रविवार, ६ डिसेंबर, २००९

आंटीचे शेयर्स !

शेयर बाजाराचे मला ब‍‍र्यापेकी ज्ञान आहे हा अनेकांचा गैरसमज मी माझ्या परीने सुद्धा जोपासला आहे. न मागता सुद्धा मी लोकांना “शेयर की सोने” यावर कामावर लेक्चर झाडत असतो व खरेदी-विक्रीच्या टीप सुद्धा देत असतो. सुदैवाने त्या कोणी फारशा गांभीर्याने घेत नाहीत म्हणून गोदी कामगारांना मंदीची झळ तेवढी बसलेली नाही ! हल्ली बहुतेक समभागांचे सौदे डीमॅट स्वरूपात होतात व ज्यांच्याकडे ते फिजिकल (प्रमाणपत्र) स्वरूपात असतात असे लोक हमखास माझ्याकडे मार्गदर्शनाला येत असतात. कधी कधी हजार-दोन हजार बाजारात किंमत असलेल्या समभागासाठी ५०० रूपये वार्षिक फ़ी असलेले डीमॅट खाते उघडणे मूर्खपणाचेच असते व त्यातही ती व्यक्ती पुन्हा कधी समभाग घेणार सुद्धा नसते. अशावेळी ओळखीतला कोणीतरी मी पकडतो व १० % कमी भावात ते त्याला विकून मी तोड काढतो. मुंबई शेयर बाजारात फिजीकल शेयर्सचे व्यवहार होतात व त्यात सुद्धा बाजारभावापेक्षा १० % कमी भावाने व्यवहार होतो पण हल्ली हे सौदे रोडावले आहेत व असे समभाग विकणे खूपच खर्चिक , कटकटीचे हो‍उन बसले आहे.

असेच मी एकाला शेयरबाजारासंबंधी मार्गदर्शन देत असताना माझा सहकारी मित्र डिसोजाने ते ऐकले व त्याच्या आंटीचे शेयर विकून दे असे विनवले. मी होकार देताच दूसर्या दिवशी तो पेपरचे एक मोठे बाड घेउन आला. एक तास तो डोंगर पोखरल्यावर तिन शेयर हाती गवसले ! एल.आय.सी. हाउसिंग फायनान्स व हिंदूस्तान ऑइल एक्सप्लोरेशन चे प्रत्येकी १०० समभाग व कोलगेट चे १० समभाग. साधारण आठ महिन्यापुर्वी त्यांचे बाजारमूल्य होते ४०,००० रूपये. माझ्या वडाळ्याच्या ब्रोकरला फोन केला तेव्हा ते विकण्याबाबत तो काही फारसा उत्साही वाटला नाही. हल्ली असे सौदे फारसे होत नाहीत हे त्याने मला सांगितले. मी अगदीच गळ घातल्यावर समभाग हस्तांतरण अर्जावरच्या सह्या नोटरी वा तत्सम कोणाकडून तरी सत्यापित करून आण मग बघतो असे सांगितले. या वेळेपर्यंत ते समभाग कोणाच्या नावावर आहेत हे मी बघितलेच नव्हतो. एका पमाणपत्रावर आंटी व तिच्या मुलीचे नाव होते, दूसर्यावर आंटी व जावयाचे नाव होते व तिसर्यावर त्या तिघांची नावे बघून मी कपाळावर हातच मारला, त्यात जाव‍ई व मुलगी आता ऑस्ट्रेलियात सेटल झाले आहेत हे कळल्यावर मी त्यातुन सरळ अंग काढून घेतले. कारण या तिरपागड्यामुळे त्यांची सही सत्यापित कोण करणार हा प्रश्न होता व नावाचा क्रम वेगवेगळा असल्याने तिन वेगवेगळी खाती उघडावी लागणार होती.

नाराज हो‍उन डिसोजा सगळी प्रमाणपत्रे परत घेउन गेला. साधारण दोन महिने गेले. युपीए अधिक मजबुतीने परत सत्तेत आल्यामुळे बाजार सावरू लागला होता. ’ते’ शेयर सुद्धा जोरात चालले होते. एके दिवशी डिसोझा सांगू लागला की आंटीला पैशाची गरज आहे व एकजण ते सगळे शेयर तिला ३०,००० रोख देउन घ्यायला तयार झाला आहे. काय करू ? आंटीची एक मुलगी अपंग आहे व तिच्या उपचारासाठी पैसे हवेत असे समजले. तिचा जावई त्या दोघींना आपल्या बरोबर ऑस्ट्रेलियात न्यायला तयार आहे पण तिकडचे सरकार मुलगी अपंग असल्याने परवानगी देत नाही असेही समजले. मी सहज त्या शेयर्सचा बाजारभाव चेक केला व धक्काच बसला, कारण त्यांची किंमत चक्क ७०,००० रूपये झाली होती ! म्हणजे तिला मदत करण्याच्या नावाखाली “तो कोणीतरी” तिला फसवू पाहत होता ! यातुन कसा मार्ग काढायचा हेच सूचत नव्हते. कोणत्याही मार्गाने गेलो तरी वेळ लागणार होताच. मुख्य प्रश्न बाहेर स्थायिक झालेल्यांच्या सह्या सत्यापित कोण करून देणार हा होता. कारण सह्या जुळल्या नाहीत तर हस्तांतरण लटकलेच असते ! अचानक डिसोजकडून कळले की त्या तिघांचे संयुक्त खाते एकाच बँकेत आहे ! लगेच डोक्याला चालना मिळाली व एक ऍक्शन प्लान तयार झाला ! सगळे शेयर आंटीच्या एकाच नावावर हस्तांतरीत करून घ्यायचे , मग तिच्या एकटीच्या नावाने डीमॅट खाते उघडायचे, नावावर झालेले शेयर त्या खात्यात डीमॅट करून टाकायचे व मग बाजारात विकायचे ! हस्तांतरण अर्ज मी व्यवस्थित भरून दिले व सह्या कोठे करायच्या याच्या खुणा करून देउन पोस्टाने ऑस्ट्रेलियाला रवाना केले. त्यांना इमेल धाडून काय करणार आहे त्याची कल्पना दिली. अवघ्या पंधरा दिवसात त्यांची सही झालेले अर्ज पोस्टाने आले. आंटीला बँकेत पिटाळून त्या अर्जांवरच्या सह्या सत्यापित करून घेतल्या. मग बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शूल्क डकवायचे काम पार पाडले. मधल्या काळात त्या सर्व कंपन्यांचे समभाग नोंद ठेवणार्या एजंटाचे पत्ते काढले होतेच. दोन मुंबईतलेच होते व एक गुजरात, बडोदा येथील होता. गुजरातचा कुरीयरने रवाना केला व शिपायाला मुंबईच्या पत्त्यावर धाडले तेव्हा समजले की पॅन नंबरची प्रत जोडल्याशिवाय हस्तांतरण अर्ज स्वीकारले जात नाहीत. या नव्या नियमाची मला कल्पनाच नव्हती ! अर्थात त्यावर सुद्धा तोडगा निघालाच. जवळच असलेल्य युटीआय बँकेच्या कार्यालयात सगळे सोपस्कार पार पडल्यावर आंटीच्या नावाचे पॅन कार्ड सुद्धा मिळाले. मुंबईचे काम मार्गी लागले. गुजरातच्या एजंटला आधीच फोन करून पॅन कार्ड पाठवायची व्यवस्था करतो आहोत, जरा थांबा असे विनवले होतेच. पॅन कार्डची फोटोप्रत फ़ॅक्स करून पाठविल्यास सुद्धा अर्ज प्रोसेस करायची त्याने तयारी दाखविल्यावर काम अजून जलद झाले ! मधल्या काळात अजून एक चांगली घटना घडली. शेयरखानने त्यांच्या पोर्टलवरून ऑनलाइन शेयर खरेदी-विक्री करणार्यांना एक वर्ष मोफ़त डीमॅट खाते देउ केले होते ! लगेच आंटीच्या नावाने शेयरखान मध्ये ऑनलाइन खाते उघडले! पुढे आठवड्याच्या अंतराने काहीही अडथळा न येता सर्व समभाग आंटीच्या एकटीच्या नावे झाले व ते लगेच डीमॅट करण्यासाठी सादर केले ! बाजार सुद्धा चांगलाच वधारला होता. एल.आय.सी. ने २५० वरून ६०० ची पातळी गाठली होती. कोलगेट ४०० वरून ७०० झाला होता व हिंन्दुस्थान ऑईल एक्सप्लोरेशन रोज अपर सर्किटला भेदत ३५० वर स्थिरावला होता. म्हणजे अवघ्या चार पाच महीन्यात आंटीच्या ३०,००० रूपयाचे लाख रूपये झाले होते ! मी डिसोजाला सांगितले होते की ज्या दिवशी शेयर डीमॅट खात्यात येतील त्याच दिवशी विकायचे व तो सुद्धा तयार झाला होता. एल.आय.सी. जेव्हा खात्यात आला त्याच दिवशी १० % वाढला व ६८७ रूपयाला विकला सुद्धा गेला! पण थोड्याच वेळात तो तब्बल १५ रूपयानी घसरला व स्क्वेयर अप गेल्यास एका दिवसात १५०० रूपये मिळणार होते. पण डिसोजा त्याला तयार झाला नाही. केव्हा अगदी या झमेल्यातुन बाहेर पडतो असे त्याला झाले होते ! कोलगेट सुद्धा असाच डीमॅट हो‍उन खात्यात येताच ८०० रूपयाला विकला गेला . हिंन्दुस्थान ऑईल एक्सप्लोरेशन मात्र काही केल्या डीमॅट होत नव्हता. अनेक फोन करून सुद्धा दाद लागत नव्हती. दरम्यान हिंन्दुस्थान ऑईल एक्सप्लोरेशन ४०० रूपये या त्याच्या अत्युच्च पातळीला पोचला व हातात समभाग नसल्यामुळे आमची नुसती चडफड होत होती, त्यात आधी विकलेले एलाआयसी व कोलगेट अजून २०० व १०० रूपयाने वाढल्याने उगाच विकायची घाई केली असे डिसोजाला वाटत होते ! अनेक वेळा फोनाफोनी करून एकदाचा हिंन्दुस्थान ऑईल एक्सप्लोरेशन खात्यात आला त्याच दिवशी बाजार कोसळला व तो समभाग ३६० रूपयावर आला ! अर्थात आधी ठरल्याप्रमाणे मी तो विकायच्या तयारीत असतानाच डिसोजाने मला अडवले व अजून थांबूया असे सांगितले.

आधी विकलेल्या शेयरचे साधारण ७५,००० रूपये चेकने आंटीला मिळताच तिला धक्काच बसला ! आपल्याकडे असलेल्या कपट्यांना एवढे रूपये कसे मिळाले याचेच तिला आश्चर्य वाटत होते. डिसोजाला फोन करून तिने आभार मानण्यासाठी मला लाइनवर बोलावले, पण बराच वेळ तिला काही बोलताच आले नाही, शेवटी अतिशय कातर आवाजात “गॉड ब्लेस यू माय चाइल्ड” एवढेच ती बोलू शकली ! आता पर्यंत अनेकांची अनेक कामे केली पण एवढा मनसे आशीर्वाद मला कधीच मिळाला नव्हता ! मी सुद्धा मोहरून गेलो व उत्तर म्हणून बोलायला काही न सूचल्याने शेवटी नि:शब्दपणे फोन कट केला ! दूसर्याच दिवशी तिने स्वत: केक बनवून मला पाठवून दिला होता !

त्या दिवशी ३६० ला न विकलेला तो शेयर अजून १०० ने उतरला आहे व त्याचा भाव बघून डिसोजा, “ मराठे , तू सांगितल्याप्रमाणेच केले असते तर ? असे रोज विचारून मला उदास करतोच आहे. ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे ! घेतलेले शेयर पडतात, विकलेले शेयर अजून वाढतात व न विकलेले पडतात हा अनुभव मला तरी नवीन नाही ! तुमच्या नशीबात जे आहे तेच तुम्हाला मिळणार , अगदी एक पै सुद्धा कमी नाही की जास्त ! जिला शेयर म्हणजे काय ते माहीत नाही ती पाउण लाख मिळाल्याने भरून पावली व तिला अजून आपण मिळवून देउ शकलो असतो या विचाराने आम्ही मात्र कासावीस झालो आहोत ! कर्म की गति न्यारी बंधो ----- !

मंगळवार, १ डिसेंबर, २००९

इंडियन टाईम !

आधी कालमापनाचे तिनच प्रहर होते, मग तास, मिनिट, सेकंद व मायक्रो सेकंद इथपर्यंत अचूक वेळ आपण मोजू लागलो. पण नेमकी वेळ सांगता येणे व ती पाळणे यातली तफ़ावत मात्र वाढतच चालली आहे. उदंड जाहली घड्याळे अशी आज अवस्था आहे. प्रत्येकाच्या मनगटाला घड्याळ, मोबाईलमध्ये घड्याळ, ( त्यात तर अलार्म लावायची पण सोय) रेल्वे स्थानकावर घड्याळ, डेस्कटॉपवर घड्याळ…, पण वेळ दिली जाते , पाळली मात्र जात नाही. गेल्या अनेक वर्षात एखादा कार्यक्रम, सभा वेळेवर चालू झालेली मी पाहीलेली नाही. अगदी लग्न सुद्धा मुहुर्तावर लागत नाहीत ! दोन घड्याळे कधीही सारखी वेळ दाखवित नाहीत हे जरी मान्य केले तरी ५-१० मिनिटांचा उशीर शम्य आहे. त्या पेक्षा जास्त उशीर मला तरी खपत नाही. मी स्वत: वेळ पाळण्याबाबत काटेकोर आहे, दूसर्याने ती पाळावी अशी अपेक्षा बाळगणे रास्तच नाही का ? दिलेल्या वेळेच्या आधीच काही मिनिटे पोचायचा / हजर रहायचा माझा प्रयत्न असतो, पण तो हल्ली हास्यास्पद ठरू लागला आहे. मला काही कामधाम नसते म्हणून मी वेळेआधी पोचतो असे मित्र खुशाल सांगत सूटतात ! मला वेळ पाळायचे टेन्शन असते तर मला वेळ देणार्याला माझ्या वेळेआधीच येण्याच्या ’वाईट’ सवयीचे टेन्शन ! हल्ली मित्र मला वेळ देताना ती तासभर वाढवूनच सांगतात ! मुंबई सारख्या शहरात विविध अडथळ्यांमुळे उशीर होतो हे समजण्यासारखे आहे पण आता मोबाईल आहेत तर निदान तसे कळवायला तरी नको का ? पण नाही, ही साधी गोष्ट सुद्धा केली जात नाही !



मुलांचे शाळेतले संमेलन, पालक-सभा, सहली अशा कार्यक्रमात वेळ दिलेली असते. मी तिकडे १० मिनिटे आधी पोचतो, निदान शाळेत तरी वेळ पाळली जात असेल अशी भाबडी आशा मी आपला अजून बाळगून आहे ! पण हल्ली एका तासाचा विलंब गृहीतच धरलेला असतो. वेळेवर पोचणाराच हास्यास्पद ठरतो. सुरवात उशीराने होते म्हटल्यावर शेवटाला सुद्धा विलंब होणार हे ओघानेच आले. कार्यक्रम उशीरा सुरू होण्याची कारणे सांगायची तसदी सुद्धा कोणी घेत नाही आणि घेतलीच तर ती सगळी गोलमालच असतात. लोकसेवक एखाद्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून येणार असेल तर तो जेवढा उशीर ये‍ईल तेवढा तो मोठा असा एक समज आहे ! अशा कार्यक्रमाला मी तर हल्ली जातच नाही ! पण काही कार्यक्रम टाळता येत नाहीत तेव्हा त्यांना किती उशीर होणार याची अटकळ बांधत तिष्टत बसणेच आपल्या हाती असते !



संस्थाबाजी करणे हा तसा माझा पिंड नाही पण एकदा कसे ते ब्राह्मण सभा, नवीन पनवेलची स्थापना करायचे मनात आले. माझ्याच घरी समविचारी लोकांची सभा बोलावली. संध्याकाळी सहाची वेळ ठरली असताना लोक जेव्हा ७ च्या नंतर जमू लागले तेव्हाच खरे तर मी शहाणे व्ह्यायला हवे होते. एकदाची सभा पार पडली, उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाची तारीख ठरली व मग वेळ संध्याकाळची हवी असेही ठरले. पण मग पाच, सहा की सात या वर चर्चा फ़ारच रंगली ! शेवटी पत्रिकेत ६ म्हणायचे म्हणजे कार्यक्रम ७ वाजता सुरू होईल यावर एकमत झाले. इथे माझा सात्विक संताप उफाळून आला ! आपण ब्राह्मण सभा सुरू करतो आहोत तेव्हा आपला कार्यक्रम जी वेळ ठरवू त्या ठोक्यालाच सुरू झाला पाहिजे असा आग्रह धरला. अगदी कोणीही नसले तरी आपण ठरल्या वेळेलाचा दीप-प्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करायचाच असे मी सर्वाना बजावले. अर्थात प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या संध्याकाळी सहा या नियोजित वेळेला सभागृहात मी एकटाच होतो ! कार्यक्रम सुरू व्ह्यायला सात वाजले ! इथून आमच्या सभेने वेळेशी जो काडीमोड घेतला आहे तो अगदी आजतागायत ! अगदी दिवाळी पहाट सुद्धा सकाळी सुरू होते व काव्यसंध्या रात्री !



वेळ ना पाळणार्या लोकांची इतरांनी वेळ पाळली पाहिजे अशी अजब अपेक्षा असते. लोकल वेळेवर सूटली पाहिजे. पत्र वेळेत मिळाले पाहिजे, गुंतवणुकिवरचे व्याज निर्धारीत तारखेला खात्यात जमा झालेच पाहिजे, पगार १ तारखेला झालाच पाहिजे, शिंप्याने व धोब्याने कपडे वेळेत दिलेच पाहिजेत, रोजचा पेपर वेळेवर घरात पडलाच पाहिजे, कामवाल्या बाईने वेळ पाळलीच पाहिजे ! कार्यालयात जाताना उशीर झाल्याचे खापर मात्र लोकलवर फोडायचे पण परत यायची वेळ कटाक्षाने पाळायची ! लोकल उशीरा असल्याने उशीर झाला असे म्हणणारी माणसे सराईतपणे खोटे बोलत असतात. समजा लोकल दहा मिनिटे उशीराने धावत असतील आणि तुम्ही जर आपल्या ठरलेल्या वेळी स्थानकावर पोचला असाल तर आधीची लोकल तुम्हाला , जी उशीराने आलेली होती, ती तरी तुम्हाला मिळायला हवी होती ! मी २५ वर्षाहुन जास्त काळ लोकलकर आहे आणि उशीरा पोचण्याचे कारण अगदी ९९.९ % वेळेला लोकल नसते हे छातीठोकपणे सांगू शकतो ! वेळ न पाळण्याच्या सवयीचे खापर मात्र लोकलच्या माथी मारले जाते.



या देशात काय वेळेवर होते असे आता विचारायची वेळ आली आहे. प्रत्येक गोष्टीचे वेळा-पत्रक कोलमडले आहे. निवडणुका वेळी-अवेळी घेतल्या जातात, सरकारे आपली टर्म पुरी करीत नाहीत, कोणाची खुर्ची कधी जाईल हे सांगता येत नाही, परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीतच, ( एक मात्र बरे आहे की एकदा तारखेचा घोळ मिटला की पेपर मात्र ठरलेल्या वेळी होतात व वेळ संपताच हातातुन काढून घेतले जातात !) , त्यांचा निकाल सुद्धा वेळेत लावता येत नाही, मग प्रवेश प्रक्रीया सुद्धा वेळेत पुरी होत नाही, न्यायालये मुदतीत निकाल देत नाहीत, समन्स सुद्धा वेळेवर पोचत नाहीत ! सोसायटीच्या वार्षिक सभेची वेळ जवळ आली की सभासद बाहेर कलटी मारतात व सभा आटोपल्यावर एंट्री मारतात ( हे टायमिंग कसे बुवा जमते ?!) , फ़ाशी झालेला सुद्धा वेळेवर फ़ासावर चढत नाही, स्पीडपोस्ट ने पाठवलेले पत्र सुद्धा पाच दिवसाने पोचते ! जन्म झाल्याची बातमी बारशाला पोचते तर मेल्याची बातमी बाराव्याला ! तशी कोणतीच डिलीवरी हल्ली वेळेवर होत नाही म्हणा ! मागच्या आठवड्यात आमच्या कार्यालयाला जहाज मंत्रालयाकडून स्पीडपोस्टने तीन पत्रे आले, एकात एक माहिती तातडीने हवी होती, दूसर्यात ती माहीती अजून न मिळाल्याचे स्मरण करून दिले होते तर तिसर्यात चक्क दिलेल्या मुदतीत स्मरण करून देउन सुद्धा माहीती न दिल्यामुळे खुलासा मागितला होता, अर्थात तो खुलासा द्यायची सुद्धा मुदत टळून गेलेली होती ! हे सगळे मानव निर्मित झाले, आता निसर्ग सुद्धा वेळ पाळत नाही ! कोणाची वेळ कधी भरेल हे सांगता येत नाही ! नेमेचि येतो मग पावसाळा असे आता फ़क्त कवितेतच उरले आहे, आता तो वेळेवर येत नाहीच , वेळेवर जात पण नाही, सगळे ऋतूचक्रच बदलून गेले आहे. थंडीत उन्हाचा तडाखा, उन्हाळ्यात थंडी, थंडीत पावसाळा !



इंग्रजांचे / पाश्चात्यांचे नको ते अनेक गुण आपण घेतले पण वेळ पाळण्याचा गुण मात्र आपल्या अंगवळणी पडला नाही. आमच्या कार्यालयाला भेट देणारे विदेशी पाहुणे दिलेल्या वेळेच्या अगदी ठोक्याला अध्यक्षांच्या दालनात प्रवेश करतात. रस्ता माहीत नसेल तर त्यांचे कार्यालय सर्व माहीती आधीच घेउन ठेवते पण त्यांनी वेळ चुकविली असे माझ्या एकदाही पाहण्यात नाही ! माझ्या मित्राला कोणी किती वाजता भेटायचे असे विचारले तर त्याचे उत्तर असते पाच पर्यंत कधीही नाहीतर पाचच्या पुढे केव्हाही, वर, या अगदी निवांत अशी पुस्ती जोडली जाते ! अरे ही काय वेळ द्यायची पद्धत झाली का ?



वेळेवर या अशी हजारदा तंबी देउन सुद्धा एक मित्र(?) कार्यक्रमाला तब्बल एक तास उशीराने पोचला. त्याबद्दल दिलगिरी सोडाच, घड्याळ बघून तो बोलला की पोचलो की नाही अगदी वेळेवर ? अगदी इंडीयन टाईम, भारतीय प्रमाण-वेळ ! आता मात्र माझी तार सटकली ! उशीरा येता ते येता वर हीच भारतीय प्रमाणवेळ आहे असे वेशरमपणे म्हणता म्हणजे अगदी कहर झाला. स्वत:च्या गलथानपणाने वेळ पाळता येत नाही वर देशाला बदनाम करता ? या शब्दात मी त्याची हजेरी घेतली ! परीणाम मात्र अगदी उलटा झाला. वेळेचे भान पाळत नाही म्हणून कान-उघाडणी करणार्या मला स्थळ-काळ-वेळ याचे भान नाही व माझे जन्माला येण्याचे टायमिंग चूकलेले आहे यावर मात्र एकमत झाले !

साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक.

साने गुरूजी हे माझे स्वत:चे प्रेरणा स्थान आहे. लहानपणीच त्यांची पुस्तके वाचून त्यांच्या लेखनाचा व चरीत्राचा प्रभाव अगदी खोलवर ठसा उमटवून गेला आहे. काही दिवसापुर्वीच या स्मारकाला भेट दिली व संस्थेच्या माहीतीपत्रकातील माहिती आपल्या बरोबर शेयर करत आहे. या कार्याला आपला हातभार लागावा अशी कळकळीची विनंती.

वाटचाल

· पांडुरंग सदाशिव साने उर्फ़ साने गुरूजींच्या जन्मशताब्दी निमित्त १९९८ साली “साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट”ची स्थापना करण्यात आली.

· रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालुक्यातील पालगड येथील साने गुरूजींचे घर शासनाने ताब्यात घेउन ट्रस्टकडे हस्तांतरीत केले. त्या ठीकाणी “साने गुरूजी स्मृती भवन” उभारण्यात आले.

· पालगडपासून ५५ कि.मी. अंतरावरील वडघर, ता. माणगाव, जि. रायगड येथे ट्रस्टने ३६ एकर जमिन खरेदी करून “राष्ट्रीय स्मारक” उभारण्यात आले.

· पहिल्या टप्प्यामध्ये कॅम्पिंग सुविधा, डॉर्मेटरी, गेस्ट-हाउस इ. बांधकाम करण्यात आले.

· दुसर्या टप्प्यामध्ये “साने गुरूजी भवन” व “अनुवाद सुविधा केंद्र” उभारण्यात येत आहे.

· तिसर्या टप्प्यामध्ये “आंतरभारती भवन” व ऍम्फ़ी थिएटर” यांचा समावेश आहे.

· स्मारक उभारणीमध्ये विद्यार्थांचा प्रमुख सहभाग आहे. ७० हजार विद्यार्थ्यांनी ६० लाख रूपयांचा निधी जमवून दिला.

उपक्रम

· शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिरे, “प्रेरणाप्रबोधन शिविर”, एन.एस.एस. ची कॉलेज विद्यार्थ्यांची शिबिरे व विद्यार्थ्यांच्या सहली.

· याशिवाय येथे अनेक संघटनांची व संस्थाची शिबिरे, मेळावे होतात. संस्थेतर्फे प्रतिवर्षी हितचिंतक व कार्यकर्त्यांचा मित्र मेळावा घेण्यात येतो.

· “स्वाधार” च्या सहकार्याने पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले जाते.

· परिवर्तन मुंबई या संस्थेच्या सहकार्याने पंचक्रोशीतील गावकर्यांच्या क्रिडा स्पर्धा घेण्यात येतात.

· दरवर्षी मे महिन्यात “युवा श्रम संस्कार छावणी” शिबिर घेण्यात येते.

आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र

भारतीय भाषांमध्ये आदान-प्रदान घडविण्याचा “आंतरभारती” हा उप्रक्रम राबविणे हे राष्ट्रीय स्मारकाचे दुसरे उद्दीष्ट आहे. त्या साठी “अनुवाद सुविधा केंद्राची” स्थापन करण्यात आली आहे. या ठीकाणी अनुवादासाठी आवश्यक शब्दकोश व अन्य पुस्तके असलेले ग्रंथालय आहे. अनुवादकांच्या निवासाची व भोजनाची सोय आहे. या केंद्राच्या वतीने अनुवाद कार्यशाळा, विंदा करंदीकर यांच्या देणगीतुन बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार, वासंती गंगाधर गाडगीळ अनुवाद अभ्यासवृत्ती, जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या देणगीतुन पुस्तके अनुवादित करण्यात येत आहेत. अनुवादाला वाहिलेल्या “मायमावशी” षणमासिकाचे प्रकाशन हा आणखी एक उपक्रम आहे.

राष्ट्रीय स्मारकातर्फे दर दोन वर्षानी “आंतरभारती साहित्य संवाद” चे आयोजन करण्यात येते. जानेवारी २००९ मध्ये चवथे “साहित्य संवाद” संमेलन “गुरूदेव टागोर तौलनिक साहित्याध्यासन” मुंबई विद्यापीठ, यांच्या सहकार्याने पार पडले.

स्मारक परिसर व सुविधा

Ø स्मारकाची जागा मुंबई-गोवा महामार्ग व कोकण रेल्वेच्या गोरेगाव रोड व माणगाव स्टेशनच्या जवळ आहे.

Ø ३६ एकराचा हा निसर्गरम्य परिसर डोंगरउतार, कालवा, नदी, विहीर, जैविक उद्यान शंभराहून अधिक प्रकारची झाडे, विविध पक्षी यांनी सम्पन्न आहे.

Ø स्मारकामध्ये राहुटी निवास, डॉर्मेटरी, गेस्ट-हाउसेस, कॉमन व्हरांडा, स्वच्छतागृहे, भोजनगृहे, खेळाचे मैदान, खुले सभागृह, नेचर ट्रेल अशी परिपुर्ण व्यवस्था आहे.

आवाहन

विद्यार्थ्यांना संस्कारीत करणारा, तरूणाईला साद घालणारा, आंतरभारती उपक्रमातुन समाजाला जोडू पाहणारा हा प्रकल्प. साने गुरूजींपासून समाजसेवेची प्रेरणा घेतलेल्या तरूणांच्या पुढाकारातून गेल्या दहा वर्षात उभा राहिला. समाज आणि शासनानेही त्याला भरभरून प्रतिसाद दिला. असेही घडू शकते हा अनुभव दिलासा देणारा आहे.

स्मारकाच्या पुढच्या वाटचालीत आपली साथ हवी, आपण हक्काने इथे यावे, रहावे आणि आपलेच काम समजून आर्थिक सहकार्यही करावे.

देणगी धनादेश “साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट” या नावाने काढावा.

(देणग्यांना कलम ८० जी आयकर सवलत मिळेल)

राष्ट्रीय स्मारक – वडघर, पो. गोरेगाव, ता. माणगाव, जिल्हा – रायगड

दूरध्वनी क्रमांक – ०२१४०-२५०७९५, ०२१४०-२५०२०५

स्मृती भवन - पालगड, ता. दापोली, जि. रत्नागिरी

कार्यालय साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट (रजि. नं. ई/१७८८४, मुंबई)

म्युनिसिपल मराठी शाळा क्र.२, पहिला माळा, खोली क्र. ३२,

पोर्तुगीज चर्च जवळ, गोखले रोड(द), दादर(पश्चिम), मुंबई – ४०००२८

फ़ोन नंबर ०२२-२४३०७९१७

वेब साइट – aantarbharati.org

इमेल – antarbharati_ask@yahoo.co.in

सोमवार, २३ नोव्हेंबर, २००९

गोरा भिकारी !

साधारण १९८५ मधली गोष्ट असेल. दादरला काही कामा निमित्त गेलो होतो. दादर पश्चिमेला फूलबाजार आहे, तिकडच्या रेल्वे पुलाखाली लोकांची गर्दी झाली होती. कुतुहुल म्हणून गर्दीचे कारण शोधायला गेलो व थक्कच झालो. एका गोरा, चेहर्यावरून तरी युरोपियन वाटणारा तरूण तिकडे उभा होता. केस विस्कटलेले, दाढीची खुंटे वाढलेली, टाय अस्ताव्यस्त, कोट उसवलेला, शर्ट अर्धवट खोचलेला, ढगाळ विजार व बूट विटलेले. चेहर्यावर अत्यंत विमनस्क भाव. गळ्यात त्याने वृत्तपत्राच्या पानावर स्केचपेनने खरडलेला मजकूर लटकवलेला होता तो फारच लक्षवेधक होता…

“I am British tourist. Some thugs robbed me here. I lost all my money, cards, contact details, passport and luggage. Please help me!”

John.

मुंबईतल्या माणसांना भिकार्याचे कसले अप्रूप असणार ? तशी भारताची बाहेरच्या जगातली ओळख भिकार्यांचा देश अशीच आहे. एरवी भिकार्यांना भीक न घालणारे बाबू लोक या गोर्या भिकार्याभोवती मात्र कोंडाळे करून उभे होते. कोणी त्या चोरांचा उद्धार करत होते, कोणी त्या चोराने आपली इमेज डागाळली असे म्हणत होते. त्याच्या पाटीचा अनेक भाषात अनुवाद करून विंग्रजी न समजणार्यांना लोकांच्या डोक्यात प्रकाश पाडला जात होता. ज्या ब्रिटीशांनी आपल्या देशावर तब्ब्लल १५० वर्षे राज्य केले, सोन्याचा धूर निघणारा हा देश नागवला, त्याच देशातल्या एकावर आपल्या देशात टूरीस्ट म्हणून आला असताना लुबाडला जाउन भीक मागण्याची वेळ याते याच्या डागण्या अनेकांना अस्वस्थ करत होत्या. मग या पापाचे प्रायश्चित म्हणून गोर्या भिकार्याला मदत करण्यासाठी धक्का-बुक्की होत होती. त्याने आपली हॅट उलटी करून धरली होती. त्या हॅट मधून नोटा शब्दश: खाली पडत होत्या एवढी ती भरली होती ! एरवी ’बेगरला’ आठ आण्याच्या वर भीक न देणारे या गोर्याला मात्र निदान १० ची नोट ते २० रूपये त्याचे सांत्वन करून देत होते ! कोणी स्वयंसेवक बनून नोटा नीट लावून त्याच्या कोटाच्या खिशात ठेवत होते. तोडक्या मोडक्या इंग्रजीत त्याची माफी सुद्धा मागितली जात होती. गोरा मात्र तोंडातून एक चकार शब्द काढत नव्हता ! खाली घातलेली मान त्याने काही वर उचलली नव्हती ! भिकारी मग तो गोरा असो की काळा मी काही त्याला भीक कधीच घालत नाही. जरा वेळ हा तमाशा बघून मी घरची वाट धरली. पण एकंदरीत प्रकार जरा संशयास्पदच वाटत होता. जर खरेच तो ब्रिटीश नागरीक असता तर पोलिसांच्या मदतीने तो त्यांच्या देशाच्या वकिलातीत का नाही गेला ? हा प्रश्न मला पुढचे अनेक दिवस अस्वस्थ करत होता. गोरी चामडी बघितली की भुरळायची आपल्या लोकांची मानसिकता स्वातंत्र्यानंतरही बदलली नाही याची चीड होतीच.

अगदी काही महीन्यापुर्वीचीच गोष्ट. संध्याकाळी सीएसटी स्थानकाच्या वाटेवर लोकांचा घोळका जमला होता. नक्की तोच होता तो .. जॉन, गळ्यात तशीच पाटी अडकवून , त्याच स्टायलने तो उभा होता. सगळा प्रसंग अगदी जसाच्या तसा ! थोडा फरक होता, नोटा मात्र २०, ५०, १०० च्या होत्या, मधल्या काळात महागाई किती वाढली आहे ना ! अर्थात तेव्हा माझ्याकडून झालेली चूक पुन्हा होणार नव्हती. एका बाबतीत त्याला मानायलाच हवे. स्वत:ला काय मेंटेन केले होते त्याने ! त्याच्या सडसडीत अंगकाठीत काहीच फ़रक पडला नव्हता. गर्दीतुन वाट काढत मी जॉनच्या समोर उभा ठाकलो व त्याला “Hey John, so from last 20 years you are collecting money in India ! Let’s go to British Consulate, they will certainly help you if you are British!” हे ऐकल्यावर जॉनच्या चेहर्यावरचे भाव भरभर बदलायला लागले. आजूबाजच्या लोकांना सुद्धा हा काय प्रकार आहे ? असा प्रश्न पडला. मी त्यांना हा लोकांना फसविणारा भामटा आहे, त्याच्या गोर्या चमडीवर जाउ नका असे बजावले. लोक पांगले. मी जॉनचा हात धरला व त्याला टॅक्सीत बसवू लागताच तो गयावया करू लागला. त्याचा विदेशी मुखवटा पार गळून पडला. त्याला पोलिसात नेउन काही फ़रक पडला नसता. त्यांना हप्ते आधीच पोचले असणार, माझ्यासमोर त्यांनी थोडे नाटक करून त्याला सोडून दिलेच असते. मला त्याच्याबद्दल बरेच जाणून घ्यायचे होते. ही आयडीया त्याला सूचली कशी याचे कुतूहल होतेच ! मी त्याला एका टॅक्सीत कोंबले व गेट वे गाठले. पोलिसात देत नाही पण या भागात परत फ़िरकायचे नाही व तुझी सगळी स्टोरी, अगदी खरी, मला सांगावी लागेल असे म्हटल्यावर तो बोलता झाला.

तो चक्क मराठी होता. बी.कॉम झाला होता. सगळ्या अंगावर कोड आल्याने, की आणखीन कोणत्या रोगाने, त्याच्या त्वचेचा रंग लालसर, गुलबट झाला होता. केस त्याने डाय करून घेतले होते. त्याचे मित्र त्याला ब्रिट म्हणूनच चिडवत. नोकरी मिळायची शक्यता कमीच होती. भीक मागायची लाज वाटत होती व मागितल्यास देणार कोण हा प्रश्न होताच ! बेकार म्हणून भटकत असताना अनेक भारतीय गोरा साहेब समजून आपल्या मागे पडतात हे त्याच्या लक्षात आले. या मानसिकतेचा फायदा घ्यायचे त्याने ठरवले. त्याची आयडीया भलचीच क्लिक झाली ! अगदी सुपर-डुपर हीट ! अर्थात तो रोज भीक मागत नव्हताच. एकदा एका एरीयात भीक मागितली की त्या भागात तो सहसा परत जात नव्हता. देशातल्या बहुतेक शहरात या ’निमित्ताने’ तो पोचलेला होता. काही पोलिस ठाणी त्याने बांधून ठेवली होती. भीक मागताना एक शब्दही तोंडातुन तो बाहेर पडू देत नव्हता. इंग्रजी त्याचे तोडके-मोडकेच होते, तोंड उघडले असते तर त्याचे बिंग फूटलेच असते ! सर्वात मुख्य म्हणजे त्याची कमाई ! किती असावी ? काही अंदाज ? दिवसाला, काही तासात तब्बल १०,००० ते १५,००० रूपये ! एखादा नामांकित डॉक्टर सुद्धा एवढे कमवत नसेल ! अर्थात महीन्यातले १० दिवसच तो काम करायचा ! या पैशाचे तो करतो तरी काय ? बहुतेक मोठ्या शहरात त्याचे फ़्लॅट आहेत. कोठेही जाताना तो सगळ्यात वरच्या क्लासनेच प्रवास करतो. त्याचा स्टे नेहमी पंचतारांकितच असायचा. लग्न मात्र केलेले नाही !

माझी जिज्ञासा शमल्याने मला आता घरची वाट धरावी लागणार होती. मी निघालो तेव्हा तो एवढेच म्हणाला की तुम्हाला जो प्रश्न पडला, वकिलातीत जाण्याचा, त्याचा मात्र विचार मी प्लान करताना केला नव्हता. आश्चर्य म्हणजे एवढा लॉजिकल प्रश्न एवढ्या वर्षात कोणालाच पडला नव्हता, निदान त्याला तरी तसे कोणी विचारले नव्हते !

सोमवार, ९ नोव्हेंबर, २००९

मृत्यूपत्र कसे करावे ?

या जगात आपण नागडे येतो व नागडेच जाणार आहोत. ( खाली हाथ आये है हम, खाली हाथ जाना है !) या मध्यल्या काळात जे काही डबोले आपण गाठीला बांधणार आहोत त्यातले काही म्हणजे काहीही तुम्हाला सोबत नेता येणार नाही. अर्थातच आपल्या आप्तांना / जवळच्यांना ते मिळावे अशी तुमची इच्छा असणारच. पण नुसती इच्छा असून चालत नाही. त्या करीता तसे मृत्यूपत्र बनवणे फार फार गरजेचे आहे. अनेकांना नामनिर्देशन करणे व वारस नेमणे यातला फरक कळत नाही. नामनिर्देशित व्यक्तीला मृत व्यक्तीची संपत्ति एक विश्वस्त म्हणून मिळते , तो तिचा मालक बनू शकत नाही. मृत्यूपत्र नसेल तर मृत व्यक्तीची संपत्ति वारसांना मिळण्यात असाधारण विलंब होतो, मनस्ताप भोगावा लागतो, पैसा सुद्धा अमाप खर्च होतो, फ़सवणुक होण्याची भीती असतेच. मृत्यूपत्र केले असेल तर हे सगळॆ विनासायास होते तसेच मालकीहक्क बदलताना कोणतेही अतिरीक्त शूल्क द्यावे लागत नाही.

साधारण पणे वयाची चाळीशी पार केलेल्या माणसाने मृत्यूपत्र करून ठेवलेच पाहिजे. मृत्यूपत्र बनवायला तुम्हाला एका दमडीचाही खर्च येत नाही. मृत्यूपत्र नसल्याने वारसांची कशी फ़रफ़ट होते व हितशत्रू लोक त्यांना कसे अडचणीत आणतात, वकिल कसे लूटतात याचे अनेक किस्से मला माहीत आहेत. मी गेली १० वर्षे हा विषय सातत्याने मांडत आहे. अनेकजण मला सांगतात की मग तुम्ही मृत्यूपत्राचा मसूदाच का देत नाही ? काल योगायोगाने, निवृत्तांच्या एका सभेला गेलो असता, त्या संस्थेच्या वार्षिक अहवालात मृत्यूपत्राच नमूनाच मला मिळाला. त्याचा मूळ इंग्रजी मसूदा जसाच्या तसा देत आहे. त्याचा जरून फ़ायदा करून आपल्या पश्चात आपल्या संपत्तिचा उपभोग आपल्या वारसांना निश्चिंतपणे घेता येईल अशी व्यवस्था कराच !

मृत्यूपत्र तयार करण्याबाबत अनेक गैरसमज आहेत, ते दूर करायचा हा एक प्रयत्न. मृत्यूपत्र बनवताना या बाबी जरूर लक्षात घ्या;
१) मृत्यूपत्र साध्या कोर्या कागदावर सुद्धा करता येते, त्यासाठी स्टॅम्पपेपर, कोर्ट फ़ी स्टॅम्प लावलेला पेपर अशा कशाचीही गरज नाही.
२) मृत्यूपत्र नोटरी कडून नोंदवून घेण्याची व न्यायालयात नोंदवायची कोणतीही सक्ती नाही, अर्थात हे केलेत तर चांगलेच आहे.
३) मृत्यूपत्रावर ते करणार्याची व दोन साक्षीदारांच्या सहीची गरज असते. त्यातला निदान एक साक्षीदार डॉक्टर असेल तर उत्तम. साक्षीदार आपल्यापेक्षा तरूण असणे केव्हाही चांगले व ते आपल्या जवळपास राहणारे, परीवाराला चांगले माहीत असलेले असावे. साक्षीदारांचे पुर्ण नाव व पत्ता त्यात असावा.
४) मृत्यूपत्राच्या अंमलबजावणीसाठी (जास्त करून वारस अज्ञान असेल तेव्हा ) विश्वस्ताची नियुक्ती करावी. त्याचे नाव, पत्ता, मानधन याचा स्पष्ट उल्लेख केल्यास चांगले. वारस व विश्वस्त एकच असू शकत नाहीत.
५) मृत्यूपत्रात आपल्या सर्व स्व-कष्टार्जित चल-अचल संपत्तिचा सविस्तर उल्लेख असावा, कारण अशी संपत्तिच तुम्ही आपल्या वारसांना देऊ शकता.
६) कोणात्याही वेळी मृत्यूपत्र रद्द करता येते, त्यात बदल करता येतो, अधिक माहीती समाविष्ट करता येते, पण बदल करण्यापेक्षा पहीले फ़ाडून टाकून नवे कारणेच जास्त हिताचे आहे.
७) अधिकची खबरदारी तुम्ही देशाच्या कोणात्याही भागात तुमच्या मृत्यूपत्राची नोंद करू शकता.
८) मृत्यूपत्राचे कागद त्याची अंमलबजावणी करणारे व वारस यांना माहीती आहे अशा ठीकाणीच सीलबंद करून ठेवावे.


“WILL SAMPLE”

1) This is the last will of myself Shri/Smt ---------------------------------------, son/daughter/wife of Shri/Smt ----------------------------------------------, aged ------- years, resident of ------------------------------------ (Write full address), made on this --------(Date, Month, Year in words ).
2) I hereby revoke all my earlier WILLs and codicils made by me.
3) I hereby execute this last WILL and testament of mine voluntarily and without any compulsion or pressure from any source or person and in my sound health and good state of mind.
4) I appoint my wife and my eldest son/daughter/ ------ to be the executors and trustees of this WILL. (Executors and Trustees cannot be the same as beneficiary)
5) I own the following movable and immovable properties which are all my self acquired properties, built or acquired out of my own earnings and incomes without any assistance of any ancestral estate and I have therefore absolute power of disposal of the same and they are detailed below.
(Here give full description of your own land, houses, areas, their location, plot numbers, village/town/city etc,. All fixed deposits, Bank accounts, Bonds, National Saving Certificates, Equity shares, Debentures, Deposits in PPF, Insurance policies, etc. which are all on your name.)
6) I hereby fully and absolutely bequeath all my above said movable and immovable properties to my ……………. (Wife/son/daughter/or any one of your choice pther than relatives), Shri/Smt ------------------, son / daughter of Shri/ Smt --------------------.
7) I also declare that whatever nominations have been made by me shall all form part of estate and shall be dealt with accordingly and given to my heirs stated above. In witness thereof, I the said Shri / Smt ---------------- have put my signature on each sheet of this WILL, contained in this sheet and the preceding (1/2/3/4 sheets of paper ), on the day and the year first above written, viz. the …………….. day of ----.


Date: Signature of Testator.

Signed by the above name Testator in our presence at the same time and each of us has in the presence of the Testator, signed our name hereafter as the attesting witnesses.

Name/Address/Signature of first witness

Name/Address/Signature of second witness

रविवार, १ नोव्हेंबर, २००९

री-युनियन – असेही एक माजी विद्यार्थी संमेलन !

आठवीपर्यंत मी आगाशी,विरार येथील काशिदास घेलाभाई हायस्कूल मध्ये होतो. मग वडीलांना कार्यालयीन निवासस्थान मिळाल्यावर आम्ही सगळे वडाळ्याला शिफ़्ट झालो व नववी, दहावी मी वडाळ्याच्या ज्ञानेश्वर विद्यालयातुन केले. मैत्रीचे बंध ज्या वयात घट्ट होत असतात त्याच वयात शाळा बदलल्याने नव्या शाळेतील मित्रांशी माझी फ़ारशी नाळ जुळली नाही. त्यात कॉलनीतले मित्र म्हणजे अळवावरचे पाणी. वडील निवृत्त झाले किंवा त्यांची स्वत:ची जागा झाली की त्यांचा संपर्क कायमचा तुटायचा. शाळा सोबती म्हटले की म्हणूनच मला आगाशीच्या शाळेतलेच मित्र आठवतात. आगाशीतले बहुतेक मित्र तिकडले स्थानिकच होते तेव्हा आगाशी सोडून ते कोठे जायचा प्रश्नच नव्हता. नोकरी लागल्यावर मला फ़ार वाटायचे की एकदा आपल्या सर्व शाळा सोबत्यांना भेटायचे व त्यासाठी स्वत:च पुढाकार घ्यायचा. पण अनेक कारणांनी ते शक्य झाले नाही. पेपरात अधे-मधे इतर शाळांच्या री-युनियनच्या बातम्या वाचून मला गहीवर यायचा. तशा बातम्या मी अजूनही अगदी बारकाईने वाचतो. वडाळ्याच्या शाळेची ऑर्कुटवर कम्युनिटी आहे पण माझ्या १९८२ च्या बॅचमधला मी एकमेव सभासद आहे. बाकी सर्व सभासद थेट वाय२के मधले !

री-युनियनच्या ध्यासाने एका रविवारी अगदीच कासावीस झालो असताना मोबाईल वाजला. पलिकडून ’एकनाथ मराठे ना ?’ अशी विचारणा झाली व ’मी सुनील चुरी बोलतोय’ अशी ओळख दिली गेली आणि क्षणात मनाने आगाशीच्या वर्गात पोचलो ! सुनील माझा वर्गमित्र. त्याने चक्क आम्हा शाळासोबत्यांचे संमेलन आयोजित केले होते. त्यासाठी तो गेली काही वर्षे खटपट करत होता. माझा पत्ता त्याला योगायोगानेच माझ्या विरारला असलेल्या भावाकडून मिळाला व ४० पैकी ४० विद्यार्थी संपर्कात आल्यावर त्याने प्लान पक्का केला होता ! नालासोपार्याला एका रीसॉर्ट वर रात्री आम्ही सगळे एकत्र येणार होतो. ३०० रूपये शूल्क आल्यावर जमा करायचे होते. मला आता रात्रंदिवस ते संमेलन कसे असेल याचीच दृष्ये दिसत असत. कोण-कोण शिक्षक येणार असतील, आपल्याला ते ओळखतील का ? ओळखल्यावर ते आपल्याला खास ठेवलेल्या नावाने हाक मारतील का ? तसाच पाठीत धपाटा घालतील का ? त्यांना शाल व श्रीफ़ळ दिल्यावर त्यांच्या डोळ्याच्या कडा कशा पाणावतील याची कल्पना करताना माझेच डोळे पाणावायचे ! आपल्या बॅचतर्फ़े दहावीला शाळेतुन पहीला येणार्याला बक्षिस द्यायची माझी योजना मांडली की कसा टाळ्यांचा कडकडाट होईल या कल्पनेने सुद्धा मी मोहरून जायचो ! मी कामावर जो भेटेल त्याला आम्ही माजी विद्यार्थी कसे भेटणार याचे रसभरीत वर्णन करत होतो. त्यांना सुद्धा आश्चर्य, कौतुक वाटत होते. तब्बल २८ वर्षानी हा योग येणार होता.

कामावरून थेट मी विरार गाठले. आधी भावाच्या घरी गेलो. त्याला ते रिसॉर्ट माहीत होते तरी ठरल्याप्रमाणे नवापुरच्या तीठ्यावरच त्याला मी सोडायला सांगितले. वेळेआधीच मी तिकडे दाखल झालो व सुनील चुरीला मोबाईलवरून मी आल्याचे उत्साहात सांगितले. तो ही काही मिनिटातच बाइकवरून तिकडे हजर झाला. अर्थात इकडे-तिकडे बघत असल्यामुळेच मी त्याला ओळखले नाहीतर एरवी त्याने मला व मी त्याला ओळखणे कठीणच होते. तो खूपच जाड झाला होता, बाकी चेहर्यात फ़ारसा फ़रक पडला नव्हता. पुढच्या वीस-एक मिनिटात आम्ही दहाजण तिकडे जमलो, बाकीचे परस्परच रीसॉर्टला येणार होते ! मला ओळखयला त्यांना फ़ार वेळ लागला नाही पण मला दरवेळी डोक्याला भलताच ताण द्यावा लागत होता. आम्ही सर्व रीसॉर्टला आलो. बर्याच खुर्च्या हिरवळीवर मांडून ठेवलेल्या होत्या. तिकडे परस्पर आलेल्यांची ओळखपरेड सुद्धा चांगलीच रंगली. बाकि सर्व घरे जवळच असल्याने परस्परांना भेटत असणार, मी मात्र तब्बल २८ वर्षानी त्यांना दिसत असल्याने माझ्या भोवती काही काळ कोंडाळे जमले होते. शाळेत असताना दांडगोबा असलेले आता भलतेच मवाळ झाले होते तर तेव्हा शामळू असलेले अंगापिंडाने चांगलेच भरले होते. कोणाचा केशसंभार उतरणीला लागला होता, कोणाला विगचा आश्रय घ्यावा लागला होता तर कोणाला कलपाचा ! कोणाला टक्क्ल पडले होते, कोणी भरपूर मिशा वाढवल्या होत्या तर कोणी दाढी दीक्षितसुद्धा झाले होते.माझी शाळा सोडल्यानंतरची वाटचाल मी त्यांना कथन केली. सगळ्या मित्रांचे तसे बरेच चालले होते. कोणाची भात गिरण, केळ्याची बाग, फ़ुलबागा असल्याने शिक्षण त्यांनी फ़ारसे सिरीयसली घेतले नव्हते व आपल्या वडीलोपार्जीत व्यवसायात ते छान रूळले होते. काहींनी मात्र डीग्री, डिप्लोमा करून नोकरी, छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले होते. सुनील चुरी स्वत: इलाक्यातला लघुकारखानदार म्हणून फ़ेमस झाला होता. आगाशी सोडलेले मी व विनय ताटके असे दोघेच होतो. विनय माझ्या नेहमीच्या संपर्कातला होता.

इतक्यात एका गाडीतुन विदेशी दारूचे खोके व शीतपेयांचे क्रेट उतरवले गेले. आधी मला वाटले रीसॉर्टवाल्याने मागवले असतील पण ते सर्व आमच्याच मंडळींनी मागवले होते. दारू थंड ठेवण्याचा इंतजाम सुद्धा अगदी चोख होता. मद्यपान कोणी केले तर मला त्याचे वावडे अजिबात नाही पण शिक्षकांसमोर तरी असले प्रकार नको असे वाटून मी सुनील चुरीला शिक्षकांचा सत्कार आधी हो‍उन जाउदे, मग हे बाहेर आणा असे सुचवले तेव्हा तो उडालाच. कोण शिक्षक येणार आहेत ? त्यांचे काय काम इथे ? असे मला त्याने उलटेच विचारले ! अरे मग आपण जमलो कशासाठी ? या प्रश्नावर त्याने ’खाना पिना और मजा करना’ ही त्रिसूत्री सांगितली ! या धक्क्यातुन सावरायला मला बराच वेळ लागला. मी सावरेपर्यंत मद्यपींची मैफ़ल सुरू सुद्धा झाली होती ! माझ्यापुढे सुद्धा चषक केला गेला व मी घेत नाही असे सांगताच एकच गदारोळ उडाला ! बीपीटीत कामाला आणि दारू घेत नाही ? लगेच एकाने मला बीपीटी म्हणजे बेवडा पिउन टाइट असे सुद्धा ऐकवले. तु पित नसलास तरी पुढच्या पार्टीला दारूची सोय तुच करायचीस असाही लाडीक आग्रह झाला.

मी शीतपेय एका ग्लासात भरून सोबत थोडे खारे दाणे घेउन जरा बाजुलाच बसलो. आता इथून सटकणे सुद्धा शक्य नव्हते. तेवढ्यात विनय ताटके आला. तो सुद्धा माझ्याच पंथातला असल्याने शीतपेय घेत घेत एका कोपर्यात आमच्या गप्पा रंगल्या. आम्हाला शिकवणार्या शिक्षकांची सद्यस्थिती मला जाणून घ्यायची होती. इंग्रजी शिकवणार्या बाई अर्धांगवायुने घरीच पडून होत्या, सुतारकाम शिकवणारे चिखलकरसर दारूच्या पार आहारी गेले होते, गणित शिकवणारे चुरीसर अजूनही उदरनिर्वाहासाठी क्लास घेत होते. एनसीसीचे सर सुद्धा आजारपणाने अंथरूणाला खिळलेले होते. कालायतस्मै नम: ! माजी विद्यार्थी संघ नावाला उरला होता पण ८० च्या बॅचची मुले मात्र नियमित भेटतात, शिक्षकांचा आदरसत्कार करतात, कोणी त्यांना आर्थिक , वैद्यकीय मदत सुद्धा करते हे ऐकून मात्र खूप बरे वाटले. केसरी पाटील टूर्सचा संचालक (बहुदा) योगेश पाटील त्याच बॅचचा असल्याने सगळी आर्थिक बाजु तो सांभाळत होता. शेवटी विनय म्हणाला आपली बॅचपण जमते पण नुसती पिण्यासाठी, या वेळी तु येणार असे कळले म्हणून मी आलो, एरवी मी इथे फ़िरकलोही नसतो. पिउन झाल्यावर जेवणाचा का‍र्यक्रम होता पण मेनु सगळा मांसाहारी ! आम्ही दोघे दारू पित नाहीच वर शाकाहारी आहोत हे कळल्यावर परत आमचा प्रेमळ उद्धार झालाच ! रात्री बारा वाजता बाहेर तरी काय मिळणार ? शेवटी त्या रीसॉर्टच्या मालकाने आम्हाला स्वत:च्या घरी नेउन आमटी-भात करून वाढला ! सगळे जेवत असताना मी याच्या पुढे भेटू तेव्हा आपल्या शिक्षकांचा सत्कार करू व आपला एक माजी विद्यार्थी संघ स्थापून गुणवंत मुलांना काही बक्षिस ठेउ असे सुचवताच एकच कल्ला झाला. जो तो आपला आवाज टीपेला लावून सांगू लागला, कशाला ? काय फ़ूकट शिकलो आपण ? त्यांनी काय पगार घेतला नव्हता ? मग कोणाला बेवडा, कोणाला मारकुटा, कोणाला सर्कीट अशी शेलकी विशेषणे देत गुरूजनांचा शब्द-गौरव चालु होताच मी व विनयने परत कोपरा गाठला. सुनील चुरीने मग एक कागद फ़िरवला, सगळ्यांची नावे, मोबाईल नंबर, पत्ते, इमेल तो नोंदवून त्याच्या कॉप्या तो सगळ्यांना पाठवणार होता. त्याने मग ५०० रूपये वर्गणी मागताच मी उडालो. अरे ३०० ठरले होते ना ? या वर जरा बजेट वाढले म्हणून ५०० काढायला लागत आहेत असा खुलासा तयार होताच !

५०० रूपयात मला धड जेवायला सुद्धा मिळाले नव्हते व शाळेत असताना ज्यांना चहासुद्धा माहीत नसेल त्या सोबत्यांनी दारूचे खोके रीचवले होते व मांसाहार हादडला होता. पैशाचे काही दु:ख नाही हो, इतक्या लांबून, इतक्या वर्षानी मी ज्या ओढीने तिकडे आलो होतो, ज्याची कल्पना केली होती त्यातले प्रत्यक्षात काही म्हणजे काहीही उरतले नव्हते. विमनस्क अवस्थेत घर गाठले, चेहरा बघुनच बायकोला काय झाले असेल त्याचा अंदाज आला असावा. “काय झाले ?” असे एका शब्दानेही तिने मला विचारले नाही ! ऑर्कुटचे खाते उघडून बसलो. वडाळ्याच्या शाळेची कम्युनिटी ज्याने काढली होते त्याचा स्क्रॅप आला होता, “We are pleased to announce re-union of our schoolmates …” चला, निराश व्हायचे काही कारण नाही, निदान यावेळी तरी …. !

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २००९

सोमवार, १९ ऑक्टोबर, २००९

वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र

२६ डिसेंबर १९५२ ला स्व. बाळासाहेव देशपांडे यांनी लावलेल्या या छोट्याश्या रोपट्याचे रूपांतर आज प्रचंड वटवृक्षात झालेय !

५८ वर्षापुर्वी बाळासाहेबांनी एक स्वप्न पाहिले होते …

या स्वप्नाला भरभक्कम आधार होता तो या देशाला पुन्हा वैभवशाली बनविण्यासाठी अखंड कार्यरत राहण्याचा संकल्प उराशी बाळगलेल्या एका तेजस्वी राष्ट्रशक्‍तीचा ..

या कार्याला आशिर्वाद होते … स्व. ठक्करबाप्पा व प.पू. श्री. गुरूंजीसारख्या द्रष्ट्या महापुरूषांचे ..

आणि मुख्य म्हणजे त्या मागे होता एक दुर्दम्य विश्वास ..’नर सेवा हीच नारायण सेवा’ हा संस्कार वर्षानुवर्षे मनावर कोरल्या गेलेल्या समाजातील जनशक्‍तीवरचा !

कुठले स्वप्न होते ते ?

आपल्याच समाजाचे .. इथल्या प्राचीन व गौरवशाली परंपरेचे अभिन्न अंग असलेल्या वनवासी बांधवांची सर्वांगीण उन्नती साधून त्याला एवढे सामर्थशाली बनवणे की राष्ट्रउभारणीच्या कार्यातही हा समाज आपले योगदान देऊ शकेल.

एक विशाल दृष्टीकोन घेउन विविध सेवाकार्याच्या माध्यमातून कार्याची सुरवात झाली. शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास, श्रद्धाजागरण, संस्कार इ. विषय घेउन हजारो सेवाप्रकल्प उभे राहिले. या सार्‍या प्रकल्पाच्या माध्यमातुन देशभरातील वनवासी क्षेत्रात एक प्रचंड शक्‍ती निर्माण झाली आहे.

स्व. बाळासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्‍नातील प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात उतरली आहे.

भूतकाळात सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणारा वनवासी समाज आज नव्या तेजाने तळपताना दिसू लागला आहे !

महाराष्ट्रात वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याचा प्रारंभ १९७८ साली झाला.

या ३० वर्षामध्ये केलेल्या कामाचा प्रभाव म्हणून ..

· हजारो सुशिक्षित, सुसंस्कारित व प्रतिष्ठीत वनवासी युवकांची पीढी तयार झाली आहे.

· ’आपल्या समाजाचा विकास आपणच केला पाहिजे’ अशी भावना बाळगणारे शेकडो युवक पुढे येत आहेत.

· वैद्यकीय सेवा व आरोग्यरक्षक योजनेच्या माध्यमातुन लाखो वनवासी बांधवांच्या वेदना दूर झाल्या आहेत.

· श्रद्धाजागरणाच्या कार्यामुळे अराष्ट्रीय कारवायांना जबरदस्त खीळ बसली आहे.

· आपल्या वनवासी बांधवांची उन्नती करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असा विचार करून समर्पितपणे कार्य करणारे हजारो नगरीय कार्यकर्ते तयार झाले आहेत.

· एकलव्य खेलकुद स्पर्धेमुळे वनवासी क्षेत्रातील हजारो ’एकलव्यांचे’ प्रगटीकरण झाले आहे.

· वनवासी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातुन उद्योग-व्यवसाय प्रारंभ करून आपल्या कुटुंबाचा व गावाचा आर्थिक विकासा साधण्यात यश मिळवले आहे.

गेल्या ३० वर्षामधील महाराष्ट्राची वाटचाल प्रेरणादायक असली तरी वनवासी क्षेत्रात अद्यापही समस्यांचा महाकाय डोंगर उभा आहे. पुर्बीची आव्हाने तर आहेतच, पण त्यात काळानुरूप नव्याने भर पडत आहे. या सार्‍या समस्यांचा सामना करून वनवासी समाजाला अधिक शक्‍तीशाली बनवण्याचे कार्य आपण सर्वाना मिळून पूर्ण करायचे आहे.

आतापर्यंतची वाटचाल हजारो हातांच्या बळावर शक्य झाली पण या क्षेत्रातील समस्या पाहता आता लाखो हातांची आवश्यकता भासणार आहे.

या कार्यात आपण तन-मन-धनाने सहभागी व्हावे असे आमचे विनम्र आवाहन आहे.

महाराष्ट्र राज्य सद्यस्थिती (जून २००९ )

शैक्षणिक प्रकल्प

वसतिगृहे १९

प्राथमिक शाळा २

माध्यमिक शाळा २

बाल संस्कार केंद्रे १२

लाभार्थी १,६००

आर्थिक विकास प्रकल्प

औद्योगिक शिक्षण केंद्र २८

शेतकी प्रकल्प ४

बचत गट ५५८

लाभार्थी १६,०००

आरोग्य प्रकल्प

साप्ताहिक आरोग्य केंद्रे ४

दैनिक केंद्रे १

आरोग्य रक्षक ५८६

लाभार्थी ४,००,०००

खेलकूद केंद्रे १५

श्रद्धा जागरण केंद्रे ६०

एकूण प्रकल्प १,१२३

पूर्णवेळ कार्यकर्ते ८१ ( पुरूष ६५, महिला १६)

ग्राम समिती २१८

महिला समिती ६५

यापैकी आपण नक्कीच काहीतरी करू शकाल

· रू. १५,०००/- ३० विद्यार्थांच्या वसतिगृहाचा एका महिन्याचा खर्च.

· रू, ५०००/- वार्षिक देणगी देउन एका वनवासी विद्यार्थाचे पालकत्व.

· शुभप्रसंगी व प्रियजनांच्या आठवणीप्रीत्यर्थ प्रासंगिक देणगी.

· आश्रमाच्या कार्यासाठी वेळ.

· आश्रमाच्या वैद्यकीय केंद्रासाठी औषध संकलनास मदत.

· वनवासी परिसरात सांस्कृतिक भवन उभारणीस सहाय्य-सहभाग.

· कल्याण आश्रमाच्या केंद्रास नियमित/प्रासंगिक भेटी.

· वनवासी कलेस प्रोत्साहन – दिवाळी भेटकार्डे, दिनदर्शिका व राख्या विकत घ्याव्यात.

· वस्तुरूप देणगी – शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेशाचे कापड व अन्य शालेय साहित्य, धान्य, अन्य मदत.

· एका आरोग्यरक्षकाचा वर्षाचा खर्च रू. ५०००/-

सर्व देणग्या आयकराच्या ८०जी कलमाखाली सवलतीस पात्र आहेत. चेक वा ड्राफ्ट “वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र” या नावाने काढावा.

प्रांत कार्यालय : १५, कृषिनगर, महाविद्यालय मार्ग,

नाशिक ४२२ ००५.

दूरध्वनी ०२५३-२५७७ ४९१, ०२५३-२५८२ ४२९

पनवेल कार्यालय : द्वारा – श्री. उदय टिळक, यशोगंगा सोसायटी,

पहिला मजला,६४५, टिळक रोड, पनवेल – ४१० २०६.

दूरध्वनी – ०२२-२७४५ ६८२४

रविवार, १८ ऑक्टोबर, २००९

महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्था – भाउबीज नवती.

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे हे या संस्थचे संस्थापक ! १८९६ साली महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेची स्थापना झाली. तब्बल ११२ वर्षाच्या या संस्थेच्या पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी, नागपूर येथे शाखा आहेत.

पुर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, इंजिनियरींग कॉलेज, आर्कीटेक्ट, आय.टी., फ़ॅशन डिझायनिंग, नस्रिग कॉलेज इत्यादी अभ्यासक्रम केवळ मुलींसाठी संस्थेत राबवले जातात.

नोकरी करणार्या स्त्रियांसाठी पुण्यात वसतिगृह असून वृद्ध स्त्रियांसाठी वृद्धाश्रम देखिल आहेत. संस्थेच्या बेकरी मध्ये गरजू स्त्रियांना कमवा वस शिका या तत्वावर काम दिले जाते. या आर्थिक मदतीमुळे त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात.

संस्थेची आगळी-वेगळी वैशिष्ट्ये -

· स्त्रियांवरील अन्याय, कालबाह्य रूढी व सामाजिक विषमतेविरूद्ध निर्भीड ठोस उपाययोजना करणारी भारतातीला आद्य संस्था.

· स्त्री-स्वातंत्र्य व तिची अस्मिता जागविण्यासाठी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, प्रचार व प्रत्यक्ष आचरण करणारी दू्रदृष्टीची, पुरोगामी व एकमेव संस्था.

· १९१६ साली स्त्रियांसाठी विद्यापीठ उभारणारी पहिली संस्था.

· विविध शाखांमधून सर्व जाती जमातींच्या सुमारे २५,००० विद्यार्थिने शिकत आहेत.

· ३००० विद्यार्थिनी, त्यातही निम्म्या ग्रामीण भागातुन आलेल्या मुलींसाठी वसतिगृह.

संस्थेच्या या कार्याला आर्थिक मदत मिळावी म्हणून संस्थेचे कल्पक आजन्म सेवक कै. गो.म. चिपळूणकर यांनी ९० वर्षापुर्वी भाउबीज निधी संकलन योजनेची सुरवात केली. आपली भाउबीज संस्थेच्या स्वयंसेवकांकडे चेक अथावा रोखीत आपण देउ शकता. रूपये ५०० वा त्यापेक्षा जास्त देणगेसाठी आयकरात ५० % सूट मिळू शकते. सवडीनुसार एकदा संस्थेत जाउन आपण कामाची प्रत्यक्ष खात्री करू शकता. मी स्वत: या संस्थेला दहा वर्षापुर्वी एकरकमी ५००० रूपये देणगी म्हणून दिले होते व मग दरवर्षी ५०० रूपयाची भाउबीज पाठवत आहे.

उद्याच भाउबीज आहे ते लक्षात आहे ना ?

संस्थेचा पत्ता

सचिव – रविंद्र देशपांडे

कुंदा नेने - कार्याध्यक्षा, भाउबीज भेट मंडळ

कर्वेनगर, पुणे – ४११ ०५२

फोन नंबर ०२०-२५४७ १९६७ , ०२० - २५४७८९७५

शनिवार, १७ ऑक्टोबर, २००९

दिवाळी

नगरातील सदनातुन लखलखती लाख दिवे

क्षणभर की स्थिर झाले उल्कांचे दिव्य थवे

बघ वरती बघ धरती तेज:कण थरथरती

पुरूषार्थी मनुजाने निर्मियले गगन नवे

व्यर्थ तुझा यत्न नरा, जग ऐसे उजळाया

मिणमिणत्या शतपणत्या जातील पण त्या वाया

भवतीच्या तिमिरास्तव उपचार न हा वास्तव

अंतरिची ज्योत जरा उजळ जगा जगवाया

कोणाच्या ह्रदयातुन प्रेमाची ज्योत जळे

द्वेषाच्या वणव्यातुन मानवता होरपळे

हे येशु हे बुद्धा पाहुनिया या युद्धा

शांतीच्या वेदांचे वैफ़ल्य न काय कळे

देखाव्या दाही दिशा, दु:खाचा नाद उठे

जळती जरी दीप शते, तेजाचे नाव कोठे ?

अशुभा ही शुभ रजनी, जागृति ना अजुनी जनी

युद्धाच्या अंतातुन युद्धाचे बीज फ़ुटे

आक्रंदति आक्रोशती शोकाने भुवी भुवने

आनंदाने सौख्याची गाउ कशी नव कवने ?

प्रेमाविण विश्व झुरे शांतिचे नाव नुरे

तोवरी हे मंगलदिन जातिल जावोत सुने

कविवर्य वसंत बापटांची ही एक गाजलेली कविता. कालावधी माहीत नाही पण माझ्या वडीलांनी १९५४ साली ती कॉलेजच्या स्नेहसंमेलनात सादर केली होती ! कदाचित दुसर्या महायुद्धाच्या वेळची असावी. आज एवढी वर्षे उलटली तरी तिच्यातला अर्थ कोठेतरी आत अस्वस्थ करतो. त्यात जी शब्दरचना आहे ती सुद्धा अगदी सहज स्फ़ुरल्यासारखी आहे. अनुप्रासाचा अट्टाहास कोठेही नाही. ऐन दिवाळीत बापटांनी ही कविता जेव्हा सादर केली असेल तेव्हा किती गडबड उडाली असेल नाही ?

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

जुनी सायकल आहे का?

जागोजागी भंगारात पडलेल्या सायकलींचं रिपेअरिंग करून त्या आदिवासी पाड्यांतल्या मुलांना देण्याचा नवा प्रयोग 'त्या' तिघांनी यशस्वी केलाय.
गाडी शिकण्याचं पहिलं पाऊल म्हणजे सायकल. काही वर्षं सायकल तांबडल्यानंतर तिची जागा 'टू व्हिलर' घेते. इथेच सायकलचा 'वनवास' सुरू होतो, तो कायमचाच. म्हणूनच प्रत्येक घरात,सोसायटीत अशी मान मोडून पडलेली एखादी सायकल असतेच. या उलट चित्र आदिवासी पाड्यांमधलं. नशिबी दारिद्य आल्यामुळे शिक्षणासाठी पाच-पाच किलोमीटरचं अंतर पायी तुडवत ही मुलं रोज शाळेत जातात.

त्यांचे हे कष्ट कमी करण्याची प्राथमिक गरज भागवण्यातही आपण कमी पडलेलो. इतका विरोधाभास. दोघांतली हीच गॅप ओळखून 'ते' तिघे एकत्र आले, आणि त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. भंगार सायकलींचं 'सोनं' करून त्या गरजू आदिवासी मुलांना वाटण्याचा प्रयोग.
विक्रमगड, वाडा यांसारख्या आदिवासी भागात लांबलांबच्या पाड्यांतून मुलं शिकण्यासाठी गावच्या शाळेत येतात. ६ ते १६ वयोगटातल्या या कोवळ्या मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी रोजची २ ते ७ किमीची पायपीट करावी लागते. एसटीची सोय आहे, पण रोजचं ६ रुपये भाडं परवडत नाही.

आदिवासी भागातील ही वस्तुस्थिती हेमंत छाबरा आणि त्यांची पत्नी संगीता यांनी पाहिली. या मुलांसाठी काहीतरी करायला हवं, असा विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागला. सिमोना टेरन या आपल्या आणखी एका मैत्रिणीकडे त्यांनी हा विचार मांडला आणि या तिघांना एक नामी कल्पना सुचली.
मुंबईसारख्या शहरात जुन्या, मोडक्या सायकली भंगारात पडून असतात. या सायकलींची डागडुजी करून गावातल्या मुलांसाठी द्यायच्या, अशी ही कल्पना. त्यांनी आपल्या ओळखीपाळखीच्या मित्रांना फोन केले, ई-मेल धाडले आणि जवळपास ६८ मोडक्या सायकली गोळा केल्या. स्वत:च्या खर्चाने त्या रिपेअर केल्या आणि प्रजासत्ताक दिनी अलोणे गावातील श्री बिनोई घरडे विद्यालयातल्या गरजू ६८ आदिवासी मुलांना या सायकलींचं वाटप करण्यात आलं. खरं तर या शाळेतल्या १३७ मुलांना सायकलची गरज आहे, असं शाळेने कळवलं होतं. आता उरलेल्या सायकली गोळा करण्यासाठी 'दि बायसिकल प्रोजेक्ट' ही चळवळच या ग्रुपने सुरू केलीय.
एका सायकलीचं रिपेअरिंग करण्यासाठी साधारण ४०० रुपये खर्च येतो. 'सध्या आम्ही काही मित्रमंडळी आमच्याच खिशातून तो खर्च करतोय', असं हॉटेल व्यावसायिक असलेले हेमंत छाबरा सांगतात. लोकांना भंगारातल्या सायकलची किंमत नसते. पण, आदिवासी मुलांसाठी अशी सायकल म्हणजे मर्सिडीजच. सायकल मिळाल्यानंतर मुलांच्या चेह-यावर जे भाव उमटले त्याला तोड नाही, असंही छाबरा यांनी सांगितलं.
केवळ अलोणेच नव्हे, तर आदिवासी खेड्यांमधे किमान १ लाख सायकल्स वाटण्याचं या ग्रुपचं उद्दिष्ट आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी आम्ही सध्या दि बायसिकल प्रोजेक्ट नावाची चळवळच सुरु केली असून, या नावाने आम्ही लवकरच एनजीओ रजिस्टर करणार आहोत, असं सिमोना टेरन यांनी स्पष्ट केलं.
तुम्हीही उचला खारीचा वाटा भंगार सायकलींचं सोनं करण्याच्या या प्रोजेक्टमधे आपणही खारीचा वाटा उचलू शकतो. त्यासाठी हेमंत छाबरा यांना ९८२०१४९०२२ यावर फोन करायचा किंवा thebicycleproject@gmail.com या पत्त्यावर इ-मेल पाठवायचा. स्वयंसेवक तुमच्या घरी येऊन जुनी सायकल घेऊन जातील. या रिपेअरिंगचा खर्च देण्याची तुमची तयारी असेल तरीही तुमचं स्वागतच होईल.

रविवार, ४ ऑक्टोबर, २००९

व्हेज पाणपोई !

साधारण ८ वर्षापुर्वी आम्ही जेव्हा नवीन पनवेलला रहायला आलो तेव्हा इथे अगदी सिमेंटचे जंगलच होते. अनेक भागात बांधकामे जोरात चालू होती, रस्ते, फ़ूटपाथ यांचा पत्ताच नव्हता. झाडे तर जवळपास नव्हतीच. उन्हाचा तडाखा पण जबरदस्त असायचा. दूपारच्या वेळी तर घरच्या गच्चीवर पाय ठेवता येत नसे. एरवी सगळीकडे आढळणारे चिमणी, कावळा, सांळूकी हे पक्षी सुद्धा अभावानेच दर्शन देत. आम्ही गच्चीवर काही रोपे लावली होती. डोळ्याना तेवढीच हिरवळ दृष्टीस पडे. असेच एकदा पेपरात वाचले की पक्षांना जर पाणी मिळाले / दिसले तरी त्या भागात त्यांचा वावर वाढतो व ज्यांच्या घराला गच्ची आहे त्यांनी निदान उन्हाळयात तरी भांड्यात पाणी भरून ठेवावे, तेवढेच भूतदयेचे पुण्य लाभेल. लगेच एका पसरट भांड्यात पाणी भरून ते छताला टांगून ठेवू लागलो. पण पक्षांना जणू त्या पाणपोयीवर बहीष्कार टाकला. बाष्पीभवनाने जेवढे पाणी वाफ़ हो़उन जात असे तेवढेच संपे ! काही काळाने पाणी नाही पण सगळ्यांचा उत्साह मात्र ’आटला’.

मग पुन्हा वाचण्यात आले की पाणी टांगून ठेउ नये, ते खाली ठेवावे. उन्हाळ्यात एक मातीचे मडके आणले होते व ते ठेवायला तिवई पण करून घेतली होती. मग त्याचीच पाणपोई चालू केली. पण एखाद दूसरी चिमणी सोडता तिकडेही कोणी पक्षी फ़ारसे फ़िरकत नसत. एकदा त्या माठात पाणी भरत असताना तो मधोमध फ़ूटला व त्याचे दोन तूकडे झाले. खालच्या पसरट भागात पाणी भरून ठेवण्यात आले आणि काय आश्चर्य, पाणपोई कडे अनेक पक्षी आकर्षित हो़उ लागले ! मडक्याच्या काठावर बसून सावधपणे इकडे तिकडे नजर टाकत आपली इवलिशी चोच पाण्यात बुडवुन , शुधा-शांति झाल्यावर आनंदाने चित्कार करून ते आकाशात भरारी घेउ लागले ! विविध पक्षांचे निरीक्षण करणे हा मुलांचा एक छंदच झाला. सकाळी माठ पाण्याने भरत असतानाच पक्षी आसपास हुंदडू लागत व पाण्याने भरून तो जागेवर ठेवताच त्या माठावर हल्ला-बोल करत. अर्थात यात बळी तो कान पिळी असेच चालायचे. चिमणीला साळूंकी हाकलायची तर साळूंकीला कावळा पिटाळायचा, कावळ्याला कबुतरे हुसकावून लावायची. एकदा तर एक भली मोठी घार पंख पसरवुन तिकडे उतरली व संचारबंदी असल्यासारखे बाकी सगळे पक्षी पार पसार झाले. एरवी कधीही न बघितलेले पक्षी सुद्धा वर्दी देउ लागले, ते बहुदा स्थलांतरीत असावेत. मध्येच केव्हातरी पोपटांचा थवाच उतरला होता. काही पक्षी तर रात्री येउन तहान शमवून जायचे. बाजुला असलेल्या कुंड्यावर पण त्यांची नजर जायचीच. कधी कोवळी पाने, जास्वंदीच्या कळ्या, पानावरच्या अळ्या पण त्यांना मटकावायला मिळू लागल्या ! काही महीने छान गेले आणि मग मात्र उपद्रव चालू झाला.

सगळ्यात घाणेरडा पक्षी म्हणजे कबुतर ! गच्चीचे सगळे कठडे ती घाण करून ठेवीत. रोज ते साफ़ करून बायको एकदा वैतागली व बंद कर ही भूतदया नाहीतर ही सफ़ाई तू कर अशी निर्वाणीची भाषा तिने केली. मग एक एक करत कठडे साफ़ करणे, गच्चीतला कचरा काढणे, मडके साफ़ करून भरून ठेवणे, झाडांना पाणी घालणे ही सर्वच कामे माझ्या गळ्यात मारली गेली. पण हे एवढ्यावर थांबणार नव्हते. एके दिवशी मुलांनी तक्रारीचा पाढा वाचला. कबुतरे त्याच पाण्यात आंघोळ करतात, त्यामुळे बाकी पक्ष्यांना ते घाणेरडे पाणी प्यावे लागते. लहान पक्षांना पाणी पिउ देत नाहीत, पाण्याची नासाडी करतात. मग करायचे काय ? असे मी त्यांना विचारले तेव्हा सगळ्या पक्षांना वेळा ठरवून द्यायच्या असे त्यांनी सूचवले. अरे पण त्यांना हे कसे कळणार यावर बालसुलभ उत्तर आले तिकडे एक बोर्ड लावून ठेवायचा ! बरे, काय लिहायचे बोर्डावर ? लगेच मसुदा ठरला – मराठे पक्षी पाण-पोईचे नियम - १) पाणी शिस्तीत प्यायचे, नासाडी न करता २) दादागिरी करायची नाही ३) आपापल्या वेळेतच पाणी प्यायला यायचे, घुसखोरी करायची नाही ४) कुंड्यातल्या झाडांचे नुकसान करायचे नाही ५) कठड्यावर घाण करू नये – बरे – मी हसत हसत त्याला होकार दिला तेव्हा छोटया प्रियांकाने अजून एक मुद्दा सांगितला की पक्षांनी एकमेकांच्या अंगावर बसायचे नाही हे पण लिही रे बाबा ! भरपूर जागा असताना मध्येच एक-दूसर्याच्या अंगावर बसून त्याला त्रास देतात ! या वर अधिक चर्चा नको म्हणून आम्ही दोघे लगेच घरात पळालो !

काही दिवस शांततेत गेले आणि एका कावळ्याने उपद्रव चालु केला. काही दिवस पोळीचा तूकडा तो त्यात टाकून ठेवायचा. मग पावाच्या तूकड्यावर प्रयोग चालू झाला, आणि मग -- . मी घरी आल्यावर वातावरण एकदम तंग वाटले. मुले कानात कुजबुजली, आईने पाण-पोई बंद केली. माठ फ़ोडून टाकला, खूप चिडली आहे ! गच्चीत जाउन बघतो तर काय, पाणपोईच्या तिकडे कोणत्याच खुणा नव्हत्या ! ही तणतणत बाहेर आली होतीच. मी विचारले एवढे काय झाले चिडायला ? अरे, तो घाणेरडा कावळा, भलताच सोकावला होता, आधी त्याने पोळी पाण्यात टाकून बघितली, मग पाव आणि काल त्याने मच्छीचा एक तूकडात त्या माठात बुडवुन ठेवला होता. माठ साफ़ करताना तो बघूनच मला उलटी झाली ! बस झाले त्यांचे लाड ! आजपासून हे थेर बंद ! आमची ही म्हणजे भलतेच कर्मठ प्रस्थ ! हीच्या व्हेज हॉटेल मध्येच जेवायच्या हट्टाने एकदा आम्हाला साउथ मध्ये उपाशी रहावे लागले होते ! मांसाहारी वस्तूचे दर्शन झाले तरी हीला मळमळते ! पाण्यात मच्छीचा अख्खा तूकडा बघून हीची दूसरी कोणती प्रतिक्रीया अपेक्षितच नव्हती ! खरे तर मला पुढे काय घडणार याचा अंदाज आला होताच ! सवयीने पक्षी अजूनही गच्चीत घुटमळतात, झाडांना घातलेले पाणी फ़रशीवर पडते त्यात नाईलाजाने आपली चोच बुडवतात. गेले ते दिन गेले असा भाव त्यांच्या डोळ्यात असतो ! त्यांना कसे कळावे बरे की ही चांगली चाललेली व्हेज पाणपोई त्या नादान नॉन-व्हेज खाणार्या कावळ्यामुळे बंद पडली ते ?