सोमवार, २५ जुलै, २०११

इनोसंट कलमाडी साहेब !

चला, आज दसरा, आजच दिवाळी ! अहो , तोंड सांभाळून बोला, मला विस्मरणाचा रोग नाही जडला आहे, जडला होता आमच्या कलमाडी साहेबांना ! या रोगाने त्यांची नुसती आठवणच नव्हती गेली , राजकारणातली सोन्यासारखी फुललेली करीयरही संपूष्टात आली होती. कोणी म्हणत होते की शरदाचे चांदणे त्यांना बाधले. महालात राहणारा माणूस तिहारच्या तुरूंगात सडत होता. भगवान के दरबारमे देर है लेकिन अंधेर नही याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. आमचे साहेव आता निर्दोष सूटणार !


 

आता कोणाला सांगायला हरकत नाही, माझी व साहेबांची ओळख फार फार जुनी, म्हणजे किती वर्षापुर्वीची हे बी आठवत नाय यवडी जुनी ! आता गोदीत कारकुनी करणारा माणूस एवढ्या मोठ्या माणसाच्या संपर्कात तरी कसा आला असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे म्हणा, पण वो एक बहुत पुरानी कहानी है ! किती पुरानी ते मात्र आता आठवत नाय बघा ! झाले असे की आस्मादिक पुण्याचा प्रसिद्ध दगडूशेट हलवाईचा गणपती बघायला गेले होते. दगडूशेटला पोहचे पर्यंत पुण्यातल्या रीक्षावाल्यांनी घुम घुम घुमवून माझा अर्धा खिसा रिकामा केलेला होताच. दर्शनासाठी नंबर लागेपर्यंत माझे पाकिट, मोबाइल, घड्याळ, अंगठी,( चेन घातली होती का व घातली असेल तर ती सुद्धा मारली का ते आठवत नाही.) असे काय काय गहाळ झाले, दगडूशेटच्या पायावर लोटांगण घाले पर्यंत माझा कॉटन किंगचा कॉटनचा शर्ट सुद्धा कोणीतरी मारला. भयंकर प्रसंग ओढवला होता. त्याच वेळी दाढीधारी, पांढरे शुभ्र कपडे घातलेला माणूस नवस फेडण्यासाठी तिकडे आलेला होता. माझी त्याची नजरा नजर झाली व लगेच त्याने मला "पपलू" अशी जोरात हाक मारली. माझी ही अवस्था बघून तो मला "पुना कॅफे" अशी पाटी असलेल्या एका दूकानात घेवून गेला. त्याने दोन कॉफी अशी झोकात ऑर्डर ठोकली. मला उगीच वाटतय की ज्याने कॉफी आणली त्याची सुरत बारामतीकरांशी काफी मिलती जुलती होती. मी पपलू नाही, एकनाथ मराठे असे त्यांना हजारदा सांगितल्यावर त्यांना पटले. पण माणूस मोठा दिलदार ! "या कलमाडीने एकदा कोणाला आपला दोस्त मानले की मानले, कवा बी येत जा राव, हा कॅफे आपलाच आहे, दोस्त आपकी सेवा मे हाजिर है !" असा सबूद दिला आणि तो पाळलाही. योगायोग असेल पण माझी अपघाती झालेली ओळख त्यांना चांगलीच लकी ठरली. सोनिया (मा/आ)यने आश्रय दिला, राज्यसभेची खासदारकी मिळाली , पुढे तर राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजन समितीचे यजमानपद सुद्धा मिळाले.


 

साहेब म्हणजे एक वल्ली आहेत. मला त्यांनी एकदाही मराठे वा एकनाथ म्हणून हाक मारलेली मला आठवत नाही. खरेच आठवत नाही हो - नाही तसे नाही – कधी मारलीच नाही अशी हाक ! कधी मला ते टी बाळू म्हणत, कधी लखोबा, कधी आर आर कधी राहुल --- एकदा तर मला त्यांनी ममद्या अशी हाक मारून पाठीत प्रेमळ धपाटा सुद्धा घातला होता ! मला थोडे विचित्र वाटायचे पण मोठ्या माणसांच्या लिला आपल्याला कशा कळणार म्हणून सोडून द्यायचो. पुढे मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतले. दिल्लीत आयपीएचे ऑफिस आहे त्यात त्यांनी मला डेप्युटेशनवर बसविले. माझा दिल्लीत चांगलाच जम बसला. राष्ट्रकूल स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली होती, विविध कामांची धडाक्यात टेंडरे निघू लागली व माझ्या पायाला जणू भिंगरी लागली. चहा सोनियाजीं बरोबर, फराळ प्रियांकाच्या घरी, रॉबर्टबरोबर बीयर, राहुलबाबा बरोबर धाब्यावर खाणे, मनमोहनांसोबत मलईदार लस्सी, शीला दिदींच्या घरी रात्रीचे शाकाहारी खाणे ---- ! मस्त चालले होते सगळे ! पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला नजर लागतेच ना ! साहेबानी काहीतरी गडबड सुरू केली होती. टेंडर एकाचे, कंत्राट दूसर्यालाच, कामाचे पैसे तिसर्यालाच ते सुद्धा ठरल्यापेक्षा कितीतरी जास्त ! एकच काम, पण बिले हजार, काम रूपयाचे, बिले लाखाची तर कधी काम न करताच बिले ! एरवी साहेब सुरेश कलमाडी याच नावाने क्रॉस्ड चेकच घ्यायचे पण हल्ली मला ते चेक भरायला द्यायचे त्यावर आपले नाव काही भलतेच लिहायचे. मग चेक घेणे बंदच करून गांधीच घ्यायला लागले. पण मग मिळालेले पैसे तरी नीट तिजोरीत ठेवायचे ना ? अहो काय सांगू, नोटांची बंडलेच बंडले कोठेही टाकून द्यायचे, गादीखाली, लादीत, सोफ्यात, बाथरूममध्ये , अगदी संडासात सुद्धा ! शेवटी मी त्यांना जबरदस्ती डॉक्टरांकडे घेवून गेलो. सगळी लक्षणे विस्मृती रोगाची होती ! हे कळल्यावर साहेबांनी क्षणाचीही उसंत न घेता आपला राजीनामा खरडला, सार्वजनिक जीवनातुन निवृत्त होणार असून आता फक्त पुना कॅफे सांभाळणार असे प्रत्रक माझ्याकडून बनवून घेतले. आपल्या निवृत्तिचे कारण सोनिया माय, शीला दिदी, प्यारे मोहन या सगळ्या सगळ्यांना कळवायची जबाबदारी त्यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर दिली. मी उदयिकच १० जनपथ गाठले. सोनियामाय बरोबर पास्ता खात असतानाच मी कलमाडी साहेबांना झालेल्या असाध्य रोगाची माहीती दिली व ते सार्वजनिक जीवनातुन निवृत्त होत आहेत असेही सांगितले. मग मात्र अजबच झाले, सोनियांना कलमाडी कोण तेच आठवत नव्हते ! मी जोरात "राहुलबाबा जल्दी आओ" असे ओरडलो व तो धावतच आल्यावर कलमाडी टेप वाजविली तेव्हा राहुलबाबाने "कलमाडी हो या अनाडी, उनसे हमारा क्या वास्ता ? " असे मला विचारले. तिकडून मी थेट मनमोहनांकडे धाव घेतली तर त्यांना राष्ट्रकुल स्पर्धा किस चीज का नाम आहे हेच आठवत नव्हते, त्यांनी माझी बोळवण शीला दिदींकडे केली. शीला दिदींना मी सगळा प्रकार धाप लागेपर्यंत सांगितला तर त्यांनी "आपको विश्राम की सख्त जरूरत है" असे सांगत हातावर एक पेपरमिटची गोळी देवून पिटाळले. हा सगळा प्रकार साहेबांना सांगायला गेलो तर त्यांनी मलाच "कोन है बे तू ?" असे खडसाविले व धक्के देवून बाहेर काढले ! काहीतरी भयंकर घोटाळा होणार, साहेबांबरोबरच देशाचे नाव सुद्धा खराब होणार म्हणून मी पवार साहेबांना बारामतीत जावून लोटांगण घातले. मी त्यांना त्यांच्या नावाने साद घालताच ते एकदम शून्यात नजर लावून बोलू लागले " कोण मी, कोठून आलो, बारामतीची भानामती की मैद्याचे पोते ? की ममद्या खाटीक की मी श्रीखंड्या ? मराठा सदार की मोघल बादशहा ?" असे स्वगत बोलल्यासारखे बोलू लागले !


 

मधला काही काळ मीच कोमात होतो (म्हणे )! काही महिन्यानंतर की वर्षानंतर डोळे उघडल्यावर "मै कहा हूं" असे न विचारता मी "राष्ट्रकूल स्पर्धा पार पडली का ?" हा प्रश्न विचारला. पडली एकदाची रडत खडत पण त्यात करोडोचा घोटाळा केला म्हणून कलमाडी तुरूंगात आहेत असे कळताच मी "ये हरगिज नही हो सकता, साब बेकसूर है, वो तो अपनी यादगाश खो बैठे है, उन्हे छोड दो" असा टाहो फोडला तेव्हा डॉक्टरांनी "इसके दिमाखपे असर हुआ है" असे म्हणून मला येरवड्याला हलवायची व्यवस्था केली.


 

शेवटी आज तो सोनियाचा दिनू उगवला, माझी मेंटल वार्ड मधून सूटका झाली तशी आदरणीय कलमाडी साहेबांची सुद्धा होईलच ! गेलेला मान-सन्मान परत मिळेल ! चला, मला आता दिल्लीत होणार्या ऑलिंपिकच्या तयारीला आतापासूनच लागायला हवे !

1 टिप्पणी:

Amit म्हणाले...

hehe..phar chan lihile aahe :)