रविवार, ५ ऑक्टोबर, २००८

सही रे सही !

सही रे सही !
शेयर बाजारात तेव्हा उमेदवारी चालू होती.अर्थात थोबाड तेव्हाही फूटत होते आताही फूटतेच पण अनुभव नाही असे म्हणता येत नाही एवढेच. प्रत्यक्ष अनुभव घेउनच अनेक गोष्टींचे ज्ञान होत होते. १९९१ चा काळ असावा. सुधारणा पुर्व ! शेयर बाजार म्हणजे मूठभर गुजराती मारवाड्यांचा अड्डा होता. मराठी ब्रोकर होते अवघे दोन, नाबर आणि कारखानीस. मी माझे व्यवहार दादरच्या, कारखानीस यांच्या poplular investments मधून करायचो. शेयर विकत घेउन ते आपल्या नावावर करणे ही एक प्रदीर्घ प्रक्रीया असायची. यात कधी कधी सहा-सहा महीने सुद्धा जायचे, व तेवढे थांबून सही जूळत नाही म्हणून प्रमाणपत्रे परत यायची ! असेच एकदा मी reliance capital चे १०० शेयर ५० रू दराने घेतले. हाती प्रमाणपत्र मिळाले व सोबत share transfer form. सट्टा खेळणारे बहुतेक व्यवहार transfer form, कोरा ठेउन करत. एखाद्या बेअरर चेक सारखा तो बाजारात फीरत राही. कंपनीनी बुक क्लोजर जाहीर केले की तो ज्याच्या ताब्यात असेल त्याला ते शेयर आपल्या नावावर चढवून घ्यावेच लागत. (passing the ball खेळ आठवा !) माझ्यासारखा मध्यमवर्गीय गुंतवणुकदार मात्र शेयर आपल्या नावावर चढवून घेत असे. कंपनीचे नोंदणी कार्यालय मेट्रो सिनेमाजवळ होते. तिकडे गेलो पण अर्ज घेतला नाही , का तर १५ % लाभांष वाटपासाठी book closure घोषित झाले होते. म्हणजे १५० रूपयाचा फटका बसला होता ! परत तिकडे गेल्यावर trasnfer form एक वर्ष जुना आहे, चालणार नाही, नवा आणा म्हणून पिटाळला गेलो. ब्रोकरकडे परत आलो तर तो मलाच दोष देउ लागला की 'खाते बंद' तारखेच्या आधी का नाही गेलात म्हणून ! त्याच वेळी बाजारात हर्षद मेहता प्रणीत तेजी चालू झाली होती व सर्वच ब्रोकर माजले होते. त्यांचा धंदा अनेक पटीने वाढला होता. याच काळात कंपनी हक्क भाग देणार अशी घोषणा झाली आणि मला लवकर हालचाल करणे भाग पडले. परत ब्रोकरला गाठले. त्याने काम करतो पण बाजार भावाच्या २५ % कमिशन मागीतले व कामाला दोन महीने लागतील म्हणून सांगितले. मी कपाळावर हातच मारला. या काळात मी हक्क भागांनाही मुकलो असतो. त्या प्रमाणपत्रा सोबत कॉलमनी नोटीस सुद्धा होती व त्यावरून जयपूरची कोणी महीला त्याची मालकीण होती. मी तीला एक पत्र लिहीले व सोबत एक कोरा transfer form, या transfer form ची झेरॉक्स पाठवली. सोबत एक आवश्यक ते टपाल शूल्क लावलेले पाकीट पाठवले. सर्व प्रसंग नमूद करून सही करून अर्ज पुन्हा पाठवायची विनंती केली. दोन आठवडे वाट पाहीली पण उत्तर आले नाही.
मग मी हा सर्व प्रकार माझा शेयर बाजारातला गुरू व कामावरचा मित्र मुकादम याच्या कानी घातला. मी जेव्हा हजारात हरत होतो तेव्हा हा मियां लाखाने कमवत होता ! त्याने ती केस आपल्याकडे घेतली. दूसर्या दिवशी त्याने त्या फॉर्मवर सही आणली होती. सही तर अगदी तंतोतंत जुळत होती पण ती खरी नक्कीच नव्हती ! हे म्हणजे आगीतुन फुफाट्यात ! मुकादम म्हणाला की अशा केस मध्ये हे अगदी सर्रास चालते, घाबरू नकोस, मी स्वत: असे अनेकदा केले आहे. नाहीतर हक्क भाग गमावून बसशील. पण माझी काही हिंमत होई ना. शेवटी मुकादमने माझ्याकडून ५० रूपये घेतले व ती सही चक्क नोटरी कडून प्रमाणीत करून आणली ! आधी वाटले की या मियाचा काय भरवसा, सही बनावट तसा कोणी बनावट नोटरी पण त्याने बाळगला असेल ! मग मात्र मी ते शेयर घेउन मेट्रोजवळचे कंपनीचे कार्यालय गाठले पण मधल्या काळात ते चेंबूरला शिफ्ट झाले होते ! चेंबूरच्या कार्यालयात मग ते प्रमाणपत्र व सोबत 'तो' transfer form दिला. मधल्या काळात शेयरची किंमत ३० रूपयाने वाढली होती, मी मात्र मी घेतलेल्या ५० रू च्या दराने share transfer stamp लावले होते. अर्ज नवीन तारखेचा असल्याने मी ते आधीच विकत घेतले आहेत असा दावाही करता येत नव्हता ! वाढीव दराने share transfer stamp डकवून मी परत चेंबूर गाठले. का कोणास ठाउक पण त्या कार्यालयातला प्रत्येक जण माझ्याकडे संशयाने बघत आहे असे उगाचच मला वाटत होते. एकदाचा अर्ज स्वीकारला गेला व माझी सूटका झाली. महीनाभराच्या विलंबाने प्रमाणपत्रे माझ्या नावावर होउन घरी आली. दूसर्याच दिवशी पेपरात बातमी होती की रीलायन्स कॅपीटलचे अनेक बनावट शेयर बाजारात आले आहेत आणि त्यासाठी सेबीने कंपनीला जबरी दंड ठोठावला आहे ! परत माझे धाबे दणाणले. नक्कीच 'ते' शेयर बनावट असणार आणि आता आपल्याला पोलीस पकडणार या भयाने माझी झोप पार उडाली. पण तसे काही सुदैवाने झाले नाही. मला तेवढेच शेयर हक्कभाग म्हणून मिळाले. चढ्या बाजारात मी ते सर्व शेयर विकून ३०,००० रू. चा फायदा कमावला, पण २०० रू. ला विकलेले शेयर पुढच्या काही महीन्यातच ४०० रू. च्या वर गेले आणि परत हळहळ, चडफड झाली ती वेगळीच !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: