सोमवार, १८ मे, २००९

ओझे !

जन्माला येताना काही पौंडाचा का असेना, बोज बनून आलेलेच असतो आपण सर्व, पुढे खायला काळ आणि भुईला भार होतो ते अगदी खरा काळ येईपर्यंत. त्यातही हिंदू असाल तर तुमच्या नश्वर देहाची राख तरी होते, एरवी तो ही थडग्याचे अधिकचे ओझे अंगावर घेउन कयामतच्या दिनाची वाट पहात राहतो ! हे अजडाचे ओझे मग पेलतो आधी जडाकडे वळतो.

मल स्वत:ला कोठेही सडाफ़टींग जायला आवडते, अगदीच नाइलाज असेल तर किमान ओझेच मी नेतो. कोठे जाण्यासाठी आम्ही मित्र स्टेशनला जमलो की मित्रांना मी काहीच कसे घेतले नाही याचा धक्का बसतो, मला त्यांचे सामान बघून नक्की किती दिवस जायचे आहे असा प्रश्न पडतो ! आजपर्यंत मला कधीही कुली करावा लागला नाही. नाही, पैसे तर वाचतातच पण आपले ओझे दूसर्याच्या मानेवर द्यायला नाही आवडत, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे ! तसे जाताना माझे ओझे असते त्यापेक्षा कमीच होते कारण मी बाहेर शॉपिंग कधीही करत नाहीच शिवाय माझ्या काही वस्तु तिकडेच सोडून सुद्धा यतो, अर्थात विसरून !
ओझी सुसह्य व्हावी म्हणून बाजारात विविध प्रकार आहेत, वळकट्या , ट्रंका, पेटारे, एयर बॅग्स, सॅक, सूटकेसेस, त्यात परत त्यांना चाके लावायची सोय सुद्धा असते ! पण त्यांचेही स्वत:चे काही वजन असतेच ना ? अजून हास्यास्पद म्हणजे त्यांना कुलपे सुद्धा असतात ! अरे जर आत सोने असेल आणि कुलुप उघडत नसेल तर चोर काय बॅग कापून किती नुकसान होईल याचा विचार करत बसणार का ? बरे अगदी ऐन वक्ताला त्या धोका देतातच. कधी त्यांचे बंद तूटतात, चेन फ़सते, किल्ल्या हरवतात, मुठ हातामध्ये येते व मग जी त्रेधा उडते ती बघण्यासारखीच असते ! त्यांचे आकार सुद्धा रेल्वेचा किंवा बसचा रॅक, मोटारची डीकी यात नीट बसावे असे प्रमाणित नसतात आंइ मग पायाला साखळी बांधल्या सारखे ते घेउन बसावे लागते.

औरंगाबादला माझे लग्न झाले, आता संसाराचे ओझे पेलावे लागणारच होते पण “ही” सोबत जी आली ती चार सूटकेस घेउन ! बाबांनी माझ्याकडे पाहीले व माझा क्रोधाग्नी भडकायच्या आत त्यांनी मला नजरेने दामटले, मी गप्प बसलो. लग्न झाल्यावर डबा नियमित मिळू लागला. तो न्यायला आधी पाउच होता, पण तो विसरायची भीती होती म्हणुन हीने मला एक एयर बॅग घ्यायला लावली. मग आता जागा आहेच तर एक लहान पाण्याची बाटली, एक फ़ळ, नॅपकीन, बिस्कीटचा पुडा, काही सामान येताना आणायला सांगितले तर एक नायलॉनची पिशवी ! ही सगळी भर तिने घातल्यावर मी तरी का मागे राहु ? मी सुद्धा लोकलमध्ये वाचण्यासाठी गीतेचे पुस्तक, चष्मा – जो मी कधीही लावला नाही, अधिकची पेने, मोबाईल चार्जर, त्याचा इयरफ़ोन, कोरे कागद , चेक बुक , डायरी अशी भर घातली. आता त्या एयर बॅगचेच ओझे एवढे झाले आहे की डबा नसेल तेव्हा ही मी ती घेउन जातो, कारण अगदी हलके वाटून करमत नाही म्हणून ! मुलांना ती अलीबाबाची गुहाच वाटते !

अनेक बाबतीत आमची टोकाची मते आहेत, त्यात कोठे जाताना लगेज किती न्यायचे यावर प्रचंडच मतभेद आहेत. हीच्या मते जेवढे दिवस मुक्काम तेवढे कपड्याचे जोड हवेत, माझ्या मते एक दांडीला व एक … ! तेच कपडे पुन्हा घातले तर आपल्याला कोण ओळखतो आहे बाहेर गावी ? पण हल्ली वाद नको म्हणून मी कोठे मुक्कामाला जायचे असले की तिलाच सामान भरायला सांगतो. रात्री सगळ्या तयारीचा आढावा घेताना लगेजची तपासणी होते. कपड्यांच्या दोन मोठ्या सूटकेस, खाण्याची एक पिशवी, पिण्याच्या पाण्याची एक पिशवी, भेट-वस्तुंची एक पिशवी, एक अधिकची बॅग , येताना काही आणण्यासाठी, एक स्लीपरची पिशवी , आणि हे काय, पारलेची बिस्कीटे २ किलो ? ती नाही का तिकडे मिळत ? आणि एवढ्या प्रवासात त्यांचा चुरा नाही का होणार ? यावर तिचे उत्तर, अरे, पार्ले बिस्किटच्या फ़ॅक्टरीत गेले होते ना, तिकडे घेतली, स्वस्त मिळतात ! त्यातलीच थोडी(?) आईला घेउन चालली आहे ! मी कपाळावर हातच मारला. आता मी निक्षून सांगतो, हे जरा जास्तच होते आहे, थोडे कमी कर. ही तितक्याच ठामपणे सांगते, उलट हे कमीच आहे, लोकं जातात तेव्हा बघा जरा ! तुला ना कसली हौसच नाही ! मग माझी प्रश्नांची फ़ैर … हमाली करायची कसली आली हौस ग ! एवढे खाणे कशाला, दुष्काळी भागात चाललो आहोत का ? प्रवासात बिसलेरी घेता येत नाही का ? भेटींची ओझी इकडून नेण्यापेक्षा तिकडेच काही घेउन द्यावे नाहीतर सरळ रोख पैसे का देत नाहीस ? लोकांना मुंबईवरून काही आणले याचे कौतुक असते कळले का, असे एकाच प्रश्नाचे उत्तर देउन बाकी प्रश्नावर ती अर्थात मौन पाळते.
माझे किती कपडे घेतले आहेस ? माझा पुढचा प्रश्न,
चार जोड आहेत.
मग त्यातले दोन कमी कर, माझा फ़ायनल आदेश.
ही तणतणत माझे कपडे परत कपाटात ठेवते पण येताना त्या बदल्यात आपले दोन व लेकीचे दोन जोड घेउन येते !

तु नाही तर आम्ही तरी घेतो मिरवुन लग्नात !

शेवटी सगळे सामान बॅगात कोंबताना नाकी ऩउ येतात. प्रसाद-प्रियांका सूटकेस वर उभे राहतात तेव्हाच त्या बंद करता येतात. मग बाहेर पडताना ही हातात फ़क्त पर्स घेउन लेकी सोबत पुढे जाते. मी दोन हातात दोन सूटकेस, दोन्ही खांद्यावर एयर बॅगा घेतल्यावर प्रसाद बाकीचे उचलतो ! हमाल न करणे हे तुझे तत्व आहे ना मग कर हमाली !

ता.क. :- आत्ताच ही माहेरून आली. सोबत प्रचंड ओझे, कल्याणला उतरून पनवेलसाठीच्या बसमध्ये सामानासह चढणेच अशक्य झाले ! एक तास हेच चालले होते. गर्दी वाढतच चालली होती. शेवटी स्पेशल रीक्षा करून, ३०० रूपये मोजून बाईसाहेब आल्या ! ( औरंगाबाद ते कल्याण – एक्सप्रेसचे तिघांचे भाडे होते २८० रूपये ! ) काय ग ? एवढे ओझे ? आईकडून सगळे मसाले करून आणले आहेत, पापड , चिकवड्या , शेवया सुद्धा आहेत !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: