शनिवार, १३ डिसेंबर, २००८

मराठे चौथर्याचे रहस्य.

हिंदू समाजातील ब्राह्मणवर्गाची उपासना ही मुख्यत: वेदाधीष्ठीत अशी होती. किंबुहना ’वर्णानां ब्राह्मणो गुरू:’, म्हणजे सर्व वर्णात ब्राह्मण हा गुरूस्थानी होता. निरनिराळ्या कालखंडात समाजात अनेक स्थित्यंतरे झाली. परीणामत: ब्राह्मणवर्गाचाही अध:पात झाला. त्याच्या उपजीवनाचे साधन म्हणून असेलेल ज्ञानदान आणि आपतकालीना भीक्षा वृत्ती या सुद्धा धोक्यात आल्या. अशावेळी समाजातील सामान्य माणसाप्रमाणे त्याला आपला जीवन निर्वाह करावा लागला. अति दूर अंतरावर ग्रामीण जीवनापासून वेगळा राहुन जगणार ब्राह्मण राजाश्रयाअभावी ग्रामीण जीवनात येउ लागला. साहजिकच त्याला त्या समाजाशी जवळीक ठेवण्यासाठी त्यांच्या उपासना पद्धती अपरीहार्य पणे स्वीकाराव्या लागल्या. या संबंधात, समर्थानी, दासबोधात ही व्यथा व्यक्त केली आहे. ’ब्राह्मणास ग्रामीणीने बुडविले, अन्न मिळेन ऐसे झाले, आपुल्या प्रचीतीस आले किंवा नाही असे विचारून ते म्हणतात , ’आम्हीही तेचि ब्राह्मण, वडील गेले ग्रामीणी करून , आम्हा भोवते’

अशाच एका कालखंडात, ब्राह्मणांनी आप्ले नित्यकर्म करत असता, आपल्या उपासनेला, ग्रामीण देव-देवतांची, उपासना जोडून घेतली. अति प्राचीन काळी, कुलदेवता नावाची देवता होती की नाही हा संशोधनाचा विषय आहे. या संबंधात, एक ज्येष्ठ विचारवंत असे म्हणतात की ब्राह्मणांना गायत्रीशिवाय अन्य कोणत्याही देवतेची गरज नाही. गायत्रीचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळॆ आजही शोडश संस्कारापैकी उपनयन म्हणजे मुंज आणि विवाह हे दोनच संस्कार तग धरून राहीले आहेत. वास्तविक ते तसे अर्थहीन झाले आहेत. आज केल्या जाणार्या उपासनांना वैदीकांची शास्त्रनिष्ठ ज्ञानाची चौकट राहीलेली नाही. आजचा समाज स्वार्थासाठी कुणाचेही नामस्मरण करून मुह मे राम और बगल मे छुरी असा व्यवहार करताना दिसतो.

कुलस्वामीनी संबंधीच्या अज्ञानामुळे कुलाच्या उत्कर्षास बाधा येते असे आजकाल सर्वत्र मानले जाते. आजच्या काळातही, प्रत्येक हिंदू आपली कुलस्वामिनी आणि कुलदेव यांचे स्मरण ठेवतो वत्याची नित्यनैमित्तिक पूजा-अर्चा करीत असतो. अर्थात यातुन ब्राह्मणही सूटलेला नाही. आजही एखाद्या मंगल कार्याच्या आरंभी आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून , विडा-सुपारी ठेवावी लागते. असे असले तरी, आजही, कितीतरी ब्राह्मण कुलाना आपल्या कुलदेवतेचे विस्मरण झाले आहे.

अशा स्थितीत मराठे कुलवृत्तांतात कोकणस्थांच्या अनेक कुलस्वामिनी दिलेल्या आहेत. त्यात प्रत्येक कुलाची कुलस्वामिनी वेगळीही दिलेली आहे. कपिकुलामध्ये एकूण एकोणपन्नास कुले ज्ञात आहेत. त्या पैकी आमच्या मराठेकुळाची कुलस्वामिनी कोण हे निश्चित माहीत नव्हते. ते ज्ञान व्हावे म्हणून मी कुलस्वामिनीचा बोध व्हावा म्हणून एका वि्शिष्ट पद्धतीने देवतेला उपासना करून या संबंधि मार्गदर्शन मिळावे अशी प्रार्थना केली. परीणामत: थोड्याच काळात स्वप्न व अन्य दृष्टांताने मला माझ्या कुलस्वामिनीचा बोध झाला. या प्रसंगात, एका विशिष्ट क्षणी कृपाछत्र ही कविता मला स्फ़ुरली. ती कृपाछत्र या कविता संग्रहात दिली आहे.

श्रावण महीन्यातील सकाळची आठ-साडे आठची वेळ. मेट्रो सिनेमाकडून मी धोबीतलावच्या रस्त्याने जात असता, रीमझीम पाउस पडत होता, एक दहा-बार वर्षाची मुलगी हातात लेडीज छत्री घेउन येत असताना समोर दिसली. तिला पहाताच, कृपाछत्र ही कविता स्फ़ुरली ती अशी,

कृपा-छत्र गे उघडी शिरी ते
मिटूनी असे का धरीसी करी ते ॥धृ॥
कमल-नेत्र तव बघण्या आई
धावत आलो करूनी घाई
परी मीटसी का कमलनेत्र ते
खाली करीसी अन अभय कराते ॥१॥
दूर बहू मी तुजला सोडून
गेलो आई नावही विसरून
अंगाराची वृष्टी वरती
त्रिविध तापी या त्रेधा उडाते ॥२॥
तूच ठेविले नाव मुलाला
तुलाच का गे विसरच पडला
पोटापाठी वणवण फ़िरता
कसे आठवू तव नामा ते ॥३॥
पाठी घालशिल ना गे माते
विसरून माझ्या अपराधाते
करूणा धन ती हसते म्हणते
’पहा वरी रे छत्र शिरी ते” ॥४॥


कुलस्वामिनीचा बोध झाल्यावर त्या स्थानास जाण्याच्या उद्देशाने ए्के दिवशी, मी राजापुरवरून आडीवर्याच्या दिशने प्रयाण केले. तिथे गेल्यावर मी, महाकाली देवस्थानात गेलो आणि देवीचे दर्शन घेतले. नवीनच असल्यामुळे मला काहीच माहीती नव्हती. जवळपास विशेष घरेही नाहीत. म्हणून चौकशी केल्यावर थोड्या दूर अंतरावर काही ब्राह्मणांची घरे आहेत असे कळले. सहज ज्यांच्याकडे मी गेलो, ते श्री. रानडे, महाकालीचे नैवैद्य अधिकारी होते. त्यांनी मला थोडी माहीती दिली आणि अभिषेक आणि महाप्रसाद अशी सेवा करता येइल असे सांगितले. दूसर्या दिवशी त्यांनी त्या दोन्हीही गोष्टी पुर्या करून मला देवीचा महाप्रसाद व तीचा फ़ोटो दिला. थोडीशी विश्रांती घेउन मी माझ्या घरी आलो आणि देवीच्या फ़ोटोची देवघरात स्थापना करून तीचे नित्यस्मरण करू लागलो. परीणामत: माझ्या मार्गातील अनेक अडचणी हळूहळू कमी होत गेल्या. अनुभव आल्यामुळे माझी देवीवरीला श्रद्धा वाढली. मी नवरात्रानिमित्त पतिवर्षी काही पैसे देवस्थानाकडे सेवेसाठी पाठवू लागलो. मध्यंतरीच्या काळात तिथे माझे काहीवेळा सह्कुटुंब जाणेही झाले. या सर्व घडामोडी तिथे एक गोष्ट मला सतत रहस्यमय वाटत राहीली. ती म्हणजे तिथे दाखवला जाणारा ’मराठ्यांचा चौथरा’. प्रत्यक्ष पाहीले तर हा चौथरा आज एखाद्या मोठ्या वाड्याच्या चौथर्यासारखा दिसतो, परंतु या गावात एकही मराठे आडणावाच्या व्यक्तीचे घर नाही. अशा स्थितीत, एक जिज्ञानासा म्हणून मी हा प्रश्न, अनेक मान्यवर व्यक्तींसमोर उपस्थित केला. परंतु याबाबतीत कोणीही बोलण्याचे धैर्यही दाखवत नाही. प्रसिद्ध गायिका, अनुराधा मराठे या, मराठ्यांच्या कुलवृत्तातील ३४ व्या घराण्याच्या आहेत, त्यांच्याशी पत्रव्यवहार केला पण उत्तर मिळाले नाही.

अधिक चौकशीत असे लक्षात आले की मराठे जवळच्या एका गावी रहायला गेले. त्यांच्याशी संपर्क साधल्यास यावर काही प्रकाश पडू शकेल. या एकाकी प्रयत्नात मला अपेक्षित यश आले नाही. देवस्थानांच्या इतिहासातील काही तज्ञ व्यक्तींची ’कोकणातील देवस्थाने’ अशा अर्थाचे पुस्तक लिहीले आहे. पण त्यात सुद्धा ही माहीती मिळत नाही. जिज्ञासूंनी लक्ष घालून माहीती उपलब्ध करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: