सोमवार, २३ जुलै, २०१२

पाऊस, पापड व पाडगावकर !

फार फार वर्षापुर्वी लिज्जत कंपनीच्या लक्षात आले की पावसाळ्यात पापडांची विक्री जवळ-जवळ होतच नाही. कंपनीचा आर्थिक डोलारा कोलमडू नये म्हणून एक तज्ज्ञ समिती नेमण्यात आली. या कमिटीने बरेच पापड फस्त केल्यावर उपाय सूचविला तो म्हणजे कविता पाडायचा ! लोक कविता वाचता-वाचता पापड खातील , त्यांना आपण अशी सवयच लावायची ! लिज्जतने तो अहवाल स्वीकारला व कविता पाडण्याचे कंत्राट कोणाला द्यायचे यासाठी एक उच्च स्तरीय समिती नेमली. अनेक पावसाळॆ कोरडे गेल्यावर एकदाचे या समितीने एक नाव नक्की केले ते म्हणजे पाडगावकर !

 लिज्जतने मग पाडगावकरांबरोबर करारच करून टाकला की पाडगावकरांनी पाउस पडताच एक कविता पाडायची, पावसाचे आगमन झाले रे झाले की लिज्जतने आपल्या पापडाच्या जाहिरातीत ती कविता वापरायची, अगदी दरवर्षी ! पहिल्याच वर्षी ही कल्पना चांगलीच चालली ! जाहिरात प्रसिद्ध झाल्या झाल्याच कंपनीचे सगळॆ पापड हातोहात खपले ! पाऊस, पापड व पाडगावकर हे समीकरण अगदी फिट्ट बसले. पुढच्या वर्षी तर पावसाने अटच घातली की आधी पाडगावरांना कविता पाडू दे मगच मी पडतो ! मग पुढची काही वर्षे आधी पाडगावकर पावसाला कवितेतून “ये रे ये पावसा “ म्हणायचे व पाऊस लगेचच धावून यायचा ! लोकसुद्धा याला सरावले. म्हणजे आधी जून महिना लागला की छत्री, रेनकोट यांची खरेदी सुरू व्हायची, आता लोक पाडगावकरांनी पावसाला साद घातली की मगच या खरेदीसाठी घराबाहेर पडू लागले. खरे-खोटे पाडगावकर जाणोत पण या वस्तू विकणारे उत्पादक सुद्धा पाडगावकरांवर वॉच ठेवून स्टॉक बाजारात आणू लागत असे म्हटले जात असे. पाडगावकरांच्या पाऊस कवितेची लोकांना एवढी सवय झाली की लोक “आधी पडते पाडगावकरांची कविता, मग पडतो पाऊस” असे म्हणू लागले. ज्या भागात दुष्काळ पडतो त्या भागात सरकारच आपल्या खर्चाने पाडगावकरांच्या पाऊस कविता छापू लागली व मग तिकडे धो धो पाऊस कोसळू लागला. पुढे मग भारतातील 13 प्रमुख भाषांत पाडगावकरांच्या पाऊस कवितांचे अनुवाद केले गेले व भारत “सुजलाम सुफलाम झाला” !

 पुढे मात्र पाडगावरांचे मन या सगळ्या प्रकाराला वीटले. अति झाले आणि हसू आले म्हणतात तसे झाले. पाडगावकर कविता खरेच पाडू लागले, एका पापडाच्या लाटीतुन जसे 10 पापड बनतात तसे पाडगावकर एकाच कवितेच्या दहा कविता बनवून देवू लागले. कधी तर आधी कधी छापलेल्याच कविता नव्या म्हणून खपवू लागले. लोकांना त्या कविता रटाळ वाटू लागल्या. आधी पाऊस सुद्धा पाडगावकरांच्या स्वत:वरच्या कविता वाचायला अगदी उत्सूक असायचा पण त्याच त्याच पापडासारख्या एक सारख्या कविता वाचून तो सुद्धा बिथरला. लिज्जतची जाहिरात छापून आली की पाऊस रडायचा म्हणजे अगदी बदाबदा कोसळायचा. पण त्याने योग्य संदेश जात नाही असे कळल्यावर तो तोंड असे काळे करायचा की लोकांच्या तोंडचे पाणीच पळायचे व डोळ्यात पाणी यायचे ! मग सरकारी आदेशाने लिज्जतवाले पाऊस पुरेसा पडून झाला की मगच ती जाहिरात काढायचे ! सरकार सुद्धा लगोलग “मान्सून” संपल्याचे जाहिर करायचे ! ज्या भागात अतिवृष्टी होत असेल त्या भागात सरकार आपल्या खर्चाने पाडगावकरांची पाऊस कविता छापायचे व पाऊस धूम ठोकायचा. 

पाडगावकरांची कविता असलेली जाहिरात आधी वर्तमानपत्रे पहिल्या पानावर छापत पण कवितांचा दर्जा घसरल्याने जाहिरात छापून येते त्या दिवशीच पहिले पान बघून वितरक गठ्ठ्याला हातच लावत नाहीत म्ह्टल्यावर ती आतल्या पानात छापली जावू लागली. खरी गोची झाली लिज्जतची. पाडगावकर पडले पक्के व्यवहारी. त्यांनी प्रदीर्घ कराराचे सगळेच पैसे आगावू घेतलेले होते म्हणून पावूस पडला काय नाय पडला काय, पापड खपले काय नाय खपले काय , जाहिरात पहिल्या पानावर छापली काय की आतल्या पानावर, त्यांना कसलेच सोयर-सुतक नव्हते ! लिज्जतने परत एक समिती नेमली व यातून “वे आऊट” शोधायचे ठरले. पावसाळ्यात पापड खपत नाहीत याचे सोपे कारण होते ते ओले राहतात म्हणून, सुर्यप्रकाश नसल्याने पापड पुर्ण सुकत नाहीत, ते तसेच पॅक केले जातात म्हणून ते खराब होतात व लोक ते घेत नाहीत ! पण या पश्चात बुद्धीचा काय उपयोग ? मग समितीला एक नामी उपाय सूचला. सरकारकडेच “बेल आउट” पॅकेज मागायचे ! कंपनी तोट्यात चालली आहे तेव्हा अनुदान द्या नाहीतर पापड कविता छापून पावसावर पडदा पाडतो ! सरकारने पण समिती नेमली व त्या समितीने दुष्काळ नको असेल तर लिज्जतला बेल-आउट करणे भागच आहे अशी शिफारस केली व सर्व करातुन सूट, कोणतेही बिल पुढची दहा वर्षे भरायचे नाही असे व अजून बरेच काही डील झाले. 

 आधी ताकाने तोंड पोळलेला पाऊस आता अनुभवातुन शहाणा झालेला आहे. जुन महिन्यात जाहिरात नाही आली याची खात्री करून मगच तो पडतो, तो सुद्धा तूरळक, मग आठवडाभर थांबतो, जाहिरात नाही ना आली परत याची खात्री करतो व असाच बेता-बेताने पडून आपला मुक्काम लांबवतो कारण तो गेला असे वाटून परत जाहिरात छापून आली तर काय घ्या ?

२ टिप्पण्या:

aativas म्हणाले...

लेख आवडला. पण परिच्छेद नसल्याने वाचणे त्रासदायक झाले.

aativas म्हणाले...

लेख आवडला. पण परिच्छेद नसल्याने वाचणे त्रासदायक झाले.