शनिवार, २७ सप्टेंबर, २००८

सुसाईड नोट !

सुसाईड नोट !


मी, भीमराव जोंधळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वडाळा पोलीस ठाणे, कोणत्याही दबावाविना ही नोट लिहीत आहे। मी हे सर्व लिहीताना पुर्ण शुद्धीत आहे, या आत्महत्येसाठी मला कोणीही प्रवृत्त केलेले नाही, आणि माझ्या हातून जे पाप घडले आहे त्यानंतरही मी जिवंत राहणे माझ्याच सद्-सद्-विवेक बुद्धीला पटत नाही.


साधारण दीड एक महीन्यापुर्वी अनुप हा तरूण missing असल्याची तक्रार माझ्या ठाण्यात दाखल झाली होती। आता या महानगरीत या अशा तक्रारी निव्वळ नोंदवून ठेवण्यापुरत्याच असतात. आम्ही ही तेव्हा तेच केले होते. पण त्या नंतर अनुपच्या समाजाचे एक शिष्टमंडळ मला येउन भेटले. ही साधीसुधी केस नाही, मागासवर्गीय तरूणाचा हा खूनच आहे, तुम्ही याचे धागेदोरे उकला नाहीतर आम्ही सी.आय.डी. चौकशीची मागणी करू, अशा आशयाचे निवेदन देउन निघून गेले. पाठोपाठ कमिशनर साहेबांचा फोन वरून आदेश आला की या प्रकरणाची सखोल चौकशी करा, मला मुख्यमंत्र्यांना अहवाल द्यायचा आहे.


अनुपला शेवटचे पाहीले होते विकास देसाईने। तो अनुपचा लहानपणापासूनचा मित्र होता. एका खाजगी कंपनीत नुकताच कामाला लागला होता. अनुप त्याच्याहुन एक वर्ष लहान होता. दोघेही कंपनीच्या वसाहतीत आपल्या आई-वडीलांसोबत रहात होते. मी अनुपला बघताच ठरवले की हा मुलगा innocent आहे. अनेक वर्ष या खात्यात नोकरी करून आमची नजर तयार झालेली असते. 'त्या' दिवशी ते दोघे रोजच्या सारखेच वसाहतीतील क्लब मध्ये खेळायला गेले होते. रात्री नउ वाजता क्लब बंद झाल्यावर ते घरी परत यायला निघाले. रस्ता तसा ओसाडच आहे, कारण क्लब वस्तीच्या पार टोकाला आहे. बाजूला लागूनच रेल्वे लाईन आहे. बोलत बोलत चालले असते अचानक विकासला जाणवले की आपण एकटेच बडबडत चाललो आहेत, अनुप आपल्या सोबत नाही आहे. त्याला आधी वाटले, तो क्लबमध्ये परत फीरला असेल पण क्लब तर बंदच होता. कोठे गायब झाला काही कळलेच नाही. असेल गंमत करत असे वाटून तो घरी पोचला. दोघेही एकाच इमारतीत रहात होते. पहील्या आणि दूसर्या मजल्यावर. रात्री थोडे उशीरा अनुप घरी आला आहे का याची चौकशी करायला विकास बाहेर पडणार तोच अनुपची आईच त्याच्या घरी आली. अनुप घरी आलेला नव्हता तर. बरीच चौकशी करून रात्री उशीरा तक्रार दाखल झाली. त्या नंतर आठवडा भराने अनुपच्या वडीलांनी पत्रकार परीषद घेउन, जी त्यांच्याच समाजाने आयोजित केली होती, आरोप केला की अनुपचा खून विकासनेच केलेला आहे व मृतदेह सुद्धा गायब केला आहे. पोलीस पैसे खाउन हे प्रकरण दाबत आहेत. खूनी विकास मोकळा फीरतो आहे त्याला अटक करून त्याची चौकशी व्हावी. मग मी त्या क्लबमध्ये गेलो. तिकडे समजले की दोघे अगदी जानी मित्र होते, त्यांच्यात त्याच दिवशी सोडाच, आधीही कधी भांडण झाले नव्हते. तसे अनुपच्या मानाने विकास फारच किरकोळ होता व मारामारी झाली असते तरी अनुपला ठार मारून त्याचा मृतदेह विकास नष्ट करणे निव्वळ अशक्य होते. दोघांचे कसले प्रेम-प्रकरण पण नव्हते. त्या घटनेनंतर बेवारसी मृतदेह मिळाले पण ते अनुपचे नव्हतेच. पण अनुप बेपत्ता होता व त्याला शेवटचे पाहणारा विकासच होता. मी विकासला नाईलाजाने अटक केली. पण त्याला थर्ड डीग्री दाखवायची खरच काही गरज नव्हती. पण माझ्यावरचा दबाव वाढत गेला, राजकारण आले की आम्ही तर काय करणार. चांगले पोस्टींग सोडून गडचिरोलीला बदली करून घ्यायची मला का हौस होती. मी विकासला सात दिवसाच्या रीमांडवर 'आत' घेतले. पोलीसी खाक्या वापरून सुद्धा तो काही बोलला नाही. मी मात्र खोटेनाटे पुरावे देत त्याचा रीमांड वाढवत राहीलो. पण त्याच्या नजरेला नजर मी कधीच देउ शकलो नाही. स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी मी हे करत होतो. वातावरण थंड होण्याची वाट बघत होतो, तसाही ३० दिवसाच्या वर रीमांड मिळत नाहीच, तो आपोआपच जामिनावर सूटला असता.अचानक काळे वकीलांनी त्याचे वकीलपत्र घेतले. त्यांच्यावर पण हल्ला झाला, त्यांनी वकीलपत्र घेउ नये म्हणून निदर्शने झाली. पण ते हटले नाहीत. माझ्याशी अनेकवेळा ते या केस संदर्भात बोलले. मी त्यांना काय सांगणार होतो की तो निर्दोषच आहे पण माझे हात बांधलेले आहेत ते ? एव्हाना विकास विरूद्ध कोणताही पुरावा नाही हे पेपरात छापून आले होते, आता तो जामिनावर मोकळा होणार हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ होते. राजकारणाने आता मात्र कहर केला, मोर्चे, निदर्शने, निवेदने यांनी कळस गाठला. रोजचे काम करणे अशक्य झाले. आणि त्यातच वरून फोन आला, काहीही करा पण विकासला अडकवा, तो जर उद्या जामिनावर सूटला तर तुमची बदली गडचिरोलीला करू.


आता मात्र माझा धीर संपला, मती भ्रष्ट झाली। रात्री अकरा वाजता मी विकासच्या कोठडीत शिरलो. सोबत दोन हवालदार. काय करायचे ते आधीच ठरले होते. दोघांनी विकासचे हातपाय धरले. त्याच्या कोठडीच्या हूकावर फास लटकवला. त्याला स्टूलावर उभे करून त्याच्या गळ्यात फास अडकवला. त्याचवेळी मला मोबाइलवर sms आल्याची सूचना मिळाली. स्टूल ढकलून आम्ही सगळे कोठडीबाहेर पडलो. मी माझ्या खुर्चीत बसून sms open केला. तो काळे वकीलांचा होता, त्यात फक्त "he is innocent" एवढाच मजकूर होता. मी ताबडतोब विकासची कोठडी गाठली, पण तो पर्यंत त्याचे प्राण गेलेले होते. आत्महत्येचा बनाव आम्ही सहज पार पाडला. पण माझे मन मला खात होते. मी 'आत्महत्येची' खबर देण्यासाठी काळे वकीलांना फोन लावला, पण ते फोन घेत नव्हते. दूसर्या दिवशीही ते आले नाहीत तेव्हा मी चमकलो. तिसर्या दिवशी त्यांच्या घरी गेलो तर घरचे ही काळजीत पडले होते, कारण ते घरी आलेच नव्हते. मी मोबाईल कंपनीशी संपर्क साधून काळ्यांच्या मोबाईल वरून आलेला शेवटचा कॉल, संदेश कोणत्या भागातुन आला असेल हे शोधायला सांगितले. मला रात्री आठ वाजता कळले की तो भाग साधारणपणे क्लबच्या आसपासचा असावा. आता त्यांचा नंबर लावल्यावर "out of coverage area or switched off" असा मेसेज मिळत होता. त्या रस्त्यावर मी जीप उभी केली व चालत चालत काही माग मिळतो का हे पाहू लागलो. अचानक मला आठवले, अनुपला पाय आपटत चालायची सवय होती, ही माहीती विकासने काळे वकीलांना दिली होती. नकळत मी पाय आपटला तो एका मॅनहोलच्या झाकणावरच . लोखंडी झाकण गरकन फीरले, तोल जाउन मी गटारात ओढला गेलो. माझ्या मोठ्या पोटाने मला थेट आत पडू दिले नव्हते. गाडीचा चालक चटकन खाली उतरला व त्याने मला बाहेर काढले. मग मी रस्सी मागवुन त्या गटारात सावकाश उतरलो. एका हूकात अडकवून ठेवलेला मोबाईल मला सापडला. अर्थात त्याची बॅटरी डाउन झालेली होती. अनुपही असाच मेला होता. त्याने गटारावर पाय आपटताच, ते त्याला आत घेउन परत बंद झाले होते. अंडाकृती झाकण एका रींग भोवती फिरवून बघा, तुम्हाला काय झाले असेल त्याचा अंदाज बांधता येईल. बोलत बोलत विकास पुढे गेला होता. झाकणाचा आवाज त्याला कळलाही नसेल आणि अनुप गडप झाला असणार. झाकण गरकन फिरुन परत जाग्यावर बसल्यामुळे तो गटारात पडला अशी विकास काय कोणालाच शंका यायचे कारण नव्हते. त्या रस्त्यावर तेव्हा हे बघणारे आणि कोणी असण्याची शक्यताही नव्हती. काळे वकीलही असेच मेले होते, पण लगेच नाही. त्यांना थोडा वेळ मिळाला असणार, त्या वेळात त्यांनी एक sms धाडला असणार. उचंदन केंद्राचे काम ओहोटी लागली की चालू होते, मग मैला मिश्रीत पाणी तूफान वेगाने समुद्रात ढकलले जाते, त्यात ते दोघेही वाहुन गेले असणार, त्यांची प्रेते कोणत्यातरी किनार्याला लागली असतीलच, पण त्यांची ओळख पटवणे निव्वळ अशक्यच.


अजून एक, अगदी राहवत नाही म्हणून नमूद करतो, त्या दिवशी मी सुद्धा मेलोच असतो जर मला माझ्या चालकाने पडताना पाहीले नसते तर व माझ्या सूटलेल्या पोटाने मला थोपवले नसते तर। पण मी ज्या वेगाने गटारात ओढलो गेलो, त्या मागे एखादी अमानवी शक्ती असावी असे मला राहून राहून वाटते. त्या मॅनहोलचे झाकण बदलावे पण तिथे काही गूढ, अघोरी असे काही असेल का याचाही शोध घेतला जावा.


आता हे सर्व कळल्यावर माझ्या जगण्याला खरच काही अर्थ उरला असता का ? हे पत्र मिळताच विकास निर्दोष असल्याचे खात्याने जाहीर करावे, बिचार्याला आपल्या सडलेल्या यंत्रणेने जिवंतपणी न्याय मिळाला नाही, मेल्यावर तरी त्याच्या कपाळावरचा 'संशयीत खूनी' हा शिक्का मिटावा।


शक्य असल्यास विकासच्या घरच्यांनी मला क्षमा करावी, आणखीन मी काय करू शकतो ?

1 टिप्पणी:

VIVEK TAVATE म्हणाले...

छान चालले आहे.असेच लिहीत रहा.आम्हाला चागल्या गोष्टी वाचण्यास मिळतात.