रविवार, ७ डिसेंबर, २००८

भरवसा !

२५ नोव्हेंबर, पाच केव्हाच वाजून गेले होते पण समोरचा फ़ायलींचा ढीग काही कमी होत नव्हता. जरा मोकळे होतोय असे वाटेपर्य‍ंत नव्या फ़ायली येतच होत्या. अर्थात काम संपवून टाकल्याशिवाय मी कार्यालय सोडत नाही, सकाळी आल्यावर टेबल साफ़ हवे हा माझा उसूल ! एकदाचे सगळे काम संपले, मोकळा श्वास घेतला व विजयी मुद्रेने कॉफ़ी मागवली. कडक कॉफ़ीचे गरम गरम घोट गळ्याखाली उतरत असतानाच धावत पळतच एक कामगार आत घुसला. समोरच्या खुर्चीवर फ़तकल मारूनच तो बसला व धापा टाकू लागला. त्याने बरीच धावपळ केलेली दिसत होती. त्याला आधी पाणी दिले. शांत झाल्यावर त्याने फ़ाइल पुढे केली. त्याच्या ७० वर्षाच्या वडीलांची बायपास सर्जरी होती २७ तारखेला. त्या साठी त्याला ३ लाखाचे अनुदान पास झाले होते, पण नेहमीसाखीच ती फ़ाइल लाल फ़ीतीत सापडली. गरजव‍ंताला अक्कल नसते या उक्तीप्रमाणे त्यानेच धावपळ करून सर्व अडथळे पार करून आता ती फ़ाइल औपचारीक मंजुरीसाठी अध्यक्षांच्या कार्यालयात स्वत: आणली होती. शस्त्रक्रीयेच्या एक दिवस आधी, दूपारी २ च्या आत चेक जमा केला तर शस्त्रक्रीया होणार होती नाहीतर महीनाभरान‍ंतरची तारीख मिळणार होती, त्याच्या वृद्ध वडीलांच्या तब्येतीला हा विलंब धोकादायक ठरला असता.


साहेब नाही आहेत, दिल्लीला गेले आहेत, हे कळल्यावर मात्र त्याचा धीर खचला व तो धाय मोकलून रडू लागला. त्याचा शोक मग संतापात बदलला व सर्व यंत्रणाच कशी सडली आहे, माणसाच्या जीवाची कदर कोणालाच नाही, तुमच्यावर वेळ आली म्हणजे कळेल असे सुनवू लागला. मला ऐकून घेणे भागच होते. बरेच काही बोलल्यावर तो शांत झाला व शून्यात नजर लावून बसला. मग मी त्याला शांतपणे म्हटले उद्या दूपारी बाराच्या आत तुम्हाला चेक द्यायची जबाबदारी माझी. आधी आपण काय ऐकले यावर त्याचा विश्वासच बसला नाही तेव्हा तेच वाक्य मी त्याला अधिकच ठामपणे सांगितले. मग मात्र तो ओशाळला. माझे आभार मानून निघून गेला.


रात्री उशीरा घरी पोचलो, पण सुदैवाने मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याच्या आत. हल्ल्याची तीव्रता बघता उद्या कामावर इच्छा असूनही जाउ शकू का हा विचार पहीला डोक्यात आला. पाठोपाठा विमानतळाबाहेर स्फ़ोट झाल्याची बातमी वाचली व साहेब तरी दिल्लीवरून त्यांच्या मलबारहीलच्या बंगल्यात पोचतील का याचीही काळजी वाटू लागली. सतत त्या कामगाराचा चेहरा समोर येत होता व त्याचे कधीही न बघितलेले वृद्ध वडील. सकाळी लोकल सेवा सुरू झाल्याचे कळले व कामावर निघायची तयारी केली. पाठोपाठ आई-बहीण-सासू यांचे फ़ोन आले व आज कामावर जाउ नये असे सूचवले गेले. अर्थात कोणत्याही परीस्थितीत घरी बसणे मला आवडत नाही. १९९३ च्या दंगलीत मुंबई जळत असताना सुद्धा मी व माझा भाउ विरार वरून कामावर जातच होतो, कधी-कधी तर अख्ख्या डब्यात आम्ही सगळे मिळून पाच-सहा जणच असायचो ! मग आज तरी का घरी बसा ? इतक्या वर्षाच्या संसारानंतर बायको सुद्धा मला चांगले ओळखून आहे तेव्हा तीने सुद्धा माझा डबा तयार ठेवला होताच ! घराबाहेर पडताना मात्र मुलीने घट्ट धरून ठेवले व आज जायचे नाही असे निक्षून सांगितले. शणभर माझा सुद्धा निश्चय डळमळीत झाला पण परत समोर त्या कामगाराचा चेहरा आला.. नाही.. मला कामावर गेलेच पाहीजे. माझ्या भरवशावर तर तो आहे ! मोठ्या निग्रहाने मी तीच्या हातांची मिठी सोडवली , कामावर पोचल्यावर फ़ोन करतो असे सांगून पाठी वळून न बघता चालू पडलो. नेहमी सारखी टाटा करायला मुलगी बाल्कनीत आली नाहीच !


जवळपास रीकाम्या लोकलने कामावर पोचलो. फ़ोर्ट विभागावर शब्दश: अवकळा पसरली होती. रस्त्यावर शुकशुकाट, हे मुंबईचे रूप मला तरी नवीनच ! आमच्या मुख्यालयाचा दरवाजा बंदच होता. त्याला लागुनच असलेल्या ’पोर्ट भवन’चा दरवाजा सुद्धा बंदच होता. मला बघून सुरक्षा रक्षकांनी दरवाजा उघडला. माझा सिनीयर सहकारी, गिरगावला राहतो, तो सुद्धा आला होता. त्यानेच साहेब रात्री दिडला घरी पोचले पण आता कामावर यायला निघाले आहेत असा निरोप मिळाल्याचे सांगितले. गोदी विभाग, जेथे प्रत्यक्ष मालाची चढ-उतार होते, तिकडेही सामसूम होती. विविध वाहीन्यांचे प्रतिनीधी, पत्रकार फ़ोन करून गोदीची हाल-हवाल विचारत होते. त्यांच्या प्रश्नांच्या फ़ैरींना उत्तरे देणे जड जात होते. साहेब साधारण साडे अकरा वाजता कार्यालयात आले. ते आल्या आल्याच गोदीचा आढावा घ्यायला निघणार होते पण मी लगेच त्यांचाकडून ’त्या’ फ़ाइल वर सही घेतली व शिपायाला ती फ़ाइल ताबडतोब अर्थ विभागात पोचवायला पिटाळले. हुश्श... अर्धे काम तर पार पडले होते ! आता शिपाई आला की अर्थ विभागाच्या प्रमुखांना गळ घालून चेक तयार करायला सांगितले की मला सूटकेचा आनंद मिळणार होता. पण थोड्या वेळाने शिपाई आला व अर्थ विभागात कोणी आलेलेच नाही आहे हे समजले. परत निराशेने मला ग्रासले. तेवढ्यात साहेबांनी फ़ोनवर सूचना दिली की सगळ्या विभाग प्रमुखांना तातडीच्या बैठकीसाठी बोलवून घ्या, जसे असतील तिथून, लगेच ! मी पडत्या फ़ळाची आज्ञा घेउन पहीला कॉल लावला अर्थ-विभागाच्या प्रमुखांनाच. आमचे सगळे अधिकारी कुलाबाच्या कार्यालयीन वसाहतीत राहतात आणि तिथे तर कर्फ़्यु पुकारला होता ! तरी मी सांगितले, ओळखपत्र दाखवा आणि या, पण याच ! पुढल्या वीस मिनीटात सगळे विभाग प्रमुख हजर झाले, अर्थ विभागाचे प्रमुख सुद्धा ! परत गाडी रूळावर आली होती तर ! आता तो कामगार आला की चेक बनणे कठीण नव्हते. परत सूटकेचा आनंद साजरा करता आला, माझ्याकडून सगळी तयारी बाकी होती. आता फ़क्त ’त्याची’ वाट बघणे. पण अगदी पाच पर्यंत वाट बघून सुद्धा तो काही फ़िरकला नाही. दूसर्या दिवशी साहेब मंत्र्यांबरोबरच्या उच्चस्तरीय बैठकीसाठी दिल्लीला जाणार होते त्यामुळे त्यांची सही घेतली हे चांगलेच झाले होते. दूसर्या दिवशी तो नक्की येणार म्हणून कामावर जाणे भागच होते पण तो नाहीच आला ! आता मला वेगळीच काळजी वाटू लागली, त्याचेच तर काही बरे-वाईट झाले नसेल ? तरी मी चेक तयार असल्याची खात्री करूनच घर सोडले. आता मात्र मी पुरता निर्धास्त होतो. तो कधीही का येईना, मी माझा शब्द तर खरा केला होता !


तिसर्या दिवशी तो अगदी सकळीच प्रगटला, अगदी निवांत वाटला, घाई त्याला अजिबातच नव्हती जणू ! “काय, झाली का सही साहेबांची ? मीच नेतो फ़ाईल अर्थ विभागात, शस्त्रक्रीया पुढे ढकलली आहे, काय व्हायचे ते होउ दे आता ! ज्याला त्याला आपल्या जीवाची काळजी, दोन दिवस बायकोने बाहेर सोडलेच नाय बगा, डोळ्याला पदरच लावून बसली होती बगा ! मी बी म्हटलं, कशापारी आनी कोनासाठी जीव धोक्यात घालायचा ? म्हातारं काय , आज नाही परवा खपनारच आहे, पन माझ्यापाठी भरला संसार आहे नव ? आनी मी जरी आयलो असतो तरी तुम्ही थोडीच कोनी येणार होता, , भरोसा तरी कसा बाळगायचा ? खात्रीच होती मला , कोनी कामावर नसणार याची, तेवा म्हणल जाव निवांत, द्या ती फ़ाइल द्या , तशी काय बी घाय नाय म्हना आता !”


त्याला बरच काही सुनवायचे होते, पण शब्दच बाहेर नाही पडले, ’तुमचा चेक अर्थ विभागात तयार आहे, जा आता’ एवढेच मी कसेबसे बोलू शकलो !

३ टिप्पण्या:

HAREKRISHNAJI म्हणाले...

आत्ताच मी एक पोष्ट लिहीले , लगेचच हे वाचनात आले. मी लिहिलेली पोष्ट वाचाल का ?

पण एक संगतो, चांगली कॄत्य माणासे स्वःत साठीच करत असतात दुसऱ्यांसाठी नाही. मतत केली नाही तर त्याचा त्रास आपल्यालच होतो नाही का ?
तेव्हा आपण मदत करणॆ सोडु नये, केव्हाही

Some Little Greens म्हणाले...

I am proud of you marathe kaka. Because of people like you, the spirit of mumbai is alive.

अनामित म्हणाले...

Marathe Kaka, khrach tumcha blog vachlya var asa vatata ki manuski ajun jiwant ahe.