बुधवार, १५ ऑक्टोबर, २००८

वसा, 'जागते रहो' चा !

वसा, 'जागते रहो' चा !


१९८६ मध्ये मुंबई बंदरात कामाला लागलो तेव्हा आपल्याला तिन्ही शिफ्ट मध्ये काम करावे लागणार याची कल्पना होती। पण जेव्हा प्रथमच तिसरी पाळी केली तेव्हा मात्र पार वाट लागली. आधीच ४४ किलो असलेले वजन चक्क एका आठवड्यात ५ किलो उतरले. नोकरी झेपणारच नाही असे वाटू लागले. रोटा लागल्यावर तिसरी पाळी करायची असेल तर पोटात गोळाच यायचा. काम असो की नसो, झोप अनावर व्हायची. पहाटे ३ ते ५ या वेळेत कोणाला तरी बसवून शेड मध्ये कोठेही मी ताणून द्यायचो, पण झोप पूर्ण काही होत नसे. सर्व आठवडा डोळे तारवटलेलेच असत व तो हॅन्ग-ओव्हर पुढचे काही दिवस राहत असे. शिफ्ट करून लोकलने घरी परतताना वडाळ्याला उतरायच्या ऐवजी, झोप लागल्याने अनेकदा कुर्ला कारशेड पाहीली होती. घरी गेल्यावर बूट कसेबसे काढून हॉल मध्येच ताणून द्यायचो, मग १० वाजता अर्ध-मिटल्या डोळ्यानी सर्व आन्हीके पार पाडून परत झोप, १२ वाजता जेवण, परत संध्या. ६ पर्यत झोप. पण येणारी जाणारी माणसे, रस्त्यावरची वर्दळ याने गाढ झोप लागत नसेच. मग रात्री १० वाजता परत कामावर. सगळेच माझ्या शिफ्टला कंटाळले होते कारण माझी चीडचीड त्यांनाच सहन करायला लागायची, पित्त खवळायचे ते वेगळेच.एकदा अगदी कहरच झाला. कामावर जाण्यापुर्वी थोडी डुलकी लागली आणि चक्क रात्री २ वाजता जाग आली ! दांडी झाली. रजा पास होणार नाही म्हणून खोटे वैद्यकीय प्रमाण-पत्र घेतले पण नियमाप्रमाणे ते दोन दिवसाचे मिळाले व दोन दांड्या झाल्यामुळे पूर्ण तिसरी पाळी परत करायला लागली !


वडील सुद्धा बंदरातच कामाला होते व माझ्याहून जास्त वर्षे पाळ्या करत होते, अगदी गोरेगाव, विरार येथे रहात असल्यापासून आणि अगदी विना-तक्रार ! शेवटी त्यानांच शरण गेलो ! काय करावे म्हणजे ही तिसरी पाळी माझी तिसरी घंटा वाजवणार नाही ? कशी बरे सुसह्य होईल ? बाबा वदले , वत्सा, प्रामाणिक पणे ! संपूर्ण वेळ जागे राहून आणि घरी आल्यावर लगेच अजिबात झोपायचे नाही, दूपारच्या भोजनापर्यंतची सर्व नित्यकर्मे करायची मगच झोपायचे। झोप पूर्ण होईल, कामावर जाताना पेंगुळलेला दिसणार नाहीस, आल्यावर पण प्रसन्न वाटशील ! हा वसा नीट पाळ, उतू नकोस, मातू नकोस, तुझे भले होईल !


आणि खरच चमत्कार झाला. सुरवातीला रात्री कामावर जागणे कठीण गेले पण मग सलग ७ तास जरा सुद्धा थकवा न येता काम करायची सवय लागली ! मी तिसर्या पाळीत जागा असतो हे कळल्यावर अनेक जण का कोण जाणे, मला टरकून राहू लागले, धक्क्यावर काम करणारे कामगार सलाम मारू लागले, यो सायब लय कडाक हाय असे म्हणू लागले. सहकारी मात्र मी जागतो आहे म्हटल्यावर बिनघोर झोपू लागले पण त्या बदल्यात दिवसा मला सांभाळू लागले. वरीष्ठांकडून मान मिळू लागला. काम नसेल तेव्हा झोप येउ नये म्हणून वाचायची सवय लावून घेतली तीचा पण चांगलाच फायदा झाला. पुस्तकांशी परत मैत्री झाली. नव्या विचारांचे दालन खुले झाले. असेच एकदा रात्री दोन वाजता आमच्या बॅलार्ड पियरच्या धक्क्याजवळ असताना, कस्टमचा कोणी शिपाई पहाडी आवाजात लोकगीत गात होता. त्या आवाजाने तिकडे शब्दश: ओढला गेलो ! गाणारा खरच भान हरपून गात होता आणि ऐकणारेही तल्लीन झाले होते. ती अवीट मैफल कानात अगदी साठवून ठेवली आहे. शेवटी त्याने "ढलता सूरज धीरे -- " म्हणून त्यावर चार चांद लावले ! अशीच मग काम नसेल तेव्हा गेट-वे-ऑफ-इंडीया पर्यंत रात्री भटकायची सवय लागली, सोबत कोणी असेल तर ठीकच, नाहीतर एकला चलो रे ! रात्रीची अंगावर शहारा आणणारी मुबई अगदी जवळून बघता आली. भीती पण दूर झाली. असेच मग पहाटे टपरीवर इस्पेसल चाय आणि खारी विकणारा एक मित्र झाला. त्याच्या तोंडून या माया-नगरीचे अनेक रंग उमगले, जणू नवे दालनच खुले झाले !
संगणक विभागात आल्या पासून तब्बल १६ वर्षे दिवस पाळीच करतो आहे पण जागरणाचे काहीही वाटत नाही. याचा उपयोग मुलगी आजारी असताना, सतत तीन रात्री जागून काढताना झाला आणि सासर्यांच्या अखेरच्या दिवसात तीन रात्री जागून त्यांची सुद्धा सेवा करता आली. जागरणाचा आता मला कोणताही side effect होत नाही ! प्रामाणिक पणे काम केल्यामुळे जणू निद्रा देवी मला प्रसन्न झाली आहे !

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

uttam lekh aahe. tuze sarv (all) lekh wachale. tuzya lekhanawar p.l. deshandecha tuch aahe. i like so much.