सोमवार, ९ जानेवारी, २०१२

जेव्हा गाढवच गीता वाचते !

गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता ! अशी एक मराठी म्हण आहे. कालचा गोंधळ बराच बरा होता असे म्हणायची वेळ मेघनाद देसाई नामक गाढवाने आणली आहे ! या गाढवापुढे कोणी गीता वाचली नाही तर त्याने स्वत:च ती वाचली आहे ! नुसती वाचली नाही तर तिचे सार पण त्यांना समजले आहे ! गीतेचे सार काय तर “प्रत्येकाने मैदानात यावे व एकमेकांना मारून टाकावे” ! गीतेने कर्मयोग सांगितला की ज्ञानयोग हे अनेक विद्वांना हयात घालवूनही समजले नाही ! त्यासाठी अनेक ग्रंथाची रचना झाली. जवळ जवळ प्रत्येक भाषेत गीतेचे भाषांतर झाले आहे. हिंदूच नव्हे तर अनेक धर्माच्या लोकांनी गीतेचा अभ्यास केला आहे व गीतेमुळे आपल्या आयुष्याला दिशा मिळाली असे नमूद केले आहे. मेघनाद देसाई यांनी मात्र या सगळ्यांवर कडी केली आहे. गीता हिंसाचाराला महत्व देते, युद्धाचा प्रचार करते असा जावईशोध त्यांनी लावला आहे. बरे या संशोधनाचा वापर त्यांनी केला आहे तो महात्मा गांधीच्या अहिंसकपणाला आव्हान देण्यासाठी ! गांधीजी भगवत्गीतेला मानत, गीता हिंसेचा प्रसार करते , मग गांधीजी अहिंसक कसे ? असा प्रश्न मेघनाद देसाईंना पडला आहे.

मेघनाद देसाईंनी कोणा गाढवाकडून गीता शिकली याचा काही सकाळच्या (८/१/२०१२) बातमीत उल्लेख नाही तेव्हा या गाढवानेच गीता वाचली व थेट ती युद्धखोरांचे बायबल असल्याचा शिक्का मारून मोकळे झाले ! कदाचित हे त्यांचे संशोधन वाचूनच सैबेरीयात गीतेवर बंदी घालायची मागणी पुढे आली असावी.

मुळात गीतेतील विचार कोणाचा ? महाभारतीतल कृष्णाचा ? नाही. ती जरी लिहिली गणपतीने तरी त्याला ती डीक्टेट करीत होते महर्षि व्यास ! अनेक विद्वानांना गीता घुसडलेली वाटते. अनेकांना कृष्ण व अर्जुन नुसते निमित्तमात्र आहेत, जगद्गुरू व्यासांनी गीता , जी वेदांचे सार आहे, सामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांची योजना केली आहे. ऐन युद्धात असा काही प्रसंग घडला असेल असे संभवत नाही. आचार्य विनोबा भावे यांनासुद्धा तेच वाटते. गीतेच्या निमित्ताने व्यासांनी वैदीक तत्वज्ञानाचे सार सादर केले आहे. आत्म्याची अमरता, स्वधर्माप्रमाणे कर्माचरण, कर्म करताना फळाची अपेक्षा न ठेवता उत्तम कर्म करणे, व हे सर्व अभ्यासाने व संयमाने साध्य होते. देव मुर्तीतच नाही तर निसर्गात जे जे भव्य-दिव्य, उद्दात्त आहे अशा सर्व ठीकाणी आहे हे ही सांगितले आहे. एक तर माझ्यावर सर्व सोपवून निर्धास्त रहा किंवा जी जबाबदारी तुमच्यावर आहे ती उत्तम प्रकारे पार पाडा, बाकी काय ते मी बघून घेतो अशी हमी दिलेली आहे ! अशी गीतेची सरळ साधी शिकवण आहे. गीतेत हिंदू हा शब्द कोठेही नाही ! ही शिकवण समस्त मानवजातीसाठी आहे.

महाभारतात गीता घुसडण्यासाठी सुह्रदांना बघून अर्जुन शोकाकुल होतो, त्याचे धनुष्य गळून पडते, मेलो तरी चालेल पण स्वकीयांना मारून मिळणारे राज्य नको असे तो बोलू लागतो, असा प्रसंग केला गेला आहे. युद्धाला तो घाबरत असावा असे समजून कृष्ण त्याला गांडू अशी शिवी हासडतो पण अर्जून त्याला भीक घालत नाही व कृष्णालाच पट्टी पढवू लागतो तेव्हा त्याचा मोह नष्ट करण्यासाठी कृष्ण गीता सांगायला सुरवात करतो असा तो सगळा सीन आहे ! गीतेत जे काही करायचे ते समजून उमजून, पुर्ण ज्ञान प्राप्त करून करा असेही सांगितले आहे. “सम्यक विचार करून काय तो निर्णय घे “ असे कृष्णाने अर्जुनाला समजाविले आहे. युद्ध कर असे थेट सुरवातीला सांगितले असले तरी सगळा उपदेश करून झाल्यावर मात्र “तुला पटेल तसे कर” अशी मुभा त्याला दिलेली आहे. अर्जुनाने त्याचा सोयिस्कर अर्थ काढून युद्ध केले, ते जिंकले व त्यानंतर राज्यपद सुद्धा अगदी म्हातारा होइपर्यंत भोगले ! आता अर्जुनाला सुद्धा गीता समजली नाही असा याचा अर्थ काढायचा का ? खरेच जर त्याला संन्यासी व्हायचे होते तर युद्ध जिंकायचे कार्य सिद्ध झाल्यावर त्याला संन्यास घ्यायला कोणी अडविले होते ? या सर्वांवर कळस म्हणजे कृष्णाच्या परीवाराला द्वारकेवरून परत आणायच्या वेळचा आहे ! कृष्णाने देह सोडल्यावर अर्जुनाला निरोप देताना आपली अंतिम इच्छा कळविली होती. ती म्हणजे द्वारका आता नाश पावणार आहे, यादव कुलच नष्ट होणार आहे तेव्हा माझ्या परिवाराला इंद्रप्रस्थाला घेवून ये ! आपल्या जिवलग मित्राची ही अंतिम इच्छासुद्धा अर्जुनाला पुर्ण करता आली नाही. द्वारकेवरून इंद्रप्रस्थाकडे वाटेवर चोरा-टोरांनी त्यांच्यावर हल्ले केले. मित्र शोकाने व्याकूळ झालेल्या अर्जुनाला राज-परिवाराचे रक्षणही करता आले नाही ! साक्षात कृष्णाकडून गीता ऐकलेल्या अर्जुनाची अशी संभ्रमावस्था झाली असती का ? तेव्हा अर्जुन व कृष्ण हे निमित्तमात्र होते ! तेव्हा हिंसा कर म्हणून गीता सांगितली गेली या दाव्यात काही अर्थच राहत नाही.

मेघनाद देसाई या गाढवाला नक्की काय सिद्ध करायचे आहे ? गांधीची अहिंसेवरील निष्ठा संशयास्पद होती हे की गीता हिंसेचा संदेश देते हे ? या दोन्ही गोष्टींची अजब गुंफण करून या गाढवाने भलतेच तर्कट लढविले आहे !

1 टिप्पणी:

Mumbaicha Raja म्हणाले...

Why no more posts since quite some time?