रविवार, ६ सप्टेंबर, २००९

पन्नास रूपयाची उसनवारी !

मी –

सकाळी ८:२४ ची लोकल दहा मिनिटे आधीच लागलेली होती. स्वाइन फ़्लुचा धसका व त्यातच गणपतीसाठी गावाला गेलेले चाकरमानी यामुळे गर्दी नव्हतीच. मस्त खिडकिजवळची जागा मिळाली. नेहमीचे दिसणारे चेहरे सगळ्या कोपर्यात पांगलेले होते. तेवढ्यात एक तरूण धावत धावत, धापा टाकत नेमका माझ्यासमोर आला. पन्नास रूपये ताबडतोब द्या, प्लीज, खूप घाई आहे ! मी पण कोण, कोठला याचा काहीही विचार न करता त्याच्या हातावर पन्नासची नोट टेकवली. आला तसाच तो धूम गायब पण झाला ! आता कोपर्यातले लोक माझ्याजवळ आले, तुम उसे पहचानते हो क्या ? यावर मी नाही असे सांगताच , नाव, गाव काहिही न विचारता तुम्हा त्याला पन्नास रूपये दिलेतच कसे ? नेमके तुमच्यापुढेच त्याने कसे हात पसरले ? पैसे काढायची नवी ट्रीक दिसते ही, तुमचे पैसे बुडाले, परत मिळायची आशाच सोडा – असे डोस पाजले गेले. मला सुद्धा नवल वाटले. त्या माणसाला आधी केव्हातरी नक्की लोकलमध्ये पाहिलेले होते. त्याने मागितले मी दिले, परतीची बोली झालीच नव्हती. खरेच कोणी गरजू असेल तो, उद्या परत करेल, आणि नाही केले परत तरी पन्नास रूपयाने आपण काही रस्त्यावर नक्कीच येत नाही. अक्कल खाती अजून पन्नास रूपयाची भर !

दूसर्या दिवशी मी ती गोष्ट विसरून सुद्धा गेलो. मुंबईत पाउस पडल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते. गच्च भरून आलेल्या दोन गाड्या सोडल्यावर जी लोकल आली ती अर्थातच रिकामी होती , त्यात बसून कार्यालय गाठले. पुढचे चार दिवस बरोबरचा सहकारी रजेवर असल्याने, दोन लोकल आधीची म्हणजे ८:०१ ची गाडी पकडत होतो. पाचव्या दिवशी नेहमीची लोकल पकडल्यावर एकाने विचारले की “उसने आपका पैसा दिया क्या ?” तेव्हा मला त्या पन्नास रूपयाची आठवण झाली ! पण मीच रोजची गाडी पकडत नव्हतो तेव्हा त्याला दोष देण्यात काही अर्थ नव्हता. दूसर्या दिवशी महिन्याचा दूसरा शनिवार आल्याने कार्यालयाला सुट्टी होती. थेट सोमवारीच कामावर गेलो. त्या दिवशी व दूसर्या दिवशीही रोजच्या लोकलमध्ये काही तो दिसला नाही. थोडी चुटपुट नक्की लागुन राहिली. पैशाचा प्रश्न नव्हता पण एवढ्या लोकात नेमके मलाच त्याने कसे हेरले याचे नवल वाटत होते ! बुधवारी आधीची, ८:१३ ची लोकल थोडी उशीरा सूटली व मला अनायसेच मिळाली.

तो

अमरावतीला माझे गाव आहे. जमिनीच्या वादासंदर्भात मला अचानक गावाला जायचे होते. रेल्वेचे आरक्षण उपलब्ध नव्हते म्हणून तात्काळमध्ये तिकिट काढायला बुकिंग क्लार्कला सांगितले. त्याने तिकिट काढले व ९५२ रूपये द्या म्हणून सांगितले. माझ्या खिषात तर मोजून ऩउशे रूपये व थोडी चिल्लर होती. क्लार्कने तिकिट काढले सुद्धा होते ! तात्काळ तिकिट रद्द सुद्धा करता येते नाही, म्हणजे वांदाच झाला होता. करायचे काय ? कोणी मित्र इतक्या सकाळी इकडे यायची काहीच शक्यता नव्हती. शेवटी असलेले पैसे व तिकिट त्या क्लार्क कडेच ठेउन मी रोज पकडतो तो डबा गाठला. मागचा पुढचा विचार न करता एकदम कोपर्यात बसलेल्या, नेहमीच्या पहाण्यातल्या माणसाकडे पन्नास रूपये मागितले, त्याने सुद्धा ते कोणतीही खळखळ न करता दिले ! तिकिट खिडकीवर जाउन मी तिकिट ताब्यात घेतले. त्याच रात्रीच्या गाडीने अमरावती गाठले. दूसर्या दिवशी परत फ़िरलो व नेहमीची लोकल पकडली. पन्नास रूपये ज्याने दिले त्याला साभार परत करण्यासाठी सगळा डबा पालथा घातला पण तो काही दिसला नाही. त्याचा शोध घेण्यात शनिवार सुद्धा निघुन गेला. आता मात्र मला चांगलीच खंत वाटू लागली. ज्याने आपल्याला मदत केली त्याचा नक्की आता गैरसमज होणार, खरेतर आपणच त्याचा निदान नंबर तरी घ्यायला हवा होता. पैसे परत तर करायचे आहेत पण कसे ? सोमवारी एक गाडी लवकरची पकडली व मंगळवारी थोडे त्याच्याही आधीची लोकल पकडली. पण त्याची काही गाठ पडलीच नाही. बुधवारी पुलावरच थांबून त्याला शोधले पण व्यर्थ ! रोजच्या लोकलमध्ये , नेहमीच्या डब्यात एकाला विचारले, तो अमका हल्ली कोणती गाडी पकडतो, तेव्हा त्याने हल्ली या लोकलला असत नाही पण तो कामाला मुंबई बंदरात असल्याचे सांगितले ! चला निदान तो कोठे कामाला आहे हे तरी कळले होते. कामावर पोचल्यावर लगेच गुगल मध्ये “Mumbai Port” टायपुन , सर्च वर क्लिक केले. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटची लिंक मिळाली. साइट उघडल्यावर “Contact Us” वर क्लिक करताच पहीलाच नंबर होता, 2261 1234 ! मोठया उत्साहाने तो नंबर लावला …. !

मी

कामावर पोचताच फ़ोन खणखणला. नेहमी प्रमाणेच “Good Morning ! This is chairman’s Office, Mumbai port Trust, what can I do for you sir ?” असे म्हणताच पलिकडून बराच वेळ काही उत्तर आले नाही. मग मोठ्याने हॅलो असे म्हटल्यावर, माफ़ करा, पण तुमचा कोणी कर्मचारी पनवेलला राहतो का ? अशी विचारणा झाली. मग मात्र वैतागुन मी “अहो, हे चेयरमनचे कार्यालय आहे, आणि आमच्याकडे १८,००० माणसे तीन शिफ़्टमध्ये काम करतात, एवढ्या माहितीवर तुम्हाला काय सांगू ? तसा मी सुद्धा पनवेललाच राहतो, तुम्हाला तिकडचा जागेचा भाव हवा आहे का ?” असे तिरसटासारखे विचारल्यावर त्याने फ़ोन कटच केला. मी कामात गढून गेलो.

तो

फ़ोन करून निराशा पदरी पडल्यावर रोजचा पेपर बघत असताना, मुंबई पोर्टच्या स्टोअर्स विभागाची नोटीस बघितली. डॉकयार्डचा पत्ता माझ्या कार्यालया कडून जवळचा होता. लगेच तिकडे पोचलो. तिकडेच एकाला पनवेलचा कोणी आहे का ? असे विचारताच सकाळसारखीच “१८००० कामगार …”, टेप ऐकावी लागली पण एक प्रोग्रामर पनवेलचा आहे. पण त्यासाठी तुम्हाला गोदी विभागाच्या हद्दीत जावे लागेल व त्यासाठी परवाना हवा असेही समजले. पण त्याचा नंबर घ्या, गेटवरून त्याला फ़ोन लावा , तो तुमची आत यायची व्यवस्था करेल असेही सांगितले. चला काहितरी मार्ग सापडला तर ! भले तो ’तो’ नसेल पण कदाचित ’त्याला’ ओळखत सुद्धा असेल ! गेटवरून फ़ोन करताच, मोजून दूसर्या मिनिटाला तो खाली आला, तो, ’तो’ नव्हता ! पण त्याच्यासारखाच पनवेलला राहणारा व त्याच गाडीने सकाळी प्रवास करणारा एक त्याला माहित होता. मराठे त्याचे नाव, पण सध्या त्याची पोस्टींग हमालेज विभागात होती. ती इमारत मला तिकडूनच त्याने दाखविली. गोदीत असलेल्या धक्क्याच्या बाजूने चालत गेल्यास मी तिकडे दहा मिनिटात पोचलो असतो. तिकडे पाचव्या मजल्यावर त्या मराठेचे कार्यालय होते. पावसाने केव्हाच पाठ फ़िरवल्याने कडक उन्ह पडले होते. मुंबई गोदी नुसती आधी ऐकुनच माहित होती पण आता बघायला मिळत होती. बाप रे ! केव्हढ्या प्रचंड या बोटी, त्यावरच्या अजस्त्र क्रेन्स, मालाची अखंड चालू असलेली चढ-उतार ! अगदी हरखूनच गेलो सगळे बघून ! चला या निमित्ताने का होईना गोदी बघायला मिळाली. त्या कार्यालयात गेल्यावर कळले की इथे मराठे होते , ते पनवेलचेच आहेत पण साधारण वर्षभरापुर्वीच त्यांची चेयरमनच्या कार्यालयात बदली झाली आहे. ते कार्यालय बॅलार्ड पियरला आहे. मी तिकडे निघालो, पण गोदीचे काम जवळून बघायला मिळावे, शेवटचे, हो ना, पुन्हा कधी असा योग येणार आहे म्हणा, धक्क्यावरूनच निघालो !

( स्पेशल ड्युटीवर असणारा हवालदार मोरे, गोदीच्या धक्क्यावर कोणी गिर्हाईक हेरत होता. आज दूपारी यलोगेटला चिकन पार्टी होती. तिच्या बिलासाठी जमवाजमव करायचे काम त्याच्यावरच तर होते. धक्क्यावरून जाणार्या एकाला त्याने बरोबर हेरले ! सावजाला पोलीसी खाक्यात त्याने पास विचारला, त्याच्याकडे तो अर्थातच नव्हता. त्याचे काहिही ऐकून न घेता, त्याने त्याला यलोगेटला आणले ! तोवर पार्टी चालु झालीच होती. त्याला दम देउन बाजूच्या बाकड्यावर बसवले गेले. तासाभराने पार्टी संपल्यावर खाणाखुणा झाल्या, पोर्याने आणलेले बिल त्याच्याजवळ दिले गेले व बिल देउन जावा गुमान म्हणून सांगितले गेले ! )

तो

पोलीस ठाण्यातुन बाहेर पडल्यावर पहिली जाणीव भूकेची झाली ! पण खिषात परत करायचे पन्नास रूपये सोडले तर काहिच शिल्लक रहात नव्हते. तेव्हा तो विचार झटकून टाकून पायीच मराठेच्या नव्या कार्यालयात निघालो. उन्हातुन २० मिनिटे तंगडतोड केल्यावर पत्त्यात सांगितल्याप्रमाणे कोपर्यावर सेंन्ट्रल बँक, त्याच्या बाजूला, विजय-दीप ही ७ मजली इमारत व तिला लागुनच दगडी बांधणीची पोर्ट भवन ही इमारत दिसली. आत शिरण्यासाठी पास घेण्यासाठी रांगेत पाच माणसे उभी होती. मी चेयरमनच्या कार्यालयात असणार्या मराठेंना भेटायचे आहे असे सांगताच थेट त्या शिपायाने थेट फ़ोनच लावला …. .

मी

नेहमीप्रमाणेच कामाच्या रगाड्यातुन डबा खायला दोन वाजलेच. जेवण आटोपल्यावर जरा निवांतपणा मिळाला पण ’त्याचा’ विचार काही जात नव्हता ! खरेच तो कोणी लफ़ंगा असेल ? असेच माझ्यासारखे भोळसट हेरून तो दिवसाला आरामात पन्नास-शंभर रूपये कमवत असेल ? चांगुलपणा कोणाला दाखवायचाच नाही का ? कोणावर विश्वास ठेवायचाच नाही का ? इतक्यात फ़ोन वाजला. सुरक्षा रक्षकाने कोणी भेटायला येत आहे, सोडू का ? असे विचारले, मी सोडा असे सांगितले. दारातुन आत येचात त्याची माझी नजरभेट झाली व तोच ’तो’ अशी खात्री पटली ! कमाल आहे, आपल्यापर्यंत कसा पोचला हा ? का काही वेगळ्याच कामासाठी आला आहे व योगायोगाने आपली गाठ पडते आहे ? त्याच्या डोळ्यात मात्र जत्रेत हरवलेल्या मुलाला बराच वेळ ताटातूट झाल्यावर एकदाची आई दिसल्याचे भाव दिसत होते. धावतच तो माझ्याकडे आला. त्याचा अवतार अगदी बघण्यासारखा झाला होता, उन्हात पायपीट करून तो पार विस्कटला होता. धपकन तो खुर्चीवर बसला, काय बोलावे हेच त्याला समजत नव्हते ! त्याच्यासाठी मी पाणी मागवले, चहा समोर ठेवला. मग त्याच्या चेहर्यावर जरा तरतरी आली, हसू फ़ूटले. सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेली त्याची शोध-मोहिम ऐकताना मी हरखून गेलो ! अहो, कमाल करता, साधी पन्नास रूपयाची तर बात, त्याने मी काही रस्त्यावर येणार नव्हतो व तुम्ही काही घर घेणार नव्हतात, कधीतरी गाठ पडली असतीच ना ? या माझ्या प्रश्नावर मात्र तो गंभीर झाला. साहेव, पैशाचा प्रश्न नाही, तुम्ही अगदी एका शब्दानेही चौकशी न करता मला मदत केलीत, मी मात्र आठवडा झाला तरी तुमचे पैसे परत करू शकत नव्हतो. माझे मन मला खात होते. जगात देणारी माणसे किती उरली आहेत ? अशाने त्यांचासुद्धा माणसावरचा विश्वास उडेल, त्यासाठीच मला तुमचे पैसे परत करायचेच होते, आजच आणि ऍट एनी कॉस्ट ! ये बात पतेकी थी ! त्याने पाकिटातुन पन्नासची नोट काढून मला देताच ते आता रिकामे झाल्याचे माझ्या लक्षात आले. आता हा बाहेर खाणार तरी काय ? मी लगेच शिपायाला बोलवुन त्याच्या साठी एक राइस प्लेट मागविली. आमच्या पॅन्ट्रीरूम मध्ये त्याला जेवायला बसवले. जेवण झाल्यावर मला हात जोडून तो म्हणाला, अन्नदाता सुखी भव ! साहेब, याचे किती रूपये झाले ? पोटात भूकेने कावळे ओरडत होते ! आता माझ्याकडे द्यायला एक छदाम पण नाही, मी तुम्हाला ते उद्या परत करेन ! ते का मला माहित नव्हते ? पन्नास रूपये देण्यासाठी तो चार तास उन्हात भटकत होता, पोलिस ठाण्याची हवा खाउन, स्वत:च्या पोटात कावळे ओरडत असताना त्यांच्या चिकनपार्टीचे ७०० रूपयाचे बिल देउन बिचार्याने सूटका करून घेऊन एकदाचे मला गाठले होते. मी म्हटले याचे पैसे माझे कार्यालय भरणार आहे, तुम्ही काळजी करू नका. त्याला सुद्धा ते पटले, परत आभार मानून तो जायला निघताच मला काहितरी आठवले –

“सकाळी तुम्हीच फ़ोन केला होतात ना ? मग काही न सांगताच कट का केला फ़ोन ? अजब योगायोगाने तुम्ही चक्क मलाच फ़ोन लावला होतात ! हे सगळेच मग टळले असते ना ?” आता मात्र तो पार ओशाळला, “साहेव, काय सांगू – एवढ्या मोठ्या कार्यालयात असणारा सेकंड क्लासने कसा प्रवास करेल – हा विचार मनात आला व मी फ़ोन कट केला !

२ टिप्पण्या:

Mahendra म्हणाले...

खुपच सुंदर झालाय लेख.. मनापासुन आवडला. आणि तुम्ही लिहिलं पण इतक्या उत्कटतेने की वाचतांना पण मजा आली.

Padmakar (पद्माकर) म्हणाले...

श्री. एकनाथजी...(पुढे रानडे असे लिहील्यावर आपले आडनाव मराठे असल्याची आठवण झाली.. काही नावंच अशी असतात नाही?),

कर्मधर्मसंयोगाने आपल्या टॅलीनाम्याशी येऊन दाखल झालो आणि पहिला लेख वाचला तो हाच! फारच अप्रतीम लेख आहे. शिवाया माझ्याच धाटणीचा. अतिशय साधी, सोपी, सरळ भाषा!

मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याशी ओळख करून घ्यायला नक्कीच आवडेल!

शुभेच्छा!