ ऑक्टोबर, २००८

दानत !

दानत !

लोकलमध्ये भीक मागणार्यात सुद्धा भरपूर वरायटी असते ! कोण नुसतेच हात पसरतात, कोण अंगातला शर्ट फिल्मी स्टायलने काढून डबा स्वच्छ करून मेहनतीचा मेहनताना मागतात, तर कोणी गाणे गाउन, कोणी वाजवून, तर कोणी गाउन आणि वाजवून लोकलप्रवाशांना साद घालतात ! हार्बरवर तर आपली गानकला पेश करून भीक मागणारे अख्खे खानदान आहे ! पुरूष पेटी वाजवतो व गातो, बायको (?) ढोलके वाजवते, तर मुले साथ देतात व भीकेचा कटोरा फीरवतात ! अशी गाणी ऐकून दौलतजादा करणारे पण बरेच असतात, त्यात फर्माईष करून मोबदला देणारेही असतात. गाणार्याचा दर्दभरा (?) आवाज ऐकून ह्र्दयाला पीळ पाडून घेणारेही रसिक भेटतात तसेच 'केसवा मादवा' गाउ नकोस असे काकूळतीने सांगत पैसे देणारेही असतात ! एकदा माझ्या शेजार्याने (लोकलमधल्या !), 'दोनो ने किया' हे गाणे ऐकून भिकार्याला १० ची नोट दिली होती. भिकार्याने अशीच मग एकापेक्षा एक दर्दभरी गाणी त्या रसिकाला ऐकवून त्याला पार कफल्लक करून टाकले. गाडीत तर अश्रूंचा महापूर आला होता. पनवेलच्या पुढे अजून लोकल जात नाही हे कळल्यावर तो भिकारी सुद्धा रडायला लागला होता पण दात्याने मात्र आपले दोन्ही खिसे त्याला उलटे करून दाखवले व त्याचे सांत्वन केले !
हिंदी सिनेमा जसा चाकोरीबाहेर जात नाही तशीच भिकार्यांची गाणी पण घसीटी-पसीटीच असतात ! 'केसवा मादवा' ऑल टाईम हीट, मग परदेसी परदेसी, तुम एक पैसा दोगे, जगी ज्यास कोणी नाही--- यांचा क्रम. पण एकदा मात्र एका भिकार्याने जरा वेगळा मार्ग चोखाळला, गायक भिकार्यातला तो बहुतेक शाम बेनेगल असावा ! त्याने चक्क भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पोवाडा सुरू केला ! त्याचा आवाज अशा गाण्यांसाठी सूट होता व रसिक कान देउन तो ऐकत होते. माझ्या बाजूला कोणीतरी, बहुदा बाबासाहेबांना मानणारा असावा, बसला होता. त्याला अगदी भरून आले. भरलेल्या आवाजाने तो म्हणाला "जियो मेरे लाल, आजपर्यंत बाबासाहेबांचा पोवाडा मी लोकलमध्ये केव्हाच ऐकला नव्हता, धन्य झालो, परत एकदा म्हण, मी तुला खुष करून टाकीन !". भिकारी आता त्याच्या पायाशीच बसला व बाबासाहेबांवर असलेली सगळी गाणी म्हणू लागला. आम्हाला आता कुतूहल होते की हा रसिक किती दौलतजादा करतो याचेच ! श्रोता तसा तालेवार वाटत होता. भारी कपडे, गळ्यात जाडजूड चेन (चैन !), पाची बोटात अंगठ्या, सोन्याची झळाळी असलेले घड्याळ ! खांदेश्वर आले, भिकार्याने आता आवरते घेतले व तो हात जोडून दीनवाणे पणे आपल्या मायबाप रसिकाकडे बघत राहीला. रसिक आता 'भाना'वर आला. खिषात हात घालून त्याने नोटांनी फुगलेले पाकीट बाहेर काढले. शंभरच्या नोटा मोजून झाल्या, मग पन्नासच्या, मग वीसच्या ! भिकार्याच्या तोंडून आता लाळच गळायची बाकी होती. त्याचे डोळे पार विस्फारले होते. लोकलमधले लोक पण अचंबित झाले होते ! त्त्या पुडक्यातून त्याने आता वीसची नोट बाहेर काढली. ती नोट रस्त्यावरच्या पानवाल्याने पण घेतली नसती व रद्दीच्या दूकानातून ती बदलायलाच २ रूपये तरी खर्ची पडले असते. पण अगदीच रूपया दोन रूपयापेक्षा वीस रूपये भारीच होते. मग मात्र नाट्यच घडले ! त्याने भिकार्याला विचारले,सूट्टे आहेत का, काढ आधी ! भिकार्याने दोन दहाच्या नोटा काढल्या तेव्हा दाता बोलला 'अजून काढ !" आता भिकारी त्याच्या हातावर रूपये, आठ आणे, चार आणे जमा करत होता. दाता कोण आणि याचक कोण हेच कळत नव्हते ! सगळी चिल्लर १९ रूपयाची जमली. आता भिकार्याने खिसे उलटे करून दाखवले. दाता म्हणतो कसा, 'बघा भिकारी पण किती तालेवार आहे . xxxच्याला बंदा रुपया भिक पाहीजे !' मग त्याने 'कोणीतरी दोन आठ आणे द्या' म्हणून आवाहन केले. त्याची ती मुराद एकाने तत्परतेने पुरी केली. मग त्याने परत सोडे एकोणीस रूपये मोजून घेतले व मगच ती कळकट मळकट नोट दौलतजादा केल्याच्या थाटात त्या भिकार्याला दिली !
इतका लाचार भिकारी आणि इतकी प्रचंड दानत तुम्ही कधी लोकलमध्ये बघितली आहे का ?

बुधवार, २२ ऑक्टोबर, २००८

मराठीगिरी !

मराठीगिरी !

ठरवले तर होते की आपले जे जे काही काम असेल ते मराठी माणसाकडूनच करून घ्यायचे, दूकानात जायचे तर शहाडे-आठवले यांच्याच किंवा जोशी फॅमीली स्टोअर नाहीतर आयडीयल बुक डेपो ( नावावर जाउ नका, दूकाने मराठी, ब्राह्मण माणसांची आहेत !), हॉटेलात जायचे तर तांबे किवा 'केळकर विश्रांति भुवनच' ! कपडे घ्यायचे ते सिंघानियाच्या रेमंडचे कारण तिकडचे विक्रेते १००% मराठी असतात ! बिल्डर परांजपेच हवा। बॅक हवी संघपरीवारातली, घराचे नूतनीकरण मराठी माणसाकडूनच करून घ्यायचे भले त्याचे कारागिर भय्ये असू देत, सूतार, प्लंबर, रंगारी, वायरमन, मेकॅनिक , ब्रोकरपण मराठीच हवा !

प्रसंग १ - शहाडे-आठवले यांच्या दूकानात पाउल टाकले। बराच काळ सेल्समन कोणी पुढे आलाच नाही. मालक पण जागचा हालला नाही ! पंखे सगळे बंद ! शेवटी मीच विचारले धोतर जोडी, साडी, पंचे घ्यायचे आहेत. 'काय ताप आहे' असा चेहरा करत एक सेल्समन पुढे आला. तुमचे बजेट सांगा आधी म्हणजे त्या हीशोबाने काढतो, उगाच पसारा करणार नाही मी ! मी बजेट सांगितले. मग त्याने काही साड्यांची बाडे काढली. ती उघडून दाखवायचे पण कष्ट तो घेत नव्हता तेव्हा मी साडी घ्यायचा विचार सोडूनच दिला, धोतराचे पान घेतले, पंचे/टॉवेल घेतले (कारण त्यात आवडी निवडीचा प्रश्न येतोच कोठे ?) बिल झाले काहीतरी ३६६ रूपड्याच्या आसपास, मी मालकाला ४०० रू. दिल्यावर मालक कडाडलेच ! बोहनीच्या टायमाला तरी निदान सुटे पैसे काढायचे ना राव ! मी म्हणालो, नाही आहेत सूटे, काय करायचे आता ? माल ठेउन जा आणि बघा आसपास सुटे कोठे मिळतात का ! मी माल सोडून जे दूकान सोडले ते परत कधीही तिकडे फिरकलो सुद्धा नाही ! गंमत बघा लोकल मध्ये रूपयाला संत्रे विकणारा भय्या १०० ची नोट दिलीत तरी कूरकूर करत नाही , काहीही करून, अगदी कोणाच्या हातापाया पडून सुद्धा, सूटे पैसे करतो पण गिर्हाईक सोडत नाही !

प्रसंग २ - मराठी ब्रोकर हवा म्हणून मी दादरचे पॉप्युलर गाठले। मालक कारखानीस. सगळा स्टाफ त्याच्या नात्या-गोत्यातलाच आणि बायकाच ! तिथे गेल्यावर कधीही हसून स्वागत झाले नाही ! ब्रोकरेज जास्त लावायचाच पण पेमेंट सुद्धा वेळेवर होत नसे. भावात पण हेराफेरी करायचाच. पुढे डीमॅटचा काळ आला. शेयर द्यायचे असतील तर चलन ( Delivery Instruction ) घ्यायचे २५ रू. जास्त घेउ लागला नाहीतर मग द्या तुम्हीच ! फोनवर कोणतीही कामे होत नसत, त्यासाठी दादर गाठावेच लागे ! शेयर विकत घ्यायचे असतील तर आधी चेक जमा करावा लागे. फोनवर order घेत नसे ! शेवटी मला याचा अगदी उबग आला. वडाळ्याला असेच भटकत असताना "Magnum Invesetment" चा बोर्डे बघितला. मालक जैन होता. तरूण होता. हसतमुख. आगत-स्वागत झाले. माणूस बरा वाटला म्हणून त्याच्याकडूनच व्यवहार करायचे ठरवले. पुढची ६ वर्षे, icici direct मध्ये online खाते उघडेपर्यंत तोच माझा ब्रोकर होता शिवाय IT Return सुद्धा तोच भरायचा ! ब्रोकरेज कारखानिसच्या अर्धे, तत्पर सेवा, कितीही मोठी ऑर्डर फोनवर घ्यायचा. दर दिवाळीला मुहुर्त सौद्याचे आमंत्रण अजूनही देतो !

प्रसंग - ३) इस्त्रीवाला - आधी मराठीच पकडला होता। काही दिवस चांगले गेले. पण जसे काम वाढत चालले , गडी बदलला. आधी सकाळी टाकलेले कपडे संध्याकाळी तयार असायचे पण मग हाच वेळ दोन दिवसावर गेला. मी म्हटले, अरे काम वाढले आहे, तर अजून थोडी माणसे ठेव पण कपडे वेळेवर देत जा. त्याचे उतर 'परवडत नाय !' मित्राकडे भैया सकाळी कपडे घेउन जायचा आणि संध्याकाळी परत सुद्धा आणायचा. सगळा हिशोब महीन्यामध्ये एकदाच करायचा ! शेवटी भैयालाच जवळ केला !

प्रसंग - ४ ) घराचे नूतनीकरण करायचे होते। साधारण २.५० लाखाचे काम होते. मराठी कंत्राटदार अनेक वेळा निरोप देउन घरी आलाच नाही. एकदा वाटेत दिसल्यावर त्यालाच घरी आणले. कोटेशन दे म्हणालो, तर शक्य नाही बोलला, जसे काम होत जाईल सांगत जाईन ! सामान माझ्या ओळखीच्या दूकानातून आणणार पण बरोबर तुम्ही यायचे नाही, का ? तर म्हणे मग दूकानदार भाव वाढवून सांगतो ! काम सलग पूर्ण करणार का ? करीन -- पण दूसरे मोठे काम मिळाले तर थोडे तुमचे काम लांबेल. पैसे कसे द्यायचे - सगळेच आधी दिलेत तर बरे , मग लगेच काम सुरू करतो. शेवटी त्याचा नाद सोडला आणि एका अण्णाला पकडले. फोन केल्यावर १० मिनीटात घरी हजर, टेप घेउन ! प्रत्येक कामाचे डीटेल कोटेशन दूसर्याच दिवशी तयार, सामान तुम्ही आणा किंवा मी आणतो, choice is yours ! काम २१ दिवसात पूर्ण करीन नाहीतर दर दिवशी ५०० रू. पेनल्टी लावा ! शेवटी त्यालाच काम दिले. pop चे काम करणारे सगळे कारागिर मुसलमान ! मानखुर्द वरून यायचे पण वेळे आधी यायचे व शेवटची गाडी पकडून जायचे. लोडशेडींगची वेळ डोक्यात ठेउन कामाचे नियोजन करायचे. या धंद्यात एकही मराठी माणूस नाही ! प्रचंड कष्टाचे काम आहे हे ! रंगारी मात्र मराठी होते. पण काम चालू झाल्यावर त्यांनी जे रंग दाखवले की मला त्यांना काम आहे त्याच स्थितीत सोडून हाकलून द्यावे लागले !

प्रसंग ५ - सूतार - वडाळ्याला असताना लाकडी फर्निचर करून घ्यायचे ठरवले। सूतार मराठीच पकडला. कारखान्यात सगळे करतो व घरी आणून जोडतो म्हणाला. गुढी पाडव्याला फर्निचर मिळणार होते पण पाडवा म्हणजे दिवाळीतला, उलटून गेल्यावर मिळाले ! मध्ये तोंड दाखवायचा पण आगाउ पैसे मागायला ! फर्निचर घरी लागले पण पॉलीशचे काम करायला परत काही आला नाही. मी फोन केला तेव्हा म्हणाला की बजेट संपले ! ते मला शेवटी भय्याकडूनच करून घ्यावे लागले !

प्रसंग ६ - सोसायटीचे दुरूस्ती (गळती) काम - मी मराठी ठेकेदाराकडून कोटेशन आणले आणि एकाने भय्याकडून। बैठकीत दोन्ही उघडली गेली. मराठी माणसाचे कोटेशन होते २.५० लाखाचे तर भय्याचे ५० हजाराचे. दोघे एकाच प्रकारे काम करणार होते तरी एवढा फरक ? शेवटी ठरवले की फूटावर दर द्या, ज्या भागात गळती आहे तेवढेच काम करा. कारण एकाच बाजूलाच (जी वार्याची दिशा होती) गळती होती. मराठी 'नाय जमत बोलला', भय्याने १२ रू फूट भाव दिला व १० हजारात काम झाले !

प्रसंग ७ - ग्रिलचे काम - जागा ताब्यात घ्यायच्या आधीच एका मराठी कारागिराला अर्धे पैसे आगाउ देउन सर्व फीटींग करायला सांगितले होते। पनवेलला रहायला गेलो आणि महीना झाला तरी फक्त सेफ्टी डोअरच लागले ! शेवटी कंटाळून पैसे भांडून परत घ्यायला लागले व एका बिहारी मुसलमानाकडून कमी पैशात काम करून घ्यावे लागले !

प्रसंग ८ - मराठी वॉचमन - मोठ्या हट्टाने मी ठेवला पण महीनाभरात त्याने अगदी वात आणला। उशीरा येणे, आल्यावर गुल होणे, कामे धड न करणे हे प्रकार सहन करत असतानाचा , चक्क दारू पिउन कामावर येउ लागला व पगार वाढवून द्या म्हणून सांगू लागला. शेवटी त्याला हाकलावेच लागले आता नेपाळी गुरखा आहे !

प्रसंग ९ - घरात लहान सहान कामे निघत असतातच पण दर वेळी हूकमी माणूस कोण मिळणार ? आमच्या कामावर एक शिपाई होता, तो बोलला, साहेब सगळे घोडे ड्रील वाचून अडते, नायतर मी कवाबी यायला तयार आहे। मी त्याला १२०० रूपयाचे ड्रील घेउन दिले. चार महीने झाले , थोडे काम मिळाले की महीना १०० रूपये असे परत कर असे सांगितले. गडी तयार झाला. माझ्या घरी तसेच आसपासची कामे करू लागला. त्याला चांगली कमाईपण होउ लागली ! असेच सहा महीने गेले आणि माझ्या लक्षात आले की गडी पैसे परत करत नाही आहे. चौकशी केली तर कळले की त्याने चक्क नोकरी सोडली आहे व आता रीपब्लीकन पार्टीचे काम करतो ! निरोप दिल्यावर आला, सगळे पैसे परत केले वर या कामात जाम झगझग आहे , पार्टीचे काम मस्त, चांगले पैसे मिळतात, तवा नोकरी बी सोडली ! काही महीन्यापुर्वीच कळले की त्याची अन्नान्न दशा आहे, दारू पिउन तबेतीची पण पार वाट लावून घेतली आहे कधी टपकेल भरवसा नाही !

प्रसंग १० - पनवेलचे घर स्टेशन पासून थोडे लांबच आहे. रोजची पायपीट शक्य होत नाही . स्कूटर घेण्यापेक्षा एक रिक्षा घेउ, मराठी तरूणाला चालवायला देउ, त्याने फक्त मला सकाळी स्टेशनला सोडायचे व महीना ठराविक रक्कम द्यायची असे काहीसे घाटत होते. एका मराठी रिक्षावाल्याला मनातली बात सांगितली तेव्हा तो बोलला , शहाणे असाल तर हे खूळ काढून टाका, स्कूटर घ्या आणि मोकळे व्हा ! मी विचारले का रे बाबा ? तेव्हा तो म्हणाला की स्वत: चालवणार असाल तरच चार पैसे कमवाल. गावातल्या माणसाला चालवायला द्याल तर पस्तवाल. तो तीचा एका वर्षातच पार खूळखूळा करून टाकेल. फालतू दुरूस्ती दाखवून तुमचे महीन्याचे पैसेपण देणार नाही. तुमच्या ताब्यात रिक्षा जेव्हा परत मिळेल तेव्हा तीला भंगाराची किंमत मिळेल ! मला आतापर्यंतच्या आयुष्यात मिळालेला एकमेव योग्य सल्ला !

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २००८

T9 चा फंडा !

T9 चा फंडा !
मोबाईल (तसे कोणेतेही उपकरण) घेतला की मी त्याचे मॅन्युअल वाचून काढतो। मला मग तो कसा हाताळावा हे व्यवस्थित समजते. मी वाचतो म्हणून माझे सहकारी आपला बहूमूल्य वेळ वाया घालवत नाहीत व स्वत:चा मोबाईल माझ्या पायावर ठेउन मोकळे होतात ! लोकांना मोबाईल वापरायला शिकवणे हा माझ्या कामाचा जणू भागच झाला होता ! कधी कधी मी कामावर येण्या आधी लोक आपले मोबाईल घेउन दारात उभे असत आणि कार्यालयीन कामे उरकण्याआधी मला त्यांची शिकवणी घ्यायला लागायची ! मोबाईल मध्ये sms पाठवण्यासाठी t9 असा काही प्रकार असतो, पण तो मात्र मला अजिबात जमत नसे. त्याने म्हणे इंग्रजीमध्ये टाइप करणे खूप सोपे जाते. मी अनेक वेळा प्रयत्न करून बघितला पण लिहायचे असायचे एक, आणि उमटायचे भलतेच , त्यामुळे काहीतरी 'बग' असावा असे वाटून मी तो नाद सोडून दिला व पारंपारीक पद्धतीनेच संदेश पाठवत असे. उदा. मला लिहायचे आहे write तर ९ आणि ७ चे बटण दाबले की yr उमटायचे आणि 'हे काय भलतेच' असे म्हणून मी ते abort करायचो !

एकदा असाच कामावर जात असताना लोकल बंद पडल्या। जो तो मोबाईल काढून कामावर sms पाठवून उशीर होत असल्याचे कळवू लागला. मी आणि माझ्या समोरचा आम्ही एकदमच टायपायला सुरवात केली. त्याने sms पाठवला सुद्धा , मी आपला बटणे शोधत , परत परत दाबत बसलो होतो. "Trains are running late, i will be late" हाच संदेश त्याने पण पाठवला होता. मी त्याला विचारले की एवढ्या पटकन कसे टाइप केले तुम्ही ? त्याने हसून 'T9' असे सांगितले. तुम्हाला पण करता येईल, सोपे आहे ! मी प्रयत्न करू लागलो, टी साठी ८ अंक दाबला, t उमटले पण मग आर साठी ७ दाबताच त्याचे up झाले ! मी त्याला ते दाखवले व म्हणालो, बघा, हा असा problem आहे ! तो बोलला "काही problem नाही आहे, आता a साठी २ नंबरचे बटण दाबून तर बघा !". आणि काय आश्चर्य, आता पडद्यावर tra असे दिसत होते ! बर्याच वर्षाने का होईना माझी ट्यूब पेटली तर ! T9 चा फंडा मला कळला ! आपले अर्धे कॉल आपण sms करून वाचवू शकतो व त्या प्रमाणात मोबाईलचे बिल सुद्धा ! t9 वापररून sms टाइप केलात तर बराच वेळ वाचतो आणि बर्यापैकी सविस्तर, लगेच कळेल असे लिहीता येते. "trains are running late" हे वाक्य t9 वापरून लिहील्यास तुम्हाला फक्त २३ वेळा बटणे दाबावी लागतील आणि जर पारंपारीक पद्धतीने केल्यास तब्बल ४२ वेळा तुम्हाला बटणे दाबावी लागतील ! t9 चा अजून एक फायदा म्हणजे स्पेलींग मिस्टेक कमी होतात, निदान आपले काहीतरी चूकते आहे हे तरी कळते. एकादा मला anniversary हा शब्द लिहायचा होता. त्याचे स्पेलींग मी आधी anniversory केले ते जमेना, मग anniversery केले तरी चूक ! शेवटी शब्दकोष काढला तेव्हा चूक समजली !

थोड्याच काळात मी या तंत्रात चांगलाच पारंगत झालो, मित्रांना लंबे चवडे मेसेज पाठवून मी त्या काळात अगदी वात आणला होता। एकदा एखादे खूळ माझ्या डोक्यात शिरले की शिरले, मी पार t9 मय होउन गेलो होती त्या काळात "जे जे आपणासि ठावे, ते ते दूसर्यास शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन" या उक्तीप्रमाणे मी ज्याला त्याला हा वसा देउ लागलो. कोणी sms टाइप करताना दिसला रे दिसला , की तो ओळखीचा असो की नसो, मी लगेच त्याला t9 चा वसा देउ करे, अट एवढीच, त्याने सुद्धा निदान एकाला तरी हा वसा द्यायचा आणि हीच अट घालून !

तुम्ही वापरता का t9 ? मग मला "read your new posting" असा मेसेज मला सगळ्यात आधी कोण पाठवते ते बघूच ! माझा मोबाईल नंबर आहे 9869710424 !

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २००८

अश्व-व्रत !

अश्व-व्रत !
तेव्हा आम्ही रहायला विरार, आगाशी येथे होतो। मी असेन चवथीत. सुट्टी पडली की बाबांबरोबर मुंबई बघायला जाणे हा कार्यक्रम असेच. विरारवरून लोकलने आधी बाबांचे कार्यालय, गोदी बघणे, मग बाबा हाफ डे घेउन आम्हाला डबल डेकर बस, टॅक्सी, घोडा-गाडी , हॉटेलात खाणे आणि जमले तर पिक्चर दाखवून अगदी खूश करून टाकत ! असेच एका सुट्टीत लोकल मध्ये बाबांच्या मांडीवर खिडकीजवळ बसलो होतो. लोकलमध्ये बाबांचा बराच मित्र परीवार होता. साधारण अंधेरी आले आणि सगळे मित्र उभे राहीले ! बाबांनी माझा ताबा एका उभ्या असलेल्या माणसाकडे दिला व ते ही उभे राहीले. उभे असलेली माणसे आता बसली होती, माझ्या चेहर्यावर आश्चर्य ! मग एक मित्र बोलला अरे पोराला पण सांगून ठेव तुझे अश्व-व्रत. केव्हातरी लोकलने प्रवास करावा लागणारच आहे त्याला पण ! मग तोच मला बोलला, लोकलमध्ये बसलेल्यांनी पूर्ण प्रवासाच्या अर्धा वेळच बसावे व मग उभे असणार्यांना बसायली द्यावे ! हेच तुझ्या बाबांचे अश्व-व्रत ! मला तेव्हा काहीच कळले नाही !


बाबांना कामावर जाणे-येणे खूपच त्रासाचे होउ लागले, परत शिफ्टची कटकट होतीच तेव्हा ती भाड्याची खोली मालकाला परत करून आम्ही कार्यालयीन वसाहतीत वडाळ्याला शिफ्ट झालो। प्रवास अवघ्या २० मिनीटावर आला आणि तेवढे उभे राहणे काही विशेष नव्हते. मी १९८६ मध्ये गोदीतच कामाला लागलो व जागा असो किंवा नसो दारावर उभा राहूनच प्रवास करायचो पुढे प्रथम वर्गाचा पास काढायला लागलो. बाबा निवृत्त झाल्यावर आम्ही सगळेच परत विरार- जेपी नगरला रहायला आलो. पहील्याच दिवशी लोकल मध्ये एक ग्रूप मिळाला. अंधेरी आल्यावर सगळे उभे राहीले, मी ही उभा राहीलो व हा काय प्रकार आहे असे विचारले. त्यातला जरा जास्त वयाचा म्हणाला की अरे हे अश्व-व्रत आहे, कोणी मराठे म्हणून होते त्याचा प्रचार करणारे ! मी थक्कच झालो, मला लहानपणीचा तो सदर्भ आता लागत होता.


नंतर साधारण दोन वर्षे हे व्रत पाळून मी पण वडाळ्याला कार्यालयाची जागा घेतली व प्रवासाची दगदग संपली। २००२ च्या आसपास, नवीन पनवेल स्वत:ची जागा घेतली व परत लोकलकर झालो.सुरवातीला एवढी गर्दी नसायची त्यामुळे सगळ्यांनाच बसायला मिळायचे. तसाही हार्बर वर प्रवाशांचा टर्न-अराउंड चांगला आहे. कुर्ला येथे तर गाडी जवळपास खाली होउन परत तेवढीच भरते ! पण आता हार्बरची गर्दी सुद्धा मेन व वेस्टर्न बरोबर स्पर्धा करू लागली आहे ! पनवेलला सुद्धा सकाळच्या वेळी चवथी सीट सुद्धा मिळत नाही. पनवेलला बसणारे बहुतेक थेट मुंबई व्ही.टी पर्यंत जाणारे असतात. अगदी खांदेश्वर, खारघर व आता मानससरोवरला चढणारे प्रवास बिचारे सगळा प्रवास उभ्यानेच करतात. यातुनच मग टोमणेबाजी होउ लागली. फेव्हीकॉल जोड है, xx ला फोडे आली, राजकरणी तरी खुर्ची सोडतील पण हे पनवेलकर ! मग त्यांनाही प्रत्युत्तरे जाउ लागली, आम्ही बसतो, तुमची का xx जळते , या, घ्या घर पनवेलला, अरे बोरीबंदर काय कुलाब्याला गाडी जायला लागेपर्यंत बसून राहू ! टोमणे मारता ना, नाही उठत, करा काय करता ते, कायदा आहे काय ?


दोन महीन्यापुर्वी माझी बदली झाली। नव्या जागी संध्याकाळी सातपर्यंत थांबावे लागू लागले. सकाळी निघताना पण जागा मिळाली नाही म्हणून लोकल सोडावी लागते ! संध्याकाळी परतताना लोकल मशीदवरून येतानाच पॅक ! कसेबसे उभे राहण्यापुरतीच जागा मिळू लागली. असाच एकदा पार exhaust होउन घरी निघालो, सीटच्या मधल्या जागेत कसाबसा उभा होतो, तोल सांभाळत, प्रत्येक स्थानकागणिक गर्दी वाढतच चालली होती. हा प्रवास कधी संपणारच नाही असे वाटू लागले, डोळ्यासमोर अंधारी येउन खाली कोसळणार असे वाटत असतानाच एकाने बसायला दिले. मला तो अगदी देवदूतच वाटला तेव्हा. साधारण बेलापूर गेल्यावर त्याला पण परत बसायला मिळाले. मी त्याचे अगदी मनापासून आभार मानले त्यावर तो एवढेच म्हणाला "ये तो मेरा व्रत है, हो सके तो आप भी शूरू करो !"


अश्व-व्रत --- घोडा - तुम्ही त्याला कधी बसलेला बघितलाय का ? केव्हाच नाही ! घोडा जन्माला आल्यापासून उभाच असतो, न थकता, न कंटाळता ! जेव्हा तो बसू लागतो तेव्हा समजायचे आता हा पुन्हा कधी उठणारच नाही ! खरच , सलग सव्वा-तास बसणे सुद्धा कष्टदायकच आहे, पायात माणसे आलेली असतात, त्यामुळे ते पण अगदी आखडून जातात. बसलेलेही दु:खी, उभे राहणारे सुद्धा दु:खी ! सव्वा तासाच्या प्रवासात ५० मिनीटे बसणेच योग्य आहे, मग सरळ उभे रहावे हेच उत्तम आणि त्यात खरे तर स्वार्थच जास्त आहे ! मग ठरले - परत अश्व-व्रताचा स्वीकार करायचा, प्रचार करायचा, अगदी मनसे !
महीना झाला हे व्रत अंगिकारून, अगदी मस्त वाटते, काहीही त्रास होत नाही, उलट हात-पाय अधिक जोमाने काम करतात ! टोमणे थांबले आता ! आता सगळे नांदा सौख्यभरे ! अगदी तुझ्या गळा, माझ्या गळा स्टायल, पहीले आप - पहीले आप ! कधी कधी तर मला उठायचीही गरज पडत नाही, किंवा बसणारे कोणी उरलेच नसल्यामुळे परत बसायला मिळते ! कधीतरी कोणीतरी विचारतो, "आपको तो बोरीबंदर जाना था, तो वडाला क्यो खडे हुए ? " ही संधी मग मी सोडत नाही, अजून अश्व-व्रत न पाळणार्यांना सुनवायची मला आयतीच संधी मिळते, ती मी बरा सोडेन ? आता निदान माझ्या डब्यात तरी अनेक जण या व्रताचे पालन करून सुखी झालेले आहेत ! बोला, तुम्ही घेणार हा वसा ? पण एक आहे, घेतला वसा टाकायचा नाही, उतायचे नाही आणि मातायचे नाही ! तुमचे भले होईल, अगदी निवृत होईपर्यंत ठणठणीत रहाल, घ्या gurantee !

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २००८

परीकथेतील राजकूमार !

नेहमीपेक्षा कामावरून जरा लवकरच निघालो होतो. वडाळा , पश्चिमेला ब्रोकरकडे काम होते. स्टेशनला उतरलो आणि काहीतरी strike झाले. फलाटावरील बाकावर बसलेली ती बाई ओळखीची वाटत होती. हो कविताच होती ती ! वर्गातल्या मराठी मुलींमधील सर्वात देखणी, सर्वात जास्त भाव खाणारी, स्टेटस सांभाळणारी ! कॉलेजच्या गॅदरींगमध्ये 'परीकथेतील राजकूमारा' गाणे गाउन आम्हा सर्व मित्रांना तीने नादावून सोडले होते. ज्याला त्याला तो राजकूमार आपणच असे वाटले होते पण 'तो' कोणी तिसराच निघाला होता ! या गोष्टीला आता २० वर्षे झाली होती. पण 'ती' कविता आणि आता समोर असलेली यात जमीन-अस्मानाचा फरक पडला होता. पार वीटलेली दिसत होती, चेहर्यावर तेज उरलेच नव्हते, अनेक दु:खे पचवुन कशीबशी जगते आहे असेच वाटत होते. तिच्याशी मी आधीही कधी बोललो नव्हतोच आणि आता बोलायची काही गरजच नव्हती. मी वाट धरत असतानाच तिचा 'राजकूमार' सुद्धा पहायला मिळाला ! खरच 'काय पायलस याच्यात' अशी स्थिती होती. आम्हा मित्रांपैकी कोणीही अनेक बाबतीत त्याच्या पेक्षा सरसच भरला असता ! जाउ दे ! पसंद अपनी अपनी !


ब्रोकर कडे गप्पा-टप्पा झाल्यावर निघायला सहा वाजले। बर्यापैकी अंधारून आले होते आणि 'ती' दिसली. टॅक्सीची वाट पहात होती. ती होती क्वीनसी ! नावाप्रमाणेच राणी सारखी दिसणारी, गोवनीज ! रोझ डे मध्ये सलग तीन वर्षे 'Miss Roze' बहुमान मिळालेली ! पण तीला मित्रच काय मैत्रीणीही नव्हत्या ! नेहमी एकटी असायची. आमच्या मराठी वाड्मय मंडळाच्या कार्यक्रमाला मात्र हजेरी लावायची, मख्ख चेहर्याने ! अजूनही स्वत:ला तीने काय पण maintain केले होते ! मध्ये जणू काही काळ गेलाच नव्हता ! क्वीनसी बरोबर माझी तशी काहीच ओळख नव्हती पण काय वाटले कोणास ठाउक. कदाचित अनेक वर्षाने कोणी दिसते तेव्हा असे वाटतही असेल, मी तीला Hi केले व माझी ओळख दिली. तीने 'येस, आय नो यू' असे हसून म्हटले. काही क्षण असेच गेले आणि ती एकदम बोलली , माझे घर five gardern जवळ आहे, माझ्या बरोबर येतोस गप्पा मारत ?


तसे आमच्यात गप्पा माराव्या असे काही मुद्देच नव्हते, आम्ही दोघेही पूर्ण वेगळ्या जगातले होतो, भाषा, धर्म, आर्थिक स्थिती यात दोन ध्रूवांचे अंतर होते। नुसते चालणे चालू होते. बाग आल्यावर ती एका बाकावर बसली व मला जवळ बसायची खूण केली. थोडा वेळ पॉज घेउन तीने स्वत: विषयी बोलायला सुरवात केली. शून्यात नजर लावून ती बोलत होती पण अगदी मनापासून, तीचा आवाज अगदी आतला वाटत होता. भरपूरच संकटे तीने झेलली होती, अगदी तावून सुलाखून निघाली होती. तीच्या जीवनात मोठीच उलथापालथ झाली होती. अनेकांनी तीला फसवले होते, संकटात एकटे टाकले होते, तीचे लग्नही मोडले होते व आता ती अगदी एकाकी जीवन जगत होती. कमाल आहे त्या कवितेची अशी गत आणि कॉलेज क्वीन क्वीनसी ची अशी ! काय पण तकदीरचे खेळ आहेत. पण हे सर्व ती मला का सांगत होती ?


मी हे सर्व तुला का सांगते आहे ? हाच प्रश्न तुला पडला असेल ना ? माझ्या या अवस्थेला तूच जबाबदार आहेस !
मी ???? what non-sense !!
हो तूच ! माझ्या प्रेमाला तू झिडकारले नसतेस तर ----
मी तीला माझी परत ओळख करून दिली, आपण कधी एकमेकांशी एक शब्दही बोललो नाही हे पण सांगितले, मग मी तुला झिडकारायचा प्रश्न येतोच कोठे ?
तुला खरेच आठवत नाही आहे ? ok - तूझे डोळे खोटे बोलूच शकत नाहीत-- सगळ सांगते--


अकरावीत तू अगदीच शामळू होतास, बेताची उंची आणि हडकूळा पण तुझे डोळे व गालाला पडणारी खळी,। तेव्हाही मुलींमधे चर्चेचा विषय होती. बारावीच्या पुढे तुझ्यात खूपच बदल झाला. उंची वाढली, बुजरेपणा गेला, कॉलेजच्या अनेक activities मध्ये तू दिसू लागलास. मराठी वाड्मय मंडळाच्या कार्यक्रमात तू जास्तच खुलायचास. मराठी मला फारसे येत नाही पण निव्वळ तुला बघण्याकरता मी यायचे. अशाच तुमच्या एका गाण्यात "परीकथेतील राजकूमारा" हे गाणे ऐकले आणि तुझ्यातच तो राजकूमार मला दिसला.राजकूमाराचा शोध संपला ! कसे ते आठवत नाही, तुझे एक पुस्तक माझ्या हाती आले, त्यात मी "I LOVE YOU" अशी एक चिठ्ठी टाकली होती. माझे नाव म्हणून मी मोठा Q , त्याला राणीच्या चेहर्याचा आकार दिला होता, व शेवटी CY लिहीले होते॥


मेहताने माझे पुस्तक मला परत केले, ते चाळताना आतली चिठ्ठी मला सापडली। मी मेहताला म्हणालो 'अरे गाढवा , तुला कोणाला फसवताही येत नाही. माझ्या पुस्तकात तू जे प्रेम-पत्र टाकले आहेस त्याने मीच काय, कोणीही फसणार नाही. अरे मुलींना पैसेवाली, xx खाली मोटार-सायकल असलेली मुले आवडतात किंवा रावडी तरी ! आपण या व्याख्येत कोठेच बसत नाही. मेहता अगदी कळवळून बोलला "अरे मैने ये नही किया " , फिर दूसरा कोई होगा ! यावर सगळ्यानीच एकमेकांकडे बघितले. मी ते so called love letter---


पार तूकडे तूकडे करून खिडकीबाहेर भिरकावून दिलेस ! मी पार कोलमडले। माझी अशी काही अपेशाच नव्हती. माझ्या पाठी मुले वेडी होउन पळत असताना, तू -- तू --. एवढा स्वत:ला समजत तरी कोण होतास ? तुला चांगलाच धडा शिकवायचा होता मला. अनेक मित्र करून, तुझ्या समोर त्यांना नाचवणार होते, पण त्या आधीच तू कॉलेज सोडून कामाला लागला होतास असे कळले. मग मात्र अगदी भरकटत गेले, वाहवत गेले, कटी-पतंगा सारखी. अनेक धक्के पचवले, अनेक पुरूष आयुष्यात आले आणि गेले, कोणी मला फसवले, कधी मी कोणाला नाचवले, खेळवले, त्यांना पार वेडे करून 'सोडले'॥, असे केले की मला जणू सूड उगवल्याचे समाधान मिळ होते, पण यात मीच उध्वस्त होत चालले आहे हे मला कळलेच नाही. खूप खस्ता खाल्ल्या आणि आता एकाकी जीवन जगत आहे.


मी सुन्न झालो होतो. माझ्यासारख्या फटीचरच्या प्रेमात कॉलेज क्वीन पडली होती, तीने मला propose ही केले होते आणि माझ्या ते गावीही नव्हते ! थोडे सावरून मी तीला म्हणालो, 'दिल आया गधी पे तो परी क्या चीज है' अशी एक म्हण आहे, ती जरा उलटी केली पाहीजे. माझ्यावर प्रेम करून तरी तू कोठे सुखी झाली असतीस ? वेडेपणा होता तुझा ! तुला तेव्हा वर-खर्चाला जेवढे पैसे मिळायचे तेवढा माझा आजही पगार नाही. तेव्हा दु:खी होण्याचे काही कारणच नाही. we were totally mismatch for each other !
मुलांना असे का वाटते की मुलींना पैसेवाला, handsome च मुलगा आवडतो ? मला वाटते ज्याच्या खांद्यावर डोके ठेउन रडता यावे असा कोणी मुलींना हवा असतो। ज्याच्या डोळ्यात खोलवर बूडता यावे, डोळे मिटून विश्वास ठेवावा , असा कोणी. आणि तू तसा होतास !


परत भयाण शांतता, आम्ही दोघेही नि:शव्द झालो होतो--
माझ्या डोळ्यात बघून एका प्रश्नाचे अगदी खरे खुरे उत्तर देशील ?
विचार-
forget past, मध्ये काही वर्षे गेलीच नाहीत असे समज, i don't care about your current marital status, आता मला सांग--- माझा होशील ?
अर्थात मी फारसा वेळ नाही घेतला, ठाम स्वरात मी एवढेच म्हणालो;
ना ही !
आता मात्र तीचा बांध फूटला ! ती मान खाली घालून ओक्सा-बोक्षी रडू लागली. बायको रडते तेव्हा माझी स्थिती नेहमीच विचीत्र होते, काय करावे तेच समजत नाही ! आणि ही तर ---. मी तीला पूर्ण मोकळे होउ दिले. हळू हळू ती शांत झाली. डोळे पुसून तीने माझ्याकडे बघितले, अगदी डोळ्यात डोळे घालून. तीचा चेहरा आता विलक्षण शांत वाटत होता. पसन्न ! आणि आता तर ती अधिकच देखणी वाटत होती. मस्त हसून ती म्हणाली ,"किती ठामपणे नाही बोललास, बाकी शब्दांचा पसारा न मांडता, एकच 'नाही' पण आतून आलेला ! --- मला आता अगदी मस्त हलके वाटते आहे, मोकळे, relaxed ! वीस वर्षापुर्वी मला तुझ्या बाबत जी खात्री होती, विश्वास टाकण्याची, ती अगदी बरोबर होती. परीकथेतला राजकूमार मला तरी मिळाला होता--- next is destiny ! आता याच सहार्यावर मी माझे बाकी आयुष्य समाधानाने घालवेन ! good bye , forever !
-- आणि एकदाही मागे वळून न बघता, ती रस्ता ओलांडून निघूनही गेली ! अगदी कायमची, forever !

बुधवार, १५ ऑक्टोबर, २००८

वसा, 'जागते रहो' चा !

वसा, 'जागते रहो' चा !


१९८६ मध्ये मुंबई बंदरात कामाला लागलो तेव्हा आपल्याला तिन्ही शिफ्ट मध्ये काम करावे लागणार याची कल्पना होती। पण जेव्हा प्रथमच तिसरी पाळी केली तेव्हा मात्र पार वाट लागली. आधीच ४४ किलो असलेले वजन चक्क एका आठवड्यात ५ किलो उतरले. नोकरी झेपणारच नाही असे वाटू लागले. रोटा लागल्यावर तिसरी पाळी करायची असेल तर पोटात गोळाच यायचा. काम असो की नसो, झोप अनावर व्हायची. पहाटे ३ ते ५ या वेळेत कोणाला तरी बसवून शेड मध्ये कोठेही मी ताणून द्यायचो, पण झोप पूर्ण काही होत नसे. सर्व आठवडा डोळे तारवटलेलेच असत व तो हॅन्ग-ओव्हर पुढचे काही दिवस राहत असे. शिफ्ट करून लोकलने घरी परतताना वडाळ्याला उतरायच्या ऐवजी, झोप लागल्याने अनेकदा कुर्ला कारशेड पाहीली होती. घरी गेल्यावर बूट कसेबसे काढून हॉल मध्येच ताणून द्यायचो, मग १० वाजता अर्ध-मिटल्या डोळ्यानी सर्व आन्हीके पार पाडून परत झोप, १२ वाजता जेवण, परत संध्या. ६ पर्यत झोप. पण येणारी जाणारी माणसे, रस्त्यावरची वर्दळ याने गाढ झोप लागत नसेच. मग रात्री १० वाजता परत कामावर. सगळेच माझ्या शिफ्टला कंटाळले होते कारण माझी चीडचीड त्यांनाच सहन करायला लागायची, पित्त खवळायचे ते वेगळेच.एकदा अगदी कहरच झाला. कामावर जाण्यापुर्वी थोडी डुलकी लागली आणि चक्क रात्री २ वाजता जाग आली ! दांडी झाली. रजा पास होणार नाही म्हणून खोटे वैद्यकीय प्रमाण-पत्र घेतले पण नियमाप्रमाणे ते दोन दिवसाचे मिळाले व दोन दांड्या झाल्यामुळे पूर्ण तिसरी पाळी परत करायला लागली !


वडील सुद्धा बंदरातच कामाला होते व माझ्याहून जास्त वर्षे पाळ्या करत होते, अगदी गोरेगाव, विरार येथे रहात असल्यापासून आणि अगदी विना-तक्रार ! शेवटी त्यानांच शरण गेलो ! काय करावे म्हणजे ही तिसरी पाळी माझी तिसरी घंटा वाजवणार नाही ? कशी बरे सुसह्य होईल ? बाबा वदले , वत्सा, प्रामाणिक पणे ! संपूर्ण वेळ जागे राहून आणि घरी आल्यावर लगेच अजिबात झोपायचे नाही, दूपारच्या भोजनापर्यंतची सर्व नित्यकर्मे करायची मगच झोपायचे। झोप पूर्ण होईल, कामावर जाताना पेंगुळलेला दिसणार नाहीस, आल्यावर पण प्रसन्न वाटशील ! हा वसा नीट पाळ, उतू नकोस, मातू नकोस, तुझे भले होईल !


आणि खरच चमत्कार झाला. सुरवातीला रात्री कामावर जागणे कठीण गेले पण मग सलग ७ तास जरा सुद्धा थकवा न येता काम करायची सवय लागली ! मी तिसर्या पाळीत जागा असतो हे कळल्यावर अनेक जण का कोण जाणे, मला टरकून राहू लागले, धक्क्यावर काम करणारे कामगार सलाम मारू लागले, यो सायब लय कडाक हाय असे म्हणू लागले. सहकारी मात्र मी जागतो आहे म्हटल्यावर बिनघोर झोपू लागले पण त्या बदल्यात दिवसा मला सांभाळू लागले. वरीष्ठांकडून मान मिळू लागला. काम नसेल तेव्हा झोप येउ नये म्हणून वाचायची सवय लावून घेतली तीचा पण चांगलाच फायदा झाला. पुस्तकांशी परत मैत्री झाली. नव्या विचारांचे दालन खुले झाले. असेच एकदा रात्री दोन वाजता आमच्या बॅलार्ड पियरच्या धक्क्याजवळ असताना, कस्टमचा कोणी शिपाई पहाडी आवाजात लोकगीत गात होता. त्या आवाजाने तिकडे शब्दश: ओढला गेलो ! गाणारा खरच भान हरपून गात होता आणि ऐकणारेही तल्लीन झाले होते. ती अवीट मैफल कानात अगदी साठवून ठेवली आहे. शेवटी त्याने "ढलता सूरज धीरे -- " म्हणून त्यावर चार चांद लावले ! अशीच मग काम नसेल तेव्हा गेट-वे-ऑफ-इंडीया पर्यंत रात्री भटकायची सवय लागली, सोबत कोणी असेल तर ठीकच, नाहीतर एकला चलो रे ! रात्रीची अंगावर शहारा आणणारी मुबई अगदी जवळून बघता आली. भीती पण दूर झाली. असेच मग पहाटे टपरीवर इस्पेसल चाय आणि खारी विकणारा एक मित्र झाला. त्याच्या तोंडून या माया-नगरीचे अनेक रंग उमगले, जणू नवे दालनच खुले झाले !
संगणक विभागात आल्या पासून तब्बल १६ वर्षे दिवस पाळीच करतो आहे पण जागरणाचे काहीही वाटत नाही. याचा उपयोग मुलगी आजारी असताना, सतत तीन रात्री जागून काढताना झाला आणि सासर्यांच्या अखेरच्या दिवसात तीन रात्री जागून त्यांची सुद्धा सेवा करता आली. जागरणाचा आता मला कोणताही side effect होत नाही ! प्रामाणिक पणे काम केल्यामुळे जणू निद्रा देवी मला प्रसन्न झाली आहे !

रविवार, १२ ऑक्टोबर, २००८

रेल-खेल !

रेल-खेल !
खेळल्यामुळे ताण कमी होण्यास मदत होत्ते। आज-काल लोकल मधली गर्दी वाढतच चालली आहे आणि लोकलकरांवरचा ताण सुद्धा ! हल्ली कोणत्याही शूल्लक कारणावरून लोकलमध्ये भांडणे होतात व शेवट मारामारीत होतो ! तेव्हा लोकलकरांवरचा ताण कमी व्हावा म्हणून खास त्यांच्याकरता काही खेळ सूचवत आहे, तुम्हीही सूचवा !

तिकीट-तिकीट - १) एका मिनीटात जास्तीत जास्त कूपन पंच करणे २) एका मिनीटात 'स्मार्ट कार्ड' वापरून जास्तीत जास्त तिकीटे काढणे ३) रांगेत उभे राहून आपला नंबर किती वेळात येईल त्याचा अंदाज सांगणे (यात कोणती खिडकी केव्हा बंद होणार याचेही भान हवे) ४) कोणत्याही दोन स्टेशनच्या दरम्यानचे भाडे किती आहे ते झटपट सांगणे।

सबसे तेज कौन / डेयर डेव्हील - १) यात पुलाच्या एका टोकापासून पळत जाउन ठरलेला डबा आधी गाडी कोण पकडतो ते बघायचे.( या स्पर्धा दादर, कुर्ला, वडाळा य ठीकाणी घेतल्या जातील.) २) थांबलेली गाडी पकडणे, (यात उतरणारे प्रवासी उतरायच्या आत चढणे हे विशेष प्राविण्य मानले जाईल) , पळती गाडी पकडणे, ३) गर्दीतुन आत शिरल्यावर कमीत कमी वेळात खिडकीपर्यंत धडक मारणे तसेच फलाटावर गाडी पूर्ण थांबायच्या आत उतरणे, विरार गाडी पकडून अंधेरी किंवा बोरीवलीला उतरून दाखवणे. ४) बाजूच्या झोपडपट्टीतुन मारलेले दगड, घाण, फुगे चुकवणे.५) टफावरून प्रवास करणे, या डब्यातुन त्या डब्यात जाणे , महीलांच्या डब्यातुन प्रवास करणे (न पकडता !), टफावरची पकडापकडी इ. ६) कितीही गर्दी असूदे कोणताही सपोर्ट न घेता उभे राहणे.
फलाट कोठे येईल - यात सर्व उपनगरी स्थानकांच्या अप तसेच डाउन मार्गावर प्रवास करताना फलाट कोणत्या बाजूला येईल ते सांगता आले पाहीजे।

खिडकी-खिडकी - यात संपूर्ण रीकामी गाडी स्थानकात आणली जाईल. प्रवाशांनी शीटी मारल्यावर गाडीत शिरून खिडकी पकडण्याची स्पर्धा लावली जाईल. खिडकीत पकडताना पण हवेच्या दिशेची व मोठी खिडकी पकडणार्या स्पर्धकास बोनस गुण मिळतील.
फेका-फेकी - यात लोकलच्या रॅकवर जास्तीत जास्त सामान, ते ही न पडता ठेउन दाखवावे लागेल। तसेच दाराकडून बॅग रॅकवर फेकून देणे अशीही एक स्पर्धा असेल. तसेच कोणते सामान कोणत्या प्रवाशाच्या डोक्यावर कोसळेल त्याचा अंदाज वर्तवणे असाही एक प्रकार असेल.

रेल्वे माझ्या बापाची - यात जास्तीत जास्त पसरून बसणे, सहप्रवाशाच्या खांद्यावर मान टाकून झोपणे, मोबाईलवर मोठया आवाजात गाणी ऐकून लोकांना पकवणे, तिसर्या शीटवरून पानाची पिंक थेट खिडकीबाहेर मारणे, पत्ते खेळणे, भजने म्हणणे, आरती फिरवणे, रेल्वेचा डबा बडवणे, सीटवर काहीबाही लिहून ठेवणे, चवथ्या सीटवर बसलेल्या प्रवाशाचे बसणे अशक्य करून सोडणे, सूटकेस मांडीवर ठेउन प्रवास करणे, पेपर पूर्ण पसरून वाचणे, दूसर्याच्या हातातला पेपर न विचारता काढून घेणे , समोरच्या प्रवाशाने धरलेल्या पेपरचे आपल्यासमोरील पान बिनचूक वाचणे, उभ्या असलेल्या प्रवाशांनी कितीही टोमणे मारले तर आपली खुर्ची न सोडणे, बाजूने जात असलेल्या डब्यातील प्रवाशांना, जास्त करून महीला प्रवाशांना चिडवणे असे प्रकार असतील।

चोर-पुलीस - यात तिकीट काढताना बुकींग क्लार्क तुम्हाला फसवायचा प्रयत्न करेल, जसे भलत्याच स्टेशनचे तिकीट देईल, वा परत करताना कमी पैसे परत करेल-- असे प्रयत्न तुम्ही हाणून पाडायचे। तसेच तिकीट न काढताही तिकीट तपासनीसांच्या गराड्यातुन सहीसलामत बाहेर पडणे, गाडीत तिकीट तपासणार्याला मामा बनवणे, अवैध मालाची (जसे फटाके, रॉकेल )वाहतूक निर्धोकपणे करणे , प्रसंगी तिकीट तपासनीसाला लपेटणे अशाही स्पर्धा होतील.

कोणाची विकेट पडणार - यात विविध स्टेशनावर उतरणार्या प्रवाशांचे चेहरे दाखविण्यात येतील। मग लोकलमध्ये शिरून बसलेला कोणता प्रवासी कोठे उतरणार आहे ते बिनचूक ओळखायचे. यात जरा वैविध्य म्हणजे बसलेल्या प्रवाशाच्या हालचालीवरून तो कधी उतरणार याचा अंदाज बांधणे, रिकामी झालेली सीट चपळाईने पकडणे हे प्रकार असतील.

अंदाज अपना अपना - १) यात स्पर्धकाच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात येइल व जेव्हा विचारले जाईल तेव्हा लोकल कोणत्या दोन स्थानकांच्या दरम्यान आहे हे ओळखून दाखवायचे किंवा मध्येच केव्हातरी पट्टी ३ सेकंदापुरती काढली जाईल , तेवढ्या वेळात बाहेर बघून कोणते स्थानक येणार ते सांगायचे। २) मशीद बंदर किंवा मरीनलाईनस वरून गेलेली अप लोकल डाउन होताना कोणती असेल (म्हणजे विरार, बोरीवली, कल्याण, अंबरनाथ इ. ) ते ओळखायचे.

मेमरी - यात कोणत्याही मार्गावरची स्थानके न चूकता कमीतकमी वेळात सांगणे, कोणत्याही ठीकाणावरून दूसर्या कोणत्याही ठीकाणी जाण्याचा सर्वात जवळचा रूट सांगणे, वेगवेगळ्या वर्गाची भाडी सांगणे, अंतरे सांगणे, लोकलचे टाइम टेबल (लेडीज स्पेशलच्या वेळा पकडून ) सांगणे, महीलांचे डबे कोणत्या वेळात राखीव असतात ते सांगणे, इ।

निबंध स्पर्धा किंवा परीसंवादाचे विषय - १) ६५ किलो वजनाच्या वरच्या माणसांना अधिभार लावावा का ? २) चवथी शीट व नववी शीट अधिकृत करावी का ? ३) सुरवातीचे स्थानक ते शेवटचे स्थानक असा बसून प्रवास करणार्यांनी दूसत्या कोणाला बसायला द्यावे का, द्यावे तर केव्हा द्यावे ? ४) चवथ्या शीट वरच्या माणसाला बढतीचा हक्क असावा का ? ५) टफावरून प्रवास करणार्यांना भाड्यात सवलत द्यावी का ? ६) पास विसरलो व पकडले गेल्यास, दूसर्या दिवशी पास दाखवल्यास दंडाची अर्धी रक्कम तरी परत मिळावी का ? ७) गाडीत झोपणार्या प्रवाशांकडून स्लीपर चार्जेस घ्यावेत का ८) सहप्रवाशांचे सामान स्वयंसेवकासारखे रॅक वर लावून ठेवणे व परत काढून ठेवणे हे काम करणार्याला पासात सवलत द्यावी का ? ९) तिमाही पासापेक्षा रेल्वेने लाईफ-ताईम वॅलीडीटी असणारा पास आणावा का ? त्याचे भाडे किती असावे ? १०) लोकल ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उशीरा पोचल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई मिळावी का ? अशी भरपाई रोख न देता ट्रॅव्हल पॉईंटसच्या स्वरूपात द्यावी का ? ११) रूमाल, पेन, पिशवी, पेपर असे ठेउन शीट बूक करणे (आपल्या उशीरा येणार्या दोस्तांसाठी) योग्य की अयोग्य ? १२) महीलांसाठी राखीव डब्यातुन पुरूषांना प्रवास करता येत नाही, तोच नियम महीलांना पण लागू करावा का की महीला प्रवाशांनीच निदान गर्दीच्या वेळात तरी जनरल डब्यातून प्रवास करणे टाळून पुरूष-दाक्षिण्य दाखवावे ? १३) उठ-सूट मोटरमनला मारहाण करणे योग्य आहे का ? १४) रेल्वेने प्रवास करताना शिरस्त्राण , चिलखत, प्राणवायूचे नळकांडे बाळगावे का ? १४) कोणता प्रवासी कोठे उतरणार त्याची माहीती त्याने सगळ्यांना दिसेल अशा ठीकाणी लावावी का ? १५) ठराविक वर्ष प्रवास केल्यानंतर मोटरमन किंवा गार्डच्या डब्यातुन प्रवासाचा मान / परवाना मिळावा का ? १६) रेल्वेत जे विक्रेते असतात, त्यांच्याकडून फसवणूक झाल्यास नुकसान भरपाई मिळावी का ?

मग, घेणार ना या स्पर्धात भाग ? तर मग लागा तयारीला !

रविवार, ५ ऑक्टोबर, २००८

सही रे सही !

सही रे सही !
शेयर बाजारात तेव्हा उमेदवारी चालू होती.अर्थात थोबाड तेव्हाही फूटत होते आताही फूटतेच पण अनुभव नाही असे म्हणता येत नाही एवढेच. प्रत्यक्ष अनुभव घेउनच अनेक गोष्टींचे ज्ञान होत होते. १९९१ चा काळ असावा. सुधारणा पुर्व ! शेयर बाजार म्हणजे मूठभर गुजराती मारवाड्यांचा अड्डा होता. मराठी ब्रोकर होते अवघे दोन, नाबर आणि कारखानीस. मी माझे व्यवहार दादरच्या, कारखानीस यांच्या poplular investments मधून करायचो. शेयर विकत घेउन ते आपल्या नावावर करणे ही एक प्रदीर्घ प्रक्रीया असायची. यात कधी कधी सहा-सहा महीने सुद्धा जायचे, व तेवढे थांबून सही जूळत नाही म्हणून प्रमाणपत्रे परत यायची ! असेच एकदा मी reliance capital चे १०० शेयर ५० रू दराने घेतले. हाती प्रमाणपत्र मिळाले व सोबत share transfer form. सट्टा खेळणारे बहुतेक व्यवहार transfer form, कोरा ठेउन करत. एखाद्या बेअरर चेक सारखा तो बाजारात फीरत राही. कंपनीनी बुक क्लोजर जाहीर केले की तो ज्याच्या ताब्यात असेल त्याला ते शेयर आपल्या नावावर चढवून घ्यावेच लागत. (passing the ball खेळ आठवा !) माझ्यासारखा मध्यमवर्गीय गुंतवणुकदार मात्र शेयर आपल्या नावावर चढवून घेत असे. कंपनीचे नोंदणी कार्यालय मेट्रो सिनेमाजवळ होते. तिकडे गेलो पण अर्ज घेतला नाही , का तर १५ % लाभांष वाटपासाठी book closure घोषित झाले होते. म्हणजे १५० रूपयाचा फटका बसला होता ! परत तिकडे गेल्यावर trasnfer form एक वर्ष जुना आहे, चालणार नाही, नवा आणा म्हणून पिटाळला गेलो. ब्रोकरकडे परत आलो तर तो मलाच दोष देउ लागला की 'खाते बंद' तारखेच्या आधी का नाही गेलात म्हणून ! त्याच वेळी बाजारात हर्षद मेहता प्रणीत तेजी चालू झाली होती व सर्वच ब्रोकर माजले होते. त्यांचा धंदा अनेक पटीने वाढला होता. याच काळात कंपनी हक्क भाग देणार अशी घोषणा झाली आणि मला लवकर हालचाल करणे भाग पडले. परत ब्रोकरला गाठले. त्याने काम करतो पण बाजार भावाच्या २५ % कमिशन मागीतले व कामाला दोन महीने लागतील म्हणून सांगितले. मी कपाळावर हातच मारला. या काळात मी हक्क भागांनाही मुकलो असतो. त्या प्रमाणपत्रा सोबत कॉलमनी नोटीस सुद्धा होती व त्यावरून जयपूरची कोणी महीला त्याची मालकीण होती. मी तीला एक पत्र लिहीले व सोबत एक कोरा transfer form, या transfer form ची झेरॉक्स पाठवली. सोबत एक आवश्यक ते टपाल शूल्क लावलेले पाकीट पाठवले. सर्व प्रसंग नमूद करून सही करून अर्ज पुन्हा पाठवायची विनंती केली. दोन आठवडे वाट पाहीली पण उत्तर आले नाही.
मग मी हा सर्व प्रकार माझा शेयर बाजारातला गुरू व कामावरचा मित्र मुकादम याच्या कानी घातला. मी जेव्हा हजारात हरत होतो तेव्हा हा मियां लाखाने कमवत होता ! त्याने ती केस आपल्याकडे घेतली. दूसर्या दिवशी त्याने त्या फॉर्मवर सही आणली होती. सही तर अगदी तंतोतंत जुळत होती पण ती खरी नक्कीच नव्हती ! हे म्हणजे आगीतुन फुफाट्यात ! मुकादम म्हणाला की अशा केस मध्ये हे अगदी सर्रास चालते, घाबरू नकोस, मी स्वत: असे अनेकदा केले आहे. नाहीतर हक्क भाग गमावून बसशील. पण माझी काही हिंमत होई ना. शेवटी मुकादमने माझ्याकडून ५० रूपये घेतले व ती सही चक्क नोटरी कडून प्रमाणीत करून आणली ! आधी वाटले की या मियाचा काय भरवसा, सही बनावट तसा कोणी बनावट नोटरी पण त्याने बाळगला असेल ! मग मात्र मी ते शेयर घेउन मेट्रोजवळचे कंपनीचे कार्यालय गाठले पण मधल्या काळात ते चेंबूरला शिफ्ट झाले होते ! चेंबूरच्या कार्यालयात मग ते प्रमाणपत्र व सोबत 'तो' transfer form दिला. मधल्या काळात शेयरची किंमत ३० रूपयाने वाढली होती, मी मात्र मी घेतलेल्या ५० रू च्या दराने share transfer stamp लावले होते. अर्ज नवीन तारखेचा असल्याने मी ते आधीच विकत घेतले आहेत असा दावाही करता येत नव्हता ! वाढीव दराने share transfer stamp डकवून मी परत चेंबूर गाठले. का कोणास ठाउक पण त्या कार्यालयातला प्रत्येक जण माझ्याकडे संशयाने बघत आहे असे उगाचच मला वाटत होते. एकदाचा अर्ज स्वीकारला गेला व माझी सूटका झाली. महीनाभराच्या विलंबाने प्रमाणपत्रे माझ्या नावावर होउन घरी आली. दूसर्याच दिवशी पेपरात बातमी होती की रीलायन्स कॅपीटलचे अनेक बनावट शेयर बाजारात आले आहेत आणि त्यासाठी सेबीने कंपनीला जबरी दंड ठोठावला आहे ! परत माझे धाबे दणाणले. नक्कीच 'ते' शेयर बनावट असणार आणि आता आपल्याला पोलीस पकडणार या भयाने माझी झोप पार उडाली. पण तसे काही सुदैवाने झाले नाही. मला तेवढेच शेयर हक्कभाग म्हणून मिळाले. चढ्या बाजारात मी ते सर्व शेयर विकून ३०,००० रू. चा फायदा कमावला, पण २०० रू. ला विकलेले शेयर पुढच्या काही महीन्यातच ४०० रू. च्या वर गेले आणि परत हळहळ, चडफड झाली ती वेगळीच !

शनिवार, ४ ऑक्टोबर, २००८

ओळख आणि तपास !

ओळख आणि तपास !
साधारण दूपारची दोनची वेळ असेल, जरा कमी कामाची वेळ। याच वेळी मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आले. एका खुनाच्या तपासासाठी त्यांना मदत हवी होती. मुंब्र्याच्या एका लॉज मध्ये एका मुस्लीम बाईचा खून झाला होता. मृत महीलेची ओळख पटत नव्हती पण तीच्या सामानाते एक खोके सापडले होते व त्यावर काही नंबर व "PORT MUMBAI" असे छापलेले होते. तोच धागा पकडून आमची अनेक कार्यालये पालथी घालून तो आता माझ्याकडे आला होता. हा खरतर सूतावरून स्वर्ग गाठण्याचाच प्रकार होता पण त्याला नाराज करणे बरे वाटले नाही म्हणून मी तो मार्क व त्याचा फोन नंबर लिहून घेतला. आमच्या सिस्टीम मध्ये निदान लाखभर तरी रेकॉर्डस होते, त्यात तो नंबर सापडणे अवघडच होते, म्हणजे तसे हजारो नंबर सापडले असते. पण मग जरा विचार केल्यावर प्रयत्न करायला हरकत नाही असे वाटू लागले.


माल बाहेर सापडला होता, म्हणजे जे आयटम अजून pending होते ते बघायची गरज नव्हती,

बाईच्या खूनाची साधारण तारीख होती, त्या तारखेच्या आत सोडवलेला माल तपासायचा,

तो माल बॅगेज या प्रकारचा असावा, मग त्यात पण आयटम टाइप UB च तपासायचा,

आयातदाराच्या पत्त्यात , मुंबई हा शब्द असेल तरच पुढे जायचे !


असा पद्धतशीर 'सर्च' केल्यावर तपास लागला ! त्या बाईचे नाव, पत्ता, तीला तो माल कोणी पाठवला होता त्याचा ठाव-ठीकाणा पण लागला ! पोलीस मग त्या बाईच्या नागपाड्याच्या पत्त्यावर गेले तेव्हा ती बाई missing असल्याचे त्यांना कळले व लगेच तीच्या फोटोवरून मृतदेहाची ओळख पटली ! एकदा ओळख पटल्यावर खुनाची उकल करायला पोलीसांना फारसा वेळ लागला नाही. अनैतिक संबंधातुनच हा खून झाला होता. पोलीसांनी आमच्या विभागाचे आभार मानले. बक्षिसासाठी माझ्या नावाची शिफारस पण झाली होती पण त्याचे पुढे काय झाले याचा अजून तपास लागायचा आहे !