शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २००८

अश्व-व्रत !

अश्व-व्रत !
तेव्हा आम्ही रहायला विरार, आगाशी येथे होतो। मी असेन चवथीत. सुट्टी पडली की बाबांबरोबर मुंबई बघायला जाणे हा कार्यक्रम असेच. विरारवरून लोकलने आधी बाबांचे कार्यालय, गोदी बघणे, मग बाबा हाफ डे घेउन आम्हाला डबल डेकर बस, टॅक्सी, घोडा-गाडी , हॉटेलात खाणे आणि जमले तर पिक्चर दाखवून अगदी खूश करून टाकत ! असेच एका सुट्टीत लोकल मध्ये बाबांच्या मांडीवर खिडकीजवळ बसलो होतो. लोकलमध्ये बाबांचा बराच मित्र परीवार होता. साधारण अंधेरी आले आणि सगळे मित्र उभे राहीले ! बाबांनी माझा ताबा एका उभ्या असलेल्या माणसाकडे दिला व ते ही उभे राहीले. उभे असलेली माणसे आता बसली होती, माझ्या चेहर्यावर आश्चर्य ! मग एक मित्र बोलला अरे पोराला पण सांगून ठेव तुझे अश्व-व्रत. केव्हातरी लोकलने प्रवास करावा लागणारच आहे त्याला पण ! मग तोच मला बोलला, लोकलमध्ये बसलेल्यांनी पूर्ण प्रवासाच्या अर्धा वेळच बसावे व मग उभे असणार्यांना बसायली द्यावे ! हेच तुझ्या बाबांचे अश्व-व्रत ! मला तेव्हा काहीच कळले नाही !


बाबांना कामावर जाणे-येणे खूपच त्रासाचे होउ लागले, परत शिफ्टची कटकट होतीच तेव्हा ती भाड्याची खोली मालकाला परत करून आम्ही कार्यालयीन वसाहतीत वडाळ्याला शिफ्ट झालो। प्रवास अवघ्या २० मिनीटावर आला आणि तेवढे उभे राहणे काही विशेष नव्हते. मी १९८६ मध्ये गोदीतच कामाला लागलो व जागा असो किंवा नसो दारावर उभा राहूनच प्रवास करायचो पुढे प्रथम वर्गाचा पास काढायला लागलो. बाबा निवृत्त झाल्यावर आम्ही सगळेच परत विरार- जेपी नगरला रहायला आलो. पहील्याच दिवशी लोकल मध्ये एक ग्रूप मिळाला. अंधेरी आल्यावर सगळे उभे राहीले, मी ही उभा राहीलो व हा काय प्रकार आहे असे विचारले. त्यातला जरा जास्त वयाचा म्हणाला की अरे हे अश्व-व्रत आहे, कोणी मराठे म्हणून होते त्याचा प्रचार करणारे ! मी थक्कच झालो, मला लहानपणीचा तो सदर्भ आता लागत होता.


नंतर साधारण दोन वर्षे हे व्रत पाळून मी पण वडाळ्याला कार्यालयाची जागा घेतली व प्रवासाची दगदग संपली। २००२ च्या आसपास, नवीन पनवेल स्वत:ची जागा घेतली व परत लोकलकर झालो.सुरवातीला एवढी गर्दी नसायची त्यामुळे सगळ्यांनाच बसायला मिळायचे. तसाही हार्बर वर प्रवाशांचा टर्न-अराउंड चांगला आहे. कुर्ला येथे तर गाडी जवळपास खाली होउन परत तेवढीच भरते ! पण आता हार्बरची गर्दी सुद्धा मेन व वेस्टर्न बरोबर स्पर्धा करू लागली आहे ! पनवेलला सुद्धा सकाळच्या वेळी चवथी सीट सुद्धा मिळत नाही. पनवेलला बसणारे बहुतेक थेट मुंबई व्ही.टी पर्यंत जाणारे असतात. अगदी खांदेश्वर, खारघर व आता मानससरोवरला चढणारे प्रवास बिचारे सगळा प्रवास उभ्यानेच करतात. यातुनच मग टोमणेबाजी होउ लागली. फेव्हीकॉल जोड है, xx ला फोडे आली, राजकरणी तरी खुर्ची सोडतील पण हे पनवेलकर ! मग त्यांनाही प्रत्युत्तरे जाउ लागली, आम्ही बसतो, तुमची का xx जळते , या, घ्या घर पनवेलला, अरे बोरीबंदर काय कुलाब्याला गाडी जायला लागेपर्यंत बसून राहू ! टोमणे मारता ना, नाही उठत, करा काय करता ते, कायदा आहे काय ?


दोन महीन्यापुर्वी माझी बदली झाली। नव्या जागी संध्याकाळी सातपर्यंत थांबावे लागू लागले. सकाळी निघताना पण जागा मिळाली नाही म्हणून लोकल सोडावी लागते ! संध्याकाळी परतताना लोकल मशीदवरून येतानाच पॅक ! कसेबसे उभे राहण्यापुरतीच जागा मिळू लागली. असाच एकदा पार exhaust होउन घरी निघालो, सीटच्या मधल्या जागेत कसाबसा उभा होतो, तोल सांभाळत, प्रत्येक स्थानकागणिक गर्दी वाढतच चालली होती. हा प्रवास कधी संपणारच नाही असे वाटू लागले, डोळ्यासमोर अंधारी येउन खाली कोसळणार असे वाटत असतानाच एकाने बसायला दिले. मला तो अगदी देवदूतच वाटला तेव्हा. साधारण बेलापूर गेल्यावर त्याला पण परत बसायला मिळाले. मी त्याचे अगदी मनापासून आभार मानले त्यावर तो एवढेच म्हणाला "ये तो मेरा व्रत है, हो सके तो आप भी शूरू करो !"


अश्व-व्रत --- घोडा - तुम्ही त्याला कधी बसलेला बघितलाय का ? केव्हाच नाही ! घोडा जन्माला आल्यापासून उभाच असतो, न थकता, न कंटाळता ! जेव्हा तो बसू लागतो तेव्हा समजायचे आता हा पुन्हा कधी उठणारच नाही ! खरच , सलग सव्वा-तास बसणे सुद्धा कष्टदायकच आहे, पायात माणसे आलेली असतात, त्यामुळे ते पण अगदी आखडून जातात. बसलेलेही दु:खी, उभे राहणारे सुद्धा दु:खी ! सव्वा तासाच्या प्रवासात ५० मिनीटे बसणेच योग्य आहे, मग सरळ उभे रहावे हेच उत्तम आणि त्यात खरे तर स्वार्थच जास्त आहे ! मग ठरले - परत अश्व-व्रताचा स्वीकार करायचा, प्रचार करायचा, अगदी मनसे !
महीना झाला हे व्रत अंगिकारून, अगदी मस्त वाटते, काहीही त्रास होत नाही, उलट हात-पाय अधिक जोमाने काम करतात ! टोमणे थांबले आता ! आता सगळे नांदा सौख्यभरे ! अगदी तुझ्या गळा, माझ्या गळा स्टायल, पहीले आप - पहीले आप ! कधी कधी तर मला उठायचीही गरज पडत नाही, किंवा बसणारे कोणी उरलेच नसल्यामुळे परत बसायला मिळते ! कधीतरी कोणीतरी विचारतो, "आपको तो बोरीबंदर जाना था, तो वडाला क्यो खडे हुए ? " ही संधी मग मी सोडत नाही, अजून अश्व-व्रत न पाळणार्यांना सुनवायची मला आयतीच संधी मिळते, ती मी बरा सोडेन ? आता निदान माझ्या डब्यात तरी अनेक जण या व्रताचे पालन करून सुखी झालेले आहेत ! बोला, तुम्ही घेणार हा वसा ? पण एक आहे, घेतला वसा टाकायचा नाही, उतायचे नाही आणि मातायचे नाही ! तुमचे भले होईल, अगदी निवृत होईपर्यंत ठणठणीत रहाल, घ्या gurantee !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: