शनिवार, १३ डिसेंबर, २००८

निर्मळचे शंकराचार्य.

काही वर्षापुर्वी कोल्हापुरच्या शांकरपीठाचे शंकाराचार्य श्रीमत शंकर विद्याभारती हे वस‌ई परीसरात चार दिवस पाद्यपूजेसाठी आले होते. विरारचे सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. वामनराव सामंत (आप्पा सामंत) यांनी विश्व हिंदू परीषदेच्या वतीने त्यांचा दौरा आयोजित केला होता. या दौर्यात माझे वडील ज.गो. मराठे हे त्याच्या बरोबर चार दिवस होते. ज्या ज्या ठीकाणी त्यांचा सत्कार झाला त्या त्या ठीकाणी त्यांनी श्रीमत दासबोधाबद्दल माहीती दे‌उन, तो विषेशत: तरूणानी वाचावा असा प्रचार केला. त्यांच्या सोबत विश्व हिदू परीषदेचे एक प्रसिद्ध कार्यकर्ते होते. त्या प्रवासात त्यानी निर्मळ क्षेत्राच्या शंकराचार्यांबद्दल माहीती विचारली. तेव्हा, गाडीमध्येच त्यांनी त्या बद्दलची सविस्तर माहीती त्यांना ऐकवली. पुढे त्यांनी ती शब्दबद्ध करून त्यांना दाखवली व ही माहीती शंकराचार्यांच्या पीठाने प्रसिद्ध करावी यासाठी पीठाकडे पाठवली. या सबंधीची पुस्तके पीठाने प्रसिद्ध केल्यास तीला अधिकृतता ये‌इल असा त्या मागचा हेतू होता.
वस‌ईचे एक सुप्रसिद्ध इतिहास संशोधक श्री. रा.बा.जोशी त्यांना त्याची एक प्रत दिली. पुढे या संबधी काही हालचाल झाली नाही. मग शंकराचार्य यांनी ती माहीती खालील प्रमाणे दिली होती ती अशी,
शृंगेरी पीठाचे शंकराचार्य विद्यारण्य स्वामी, हे पीठावर असताना, त्यांच्या वृद्धापकाळात आपला उत्तराधिकारी म्हणून श्री गोसावी यांची नियुक्ती केली. त्या नंतर गुरूची आज्ञेने तीर्थ यात्रेसाठी निघाले. हिमालयातील यात्रा करून झाल्यावर ते , हिमालयातील ज्या गुहेत आद्य शंकराचार्यांनी प्रवेष केला होता, त्या गुहेजवळ आले आणि त्यांना त्या गुहेत प्रवेष करण्याची प्रेरणा झाली. त्यांनी आपल्या बरोबरच्या अंतेवासींना काही मुदत दे‌उन , तेवढ्या काळात मी आलो नाही तर आपण परत जा अशी आज्ञा दिली. दिलेल्या वेळेपर्यंत वाट पाहुन ते शिष्य परत शृंगेरीला गेले आणि त्यांनी हा वृतांत पीठस्थ विद्यारण्य स्वामीना सांगितला. विद्यारण्या स्वामीची प्रकृती खालावत चालली होती व अधिकृत घोषणा झालेले शंकराचार्य उपस्थित नाहीत असे पाहुन त्यांनी दुसर्या एका शिष्याची निवड केली व ते पुढे शंकाराचार्य झाले. पुढे गोसावी हिमालयातून निघाले व थोडयाच काळात शृगेरीजवळ आले. त्या वेळी त्यांना शृगेरी पीठावर शंकराचार्यांची निवड झाली आहे असे कळेले. तेव्हा शृगेरीला न जाता कोल्हापुरच्या जवळच असलेल्या () एका ठीकाणी आपली स्वतंत्र गादी स्थापन केली. आणि त्या पीठामधून धर्मप्रचाराची सुरवात केली. आणि त्याचीच एक उप-पीठ म्हणून कोल्हापुरचा शांकरमठाची स्थापना झाली. शंकराचार्य गोसावी फ़िरत फ़िरत वस‌ईच्या निर्मळ क्षेत्री आले व तिथेच त्यांनी समाधि घेतली. त्या टेकडीवर फ़ार मोठे जंगल वाढले. पुढे पेशव्यांनी वस‌ईची मोहीम यशस्वी केल्यानंतर ही जागा, साफ़सफ़ा‌ई करताना सापडली. पुढे ती जागा आद्य-शंकराचार्यांची समाधि म्हणून प्रसिद्धीला आली. पेशव्यांनी त्यानंतर त्या ठीकाणी आज असलेले मंदीर बांधून पूजा-अर्चेची व्यवस्था केली. आज हे निर्मळ क्षेत्र, आद्य शंकराचार्यांचे समाधिस्थळ म्हणून मानले जाते. आता विश्व हिंदू परीषदेने, प्रतिवर्षी होत असलेल्या यात्रेला विषेश रूप दिले आहे. ही समाधि आद्य शंकराचार्यांची नसूनही तसे सांगितले जाते, त्याचे कारण, शृगेरी पीठाचे नियुक्त शंकराचार्य ही हिमालयातील आद्य शंकराचार्यांच्या गुहेतुन आले असल्यामुळे तसा प्रवाद निर्माण झाला. अजून एक समज असा आहे की शंकराचार्यांना एक शाप होता की तुझी समाधि कंटकवनात हो‌ईल. योगायोगाने या परीसरात काटेरी झुडपे वाढलेली होती त्या मुळॆही या समजाला बळकटी मिळाली. या संबंधात अधिक संशोधनाची गरज आहे. आपली धर्मपीठे या सबंधात कमालीची उदासीनता दाखवतात हे ही आपल्या लक्षात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: